मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या वर्षी गणपतीची प्लॅस्टिक सजावट नकोच ?

चौथा कोनाडा · · काथ्याकूट
या वर्षी गणपती सजावट नकोच ? त्या काळी घरी गणपती बसवायचा म्हणजे कागद, पुठ्ठया, साड्यांचे पडदे, झुरमुळ्या असं घरगुती काही बाही सामान वापरत सजावट करायचो..... हळूहळू लाईटच्या माळ आल्या , त्या ही महाग असायच्या एकच माळ गणपती, दिवाळी असं दोन्हीला कित्येक वर्षे वापरायचो. मग लाईटच्या माळा थोड्या स्वस्त झाल्या ... आणखी दोन चार घेऊन टाकल्या .. मग काय गणपती पुढे झगमगाट भारी वाटायला लागला ... पुढे फोकस आले ... मग रंगीत फोकस आले ... चिनी लाईट च्या अतिस्वस्त माळा आल्या ... आपल्या गणपती बाप्पा सजावट लै भारी मग हॉल सजावटीत प्लॅस्टिकची फुलं बाजारात आली ... तशी महाग होती एखाद दुसरी विकत घेऊन हॉल सजवू लागलो ... तीच फुलं गणपती सजावटीला वापरू लागलो ... खालून लाईट सोडली कि झ्याक भारी दिसायचं ! मग थर्माकोल आलं, ,, हे धुमाकूळ प्रचंड आकर्षक मखरे बाजारात मिळू लागली ... घरोघरी अशी थर्माकोल मखरे ... मग प्लॅस्टिकच्या तऱ्हे तऱ्हे फुलांनी बाजारपेठ व्यापून टाकायला सुरुवात झाली. प्लॅस्टिक फुलांचीच तोरणं, त्याचेच हँगिंग्ज ... सजावटीचे काय वाट्टेल ते आयटम भुरळ घालू लागले ... वेड लागायची पाळी आली. प्रत्येक लग्न किंवा इतर कार्यात प्लॅस्टिक फुलांचीच सजावट ... इकडे प्लॅस्टिक तिकडे प्लॅस्टिक ... जिकडे तिकडे प्लस्टिक च प्लॅस्टिक ! इकडे प्लस्टिक फुलं तिकडे प्लॅस्टिक फुलं ... जिकडे तिकडे प्लॅस्टिक फुलं च प्लॅस्टिक फुलं ! ganeshdeco1234thycb प्लॅस्टिकचा कचराच कचरा ... विघटन न करता येणारा ... किती किती जमिनीत गाडायचा ? हात आणि यंत्रणा थकू लागल्या ... प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणं महाकठीण होऊन बसलं ! अन एक दिवस खाड्कन डोळे उघडले ! प्लॅस्टिकची फुले, प्लॅस्टिक सजावटीवर बंदी ? प्लॅस्टिकची फुले (Plastic Flower) बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने एकीकडे पर्यावरणाचा दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारण (Farmer Economy) अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक फुलांवर बंदी (Ban Plastic Flower) घालण्यासाठी मागणी होत आहे. ‘प्लॅस्टिक बंदी कायदा २०१६’ अन्वये महाराष्ट्र राज्य शासनाने २०१८ साली एकल (सिंगल) वापर प्लॅस्टिक बंदी केली होती. परंतु त्यात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा समावेश नव्हता. त्यामुळे प्लॅस्टिक फुलांचा वापर वाढून प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होत होते. त्याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे. ‘प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची’ ‘एकवेळ प्लॅस्टिक वस्तू वापर’ या अधिसूचनेत १०० मायक्रोनपेक्षा कमी वापरास प्रतिबंध आहे. मात्र प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची असल्याचे आढळले आहे. बाजारात कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. परिणामी कचरा म्हणून फेकून दिल्यानंतर प्रदूषण वाढते. ही फुले पॉलिथिन आणि घातक सिंथेटिक रंगांनी बनविली आहेत. त्यांचे विघटन होण्यासाठी कोणत्याही प्लॅस्टिक इतकाच वेळ लागतो. त्यांची टिकवण क्षमता कमी व वातावरणीय परिस्थितीमुळे रंग उडत असल्याने पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिकची फुले, प्लॅस्टिक सजावटीवर लवकरच बंदी येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या वर्षी ... या वर्षी गणपती सजावट नकोच ? आपण आपलं साधं नारळ, विड्याची पाने, ५ रंगाची फळे, आंब्याची पाने / केळींचे, कर्दळीचे खुंट असं पारंपरिक सजावटच खुप झाली ! काय म्हणताय मंडळी ... काय मत आहे तुमचं ?

