मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बर्बरता

म्हया बिलंदर · · काथ्याकूट
उसे बर्बरता से पीटा गया.....' किंवा तत्सम वाक्य कानावर बरेचदा पडलेलं आहे. ह्यातील 'बर्बरता' ह्या शब्दाचे मूळ माझ्या अंदाजाने जुन्या ग्रीक भाषेत असावे. रोमन शासक वर्ग व अधिकारी स्वतःला सभ्य, कुलीन व प्रगत समजत व ते लॅटिन अथवा ग्रीक भाषेत बोलत, व्यवहार करीत. एखाद्या प्रदेशावर जेव्हा रोमन सैन्य आक्रमण करत तेव्हा (त्यांच्याच मते) ते शिस्तीत, प्रशिक्षित पद्धतीने लढत तर समोरील सेना अगदीच क्रूर पद्धतीने लढत. हे कमी प्रगत(?) लोक ज्या निरनिराळ्या भाषा बोलत त्या भाषांना जुन्या ग्रीक भाषेत एक शब्द दिला गेला 'Bárbaros'. तर बार्बारोस लोकं ज्या क्रूर पद्धतीने लढत व लढताना समोरच्याच्या शरीराचे हाल-हाल करत त्यावरून 'बर्बरता' शब्द हिंदी/उर्दू भाषेत शिरला असावा. दुसरे मजेदार म्हणजे Bárbaros हा शब्दच मुळात ध्वनिअनुकरणात्मक शब्द आहे. बार्बारोस लोक जे बोलत ते रोमनांसाठी BarBar असायची तिथेच आपल्या 'बडबड' शब्दाचे मूळ असावे. म्हणजे आपली 'बडबड' हि दोन अडीच हजार वर्षे जुनी आहे पण मग लेखी वाङ्मयात याचे उल्लेख आहेत का? कोणाला 'बडबड' या शब्दाचा सर्वात जुना लेखी उल्लेख माहिती असेल तर नक्की सांगा.

वाचने 6669 वाचनखूण प्रतिक्रिया 24

सदर शब्द हिंदी ह्या भाषेत ऊत्तरेतील राज्यात वापरला जातो. महाराष्ट्रात असला शब्द वापरला जात नाही. हिंदी ह्या युपी बिहारींच्या भाषेत कुठला शब्द कुठून आला ह्यावर आपण मराठी लोकांनी का दळण दळावं? इतके रिकामे मिपाकर नसावेत असं मला वाटतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हया बिलंदर Wed, 11/22/2023 - 08:31
तुमच्या प्रतिक्रियेतला पहिला शब्दच 'सदर' हा मराठी च आहे असे तुम्हाला वाटते का?

In reply to by म्हया बिलंदर

परभाषेतील जरी असला तरी मराठीने स्विकारलाय.बर्बरता हा युपी बिहारींचा शब्द मराठीने स्विकारला नाहीये.

सर टोबी Tue, 11/21/2023 - 23:30
विविध भारती, दूरदर्शन, किंवा ऑल इंडीया रेडिओ हे हिंदी आणि उर्दू भाषेसाठी प्रमाणभूत म्हणून बघण्याचे दिवस बहुदा संपलेत. हीच गत मराठीची देखील झाली आहे. आणि वर्तमानपत्राबद्दल तर बोलायलाच नको. तिथे तर डुलक्या घेण्यासाठीदेखील उपसंपादक उरले नसावेत असं दिसतंय. आता ठराव संमत न होता पारीत होतात, इशारा न मिळता संकेत मिळतात, सांसद आणि विधायक यांनी खासदार आणि आमदारांची सुट्टी केली आहे. आता ”ब्राउजर सुरु करून साईट ओपन कर” हे जितकं मराठी वाटतं तितकंच “उद्या नवनिर्वाचित सांसद शपथ ग्रहण करतील” मराठी ऐकावं लागेल असं दिसतंय.

जेपी Tue, 11/21/2023 - 23:30
इतके रिकामे मिपाकर नसावेत असं मला वाटतं. इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे. बाकी च्या कथा कुटायला पण टाईम भेटल. बाकी बर्बरता शब्द महाभारत मधील बार्बरीक वरून आला असावा. बार्बरिक कोण होता या साठी वेगळा धागा काढायला हरकत नाही

In reply to by जेपी

इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे. कुणी कुटल्या? कुठे कुटल्या?? ऊलट वेळ वाया घालवू नका असेच मी सांगीतले. बाकी हिंदी शी मराठी भाषकांचा काय तो संबंधं?? का म्हणून हिंदीचं दळण दळावं?? ह्याबद्दल काही ऊत्तर आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हया बिलंदर Wed, 11/22/2023 - 08:28
मराठी भाषकांचा केवळ हिंदीच नाही तर अन्य भाषांशी देखील संबंध आहेच. 'बडबड' शब्दबद्दल वर मत मांडलेलं आहेच शिवाय आणखी ही बरेच शब्द मराठीत आपण सर्रास वापरतो. भाषेचे प्रवाही असणेच भाषेला समृध्द बनवते असे माझे मत. बाकी कुठल्या कुठे विषय नेल्यामुळे तुम्ही आजची गोळी चुकवली असे वाटते.

