Skip to main content

विहीर - माझ्या मनातील...

विहीर - माझ्या मनातील...

अज्ञात
Published on 13/02/2011 - 23:05 प्रकाशित मुखपृष्ठ
बर्याच दिवसांनी आज गावाला निघालोय... तशी माझी दर महिन्याला चक्कर असायची गावाकडं, पण मागचे ६ ते ७ महिने काही जमलच नाही, मलेरियाने आजारी होतो आणि नंतर बराच वेळ अशक्तपणामुळे किवा कामामुळे जमलच नाही गावी यायला... खूप दिवसांनी आता सवड मिळाली म्हणून म्हंटल गावाला चक्कर मारावी, म्हातारीची ख्याली खुशाली पुसावी म्हणून निघालो. आमच गाव तस खूप प्रसिद्ध अस नाही... कोलवडी त्याचा नाव, तिथे जायच म्हणजे मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असा करावा लागतो.. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल हे गाव, तिथे दिवसातून फक्त एकदाच एस टी जाते, ती सुद्धा ५ मिनिटे थांबून पुढच्या मुक्कामाला आणि सकाळी ती तिथून निघते आणि पाच मिन्तांसाठी गावात येऊन थांबते, गाव तसा निसर्ग संपन्न, 50 ते 60 कौलांच हे गाव, गावातली सगळी तरुण मंडळी बाहेरगावी कामानिमित्त गेलेली असतात त्यामुळे गावात फक्त म्हातारे, बायका आणि लहान पोर जास्त दिसतात.. शेतीवाडी तशी कमीच, जो काही उद्योग धंदा असेल तो डोंग्रावरच्या जंगलावर अवलंबून. एस टी गावात पोहोचायला दुपारचे १ वाजले होते, उन्हाळ्याचे दिवस असल्याने चांगलच तापल होत, वारा सुद्धा चटके देणारा वाटत होता, एस टी मधून आज उतरणारा मी एकटाच होतो, बस थांब्यापासून घर तस ४ ते ५ किलोमीटर लांब, रस्ता, रस्ता कसला गाडीवाट होती ती, पूर्ण फुफात्याने भरलेली होती, अंगात तेरीकोट चा सदरा आणि पायजमा होता, उन्हामुल तो सुद्धा तापून अंगाला चिकटत होता, अंग पूर्ण घामाने चपचपलेल होत, पायात स्लीपर होती, फुफात्यातून जाताना निखार्यावरून चालल्यागत वाटत होत, कधी घरी जातोय अस झलेलं. ह्या गावाच आणि माझ नातं कधीच तुटलेल, भाऊ, म्हणजे माझे वडील, गेला आणि मी हे गाव सोडल, गावात फक्त माझी आज्जी राहते आता, आई तर लहानपणीच वर्लेली होती त्यामुळे आज्जीनेच भाऊचा संसार केला म्हणायचा, पदरात एकुलत एक पोर टाकून आईने प्राण सोडला. अर्ध्या हाताचा असतानापासून तिने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, गावात २,३ एकर कोरडवाहू जमीन आणि ५ पडवीच आमच घर एवढीच संपत्ती होती आमची, त्यातली जमीन पण आता राहिली नाही, राहत घर तेवढ शिल्लक आहे, ते सुद्धा आता शेवटच्या घटका मोजतय.... आजीसारख. माझी आज्जी खूप ताकदीची बाई, भर जवानीत नवरा गेला, मोल मजुरी करून तीनं पोटच्या पोराला पोसला त्याच लग्न लावल, तर म्हातारपणी सून पदरी एक पोरग टाकून गेली, मुलाला दुसावटयावर लग्न करायला सांगितल तर त्याने ते ऐकल नाही, शेवटी दारू पिऊन पिऊन स्वतःच आयुष्य आणि आमच सुद्धा खराब करून गेला तो. दारू सोडली तर तो खूप सच्चा माणूस. कधीच कोणाचे २ पैसे खाल्ले नाही की लांडी लबाडी केली नाही. गावाबाहेरचा म्हसोबाचा पार दिसू लागला तसा मी झपाझप पावल उचलू लागलो, एव्हान ३, ४ वाजले असतील, पारावर आज कोणीच दिसल नाही, गावाबाहेरचा हा म्हसोबाच पार, इथे खूप मोठा आणि जुना वड आहे, त्याच्या पारंब्या आता त्याह्च्याच बाजूला जमिनीत रुजू लागल्या आहेत... जणू काही दुसरा संसार थातू लागल्यात. कस असत न, नव्या पिढीला जेव्हा जुन्या पिढीच्या सावलीत गुदमरल्यासारख, होत असत तेव्हा ते सुद्धा आपल स्वतंत्र आभाळ शोधू पाहतात. हि झाडसुद्धा त्याला अपवाद नाही. पार खूप प्रशस्थ आणि मोठा आहे, चांगला चिरेबंद दगडी बांधकामात बांधलेला आहे, ह्या पारावर बसल्यावर उगव्तीकडे, आमच ग्रामदैवत भैरोबाच मंदिर आहे, आणि मावळतीला ३ ते ४ मैलांवर आई येडाइचां डोंगर आहे. आई येडाइ हि आमची गावदेवी, मार्गशीर्षात हिची खूप मोठी जत्र्रा असते, पंचक्रोशीतली लोक इथे येतात. आता दिवस चांगलाच कलत आलाय, म्हणून पटकन घराकडे निघालो, घर यायला थोडा वेळ होता, जाता जाता काही लोकच दिसत होती, बरीचशी ओळखीची नवती, घरी पोहोचलो, दाराला कडी होती, उघडून आत गेलो. हातातली पिशवी टाकली आणि सायपाक घरात गेलो, आज्जी ला आवाज दिला पण ती घरात नवती, पडविला टेकून बसलो. घराची रयाच आता उतरली होती. आमच घर तस प्रशस्थ. ५ खनीच. लांबलचक अस, सुरवातीला दुकान खोली, आता हिला दुकान खोली का म्हणतात ते माहीत नाही, पण आम्ही हिला दुकान खोली म्हणतो, नंतर मधली खोली, त्याच्या बाजूला देव्हार्याची खोली, पुढे सायकल खोली, आणि तिला लागून सायपाक घर, सायपाक घरातच बांधलेली मोरी होती, घर तस कौलारू, इंग्लिश कौलांच घर आहे हे, पण बऱ्याच ठिकाणी ती कौल फुटलेली आहेत, त्यातून दिवसा काळपट उन्हाच्या झिरमिळ्या घरभर पसरायच्या, त्यात बऱ्याचवेळा मी धुरांच्या लडिवाळ प्रवासाचा खेळ पाहत असायचो. आमच घर म्हणजे