वाचने 9017 वाचनखूण प्रतिक्रिया 47

कंजूस गुरुवार, 09/07/2023 - 18:51
बरोबर आहे. जून महिन्यात तेरड्याचे बी पेरावे कुंड्यांत. झेंडूचे बीसुद्धा पेरायचे दोन चार मोठ्या कुंड्यांमध्ये. गणपती नवरात्रात फुललेल्या कुंड्या समोर ठेवायच्या. लाल माठ लावल्यास ती झाडेही गौरी साठी लागतील. एकदा का सवय झाली की पुढल्या वर्षी सोपे. काही जण यांचा व्यवसायही करू शकतील. तयार फुलझाडे. (ख्रिसमसच्या सणात ती क्रिसमस ट्री आणि पोनसेटीया हे शोभेचे झाड खूप खपतात.)

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 09/07/2023 - 21:52
हो, पुर्वी कुंड्यातल्या रोपांची सजावट करायची खुप फॅशन होती ... घरी सत्यनारायणालाही अगदी कुंड्या नसतील तर स्टील ग्लासात गुलाबाच्या फुल कांड्या लावायचे. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसुद्धा आजकाल मनपाच्या नर्सरीतुन कुंड्या आणून सजावट केली जाते ... भारी दिसतं !

In reply to by कंजूस

रामचंद्र गुरुवार, 09/07/2023 - 23:25
तेरडा, झेंडू, तांबडा माठ, सदाफुली कुंड्यांमध्ये वाढवून आराशीसाठी वापरण्याची कल्पना खरंच अनुकरणीय आहे. झेंडूची रोपे जेव्हा वाळून जातील तेव्हा ती वाळलेली झुडपे आणि कडुलिंबाच्या डहाळ्या झाल्यास तो डासनियंत्रणासाठी उत्तम पर्यावरणपूरक पर्याय आहे.

चित्रगुप्त गुरुवार, 09/07/2023 - 18:55
शंभर टक्के सहमत. याच बरोबर गणेशोत्सव म्हणजे मोठमोठे लाऊडस्पीकर, डीजे चा धिंगाणा वगैरे सगळे बंद होऊन उत्सवाला मूळचे शालीन रूप येईल तो सुदिन.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र गुरुवार, 09/07/2023 - 20:24
शंभर टक्के सहमत. अर्थात सर्वच सणांसाठी. आणि याच्याच जोडीला फटाके आणि बीभत्स, अतिप्रखर रोषणाईसुद्धा नको. यासाठी गणपतीची आर्ततेने आळवणी.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा गुरुवार, 09/07/2023 - 21:55
अतिप्रखर रोषणाईसुद्धा नको.
वीट आलाय आता रोषणाईचा ! जिकडं तिकडं रोषणाई ... अगदी जंगल / अ‍ॅग्रो टुरिझम कॅम्पात सुद्धा रोषणाई असते . अंधार पुर्णपणे नाहीसा होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ Fri, 09/08/2023 - 10:16
जिकडं तिकडं रोषणाई ... अगदी जंगल / अ‍ॅग्रो टुरिझम कॅम्पात सुद्धा रोषणाई असते . ह्याला म्हणतात प्रोग्रेस .. आहात कुठं मास्तर ! (खी खी खी वाली इमोजी )? एकदा भीमाशंकर ला भ्रमंतीला गेलो होतो प्रसंन्न दिवस होता , सोबत एक नौदलातील अधिकारी होता , मूर्ती लहान कमी बोलणे .. वर गेल्यावर जंगलातून "ढिंग चाक ढिंग चाक" टू इन वन लावून एक टोळकं दंगा करीत होत .. तो नौदलीय असा वैतागला... शेलक्या शब्दात त्याने त्या टोळक्याची कानउघडणी केली .. आवाज बंद प्रकाशाचे प्रदूषण आवाजचे रसायनाचे / रंगाचे ( जुन्या दगडी देवळाला ऑइल पेंट देणे) हे राम

In reply to by चौकस२१२

कंजूस Fri, 09/08/2023 - 10:58
सोमवरी जाऊन पाहा भिमाशंकरला साक्षी विनायक वाटेवर घनदाट अरण्य. पण फटाके वाजवतात तिथे. शेकरू लांब गेले तो भाग सोडून.

