मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुसळधार पावसात-लोहगडावर

प्रचेतस · · कलादालन
शनिवारचा पराठेवाला कट्टा यथासांग पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवसाचा रविवार तसा आळसातच घालवायच्या तयारीत होतो. तितक्यात सकाळी ९.३० ला मित्राचा फोन आला "१०.३० पर्यंत तयार हो, बाहेर जायचेय भटकायला". कुठे जायचेय, कसे जायचेय काहीही ठरले नव्हते. ठरल्याप्रमाणे तो वेळेवर आला, गाडीत बसलो आणि कुठे जायचे याची चर्चा सुरु झाली. मुळशी, पवना वगैरे ठिकाणांचा विचार मागे मागे पडत गेला. पाऊस तर मुसळधार पडत होता आणि विचार फक्त भिजण्याचाच होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गानेच प्रवास चालू होता. डोंगर अगदी हिरवेकंच झाले होते. ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत होते. कामशेतच्या पुढे तर पावसाने रौद्र स्वरूप धारण केले होते. सगळी सृष्टीच चैतन्यमय झाली होती. लोणावळ्याची गर्दी टाळण्यासाठी गाडी मळवलीच्या दिशेने वळवली. लोहगड विसापूर किल्ले धुकटाआड दडले होते. मळवलीचे रेल्वे फाटक ओलांडून भाजे गावात शिरलो. पाउस किंचीत थांबला होता. भाज्यात पर्यटकांची तशी बरीचशी गर्दी होती. तीही अर्थात भाज्यातल्या मुख्य धबधब्यावर आणि उरलीसुरली भाजे लेणीच्या दिशेने जात होती. कामशेतजवळच्या भातराशी डोंगरावरून कोसळणारे हे मनोहारी धबधबे- इंद्रायणीच्या काठाकाठानं जाणारी रेल्वेगाडी- भाजेगावातील मुख्य धबधबा- आम्ही लोहगडाच्या दिशेने जायचे ठरवले. लोहगडाला जाणारी रूंद पायवाट भाजे गावातूनच सुरु होते. एका वळणावर एक मोठा धबधबा आहे. त्यापाठच्या विसापूरावरून येणार्‍या ५/६ मोठ्या धबधब्यांना कवेत घेउन तो इथे कोसळत असतो. इथूनच किल्ल्याच्या पहिल्या पठाराची चढण चालू होते. पाठीमागे बघितले असता भाजे लेणीचे विशाल चैत्यगृह आणि दुमजली विहार ठळकपणे नजरेस येत होते. सूर्यगुंफेच्या शेजारून एक मोठा धबधबा कोसळत होता. भाजेगावाच्या पुढे लोहगडाच्या वाटेवरील हा अतिशय सुंदर जलप्रपात- आता पावसाला परत सुरुवात झाली होती. खालची भातखाचरं पाण्याने आणि तरारलेल्या भातानं तुडुंब भरलेली दिसत होती. आम्ही दोघे साधारण अर्ध्या पाऊण तासातच पठार चढून सपाटीवर आलो. इथे आता डावीकडे विसापूर किल्ल्याची कातळभिंत दृग्गोचर होत होती तर लोहगड पूर्णपणे ढगांचा बुरखा पांघरून पदरातील झाडीच फक्त दाखवत होता. या भागाला गायमुख खिंड म्हणतात. डावीकडची वाट विसापूर किल्ल्याकडे जाते. घळीच्या मार्गाची ही वाट आहे. तर उजवीकडची वाट आपल्याला थेट लोहगडाच्या पायथ्याला-लोहगडवाडीत नेउन सोडते. आम्ही लोहगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. लोहगडवाडीत येण्यासाठी आता गाडीवाट पण तयार झाली आहे. लोणावळा - पवनानगर मार्गावर दुधिवरे खिंडीच्या अलीकडेच लोहगडला जाणारा फाटा आहे. गाडीवाटेमुळे लोहगडवाडीचे बरेचसे व्यापारीकरण झाले आहे. आता तिथे बरीचसी खाद्यपेय पुरवणारी बरीचशी टपरीवजा दुकानं झाली आहेत. लोहगडवाडीतूनच लोहगड किल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍या सुरु होतात. लोहगड हा सुमारे २००० वर्षांपासूनचा पुराणपुरुष. कार्ले, भाजे, बेडसे सारखी सौंदर्यस्थळे निर्माण करणे याच्या आणि विसापूराच्या संरक्षणाशिवाय अशक्यच. तेव्हा हे दोन्ही जोडकिल्ले हे यांपेक्षाही प्राचीन. पण इतका प्राचीन हा किल्ला असूनही याच्या दरवाजांचे बांधकाम मात्र तसे अलीकडचे. नाना फडणीसांच्या देखरेखीखाली याच्या दरवाजांचे बांधकाम झाले आहे. लोहगडाचे दरवाजे, त्यावरचे बुरुजांचे बांधकाम, बुरुजांमध्ये कोरलेल्या जंघ्या, दरवाज्यात कोरलेल्या देवड्या, बुरुजांजवळच असलेले धान्यकोठार, जवळच असलेली चोरवाट, कमानी सर्वच आजही खूप भक्कम स्थितीत आहे. जणू काय गड आतापर्यंत जागताच आहे असे. गडाला दरवाजे चार. