मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वारी - सज्जनगड

स्पा · · कलादालन
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर. अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो. ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :) रात्री १२ ची बस होती, (नशीब युयुत्सुंची अशुभ पोर्णिमा १२ लाच संपत होती, म्हणजे नंतरचा प्रवास निर्धास्त होणार होता ;) ), ती यायला जवळ जवळ एक तास उशीर झाला. असो पण सकाळी सातार्याला ६ पर्यंत पोचलो. मस्त गारेगार वातावरण होत, नुकताच चिंब पाऊस पडून गेला होता. १) सज्जन गड ला जाणारी पहिली बस ७ ची होती. म्हणजे अजून बराच अवकाश होता, बाहेर आलो, मस्त गरम गरम चहा ढोसला. जरा तरतरी आली . २) मग बस ची वाट पाहू लागलो. बस चा पत्ताच नव्हता, शेवटी ७.३० ला पहिली बस आली, २० -२५ मीन सज्जनगडावर पोचलो, मधेच दिसणारा हा अजिंक्यतारा . वातावरण भन्नाट होत , ३) नागमोडी रस्ता ४) गडाकडे जाणारी वाट ५) ६) ७) ८) ९) गडावर पोचल्यावर सर्वात मोठी चिंता होती ती भक्त निवासात राहायला जागा मिळेल कि नाही, कारण एकतर शनिवार रविवार जोडून सुट्टी , आणि सोमवारी १५ ऑगस्ट ची सुट्टी. आमचा गडावर राहायचा बेत होता. पण नशिबाने आम्हाला मस्त रूम मिळाली १०) गॅलरीतून दिसणारं बाहेरच विहंगम दृश्य ११) बाहेरच दृश्य , फ्रेम मध्ये कैद केल्यासारखं वाटत होत १२) गडावरचे पिण्याच्या पाण्याचे तळे १३) जाऊन समान टाकल, अंघोळी उरकल्या आणि सर्वात आधी समर्थांच्या शेज घरात गेलो. तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो :) तिथून बाहेर राम मंदिरात गेलो. गडावरील इतर इमारती . १४) १५) १६) राम मंदिर १७) त्याच त्या मूर्ती , खरतर पंचायतन अस नाव आहे, राम ,लक्ष्मण, सीता, मारुती आणि बहुतेक गरुड असावा. या मुर्त्या "आंधळ्या कारागिराने" घडवलेल्या होत्या. हे वाचून तर प्रचंड धक्का बसला. इतक्या सुरेख मुर्त्या मी क्वचितच पाहिलेल्या आहेत. तिथून परत प्रवेशद्वारावर आलो. भूक लागलेली होती. बाहेर ३.४ हाटेल आहेत, त्यातलाच एका हाटेलात मस्त मिसळीवर ताव मारला. परत एकदा चहा पिऊन गड भटकायला निघालो. १८) . अर्थात मी आधी जाऊन आल्याने वाटाड्या चा रोल माझाच होता :). १९) वेण्णा बाईंची समाधी २०) तिथून मागे एक पायवाट जाते, जी जास्त कोणाला माहित आहे असे वाटत नाही. तिथून आम्ही कड्यावर आलो. समोरच दृश्य बघून भानच हरपलं. भरून आलेल आभाळ, भन्नाट वारा, गवताळ पठार, समोर उरमोडीच प्रचंड पात्र, आभाळ आणि पाणी यातला फरकच कळत नव्हता , बराच वेळ तिथे बसलो, फोटो वेग्रे काढले. २१) २२) पेठेचा मारुती २३) २४) क.... क .... किसन.... :D २५) उरमोडी आणि काठावरची गाव २६) २७) २८) २९) उरमोडीवरच धरण ३०) सूड इन राजे पोज ३१) ३२) मागे फिरलो. गडावरच तळ बघितल, समोरची धर्मशाळा, तिथून