Skip to main content

गाथा ..... हा लेख का लिहला ?

लेखक शरद यांनी सोमवार, 03/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नितिन थत्ते यांनी विचारले की हा लेख लिह्ण्याचा उद्देश काय ? तसेच अभंगाच्या खरेखोटेपणाबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. खरे म्हणजे या दोन्हींचीही माहिती लेखांत दिली आहे. शरदबोवा थापा मारतात हे (सप्रमाण) पहिल्यांदीच सांगितले आहे. तसेच माझा उद्देश काय हेही शेवटी सांगितले आहे. इथे परत एकदा सांगतो. बहुजनांच्या समजुतीत, त्यांच्या श्रद्द्धाविषयांत, त्यांच्या लोककथांमध्ये,सत्याचा लहानसा अंश असण्याची शक्यता असते. आजच्या काळांत त्या चुकीच्या वाटल्या तर त्यांना एकदम झिडकारून, त्यांची टिगल करून त्या त्याज्य ठरवावयाच्या आधी थोडे संशोधन करणे योग्य ठरेल डॉ.रा.चिं.ढेरे यांनी एके ठिकाणी लिहले आहे " पुराणांमध्ये सगळ्या भाकड कथा आहेत असे शेरे मारतांना आपल्या भारताच्या अज्ञात इतिहासातील अनेक गोष्टी त्या कथांमधून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही." तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीतून तेरा दिवसांनी वर आली ही जनश्रद्धा. ती चुकीची असे आजच्या विद्वानांचे मत. मग इंद्रायणी म्हणजे लोकमानस, त्यात गाथा सुरक्षित राहिली असली लटपटपंची करावी लागते. असो. आता या लेखाची कल्पना कशी सुचली ते सांगतो. माझे एक मित्र चित्रे काढतात. प्रदर्शनात ठेवण्याएवढी चांगली काढतात. जास्त करून जलरंगात. या चित्रात एक अडचण अशी असते की ती कांचेच्या फ्रेममध्ये बंदिस्त करावी लागतात. फ़्रेम केली नाही तर ती ओल्या फडक्याने साफ करता येत नाहीत. आता त्यांना लॅकरिंग किंवा व्हार्निशिंग ही करता येत नाही. कारण चित्र ग्लॉसी दिसते, रंगात थोडाका होईना फरक पडतो, वगैरे. त्यांची गरज अशी : (१) चित्र ओल्या फडक्याने पुसून साफ करता आले पाहिजे. चित्राला कोणताही धक्का पोचता कामा नये. (२) कोटिंग करतांना कागद व रंग यात काही बदल होऊ नये. ते अजिबात चकाकी आणणारे नको. कोटिंग केले आहे हेच कळता कामा नये. (३) कोटिंग शक्य तो ब्रशने लावता यावे, स्प्रेची गरज भासू नये. (४) कोटिंग किमान पन्नासेक वर्षे टिकावे. आणि अर्थात (५) फार खर्चाचे नसावे. सर्व लक्षात घेऊन मी एक रसायन तयार केले. नातीने काढलेले एक जलरंगातील चित्र घेऊन त्यावर ते फासले. वाळल्यावर त्याच्यावर थोडे पाणी ओतले. काही होत नाही असे लक्षात आल्यावर चक्क एका बादलीत पाणी घेऊन त्यात ते बुडवले. एक लहान वजनही ठेवले होते. रात्रभर पाण्यात ठेऊन सकाळी वजन काढल्यावर चित्र हळूहळू वर येऊ लागले. इथे मला तुकाराम महाराजांची गाथा आठवली. एक गंमत करावयाचे ठरवले. एक ड्रॉईंग पेपर घेऊन तो थोडा पिवळसर केला. त्यावर मार्कर पेनने अभंग लिहले. बोरूने साध्या काळ्या शाईने लिहले असते तरी काही फरक पडला नसता. हे आमचे " तुकोबांचे अभंग ". मग श्री. यनावाला यांचे घरी जाऊन त्यांना प्रयोग करावयास सांगितला. हेही सांगितले कीं water-proof शाई मिळते. व जुन्नर येथे पूर्वी हातकागद तयार करत. तो जलरोधक होता का हे माहीत नाही ; बहुदा नसावा. त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला " तेरा दिवस पाण्यात बुडवूनही गाथा खराब न होता वर येणे शक्य आहे का ? त्यांनी " हो" म्हटल्यावर त्यांना तसे प्रतिसादात लिहण्याची विनंती केली. श्री प्रकाश घाटपांडे यांना घरी येण्याची विनंती केली. ते आले, त्यांनी पहिले व त्यांनीही तसे कबूल केले. प्रतिसाद दिले. हे दोघे कां ? श्री. यनावाला व श्री. घाटपांडे यांची मते सगळ्यांना माहीत आहेत. सर्वश्री शुची यांचे मत एखादे वेळी सर्वजण ग्राह्य धरणार नाहीत.(त्यांच्या लिखाणावरून झालेली माझी समजूत, श्रद्धेला बर्‍याच वेळी अंधश्रद्धा समजण्याचा हा काळ आहे.चु.भु.दे.घे.) " तेरा दिवसांनंतर गाथा खराब न होता इंद्रायणीतून बाहेर आली " याला बहुजन समाज "चमत्कार" म्हणतो. आज हे दोघे "असे शक्य आहे " असे म्हणतात. बस. मला एवढेच म्हणावयाचे होते. श्री. यनावाला व श्री घाटपांडे बहुश्रुत, सुशिक्षित माणसे आहेत. त्यांना जर मी काय केले हे समजले नसेल तर सर्वसामान्य माणसाला कळणे अवघड आहे. म्हणजे मी एक चमत्कारच केला म्हणावयाचा. रेड्याच्या तोंडून वेद म्हणवणे मला शक्य नसले तरी बाहुल्याच्या तोंडातून काहीही वदवणार्‍या श्री. पाध्ये यांना हे अशक्य नाही ! ज्या विषयांचा गाढ अभ्यास आपण केला नाही त्या विषयांवर आपण आपल्या क्षेत्रांत कितीही प्रावीण्य मिळवले असले तरी मत देतांना " हे अशक्य आहे " असे म्हणण्याऐवजी " मला सांगता येणार नाही, हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे ; फारफार तर माझ्या आजच्या ज्ञानानुसार हे अशक्य वाटते " असे उत्तर देणे मी पसंत करेन. हे सगळ्यांना पटावे कां ? माझा तसाही आग्रह नाही.हे ही शक्य आहे की काही जणांना सर्व विषयातील सर्व कळते ! प्रयोगानंतर मी काय केले ते श्री. यनावाला आणि श्री. घाटपांडे यांना सांगितले होते. फक्त त्यांना विनंती केली की हे त्यांनी त्यांच्या प्रतिसादात सांगू नये.ते त्यांनी मान्य केले. धन्यवाद. इंद्रायणीतून गाथा वर आली हे खोटे असे त्यांनी म्हटलेले नाही व मी त्यांना खोटे पाडले असेही नाही. आता उरल्या दोन गोष्टी (१) अभंग पहाण्यास येण्याची गरज नाही. पण आपण जलरंगात चित्रे काढत असाल व आपणास हे रसायन पाहिजे असेल (मोफत) तर अवष्य फोन करा. मी व्यवसायातून निवृत्त झालो आहे. या लेखाला जाहिरात समजू नका. (२) माझा आजचा मुद्दा मागच्या विषयापेक्षा निराळा आहे. आपली मते पन्नासाव्या प्रतिसादांनंतर देण्यात मजा नाही. म्हणून नविन दुवा. शरद

