तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली. पूर्वी इथे एक फलक लावलेला असायचा,"वेतोबा देवस्थानाकडे" असा आताशा तो दिसत नाही.पण हि दोन रस्त्यांची खूण लक्षात राहते.खालच्या रस्त्याने उतरलो कि आपण नारळ पोफळींच्या घनदाट बागांमध्ये शिरतो. झाडांची गर्दी वाढत जाते,पावणा झाडांमध्ये हरवून जातो.पण आपण सरळ चालत राहायचं,रस्ता कधी सोडायचा नाही.काही वेळात समोर उघाड दिसायला लागतो,जीवात जीव येतो.त्या अंधारबनातून बाहेर आल्यावर एकदम हायसं वाटतं.
पण समोर जे दृश्य दिसतं, ते नवीन माणसाला एकदम आश्चर्यचकित करणारं.समोर पसरलेलं अथांग तळं,इतका मोठा जलाशय कि समोरचा काठ दिसताना मारामार. तळयाभोवती तीन ठिकाणी प्रचंड घाट.दगडी पायऱ्यांनी बांधलेले.पिवळ्या दगडांचे ते घाट मावळत्या सूर्याच्या किरणांत जणू सोन्याचेच भासतात.हा घाट मागे पेशव्यांनी कधीतरी बांधला म्हणतात,हा असा दगड कोकणात मिळत नाही, बाहेरून मागवावा लागला.
असो पुढे घाटावर दिसतं ते जुनाट जांभा दगडातलं एक भव्य मंदिर.लांबून त्याच्या फक्त कळस दिसतो, आणि वडाच्या झाडाचा शेंडा.कारण सभोवताली त्याच दगडातली प्रचंड तटबंदी. आपण तळ्याला लागून चालत देवळापर्यंत येतो. देवळासमोर तीन पुरुष उंचीच भव्य महाद्वार दिसतं.तिथूनच दोहो बाजूंनी तटबंदी सुरु होते.महाद्वार्च्या शेजारी दोन कोनाड्यात जय-विजयांच्या भग्न मूर्ती, पण चेहऱ्यावरील भाव अजूनही तसेच,त्यांच्याही कपाळावर शेंदूर माखलेला .महाद्वारातून पुढे आत गेलं कि एक भव्य दगडी फरशीच पटांगण लागतं,मग दिसतो मधोमध पसरलेला एक शेकडो वर्ष जुना वड.आणि चार बाजूंना उंचच उंच दगडी दीपमाळा.आत शिरल्यावर दोन्ही बाजूंनी बांधलेले उंच दगडी ओटे , मध्ये मध्ये त्यावर चढण्याकरता बांधलेल्या पायऱ्या.बहुतेक यात्रेकरूंच्या सोयीसाठी धर्म शाळांसारखे हे बांधकाम असावे, आता तिथे माणसेच काय साधे कुत्रेही दिसत नाही. आत वाघुळंच्या फडफडण्याचा आवाज मात्र येत राहतो. त्या दगडी ओट्यांवर प्रचंड कोरीवकाम, तसेच खांबांवर पण, लढाईतले प्रसंग,राज्याभिषेकाचे क्षण,नागरी जीवन.पण कोकणातला हा असा निर्दयी पाउस झेलून सगळेच गुळगुळीत झालेले, मुर्तींचे नाक,कान, डोळे कशाचाच पत्ता नाही ,सगळे आपले गोल गोल गोटे.वडाखाली मोठा पार,आणि पारालाच टेकून मांडलेल्या वीरगळ,त्यावरही कधीकाळी झालेली पूजा अर्चा,शेंदूर तेल.वडाच्या बुंध्याशी असलेले एक मोठे शिवलिंग.