पुढे अंगाई देवीच मंदिर ., या देवीची स्थापना समर्थांनी गडाच्या सुरक्षितते साठी केली होती. इथे बर्याच वेळा शिव समर्थ भेटीही होत असत. ३३) ३४) ३५) ३६) तिघांचा एकाच फोटोत यायचा प्रयत्न :) ३७) ३८) ३९) ४०) याचवेळी, अचानक धुक पसरायला लागला, आणि आसपासचा अवघा परिसर धुक्यात लपेटला गेला. मग आम्ही परत भक्त निवासात परतलो, तो पर्यंत जेवणाची वेळ झालेली होती. मस्त गरमागरम आमटी भात आणि भाजी आणि गावाची खीर . भूक सडकून लागलेली होती . जेवणाआधी वाढेपर्यंत नामस्मरण. तिकडचा इतका शिस्तीचा कारभार पाहून खूप बर वाटल. जेवून परत खोलीवर आलो. जरावेळ झोपलो. संध्याकाळी मागे धाब्याच्या मारुतीपाशी गेलो, ४१) ४२) ४३) ठोसेघर कडे जाणारा रस्ता ४४) ४५) धाब्याचा मारुती ४६) ४७) या पठारावर बर्यापैकी गर्दी होती, म्हणून इतकी मजा आली नाही. मग मी सूड आणि किसनला सांगितल कि रात्री याच पठारावर परत यायचं. अंधारात .... :) संध्याकाळी गडावर ६ ते ७ सामुदाईक उपासना असते. त्यात रामनाम, जोहार, इतर स्तोत्र , श्लोक, रामरक्षा, आणि मारुती स्तोत्र वेग्रे म्हटली जातात. आम्हीहि त्याला हजेरी लावली . तो १ तास खरच अविस्मरणीय होता, बाहेर पडणारा पाऊस , गारठवणारी थंडी. तिन्ही सांजेची वेळ , एकाच पट्टीत , खणखणीत आवाजात होणार स्तोत्रपठन . डोक एकदम शांत झाल :) बाहेर येई पर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आता थंडी कायच्या काय वाढलेली होती, आणि आम्हाला जेवण उरकून पठारावर परत जायचं होत :) रात्री सुद्धा मस्त जेवलो, रूम वर आलो, थंडीचा जमेल तसा बंदोबस्त केला आणि आणि ब्याटर्या घेऊन परत निघालो, बाहेर दासबोध वाचन सुरु होत, बाहेर चालायला सुरुवात केली, आणि अंधारच साम्राज्य सुरु झाल.. कसे बसे वाट काढून चालत होतो. खाली काही गावातले लुकलुकणारे दिवे, बस या व्यतिरिक्त उजेड नव्हता... आणि जी शांतता होती, ती केवळ अविस्मरणीय! अपवाद बेडकांच्या ओरडण्याचा, आणि बेडूक तरी केवढे, लहान दगडा एवढे मोठे :) मग पावसाचा जोर कायच्या काय वाढला, आणि आम्ही परतीची वाट पकडली. रूम वर आल्यावर परत गप्पांना रंग चढला. सकाळी ५ ला उठलो. अंघोळी उरकून परत रामरायाच दर्शन घेतल आणि निघालो. पहिली बस ७.३० ची होती, पण ती गडावर आलीच नाही, खालच्या खाली निघून गेली, ४८) मग खाली फाट्यापर्यंत चालत आलो, थोड्यावेळाने तिकडे एक जीपड मिळाल, तिथून सातारा बस स्थानकापर्यंत आलो. तिथून स्वारगेट, स्वारगेट हून पनवेल, पनवेल हून डोंबिवली, आणि डोम्बिव्लीहून ठाकुर्ली, असा वाकडा तिकडा प्रवास करत संध्याकाळी ६ ला स्वारी घरी पोचली. मनात इच्छा असेल तर काहीही संकट येत नाही, हे परत जाणवले. सज्जनगडाची वारी फर्मास झाली .निसर्गाच्या कुशीत २ दिवस कसे गेले समजलंच नाही. असाच ट्रेक परत होईलच, तूर्तास रजा घेतो जय जय रघुवीर समर्थ
लेखनविषय:

