Skip to main content

आमचं प्रेम सेम नसतं!

आमचं प्रेम सेम नसतं!

Published on शुक्रवार, 25/10/2019 प्रकाशित

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


आमचं प्रेम सेम नसतं!




लोक म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळ्यांचं जवळपास सेम असतं! आम्ही म्हणतो, प्रेम म्हणजे च्यायला नक्की काय असतं? ते कशाशी खातात??

हातात हात घेऊन लोक रस्त्याच्या कडेने चालतात. आम्ही? नाही! आमच्या हातात तेव्हा किराण्याच्या पिशव्या असतात! अरे, डोक्यावरती तापलेलं ऊन असताना यांना दुसरं काही लोभसवाणं सुचतंच कसं??? मागे एकदा, बाहेर फिरायला गेल्यावर बायकोकडे बघून एक-दोनदा हसलो.. अहो, तिचं जाऊं देत, माझं मलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं! लोक वेण्या घेतात.. त्या बायकोला(च) देतात.. आवडत नसलं तरीही दोघं मिळून एकत्र एखादा पिक्चर टाकतात. आमच्याकडे 'कोणता पिक्चर' यावर सहज आठवडाभर वाद होतो! आणि मुळात 'बॉबकटवर वेणी कोण घालतं..' हा सनातन प्रश्न आ वासून उभा असतोच!! अरे??? च्यायला! आम्ही काय कधी रोमँटिक क्षण अनुभवायचेच नाहीत की काय?? मित्राने डायलॉग टाकला,"रोमान्स ही एक मनाची अवस्था आहे!" मी म्हटलं, "आधी लग्न कर, मग बघतो किती दिवस हा चावलेला 'रागा' चालतो तुझा.." म्हणे मनाची अवस्था.. फुकटचे सल्ले! नाही, काय होतं एखादवेळेस आपल्या मनात नसलं, तरी दुसर्‍याला आवडेल असं (जरा वेळ का होईना) वागायला?? त्याच्या मनाखातर?? इथं डायरेक्ट स्टेटमेंट असतं.. "तुला कसलं आलंय मन? हृदयात आणि डोक्यात, दगड-माती घेऊन जन्माला आला आहेस.." अरे???!! एकदा तर हद्द झाली. आमच्या बाजूचे आज्जी-आजोबासुद्धा मस्तपैकी फिरून आले... चांगले ८-१० दिवस! "अरे, लग्नाचा पन्नासावा वाढदिवस.. म्हटलं जरा थाटात साजरा करू या! बाकी दार्जिलिंग मस्त आहे रे!!" यावर मात्र मी पेटलोच. अरे, लोक जग बदलतात.. आपण आपलं लाइफ तरी जरा बदलायला पाहिजे! फोनाफोनी सुरू केली. मित्राला कामाला लावलं. परवडणारं पॅकेज डील शोधून काढलं. पोरीची जरा आठवडाभर आजोळी सोय केली!
20191018-155907

कुठे जायचं? हा प्रश्न मागच्या अनुभवावरून विचारलाच नाही. "औदुंबराला जाऊन येऊ. मग वाडी.. आणि येतांना सज्जनगड वगैरेसुद्धा करता येईल की!" मला तेव्हा साक्षात दत्तगुरू डोक्याला हात लावून आमच्याकडे करुण दॄष्टीने बघताहेत, असा भास झालेला.

हिमाचलाची टूर करायची तर तयारी बरीच करावी लागणार. म्हंजे मी कॅमेरा, बॅटरी, कार्डं, चार्जर, थर्मल्स, शूज, खास कपडे, एखाद-दोन पुस्तकं यांचा विचार करत होतो.. आणि ती काय काय खायला घ्यायचं अन् सर्दी झाली/घाट लागला तर औषधं जवळ असूं देत याचा विचार करत होती!

"आपण पहाडगंजपर्यंत ट्रेनने जाणारे ना रे.. मग १५-२० धपाटे घेते बरोबर. उगाच बाहेरचं खायला नको." असं वाक्य टपकलं. हटलं नशीब! येताना प्लेनने येणार, नाही तर आलू पराठे आणि राजम्याची उसळ बांधून घेतली असती हिने. विचार केला, बाकी आवर-सावर जाऊ दे, आधी या प्रकारालाच सावरावं जरा. नाहीतर पूर्ण टूरचं भजं व्हायचं! मग नीट समोर बसवून चांगली तास-दोन तास शाळा घेतली. "कधी तर दुसरा विचार करून बघ की.. थोडे दिवस घर-पोट-पोरगी-तब्बेत यांचा विचार जरा बाजूला ठेव. तिथे जाऊन काय काय करू शकणार याचा विचार करून बघ! भाजी-किराणा कुणालाच सुटलेले नाहीयेत. पण हॉटेलात जेवताना आपण किराणा संपलाय आणि आणावा लागणार याचा विचार करत बसलो ना, तर स्वीट डिशसुद्धा आंबट लागेल!".. वगैरे..! शेवटी एकदाचं पटलं. मग काय.. भरपूर पिंगा घालून चांगली टूर प्लॅन केली आणि जाऊन आलो! बाकी टूरवर काय-काय झालं ते सांगत बसत नाही! खरं सांगू का.. बायकोला घराव्यतिरिक्त दुसरा कोणता विचार करणं शक्य झालं, याचाच मला जास्त आनंद झाला होता! परत आल्यावर आजोबांनी डोळे मिचकावत विचारलं, "काय रे? कशी झाली टूर??" आता या वेळी मात्र माझ्याकडे चांगलं तोंडभर हसू होतं.. छान झाली, म्हणून सांगायला!!

श्रेयनिर्देश: चित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815
अनुक्रमणिका

याद्या 10579
प्रतिक्रिया 14

लेखन आवडले!

खूप मस्त, रंगवून लिहिलंय!

मित्राने डायलॉग टाकला,"रोमान्स ही एक मनाची अवस्था आहे!" मी म्हटलं, "आधी लग्न कर, मग बघतो किती दिवस हा चावलेला 'रागा' चालतो तुझा.." म्हणे मनाची अवस्था.. फुकटचे सल्ले!
एकीच मारा पर सॉलिड मारा

बरेच पॉईंटर मिळाले, गाईड करता धन्यवाद :)

मला तेव्हा साक्षात दत्तगुरू डोक्याला हात लावून आमच्याकडे करुण दॄष्टीने बघताहेत, असा भास झालेला.
हहपुवा!!! भारी लिहिलंय.... :-)

आता या वेळी मात्र माझ्याकडे चांगलं तोंडभर हसू होतं.. छान झाली, म्हणून सांगायला!!
तुमची यात्रा सुफळ संपूर्ण झाली हे छान झालं! खुसखुशीत लेख आवडला.

झक्कास! ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल :) - (रोमॅन्टीक) सोकाजी

माझं पण असंच होतं.. मुलं.. जेवण.. घरदार ..नोकरी यातून बाहेर पडणं कठीणच जातं..