पाऊस एक रा* आहे. :)
मला पाऊस खूप आवडतो. :) (चला शाळेतल्या निबंधासारखी सुरुवात झाली). पूर्वी पुण्यात जेव्हा वाड्यात रहायचो तेव्हा पावसाळ्यात १-२ कौले फुटली असतील तर तिथून पाणी गळायचे. तेव्हा आई त्या खाली बादली लावून ठेवायची. तेव्हाच्या वाड्यांमधे कॉर्पोरेशनचे पाणि दिवसातून २ दा २ तास येत असे. त्यामुळे त्यावेळात दिवसभराचे वापरायचे पाणी भरून ठेवायला लागायचे. तेव्हा पावसाळ्यात अशा साठवलेल्या पाण्यामुळे पाण्याची ऐश असायची. एखाद्या ठिकाणी कौल थोडंच फुटलं असेल तर तिथे त्याखाली फरशीवर नुसतं फरशीपुसणं टाकून ठेवायची. मी मस्त वाड्याच्या गॅलरीत (किंवा सज्जात) उभाराहून कौलावर तडाडणारा पाऊस ऐकत उभा रहायचो. वाड्याच्या आजूबाजूला लावलेली झाडं जी गॅलरी पासून खूप दूर होती ती वार्याच्या फटक्यानी हलकेच वाड्याच्या भिंतीना थापट मारून जायची. अंगणात साचलेले पाणी वाड्याबाहेर पाणी जावं यासाठी असलेल्या बोगद्यातून बाहेर जाण्यासाठी झेपाऊ लागे तेव्हा त्यात भोवरे तयार होत. मग आम्ही कागदाचे कपटे वरून टाकायचो आणि भोवर्यात जाऊन फिरायला लागले की तयार होणारी नक्षी पाहून हरखून जायचो. वाटायचॉ आपण कागदाचे कपटे असलो असतो तर किती मजा आली असती मस्तं या वाहत्या पाण्याबरोबर जाऊन त्या भोवर्यात गरगर फिरलो असतो. मजाच मजा. आईला मग तसं सांगितलं की म्हणायची की "अरे कपटे केरातच जातात. ते त्या पाण्यात फिरतात आणि बाहेर जाऊन गटारातच जातात. त्यात कसली आलीये मजा". मला वाटायचं "तिला वेडीला कळतच नाही काय मजा आहे त्या कपट्यांची." पुढे मोठा झाल्यावर कस्पटासमान वागणूक मिळाल्यावर वाटलं बरं झालं की कपटे झालो नाही. मी वाढत राहीलो आणि पुण्यातला पाऊसही. पूर्वी खरंच आषाढातली पावसाची तोफ श्रावणात अगदीच पारीजातकाच्या सड्यासारखी हळूवार होत असे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असे कींवा शाळांमधेही गंमत जम्मत चालू असे. एखाद्या श्रावणातल्या शुक्रवारी शाळेत फुटाणे वाटायचे. एखाद्या सोमवारी केळी. घरी सुधा पुरणाची दिंड, पुरणाची पोळी, साखरभात, भाजणीचे वडे असे नेहेमीची चापरीतले (नेहमी चापायचे) किंवा कधी केनीकुर्डूची भाजी, भारिंगीची भाजी अशा अनवट भाजा खायला मिळायच्या. चातुर्मास घरी पाळत नसले तरी श्रावण महीना आवर्जून पाळला जायचा. म्हणून श्रावणात कांदा, लसूण कशात वापरायचे नाहीत. तसेच वांगं पण नसे श्रावणात (त्यामुळे मी खूष).
