काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १
काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २
काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग ३
काव्हीकाने.......
१५१७ साली ऑट्टोमन राजा पहिला सलीम याने इजिप्त जिंकल्यावर कॉन्स्टंटटिनोपाल मधे कॉफी आणली. क़ोफीची लोकप्रियता वाढल्यावर ती सिरियामधून दमास्कस व अलेप्पो मधे लोकप्रिय झाली. ते काळ होता १४३० ते १५३२. दमास्कसमधील अनेक काव्हिकाने (कॉफी हाऊस) ही जगभर प्रसिद्ध झाली. त्यातील दोन नावे इतिहासात सापडतात. एकाचे नाव होते कॅफे रोज आणि दुसरे होते कॅफे गेटवे.
सलीम....
जसे कॉफीचे स्थान जनमानसात एक पेय व औषध म्हणून पक्के हो़ऊ लागले तसे त्या शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काही वैद्यांच्या पोटात गोळा उठला. १५२३ साली त्याने आपल्या व्यवसायबंधूंची बैठक बोलाविली आणि सवाल केला, ‘सध्या जे कॉफी नामक पेय एकत्र जमून पिण्याची पद्धत पडली आहे त्या बद्दल आपले काय मत आहे ? ही नुसती डोक्यातच जात नाही तर तिचे काही दुष्परिणामही आहेत. ही सर्रास पिण्यास बंदी आहे, का परवानगी ?’ मोठ्या अक्कल हुशारीने त्याने त्याच्या शेवटच्या प्रश्नात कॉफीवरील बंदीचे सुतोवाच केले होते.
ही बातमी कैरोतील वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अर्थात या चर्चेने कॉफी पिणाऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही. पण या लोकांनी धर्मगुरुंना हाताशी धरुन एक वेगळी चाल खेळली. त्या काळात कॉफी पिण्याच्या जागा मशिदींपेक्षा जास्त लोकप्रिय होत होत्या, जनता एकवेळ मशिदीत जाण्याचे विसरत होती पण कॉफी पिण्याच्या जागा माणसांनी ओसंडून जात होत्या. हे असे काही काळ चालले होते पण १५३४ साली कॉफीविरुद्ध एका मशिदीत एका कडव्या धर्मगुरुने अत्यंत प्रक्षोभक भाषण ठोकले ज्यात त्याने कॉफी पिणे हे कसे मोहम्मदाच्या धर्माविरुद्ध व अल्लाविरुद्ध आहे हे मोठ्या जहाल भाषेत समजाऊन सांगितले. जो कॉफी पितो तो खरा मुसलमान नाही असे म्हणून त्याच भाषणाच्या शेवटी त्याने कॉफी पिण्याच्या जागा उध्वस्त करण्याचे आवाहन केले. झाले. मशिदीतून जसा हा जमाव बाहेर पडला त्याने आपला मोर्चा जवळच असणाऱ्या कॉफीच्या दुकानाकडे वळविला व त्याची नासधूस केली. एवढेच नाही तर त्यात जे लोक कॉफी पीत होते त्यांनाही मारहाण झाली व त्यांचे कपडे फाडण्यात आले व नग्नावस्थेत रस्त्यावर हाकलून देण्यात आले. या घटनेनंतर मात्र शहराची लोकसंख्या दोन गटात विभागली गेली. एक कॉफीच्या विरुद्ध ज्यात कर्मठ लोकांचा भरणा होता तर दुसऱ्यात उदारमतवादी जे कॉफीच्या बाजूने ठाम उभे होते. या सगळ्या वादविवादात कॉफीच्या मदतीस एक देवदूतच आला असे म्हणावे लागेल. तो होता प्रत्यक्ष हा तंटा सोडविणारा मुख्य न्यायाधीश. त्याने या विषयातील तज्ञांना ताबडतोब हजर होण्याचे फर्मान काढले. वैद्यकीय तज्ञांनी आपली बाजू ठामपणे मांडताना याचा निकाल पूर्वीच कैरोमधे लागलेला आहे व आता त्यात कसलाही बदल करण्याचे काही कारण आहे असे वाटत नाही असे प्रतिपादन केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की या कर्मठ मंडळीच्या हिंसक कारवायांना आळा घालायची हीच वेळ आहे. त्या न्यायाधिशाने उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्या समोर कॉफी प्यावी व आपला अनुभव कथन करावा अशी आज्ञा दिली. एवढेच नव्हे तर तो स्वत:ही त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला. हा कार्यक्रम पार पडल्यावर त्याने जाहीर केले की दोन्ही पक्षांमधे आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत. या सगळ्या प्रकरणाचा एक असा फायदा झाला की आता कॉफी थोरामोठ्यांच्या घरादारात पोहोचली व वेगळ्या प्रकारची उच्च दर्जाची कॉफी पिण्याची ठिकाणेही निर्माण होण्यास सुरुवात झाली.
