भाग १ :- http://www.misalpav.com/node/24523
वत्सला बाई संपलेला दुधाचा ग्लास घेऊन औषध आणायला बाहेर गेल्या.. ती हि थोडीशी मागे सरकली, तेवढ्यात आत्त्याने झपाट्याने पुढे सरकून तिचा हात दाबला.. " माझं घर आहे, तू.... निघून जा.. घर पाहावे बांधून ... घर निघून जा .. तुला पाहावे बांधून .... मला नाय जायचं .. बांधून टाकेन .. सगळ्यांना बांधेन ..माझं घर .. माझं घर माझ घर .. तोंडातल्या बोळक्यातून जीभ वळवळत होती, तोंडावरच्या शिरा ताणल्या गेलेल्या होत्या.. अत्त्या जवळजवळ सरकत होती
ती जोरात ओरडून कशीबशी बाहेर आली. आत्त्या बोळक्या तोंडाने हसत होती.
एका आठवड्यानंतर
अजूनही त्या घराशी तिला जुळवता आलेलं नव्हतं,निखील नीलिमा अमेरिकेत जाऊन आठवडा उलटला होता,रोज दोघांचाही न चुकता फोन असायचाच.तिचा दिनक्रमही आता ठरलेला होता.सकाळी उठलं कि आंघोळ आटपून आत्त्याकडे बसायचं (एक गोष्ट तिने कटाक्षाने पाळलेली होती, नजरेला नजर द्यायची नाही. अत्त्या नेहमीसारखीच तिच्याकडे टक लाऊन पहायची).वत्सला बाई रात्रभर असायच्या, त्या सकाळी घरी जायच्या. तोपर्यंत स्वयंपाकीण बाई यायच्या. बाहेर गडी असायचेच, बंगल्याची साफसफाई, बाहेरची जी पडतील ती काम ते दोघे करायचे.आत्त्याची भयानक बडबड मात्र तिला सहन व्हायची नाही.डोकंउठून जायचं, एक मिनिटही ती बाई उसंत घ्यायची नाही, घोगरा,भयाण आवाज. ती बाजूच्या खोलीत असली तरी तिला ऐकू येत राहायचा.
खाली दिवाणखान्यात प्रचंड उंचीची दोन शिसवी कपाटं होती, आणि ती संपूर्ण पुस्तकांनी भरलेली होती. तिला वाचनाची भयंकर आवड त्यामुळे ती हरखून गेलेली होती, जवळपास सर्वच विषयांवरची पुस्तकं खचाखच भरलेली होती.त्यातली पुस्तकं ती खोलीत घेऊन यायची.दुपारपर्यंत वत्सला बाई यायच्या.परत आत्त्याच सर्व करायच्या.पण त्या फारश्या बोलायच्या नाहीत. तीहि तशी अबोलच होती.संध्याकाळी ती बाहेर फेरफटका मारून यायची, संध्याकाळी बाहेर पडलं कि तिला वातावरणातला फरक जाणवायचा. घरात प्रचंड दाबल्यासारखं वाटायचं, भयंकर घुसमट व्हायची. का कोण जाणे.. तसा भरपूर उजेड ,वारा असायचा, पण त्याच्यावरही कोणाची सत्ता असल्यासारखं वाटायचं, उन्हहि उदास वाटायचं.तेच गेटच्या बाहेर पडलं कि अचानक तिला मोकळं वाटायचं, हलकं वाटायचं ती टेकडीवरच्या गणपतीच्या देवळात जाऊन यायची, पार सूर्यास्त होईस्तोवर तिथेच गार वाऱ्यात बसून राहायची, चार लोकं दिसायची, लहान मुलं खेळताना दिसायची, तास दोन तास मजेत जायचे.पण परतीला लागली कि पुन्हा भीती दाटून यायची,
तात्पुरतं दूर झालेलं मळभ पुन्हा अंधारून यायचं. त्या घरात पाउल टाकणं नको असं वाटायचं.पण पर्याय नव्हता तिने जबाबदारी अंगावर घेतलेली होती.संध्याकाळ झाली कि आत्त्याला सांभाळण हे मोठं काम असायचं.तिच्या आरड्याओरड्याला न जुमानता दोघी तिला पकडून कसबस औषध पाजीत. आत्याचे गरगरणारे डोळे पाहून तिला चक्कर आल्यासारखेच होत असे.पण कशीबशी ती स्वतःला सावरून धीर देत असे. रात्र तर संपता संपत नसे.आत्त्याच बरळण सुरूच असे. ती कधीकधी बेड वरून खाली यायचा हिं प्रयत्न करी, वत्सलाबाई तिच्याच खोलीत असल्याने त्याचं लक्ष असे.