In reply to by म्हया बिलंदर

मंगोल भाषेतील तुर्की शब्द ह्यावरही एक लेख येऊद्या, किंवा कुर्दी भाषेताल चिनी शब्द ह्यावरही. मिपाकरांना कुठे काय कामधंदे आहेत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी हिंदी शी मराठी भाषकांचा काय तो संबंधं?? का म्हणून हिंदीचं दळण दळावं
ते दळण गेले ५० वर्षे दळले जात आहेच. 'साजन'ला 'साजणा' करणारे आपले मराठमोळे गीतकारच ना? आघाडीच्या मराठ्मोळ्या गायिकांनी हिंदीतच आपले करीयर केले ना? एकीने तर उर्दु शिक्षकही लावला होता. मराठी साहित्य सम्मेलनाला बॉलिवूडच्या महानायकाला बोलावले पण हिंदी/उर्दु साहित्य सम्मेलनाला कधी अशोक सराफ्,सचिनला बोलावले का?

रामचंद्र गुरुवार, 11/23/2023 - 01:39
बडबड या शब्दाचं मूळ पहायला व्युत्पत्ती कोश आत्ता हाताशी नाही. मुळात हा शब्द onomatopoeia किंवा ध्वनिदर्शक शब्द दिसतो. वेदशास्त्रीं नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥ अशी एकनाथांच्या अभंगाची एक ओळ सापडली त्याअर्थी किमान यादवकालीन तरी हा शब्द मराठीत रुजलेला नक्कीच असणार. किती जुना ते कळलं तर छानच होईल. बर्बरता आपण म्हणता त्याप्रमाणे ग्रीक-रोमनेतरांशिवायचे 'असंस्कृत', 'रानटी' म्हणून क्रूर अशा अर्थानेच हिंदीत आहे. पण इंग्रजी शब्दांचे 'हिंदीकरण' करण्याची त्यांची पद्धत आहेच. उदा. बार्बरिक, बार्बेरियनचं बर्बर, सॉक्रेटिसचं सुकरात, प्लेटोचं अफलातून, रिपोर्टचं रपट. असो, एकेक भाषेच्या तऱ्हा.

In reply to by विजुभाऊ

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/23/2023 - 12:48
हिंदीभाषीकांमा जसेच्या तसे शब्द स्विकारायचा त्रास होतो. ते आपल्या भाषेत घेताना शब्द बदलतातच पण इतर भागात जाऊन त्यांच्याही गावांची नावे बदलत सूटतात. महाराष्ट्रात घुसून मुंबईचं बंबई, सोलापूरचं शोलापुर, ठाणेचं थाना, धुळेचं धुलिया करत सुटलेत. कणाहीन मराठी माणसेही आता सदर शब्द इतरांशी बोलताना वापरू लागलेत, कणाहीन मराठी सरकारही तश्याच नावांची फलके लावू लागलंय. मराठी माणसाचं आपल्या भाषेवर प्रेम राहीलेलं नाही. काय करनार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र Sun, 11/26/2023 - 00:47
मुंबईचं बॉम्बे, पुण्याचं पूना, सोलापूरचं शोलापूर, बीडचं भीर, धुळ्याचं धुलिया, खडकीचं किरकी, शीवचं सायन ही सगळी इंग्रजांची करामत (Byculla to Kaliyan आठवा!). बंबई, ढक्कन (डेक्कन) कॉर्नर, भोसरीचं भोसx ही उत्तर भारतीयांची कमाल. अशा वातावरणात 'नया है वह'वालं प्रमाण भाषेचा आग्रह धरणारे पात्र विनोदी ठरलं तर नवल नाही.

In reply to by रामचंद्र

इंग्रज इंग्लंडात कलमडून ७० वर्षे झाली, चेन्नईला मद्रास कुणीच म्हणत नाही फक्त त्रास मराठी नावांचाच होतो. नी ते ऊभा बदलत सुटतात, नी त्यांना काही बोलावं तर मराठी भैय्ये छातीचा कोट करून पुढे येतात. चहापेक्षा किटली गरम असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रामचंद्र Sun, 11/26/2023 - 20:37
मुळात मराठी मंडळीच प्रमाण भाषेच्या मुळावर आलीत असं वाटतं. त्यामुळे रोजच मराठीचे धिंदवडे निघताना दिसतात. आणि इतरांकडूनही तसेच होत असल्याने त्याचे मराठीभाषक जनतेला काहीच वाटत नाही. एक साधं उदाहरण पहा, मराठी वाहिन्यांवरच्या मराठीचा दर्जा आणि हिंदी वाहिन्यांवरच्या हिंदीचा दर्जा पहा. त्यांची मराठीइतकी घसरण वाटत नाही. खासकरून उच्चाराच्याबाबतीत.