पावसाळ्यात शाळेत जाताना-येताना रेनकोट घालून कंपू करून चालत जायचं. एखादी रिक्षा अंगावर पाणी उडवून गेली तर शिताफीने कंपू रिक्षाचा पाठलाग करायचा आणि त्या रिक्षाला गाठून, रिक्षावर चिखल चिखल उडवून रिक्षावाला मारायला मागे धावला तर या बोळातून त्या बोळात या वाड्यातून त्या वाड्यात वेगवेगळ्या दिशांनी पळायचं. रिक्षावाला हैराण व्हायचा. मग ठरलेल्या ठिकाणि परत येऊन परत शाळेकडे-घराकडे जायचं.शाळेच्या ग्राऊंडवरच्या चिखलात लाल रबरी छोट्या बॉलनं फुटबॉल खेळायचा. चिखल उडवत बॉल तडकावयचा आणि २ विटांमधल्या गोलमधे मारायचा. त्यात नडग्यांना नडग्या, घोट्याला घोटे आपटून सडकून निघायचे. कोणतरी एक रोज झांजरलेला असायचा किंवा लंगडत असायचा. शाळेतून घरी जाताना जोरजोरात गप्पा मारत दंगा करत घरी जायचं. मित्रांच्या नावाच्या मागे भकार, मकार लावायला आम्ही लहान वयातच शिकलो. म्हणजे पाचवी सहावीत. जसा कंपू घराच्या रेंज मधे येई तशी शाळेत उधळलेला आमचा भाषेचा वारू पुन्हा साजूक तूपात शिरे. ;)घरी पोचताच आली डुकरं उकीरड्यात लोळून म्हणून उद्धार होई. मग कपडे बदलून गरमागरम वरणभात खाऊन पाऊस बघत, समोर स्वाध्यायाच्या (मराठी शाळेत शिकलेल्याना स्वाध्याय म्हणजे काय असा प्रश्न पडणार नाही. पण हा स्वाध्याय म्हणजे घरचा अभ्यास नव्हे तो वेगळा. स्वाध्यायाचा हप्ता प्रत्येक विषयात महीन्यातून एकदाच असे पण घरच्या अभ्यासाची वसूली रोजची असे. घरचा अभ्यास कधीच करत नसू पण स्वाध्यायाचा कर मात्र न चुकता भरत असू) वह्या घेऊन पेंगायचं. चारचा ठोका पडला की सारा कंपू बनियन-हाफपँट अशा कुमारसुलभ वेषात परत दंगा करायला हजर. मग दुसर्या दिवशी सकाळीच घरचा अभ्यास न केल्यामुळे गणिताच्या नाईक बाई आमची रवानगी वर्गाबाहेरच्या व्हरांड्यात करत. मग पुन्हा तो पाऊस आणि मी दोघेच सोबती. मस्तपैकी व्हरांड्यात उभे राहून गळणार्या पागोळ्या बघत बघत तास कसा संपायचा कळायचंच नाही. पावसाळ्यात धांद्रटपणामुळे पळताना पाय घसरून पडणे ठरलेलेच. मस्तंपैकी पार्श्वभाग सडकून निघे. एखाद्यावेळेला डोक्याला खोक पडणे वगैरे होत असे. इतरवेळेला घसरून पडल्यावर कपडे खराब झाले म्हणून ठरलेला घरचा 'आहेर' खोक वगैरे पडली तर मात्र मिळत नसे.
कॉलेजात मात्र या पावसाने अनेक वेगळे रंग दाखवायला सुरुवात केली. शिंग फुटलेल्या आमच्या डोक्यातून सिग्रेटिची झिंगही खेळू लागली. मस्तंपैकी एस एम जोशी पुलाखाली जाऊन आमचा कंपू शिग्रटी फुकायचा. कारण नदीपात्रातला रस्ता तेव्हा नव्हता त्यामुळे तो भाग एकदम निर्मनुष्य म्हणून आमचासाठी सेफ. पुलाखाली पाऊस पण लागत नसे, पण आजूबाजूला मात्र पाऊस मस्त रपरपत असे. थोडेसे नदीचेही पाणी वाढलेले त्यामुळे पाण्याला गटाराची घाण येत नसे. तिथल्या निर्जनतेचा वेगळा फायदा काही काही कॉलेजातली जोडपीही घेत. ते त्यांच्या खेळात दंगलेले आणि आम्ही त्यांना बघत बघत झुरके मारण्यात. त्यांचे ऊर प्रणायाने उसासत आणि आमचे शिग्रेटीने.
अजूनही काही लोक पावसाला शिव्या देतात किरकिरतात पण मी मात्र पाऊस पडू लागला की पावसासाठीची माझी खास जीन्स आणि टि-शर्ट घालतो आणि गाडीवर टांग टाकून बोंबलत बाहेर फिरायला निघतो.
प्रतिक्रिया
मस्त
+१
+२
लेख अतिशय छान लिहिलाय फक्त
नाही नाही. मध्यंतरी आमच्या
हा हा हा ...
ती कविता कुठे वाचायला मिळेल
हा हा हा शिर्षक वाचुन दचकलोच
सही लेख
मी पण खेळायचे सळईचा खेळ.
रा* ?? या * चा अर्थ समजला
आता घरात २४ तास पाणी असते पण
पुपे पेश्शल
सहीच रे लेख पुपे.. आवडला
माझे अहमदनगरचे नातेवाईक
पावसाळ्यात शाळेत
जबर्या !!
फार्फार आवडले
मस्त!!!
२६ जुलै आणि पाऊस!
सुरेख...
पाऊस एक रा* आहे. मला वाटल
मस्त रे पुप्या!!
गमबुटात मुद्दाम पाणी साचवून
मस्त बाळकडू
पाऊस एक राग आहे, मल्हारासारखा!!