आता आपण मुख्य देवळापाशी येतो, आणि त्याची भव्यता अजूनच जाणवते आकाशात भिडलेला अप्रतिम नक्षीकाम केलेला कळस,दहा पायऱ्या चढून आपण आत येतो.समोर अतिप्रचंड असा नंदी.आत भरपूर खांब, सगळे कोरीवकामाने नटलेले,खाली गुळगुळीत दगडांची थंडगार फरशी.वर पितळी धातूच्या दोन मोठ्ठ्या घंटा,एकदा वाजवली कि त्या शांततेत बराच वेळ घुमत राहणारा तिचा नाद,मग पावण्यालाच घाबरल्यागत होतं आणि घंटेला हात लाऊन तो आवाज थांबवतो.गाभाऱ्यात जायचे म्हणजे परत चार पायऱ्या खाली उतरायचे,आत मध्ये मिट्ट,अनेक वर्षांचा साठलेला गूढ अंधार,मधोमध उभी असलेली वेतोबाची उंच मूर्ती.बाजूला दोन मोठ्या समया त्यात काठोकाठ भरलेले काळे झालेले तेल,त्यातच बुडालेल्या जाड जाड वाती. दोन समयांचा गाभार्यातला अंधार दूर करण्याची केविलवाणी धडपड,पण गाभाराच एवढा उंच कि समयांचा प्रकाश जेमतेम वेतोबवारच पडतो.काळोख त्याच्या सहस्त्र जिव्हांनी ज्योतीला गडप करण्याच्या बेतात,पण जोवर समईत तेल भरलेलं आहे,त्या टीचभर प्रकाशाचं तो काहीच वाकडं करू शकत नाही.मूर्ती समयांच्या प्रकाशात उजळून निघते.डूईवर दगडी मुकुट. चेहऱ्यावरचे भाव उग्र भरगोस मिशा. मोठ्ठाले बटबटीत डोळे,(जणूकाही भक्तांच्या पापांना जाळण्यासाठीच रोखलेले)भेसूर हास्य,बघताक्षणीच काळजाचा ठोका चुकवणारे.मूर्तीला चार हात, चारही हातात शस्त्र,खड्ग,पायाशी एक दैत्य,डोळ्यात पराजीताचे भाव,वेतोबाचा एक पाय त्याच्या छाताडावर.असा हा युद्धाच्या पवित्र्यातला वेतोबा म्हणजे शंकराचाच अवतार.गाभाऱ्यात दुधाचा,फुलांचा,बेलाच्या पानांचा,समयांच्या भगभगीत धुराचा,आतल्या कोंदट वातावरणाचा असा एक वेगळाच संमिश्र वास.
गाभाऱ्यातून बाहेर आलं कि अचानक मोकळं वाटत,स्वतःला तोंड देणं सर्वात कठीण,वेतोबाची उग्र नजर आठवत राहते,मनातली पापं,भूतकाळ वर नाचायला लागतात. बाहेर तळ्याकडे नजर जाते,सांज उतरू लागलेली असते,मगासचा सोनेरी प्रकाश आता लालसर रंगात बदललेला असतो.तळ्यात पाणी भरपूर,आकाशाच्याच रंगाचं,वर आभाळात रंगोत्सव झाला कि आरश्याप्रमाणे तळ्यात पण बदल होतात.मगाशी सोनेरी रंगात चमचमणारं तळं आता लाल तांबूस होऊन गेलेलं असतं.कोकणात पाउस चिक्कार आभाळ फाटून पाउस बरसायला लागला कि मग चहु बाजूंनी पाण्याचे लोट तळ्यात येउन कोसळू लागतात.सारं तळं लाल पाण्याने ओसंडून वाहू लागतं.घाटाच्या सर्व पायऱ्या पाण्यात बुडून जातात,कधी कधी तर महाद्वारापर्यंत गंगा येते.
देवळाच्या मागे दोन दगडी घरं.एकात जत्रेचा रथ,जेवणाची मोठाली भांडी,नगारे,मृदुंग आणि इतर काहीबाही सामान आणि एकात'तो'राहतो.त्याचे नाव माहित नाही.पण लोकं त्याला गुरव,भट,बामन,बाबा,महाराज अशा कित्येक नावांनी हाक मारतात.उंची चांगलीच उंच पण आता वयोमानानुसार थोडंस पोक आलेलं,खाली स्वच्छ धोतर,खांद्यावर उपरणे,पांढरी शुभ्र दाढी,भेदक नजर असा वेश,तो आहे म्हणून वेतोबाची दिवा बत्ती होते.गावकरी समाधानी आहेत.त्याचा कधीच कुणाला त्रास नसतो.अत्यंत मितभाषी,जेवढ्यास तेवढे,कित्त्येकांना तर तो मुकाच वाटतो.त्याला ओळखणारे आता बहुतेक सगळे वर गेलेले,नवीन पिढीला कोणालाच त्याचा इतिहास माहित नाही,कोणाला जाणून घ्यायची उत्सुकताही नाही.अख्या देवळाची साफसफाई एकटा करतो.दुपारचा नेवैद्य दररोज गावातून येतो.रात्री साठी देवासमोर जमलेल्या तांदळातून खिचडी किंवा खिमट,कधी कुणी दिली तर फळं,दुध.पण हा कधी एका शब्दानेही कुणाकडे काही मागत नाही.पावसाळ्यात तर पंधरा पंधरा दिवस लोक बाहेर सुद्धा पडत नाहीत,हा दुपारी बारा वाजेपर्यंत वाट बघतो,मग स्वता:च खिचडीचा नैवेद्य वेतोबाला दाखवतो.लग्न झाले,मूल झाले किंवा इतर नवस पूर्ण झाले कि लोक वेतोबाला येतात,वेतोबासोबत यालाही नमस्कार चमत्कार होतो हा आकाशाकडे बघून काहीतरी पुटपुटतो.कधी कुणी पंचांग घेऊन मुहूर्त विचारायला येतं,भविष्य पाहायला येतं,ज्याच्या त्याचा भाव,सर्व वेतोबावर सोपवा म्हणतो.