आत्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच चाललेली होती, डॉक्टरांनीहि आशा सोडलेली होती. किती दिवस जातील काहीच शक्यता नव्हती, तिने खाण सोडलेलं होतं. फक्त दिवसातून ४ वेळा थोडा थोडा फळांचा रस पोटात जात होता. पण डोळ्यांमधलं भीतीदायकपण वाढतंच होतं, डोळे आता लालसर होऊ लागलेले होते.
कसली तिची इच्छा या घरात राहिलेली होती माहित नाही, पण पुटपुटणं सुरूच असायचं, ‘घल.. फ्वावे बंडून...माज.. घल... सोद्णाल .नाय .. माजये..” आवाज आता पहिल्या पेक्षा कमी झालेला होता.अगदी जवळ गेलं तरच ती काय बोलतेय हे ऐकू यायचं.
पण एके दिवशी असा प्रसंग घडला कि तिथे नक्की काहीतरी अमानवीय घडत होतं हे तिच्या मनाने नक्की केलं. घरात आल्यानंतर तिला जाणवलेली गोष्ट म्हणजे घरात देव्हारा नव्हता. तसेच कुठल्याही देवतेची मूर्ती, तसबीर काहीच नव्हतं. तीही फार धार्मिक नसली तरी सकाळ संध्याकाळ देवासमोर हात जोडून प्रार्थना करण्याचे संस्कार मात्र तिच्यावर झालेले होते, शिवाय मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली कि तिला बरं वाटायचं.त्यामुळे आज तिने संध्याकाळी येताना रामाची एक छानशी तसबीर आणली. खोलीत एका टेबलावर तिने ती ठेवली. बराच धीर आल्यासारखं वाटलं.रात्री जेवल्यावर नेहमीप्रमाणे आत्याला इंजेक्शन द्यायचा कार्यक्रम पार पडायचा होता. वत्सला बाईनी आत्त्याला कसबस पकडून ठेवलं. हिने इंजेक्शन तयार करून आत्याच्या दंडावर टोचलं, तेवढ्यात आत्या ओरडली, ह्या .. ह्या ..असल्या चित.. चीत्लांना मी घाबरत नाय.. फेकून दे ...माझं घल ... मी बांधलय.. तुला नाय सोद्णाल.तिची वळवळणारी जीभ पाहून तिला शिसारी आली. ती झपाट्याने खोलीबाहेर आली.
मी देवाचं चित्र आणलय हे आत्याला कसं समजल?मी तर वत्सला बाईंनाहि काही बोलले नव्हते. ती हादरली. घरी फोन करून आईला सगळं सांगावसं तिला वाटत होतं. पण आधीच आई आजारी, जरा कुठे तिला शांतता असेल तर मी अस सांगून ती अजून काळजीत पडेल.तशी गावातल्या मोकळ्या वातावरणात वाढलेली असल्याने भित्रट नव्हतीच. तालुक्याहून कित्येकदा क्लास करून रात्री अपरात्री ती एकटीही मसणवाट तुडवत घरी आलेली होती.पण हा प्रकार खासच कधी न बघितलेला, ऐकलेला होता. आत्याला वेडं ठरवावं तर ती व्यवस्थित तिच्या शुद्धीवर होती. पण नॉर्मल नव्हती हेही खरच. आणि कोणालाही न सांगता आणलेली गोष्ट तिला कशी दिसली ? तिच्या त्या भयाण डोळ्यांना सर्व दिसत असेल? तिच्या अंगावर काटा आला. झोपायचा प्रयत्न करून देखील तिला झोप येत नव्हती.आत्याच्या डोळ्यांची वलय समोर गोल फेर धरून नाचत होती.
