Skip to main content

मेरा दर्द ना जाने कोई

मेरा दर्द ना जाने कोई

Published on शुक्रवार, 25/10/2019 प्रकाशित मुखपृष्ठ

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


मेरा दर्द ना जाने कोई




संत मीराबाई (१६वे शतक) हिचे जीवनवृत्त व काल यांविषयी निश्चित माहिती मिळत नाही. तत्कालीन काव्यकृती व दंतकथा यावरून मीरेचे चरित्र समजते.

मेडत्याचा राव रत्नसिंग याची ही मुलगी. लहानपणीच आई-वडील वारल्याने तिच्या आजोबांनी तिचा सांभाळ केला. लहानपणी घरी आलेल्या एका साधूकडची कृष्णमूर्ती पाहून मीरा वेडावली व हट्टाने ती मूर्ती मिळवून ती त्या मूर्तीची पूजाअर्चा करण्यात दंग होऊन गेली. ती वयात आल्यावर मेवाडचा महाराणा सांगा याचा पुत्र भोजराज याच्याशी तिचा विवाह झाला. पण लवकरच भोजाचा मृत्यू झाला व मीरा विधवा झाली. या दु:खद घटनेने मीरेला कमालीचे वैराग्य प्राप्त झाले व ती कृष्णभक्तीत रमून जाऊ लागली. पुढे तिने कृष्णालाच आपला पती मानले आणि ती त्याच्या सेवेत अष्टोप्रहर राहू लागली. कृष्णमूर्तीची पूजा व साधुसंतांची संगती यांत तिचा वेळ जाऊ लागला. सासरच्या लोकांना हे वागणे कुलाला कलंकभूत वाटू लागले व त्यांनी मीरेचा छळ मांडला. पार विषप्रयोगापर्यंत मजल गेली. मीरा त्यातून बचावली, पण नंतर कंटाळून तिने सासरचा त्याग करून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिचे स्वागत झाले, पण राजकीय उलाढालींमुळे तिथून निघून तिने तीर्थयात्रेचे प्रस्थान ठेवले. प्रथम वॄंदावन येथे राहून मग ती द्वारकेला गेली. अखेर तिथेच ती श्रीकृष्णचरणी विलीन झाली.


images-5

हे झाले मीरेचे थोडक्यात चरित्र. तिने माहेर-सासरच्या वैभवाच्या काळात चांगले संस्कार प्राप्त केले. तिचा तत्कालीन संतसाहित्याचा मोठा अभ्यास होता. आध्यात्मिक, पौराणिक साहित्याचा तिला चांगला परिचय होता. संगीतकलेत ती प्रवीण होती. तिच्या रचनांचे कालानुसार तीन भाग पडतात. सुरुवातीचे काव्य राजस्थानी भाषेत, नंतर वृंंदावनात व्रजभाषेत व अंतिम द्वारकेत गुजराथी भाषेत. मीरेच्या साहित्यात प्रचंड भेसळ आहे. कोणीही चार ओळी खरडाव्यात व शेवटी 'मीराके प्रभू गिरीधर नागर' असे लिहावे म्हणजे झाले. असो. आपण काव्य संशोधक नाही, तर फक्त रसिक आहोत. आपण केवळ काव्याचा आस्वाद घ्यावा, हेच आनंदाचे.

ज्ञानेश्वर संतकवी आहेत म्हणजे काय? ते संत आहेत आणि कवीही आहेत. पण प्रथम ते संत आहेत व कितीही श्रेष्ठ कवी असले तरी तो त्यांच्या व्यक्तित्वाचा दुय्यम भाग आहे. तसेच मीरेचे. ती 'भक्तकवयित्री' आहे. मीरा प्रथम आणि शेवटीही भक्त आहे. तिचा प्रत्येक श्वास हा श्रीकृष्णमीलनाकरिता आसुसलेला आहे. त्या अंतिम ध्येयाकडे जाताना वाटेत तिने जी वेल लावली, तिच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे 'अंसुवन जल सींच सींच प्रेम बेल बोई अब तो बेल फ़ैल गयी'... त्या प्रेमवेलीला आलेली फुले म्हणजे आपल्यासमोर असलेली मीरा भजने. कवितेकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहता येते. मग भजनाकडे का पाहता येऊं नये? आज मी त्या दृष्टीने थोडा प्रयत्न करणार आहे. मीरेच्या अंतर्भावना तिच्या भजनांत कशा दिसून येतात त्याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न. नेहमीप्रमाणे हे रसग्रहण नाही. भजने सहज समजण्यासारखी असल्यामुळे अर्थही देत नाही.