काबाजवळील कॉफीगृह........
कॉन्स्ट्ंटिनोपालमधेही कॉफीच्या वाट्याला हे सर्व आले. काही मूर्ख लोकांचा विरोध, काही कर्मठ धर्मवाद्यांची आदळआपट, पण येथेही अंतीम विजय कॉफीचाच झाला. खरे तर येथे कॉफी १५१७ सालापासूनच माहीत होती पण येथे कॉफीहाऊसची संस्कृती अजून रुजायची होती. १५५४ साली कॉस्टंनटिनोपाल येथे पहिल्या सलीमचा मुलगा गादीवर आला त्याचे नाव होते सॉलिमन. याच्या काळात दमास्कसच्या शम्सी व अलीप्पोच्या एका हकिमाने मिळून पहिली दोन कॉफीहाऊस उघडली. त्यांना तक्तच्लाह या नावाने ओळखले जाई. त्या काळात ती त्यांच्या सजावटीसाठी, आरामदायी बैठकींसाठी अतीशय प्रसिद्ध होती. त्याच्या पेक्षाही ती तेथे मनमोकळेपणाने गप्पा मारता येत असत यासाठी प्रसिद्ध होती. आत शिरण्यासाठी साठी फक्त एक कप कॉफीची किंमत मोजायला लागे. तुर्कांनी ही कॉफीहाऊसची कल्पना उचलून धरली व लवकरच मागणी आणि पुरवठा यात अंतर पडायला लागले. समाजातील सर्व स्तरावर कॉफीची प्रतिष्ठा वाढली. सुलतानाला कॉफी तयार करुन देण्यासाठी एका खास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्याला ते ‘काव्हिजिबाची’ म्हणत. तुर्कानीच कॉफीच्या दुकानांना कावीकाने हे नाव दिले. या काव्हिकानेंची लोकप्रियता अतोनात वाढल्यावर ती जास्त अलिशान झाली व त्यांचा वापर हा उद्योगधंद्यासाठी भेटण्यासाठी हो़ऊ लागला. म्हणजे आत्ताच्या बॅरिस्तासारखा. आता काव्ह्कानेमधे व्यापारी, शिक्षक, विद्वान, त्यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक असलेली तरुण मंडळी, घरंदाज स्त्रिया, देशोदेशीचे राजदूत, सरदार इ. प्रकारची माणसे कॉफीचा आनंद लुटण्यासाठी व गाठीभेटी होतात म्हणून येऊ लागली.
