मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रद्धांजली: शिरीष कणेकर यांचे निधन

चलत मुसाफिर · · काथ्याकूट
आपल्या तिरकस व खवट शैलीमुळे अपार लोकप्रियता मिळवलेले लेखक- पत्रकार आणि सादरकर्ते शिरीष कणेकर यांचे काल वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. अगदी अखेरपर्यंत ते लिहिते होते. गेल्या रविवारीच त्यांचा साप्ताहिक लेख सामना पेपरमधे आलेला होता. एकेकाळी त्यांचे सिनेमा व क्रिकेट यावरचे खुसखुशीत लेख वाचण्यासाठी हजारो मराठी वाचक आतुर असत. अनेक चित्रपट कलाकार व क्रिकेटपटू यांच्याशी कणेकरांचे जवळचे संबंध होते. मंगेशकर कुटुंबियांसोबत तर अगदी घरोबा होता. त्यांच्या लेखन व कार्यक्रमांमधे हे किस्से नेहमी येत असत. मराठीत पुलं आणि नगरकर यांच्या नंतरचे मुख्य stand up comic म्हणून कणेकरांचे नाव घेता येईल. पण हेही तितकेच खरे आहे की कणेकरांचा वकूब सामान्य होता आणि एका मर्यादेनंतर त्यांचे लेखन, त्यातील नकारात्मकता, टोमणे, भक्तिभाव हे सर्व कंटाळवाणे होई. अनेकांचा रागही त्यांनी ओढवून घेतला. पत्रकार मुकेश माचकरांनी एक मोठा लेख लिहून कणेकरांच्या या 'सपासप' लेखनाचा चांगलाच समाचार घेतला होता. Vagina Monologues सारख्या cult नाटकाचे वंदना खरे यांनी केलेले मराठी रूपांतर पाहून (तेही अर्धेच!) कणेकरांनी त्याची जाहीर लेखात टर उडवली होती. ते अनेकांना आवडले नाही. काही वर्षांपूर्वी मी त्यांचा एक जुना नियमित वाचक या नात्याने त्यांना कृतज्ञतापूर्वक ते सर्व सांगणारा ईमेल टाकला होता. कणेकरांचा आलेले अत्यंत कुत्सित उत्तर वाचून मी सूज्ञपणे संपर्क वाढवला नाही. असो. साधारण 10 वर्षांपूर्वी राजेश खन्ना गेला, मग देव आनंद, दिलीपकुमार गेले. त्यानंतर कणेकरांच्या लेखनात निरवानिरवीचे सूर उमटू लागले. फेब्रुवारी 2022ला लता मंगेशकर यांचे देहावसान झाल्यावर कणेकर मुळापासून हलले असे त्यांच्या तदनंतरच्या लेखनातून दिसते. काहीही असले तरी आमच्या पिढीला हिंदी सिनेमाचा व सिनेसंगीताचा नाद लावणारे कणेकरच होते हे अमान्य करता येत नाही. त्यांना कृतज्ञ श्रद्धांजली.

वाचने 10542 वाचनखूण प्रतिक्रिया 43

गवि 26/07/2023 - 08:33
एकेकाळी ज्याने खदखदून हसवले असा मनुष्य गेला. फार वाईट वाटले. कोणीच सतत वेगवेगळे आणि काळानुसार शेवटपर्यंत अधिकाधिक उच्च दर्जाचे लेखन करू शकेल असे शक्य नसते. स्वभाव दोष देखील कोणाला चुकलेत? पण आता या दुःखद घटनेनंतर या क्षणी तरी टीकात्मक समीक्षकी चष्मा लावणे कठीण आहे. आदरांजली..

In reply to by गवि

चलत मुसाफिर 26/07/2023 - 14:08
सहमत आहे सर. जमेची बाजू ही म्हणता येईल की कणेकर जसे लेखनातून फटकळ, उद्धट व तिरसट (सर्व विशेषणे प्रशंसात्मक अर्थाने वापरली आहेत) भासत तसेच प्रत्यक्षातही होते. त्यांनी कोणताच फिल्टर किंवा मुखवटा बाळगला नव्हता.