या भजनांकडे वळायच्या आधी आपल्याला आणखी एक बारकावा लक्षात घेतला पाहिजे. मीरा एक 'स्त्री' आहे. तिने भले राणाजींनी पाठवलेला विषाचा प्याला हसत हसत तोंडाला लावला असला; 'तात, मात, भ्रात, बंधु आपना न कोई' 'छांड दई कुलकी कान, का करिहे कोई' असे ठणकावून सांगितले असले, तरी ती स्त्रीच आहे. भारतीय स्त्रीमध्ये असणार्‍या सर्व भावना तिच्या मनांत आहेतच. आपणास आढळून येईल की या सर्व भावनांच्या विविध छटा तिच्या भजनात मनोज्ञ पद्धतीने साकारल्या आहेत.

आत्मसमर्पण, हुरहुर, स्वप्नरंजन, प्रियकर-आपण यांतील दुरावा, असाहाय्यता, आपल्या अंगातील दुर्गुणांमुळे तो आपल्याला स्वीकारेल की नाकारेल याबद्दल शंका, विनवणी, निसर्गात प्रियकर दिसणे, लोकांची समजूत कशी घालावयाची इत्यादी अनेक विचार तिच्या मनात येत राहतात व त्याविषयी ती आत्मीयतेने लिहिते. या प्रत्येकातील छटा निरनिराळ्या आहेत. आता स्वप्नरंजन घेतले तर एकदा तिला वाटते कृष्णाने आपल्याला नोकर म्हणून ठेवले आहे, तर दुसरीकडे ती म्हणते वैकुंठ सोडून आपल्याला भेटावयास भगवान आले आहेत. बघा, हा कॅनव्हास किती प्रचंड आहे!

प्रथम तिचे स्वप्नरंजन बघू. का? तर आपण सगळेच, रोज, काही वेळ तरी कोणत्या ना कोणत्या स्वप्नरंजनात गुंग असतोच. तरुणपणी आपली/आपला प्रेयसी/प्रियकर आपल्याला "तू किती गोsssड आहेस" असे म्हणत आहे" असे दिसते, तर काही वर्षांनी "घरी गेल्यावर बायको नेहमीसारखे खेकसण्याऐवजी हसतमुखाने चहाचा कप देत आहे" असेही स्वप्न पडू शकते. जाऊ द्या. मीरेचे स्वप्न बघा.

स्याम मने चाकर राखो जी ! गिरधारीलाल चाकर राखो जी !! चाकर रहसूं बाग लगासूं, निस उठ दरसन पासूं ! ब्रिंदावनकी कुंज गलीन में तेरी लीला गासूं !! चाकरीमें दरसन पाऊं, सुमिरन पाऊं खरची ! भाव भगति जागिरी पाऊं, तिनो बातां सरसी !! मोर मुगट पीतांबर सोहै, गल बैजंतीमाला ! ब्रिंदावनमे धेनु चरावे, मोहन मुरलीवाला !! हरे हरे नित बाग लगाऊं, बिच बिच राखूं क्यारी ! सांवरियाके दरसन पाऊं, पहर कुसुंबी सारी !! जोगी आया जोग करनकूं, तप करने संन्यासी ! हरी भजनकूं साधू आया, ब्रिंदावनके बासी !! "मीरा"के प्रभु गहिर गंभिरा, सदा रहो जी धीरा ! आधी रात प्रभु दरसन दीन्हें, प्रेमनदीके तीरा !!