आत्याची तब्येत ढासळतच होती, आणि घरातलं वातावरण अजूनच भयानक होत होतं. गडी तर आता दिवसाही आत यायचे नाहीत, त्यांना सारखं कोणतरी रोखून आपल्याकडे बघतय असं वाटायचं. हेही वत्सला बाईंकडूनच तिला समजलं, त्याही जरा घाबरलेल्या असायच्या, स्वयंपाकीण बाई गावाला जाते म्हणून सांगून जी गेली ती आलीच नव्हती. तिलाही तो अनुभव येतंच होता. घरात कुठेही फिरलं तरी कोणतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे, अस सतत जाणवायचं, तिला सतत आजूबाजूला लाल मोठी वर्तुळ फिर्तायेत असं वाटायचं. जणू काही अख्या घरात आत्त्याची शक्ती एकवटलेली होती. जणू काही अख्ख घर तीच गुलाम झालं होतं. आत्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने त्या दगड विटांच्या निर्जीव वास्तुतही एक अभद्र चैतन्य आल्यासारखं तिला वाटत होतं.
एकदा जेवताना वत्सला बाई म्हणाल्या देखील, मला या घरात वावरणं कठीण झालंय अग, अत्याबैंच्या नजरेला नजर देववत नाही, काय बाई ती भयाण नजर , मला ब्रह्मांडच आठवलं, परवा म्हणे वामन ला रात्री आत्या मागच्या खिडकीबाहेरून फिरताना दिसली, स्ल्याब वरून हळूहळू चालत होती. ह्याने घाबरून जवळ जाऊन पाहिलं तर कोणीच नव्हत, दारूच्या तंद्रीत भास झाला असेल,अस समजून तो परत आला अग त्यांना साध बसवत देखील नाही, त्या काय चालणार. आणि काय ग ती खिडकी तर तुच्याच खोलीची आहे ना ? दोघी एकदमच दचकल्या...
बराचवेळ काय बोलायचं दोघींना कळल नाही . "वत्सला बाई तुम्ही आजपासून माझ्या खोलीत झोपाल? मला भीती वाटते त्यांची". तिने त्यांना विचारून पाहिलं. ती खरच घाबरलेली होतीत्याही तयार होतात. रात्री डॉक्टर तपासायला येतात. ते म्हणतात जेमतेम १० दिवस, आता शरीरातली सर्व गात्र जवळ जवळ काम करण बंद करत आहेत. पण का कोण जाणे, ह्यांचा मेंदू एकदम नॉर्मल व्यक्तीसारखा आहे , किंबहुना त्याहूनही अधिक सशक्त, मेंदूच्या सर्व संवेदना शाबूत आहेत, प्रत्येक अवयवाला सुसंगत सूचना मिळत आहेत, अवयवच थकलेले असल्याने ते काम करू शकत नाहीयेत, पेशी मृत होत चाललेल्या आहेत, नवीन पेशी अर्थातच आहार नसल्याने बनत नाहीयेत, किडनी कधीही फेल होऊ शकते,दुसरी एखादी व्यक्ती असती तर कदाचित मेंदूचे कार्य पण थंडावले असते, पण माझ्या दर वेळच्या नोंदीत ह्यांच्या मेंदूची शक्ती वाढलेलीच दिसतेय. चमत्कारच आहे हा. अर्थात एकदा हृदय थांबल कि मेंदूच कार्य थांबेलच पण सध्या तरी ह्यांचे हार्ट बिट्स पण नॉर्मल येत आहेत. विचित्रच परिस्थिती आहे. यांची कुठलीतरी तीव्र इच्छाशक्तीच यांच्या शरीराला जगवत आहे. तरीही मी निखीलला आज फोन करीनच, हि परीस्थिती जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही.
