"ओरडू नका... पुस्तकाची किंमत? तीन? हे घ्या..."
जीवनातील प्रत्येक वस्तूचे मोल हे पैशात करण्याची जी प्रवृत्ती माणसाच्या मनी वसत असते तिला अनेक कंगोरे असतात; त्यापैकी एक म्हणजे त्याची बौद्धिक कमजोरता. आपण पैसे फेकले म्हणजे झाले, ती वस्तू काय होती, कशी होती, जिची आहे/होती त्याच्या मनात त्या वस्तूबद्दल काय कोमल हळव्या भावना आहेत, त्याने ती वस्तू कशा प्रकारे ती पैदा केली होती, कशी जपली होती, या व अन्य बाबींचे अजिबात सोयरसुतक अशा गुर्मीत वाढलेल्या इसमाच्या गावी नसते. अशा प्रसंगी "हतबलता" म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची "डिश" आहे हे उमगते आणि संबंधित व्यक्ती खिन्नपणे समोरच्या घडामोडीकडे पाहत राहते. कारण त्याला हे ठाऊक असते की वस्तूचे मोल "रुपयात" करणार्याकडे इतकी अक्कल असणे शक्य नाही कि काही गोष्टींची किंमत पैशात कदापीही होऊ शकत नसते.
माझ्या मामांची (जी पर्यायाने माझी स्वत:चीदेखील...) छानपैकी वैयक्तिक लायब्ररी आहे. ते ज्या ज्या ठिकाणी लेखा परीक्षणासाठी जात असतात त्या त्या गावाची आठवण म्हणून फावल्या वेळेत तेथील स्थानिक पुस्तक विक्री केंद्रांना भेट देतात व प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या पुस्तकांची (किरकोळ का होईना..) खरेदी करीत असतात. त्यामुळे घरी नव्या जुन्या पुस्तकांचा गंध कायम दरवळत असतो. ते स्वत: जरी लेखक नसले तरी साहित्य क्षेत्राशी या ना त्या संबंधाने संपर्कात असतात आणि साहजिकच काही लेखकासमवेत अगदी "अरे तुरे" पर्यंतचे संबध होते/असावेत. त्यांच्या संग्रहात अनेक लेखकांपैकी श्री. पु. शि. रेगे यांची बहुतांशी पुस्तके आहेत. या पैकी रेगेंच्या "सावित्री" या कादंबरीवर त्यांचा फार जीव. कारण त्यांच्याकडील प्रत हे खुद्द श्री. पु. शि. रेगे यांनी स्वाक्षरी करून "एका करवीरकरास सप्रेम..." असे लिहून दिली असल्याने त्यांच्या या छोटेखानी कादंबरीबद्दल विशेष हळव्या भावना आहेत (आता "होत्या" म्हणावे लागेल.... कारण ती प्रत आता "कै." झाली...).
एकदा ते आपल्या टीमसमवेत रत्नागिरीला ऑडिटला गेले होते; आणि त्याच संध्याकाळी त्यांचे शासनाच्या "इरिगेशन" खात्यात काम करणारे त्यांच्याच वयाचे एक मित्र आमच्या घरी आले आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी (जी मराठी विषयात बहि:स्थ एम. ए. करीत होती...) पु. शि. रेगे यांची "मातृका" नावाची कादंबरी हवी होती, जी आमच्याकडे, अर्थातच, होती. मामा पुस्तके देण्याबद्दल तसे कडक असल्याने मी पुस्तक त्या गृहस्थाला देणे शक्यच नव्हते. पण त्यांनी त्याक्षणीच मामांना मोबाईल लावला, फोनवर जे काय बोलायचे ते बोलले व माझ्या हाती फोन दिला. मामांचा आवाज तसा नाराजीचाच होता, (कारण इरिगेशनच्या त्या इसमाचे वाचन काय असणार यांची कल्पना त्यांना होतीच.....) पण त्या मुलीच्या अभ्यासासाठी ते पुस्तक मागत असल्याने नाईलाजाने का होईना पण त्यांनी मला "मातृका" देण्यास सांगितले. मी पुस्तक कपाटात शोधत असतानाच त्या मुलीचा सेल त्या इसमास आला, दोघे काहीतरी बोलले व त्यांनी तो फोन मला दिला. ती मुलगी सांगू लागली की, "प्लीज, असल्यास 'सावित्री' पण दिली तर बरे होईल....". आता परत सावित्रीबद्दल मामांची परवानगी घ्या असे सांगणे मला त्याक्षणी तरी बरे वाटले नाही... कारण वयाचा फरक, आणि आविर्भावावरून ते गृहस्थ असे दिसत होते कि मामा त्यांना "मान" देत असणार. त्यानंतर विशेष असे काही बोलणे झाले नाही, कारण थोड्याच वेळात "मातृका" आणि "सावित्री" दोन्ही पुस्तके मला मिळाली व ती ते घेऊन ते गृहस्थ आभार मानून निघून गेले.