१५७० सालापर्यंत सगळे ठीक चालले होते पण परत एकदा कर्मठ मुल्ला मौलवींच्या लक्षात एक भयानक गोष्ट आली ती म्हणजे मशिदी ओस पडल्या होत्या तर काव्हिकाने ओसंडून वहात होते. परत एकदा कॉफीला त्याच चक्रातून जावे लागले. पण या वेळेस या रंगमंचावर एक असा मुफ्ती अवतरला जो कॉफीचा अत्यंत द्वेष करत असे. त्याने जाहीर केले, ‘मोहम्मदाला कॉफी हे पेयच माहीत नसल्यामुळे त्याची या पेयाला मान्यता असण्याची शक्यताच नव्हती.’ त्याने दुसरे एक मजेदार कारण सांगितले ते म्हणजे कॉफी जाळून त्याचे पेय करतात म्हणजेच त्याचा कोळसा होतो हे कुराणाविरुद्ध आहे. अशी अनेक कारणे देत कॉफीवर परत एकदा बंदी घालण्यात आली. अर्थात या बंदीचे मानापासून स्वागत ती गुप्तपणे तोडून करण्यात आले. कॉफी सर्रास मिळत असे पण दरवाजाआड. १५८० साली अमुराथने जेव्हा कॉफी हे एक मादक पेय आहे त्यामुळे ते पिण्याची परवानगी देता येणार नाही असे जाहीर केले तेव्हा लोक गालातल्या गालात हसले आणि त्यांनी पूर्वीच्याच जोमाने, आवडीने कॉफी पिणे चालू ठेवले. ही बंदी अमलात आणणे अवघड नव्हे अशक्य आहे हे जाणून शेवटी सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचा नाद सोडला. या नंतर आलेल्या मुफ्तीने हे बंदीचे चक्र उलटे फिरवले आणि परत एकदा कॉफीने मोकळा श्वास घेतला. त्यवेळी विशेष आनंदत्सोव वगैरे साजरा झाला नाही कारण कॉफीवर खरी बंदी कधीच नव्हती. कॉफीवर कर बसविण्यात आल्यामुळे त्याकडे आता उत्पन्नाचे साधन म्हणून बघण्यात येऊ लागले.
चवथ्या अमुराथच्या काळात त्याच्या वजिराने, कुप्रिलीने मात्र कॉफीवर कडक बंदी घातली व त्याचे कारण दिले सत्तेविरुद्ध बंड करण्याच्या जागा या पेयामुळे तयार होतात हे. युरोपमधे बरोबर १०० वर्षांनी हेच कारण देऊन कॉफीवर बंदी घालण्यात येणार होती. असो. पण यावेळी बंदी इतकी कडक होती की पहिल्या गुन्ह्यासाठी फटक्यांची शिक्षा होती तर दुसऱ्या गुन्ह्यानंतर पोत्यात घालून समुद्रात बुडविण्यात येत असे. गंमत म्हणजे हा माणूस कुराणाचा हवाला देत कॉफीवर बंदी घालत होता, ती पिणाऱ्यांवर अत्याचार करत होता पण त्याच वेळी त्याच्या राज्यात दारु पिण्यासाठी मात्र मोकळीक होती. कदाचित दारु पिण्यामुळे त्याच्या सत्तेस धोका नसावा. त्या काळातही अन्यायी कायदे राबविणे फार अवघड होते. दारुमुळे माणसे गुंगीत रहात पण कॉफीमुळे त्यांची वाद घालायची इच्छा उफाळून येत असे. गॅलँड म्हणतो, ‘कॉफीने माणसे जोडली जातात...व त्यांच्यामधे संवाद हो़ऊ लागतो....’ कुप्रिलीनेही शेवटी कॉफीवरची बंदी उठविली.
काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की कॉफीचा शोध पर्शियामधे लागला पण त्याला काही पुरावा नाही. अर्थात पर्शियामधे पुरातन काळापासून कॉफी माहीत होती हे निश्चित. पर्शियन राजकारण्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कॉफीचे प्रकरण मोठ्या हुशारीने हाताळले त्यामुळे तेथे संघर्ष झाला नाही. शहा आब्बासच्या बेगमेला जेव्हा गप्पांसाठी, चर्चेसाठी, भेटण्यासाठी कॉफी प्यायली जाते हे उमगले तेव्हा तिने शहाणपणाचा मार्ग अवलंबला. तिने इस्पहानमधे त्या कॉफी पिण्याच्या जागी मुल्लांची नेमणूक केली जे या चर्चांमधून भाग घेत असत व आपले म्हणणे लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असत. हा माणूस हुशार असल्यामुळे चर्चा नेमकी पाहिजे तेथे वळवित असे.
तुर्की कॉफीगृह........