एरवी शांत असणारे देऊळ वर्षातून दोनदा गजबजते. महाशिवरात्र आणि त्रिपुरारी पोर्णिमा.महाशिवरात्रीला तर मोठ्ठी जत्रा असते. आजूबाजूच्या गावातून लोकं येतात. पूजेचा मान अर्थातच याच्याकडे. भल्या पहाटे उठून हा तळ्यावर जातो,गार पाण्यात कमरे एवढा बुडतो.पूर्वेला पाहत मोठ्याने गायत्री म्हणतो,असा खणखणीत आवाज की ऐकतच राहावे,अर्घ्य देऊन झाले कि स्नान आटोपून दोन घागऱ्या पाणी देवळात आणतो,समया सारख्या करतो, त्यांच्या उजेडात वेतोबाला खसखसून अंघोळ घालतो.बाहेर फुलझाडं बहरलेलीच असतात,भरपुर फुल काढतो,टोपलीभरुन बेल निघतो. "ओम नम: शिवाय||" गाभार्याभर याचा आवाज घुमतो.वेतोबाच्या डोक्यावरच बेलाचं पानही थरथरतं,तोवर सुर्योदय होतो,हळु हळु लोक जमायला सुरवात होते.यज्ञ,होमहवन होतात,पंगती उठतात,शेकड्याने माणसं जेउन जातात,त्या गोंधळात हा कुठेच नसतो.तो दुरवर तळ्याकाठी जाउन डोळे मिटुन शांत बसुन राहतो.रात्री भजन,किर्तन दणदणते.गार वार्यावर बाहेर हा शांतपणे किर्तन ऎकत बसतो,कधीतरी मग तिथेच डोळा लागतो.सकाळि जाग येते ती पक्षांच्या किलबिलाटाने,सार्या तळ्यावर धुक्याची चादर पसरलेली असते,कालची सगळी मंडळी परतलेली असतात,देवळाच्या आवारात हा कचरा पडलेला.तो निश्वास टाकतो आणि कोपर्यातला झाडु हातात घेउन देउळ झाडायला घेतो.
त्रिपुरारी पोर्णिमेला मात्र फक्त संध्याकाळी किर्तन आणि मग अभंगांची मॆफिल.हा तेव्हा तसा उत्साहात दिसतो,कारण त्या दिवशी विशेष अशी गर्दी नसते,ठराविक दर्दी मंडळी येतात.थंडीची नुकतीच सुरवात असते,तिन्हीसांज उलटली,चंद्रोदय झाला की हळुहळु हा हातात तेलाची कळशी घेउन दीपमाळेत एक एक दिवा लावायला सुरवात करतो,गावातली जमलेली लोकं,भजनी मंडळ प्रेमाने हा सोहळा पहात बसतं,मग एखाद दोन पोरं उठुन याच्या मदतीला धावतात,तो नाही म्हणत नाही.तासा दोन तासात चारी दिपमाळा दिव्यांनी उजळुन निघतात.स्निग्ध,सोनेरी प्रकाश पार वेतोबाच्या गाभार्यापाशी पोहोचतो,मोठाल्या डोळ्यानी तो ही सारे कॊतुक पहात असतो. कीर्तनाला सुरवात होते, सारे रंगुन जातात.किर्तन संपेस्तोवर चंद्र डोक्यावर येतो त्याच्या मोतीया प्रकाशात तळ चमचमायला लागतं,'हा' स्वतात हरवुन जातो,मग कोणितरी याला बोलावुन आणतं, म्रृदुंगावर थाप पडते आणि हा भानावर येतो.मग रात्रभर भजना अभंगाची मॆफिल उडते,हा बेभान होउन गात राहतो,एकणारे भान विसरुन ऎकत राहतात.कधितरी पहाटे सर्व मंडळी परतात,आणि हा परत अबोल,एकटा उरतो,पहाटेच्या वार्यावर दीपमाळेतला एक एक दीप विझत जातो, तसा याचाही डोळा लागतो.
दिवसांमागुन दिवस उलटतात,वर्षांमागुन वर्ष उलटतात,उन्हाळ्यात तळं आटतं,पावसाळ्यात गर्भार स्त्री सारखं सजतं,हाही पूर्वीसारखाच शांत, अबोल. एकदा मे महीन्यातल्या एका दुपारी चार च्या सुमारास एक लाल गाडी धुळ उडवत येउन थांबते,आतुन दोन माणसं,दोन बायका,एक पाच सहा वर्षाची लहान मुलगी,आणि सर्वात शेवटी एक साधारण साठीची एक स्थुल स्त्री उतरतात हळुहळु ते देवळाजवळ येतात,तसा हा सावरुन बसतो, त्याच्या कपाळावर एक बारीकशी आठी येते,पण दुसर्याच क्षणी परत चेहरा पुर्वी सारखा कोरा होतो.आता त्यांचा आवाजही ऎकु यायला लागतो
"Wow dad,such a wonderful place this is, just look at that pond, its sooooo big? N at this temple its so huge n beautiful, its just awesome... dad... thanks àaji... look at this warriors, who are they? "
लहान मुलगी बापाला प्रश्न विचारुन हॆराण करत राहते. बाप मग करवादुन त्या म्हातार्या बाइला सांगतो,आई आता तुच सांग हिला सगळा इतिहास.