स्याम रोज भेटावयास हवा असेल तर वृंदावनात गेले पाहिजे. पण तेथे गेले तरी त्याचे दर्शन सारखे कसे घडेल? त्याकरिता मीरा एक युक्ती लढवते. ती म्हणते, "स्यामने मला नोकर म्हणून ठेवले." घ्या, म्हणजे ही 'घररीघी'सारखी, बिनबुलाये, घरात घुसली की हो! आणि स्वत:करिता काम घेतले ते बागेतले. आता श्यामचे दर्शन ही उठताबसता होणारी गोष्ट झाली. आणि हो, स्वप्न असले तरी ती रोजच्या व्यवहारातील गोष्टी विसरत नाही. नोकराला 'उचल' लागतेच. त्याकरिता ती मागते 'सुमिरन'. तिला खातरी आहे की धनी प्रसन्न होऊन भावभक्तीची जहागीर देईलच. पण ते महत्त्वाचे नाही, दर्शन घेताना आपली साडी कुसुम्बी रंगाची आहे ह्याची काळजी घ्यावयाला ती विसरत नाही. नेहमी साधु-संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला आपल्या साधनेत मदत झाली हे न विसरल्याने ती त्यांनाही स्वप्नातील वृंदावनात जागा द्यावयास चुकत नाही. प्रभुदर्शन घाईघाईने होत नाही, त्याकरिता धीर धरावयास हवा हे माहीत असले, तरी शेवटी ती मध्यरात्री प्रेमनदीच्या तीरावर प्रभुदर्शन व्हावे ही इच्छा व्यक्त करते.

आता आणखी एक स्वप्न पाहा. आपले सुखदु:ख, आपल्या अंतरीच्या भावना कोणाला तरी सांगाव्यात असे स्त्रीला जितके वाटत असते, तितके पुरुषाला नक्कीच वाटत नाही.. तिला आपली व्यथा सांगावयाची आहे. पण कोणाला सांगणार? "मला जाणून घेणारा इथे तर कोणी दिसत नाही, तूं तरी लक्ष दे ना" असे सावळ्याला विनवताना ती म्हणते,

हे री मै तो प्रेमदिवानी, मेरा दर्द न जाने कोय ! !! सूली उपर सेज हमारी, किस बिध सोना होय ! गगन मंडलपे सेज पियाकी, किस बिध मिलना होय !! घायलकी गति घायल जाने, की जिन लाई होय ! जौहरकी गति जोहरी जाने, की जिन जौहर होय !! दरदकी मारी बन बन डोलूं, बैद मिला नही कोय ! 'मीरा' की प्रभु पीर मिटैगी, जब बैद सवलिया होय !!

"मला सर्व जण वेडपट समजतात, पण मी तुझ्या प्रेमात पडल्याने दिवाणी झाले आहे हे कोणालाच कळत नाही. माझे दु:ख जाणणारा येथे तर कोणीच नाही. सुळावरची माझी सेज, झोप थोडीच येणार आहे? आणि प्रियकराची शेज, तुझी शेज तर आकाशात. कसे काय मीलन संभवणार? भक्त पृथ्वीवर व प्रभू गगनात, मीलन तर अशक्यच, नाही का?" आपली व्यथा कोणाला का कळत नाही, हे तिला हळूहळू समजू लागले आहे. ती म्हणते, "आगीने पोळल्यावर होणार्‍या वेदना ज्याचे हात आगीने पोळले आहेत त्यालाच कळणार. धगधगीत आगीत शिरणार्‍या स्त्रीची वेदना लांबून पाहाणार्‍यांना काय समजणार? वेदनेने माझ्या झोकांड्या जात आहेत, पण वैद्य काही मिळत नाही. तो 'सावळा'च वैद्य म्हणून मिळाला, तरच ही पीडा टळेल."

इथे स्त्रीच्या वेदना तीन आहेत. एक - तिचे दु:ख जाणून घेण्यातच कोणाला स्वारस्य नाही. त्यामुळे कोणाशी काही बोलणेच खुंटले. सार्‍या जगात ती एकाकी पडली आहे. दुसरी - तिचा प्रियकर व ती यांच्यात फार मोठे अंतर आहे आणि ते कमी होणे जवळजवळ अशक्यच आहे. तिसरी - तिचे दु:ख केवळ तिचा प्रियकरच दूर करू शकतो आणि तो तर वर, दूर गगनात.

या जातीच्या तिच्या अनेक भजनांवर बरेच काही लिहता येण्यासारखे आहे. असो.

भावनांच्या दोन छटा दाखवणारी मीरेची ही दोन भजने. आणखी काही भजने आपण पुन्हा कधीतरी पाहू. तुम्हांंला आवडणारी मीरेची भजने कोणती, हेही सांगा. जरा आदानप्रदान होऊ दे ना!