ॲडॅम ऑलिरियस नावाचा एक अधिकारी जर्मन वकिलातीत नोकरी करत होता त्याने या कॉफीहाऊसचे वर्णन लिहून ठेवले आहे. (१५९९) ‘या जागी कवी, लेखक, इतिहासकार एकत्र जमत. त्यांची बसण्याची सोय उंच आसनावर केलेली असे. ते मग चर्चा करत, कहाण्या सांगत, वादविवादही होत असत पण सर्व अत्यंत सभ्यतेने. ‘काविजीबाची’ सर्वांना कॉफी ओतायचे काम करत असत. कार्स्टीन निबुहर नावाचा एक हॅनॉव्हरचा प्रवासी होता त्याने या काव्हिकान्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. (१७५३) तो लिहितो, ‘ हे मोठे सभागृह असे. जमिनीवर उंची गालिचे अंथरलेले असत व रात्री सर्वत्र मंद दिवे ते सभागृह उजाळून टाकत असत. येथे ज्ञानी माणसे भाषणे देत व जनांना शहाणे करायचा प्रयत्न करत. रुस्तुमच्या कहाण्या मोठ्या चविने सांगितल्या जातात. काही गोष्टी रचून सांगितल्या जातात त्यातून पाहिजे तसा अर्थ जमलेली लोक काढत. या गोष्टी सांगताना ते मोठ्या नाट्यमय पद्धतीने त्या सभागृहातून फेरफटका मारत असत. कुठलाही विषय व्यर्ज नसे. मला तर दमास्कसमधील अशी एक जागा माहीत आहे की तेथे विद्वानांना पैसे देऊन आणले जात असे.’
काही कॉफीहाउसमधे नाचणाऱ्या मुली असायच्या तर काहीमधे अरेबियन नाईटसमधील कहाण्या रोज सादर केल्या जायच्या. फार पूर्वी जे पाहुणे नको असायचे त्यांना खराब कॉफी देण्याची पद्धत होती. ती मिळाल्यावर त्यांनी ती जागा सोडून जाणे अपेक्षित असायचे. काहीच काळात जगाच्या त्या भागात असे एकही घर राहिले नाही की जेथे कॉफी प्यायली जात नसे. आलेल्या गेलेल्यांना कॉफी पाजण्याचा रिवाजच पडून गेला. काही घरात कॉफी दोनदा तरी व्ह्याचीच पण कित्येक घरात कॉफी कायम उकळत असे व ती वारंवार पिण्याची पद्धत होती. त्या काळात दिवसात माणशी वीस कप कॉफी सहज खपत असे. भिकारीही कॉफीसाठी पैसे मागत. एका अरेबीक हस्तलिखितात सोळाव्या शतकात कॉफी कशी प्यायली जायची याची हकिकत आली आहे ती देऊन हा भाग येथे संपवतो......
कॉफीने स्वागत........
‘येथे (कॉन्स्टन्टिनोपाल) घरात काही नोकरांची जबाबदारी कॉफीचा सतत पुरवठा कसा होईल ही असते. दिवाणखान्याला जेथे पाहुण्यांची कॉफीने सरबराई केली जात असे त्याची पूर्ण जबाबदारी ज्या माणसावर असे त्याला ‘काव्हिजी’ असे म्हणतात. या माणसाला व त्याच्या नोकरांना स्त्रियांच्या खोल्यांमधूनही मुक्त प्रवेश असतो. याला चांगला पगार व जमिनही दिलेली असते. मालकाच्या नुसत्या खुणेने त्याला कॉफी कोणाला द्यायची हे कळते. कॉफी चांदीच्या किंवा लाकडाच्या ट्रे मधून आणली जाते. त्यात साधारणत: १५ ते २० कॉफीचे बारके कप असतात व हे विशिष्ठ पद्धतीने धरतात’.............
प्रतिक्रिया
20 Jul 2013 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त रंगलेय कॉफीपुराण... लवकर लवकर टाका पुढेचे भाग.
20 Jul 2013 - 10:54 pm | हरिप्रिया_
आवडेश...
येऊ द्या लवकर लवकर
20 Jul 2013 - 11:12 pm | बॅटमॅन
मस्त कॉफीपुराण!!!
20 Jul 2013 - 11:16 pm | बॅटमॅन
बायदवे लेखाच्या दुसर्या परिच्छेदातले १९२३ हे साल चुकले आहे असे वाटते. १५२३ पाहिजे काय?