वाचने 23259 वाचनखूण प्रतिक्रिया 76

इंटरनेटस्नेही 17/08/2011 - 11:16
मस्त रे स्पा.. ! उत्तम फोटो आणि झक्कास प्रवासवर्णन. जय जय रघुवीर समर्थ!

इंटरनेटस्नेही 17/08/2011 - 11:16
मस्त रे स्पा.. ! उत्तम फोटो आणि झक्कास प्रवासवर्णन. जय जय रघुवीर समर्थ!

चिंतामणी 17/08/2011 - 11:24
छान सचीत्र दर्शन. पुन्हा जाउन आल्याचा आनंद मिळाला.

In reply to by चिंतामणी

मूकवाचक 23/08/2011 - 13:49
असेच म्हणतो ...

प्रचेतस 17/08/2011 - 11:26
एकदम सुरेख वृत्तांत आणि फोटो. सज्जनगडला कधीपासून जायचे आहे पण अजूनही जमलेले नाहीये. गडावरची हिरवळ, चोहोकडचे चिंब वातावरण, दुरून दिसणारे नागमोडी रस्ते, खालची इटुकली घरे, भिजलेला आसमंत, शेवाळलेल्या भिंती, निसर्ग अशा त्याच्या सर्व चमत्कारांसारखा सामोरा येतोय.

कच्ची कैरी 17/08/2011 - 12:00
सज्जनगडला जाण्याची खूप इच्छा होती पण आज घरी बसल्या बसल्या सज्जनगडाचे दर्शन झाले ,धन्यवाद !

सुनील 17/08/2011 - 12:00
मस्त! माझी वारी हुकलीच, असो. अवांतर - मूर्तीचे अनेकवचन मूर्ती असेच होते, मुर्त्या नव्हे!

स्पा 17/08/2011 - 12:02
अवांतर - मूर्तीचे अनेकवचन मूर्ती असेच होते, मुर्त्या नव्हे! आभार तसा बदल करतो

जाई. 17/08/2011 - 12:09
फोटो उत्तम आलेत. प्रवासवर्णनही छान आहे. तिथे न जाउनही जाउन आल्याचा फील येतोय. मस्त

निनाद 17/08/2011 - 12:14
काय छान सफर घडवलीस! त्या वातावरणात अगदी रमून गेलो. सातारा स्थानक वगैरे फोटॉ पाहून तर मस्त वाटलं. सचित्र वृत्तांत यावा तर असा. असेच भटकत राहा आणि आम्हाला फोटोतून भटकवत रहा! जय जय रघुवीर समर्थ!

परिकथेतील राजकुमार 17/08/2011 - 12:35
अतिशय छान फोटो आणि ओघवत्या शब्दातले प्रवासवर्णन. गेल्याच वर्षी सज्जनगडाचे बोलावणे आले होते आणि आम्ही माथा टेकून आलो. नशीबाने गडाचे दरवाजे बंद व्हायच्या ५ मिनिटे आधीच दाखल झालो. गेल्या गेल्या गरम प्रसादाचा आशिर्वाद मिळाला. सोबतीला अनेक भक्त आणि जोडीला हरणे, मोर ह्या प्राण्यांची देखील उपस्थीती भारावुन गेली.

नंदन 17/08/2011 - 12:47
वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच. भक्तनिवासातून दिसणार्‍या देखाव्याचा फोटू तर अप्रतिम!