" हो आई,काय अप्रतीम जागा आहे,किती सुंदर,किती गुढ" दोन्ही सूना पण पुढे सरसावतात.
"इतिहास...;.. हं..... "नि:श्वास टाकत ती वृद्धा खिन्न पणे हसते.
पण लगेच चटकन सावरुन 'अग खुप मोठा इतिहास आहे बर या जागेचा' या इकडे पायर्यांवर बसुया. सर्व मंडळी तळ्याकाठी बसतात.बराच वेळ गप्पा होतात.हा गाभार्यासमोर बसुन सगळे पहात असतो.मग त्यांची फोटोग्राफी सुरु होते.
वृद्धा हळुहळू चालत आत जाते, दर्शन घेते आणि बाहेर येते, यांची नजरानजर होते, आणि ती दचकतेच.
होय तेच डोळे, तीच ती भेदक, दुसर्याच्या काळजाचा ठाव घेणारी नजर. तिलाही तो लगेच ओळखतो ,तिचे लांब सडक केस,आता रुपेरी झाले असले तरी पण..मोठे मोठे काळे डोळे.... वसु... वसुधा.. तो नकळत बोलुन जातो, आणि ती दचकुन मागे सरकते... इतकी तपं लोटली, पण त्याच्या एका हाकेत सारे अंतर संपले.. एका खांबाचा ती आधार घेते, मन अनेक वर्ष मागे पळते.
तळ्यातली कमळे हक्काने काढुन देणारा माधव, आंबे,बोर,काजु,करवंद,चिंचा आप्पांची नजर चुकवुन देणारा माधव,आपला अभ्यास घेणारा माधव,न कळत्या वयात आपला प्रियकर बनुन आलेला माधव.तळ्यावर होणार्या गाठीभेटी,वेतोबाच्या साक्षिने घेतलेल्या सात जन्मांच्या शपथा,मग नंतर आप्पांच्या कानावर आलेली बातमी,अख्खा गावासमोर माधवाने खाल्लेला बेदम मार.मग झालेली ताटातूट,मग त्याला लिहीलेली चिठठी.
"त्रिपुरा पॊर्णिमेला देवळाबाहेर भेट, कीर्तन सुरु असेल,कोणाचचं लक्ष नसेल आपण पळुन जाउ. मी येइपर्यंत देउळ सोडुन जाउ नकोस. हीच शेवटची संधी असेल. तुला तुझ्या वेतोबाची शपथ, मी येइ पर्यंत तिथेच रहा....."
तिला हे आठवुन गरगरायला लागतं.... ती त्या पौर्णिमेला पोचुच शकत नाही. आप्पा सकाळीच तिला रत्नाग्रीला मामाकडे जबरदस्ती पाठवतात.नंतर तिथुन मुंबई, मग सगळं आयुष्यच बदलतं,तिचं लग्न होतं,काळ तिला विसरायला लावतो,मग पुढे तिच माहेर रत्नाग्रीला हलतं,आणी गावचा संबध कायमचा संपतोच. ती आज इतक्या वर्षांनी इथे येते, आणि नेमका हा समोर..
तु.... तु... इथे कसा?
मी इथेच असतो , वेतोबाची शपथ आहे मला..
वचन दिलय मी.......
त्या सरत्या संध्याकाळी ते देउळ,तो वड,ते तळं,मोठ्या डोळ्यांचा वेतोबा सगळे डोळ्यांसमोर फेर धरायला लागतात, ती चक्कर येउन कोसळते, हा आधार द्यायला पुढे धावतो. तोवर मुलही येतात.
बाईना चक्कर आली. थांबा मी पाणी घेउन येतो, म्हणत तो धावतो.
आई, उठा ना, डोळे उघडा.. सुना घाबरतात.
"तुम्हाला सांगत होते,आईना दिवसभर दगदग झालीये तरी तुम्ही ऎकाल तर,उद्या आलो असतो तरी चाललं असतं..."
"अग मी पण तेच म्हणत होतो, पण आई ऎकेल तर ना.. जाउंदे आपण घरी जाउन बोलु."