Bhakti गुरुवार, 09/07/2023 - 19:08
मलाही नैसर्गिक फुलांचे डेकोरेशन आवडत.एकदा रोज वेगवेगळ्या फुलांचे हार बनवले होते.मागच्या वर्षी रोज वेगवेगळे मोदक केले होते.यंदा वेगवेगळ्या फुलांची आरास/रोज एक एक कुंडी आणते हे जमतेय का पाहते.

सौंदाळा गुरुवार, 09/07/2023 - 19:37
घरच्या गणपतीसाठी हौसेने सजावट करतो प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर न करता बरेच पर्याय आहेत. एकदा क्राफ्ट पेपरने किल्ला केला होता, एकदा फुले, एकदा (लॉकडाऊन मधे) लाकडी पट्ट्या आणि नविन लॅपटॉप बरोबर आले खोके वापरुन मखर वर म्हटल्याप्रमाणे साधी फुले पण सुंदर दिसतात, नुसत्या हिरव्यागार दूर्वांची जुडी करुन त्याचा हार केला तरी बाप्पा सुंदरच दिसतो. त्यामुळे शीर्षक पटले नाही. धाग्यामधे खूपदा 'प्लॅस्टीक' शब्द आला आहे तो शीर्षकात पण पाहिजे होता.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 09/07/2023 - 20:59
आमच्याकडे एक लाकडी चौकट आहे, दरवर्षी ती फुलवाल्याकडे देतो आणि तो जरबेरा , गुलाब वगैरे वापरुन मस्त सजवुन देतो. जरा महाग पडते पण ३-४ दिवस टिकते.

nutanm गुरुवार, 09/07/2023 - 21:53
गणपती सजावट. प्लॅस्टिक नकोच.जरी छान दिसते‌ रंग छान असतात फुलापानांचे तरी. त्यापेक्षा. खरी अष्टर व शेवंतीची फुले स्वस्त व मस्त कल्पकतेने मांडणे , त्यांची रांगोळी ,सजावट मांडणयानेही बाप्पा कसाही छानच दिसतो.फकत रंगीत ,पांढरी रांगोळी नेही. सजावट होते व सर्व रंगांची एकत्र रांगोळी नंतर ती डब्यात भरून व. परत वापरूनही. त्याबरोबर नवे रंग नवी रांगोळी कल्पकतेने केल्यासही सजावट होते , घरोघरी सुंदर छोट्या मोठ्या रांगोळ्या काढणारे कोणीतरी असतेच.

nutanm गुरुवार, 09/07/2023 - 21:59
या वर्षी गणपती प्लॅस्टिक सजावट नकोच पेक्षाही दरवर्षी गणपतीत प्लॅस्टिक सजावट नकोच असे शिर्षक हवे.जरी प्लॅस्टिक सुंदर दिसत असले तरी.

कंजूस गुरुवार, 09/07/2023 - 22:24
फुलबाजारात फुलांचा भाव वाढत गेला तसे भाविक इतर वस्तूंचे वळले. आता ते परत तिकडे जाणार नाहीत. मल्याळी लोक समारंभांत केवड्याच्या पानांचे तोरण लावतात किंवा माडांच्या झावळीच्या पानांचे करतात. गणपतीच्या वेळी केवडा सर्वांना परवडणार नाही. त्यामुळे पिवळ्या कागदाच्या पट्ट्या वापरून त्यावर केवडा अत्तर मारावे लागेल.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा Sat, 09/09/2023 - 19:53
पिवळ्या कागदाच्या पट्ट्या वापरून केवडा तयार करण्याची कल्पना छान आहे. बाजारात असे तयार मिळाले तर उत्तमच. केवड्यावर अत्तर मारण्याची गरज नाही असे वाटते. पूजेचे इतर सुगंध, धूप उदबत्ती, अत्तर, अष्टगंध ई. असतातच.