टर्मीनेटर 26/07/2023 - 10:15
शालेय जीवनात वर्तमानपत्रांतून येणारे त्यांचे सिनेमा आणि क्रिकेटवरील लेख वाचायला आवडायचे, तसेच गणेशोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांतही त्यांची सादरीकरणे दोन तीन वेळा पाहिली आहेत. पण ते अजूनपर्यंत लिहिते होते हे नव्हते माहित! शिरीष कणेकरांना आदरांजली 🙏

सौंदाळा 26/07/2023 - 10:23
राजेश खन्ना आणि लता मंगेशकर या दोनच माणसांवर (अगदी घरच्या लोकांपेक्षापण) त्यांनी निर्व्याजपणे प्रेम केले असे त्यांचे आत्मचरित्र आणि लेख वाचून जाणवले. त्यांच्या शैलीबाबत सहमत. मात्र कधीकधी हल्लीचे फिल्म्स्टार, क्रिकेटर यांच्यावर पण असे तिरकस, तिखट लिहिणारे कोणीच नाही हे जाणवते. सध्या लिहिणारे लोक एकदम दोन टोकांचे लिहातात एकतर एकदम भक्त नाहीतर साताजन्मीचा शत्रू असल्यासारखे. अशावेळी कणेकरांची आठवण येते. फिल्लमबाजी, क्रिकेट्वरचे त्यांचे स्टँडअप शोज ऐकताना ते आपल्यातच आहे असे वाटेल. असो, कणेकरांना भावपूर्ण श्रध्दांजली.

सर टोबी 26/07/2023 - 10:30
कणेकरांचे गाये चला जा हे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याच वर्षी ते माझ्या वाचनात आले. एका अर्थाने कणेकरांना मोठा लेखक होताना पाहिलं असं माझ्या बाबतीत म्हणता येईल. दिलीप कुमार, लता मंगेशकर, देव आनंद, आणि तलत मेहबूब हि माझी पण श्रद्धास्थानं आणि या लोकांबद्दल कणेकर मर्यादशील पण प्रेमाने ओथंबून लिहीत असत. मर्यादशील आणि ओथंबून हे एकाचवेळी कसं शक्य आहे असा ज्यांना प्रश्न पडेल त्यांनी सुधीर गाडगीळांचे सूत्रसंचालन पाहावे म्हणजे उगाच उत्सवमूर्तींची आणि आपली कशी गाढ मैत्री आहे हे दाखवण्याचा सोस त्यांना नसे हे पटेल. कणेकर अगदी व्यवस्थित गंभीर लिखाण करीत असत. त्यांच्या वडिलांबरोबर असणारे त्यांचे भावनिक नाते आणि मुलांबरोबर त्यांचे वडील म्हणून जाणीवपूर्वक जपलेला खेळकरपणा यावर काहीसं वाचलेलं आठवतंय. माहीमला लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्गावर एक इराण्याचं हॉटेल होतं (साल १९९०). तेथे अचानक एका घोळक्यातून आपण चमकावं असं वाक्य ऐकू आलं. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर कणेकरांनी महिफिल जुळलेली होती आणि माझी नजरानजर होताच या वाक्याची त्यांनी जणू चाचणी घेतली होती असं वाटून गेलं. आपल्याला हा प्रसंग पाहता आला याला मी भाग्य म्हणणार नाही पण माझी ती खास आठवण आहे हे नक्की.

In reply to by सर टोबी

चलत मुसाफिर 26/07/2023 - 14:12
कणेकरांनी आयुष्यात कमावलेले यश मुबलक आहे. पण तरीही आपल्या वडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याची एक खंत त्यांच्या लेखनात नेहमी दिसे (कणेकरांचे मातृछत्र लहानपणीच हरपले. वडील एक प्रथितयश डॉक्टर होते)

चित्रगुप्त 26/07/2023 - 13:05
शिरीष कणेकरांचे एक पुस्तक वाचल्याचे आठवते. कोणते ते विसरलो. पण मला ते खूपच आवडले होते. आणखी वाचायची होती, पण ते राहून गेले. आता उपलब्ध असल्यास मागवून वाचायची इच्छा आहे. त्यांची यादी (फक्त सिनेसंगीत विषयक) कुणी दिल्यास खूप मदत होईल. कै. शिरीष कणेकरांना भावपूर्ण आदरांजली.