विजुभाऊ गुरुवार, 11/23/2023 - 16:43
वांद्र्याचे बांदरा आनि हिंजवाडी चे हिंजेवाडी ऑलरेडी केलेले आहे तीच गोष्ट स्पेलिंग ची. हिंदी भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर एच असे करतात. कशासाठी तेच जाणोत. म्हणजे घोरपडी चे स्पेलिंग घोरपुरी केलेले असे आहे. कचोरी चा उच्चार कचोडी असा करतात. पुरी चा उच्चार पुडी असा करतात. हे तर सोडा "पार्टी " या शब्दाचा उच्चार पाट्टी असा करतात.

In reply to by विजुभाऊ

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/23/2023 - 19:18
सगळी कडच्य्या संस्कृती संपवून एकमेव युपी बिहार घुसवायचा डाव असावा. त्याची सुरूवात भाषा लादण्यापासून तसेच स्थानीक भाषेतील शप्द बदलण्यापासून केलीय. हे सर्व करायला त्यांनी आधी कणाहीन महाराष्ट्र राज्य सापडलं, समोरचा मराठीत जरी बोलत असेल तरी हॅ हॅ करत मराठी लोकच त्यांच्याशी हिंदीत बोलायला जातात. इतर राज्यात स्थानीक भाषा ते शिकून घेतात. नाही शिकले तर इतर राज्य सपाटून मार देतात, महाराष्ट्रात मात्र त्यांच्या डावाला पोषक वातावरण आहे.पन्नासेक वर्षात महाराष्ट्राचं संपुर्ण हिंदीकरण झालेलं असेल. - अमरेंद्र बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

प्रचेतस Fri, 11/24/2023 - 17:25
बर्बर क्रूर होतेच आणि परकीय टोळी योद्धे होते. ते बहुधा उत्तर आफ्रिकेतले असून नंतर भाडोत्री सैन्याच्या रूपाने युरोपात पसरले. महाभारतात भीष्मपर्वात आणि द्रोण पर्वात त्यांचा उल्लेख हा कायमच इतर परकीय किंवा रानटी टोळीवाल्या योद्ध्यांच्या बरोबरीने येतो. शकाः किराता दरदा बर्बरास्ताम्रलिप्तकाः | अन्ये च बहवो म्लेच्छा विविधायुधपाणयः|| काम्बोजानां सहस्रैस्तु शकानां च विशां पते | शबराणां किरातानां बर्बराणां तथैव च || शक, किरात, दरद, बर्बर, ताम्रलिप्तक, म्लेंच्छ, कंबोज, शबर हे रानटी आणि परकीय योद्धे येथे दिसतात. मात्र बडबड ह्या शब्दाचे मूळ बरबर ह्या शब्दात नसून ते संस्कृतोद्भव/ प्राकृतोद्भव आहे. मूळ संस्कृत शब्द वद, वद पासून वदवद आणि त्यापासून बडबड आणि वटवट हे दोन समानार्थी शब्द तयार झाले. वदवदचे प्राकृत मूळ वडवाडइ असे आहे. इतिहासाचार्य राजवाडे भद्, बद्, वृध् असेही धातू सुचवतात. शिवाय बडबद हा शब्द ज्ञानेश्वरीतही १५व्या अध्यायात आला आहे. म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥ तर मोरोपंतांची पुढील आर्या तर प्रसिद्धच आहे. कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ॥ मला वाटतं ह्या विषयावर इतके विवेचन पुरेसे व्हावे.

In reply to by प्रचेतस

रामचंद्र Fri, 11/24/2023 - 19:47
चांगली माहिती. यांपैकी शक, किरात आणि शबर (शबरी?) हे आपल्या संस्कृतीत पूर्णपणे मिसळून गेले असावेत, बर्बर मात्र अपवाद. कारण ते इथं स्थायिक झाले नसावेत असं असेल काय?

In reply to by रामचंद्र

प्रचेतस Sat, 11/25/2023 - 00:31
किरात आणि शबर इथलेच, किरात हे उत्तर भारत/ ईशान्य भारताच्या वन प्रदेशात राहणारे. ,तर शबर म्हणजे संस्कृत न जाणणारे निन्म जातीचे बहुधा आदिवासी. शक म्हणजे सिथियन, ह्या मध्यपूर्वेतून आलेल्या धर्मविहिन रानटी टोळ्या. शक नंतर कुशाणांचे क्षत्रप म्हणून काम करू लागले व येथील राज्यकर्ते झाले चंद्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्याने त्यांचे समूळ उच्चाटन केले. त्यापूर्वी गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद करून भूमक वंश संपवला होता. बर्बर मात्र येथे स्थायिक होऊ शकले नाहीत कारण त्यांचे सामर्थ्य तितके नव्हतेच, मात्र हूणांनी मात्र राजस्थानात आणि माळव्यात काही प्रमाणात बस्तान बसवले होते. गुप्तांची वैभवशाली राजवट अस्तंगत व्हायला हूणांचे सतत होणारे हल्ले हेही एक कारण होते.