स्नेहा.K. गुरुवार, 09/07/2023 - 23:21
एक जास्वंद, एक दूर्वांची जुडी, एक फुलांचा नाजूक हार... गणपतीची मूर्ती मुळातच इतकी मोहक आणि मनोहर असते, की कसल्याही कृत्रिम सजावटीची गरज वाटत नाही. घरातीलच हिरवीगार छोटी रोपे किंवा फुलझाडे आजूबाजूला .

In reply to by स्नेहा.K.

रामचंद्र गुरुवार, 09/07/2023 - 23:31
खरं आहे. आणि गणपतीची मूर्तीही बेताच्या आकाराची असेल तर चांगले. आणि घरात बाळगोपाळांसह माणसांची लगबग हवी तर खरा या सणाचा आनंद.

बबन ताम्बे Fri, 09/08/2023 - 12:45
तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केलाय. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, प्लास्टिकने खूपच धुमा़कूळ घातलाय. पर्यावरणाची आपण किती वाट लावतोय याचे हल्ली भान नाही. कुणी सुधारणा करावे म्हटले तर काही लोकांचा विरोध. मागे पुणे मनपाने मुर्ती नदीत न करता हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले तर नदीकाठी गणेश मुर्तीचे विसर्जन नदीतच करा, हौदात करणे शास्त्रसंमत नाही असे बोर्ड घेऊन एका संस्थेचे कार्यकर्ते उभे होते, आता बोला.

In reply to by बबन ताम्बे

रामचंद्र Fri, 09/08/2023 - 15:27
मराठवाड्यात पूर्वी दीडएकशे वर्षांपूर्वी नदीकाठी जाऊन तिथल्या मातीचीच जमेल तशी हातानेच मूर्ती करून तिचीच पूजा करून नदीत विसर्जन करायची पद्धत होती असं म्हणतात. अशा वेळी मूर्तीचा आकार हा तितकासा रेखीव नसणार हे तर उघडच आहे पण मुळात आपल्याकडं पूजन हे तांदळा, पाषाणस्वरूप, स्वयंभू म्हणून साधारण गोलसर आकार अशाही प्रकारांत केलं जात होतंच. यात दर्शनी स्वरूपापेक्षा श्रद्धाभाव महत्त्वाचा होता. या प्रकारात नदीत विसर्जनाने फारसं प्रदूषण होत नसेल. शिवाय एकत्र कुटुंब पद्धत, सार्वजनिक गणपती नसणे, लोकसंख्या कमी अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचे प्रमाण नसल्यातच जमा असणार. आता जे धार्मिकतेचे कारण सांगतात ते आता आपण मूर्ती स्वहस्ते करण्याच्या मूळ प्रथेबद्दल काय सांगतात?

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा Fri, 09/08/2023 - 21:52
सहमत. पण प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्ती बाबत घिसाडघाई होतेय असं वाटतं. अनेक प्रकारची प्लास्टीक्स उत्पादित होत असताना फक्त पीओपी मुर्त्यांवर बंदी घालयाची घाई कशाला. दहा वर्षांचा प्लान बनवून टप्प्याटप्प्याने बंदी घालता येईल. पीओपी मुर्त्यांमुळे प्रदुषण होते ही बोंब उठवली गेली पण प्रदुषण मुख्यतः रासायनिक रंगांमुळे होते. शाडूमातीच्ग्या मुर्तीला रासायनिक रंग वापरले असतिल तर त्यावर काहीच चेक्स नाहीत ! नदीत पीओपी मुर्ती विसर्जन हा वेग्ळाच मोठा विषय आहे. आमच्या मनपात एका तलाव मुर्ती विसर्जन केली दुसर्‍या दिवशी लगेच तलावाबाहेर काढातात, सॉर्ट करतात आणि पुढे पाठवतात. विसर्जित पीओपीची मुर्ती इ त र बांधकाम साहित्याप्रमाणेच (जिप्सम) रिसायकल / री युज करता येईल.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा Mon, 09/11/2023 - 14:33
म्हणूनच विसर्जित POP पीओपीची मुर्ती जमा करून इ त र बांधकाम साहित्याप्रमाणेच (जिप्सम) रिसायकल करुन वापरायला हवी ! तयार करण्यास सोपी, दिसायला सुबक, वजनाला हलकी, किंमतीला कमी या बलस्थानामुळे पीओपीची मुर्ती महत्वाची ठरते.