डॉक्टर गेल्यावर दोघीच उरल्या . जेवण तसं न बोलताच झालं, तिने सवयीप्रमाणे आईला फोन केला. आणिआत्याच्या खोलीत एकदा डोकावून आली, व ती झोपलेली आहे हे पाहून एक निश्वास टाकून खोलीत परतली. वत्सला बाई खालच आवरत होत्या, तीने त्यांचही अंथरूण घातलं आणि झोपी गेली. कधी नव्हे ते आज तिला पटकन झोप आली. पण दोनेक तासातच कशानेतरी तिला जाग आली, कोणतरी डोक्यावरून हात फिरवत होतं, तीने झोपेतच हात दूर करण्याचा प्रयत्न केला
पण दुसर्याच क्षणी तिला जाणवलं हे काहीतरी वेगळंच आहे, तिची झोप खड्ड्कन उतरली.. खोलीत चांदणं पसरलेलं होतं, खाली वत्सला बाई झोपलेल्या होत्या, पण डोक्यात खर्र्रर्र्रर्र कोणतरी खरवडल्यासारखं बोटं ओढत होतं, एका संथ लईत...तिचं अख्ख अंग दगडासारख सुन्न होतं.. बरेच प्रयत्न करूनही तिच्या तोंडातून आवाज येत नाही.. तिला मदत हवी होती पण मागे बसलेल ‘काहीतरी’ तिथेच होतं, तिच्या अगदी जवळ... कसाबसा धीर करून तिने डोळ्यांच्या कोपर्यातून मागे पहिले आणि तिला ते सावट दिसले, आत्या उशाशी बसलेली होती, घशात घरघर सुरु असते, चांदण्यात तिचा आधीच निस्तेज चेहरा, पांढराफटक पडलेला होता. त्यावर आता हिंस्त्र भाव होते, वार्यावर केस भुरू भुरू उडत होते.. कपाळावर हिरव्या नसा तडतडत होत्या, डोळे मात्र तसेच लालसर , तिच्यावर खिळलेले... ‘गाSSS प्वावे,.. बादूउ .. .. गा प्वा,.. बादूउ.. मी जानल नय.. ‘ विचित्र आवाज येत होता.. तोंडातून लाळ गळत होती.. तीने उठायचा प्रयत्न केला, पण ते हात तिच्या गळ्यावर आले, हळू हळू पकड घट्ट होत गेली, डोळ्यासमोर फक्त रंगेबिरंगी वलय दिसायला लागली, आणि त्यात ते दोन डोळे ....
ताई, ताई उठा काय झालं ? ती खाद्द्कन उठून बसली, वत्सला बाई घाबर्याघुब्र्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होत्या. ताई काय झालं का ओरडताय अशा?स्वप्न पडलं का काही?
अत्त्या .. आत्या आली होती.. माझा गळा दाबत होती.. मला नाही इथे राहायचं, बाई मला बाहेर काढा इथून प्लीज.. अहो तै इथे कसं कोण येईल ? मी येताना दाराला काडी घालून आलेय, त्यांच्या आणि आपल्या पण. हे काय ? पहा.. तिने पाहिलं, दरवाजा व्यवस्थित बंद होता, ती थरथरत उठली . पायातली शक्ती गेलेली होती. बहुतेक स्वप्नंच पडलेलं होतं. तीने बेसिनपाशी जाऊन तोंडावर पाण्याचे ५- ६ हबके मारले. आरशात स्वतःचा चेहरा पाहिला ... तेवढ्यात केसांकडे तीच लक्ष गेलं , काहीतरी अडकलेल होतं, तीने ते ओढून काढलं, तो चिंधीचा एक तुकडा होता
ती तशीच वेगाने बाथरूम बाहेर आली, वत्सला बाई बसलेल्याच होत्या . हे काय आहे बाई? बघा ? आता धक्का बसण्याची वेळ वत्सला बाईंची होती, हा अत्याबैंच्या गाऊनचा तुकडा वाटतोय ताई..
हा माझ्या डोक्यात कसा आला? दार बंद होतं ना? तिच्या हृदयाची धडधड भयानक वेगाने वाढलेली होती. जणू जखमेवरची खपली उडून त्याखालचा नाजूक भाग वर यावा, तशी तिच्या मनाची अवस्था झालेली होती, आजुबाजूच वातावरण आता एकदम गार पडलेलं होतं, दोघी अक्षरश: काकडत होत्या.