तोवर तो पाणी घेउन येतो,थोड्याच वेळात ती सावरते.मुलं त्याचे आभार मानतात. हळुहळु हाताला धरुन तीला गाडीत बसवतात. जाताना ती याच्याकडे पाहते, नजरेत माफिची विनवणी असते.. पण याला खरा प्रकार तेव्हाच समजलेला असतो,तिची झालेली फरफट तो चांगला ओळखुन असतो,तो हसुन तिला हात दाखवतो.धुरळा उडवत गाडी निघुन जाते.
हा तळ्यावर जातो, पाणी घेउन येतो,समयांच्या उजेडात वेतोबाला छान अभिषेक करतो.फुलांनी सजवतो.मग तेलाची कळशी उचलतो,आणि दीपमाळांपाशी जातो,पुढील दोनेक तासात तो सर्व दीपमाळा प्रज्वलीत करतो, सोनेरी प्रकाशात देउळ उजळुन निघतं,कृतार्तथेने तो वेतोबाला हात जोडतो, तिचा सुखी संसार पाहुन त्याचं मन भरुन येतं
आत जाउन त्याची वळकटी तो आणतो, वेतोबाला साष्टांग नमस्कार घालतो,आणि चालायला लागतो,तळ्याला वळसा घालुन तो सड्यावर पोचतो,गारठा प्रचंड असतो.
"तुझ्या वेतोबाची शपथ, मी येइ पर्यंत तिथेच रहा....." हो वसु आज वचन पुर्ण झाले
शाल पांघरलेली त्याची आकृती अंधारात दिसेनाशी होते.
दीप माळेतले दिवे वाऱ्यावर भिरभिर्तायेत
वेतोबा तसाच उभाय.. मोठ्या डोळ्यांनी समोर बघत..
समाप्त
प्रतिक्रिया
10 Nov 2013 - 10:51 pm | जेपी
पार चटका लावुन गेल
10 Nov 2013 - 10:55 pm | वडापाव
चांगली कथा आहे.
10 Nov 2013 - 11:06 pm | मेघवेडा
वातावरणनिर्मिती छान. आवडली आटोपशीर कथा.
जाता जाता : जरा शुले (मोजक्याच चुका आहेत, पण आहेत) आणि विरामचिन्हांचं बघा काहीतरी. :)
10 Nov 2013 - 11:13 pm | शिद
एका दमात वाचुन काढली.
10 Nov 2013 - 11:31 pm | उगा काहितरीच
+1
Awesome...
10 Nov 2013 - 11:45 pm | आतिवास
कथा आवडली.
11 Nov 2013 - 12:26 am | कवितानागेश
सुंदर. कथा वाचताना प्रत्यक्ष पाहात असल्याचा भास होतोय ..
11 Nov 2013 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
11 Nov 2013 - 1:12 am | बॅटमॅन
वर्णन जब्राट चित्रदर्शी आहे रे स्पांडू. मस्त आवडली कथा.
11 Nov 2013 - 1:40 am | अत्रुप्त आत्मा
अवतरले... अवतरले...! बय्राच कालावधि नंतर भयकथाकार स्पान डुब्बा अवतरले! ;-)
11 Nov 2013 - 1:54 am | प्रभाकर पेठकर
अत्तिशय म्हणजे अत्तिशय आवडली कथा. अनपेक्षित कलाटण्या, पण वास्तवापासून अजिबात दूर न जाता, 'वचन' ह्या शिर्षकाशी प्रामाणिक राहात केलेला, हृदयस्पर्शी शेवट हा तर कथेचा अत्युच्य बिंदू म्हणावा असा.
ह्या दोन परिच्छेदात 'त्याचं' पूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहते.
एक सुंदर कथा. अभिनंदन.
11 Nov 2013 - 2:06 am | बहुगुणी
कथाबीजही आवडलं. कथा छानच फुलवली आहे, आणि तशीच वेळेत आटोपतीही घेतली. Almost perfect!
11 Nov 2013 - 2:16 am | आदूबाळ
वातावरणनिर्मिती अप्रतिम! सुंदर कथा
11 Nov 2013 - 4:03 am | स्पंदना
मिपावर स्वागत! ;)
कशी रसाळ कहाणी! किती मनाला भिडणारे साधेसेच वर्णन! अन त्यातुन गुंफलेली एक नाजुक नात्याची कहाणी.....
सुरेख! स्पां सुरेख.
11 Nov 2013 - 9:13 am | मुक्त विहारि
मस्तच
11 Nov 2013 - 9:26 am | प्रचेतस
अतिशय आवडली कथा.
शब्दरचना अतिशय सुरेख आणि प्रत्यकारी.
11 Nov 2013 - 9:28 am | यशोधरा
अतिशय आवडली कथा.
11 Nov 2013 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
वा स्पांडोबा वा, मस्तच. अतिशय आवडली तुमची गोष्ट.