धर्मराजमुटके Fri, 09/08/2023 - 17:16
आज काल लहान पोरा टोरांनी हट्ट केला म्हणून गणपती बसविण्याचे फॅड फार जोरात आहे. घरात एकालाही आरत्या येत नाही. नुसताच देखावा. असो ! मी दुसर्‍याच्या घरातला गणपती बाप्पा बघूनच खूश होतो .(शिवाजी जन्मावा पण तो दुसर्‍याच्या घरात या चालीवर वाचावे !) त्यामुळे खर्च, श्रम, प्रदुषण सगळेव वाचते. शिवाय भक्तीभावात कमतरता येत नाही. ताजा कलम : आमच्या पप्पांनी गणपती हानला या गाण्याचा आस्वाद घ्या.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Fri, 09/08/2023 - 19:50
>>आज काल लहान पोरा टोरांनी हट्ट केला म्हणून गणपती बसविण्याचे फॅड फार जोरात आहे. अरे बापरे ! पुर्वी तर घरातील म्हातारी माणसेच जास्त आग्रह करायची म्हणे...

In reply to by धर्मराजमुटके

कर्नलतपस्वी Sun, 09/10/2023 - 10:59
हानला नाय भौ आणला हाय ते.... आता फॅशन झालीय,पर्यावरणाला धोका,फिजूल खर्ची,इत्यादी. कुठल्याही गोष्टीत दोन बाजू असतात हे सोईस्कर पणे विसरतात. खर्च करू शकणारे कितीतरी गरीब परीवाराचा खर्च उचलू शकतात. रोजगार निर्माण होतात. लक्ष्मी प्रवाहित होते. भुकेल्या पोटी दोन घास जातात. लहान मुलांवर संस्कार होतात. समाज एकत्र येतो. सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. असा का नाही विचार करू शकत. वाहतूक कोंडी,साऊंड प्रदुषण अमंळ जास्त होते पण कधीतरी चालतयं की .....

In reply to by कर्नलतपस्वी

धर्मराजमुटके Sun, 09/10/2023 - 13:31
वाहतूक कोंडी,साऊंड प्रदुषण अमंळ जास्त होते पण कधीतरी चालतयं की ..... साहेब, आपण मोठ्या शहरात राहता की लहान शहरात किंवा खेड्यात ते माहीत नाही. वाहतूक कोंडी,साऊंड प्रदुषण अमंळ जास्त होते पण कधीतरी नाही नेहमीचीच बाब झाली आहे त्यामुळे जास्त त्रास होतो. वर्षाचे बाराही महिने काहीना काही उत्सव चालू असतात. वीट येतो अगदी. बाकी लहान मुलांवर संस्कार होतात हे खरे (ते चांगले होतात की वाईट हा पण एक चर्चेचा मुद्दा आहे पण तो राहुदेत)