वाडीच्या अगदी एका टोकाला होत, आमच्या घरापासून घनदाट झाडीला सुरवात व्हायची, हे घर संपल की माग खूप मोठी घनदाट झाडी होती तेच आमच आंगण, घराला लागून फर्लांग भर अंतरावर आमची विहीर होती, हि विहिर जाधवची, म्हणजे आमची विहीर म्हणून ओळखली जायची, मागे खूप झाड होती, चिंचेची, आंब्याची, पिंपळाची, वडाची अशी भरुपूर, पण घनदाट झाडी होती, हि मागे खूप लाम्बपर्यंत पसरलेली होती, दिवसासुद्धा इथे गेलो तरी घनदाट सावलीत अंधारलेल असत, गारवा असतो इथे खूप. घरामागच्या विहिरीचा आता वापर कायमचा थांबलाय, विहीर तशी चांगली बध्लेली आहे, विहिरीला लागूनच पिंपळाच मोठ्ठा झाड आहे, त्याला पार सुद्धा आहे, हा पिंपळ वरून अलगद विहिरीवर सावली धरतो, त्यामुळे पानगळतीच्या दिवसात ह्याची सगळी पान विहिरीत पडतात. नेहमीच मला खूप गम्मत वाटायची ह्या पिंपळाची आणि विहिरीची, दोघ जन जणू काही म्हातारा आणि म्हतारीगत एकमेकांना आधार देत संसार करत्तात अशी गमतीदार कल्पना माझ्या मनी यायची, मला आठवतं ह्या मागच्या अंगणात खूप खेळलोय मी आणि सुमी,.... सुमी... तेवढ्यात कोणीतरी खोकत खोकत आत आल्याचा आवाज आला, नाथा मामा असनार हा म्हणून मी आवाज दिला, “नाथमा”, नाथामामाच होता तो, “इस्वास का, कधी आलास बाबा?” “ह्ये काय अर्ध्या तासापूर्वीच आलोय, आजी कुठ दिसत नाही?” मी विचारल, “आर ती गेलीय काल रातच्याला तुझ्या रकमाक्काकड, तिची पोर आलीय, पाहिलटकरीन हाय ती, रकमाक्का आजकाल आजारी हाय म्हणून आजीला बोलावल, आडी-नडीला जशी हाक्कान आपण हाक मारतो तस लोकही मारणार, काल राच्यालाच गेली तुझी आज्जी, येयील उद्यापार्वापार्यांत”, हे म्हणता म्हणता शेजारी येऊन तुळइला टेकून उकिडवा बसला. “आर पाणी बिनी काही घेतल का नाही? थांब मीच घेऊन येतो तुझ्यासाठी” आस म्हणून तो उठलाही मी नको नको म्हनेस्तोवर तो बाहेरही गेला होता, हा नाथामामा आमचा कोणी साख्यातला नवता, माझ्या आज्जीने त्याला गुरुभाऊ मानला होता. लहानपणापासून सख्या बहिण्भावापेक्षा जास्त मायेने दोघ राहिली, आजा गेल्यानंतर त्यानेच खूप आधार दिला आज्जीला. नाथमा पाणी घेऊन आला आणि त्याबरोबर चतकोर दोन चतकोर भाकरीचा तुकडाही आणला, वर ठेचा होता त्यात. “दमला अस्चीला, दोन घास खा, राच्च जेवण होपतूर तेवढाच पोटाला आधार”, मी खास्तोवर शेजारी बसला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाला, “ पड जरा वाईच मी जाऊन जरा गुरांच्या चाऱ्याचा पाहतो, धाराबी काधायच्यात,” येतोच मी, म्हणून मोकळा तांब्या घेऊन उठला, तो गेल्यावर वाटल थोड आडव व्ह्याव, पण मन बैचेन होत होत, तसाच उठलो, पिशवी खुटीला लटकवली आणि मागच्या दाराला आलो, मागच्या दारात खूप पाचोला साठलेला होता, दररोज झाडला तरी तो रोज जमा व्हायचा, तसाच पुढे गेलो, समोरच्या विहिरीमागच्या पिंपळाच्या पारावर पाय सोडून बसलो, हा पिंपळ खूप अवाढव्य, मिठीत मावणार नाही असा त्याचा बुंधा, एव्हड मोठ खोड असल तरी त्याची साल अगदी ताजी तवानी होती, कुठेही वार्धक्याच्या खुणा दिसत नवत्या, त्याच्या खोडावर शिरा ताठल्यावर जशा कातडी सोडून वर येतात तशा त्याच्या मोठाल्या नसा दिसत होत्या, त्या बुंध्यावर हळुवार एका रांगेत बारीक बारीक मुंग्या चालल्या होत्या, वर खूप खूप फांद्या होत्या, त्या सर्व पानांनी भरून गेलेल्या दोन्ही हाताचे तळवे एकत्र जोडाव्या एवढी काही काही पान, तसच काही नुकत्याच जन्मलेल्या पोरांच्या लालबुंद गालासारखी सुद्धा पान होती, पिंपळा समोरच ती मोठ्या आकाराची विहीर. पाणी खूप खाली गेलेल, तसा ह्या विहिरीला खूप पाणी फक्त पावसाळ्यात, बाकी वेळेस ५ ते ६ पुरुष खोल पाणी असत, विहीर तशी १२ ते १३ पुरुष खोल, चांगली दगडी बांधकामाची, त्यात गोलाकार वर येण्यासाठी चाल सोडलेली. मी भाऊला त्या चालीवरून अर्ध्यावर खाली जाऊन पाण्यात मूठ मारताना पाहिलंय. मूठ म्हणजे मांडी घालून पाण्यात उडी मारणे, जेव्हा पाण्यात अशी उडी मारतो त्या वेळी खूप मोठा पाण्याचा आवंढा वर येतो, आणि बुद्दुक असा दोनवेळा आवाज करून सगळ पाणी हलून ठेवतो, भाऊ तसा पट्टीचा पोहणारा. ह्या विहिरीला दोन फेऱ्या जरी मारल्या तरी दम लागायचा एवढी मोठी आहे हि. परामागे खूप अडचण होती. टनटनीची खूप मोठी झुडूप होती, जीथ कात्यांमुळे जातासुद्धा येणार नाही अशी. मी हळूच पारावरून उठलो आणि खोल विहिरीत पाहू लागलो. त्यात असंख्य पिंपळाची पाण, घाण होती, कुठे हळूच काहीतरी हलत होत, आणि बारीकश्या लाटा उसळत होत्या, बऱ्याच पाननिवल्या इकडून तिकड भटकत होत्या, कोळ्यांची खूप जाळी, सगळीकडे पसरली होती, हे सगळ पाहत असताना, एक विचित्र भावना माझा थरकाप उडून गेली, कोणास ठाऊक का पण मला वाटत होत की त्या काळ्या पाण्यातून दोन डोळे माझ्याकडे रोखुण पाहतायत, ----क्रमश....
लेखनप्रकार