एका क्षणी दोघींचं लक्ष खिडकीकडे गेले, खिडकी सताड उघडी होती , त्यांना वामन, नोकराचे बोलणं आठवलं. एक थंड घामाचा ओघळ तिच्या मानेवरून ओघळला. ती घाबरून मटकन खालीच बसली, वत्सला बाई हळूहळू चालत खिडकीपाशी गेल्या, त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं
आईं ग .. त्यानी बोंब ठोकली..
ती ताडकन उठून उभी राहिली, काय झालं वत्सला बाई? काय झालं? कोण आहे तिकडे ? त्यांच्या कडून काहीच प्रतिक्रिया आली नाही, त्या तशाच दगडी चेहऱ्याने थिजलेल्या होत्या, ती त्यांच्याजवळ गेली, आणि खिडकीतून खाली डोकावून पाहू लागली,
परमेश्वरा.. तीचं हृदय.. आता दसपटीने धडकायला लागलं.. खाली स्लँबवर अत्त्या दात विचकत उकिडवी बसलेली होती. आणि काही कळायच्या आत रांगत,खुरडत भयानक वेगाने ती दिसेनाशी झाली. दोघी लटपटत आत आल्या. खिडकी घट्ट बंद करून घेतली. घड्याळात 3 वाजलेले होते. दोघी एकमेकाना धरूनबसल्या
कधीतरी वेळ सरली, आणि सूर्य उगवला. तीने सर्वात आधी निखीलला फोन लावला, पण फोन लागला नाही, मग डॉक्टरकाकांना फोन लावला, ते नुकतेच उठलेले होते. हा प्रकार ऐकताच तेही हादरले, जेमतेम पंधरा मिनिटात ते घरी पोचले, ते आल्यावर दोघी हळूच बाहेर आल्या. आत्याच्या खोलीचा दरवाजा बंदच होता. डॉक्टर घाईघाईने आत गेले. आतमध्ये ‘आत्या’ झोपलेली होती, त्यांनी तपासलं
ओह माय गाँड!!!! शी इस नो मोर...
आत्याबाई गेल्यात.
दोघींना हा अजून एक धक्का बसला. डॉक्टरांनी परत यांच सगळं म्हणणं ऐकून घेतलं. पण त्यांनाही यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं.पण दोघी जणी खोट बोलू शकत नाहीत, किंवा दोघींना एकत्रच स्वप्न पडणेहि शक्य नाही, हेह इत्यांना काळात होतं
घसा खाकरत ते म्हणाले, मी कालच म्हणालो तसं त्यांचा मेंदू अतिशय सुस्थितीत होता. त्यांचे अवयव जरी थकलेले असले तरी. त्यांच्या मेंदूत कल्पना तयार होणे काही थांबलेले नव्हते, त्या आणि त्यांचं हे घर.. एवढचं त्याचं विश्व होतं, अशा परिस्थितीत अनेक नवीन माणस त्यांच्यासमोर आलेली , त्यांच्या मेंदूने स्वीकारली नाहीत, आणि काही तीव्र प्रतिक्षिप्त क्रिया त्यातून व्हायला लागल्या, अर्थातच हे प्रसंग मला विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहावेच लागतील. मानवी मनाचा पत्ता लागणं अशक्य आहे.
‘डॉक्टर काका, प्लीज हे रात्रीच तुमच्याशिवाय कोणाला कळू देऊ देऊ नका, अगदी निखील दादा, आणि नीलिमा ताईला पण.. त्यांना वाईट वाटेल. त्यांना झोपेत शांत मृत्यू आला असेच सांगा. तीने कळकळून विनंती केली.
डॉक्टरांनी हसून मान डोलावली, थोड्याच वेळात शववाहिका आली, आत्याचा मृतदेह नेला गेला, डॉक्टरांनी निखील नीलिमाला कळवलं. त्या रात्री ती वत्सला बाईंकडे झोपायला गेली.