वातावरण निर्मीती तर झकास, एखादी भयकथा असेल असे गृहित धरुन वाचायला सुरुवात केली होती. शेवटी पोचेपर्यंत आता घाबरवेल, पुढे घाबरवेल असे वाटत होते.
मांडणी, वातावरण निर्मीती, लेखन शैली यांना १०० पैकी १०० गुण.
11 Nov 2013 - 4:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!!
11 Nov 2013 - 10:28 am | हासिनी
अगदी सुरेख....मांडणी जबराट!!
:)
लिहीत रहा. :)
11 Nov 2013 - 12:14 pm | सूड
अतिशय छान !! शेवट चटका लावून गेला.
ते वर मेवे काय म्हनतंय तिकडं लक्ष द्या म्हंजी झालं!!
11 Nov 2013 - 12:27 pm | मन१
भारी रे भो
11 Nov 2013 - 1:15 pm | जोशी 'ले'
मस्त रे ...पुर्वार्धातील पहिल्याच पॅरा मधील वातावरणनिर्मिती मुळे कथा आपल्या समोरच घडतेय असे वाटु लागते,
क्या बात ..क्याबात..
11 Nov 2013 - 1:17 pm | सुधीर
डोळ्यासमोर चित्र उभ राहिलं. बाकी कथेवरून सुरेश भटांच्या एका गझलेमधली ओळं आठवली. "एकाच शब्दासाठी उभे आयुष्य तारण राहीले"
11 Nov 2013 - 1:22 pm | होकाका
खूप छान. "र्या" जरा कठीण वाटले स्विकारायला. पण कथा सुंदर.
र्या (shift + r + ya)
11 Nov 2013 - 1:31 pm | जोशी 'ले'
टॅब/बोल्या वर टाईप केलं असावं त्यात 'र्या' र्या असाच येतो :_(
11 Nov 2013 - 2:15 pm | स्पा
:(
11 Nov 2013 - 2:58 pm | प्यारे१
अप्रतिम खिळवून ठेवणारी शैली.
राहून राहून कुठल्यातरी थोर लेखकाची आठवण करुन देणारी. असं कुणाचं तरी वाचलंय असं जाणवून देणारी.
(तुलना थोरवीसाठी आहे, उणीव दाखवण्यासाठी नाही.)
बाकी थोडंसं शुद्धलेखन वाढायला हवं.
एकदा लिहून झाल्यावर शांत वाचलंस तर जमेल!
(मात्रा, वेलांट्या, उकार) नि
टिपिकल प्यारे मोड> त्रिपुर नावाच्या असुराचा नाश करणारा त्याचा वैरी म्हणून शंकराला 'त्रिपुरारि' असं म्हणतात. तो असुरवधाचा दिवस साजरा करायचा म्हणून त्रिपुरारि पौर्णिमा < प्यारे मोड ;)
11 Nov 2013 - 3:01 pm | सूड
+१ प्यारे.
11 Nov 2013 - 3:19 pm | प्यारे१
'अरि' ला पहिली वेलांटी असते ना?
कृष्णाचं नाव 'मुरारि'.
मला वाटतं 'हरि' मध्ये पण पहिलीच वेलांटी.
उच्चार करुन पाहिलं पहिलीच असावी.
मराठी तज्ज्ञ धनंजय रावांना बोलवा. अन्यथा संस्कृत तज्ज्ञ बॅटमॅन आहेच. ;)
11 Nov 2013 - 3:30 pm | बॅटमॅन
या सर्व उदाहरणांत र्हस्व वेलांटीच आहे संस्कृतनुसार, मराठीत मात्र बहुतेकवेळा मूळ र्हस्वाची लिहिताना दीर्घ वेलांटी होते. अर्थात उच्चारात फार कै फरक आपण करत नै. पण आदतसे मजबूर झाल्याने अशी र्हस्व वेलांटी पाहिले की ऑड वाटते खरे.
11 Nov 2013 - 3:12 pm | स्पा
धन्स प्यारे काका
करतो बदल :)
शु.ले च्या चुका आहेतच,पण या गुगल ने मराठी टायपिंग चे "मेघ" वर्जन आणल्यापासून हे असे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. मला ग म भ न वापरता येत नाही
शिवाय पूर्वपरीक्षण मध्ये एक आणि प्रकाशित झाल्यावर वेगळच दिसतं :(
11 Nov 2013 - 4:28 pm | अग्निकोल्हा
छान लिहलय!
कथेची अशी थर्ड पर्सन परस्पेकटिव मांडणी मध्यंतरी जिवंन्भाऊ कडुन एका कथेत मध्यंतरी वाचली पण ओळख मात्र फाफेकार भागवतान्नी केलि.
11 Nov 2013 - 4:29 pm | अनुप ढेरे
कमाल !!
11 Nov 2013 - 4:31 pm | सस्नेह
सुरेख तपशील अन वेधक मांडणी.