In reply to by धर्मराजमुटके

चौथा कोनाडा Sun, 09/10/2023 - 22:05
खरंय... आधीच वाहणाचेवाज,यंत्राचे आवाज याच्या प्रदूषणाने डोके उठवलेय... अन् त्यात उत्सवी डॉल्बी डीजे आणि ढोल ताशांनी डोके भाणाणून सोडलेय... ढोलताशाच्या धडाम धाडाम आवाजापेक्षा लेझिम खेळांचा मंजुळ आवाज ऐकायला आवडेल. लेझिमचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन व्हायला हवे.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र Mon, 09/11/2023 - 19:00
अगदी नेमकं हेच व्हायला हवं. एक तर लेझमीने छातीत धडधड होण्याइतका आवाज होत नाही. मुख्य म्हणजे १-२-३-४-५-६-७-८ अशा प्राथमिक तालावरचं ते अगदी लयबद्ध नृत्यच असतं. हा खरा तर उत्तम आणि सोपा व्यायामप्रकार म्हणता येईल. तसंच तरुणवर्गाला जी नाचाची अनावर ओढ असते ती लेझीम खेळताना जोशात नाचून ती अगदी मनसोक्त पूर्ण करता येईल. आता जे ढोलताशावर एकेक प्रकार बसवतात, ते लेझमीतही असे आविष्कार करू शकतील. कदाचित नाचून दमल्यावर इतरही अनेकांना एकाच मिरवणुकीत संधी मिळेल. फक्त हादरे बसणारे संगीत जोडीला नसले, केवळ अंगात भिनेल असा मस्त ताशाही पुरेल. खरंच अजूनही उशीर झाला नाही. किमान लहान मंडळे, सोसायट्या यांना अजून तयारी करता येईल.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Tue, 09/12/2023 - 20:56
तालावरचं ते अगदी लयबद्ध नृत्यच असतं
अगदी... लेझिम आणि तत्सम नृत्य प्रकार बघताना सुख मिळते. ढोल कर्णकटू ५-१० मिनिटं नंतर बघायला बोअरर् होते. ढोल वर मात करायची असेल तर लेझीम स्पर्धा घेऊन बक्षिसे देऊन प्रसार करणेच इष्ट!

In reply to by Trump

कर्नलतपस्वी Sun, 09/10/2023 - 11:02
खरे तर सध्याचा गणपती उत्सवात गणपतीच्या मुर्तीची किती गरज आहे ह्यावर चर्चा होण्याची होणे आवश्यक आहे.

In reply to by Trump

चौथा कोनाडा Sun, 09/10/2023 - 12:29
खरे तर सध्याचा गणपती उत्सवात गणपतीच्या मुर्तीची किती गरज आहे ह्यावर चर्चा होण्याची होणे आवश्यक आहे.

थेट वर्मावर घाव !

In reply to by चौथा कोनाडा

कर्नलतपस्वी Wed, 09/13/2023 - 12:05
खरे तर सध्याचा गणपती उत्सवात गणपतीच्या मुर्तीची किती गरज आहे ह्यावर चर्चा होण्याची होणे आवश्यक आहे. ही टिप्पणी ट्रम्पभौंची माझी नाही. माझे उत्तर जेव्हढं मीठ जेवणात अनिवार्य आहे तेव्हढी. हा प्रश्न सुद्धा खोडसाळ पणाचा वाटतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा Wed, 09/13/2023 - 12:32
मला वाटलं / वाटतं मी प्रतिसाद कर्नल साहेब, ट्रम्पभौंनाच दिला होता. असो. गणपतीच्या मुर्तीची किती गरज आहे याचं तुम्ही दिलेलं उत्तर "जेव्हढं मीठ जेवणात अनिवार्य आहे तेव्हढी." हे खूपच भावलं ! स्पर्धेच्या युगात मोठ्ठं .... मोठ्ठं मोठ्ठं ... अधिक मोठ्ठं मोठ्ठं .... तुमच्यापेक्षा मोठ्ठं मोठ्ठं, इतरांपेक्षा मोठ्ठं मोठ्ठं, ... सर्वांपेक्षा मोठ्ठं मोठ्ठं ... असं करत मुळ गरज किती हेच सगळेजण विसरून गेलेत.... गावोगावी / शहरोशहरी सर्वात मोठ्ठा पुतळा, सर्वात मोठ्ठा ध्वज, सर्वात मोठ्ठा घुमट, सर्वात मोठ्ठी रांगोळी, सर्वात मोठ्ठी डिश ... अश्या मोठ्या मोठ्या शर्यती सुरु आहेत ... दुर्दैवी आहे हे !

In reply to by चौथा कोनाडा

अहिरावण Wed, 09/13/2023 - 13:27
भव्यतेचे आकर्षण पुर्वापार आहे. पिरामिड, बाहुबलीची भव्य मुर्ती. स्वातंत्र्यदेवता, आयफेल टावर, बुर्ज खलिफा इत्यादी वैयक्तिक स्तरावर १ बीएच्के, २ बीएच्के, ३ बीएच्के, ३.५ बीएच्के, ४ बीएच्के. पेंटहाऊस. फार्महाऊस, यादी वाढती आहे

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा गुरुवार, 09/14/2023 - 12:15
अगदी सहमत. पण .... ......... पण हे वैयक्तिक किंवा प्रशासकिय पातळीवर ठिक आहे ... या मोठ्ठ्याचा सामाजिक पातळीवर उपद्रव होऊ लागला तर आपल्या सारखे बापडे काय करणार ?