पुढील २ दिवसात सगळे सोपस्कार पार पडले. आणि निरोप घेऊन ती बस मध्ये बसली.
मानवी जीवनात असे विचित्र अनुभव येतंच असतात. ज्या पैशांकर्ता म्हणून ती येथे आलेली होती, जेमतेम महिनाभरातच तिला परतावे लागत होते. पण त्या महिन्याभरात तिने जे सोसलेले होते, ते त्या मिळालेल्या पैशांनी भरून निघेल का एक प्रश्न तिला छळत होताच.
“घर पाहावे बांधून “ म्हणतात ते उगाच नाही
ताजा कलम :
१.डॉक्टर भिडे डेस्कवर हातात रिपोर्ट घेऊन चिंतीत नजेरेने. तिच्या म्हणण्यानुसार रात्री २ ते 3 च्या दरम्यान आत्या त्यांच्या खोलीत आलेल्या असतात. पण रिपोर्ट अस सांगतोय कि रात्री १० च्या सुमारासच आत्या ने या जगातून निरोप घेतलेला असतो
२. निखील तो बंगला विकून टाकतो, पण आता त्याचे मालक दर चार पाच महिन्यांनी बदलत असतात, आणि बाजारभावापेक्षा त्याची किमंत आता पन्नास टक्क्यांनी खाली घसरलेली आहे
“घर पाहावे बांधून “ म्हणतात ते उगाच नाही
समाप्त
प्रतिक्रिया
18 Apr 2013 - 7:14 pm | जेनी...
एक कन्फुजने ..
वसुधाबै काकु आत्याला सांभाळणार्या काकु आणि वत्सलाबै काकु त्यांच्या सैपाकिन्बै काकु होत्या का ,???
18 Apr 2013 - 7:22 pm | राघवेंद्र
मनाला चटका लावुन गेली ही कथा.
18 Apr 2013 - 8:34 pm | प्रचेतस
जबरदस्त झालीय.
ही कथा आतापर्यंतची तुझी सर्वोत्कृष्ट ठरावी. अगदी साध्या प्रसंगातून कथा सुरु होऊन शेवटी भयाचा काटा आणण्याची तुझी हातोटी लाजवाब.
21 Apr 2013 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११ टू वल्ली...
आणी-----
@जणू काही अख्ख घर तीच गुलाम झालं होतं. आत्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने त्या दगड विटांच्या निर्जीव वास्तुतही एक अभद्र चैतन्य आल्यासारखं तिला वाटत होतं. >>> या एका वाक्यासाठि तर टाळ्यांचा कडकडाट...
विषयाशी तन्मयता=अचुक शब्द योजना
@परमेश्वरा.. तीचं हृदय.. आता दसपटीने धडकायला लागलं.. खाली स्लँबवर अत्त्या दात विचकत उकिडवी बसलेली होती. आणि काही कळायच्या आत रांगत,खुरडत भयानक वेगाने ती दिसेनाशी झाली. दोघी लटपटत आत आल्या. खिडकी घट्ट बंद करून घेतली. घड्याळात 3 वाजलेले होते. दोघी एकमेकाना धरूनबसल्या >>> अरे पांडू...इथे तू मला मारलस...मागे मी,राजापुरातल्या भालावली नावाच्या जंगलवस्तित असलेल्या गावात, १ अशीच खुरडत खुरडत चालणारी जख्ख म्हातारी पाहिलिवती.(अजुनही ती आहे) नदी समोरच्या देवळात रहाते,आणी पाणी आणायला बसुनच त्या झाडितनं नदिकडे जाते...मी संध्याकाळी ५च्या सुमाराला तिला पाहुनंही उडालो होतो...
त्यामुळे तुझ्या वरच्या वर्णनानंतर तीच म्हातारी माझ्या डोळ्यांसमोर आली...बाप...रे.........!!! अता रातच्याला झोपायचे हाल आहेत. 
18 Apr 2013 - 10:48 pm | मराठे
एकदम झबरदस्त!
18 Apr 2013 - 11:05 pm | कवितानागेश
काय भयानक लिहिलय...