किसन शिंदे 17/08/2011 - 15:58
जुलै महिन्यात आषाढीला पंढरपुरला जाता जाता सज्जनगडला जायचं ठरलं होतं पण आयोजकाने ऐन वेळी घोळ घातला आणी गाडी सज्जनगडच्या ऐवजी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता रवाना झाली आणी "घोळ घालणार नाहीत ते आयोजकच कसले?" या ओळींचा अर्थ पुन्हा एकदा अनुभवास आला.:) तेव्हाच मनात ठरवलं जेव्हा कधीही सज्जनगडला जाण्याची संधी मिळेल तेव्हा ती सोडायची नाही. समर्थांच्या कृपेने हि संधी लवकरच मिळाली, स्पाने "सज्जनगडला येणार का?" म्हणून विचारलं आणी जास्त काही विचार न करता येण्याविषयी होकार कळवला. जाण्याचा दिवस नक्की करून गाडीचे रिझर्वेशन केले आणी १३ ला रात्री सज्जनगडला जाण्यासाठी आम्ही ठाण्याहून निघालो. मस्त ढगाळ वातावरणात सकाळी ६ला सातारयात पोहचलो तिथून गाडी पकडून सुखरूपपणे सज्जनगडावर पाय ठेवला. गडावर पोहचल्यानंतर समर्थ संस्थानातर्फे तिथेच भक्त निवासात आम्हाच्या राहण्याची व्यवस्था झाली. सकाळची 'प्राथमिक' कामं उरकून समाधी मंदिरात गेलो, मारुतीने हिमालयात दिलेली वल्कलं, श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी, मच्छिद्रनाथांनी दिलेली गुप्ती, शिवरायांनी विश्राम करण्यासाठी दिलेला पलंग, कल्याण स्वामींचे पाणी भरावयाचे हंडे इत्यादी वस्तू पहावयास मिळाल्या, तिथून मग राम मंदिरात त्या प्रसिध्द मुर्तींचे दर्शन घेतले. गडावरची संपुर्ण माहीती, त्या मुर्तींचा इतिहास, समर्थांची समाधी याविषयी सविस्तरपणे माहीती मंदिरातल्या एका भिंतीवर होती. दर्शन आणी पोटपूजा अनुक्रमे करून आम्ही भटकंतीसाठी बाहेर पडलो बरोबर अर्थातच आमचा 'वाटाड्या' स्पा होताच. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उरमोडीचे विशाल जलपात्र, संपुर्ण ढगाळलेले आकाश आणी हिरव्या शालूने नटलेली वसुंधरा..!!! आहाहा!! निसर्गाची अत्यंत सुंदर अशी ती किमया म्या पामराने काय वर्णावी. मिळालेलं ते समाधान शब्दात वर्णन करणं कठीण आहे. प्रदूषणविरहीत स्वच्छ हवेचा श्वास घेताना मुंबईतल्या प्रदुषित वातावरणाचा नक्कीच विसर पडावा अशी ती शांत-सुंदर जागा. मनोसक्त भटकंती करून आणी कॅमेराचा क्लिकक्लिकाट करून जेवणाच्या वेळेला आम्ही भक्तनिवासात परतलो. संध्याकाळी गडाच्या रक्षणाकरता समर्थांनी बसवलेला धाब्याचा मारूती आणी त्याबाजुचे पठार पाहायला गेलो पण तिथल्या माणसांच्या किलकिलाटामूळे ती जागा तितकीशी आवडली नाही. तिथे राहण्यासाठी, जेवण्यासाठी संस्थान सोय करतं आणी ते हि अगदी निशूल्कपणे, कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, त्यामुळे त्यांच कोउतूक करावं तेवढं कमीच आहे. १४ ऑगस्टचा पुर्ण दिवस आणी पुर्ण रात्र आम्ही गडावर घालवून १५ला आम्ही मुंबईच्या गजबजाटात परत आलो ते सज्जनगडच्या अविस्मरणीय आठवणी मनात ठेवून.!! अरे हो, स्पाच्या लेखाबद्दल बोलायचे राहिलेच कि...काय बोलणार लेखन तर सुंदर आहेच पण त्याबरोबर फोटोंवर करामती करून त्याने ते जबरदस्तपणे मांडलेत, विशेषतः अंगाई देवीचा फोटो. स्पा रॉक्स..!! ॥ जय जय रघूवीर समर्थ ॥

गणेशा 17/08/2011 - 13:38
मस्तच सर्व फोटो एकदम जानदार आहे फोटो क्रं ११,२२,३४ खुप आवडले. बाईकने गेलेलो दिवस आठवले, आणि जातान उरमोडी धरण्/बंधार्याजवळ नदित येथेच्छ दुबुन घेतलेले आठवले.

In reply to by गणेशा

प्रचेतस 17/08/2011 - 13:43
अवांतरः ह्या गणेशाला पाण्याचे भारीच आकर्षण, दिसले पाणी की हा डुंबलाच. भले ते मग उरमोडीच्या पात्रात असो,सांदण दरीतल्या पाणसाठ्यात असो वा चक्क कोरीगडाच्या पायर्‍यांवरून झुळझुळ वाहणारे पाणी असो.

In reply to by गणेशा

किसन शिंदे 17/08/2011 - 13:57
२२ आणी ३४ भारी वाटणारच, कारण त्यात त्याने ३डी ची करामत केलीय ना म्हणून. अवांतर: काय रे लब्बाडा, फक्त ८व्या फोटोतच ३डी च्या करामती केल्यास ना?;)
स्पावड्या.. सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन... खरंच मजा आली रे.. वर निनादने म्हटलंय त्या प्रमाणंच म्हणतो सचित्र वृत्तांत यावा तर असा. असेच भटकत राहा आणि आम्हाला फोटोतून भटकवत रहा! आता तुमच्या या " सुट्टी प्लॅनींग" वरुन प्रेरणा घेऊन मी पण बाहेर पडणार आहे फिरायला ...