वाचने 3730
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

धाग्यावर लक्ष ठेवून आहे. ;)
बहुजनांच्या समजुतीत, त्यांच्या श्रद्द्धाविषयांत, त्यांच्या लोककथांमध्ये,सत्याचा लहानसा अंश असण्याची शक्यता असते. आजच्या काळांत त्या चुकीच्या वाटल्या तर त्यांना एकदम झिडकारून, त्यांची टिगल करून त्या त्याज्य ठरवावयाच्या आधी थोडे संशोधन करणे योग्य ठरेल
यातले संशोधन जाऊ द्या बाजूला. ते कोण करत बसणार? ;) हे पटते की, त्या कल्पना त्याज्य ठरवताना त्यांची टिंगल करण्यात अर्थ नाही. पण कसं आहे की, टिंगलीशिवाय आपला मुद्दा जोरकसपणे जातो, असे अनेकांना वाटत नसते, आणि बहुतेक वेळेस त्यांची ती पात्रताही नसल्याने होत नसते. शिवाय मूर्ख, भंपक वगैरे शब्दांचा प्रयोग करण्याचा सोस अशांना असतो आणि ती संधीही एरवी मिळत नसते. त्यांना अभिव्यक्त होऊ द्यावे हे बरे. आता असे विवक्षीत ठिकाणी होत नसेल तर तोही त्या व्यवस्थेचाच एक भाग असतो. तिथं काशी घालायला जाऊच नये मुळात. आणि टिंगलीशिवाय कल्पनेतील फोलपणा समजून घेणेही अनेकांना जमत नसते, किंवा जमवून घेणे हितसंबंधांना बाधा आणणारे असल्याने गैरसोयीचे असते. त्यामुळं हे असं होत राहतं. आता, संशोधनांती टिंगल न करताही अशा कल्पनांची वासलात अनेकांनी लावली आहेच की. त्यांना विचारवंत म्हणतो आपण. तसंच... असो.