21 Jul 2013 - 7:31 am | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
21 Jul 2013 - 2:39 am | प्रभाकर पेठकर
मस्तं माहिती मिळते आहे. इथे मस्कत मध्ये पूर्वी 'कॅफेटेरिआ' होते. ज्यात नाश्ता (अल्पोपहार) मिळत असे. माझा ही पूर्वी 'कॅफेटेरिआ'च होता. एके दिवशी महापालिकेने फर्मान काढून सर्व कॅफॅटेरिआंचे नांव बदलून 'कॉफी शॉप' करण्याचे आदेश दिले. अरेबिक मध्ये त्याला 'मख्खा' म्ह्णतात. आता जिथे सर्व खाद्य पदार्थ, शीत पेयं, चहा वगैरे मिळतो त्याला 'कॉफी शॉप' असे संकुचित नांव का द्यायचे हे मला कळेना. पण कायदा म्हणजे कायदा. त्या विरुद्ध कसे जाणार? सर्वांनीच आपापले कॅफॅटेरिआ हे फलक उतरवून 'कॉफी शॉप' अशा नांवाचे फलक दुकानांवर चढवले.
आज त्याचे कारण कळले. 'कॉफी पिण्याची जागा' ह्या मूळ संकल्पनेलाच धरून ठेवून, आता जरी इतर खाद्यपदार्थांनी इथे मानाचे स्थान मिळविले असले, व्यवसायाची दिशा बदललेली असली, तरी मुळात 'कॉफी पिण्याची जागा' ह्या संकल्पनेला अनुषंगुन 'कॉफी शॉप' हे इंग्रजी नांव महापालिकेने स्विकारलेले दिसते आहे.
21 Jul 2013 - 7:34 am | जयंत कुलकर्णी
कॉफीहाऊस, कॉफीशॉप, काव्हिकाने ही नुसती कॉफी पिण्याची ठिकाणे नसावीत ती एक संस्कृतीच (कल्चर) होती..........:-) आनी म्हणूनच बहुदा राज्यकर्त्यांचे तेव्हाही त्यांच्याकडे लक्ष असायचे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ताहे दिसते.........
21 Jul 2013 - 12:16 pm | तिमा
सध्याही क्रांती घडवून आणायची असेल तर काव्हीकाने चालू करावेत.
लेखमाला बुकमार्क योग्य.
21 Jul 2013 - 1:09 pm | चावटमेला
तुमचे लेख म्हणजे माहितीची मेजवानीच असते. पहिल्या दोन भागांप्रमाणेच हा भाग ही छान जमून आलाय. पुभाप्र.
21 Jul 2013 - 5:45 pm | चित्रगुप्त
अतिशय सुंदर, ज्ञानवर्धक लेखमाला.
22 Jul 2013 - 2:12 pm | सौंदाळा
एखाद्या विषयाचा किती सखोल अभ्यास करता येऊ शकतो हेच तुमचे सर्व लेख वाचुन समजते.
छानच चालु आहे मालिका. वाचतोय..
19 Aug 2013 - 7:11 pm | चाफा
हातात कॉफीचा कप घेताना त्याच्या मागे इतका ईतिहास असेल असं वाटलंच नव्हतं, धन्यवाद जयंत कुलकर्णी
19 Aug 2013 - 7:27 pm | अनिरुद्ध प
पु भा प्र.
1 Feb 2020 - 4:33 pm | महासंग्राम
पु भा प्र.
2 Feb 2020 - 7:54 pm | सुधीर कांदळकर
लेख. वाचायला मजा आली. राज्यकर्ते वा धर्ममार्तंड वि. जनमत हा परंपरागत चालत आलेला निरंतर सामना मस्त रेखाटला आहे.
हे वाचून बरे वाटले. साठसत्तर चर्षांपूर्वी मुंबईतले विचारवंत, कलावंत, साहित्यिक इ. मंडळी इराण्याच्या हॉटेलमध्ये जमत आणि मैफिल जमवीत.
मस्त लेखाबद्दल जयंतरावांना आणि लेख वर काढणारांना धन्यवाद.