विश्वनाथ मेहेंदळे 17/08/2011 - 16:28
वृतांत आणि फोटो दोन्ही मस्त. यावेळी जाणे नशिबात नव्हते, पण फोटो बघून जायची इच्छा प्रबळ झाली आहे. बघू कसे जमते ते.

स्वाती दिनेश 17/08/2011 - 16:37
सुंदर फोटो आणि छान प्रवास वर्णन.. स्वाती
रविवारी गडावर पाऊल टाकलं आणि तिथली शांतता गजबजाटाची सवय असलेल्या माझ्यासारख्या मुंबैकराला प्रकर्षाने जाणवली, भावलीही. दुपारच्या जेवणानंतर स्पाडेश्वर आडवे झाले, किसनद्येव पंढरपूरात पोचले, एकाने जांभई दिली की समोरच्याचेही डोळे पेंगतात म्हणे. वीसेक मिनीटांसाठी का होईना निद्रादेवींची कृपादृष्टी आमच्यावरही झाली. जाग आली, व्हरांड्यात उभं राहून पाऊस आणि उरमोडी न्याहाळत होतो. तेवढ्यात शिंदे सरकारांनी विचारलं 'पुस्तक वैगरे काही वाचणार का ??'. त्यांच्याकडचं पुस्तक वाचतच होतो तोवर स्पाराव जागे झाले. त्यांनी खास प्रवासात ऐकण्यासाठी आणलेल्या रागांची पोतडी उघडली. फ्लुटवर....माफ करा 'बासरी'वर आळवलेले मधुवंती, बिहाग ( रागांची नावे स्पागुर्जींनी सांगितली आहेत, यातून आम्हाला गाण्यातले काही कळते असा समज होऊ नये) ऐकता ऐकता गाडी 'भाग्यदा लक्ष्मी', 'कमोदिनी काय जाणे' वर आली. बाहेर रिमझिम पडणारा पाऊस आणि ही रागदारी वा वा !! ऐकता ऐकता साडेसहा कधी वाजले कळलंही नाही, सामुदायिक उपासनेसाठी आम्ही रामाच्या देवळात जाते झालो. रामपंचायतनातल्या मूर्ती मन मोहून टाकणार्‍या होत्या, त्या मूर्ती अंध कारागिराने घडवल्यात हे वाचलं तेव्हा कळलं अन्यथा तसं वाटण्याची सुतराम शक्यता नव्हती. देवळाबाहेर आलो तोवर गार वारा सुटला होता. जेवण आटोपून पुन्हा भक्तनिवासात पोहोचलो. सोमवारी पहाटे आंघोळ वैगरे उरकून पुन्हा रामाच्या देवळात गेलो. रामदासांच्या समाधीपाशी गंभीर स्वरात 'श्रीराम जय राम जय जय राम' चा जप सुरु होता. सकाळच्या शांततेत डोळे मिटून तो जप ऐकणं फार बरं वाटत होतं. तेवढ्यात ती शांतता भंग करणारी सळसळ सुरु झाली. दुसर्‍याच मिनीटाला एक बाई दबक्या आवाजात सोबतच्या कुणाला तरी विचारत्या झाल्या, " कोन राम राम करत बसलंय का क्याशेट लावलीया ??" त्यांच्या चौकस(?) बुद्धीवर हसावं की रडावं तेच कळलं नाही. थोड्या वेळाने तिथून निघालो. पुन्हा एकदा रामाचं दर्शन घेऊन निघता निघता एक ओळ वाचली, परमेश्वराच्या भेटीसाठी । पडाव्या आप्तांच्या तुटी ॥ सर्वस्व अर्पावे शेवटी । प्राण तोही वेचावा ॥

In reply to by सूड

आत्मशून्य 17/08/2011 - 22:32
तूम्हीच खात्री करून दीलीत ना की विकांतालाही रहायच्या जागेचा कोणताही प्रोब्लेम येत नाही याची, मग आता हृदयावरचा दगडच बाजूला केलात की :). तसही वपाडाव फक्त विचारत आहे. मला वाटत नाही आम्ही या विकांताला खरचं जाउ. काय रे वपाडाव खंर ना ?