कथानक असे काही नसूनही खिळवून ठेवले.
11 Nov 2013 - 4:57 pm | जयनीत
खुपच ओघवते लेखन.
11 Nov 2013 - 5:17 pm | शैलेन्द्र
सुंदर लेखण, चित्रदर्शी :)
11 Nov 2013 - 5:34 pm | कपिलमुनी
अस देऊळ असेल तर बघायला आवडेल :)
जीएच्या आयुष्यात असाच प्रसंग घडला असे वाचल्याचे आठवते (पण नक्की नाही..चुभू द्या-घ्या)..
पळून जाण्याच्या आणाभाका..प्रियकराचे वाट पहाणे - आणि तिचे न येणे !!
12 Nov 2013 - 7:14 pm | किसन शिंदे
मला वाटलं लेखनसन्यास घेतलास कि काय.?! ;-)
त्या जागेचं, मंदिराचं, पुजार्याचं सुंदर वर्णन केलंय.
20 Nov 2013 - 8:33 pm | पैसा
देवळासमोरच्या दीपमाळेसारखं सुरेख मनाला भिडणारं लेखन. सगळं पहावं लागणारा वेतोबाही असहाय झाल्यासारखा वाटला क्षणभर. सगळा परिसर, वेतोबा, गाभार्यातला काळोख अन देऊळ ही सुद्धा अगदी जिवंत पात्रं होऊन आली आहेत. मस्तच! असं लिहिणार असशील तर इतकी वाट बघायची जरूर तयारी आहे!
22 Nov 2013 - 4:58 pm | सौरभ उप्स
मस्त लिहिलय… वाचताना अक्षरशः चित्र डोळ्यासमोर येत… कस काय सुचतं एवढ ब्वा तुम्हाला…. :p
22 Nov 2013 - 6:20 pm | जे.पी.मॉर्गन
बॅट्या म्हणाल्याप्रमाणे एकदम चित्रदर्शी कथा. ते सगळं वातावरण आणि "तो" डोळ्यांसमोर उभा राहिला!
जे.पी.
22 Nov 2013 - 8:35 pm | विकास
वर्णन वाचताना देऊळ आणि सभोवताल डोळ्यासमोर उभा राहीला. कथानक पण मस्तच.
23 Nov 2013 - 12:04 pm | प्रचेतस
जवळपास सर्वांच्याच डोळ्यांपुढे चित्र उभे राहिले इतकी सुरेख वातावरणनिर्मिती आहेच. माझ्याही मन:चक्षुंसमोर कथेतील वातावरण आणायचा प्रयत्न केला, तसे ते आलेही पण तरीही काहीतरी खटकलेच.
अर्थात कथेत उणीवा काढण्याचा प्रयत्न अजिबात नाही. पण मंदिराच्या वर्णनात काही ढोबळ चुका झालेल्या आहेत.
जुन्या मंदिरांना इतकी भव्य महाद्वारे मी तरी कधीच पाहिली नाहीत. सर्वसाधारणपणे जेमतेम वाकून जाता यावे इतक्याच उंचीची प्रवेशद्वारे असतात. भव्य महाद्वारे ही तशी अलीकडची कल्पना.
जय विजय हे मंदिरांच्या तटबंदीतल्या द्वारांमध्ये कधीच कोरलेले नसतात. ते असतात एक तर सभामंडपाच्या प्रवेशद्वारांत अथवा गर्भगृहांच्या दारात.
वेतोबाच्या मंदिरापुढे नंदी कसा आला? वेतोबा म्हणजे भैरवनाथ अथवा काळभैरव. हा वेतोबा जरी शंकराचा अवतार मानला तरी त्यांच्या मंदिरांत नंदी नसतो. मग नंदी इथे असण्याचे कारण काय असावे? तर त्याचा उलगडा कदाचित लेखाच्या ह्या ओळींत होतो.
वडाच्या बुंध्याशी असलेले एक मोठे शिवलिंग.
म्हणजे मूळात पूर्वी गाभार्यात शिवपिंडी असावी. आणि नंतर मूर्तीभञ्जकांच्या हल्यामुळे ती उद्ध्वस्त केल्यामुळे बाहेर ठेवली गेली असावी आणि मग नंतर कधीकाळी गाभार्यात वेतोबाची स्थापना झाली असावी.
चैत्रातल्या उरसाचा उल्लेख कसा काय नाय आला ब्वॉ?
बहुतेक ग्रामदेवतांचे उत्सव चैत्रामध्ये होतात. निदान घाटावरच्या तरी. कोकणातल्या दैवतांचे माहीत नाय ब्वॉ.
बाकी मंदिर परिसर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराशी बराचसा मिळताजुळता आहे असे निरिक्षण नोंदवतो.
तिथेही असंच कोट असलेलं मंदिर, वड, वडाखाली मूर्तींचे भग्नावशेष, वीरगळ असे सर्व काही आहे फक्त नंदी आणि दीपमाळा नाहीत.