In reply to by चित्रगुप्त

गवि 26/07/2023 - 14:00
फक्त विनोदी लेख आणि अनुभव याबद्दल बोलायचे तर "एकला बोलो रे" नावाचं पुस्तक सर्वाधिक हसवणारं वाटलं होतं. अनेकदा वाचूनही. बाकीही आहेत अनेक. पण ती जास्त करून दैनिक स्तंभ / सदरांचे संकलन अशा स्वरूपाची आहेत. सिनेमा, अभिनेते, लता दीदी हे विषय पूर्ण वेगळे. त्यात ते गंभीर असत.

शिरिष कणेकरांचे 'कणेकरी' लहानपणी नियमित वाचले आहे. त्या त्या सदरात उलेख केलेल्या व्यक्तीची मस्त कणिक तिंबायचे. शिरीष कणेकरांना भावपूर्ण श्रध्दांजली!

त्यांची लेखनशैली "कणेकरी" म्हणून प्रसिद्ध झाली यातंच सारं काही आलं. त्यांच्या लेखनातून आणि बोलण्यातून त्यांचा स्वभाव लगेचच लक्षात येईल असा होता तरीही मला त्यांचे व्यक्तिमत्व विशेष आवडले. कदाचित सिनेमा आणि क्रिकेट हा समान धागा असावा. राजेश खन्नावर त्यांचं विशेष प्रेम होतं पण त्याचबरोबर दिलीपकुमारलाही त्यांच्या लेखी अनन्यसाधारण महत्व होतं. भावपूर्ण श्रद्धांजली! सं - दी - प

माझी फिल्लमबाजीच्या ,(भरत नाट्य मंदिर येथील) एका खेळासाठी, मी गेलो होतो (स्वतः च्या पैश्याने तिकीट काढून ).. त्यावेळी, कणेकर, सादरीकरण करत असताना, डायलॉग आला... "माँ आज क्या बनाया है ?" (असे ४०-५० वर्ष्याचा पण कॉलेज कुमार भूमिकेतील टोणगा मुलगा ... आपल्या ३० तील पांढरे करून म्हाताऱ्या बनवलेल्या आईला विचारतो ) त्यावेळी, काणेकर पुढे बोलणार .. तेव्हाच जवळजवळ सर्व सभागृहातून एकसाथ "गाजर का हलवा" असा प्रेक्षकांकडून आवाज आला ...

In reply to by आंद्रे वडापाव

पडद्यावरची आई म्हणजे खोटी आई... पडद्यावरची मानलेली आई म्हणजे डबल खोटी आई... अशी ही डबल खोटी आई, आपल्या सिंगल खऱ्या आईच्या, डबल प्रेमळ असते.. मुलगा गाव उंडारून, उकिरडे फुंकून, घरी परत आला... की साहेबाला पाहून चप्राश्याने जसं उठावे न तसं चपापून उठते आणि म्हणते, बेटा जलदी से हाथ मुह धो लो... मैने तुम्हारे लिये.. गाजर का हलवा बनाया है...

In reply to by आंद्रे वडापाव

चलत मुसाफिर 13/08/2023 - 10:06
तेव्हा हे प्रचंड विनोदी वाटायचे. साधारण 1990-95च्या सुमारास हे सगळे संदर्भ हिंदी सिनेमातूनच काय, एकूण मनोविश्वातून हद्दपार झाले. आताच्या पिढीला कदाचित यात विनोद काय आहे याचा थांगपत्ताच लागणार नाही. कणेकरांचे अपयश हे म्हणता येईल की संस्कृती, प्रेक्षक व सिनेमात झालेले हे आमूलाग्र बदल अजिबात लक्षात न घेता, काहीही पुनर्लेखन न करता ते तीच ती आपली कणेकरी होती तशीच चालवत राहिले.

In reply to by चलत मुसाफिर

चौथा कोनाडा 15/08/2023 - 17:31
कणेकरांचे अपयश हे म्हणता येईल की संस्कृती, प्रेक्षक व सिनेमात झालेले हे आमूलाग्र बदल अजिबात लक्षात न घेता, काहीही पुनर्लेखन न करता ते तीच ती आपली कणेकरी होती तशीच चालवत राहिले.
सहमत .. तोच तो पणा येत होता, नंतर मी त्यांचे वाचन थांबवले होते. पण त्या आधीच्या काळी जे गारूड केले होते ते खुप उल्लेखनीय होते !