In reply to by सूड

वपाडाव 18/08/2011 - 11:59
आमी बलिवलं तवा वीकांताला नगं, आडवारी जौ आस्सं चाल्लं हुतं. ह्ये काय खरं न्हाय राव !!
आरं बाबा, अमास्नी भईनी हाता, त्येंच्याकडनं राकी बांदुन घ्या लागती, ववाळ्णी द्या लाग्ती... अन त्ये बी राखीच्या दिशी.... पूर्या वर्शातला एक दिवस आपुन लै बिझ्झि असताव.... बाकी, मंग फ्रेन्शिप डे, वॅलेन्टाइन डे ला फुल्ल्टु फ्री... मंग काडा कुटंलीबी ट्रिप.. कसा येका पायावर यितो का नाय त्ये बग....

In reply to by वपाडाव

किसन शिंदे 18/08/2011 - 12:30
आरं बाबा, अमास्नी भईनी हाता, त्येंच्याकडनं राकी बांदुन घ्या लागती, ववाळ्णी द्या लाग्ती... अन त्ये बी राखीच्या दिशी.... वप्या, रक्षाबंधन उरकूनच आम्ही १३ला रात्री निघालो....तु काय संपूर्ण दिवसभर राख्याच बांधून घेत हिंडत होतास काय?

In reply to by किसन शिंदे

वपाडाव 18/08/2011 - 13:36
ल्येका, ३ दिस सुट्टीचं मिळालतं.... घर एके घर खेळुन घेत हुतो मन्सोक्त.... नंतर २ म्हैने जायाचा चानस न्हाई.... काई ग्वष्टी सम्जुन घ्याच्या रं खुळ्या.... अन १३ला राती (नांदेडहुन) निगुन बी सातारला सकाळी येणं जरा औघड काम हाये......

सर्वसाक्षी 17/08/2011 - 18:54
गेल्या वर्षीच्या सज्जनगड दर्शनाची आठवण झाली. मस्त.

पल्लवी 17/08/2011 - 19:33
२२) वा फोटो क्लास आलाय. बाकी, सज्जनगडाविषयी आणखी काय बोलणे !! :) आणि तिथल्या आमटी-भाताला तोड नाही !!!!

मर्द मराठा 17/08/2011 - 22:10
मस्त... भन्नाट ... अप्रतिम... दुसरे शब्दच नाहीत... छान सचित्र प्रवासानुभव आहेत... काही वर्षांपुर्वी केलेल्या सज्जनगड भटकंतीची आठवण करून दिलीत... धन्यवाद...

५० फक्त 17/08/2011 - 23:05
मस्त रे जाम भारी जगलो तुमच्या बरोबर, अजुन काय सांगावे ? बाकी सज्जनगडावर, सोलापुरच्या सिद्धेश्वरला आणि जत जवळ यल्लमा देवीच्या देवळात मी फक्त जेवणासाठीच जातो, त्यामुळं तुमच्या या लेखातुन जरा धार्मिक माहिती मिळाली धन्यवाद. येताना उरमोडिच्या पुलाच्या खाली उतरला असता ना तर पाण्यात खेळायला जाम मजा आली असती तुम्हाला.

अत्रुप्त आत्मा 17/08/2011 - 23:57
फोटो आणी प्रवास वर्णन येक नंबर....फो.नं.-११...एखाद निसर्ग चित्र काढल्यासारखा वाटतो...आणी २५ व ४४ पाहून काइट ग्लायडींगची खुमखुमी येते....मस्त...:smile: अवांतरः- तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो.....''''''यांचे फोटू काढू देत नाहीत काय?'''''' :wink:

सविता००१ 18/08/2011 - 11:59
केवळ मस्त फोटो आणि वर्णन.

स्पा 18/08/2011 - 11:59
'''''यांचे फोटू काढू देत नाहीत काय?'''''' खरतर फोटो काढू नयेत अश्या सूचना लावण्यात आल्या आहेत.. पण लक्ष ठेवायला माणूस नसतो.. आपण गुपचूप काढू शकतो, पण ते मनाला पटल नाही, म्हणून नाही काढले

सहज 18/08/2011 - 12:14
तीन तिघाडा काम बिघाडा हे मिथ बस्ट केल्या गेले आहे तर!! झकास!