श्रेयनिर्देश: चित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815
अनुक्रमणिका

याद्या 8469
प्रतिक्रिया 12

खूप सुरेख लिहिलेत शरदकाका. मीरेचे अंतरंग उलगडून दाखवलेत. केनू संग खेलू होरी आणि ऐकली खड़ी रे मीरा बाई ह्यावर पण लिहावेत, ह्या माझ्या विनंतीपूर्वक सुचवण्या.

मीराबाईंची कवने संग्रहित कशी केली गेली? याचे मला कुतुहल आहे की तिला कोणी लेखनिक होते का?... कि तीच आपल्याआपण सुचले कि लिहून ठेवत असे?... जरी ती राजघराण्यातील असली तरी तिचे राजकीय संबंध ताणलेले होते नंतर ती वृंदावनात आली तेंव्हा तिच्या लेखनाचे संकलन केले असेल का?.... कागद-पेन्सिल नसताना त्याकाळातील लेखन साहित्य कसे काय उपलब्ध केले जायचे?..... यावर प्रकाश टाकावा ही विनंती...

In reply to by शशिकांत ओक

मौखिक परंपरा, भूर्जपत्रावरील लेखन इत्यादी प्रकार असावेत. इथे काही माहिती आहे, तिचा उपयोग होईल?

In reply to by यशोधरा

हे ग्रंथ लिहून काढणाराला विशेष महत्त्व होते व त्यांना लेखक म्हणत. अर्थात, हा शब्द ग्रंथांची हस्तलिखिते लिहून काढणारा वा नक्कल करणारा ह्या अर्थी वापरत. ग्रंथांच्या नकलांखेरीज लेखक ग्रंथांचे प्रथम लेखनही करीत. ह्या न्यायाने गणपतीस आद्य लेखक म्हणावयास हरकत नसावी! ज्ञानोबा माउलींच्या ज्ञानेश्वरीचे 'सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाहला', दासबोधाचे लेखक कल्याणस्वामी ही काही ठळक उदाहरणे. बरेचदा ग्रंथ सांगणार्‍याच्या आदरापोटी लेखक मानद म्हणून काम करीत असे. आत्मपठनार्थं परोपकारार्थं च लिखितम्, ह्या प्रेरणेने हे लिखाण होई. त्याचप्रमाणे व्यावसायिक लेखकांचा वर्गही नांदत होता व तत्कालीन धनिकांसाठी हा वर्ग काम करीत असावा.
वर म्हटल्याप्रमाणे लेखन कार्य झाले तेंव्हा.. लेखनिक सरसावून बसून लिहून घेत होते.... जसे बॉस आपल्या लेखनिकाला बोलावून डिक्टेशन देतात... इथे मामला जरा वेगळा आहे. मीरेने निर्माण केलेले काव्य हे अशा स्थानावरून केल्याचे जाणवते की तिला लेखनिक वा एका ठिकाणी बसून 'ह्या लिहून' असे म्हणायची शक्यता कमी आहे. सावरकरांनी भिंतीवर काव्यलेखन केले. नंतर ते पुसले गेले तरी आठवून त्यांनी परत रचले. गुरू नानकांचे जत्थेदार असत ते लिहून घेत असत. पाठ करून पुढच्या पिढीला सादर करायला ते आधी कोणीतरी लिहिले पाहिजे असे मला वाटले. म्हणून विचारणा...

लेख आवडला.
मीरा प्रथम आणि शेवटीही भक्त आहे.
खरेच.

सुरेख विवेचन. मीरेच्या भजनांचा सुंदर उपयोग व्ही. शांताराम यांनी वसंत देसाईंकडून करवून घेतला आहे.झनक झनक तेरी बाजे पायलिया(१९५५)आणि तुफान और दिया हे ते दोन चित्रपट.आणि लताचा तो ताजा आवाज त्या गाण्यांचं सोनं करून गेला आहे.

संत मीराबाईंची काव्य खूप माहीत नाहीत. तुम्ही दिलेल्या दोन्ही रचना अतिशय सुंदर आणि संत मीराबाईंच्या व्यथा आणि स्वप्न यांचे उत्तम निरूपण आहे.