पुराणांमध्ये सगळ्या भाकड कथा आहेत असे शेरे मारतांना आपल्या भारताच्या अज्ञात इतिहासातील अनेक गोष्टी त्या कथांमधून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही."
मुख्य म्हणजे त्या आपल्या लोककथा आहेत. त्यातून बरेचदा सामाजिक परिस्थितीची जाणीव होते.
तेरा दिवसांनंतर गाथा खराब न होता इंद्रायणीतून बाहेर आली " याला बहुजन समाज "चमत्कार" म्हणतो. आज हे दोघे "असे शक्य आहे " असे म्हणतात. बस. मला एवढेच म्हणावयाचे होते.
यनावाला शक्य आहे असे म्हणाले म्हणजे देवच पावला. ;)
ज्या विषयांचा गाढ अभ्यास आपण केला नाही त्या विषयांवर आपण आपल्या क्षेत्रांत कितीही प्रावीण्य मिळवले असले तरी मत देतांना " हे अशक्य आहे " असे म्हणण्याऐवजी " मला सांगता येणार नाही, हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे ; फारफार तर माझ्या आजच्या ज्ञानानुसार हे अशक्य वाटते " असे उत्तर देणे मी पसंत करेन.
एखादी गोष्ट मला पटत नसल्यास त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे किंवा शंका काढणे मला योग्य वाटते. त्याचप्रमाणे पिढ्यानपिढ्या एकच मत उगाळत बसण्यापेक्षा किंवा तोच तोच विश्वास जपत राहण्यापेक्षा वेगळे मत पुढे करणे योग्य वाटते परंतु हे करत असताना आपण अपुर्‍या ज्ञानापायी किंवा अपुर्‍या माहितीपायी इतरांना शिकवणी देत राहू नये असे वाटते.

अरेच्चा !!! ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून योगसामर्थ्याने/ईश्वर कृपेने वेद वदवले. विठ्ठलाच्या कृपेने तुकारामां*ची गाथा इंद्रायणीतून वर आली. योगबलाने ज्ञानेश्वरांनी बिंत चालवली. चमत्कार अशक्य आहेत असे म्हणणारे लोक या लाल अक्षरातल्या शब्दांना शक्य नाही असे म्हणतात. ते लाल अक्षरातले शब्द वगळून उरलेल्या वाक्यांची तपासणी करायला ते तयार असतातच हे यनावाला आणि प्रकाश घाटपांडे यांनी आपल्या कृतीने दाखवले आहेच. अडचण अशी आहे की लाल अक्षरातले शब्द वगळून उरलेली वाक्ये सांगण्यात/उच्चारण्यात श्रद्धाळूंना मुळीच रस नसतो. इंटरेस्टिंगली तिसरे पूर्ण वाक्यच लाल रंगात लिहावे लागते. *येथे अनंतकोटी ब्रह्मांडनायक संतसूर्य परमपूज्य श्री श्री तुकाराम महाराज असे वाचावे. ;) काही विशेषणे राहिली असल्यास तुकारामभक्तांनी समजून घ्यावे. :) (क्लिअर) नितीन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

अनंतकोटी ब्रह्मांडनायक संतसूर्य परमपूज्य
हे थोडयाफार फरकाने सगळीकडे असतं.
श्री श्री
काय हे थत्तेचाचा. श्री श्री ही उपाधी आता आता वापरात आली आहे. तुकाराम तीन शतकांपूर्वी होऊन गेले.

In reply to by नितिन थत्ते

चमत्कार (....?) अशक्य आहेत असे म्हणणारे बरेच लोक या लाल अक्षरातल्या शब्दांनाच नव्हे तर पुर्ण वाक्यच शक्य: नाही असेहि म्हणताना पाहिले आहेत. अवांतर: ती लाल अक्षरे पाहुन पड्लो तरी आपलीच लाल या म्हणिची उगाचच आठवण झाली.

