Skip to main content

सौभाग्य लेणी

Published on शुक्रवार, 22/08/2014
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी नाही.. श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ... तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही .. त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत.. हे माझे सौभाग्य नाही का??... आज मी शांत पणे जीवन जगू शकते..ज्यांनी माझ्या साठी एवढे केले त्याच्या आठवणी मी का काढू.....व त्या आजही सौ सारख्या मंगळसूत्र बांगड्या,घालतात.. कुंकू लावतात... घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...

याद्या 12024
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!

त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.

In reply to by अनुप ढेरे

जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.

रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.

In reply to by खटपट्या

काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(

ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.

मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*

In reply to by संजय क्षीरसागर

पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)

सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.

पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.

ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मूर्ती बुक झालीये का कळायला आजूबाजूला कुणी नम्रपणे उभायं का हे पाहावं लागतं. मालाय समदे नमः

आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.

रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.

अजूनही अशा रुढीवादी वगरै बायका समाजात शिल्लक आहेत हे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली!!

वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.

जगाची रीत म्हणून सौभाग्यलेणी घातली. मग जगाची रीत म्हणून ती उतरवायला काय हरकत आहे? या तो घोडा कहना या चतुर कहना.

In reply to by आदूबाळ

मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?

In reply to by प्यारे१

सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?

In reply to by आदूबाळ

>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.

In reply to by आदूबाळ

त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.

काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:D