In reply to by Trump

अहिरावण गुरुवार, 09/14/2023 - 14:41
>>>खरे तर सध्याचा गणपती उत्सवात गणपतीच्या मुर्तीची किती गरज आहे ह्यावर चर्चा होण्याची होणे आवश्यक आहे. अगदी अगदी. मुर्तीसमोर बसुन चर्चा करायला हरकत नाही. आणि समजा मुर्ती नको असे ठरले तर मुर्ती नसल्याचा काय फायदा झाला याची चर्चा करु. ती चर्चा मुर्तीसमोरच असलेली बरी, म्हण्जे दोन्ही चर्चांना एक तटस्थ साक्षीदार असलेला बरा.

विजुभाऊ Wed, 09/13/2023 - 10:52
सार्वजनीक गणेशोत्सव हा हवाच कशाला? आता तुम्ही म्हणाल की मग दही हंडी, ईद , ख्रिसमस , पर्युषण वगैरे तरी कशाला हवे. तेही खरेच आहे. ज्याने त्याने आपापला धर्म घरात ठेवला तर बरेच प्रश्न कमी होतील. रस्त्यावर नमाज आणि आरत्या करून , डीजे च्या तालावर नाचून , देव प्रसन्न होत असेल असे वाटत नाही.

In reply to by विजुभाऊ

काही वर्षापूर्वी हे उत्सव जनतेच्या वर्गणीवर चालत. मग खर्च वाढत गेले आणि स्पॉन्सरशिप चा जमाना आला. मग गुटखा,सिगारेटच्या जाहीराती मंडपात दिसु लागल्या. त्यावर टिका सुरु झाल्याने तो मार्ग बंद झाला. मग एकेका राजकीय नेत्याने ही मंडळे दत्तक घ्यायला सुरुवात केली. आता सार्वजनिक उत्सव ही जनतेची गरज संपुन राजकीय नेत्याची गरज झाली आहे. जिथे तिथे एक एक मंडळ एकेका दादा,भाऊ,भाई,आण्णा,अप्पा,साहेब वगैरेंनी दत्तक घेतलेले आहे आणि तिथे सढळ हाताने खर्च करुन, नंतर श्रमपरीहार वगैरे करुन कार्यकर्ते धरुन ठेवणे आणि पुढच्या निवडणुकीत या सगळ्याची सव्याज वसूली करणे हा धंदा झाला आहे. त्यामुळे हे उत्सव कमी होण्याऐवजी वाढतच जाणार. होळी, शिवजयंती, दहीहंडी,गणपती,नवरात्र आहेच, पण अधेमधे कोणाकोणाच्या जयंत्या वगैरेही जोरदार साजर्‍या होणे ही काळाची गरज आहे आता.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अहिरावण Wed, 09/13/2023 - 13:21
>>> सार्वजनिक उत्सव ही जनतेची गरज संपुन राजकीय नेत्याची गरज झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना टिळकांनी राजकीय गरजेतूनच केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव नेहमीच राजकीयच होता आणि राजकीयच राहिल. भाबडे लोक त्यांना हवे ते समजो पण परिसरातील राजकीय नेतृत्वाला पुढे येण्यासाठी गणेशोत्सव, दहिहंडी, रंगपंचमी, शिवजन्मोत्सव हे नेहमीच पुरक राहिले आहेत. यात जे परिघावर राहिले त्यांनी पाडवा पहाट, गरबा इत्यादी यांचा आश्रय घेतला. यात चूक काय बरोबर काय ते वेगळे. जे आहे ते असे आहे

In reply to by विजुभाऊ

अहिरावण Wed, 09/13/2023 - 13:23
उत्सव आणि धर्म यात फरक आहे. उत्सव ही मानवाची सामाजिक गरज आहे. धर्म ही मानवाच्या मनाची गरज आहे.