या दोन्ही कादंबर्या कांही आमच्या नित्याच्या वाचनातील नसल्यामुळे आमच्या एरव्हीच्या जीवनात काही फरक पडला नाही. मात्र हेही तितकेच खरे की, घरी परतल्यानंतर ज्यावेळी मामांना समजले की, मी "सावित्री" देखील त्या इसमास दिली आहे, त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर चिंता दिसली, कारण "पु.शि. रेग्यांची सही" असलेली ती प्रत होती, जिचे महत्व त्यांनाच ठाऊक असणार. तथापि त्यांनी मला तीबद्दल काही दोष दिला नाही. दिवस चालूच होते. साधारणत: एक महिन्याच्या कालावधीनंतर एका रविवारी ते गृहस्थ आमच्या घरी आले. साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही सर्वच घरी होतो. आणलेल्या पिशवीतून त्यांनी एक पुस्तक काढले आणि मला म्हटले,
"अरे इंद्र, हे ठेव... "मातृका" झाली अभ्यासून...". पुस्तक घेतले.
मामांनी विचारले. "अरे, पण त्याबरोबर याने तुला "सावित्री" देखील दिली होती ना? ती कुठे आहे?"
"होय, ती कुठली ती सावित्री नेली होती, मुलीने वाचून ठेवली बाजूला, कारण तीला या मातृकाची गरज होती, आणि तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीने तो पर्यंत ती सावित्री नेली रे !" अगदी सहजपणे ते सांगते झाले.
मामांचा चेहरा संतापाने फुलत गेलेला मी पाहू लागलो....तरीही त्यांनी तो न दाखवता शांतपणे त्या इसमास सांगितले..
"जगदाळे, हे तुम्ही मला काय सांगत आहात (मामा चिडले की "अहो जाहो" बोलतात...) हे तुम्हाला कळते काय? काय संबध तुमचा तुम्हाला दिलेले पुस्तक तुम्ही तिसर्यास देता?"
"त्यात काय झाले? शेवटी पुस्तक वाचण्यासाठीच असते ना?"
"असेल, पण ते तुमच्याकडील असले तर.... मला आज संध्याकाळपर्यंत "सावित्री" आणून देण्याची प्लीज व्यवस्था करा.... आणि याच्यावर वाद घालू नका."
"काय तुम्ही तरी पाटील ! अहो एका पुस्तकाची ती बाब काय आणि तुम्ही मला काय वादाच्या गोष्टी सांगत बसलात. आणून देतो संध्याकाळी तुमची सावित्री."
ताड ताड ते गृहस्थ जीना उतरून गेले....आणि आम्हा सर्वांचा रविवार या वादामुळे पुरा नसून गेला.
रविवारची संध्याकाळ गेली....सोमवार, मंगळवारच्या देखील आल्या, गेल्या. पण "सावित्री" काय इकडे नांदायला यायला तयार होईना. मी स्वत: त्या इसमाच्या घरी गेलो. वर्किंग डे असल्याने साहजिकच ते घरी नव्हते, मात्र घरातील अन्य मंडळी (त्या मुलीसह....) भेटले. मुलीला पुस्तकाबद्दल विचारले, तर तिनेही जणू काय मी असे विचारून त्या "महान" घराण्याचा अपमान करीत आहे कि काय असा पवित्र घेतला. "माझ्या मैत्रिणीने ते पुस्तक (नाव देखील तिने घेतले नाही...) कुठेतरी हरवले आहे असे वाटते, पण आज परत एकदा तिला पाहण्यास सांगते व तुम्हास फोन करते." संपला विषय.