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा(हा गोमुखी बांधणीचा दरवाजा सर्वात प्राचीन, कदाचित शिवकालीन असावा) आणि शेवटचा महादरवाजा. गडमाथ्यावरून पाहिले असता दरवाजांची ही गुंतागुंत मन मोहवून नेते व तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या कौशल्याने आश्चर्यचकितही करते. लोहगडवाडीतून फक्त अर्ध्या तासात गडमाथ्यावर पोहोचता येते. गडावर तशी बर्‍यापैकी गर्दी होती. अशातच पाण्याने फुफाटलेल्या पायर्‍यांवरून किल्ला पाहून उतरताना अंध मुलामुलींचा एक २०/२५ जणांचा गट दिसला. कुठल्यातरी एका स्वयंसेवी संघटनेने त्यांना गडदर्शनासाठी आणले होते. सर्वांच्या चेहर्‍यावर अतिव समाधान आणि महाराजांच्या गडाला भेट देण्याचा आनंद दिसत होता. एकीकडे गडावर दारूच्या धुंदीत असलेले काही गट आणि हा अंधांना आणणारा स्वयंसेवकाचा गट समाजातील विरोधाभासाची जाणीव प्रकर्षाने करून देत होता. असो. थोड्याच वेळात आम्ही मुसळधार पावसातच गडावर पोहोचलो. वरती ढगांचा संचार मुक्तपणे चालू असल्याने आजूबाजूचे काहीही दिसत नव्हतेच. गडावर दरवाज्याच्या जवळच एक दर्गा आहे. पाण्याची काही शिवकालीन बांधीव टाकी तर काही जमिनीच्या आत खोदली गेलेली सातवाहनकालीन टाकी आहेत. जवळच सातवाहनकालीन धान्यकोठारं आहेत. थोडेसे पुढे ल़क्ष्मीकोठी म्हणून एक प्रशस्त खोदीव गुहा आहे. एकातएक अनेक खोल्या असलेली ही गुहा वैशिष्टयपूर्ण आहे. गडाच्या थोड्या पुढच्या भागात नाना फडणीसांनी बांधलेला एक मोठा तलाव आहे. त्याच्या अलीकडेच प्राचीन शिवमंदिर आहे. गडाची एक माची विंचवाच्या नांगीसारखी दिसते तोच विंचूकाटा. याच्या दोन्ही बाजूंना खोल दर्‍या आहेत. या माचीवरही पाण्याची बरीच टाकी आहेत व शेवटी एक चिलखती बुरुज आहे. दोन टप्पे उतरून माचीवर प्रवेश करता येतो. धुव्वाधार पावसामुळे विंचूकाट्यावर मात्र जाता आले नाही. लोहगडाची अजूनही सुस्थितीत असलेली तटबंदी- इथे लेन्सवर थोडे पाणी पडले. :( - लोहगडाच्या एका दरवाज्याला अलीकडेच बसवलेला हा खिळ्यांचा दरवाजा- इथे जवळच धान्यकोठारपण आहे. महादरवाजातून दिसणारा धुकटातला दर्गा. एक छोटीशी गडफेरी मारून लवकरच परत फिरलो. पाऊस रपारप कोसळतच होता. मावळी पाऊस अनुभवणे म्हणजे एक गंमतच असते. पाऊस अगदी किंचीतकाळ थबकतो. तितक्यात समोरून वेगाने येणार्‍या जलधारा परत चिंब भिजवून टाकतात. मित्राला घरी लवकर जायचे असल्याने झपाझप गड उतरून लोहगडवाडीत आलो, वळणावळणाच्या वाटेवरून पाऊस आणि निसर्गाचा आस्वाद घेतघेतच भाजे गावात पोचते झालो. तिथे चहा घेउन सुसाट घरी. पिंपरीत मात्र पाऊस बराच कमी होता, पण मनात मात्र लोहगडावरचा भर्राट वारा व तूफान पाऊस मात्र कोसळतच होता. *पाऊस खूपच जास्त असल्याने अतिशय मोजकेच फोटो काढता आले. लोहगडावर काढलेले फोटो हे तिथल्या दरवाजांच्या आडोशाने काढले आहेत.
लेखनविषय:

