Skip to main content

दर्दी

दर्दी

लेखक यकु
Published on सोमवार, 31/01/2011 प्रकाशित
वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल तेवढी किंवा जास्तीत जास्त बिदागी तो देत असे. पण तरीही संगीतकार यायला तयार नव्हता. वाजेद अली त्याच्याकडे आल्यावर संगीतकार म्हणाला, "मी येईन जरूर, पण तुम्ही माझी एक अट पूर्ण करायला हवी. माझी फक्त एकच अट आहे, आणि ती म्हणजे: मी वाजवत असताना किंवा गात असताना कुणीही मान हलवायची नाही." वाजेद अली शाह म्हणाला, "ही काही फार काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. जे कुणी ऎकायला येणार असतील त्यांना मी आधीच बजावून ठेवील की, तुमची मान जर हलली, तर तिथंच ती उडवण्यात येईल!!" तो होताच असला बावळट - त्यानं खरंच मान उडवली पण असती. त्यानं खरोखर तशी तयारी पण केली. त्यानं पूर्ण लखनौ शहरात दवंडी पिटवली, "मैफिलीत येणार्‍यांनी यावे, पण ती जोखमीची आहे हे पण लक्षात ठेवावे. नंग्या तलवारी घेऊन सैनिक उभे राहतील आणि जो कुणी मुंडी हलवील, दाद देईल त्याची मान उडवण्यात येईल!!" एकट्या लखनौमध्ये संगीताचे किमान दहा हजार दर्दी होते - पण फक्त शंभर लोक आले. जीव द्यायचा होता का? डास गुणगुण करतोय म्हणून किंवा इतर काही कारणाने तुम्ही मुंडी हलवाल... संगीतकार महान आहे म्हणूनही तुम्ही मान हलवायची नाही हे विसराल आणि सतत ते लक्षात ठेवणंही कठीण आहे. संगीत ऐकून तर सापदेखील डोलू लागतात, नाचू लागतात. अवघड होती ही गोष्ट. त्यामुळे लोकांनी येणे टाळले, पण शंभर लोक आलेच! हे संगीताचे खरे दर्दी होते, त्यांची जीवाची जोखीम घेतली - ही जोखीम घेण्यासारखी होतीच. आणि सैनिक नंग्या तलवारी घेऊन उभे होते. अजब मैफिल जमली होती! संगीतकारानं वाजवायला सुरूवात केली आणि पहिल्या पंधरा मिनिटातच काही माना हलू लागल्या. कारण संगीत होतंच तसं जबरदस्त. वाजेद अली शहा खूपच काळजीत पडला कारण खरंच उडवायला जावं तर एकच डोकं हलत नव्हतं: बरीच डोकी हलू लागली, थोड्या वेळात आणखी काही हलली अशी हलणारी डोकी वाढतच गेली. मग तर तो खूपच काळजीत पडला: "ही सगळीच्या सगळी डोकी उडवावी लागणार?" आणि पूर्ण राजधानीतील हे अत्यंत दर्दी लोक होते! त्यांना तो ओळखत होता; ते खरे-खुरे संगीतप्रेमी होते. अर्ध्या रात्री संगीतकारानं वाजवणं थांबवलं तोपर्यंत सर्वच्या सर्व शंभर लोकांच्या माना हलू लागल्या होत्या. वाजेद अलीनं संगीतकाराला विचारलं, "आता आपण काय म्हणाल? या सर्वांची डोकी उडवू का नको? माझे सैनिक तयारच आहेत, आणि मी तुम्हाला वचन दिलंय, म्हणून मी ते पूर्ण करायला तयार आहे." संगीतकार हसू लागला आणि म्हणाला, "काळजी करू नका! मी अट फक्त एवढ्यासाठीच घातली की फक्त संगीताचे खरे दर्दीच यावेत. याच लोकांकरिता मला वाजवायचं आणि गायचं आहे. तुमचे सैनिक हटवा! मी फक्त वाट पाहात होतो: मान न डोलावता काही लोक बसून राहिले असते, तर त्यांना मैफिलीतून बाहेर जावं लागलं असतं. आता मी वाजवतो, कारण सगळीच्या सगळी शंभर डोकी हलली आहेत. अशाच मैफिलीसाठी मी जन्मभर वाट पाहात होतो. हे लोक पूर्णत: विसरूनच गेले, जीव जाणार आहे हे पण विसरून गेले - जीवन आणि मरणाचा प्रश्न होता हा." (अनुवादीत) Philosophia Ultima (Talks on Mandukyo Upnishad by Osho)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4034
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मस्तं रे येशा. चांगली गोष्ट आहे. यावरून कट्यार मधलं "गर्दी पाहीजे पण दर्दी पाहीजे" हे वाक्य आठवलं. :)

यशवंत, छान गोष्ट मजा आली, डोळ्यासमोर उभं राहिलं चित्र त्या मॅफिलिचं. हे म्हणजे हेराफेरीला जाउन न हसण्यासारखं आहे. हर्षद.

धन्यवाद यशवंत एकनाथ. कथा खूप आधी वाचलेली होती, वाचुन चातुरयाचे कौतुक देखील वाटल होतं. मात्र चांदोबा मध्ये ह्या डोकेबाज कथेची लावलेली वाट पाहून संताप आला होता. Only Some Massages Have Happy Endings ...

गोष्ट आवडली. :) शतरंज के खिलाडीमध्ये वाजीद अली शाहची भूमिका अमजदखानने केली होती. तो चित्रपट आणि त्यातली पात्रे डोक्यात इतकी फिट्ट बसली आहेत की वाजीद अली शाहचे नाव निघाले की अमजद डोळ्यांसमोर येतो. ही कथा वाचतानाही. :)

खुब ..बहोत खुब... आवड्ली.. अजुन अशा काही कथा असतील तर त्यांचा पत्ता द्या ना...

रजनीशांची प्रवचनं म्हणजे अफलातूनच असतात. त्यांची प्रवचनामध्ये अशी वेगवेगळ्या दंतकथा सांगण्याची पद्धत म्हणजे खरंच लाजवाब!

या छोट्याशा किश्श्याचा आनंद घेतल्याबद्दल सर्वांचे आभार! :) रजनीशांची कथनशैली वादातीत आहे; त्यामुळंच हा किस्सा सर्वांना आवडला.

यावरुन खुप वर्शापूर्वि पंडित भिमसेन जोशीं च्या एका मॅफिलीची आथवण झाली. ६८-६९ सालची गोश्ट आहे. रंगभवनला गाण होत. १२.३० वाजता बुवा थांबले आणि म्हणाले ज्यांना शेवटची गाडी पक्डायची आहे त्यांनी निघावं, मी अजुन गाणार आहे. जाणारे गेल्यावर बुवांनी पाहिलं ३०-४० लोकच आहेत. म्हणाले तिकडे लांब कशाला बसतां, स्टेजवरच या. रंगभवनच्या रंगमंचावर बुवा आणि आम्ही ३०-४० भाग्यवान अभोगी, सोहोनी आणि शेवटी "जो भजे हरीको सदा..." पहाटे ५ वाजता बुवांच्या पाया पडुन निघालो तेव्हा पाय जमिनीवर टेकत नव्हते. आता आथवणीनी सुद्धा अंगावर कांटा येतो.