In reply to by चेतन

>>चमत्कार (....?) अशक्य आहेत असे म्हणणारे बरेच लोक या लाल अक्षरातल्या शब्दांनाच नव्हे तर पुर्ण वाक्यच शक्य: नाही असेहि म्हणताना पाहिले आहेत. मी लिहिलेल्या तीन वाक्यांपैकी एक वाक्य म्हणूनच पूर्ण लाल रंगात लिहिले आहे. . . नितिन थत्ते

एकंदर प्रकार थोडा रंजक वाटला. पण देवावर विश्वासही तेवढाच दांडगा असल्याने घेतल त्याचच नाव आणि लागलो कामाला. सर्वप्रथम एक पिवळा कागद मिळवला. त्यावरही देवाचा धावा केला. आणि मग काय चमत्कार सांगावा राव...अहो तुमच्या डॉल्यांनीच पहा ना. :) http://www.youtube.com/watch?v=bMJOgVKDWYI

In reply to by गणपा

एवढं केलंच आहे तर आता थोडे तपशील लिही की मेल्या. कागद कसला होता, त्याचे रासायनीक विश्लेषण काय, शाई कोणती होती, तिचे रासायनीक गुणधर्म काय, लिहिणारा उजवा की डावखोरा, लिहिण्याचे साधन काय, बादली होती की आणखी काही, त्याची गुणवैशिष्ट्ये, पाणी (एचटूओ) कुठलं, त्यावर शुद्धीप्रक्रिया झाली होती का, असल्यास ती कोणती, पाण्याचे प्रमाण, तापमान, ते तापवलेले असल्यास कुठं, कसं, हा प्रयोग केला तेव्हा हवामान काय होते, त्याची परिमापके, ज्या परिसंस्थेत हा प्रयोग केला तिच्या वातावरणाची आणि त्या हवामानाची सांगड कशी घालायची, परिसंस्था असल्याने भूभाग काय होता, तिथलं रेडिएशन किती... किती प्रश्न शिल्लक आहेत इथं. त्याची उत्तरे देत नाही. आणि म्हणे प्रयोग केला. हा तर नुसता चमत्कार आहे गण्या. ;)

In reply to by श्रावण मोडक

हा तर नुसता चमत्कार आहे गण्या.
मग आम्ही काय वायले म्हणालो तर? प्रयोग आहे अस तुम्ही म्हणालात. मी तर अपार श्रद्धेनेच तो कागद पाण्यात बुडवला होता. १३ दिवस- तास सोडा १३ मिनीटं ही लागली नाहीत. :)

In reply to by श्रावण मोडक

त्याशिवाय, ही माहिती सुद्धा द्यावी. प्रयोग करणार्‍याने 'मी गणा' अशी टोपी घातली होती की नव्हती? प्रयोग करणार्‍याच्या चड्डीचा रंग भगवा होता का हिरवा? ;-)

In reply to by Nile

प्रयोग करणार्‍याच्या चड्डीचा रंग भगवा होता का हिरवा?
हा प्रश्न "प्रयोग करणार्‍याच्या चडडीची नाडी कापडी होती की इल्यास्टीकची होती?" असा असायला हवा.

In reply to by गणपा

मिडीयाला हाताशी धरुन हा प्रकार शरदबुवांनी केला असता तर काय प्रसिद्धी मिळाली असती!

उपक्रमावर उ/बुडालेला हा लेख मिपावर तरंगणार असे भाकीत मी तेव्हाच वर्तवले होते.

" पुराणांमध्ये सगळ्या भाकड कथा आहेत असे शेरे मारतांना आपल्या भारताच्या अज्ञात इतिहासातील अनेक गोष्टी त्या कथांमधून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही."
या बाबतीत श्री. यनावाला आणि श्री. घाटपांडे यांचे मत काय आहे? जर या बाबतीत मत "होय" असे असेल, तर थेट याच वाक्याबाबत त्यांची सहमती कळवली असती तर हेतू सहज साध्य झाला असता. तर "अशक्य" शब्द तुम्हाला आवडत नाही, इतके कळले. प्रत्यक्षात तो शब्द कुठल्याशा क्रियाशील प्रसंगात वापरला जातो. लोककथा सोडा, "सूर्य उत्तरेला उगतो" या वाक्यात सुद्धा सत्याचा अंशही आहे, आणि शक्यतासुद्धा आहे. वर्षातील जवळजवळ अर्ध्या दिवसांच्या सूर्योदयांत ठीक पूर्वेपेक्षा थोडा उत्तरेलाच सूर्य उगवतो. आणि भारतात नव्हे पण खूप उत्तरेकडच्या देशांत सूर्य वर्षातील एका दिवशी ठीक उत्तरेला उगवतो. पण "सूर्य उत्तरेला उगवला" हे स्थल-काल-क्रियाहेतूच्या संदर्भातच "अशक्य" म्हटले जाते. म्हणजे संवाद होण्याच्या संदर्भातच. त्यामुळे वरील "सत्याचा अंश" आणि "कुठल्या परिस्थितीत पूर्ण सत्य" हे मला ठाऊक असूनही कित्येक संदर्भांत "अशक्य" हा शब्दप्रयोग अगदी चालण्यासारखा आहे.