वाचने 13386 वाचनखूण प्रतिक्रिया 40

आत्मशून्य 05/09/2011 - 23:18
म्हणजे फोटो काढायच्या वेळी आडोसा मिळतो व आपल्याला महाग वाटणारा कॅमेरा न भिजता बाहेर काढता येऊन मनसोक्त फटू काढता येतात. फोटू ढिंच्याक आलेत पण अजून हवे होते.....

In reply to by आत्मशून्य

प्रचेतस 05/09/2011 - 23:25
छत्री न्यायची नव्हतीच. पावसात मनसोक्त भिजायचेच होते. तसाही तिथल्या सोसाट्याच्या वार्‍यात आणि मुसळधार पावसात छ्त्रीचा काहीही उपयोग झाला नसता.

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र 06/09/2011 - 00:27
मि एक दोन प्लास्टीक पिशव्या लेन्स्च्या आकारात फादुन ठेवतो, पुढुन एक बांगडी लावुन बरा आडोसा तायर होतो. शिवाय पिशवीत हात घालुन कॅमेरा सहज वापरता येतो.. अर्थात अगदीच धोधो पावुस असेल तर जरा रिस्की असत..

In reply to by आत्मशून्य

५० फक्त 06/09/2011 - 06:00
आमचे एक मित्र यांना रेनकोट वापरण्याची सवय आहे, त्यांना याबाबत काही मार्गदर्शन मिळेल काय, म्हणजे पावसात रेनकोट घालुन फोटो, अर्थात दुस-याचे कसे काढावे.

In reply to by स्पा

शैलेन्द्र 06/09/2011 - 10:30
+१ काय पण खबरे ठेवलेत एक एक ;) .. अरे लोकांना जरा मनोसोक्त भिजु द्याना आपापल्या छत्रीत.. फ्लेवर्ड असली म्हणजे लगेच आपण चव-वास घेतलाच पाहिजे असे नाही.

In reply to by अन्या दातार

सूड 06/09/2011 - 10:03
वाममार्गी म्हटलं की उगा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यासारखं वाटतं. आता असतील कम्युनिस्ट, त्यात त्यांची काय चूक नै का ? ;)

In reply to by सूड

५० फक्त 06/09/2011 - 10:58
जर वाम हा शब्द गुन्हेगारी पार्श्चभुमी (दमलो हा शब्द लिहिता लिहिता, काही जोडाक्षरं हातानं लिहायलाच सोपी असतात) असल्यासारखा वाटतो तर ' वामांगी रखुमाई दिसते शोभा' किंवा 'वामेतु जनकात्मजा ' हे का नाही वाटत तसं. वाम हा शब्द आणि झ हे अक्षर ही उगाचच बदनाम झालेली आहेत, डाव्यांनी या अन्यायाबद्दल आवाज उठवायची वेळ झाली आहे.

In reply to by ५० फक्त

सूड 06/09/2011 - 19:52
वाम= डावं, वाईट आता वामांगी (वाम+अंगी) रखुमाई, वामे जनकात्मजा येथे वाम हा शब्द स्थलदर्शक आहे. म्हणजे त्या अनुक्रमे पांडुरंग व रामरायाच्या डावीकडे आहेत. आता डावीकडेच का ?? तर आजकाल कधीकधी आवडत्या व्यक्ती/ व्यक्तीणीला लाडाने स्वीटहार्ट म्हटलं जातं, तर हार्टच्या जवळ म्हणून त्या वामांगी (असा माझा समज ;) ). आता वाममार्ग म्हणजे डावीकडे जाणारा/ हृदयप्रिय रस्ता असा अर्थ मिपावरील सुजाण लोक न काढतील तर नवल !! पण वाममार्गी म्हणजे वाईट मार्गाला लागलेला/ली असाच अर्थ नेहमी घेतला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आणखी उत्तम.