18 Apr 2013 - 11:54 pm | पैसा
काहीसं अपेक्षित. पण एकदा वाटलेलं की काही मनोविश्लेषणात्मक लिहितोयस की काय!
19 Apr 2013 - 12:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
ए बाबा, काळाशी असा खेळू नको ना रे भौ. दोन वर्षांपूर्वी व्यनिमधून दिलेली सूचना परत वाच :-)
बाकी कथा छानच.. वातावरण निर्मिती उत्कृष्ट. अगदी अर्थगौरव (याचा अर्थ वल्ली किंवा ब्याटम्यान सांगेल)...
एक कळले नाही की शेवटी दिसले ते आत्याचे भूत असेल तर आधी गड्याला दिसले ते काय होते??
19 Apr 2013 - 10:18 am | स्पा
ओक्केश विमे काका
बदल करतो
19 Apr 2013 - 1:05 am | प्यारे१
जरा घराची 'शांत' करुन घ्या!
स्पारायण धारप, लई डेन्जर ल्हितो रे. वल्लीशी सहमत नि विमेशीही. पहिल्या भागात 'ती' 'मी' झालीये एका ठिकाणी.
19 Apr 2013 - 4:44 am | स्पंदना
काटा आला स्पा.
फार भयानक लिहितोस ब्वा!
19 Apr 2013 - 10:08 am | अद्द्या
______/\_______
19 Apr 2013 - 12:01 pm | Jagannath
कथा छान झाली आहे................
19 Apr 2013 - 12:48 pm | बॅटमॅन
भयकथापरायण स्पारायण गाळपांचा विजय असो!!!!!!!!!!!!!!!!! मस्त कथा रे.
(उलटे लटकून अंधारात उडणारा) बॅटमॅन.
19 Apr 2013 - 3:07 pm | Mrunalini
बापरे.... अंगावर काटा आला अगदी..
19 Apr 2013 - 3:17 pm | अभ्या..
स्पावड्या असले विचार जास्त करत जाऊ नकोस रे. घोस्ट रायडर होशील.
उगी आपलं टीपीटीपी करायचं वय आहे तेच कर.
19 Apr 2013 - 3:45 pm | बॅटमॅन
स्पांडूला घोष्ट रैडरच्या वेषात पाहून जाम हसायला आले =)) =))
19 Apr 2013 - 3:52 pm | स्पा
वाघुळा
तू बॅटमॅन ची बाईक चालवू शकतोस
तर म्या घोस्ट रायडर ची नक्की चालवू शकेन
हाय कि नाय .
20 Apr 2013 - 12:02 am | बॅटमॅन
हां हे बाकी खरं :)
चल जाऊ "लांग" राईडला ;)
19 Apr 2013 - 3:23 pm | मुक्त विहारि
मराठी वाडमयाला एक उत्तम भयकथाकार मिळाला.
19 Apr 2013 - 3:24 pm | सुहास झेले
मस्त कथा रे ... आवडली :) :)
19 Apr 2013 - 3:42 pm | रुमानी
बापरे... भयकथा मस्तच जमलिये .वतावरण निर्मिति तर जबरदस्त.
आवडली
19 Apr 2013 - 3:53 pm | शिद
मागच्या भागासारखा हा भाग ही फक्कड जमला आहे...आणखी अश्याच भयाकथा येऊ दे बोर्डावर.
19 Apr 2013 - 11:58 pm | नेत्रेश
काल रात्रभर त्या खुरडणार्या म्हातारीचेच स्वप्न पडत होते. झोपेचे पार खोबरे झाले.
तीव्र आसक्तीने माणसाची काय अवस्था होते त्याचे अगदी विदारक चित्र उभे केलेत. तुमच्या पावरफुल लेखणीला सलाम.
20 Apr 2013 - 2:16 pm | सस्नेह
काही गोष्टी क्लीअर झाल्या नाहीत.
१. आत्या कोणत्या भाषेत बोलत होती ?
२. आत्याला देवाधर्माचे वावडे का व कधीपासून होते.
३. आत्याचे नायिकेशी वैर का होते ?
आणखी बर्याच.