23 Nov 2013 - 2:00 pm | पैसा
लेखकाचे कल्पनास्वातंत्र्य म्हणून सोडून द्या हो! =))
बादवे हे बघा आरवलीच्या वेतोबाचे ३ पुरुष उंचीचे प्रवेशद्वार. आणि महाद्वारातले जयविजय.
कोकणात जत्रांचे उत्सव बहुधा पालख्या झाल्यानंतर असतात. म्हणजे शिमग्यानंतर. उरूस मुसलमानांचा. जत्रा हिंदूंच्या.
नंदीच्या बाबत गोव्यात प्रचंड गोंधळ बघायला मिळेल. कारण लोकांनी पोर्तुगीज अत्याचारानंतर ज्या मूर्ती सापडल्या आणि लपवता आल्या त्या कशातरी लपवल्या आणि स्थैर्य मिळाले तशा मग कोणत्याही देवळात नेऊन ठेवल्या. चंद्रेश्वर भूतनाथ हा मुळात शिवगण, नंतर शिव स्वरूपात मानला गेल्याचे एकाने सांगितले. त्या देवळात नंदी आहे. गोव्यात नंदी कुठे बघायला मिळेल याची काही शाश्वती नाही. ओल्ड गोव्याला तर एका नंदीलाच वाटेवरचा देव म्हणून पुजतात. मात्र कोकणात अशा उलथापालथी झाल्या नसाव्यात.
पुरातन ग्रामदैवते ही शंकरापेक्षाही जुनी दैवते होती. त्यांची देवळे अगदी लहान घुमट्या वगैरे स्वरूपात असल्याने आक्रमकांपासून सुरक्षित राहिली आणि नंतरची शंकर आणि कृष्ण, गणपती इ. देवळे मोठी आणि वैभवशाली असल्याने फोडली गेली. कालांतराने अशा रक्षक देवांना शंकराचे अवतार वगैरे समजले गेले. हळूहळू त्यांची देवळे मोठी होत गेली. अशी देवळे सहसा अगदी साध्या घरासारख्या बांधणीची पहायला मिळतात. माझ्या आठवणीत बसणीतल्या महालक्ष्मी, रवळनाथ देवळांवर कौलारू छपरे होती.
23 Nov 2013 - 2:21 pm | प्रचेतस
अहो, लेखकाच्या कल्पनास्वातंत्र्याबद्दल आदर आहेच.
बाकी मी लेखकाने उल्लेखलेल्या प्राचीन मंदिराबद्दल बोलत होतो. तुम्ही जो फोटो दाखवताय ते काम तुलनेने बरेच अलीकडचे आहे. :)
बाकी इथे उरुस हिंदूंच्या जत्रेला पण म्हटले जाते. मुसलमानकाळात रूढ झालेला शब्द आहे तो. उत्सवाचा उरुस झाला. इथे चिंचवडात भैरवनाथाचा उरूस, वडगाव मावळातल्या पोटोबाचा उरुस असे लै फेमस आहेत.
23 Nov 2013 - 2:33 pm | पैसा
आहे ना! पण कथाही आजच्या काळातलीच आहे ना! देवळाचे जीर्णोद्धाराचे काम झाले असेल!! :D
स्पा, तुझ्या बाजूने एवढी उत्तरे दिली. बदल्यात माझ्या लेखाला प्रतिसाद मागत नाहीये. आता पुढची भूतकथा लवकर लिही!
23 Nov 2013 - 3:02 pm | प्रचेतस
=)) =))
कथा आजच्या काळातली असू दे की पण जीर्णोद्धार झालाय किंवा कसे हे लेखकाने कुठेच सुचित केले नाहीये. किंबहुना एकंदरीत लेखनाच्या धाटणीवरून मंदिर अतिशय जुने आहे असाच वाचकाचा ग्रह होतोय. :D
बाकी पुढची भूतकथा लवकर लिही याच्याशी प्रचंड सहमत.
24 Nov 2013 - 2:30 pm | बॅटमॅन
=))
वल्लीचा प्रतिवाद करणे बाकी सोपे नाही ;) प्रतिसाद आवडला. वल्लीच्या मुद्द्यांशीही सहमत आहेच पण उदाहरण एकदम डैरेक्ट दिल्याने मजा वाटली.
25 Nov 2013 - 1:02 am | विश्वनाथ मेहेंदळे
सुंदर कथा. स्पा असे काही लिहू शकतो असे वाटले नव्हते. अर्थगाैरवासाठी भारवी फेमस होता. आता हा पण होणार की काय ??? स्पा, तुला आपल्याकडुन एक पियुष, दादर पेशल ;-)
29 Apr 2015 - 10:45 pm | एक एकटा एकटाच
शेवट खरच चटका लावून गेला.