याद्या 2689
प्रतिक्रिया 14

हि कथा खुप लांबलचक झालीय. इथे प्रसीध्द करताना सुद्ध मी दोन ऐवजी तीन भागात प्रसीध्द करायला हवी होती. पुढ्च्या वेळी मी नक्की काळ्जी घेइन.

पण तुझाच प्रतिसाद पहिला आला. मला तुझी कथा आवडली. पुढे काय असेल ह्याची उत्सुकता लागली हे एक आवडण्याचे लक्षण आहे. दुसरे कारण म्हणजे, तबीयतसे सविस्तर वर्णन करून वातावरण निर्मीती केली आहे. असेच लिहीत रहा. प्रतिसाद वगैरे जाऊदे, लक्ष देऊ नकोस. इथे असेच असते. हे लांबलचक कथेमुळे आहे असे नाही. असो, कोळसा उगाळावा तेवढा काळाच. आपणच उत्तर द्यायचे असते की अशा काजळीत आपणच का सारखे सारखे येत असतो. जो पर्यंत यावेसे वाटते, तो पर्यंत यायचे!

लेखणीत जोर आहे हो तुमच्या. :) वातावरण निर्मीती छान केली आहे. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत. आवांतर : शिर्षक वाचुन विहिरच चित्रपट परिक्षण आलय अस वाटल आधी. लेखाच्या/ कथेच्या लांबीची काळजी नका करु. सविस्तर येउदेत.