दीप्स 20/08/2011 - 12:43
अप्रतिम , तुझा हेवा वाटतो आहे . सज्जनगडला कधीपासून जायचे आहे पण अजूनही जमलेले नाहीये. आता तर काय फोटो पाहून खूप हुरूप आला आहे आता जाउनच येते विकांताल .

पैसा 21/08/2011 - 18:52
स्पा, छान वर्णन आणि फोटो. खूप वर्षांपूर्वी सज्जनगडवर गेले होते, पण राहिले नव्हते. जरा अवेळी गेल्यामुळे प्रसाद संपला होता, पण दरवाजाजवळ एका घरी गरम पिठलं भाकरी मिळाली होती. शिवाय गडावर गुहा पाहिल्याचं आठवतं. आता पहायला मिळत नाही का?

केशवराव 22/08/2011 - 00:46
गड्या , तोडलस ! २१ आणि २२ मस्त !

स्पंदना 22/08/2011 - 04:53
सुंदर रे स्पाउ!! हीच फौज घेउन पेठ चा किल्ला पहाता येतो का पहा, आत्त्ता या वेळी अतिशय सुंदर असत पेठ. वरील काही फोटो आवडले.

प्राची 22/08/2011 - 10:13
सुंदर,अप्रतीम. एका महिन्यात दोनदा सज्जनगडाचे दर्शन घडवलेत,एकदा प्रत्यक्ष,आणि एकदा या लेखातून. सज्जनगडावरची गव्हाची खीर आणि त्यावर साजूक तूप..अहाहा..

जयन्त बा शिम्पि 25/11/2016 - 23:46
माझा ,सौ.सह ,तेथे जाण्याचा विचार आहे, पण सज्जनगडावर रहाण्यासाठी ज्या खोल्या आहेत, त्यांचे आरक्षण करावे लागते काय? सर्वात गर्दी कमी कोणत्या महिन्यात असते ? तेथील व्यवस्थापकांचा भ्रमणध्वनी क्रमांक येथे देता येईल काय? मी बोरिवलीहुन थेट बोरिवली-सातारा बस ने जावू शकतो, पण सातारा येथून, सज्जन गडावर जाण्यासाठी बसेस किती वाजेपर्यन्त उपलब्ध असतात. सविस्तर माहिती येथे दिल्यास सर्वांचा फायदा होईल.

In reply to by जयन्त बा शिम्पि

त्रिवेणी 24/12/2016 - 15:07
दोघच जाणार असला तर लग्न झाल्याचे प्रुफ घेऊन जा. नाहितर प्रवेश नाही देत. तिथेच अजुन एक सोय केली आहे त्यांच्यातीलच एका ग्रुपने.तिथे काही प्रुफ लागत नाही पण त्यांचे बाथरुम,टाॅयलेट काॅमन आहे.

प्रसाद गोडबोले 26/12/2016 - 03:39
भारीच यार तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वृत्तांत! तिघेही कसले लहान दिसत आहात !! ह्या लेखनाच्या निमित्ताने गडाच्या आठवणी जाग्या झाल्या , आता गडावर जायला कधी मिळणार आहे ते देव जाणे !! जय जय रघुवीर समर्थ अवांतर : काहीही म्हणा पण तब्बल 5 वर्षांपूर्वीचा लेख वाचूनही भारी वाटले , असे वाटले की आपणही आपल्या प्रत्येक ट्रिप चा वृत्तांत लिहून काढायला पाहिले , त्या निमित्ताने आठवणी ताज्या राहातील :)

लाडू 27/12/2016 - 14:13
इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?

In reply to by लाडू

प्रसाद गोडबोले 27/12/2016 - 22:13
इथे एक श्रीधर स्वामींचे कुटीर आहे. त्याचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?
प्रचि क्रं १५ मध्ये जी वास्तु दिसत आहे तीच श्रीधर कुटी आहे, तिथे आत मध्ये श्रीधर स्वामींची मुर्ती , एक सुंदर तसबीर आणि पादुका आहेत :) ( बाकी फोटो पहाताना लक्षात आले , प्रचि २० बहुतेक गंडला आहे , ती वेण्णास्वामींची समाधी नसावी बहुधा)

आर्या१२३ 27/12/2016 - 17:02
जय जय रघुवीर समर्थ! व्वाह....फार सुन्दर फोटो आणि वृत्तान्त! अगदी नॉस्टॅलजिक व्हायला झाल! ४ वर्षापुर्वी गेले होते.