Skip to main content

सांगे वडिलांची किर्ती.....

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे घराणे सरदार घराणे. अस्सल. भेसळ? ह्या. चालणारच नाही महाराजा.एकदम खानदानी. पेटारेच्या पेटारे भरुन सोने होते. मोठ्ठं कुळ. जिकडे नजर जाईल तिकडे जमीन आमचीच. आणि घरचे लोक तर काय एकाहून एक हुस्शार... सगळीकडे आमचाच बोलबाला होता. दुध दुभते भरपूर. आमच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या, बुद्धीमत्तेच्या गाथा सांगितल्या जात एकेकाळी..... पण म्हणतात ना.... साली दृष्ट लागली हो सगळ्याला. सग्गळं सग्गळं गेलं. चोरांनी लुटलं, ठगांनी फसवलं, काही अजाणतेपणी गेलं अन काही जाणतेपणी. आता आमचे लोक करतात चाकरी कुणाच्या हाताखाली. कुणाचा व्यवसाय गोळ्याबिस्किटांचा. कुणाचा फ्लॅट आहे शहरात दोन बेडरूमचा. मस्तपैकी गाडी सुद्धा आणि गावात आहे आता वाडा पडका. जुनी बाडं सापडतात अधून मधून. काय ती वर्णनं, काय ती चित्रं, काय ते हिशेब ! दिपून जायला होतं नुस्तं. लोक म्हणतात, ह्याट्ट काहीही सांगू नकोस. खोटं आहे सगळं. नाही हो नाही. बघा ना बघा. ही पुस्तकं बघा, ही चित्रं बघा, ही गणितं बघा, हा वाडा बघा. कसं खोटं असेल हो? खरं आहे आणि १००% खरं. जाज्ज्वल्य अभिमान आहे मला त्याचा. चल केलं कबूल.नसेल खोटं. आहे खरं. उपयोग काय त्याचा? आजची स्थिती काय आहे रे ? आहे आज कुणी तुझ्या शब्दाला किंमत देणारं? आहे कुणी तुझी बाजू घेणारं. उपयोग नाही कसा? आम्ही किती हुश्शार, श्रीमंत, बुद्धीवान होतो. ....होतो म्हणतोयस ना? आज काय आहे सांग. विचार करतोय. काय सांगू? का नुसताच घालू वाद सगळ्यांशी? आणि नुस्ते वाद घालून होणारे काय ? नाही. त्यापेक्षा एक काम करतो. माझ्या सगळ्या लोकांना एकत्र करतो. जे काही वाद असतील ते बाजूला सारुन आधी वाडा दुरुस्त करतो. सगळ्यांना एकत्र विचार करायला भाग पाडतो. जुन्या गोष्टी ऐकल्यात बर्‍याच. त्या आज वापरता कशा येतील ते बघणं जास्त शहाणपणाचं नाही का व्हायचं? पटेल हो सगळ्यांना वर्षं-दोन वर्षांनी दोन एकर का होईना जागा घेतली तरच नाव सांगता येईल ना खानदानाचं. नाहीतर समर्थ म्हणून गेलेतच. सांगे वडिलांची किर्ती, तो येक मूर्ख॥ ( एक प्रतिक्रिया म्हणून लिहिता लिहिता हा लेख झाला.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3461
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

करून टाका सुरुवात! बाकी चार टाळक्यांना एकत्र करायला जाण्यापेक्षा आपले आपणच पुढे सरका. नवी जागाही घ्याल नि त्यात वाडाही बांधाल. उगा कशाला कोणाला बरोबर घेऊन तीन पायाची शर्यत खेळताय? शेवटी तुमचं तुम्हाला स्वतःलाच काय ते सिद्ध करायचं आहे.... हार्दिक शुभेच्छा! मुक्त चिंतन छान प्रकटले आहे हे वे. सां. न. :-)

छान लिहलय प्रकटन!