परत दोन दिवस गेले. मामाचा व त्या इसमाचे तीन चार फोन झाले, आणि पुढील शनिवारी एकदाचे ते महाशय पुन्हा आमच्या घरी आले.
"पाटीलसाहेब, मुलीच्या त्या मूर्ख मैत्रिणीने तुमची ती "सावित्री" कुठे हरविली बाबा...." ~~ (म्हणजे "ती" मैत्रीण मूर्ख.... बेफिकीरपणे दुसर्याचे पुस्तक तिसरीला देणारी यांची मुलगी "शहाणी...")
"अहो जगदाळे, तुम्ही काय बोलता याची तुम्हाला कल्पना येत्ये काय? तुम्हाला माहित आहे का माझा त्या पुस्तकावर किती जीव आहे ते?"
"कमाल आहे, पुस्तकावर जीव आहे म्हणजे काय? पुस्तकासारखे पुस्तक, हरवत नाहीत का पुस्तके? नवीन आणून घेऊ या."
"धन्य आहे तुमच्या विचारसरणीची... तुमच्या दृष्टीने त्या पुस्तकाची छापील किंमत हीच किंमत होत असणार.... छापील किंमत तीन रुपये आहे "सावित्री" ची... म्हणून मी तिची किंमत तीन रुपयात करू काय आता?"
"हात्तेच्या.... काय गेला आठवडाभर तुम्ही व तुमचा हा भाचा दंगा घालत बसलाय त्या सावित्री अन तिच्या सत्यवानाबाबत...! मला वाटले पुस्तक कुठे शे-पाचशेचे आहे कि काय..."
"वा !! म्हणजे जगदाळे.... किमात शे-पाचशे असली तरच पुस्तकाचे महत्व काय? आणि तीन चार रुपले असले कि कचरा...?
"नाही तर काय.... तीन रुपयाच्या फाटक्या पुस्तकासाठी गेला आठवडा तुम्ही माझे डोके खाल्ले...."
"काय ?? मी डोके खाल्ले तुमचे...?"
"आता ओरडू नका, किती म्हटला पुस्तकाची किंमत ? तीन रुपये ? हे घ्या..."
आणि ते अक्कलशून्य गृहस्थ आपल्या पाकिटातून पैसे काढू लागले.
"थांबा जगदाळे.... आभारी आहे. तुमचे पैसे मला मिळाले, तुमच्या बोलण्यातून.....नमस्कार.."
आणि मामा त्या खोलीतून आतल्या बाजूस गेले....त्यांची खिन्नता दूर होण्यास बराच कालावधी जाणार होता हे दिसतच होते. या प्रसंगाचा मी केवळ एक साक्षीदारच नव्हतो तर "सावित्री" घालविण्यास मी देखील काही अंशी (कि बर्याच....!) जबाबदार होतो. माझी अक्कलदेखील त्यावेळी कुठे गवत चरायला गेली होती कुणास ठाऊक की त्या "स्वाक्षरी प्रती"ची "खरी किंमत" मामाच्या दृष्टीने काय आहे ते समजून घेता आले नाही. (आणि हेही तितकेच खरे आहे की, निव्वळ त्या प्रतीवर श्री. पु. शि. रेगे यांची सही होती म्हणून मामांना ती हरविल्याचे दु:ख झाले नव्हते तर आता ती प्रत "ऑउट ऑफ प्रिंट" होती, आणि परत विकत घेतो म्हटले तरी शक्य बाब नव्हती...)
चीड येते त्या या गोष्टीची कि, लोक अशा बाबींची किंमत पैशात करू लागतात ते पाहून. काही पुस्तके किंमतीच्या पलीकडे किती असतात ते समजण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शिक्षण देता येत नाही.... ती बाब उपजतच असली पाहिजे या मताचा मी झालो आहे.
आपणास अशा प्रकारचा "कटू" अनुभव आला असेल तर जरून लिहा.
प्रतिक्रिया
My Lost Dollar
श्रावणशी
:)
Pagination