मस्तच रे वल्ली. विंचूकाट्याचे फोटू नाही दिसले. बाय द वे या लोहगडाशी काही गोड आठवणी आहेत माझ्या.... त्या डोळ्यासमोर आल्या धन्यवाद --

In reply to by जातीवंत भटका

प्रचेतस 05/09/2011 - 23:42
एकतर विंचूकाटा ढगांमुळे अजिबातच दिसत नाही आणि सोबतीला मुसळधार पाऊस होताच. बाकी तुझ्या लोहगडाच्या गोड आठवणी पण आम्हाला सांग की. :)

मी-सौरभ 05/09/2011 - 23:35
आता प्रत्येक जण धाग्यात त्या कट्ट्याबद्दल लिहून ईनो चा खप का वाढवताय... धाग्याबद्दल फोतो चान आहेत.. त्या फोतोतली व्यक्ती म्हंजे वल्ली नाही याची नोंद असायला हवी होती ;)

चित्रा 06/09/2011 - 00:22
मस्तच फोटो! इंद्रायणीकाठची गाडी आवडली. प्रवाहाचा फोटो आवडला. जरा अधिक लांबून घेतला असता तर अधिक आवडला असता असे वाटले, पण मस्त भटकंती केली आहे.

किसन शिंदे 06/09/2011 - 08:58
जबरा आहेत सगळे फोटो...अजून थोडे फोटो हवे होते... बाकी गड-किल्ल्यांवर फिरताना मुसळधार पावसात भिजून जो आनंद मिळतो त्या आनंदाची सर रिसॉर्ट मधल्या कृत्रिम धबधब्याखाली कधीच येऊ शकत नाही.

In reply to by स्पा

५० फक्त 06/09/2011 - 10:48
'खाटिक के ख्वाब में बकरा' असं म्हणतात तसं आहे हे, मुंबैतल्या माणसाला कानी कपाळी सकाळ दुपार संध्याकाळ ट्रेनच दिसणार, तरी नशीब मालगाडी आहे, लोकल असती तर काय प्रतिसाद आला असता कुणास ठाउक ?

In reply to by मृत्युन्जय

५० फक्त 06/09/2011 - 11:05
मृत्युन्जय, आधी त्याच्यावर मानगुटीवर बसुन ते 'सातवाहन कालातला महाराष्ट्र' वर लिहिणार होता, ते पुर्ण करुन घेउ मग दुर्ग भ्रमंती बद्दल. असे ही श्री. वल्ली हे मल्टीटास्किंग असल्यानं ते दोन्हीही गोष्टी एकत्र करु शकतील. असो, १८ तारखेला वेळ काढता काय जरा ?

गणेशा 06/09/2011 - 15:58
पुन्हा अप्रतिम ... पण याची शिक्षा तुला मिळणार आहे हे नाही यात लिहिले रे तु... असो .. निसर्ग आहेच असा वेडावलेला .. कालच पुण्याहुन बाईक वर आलो मुंबईला.. इंद्रायनी... तिचे वळणदार पआणी.. रेल्वे ट्रॅक .. आणि सगळे डोंगर असदी जसेचय तसे येथे पुन्हा पाहुन आणखिनच छान वाटले...

सर्व छायाचित्रे रोमांचकारी आहेत. पावसामुळे दरवाज्याच्या आडोशाने छायाचित्रे काढावी लागली पण, नकळत, एक सुंदर कोन साधला गेला आहे. अभिनंदन. कॅमेरासाठी वॉटरप्रूफ कव्हर मिळते. ते वापरावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्पा 17/09/2011 - 08:48
कॅमेरासाठी वॉटरप्रूफ कव्हर मिळते. ते वापरावे. 'कंजूष' वल्ली ते कितपत मनावर घेईल देव जाणे... आणि आता तर पावसाळा संपल्यातच जमा आहे... :D