20 Apr 2013 - 2:25 pm | स्पा
क्लीअर करण्याचा प्रयत्न करतो
मराठीतच बोलत होती , पण अशक्तपणामुळे.. तोंडात दात नसल्याने, तिचे बोलणे असंबंध ऐकू येत होते
त्याचा रेफरन्स नाही दिला , उगाच गोष्ट वाढत बसली असती, पण आत्ता असा संदर्भ लाऊ शकतो, कि तिने स्वत: सगळ साम्राज्य उभारल्यामुळे कदाचित तिचा विश्वास नसेल
तिच्या घरात शेवटी शेवटी, तिला नवीन चेहरे दिसू लागल्याने, तिचा राग असू शकेल
येउद्यात :)
20 Apr 2013 - 3:49 pm | सस्नेह
पण आवडली कथा. मजा आली नाही म्हणत, भीती वाटली म्हणते.
20 Apr 2013 - 4:49 pm | निनाद मुक्काम प...
तुला नाय सोद्णाल.तिची वळवळणारी जीभ पाहून तिला शिसारी आली.

मला सुद्धा आली.
ही सगळ्यात उत्तम कथा झाली आहे ,
जबरा
20 Apr 2013 - 5:32 pm | गणपा
मान गये उस्ताद.
गुढ वातावरण निर्मीती छानच चितारली आहेस.
21 Apr 2013 - 12:54 am | सौरभ उप्स
वा क्या बात है. … कडक जमलीये कथा, वातावरण निर्मिती जबर्याच… कधी, कस आणि कुठे सुचत रे तुला हे??? आणि अश्या कथांनी दुसर्याची झोप उडवणाऱ्या तुला मस्त झोप लागत असेल रे रात्री…।
21 Apr 2013 - 8:25 am | धमाल मुलगा
क आणि ड आणि क!!!
आपट्या भाड्या...एक काम कर, तू सरळ पुस्तकच काढ भयकथांचं. नाहीतरी धारप गेल्यापासून मराठीतल्या भयकथा पोरक्याच झाल्यात म्हणेनास..ही धुरा आता तूच उचल!
21 Apr 2013 - 9:54 pm | प्यारे१
त्याला जरा आंदी 'बारी' बनू दे रं बाला! धुरा उचलाची तर ताकद निको?????
बाकी खरंच स्पावड्या, भा.व.ड्या, धम्या म्हणतो तसं करच. शुभेच्छा!
21 Apr 2013 - 10:11 pm | धमाल मुलगा
जल्लां त्येंका काय सगळो जालं उचलून यकट्यान नेऊक सांगणा नाय, म्हावरं, मोरी, चिंबोरी...ष्टेप बाय ष्टेप करुक होया मरें..
21 Apr 2013 - 10:50 am | जोशी 'ले'
अफाट
22 Apr 2013 - 1:02 pm | सुमीत भातखंडे
ड्रॅग मी टु हेल मधली म्हातारी आठवली
22 Apr 2013 - 1:05 pm | सुमीत भातखंडे
कथा आवडली हे सांगायचं राहून गेलं.
मस्त जमल्ये वातावरण निर्मिती
22 Apr 2013 - 5:32 pm | निनाद मुक्काम प...
काय आठवण करून दिली राव
इवील डेड नंतर सेम बर्याच वर्षानंतर कोळी मानवाचे ३ भाग घेऊन आला ,
हॉरर चे नाव घेई ना हा पठ्ठ्या
पण ह्या सिनेमाने सारी कसर भरून निघाली
16 May 2013 - 11:03 pm | वादळ
लई भारी.
आता रात्रीची झोप बोंबलली तेज्यायला...
आणि हा हाय पॉईंट....
"परमेश्वरा.. तीचं हृदय.. आता दसपटीने धडकायला लागलं.. खाली स्लँबवर अत्त्या दात विचकत उकिडवी बसलेली होती. आणि काही कळायच्या आत रांगत,खुरडत भयानक वेगाने ती दिसेनाशी झाली."
10 Apr 2015 - 2:51 pm | एक एकटा एकटाच
प्रसंग छान उभारले आहेत.
खासकरून आत्याचा शेवट.