कणेकरांची फिल्लमबाजी कॅसेट इतक्यावेळा ऐकली आहे, की कधी काळी मला फिल्लमबाजी जवळपास तोंडपाठ होती. आज मैने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है/ मै बडी हुई, मै खडी हुई, मै तडी हुई रे पार अशी गाणी/ बहार आनेतक आणि अंदर जानेतक/ रामसे बंधूंचे चित्रपट अशी एकेक भन्नाट निरिक्षणे _/\_

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 04/08/2023 - 01:51
कणेकरांचे माझ्याकडे एकच पुस्तक होते, ते मी बहुधा ओपी नय्यरच्या लेखासाठी घेतले असावे. ते आवडलेच होते. फिल्लमबाजीबद्दल इथे वाचून परवा यूट्यूबवर असलेला एक विडियो बघायला सुरुवात केली. सुरुवातीची ४०- ४५ मिनीटे बघितली त्यात एकदाही हसू आले नाही. मग कंटाळून बंद केला. मला व्यक्तिश: त्यांची बोलायची पद्धत, प्रत्येक वाक्यात एक शब्द ठासून सांगणे वगैरे फारसे भावले नाही.

In reply to by चित्रगुप्त

चलत मुसाफिर 08/08/2023 - 07:58
कणेकरांच्या लेखनातले बहुतेक संदर्भ फार लवकर कालबाह्य झाले कारण चित्रपट फार लवकर कालबाह्य होतात. शिवाय वरवरची, कुजकट मनोरंजक शेरेबाजी आणि एकंदर सखोलतेचा अभाव हेच कणेकरी साहित्याचे स्वरूप होते. त्यामुळे नावीन्य सरल्यावर त्यांच्या लिखाणाचा कंटाळा येणे साहजिक आहे.

In reply to by चलत मुसाफिर

चित्रगुप्त 08/08/2023 - 15:46
लहानपणी आसमंतात गुंजणारी मुकेश, हेमन्तकुमार, रफी, किशोर, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, लता, आशा, सचिनदेव बर्मन, ओपी नय्यर, लक्ष्मीप्यारे, कल्याणजी आनंदजी, खैय्याम, शंकर जयकिशन वगैरेंची गाणी आजही कर्णमधुर वाटतात. त्याकाळी सिनेमे मात्र फारसे बघितले नव्हते. मात्र ती गाणी आता यूट्यूबवर चाळीस-पन्नास वर्षांनंतर बघता येत आहेत. मधुबाला, देवानंद, शम्मी कपूर वगैरे काही अपवाद वगळता खूप आवडणारी गाणी देखील पडद्यावर सामान्य किंवा काही तर बघू नये अशी वाटतात. (वैयक्तिक मत) कणेकरांचा 'फिल्लमबाजी' कार्यक्रम संगीत-गाणी याऐपेक्षाही मुख्यतः नटनट्या आणि सिनेमातील दृष्ये यावर आधारित असल्याने नीरस वाटला असावा. -- अलिकडे ती जुनी गाणी 'हेमन्तकुमार म्युझिक ग्रूप' आणि अन्य ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात संपदा गोस्वामी, अनिल वाजपेयी (रफी), मुख्तार शाह (मुकेश) आणि अन्य कलावंत फार सुंदर गातात. वाद्यवृंतील निष्णात वादकांचे कौशल्य बघण्यात सिनेमातले मूळ गाणे बघण्यापेक्षाही जास्त मजा येते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 04/08/2023 - 02:03
कणेकरांचे माझ्याकडे एकच पुस्तक होते, ते मी बहुधा ओपी नय्यरच्या लेखासाठी घेतले असावे. ते आवडलेच होते. फिल्लमबाजीबद्दल इथे वाचून परवा यूट्यूबवर असलेला एक विडियो बघायला सुरुवात केली. सुरुवातीची ४०- ४५ मिनीटे बघितली त्यात एकदाही हसू आले नाही. मग कंटाळून बंद केला. मला व्यक्तिश: त्यांची बोलायची पद्धत, प्रत्येक वाक्यात एक शब्द ठासून सांगणे वगैरे फारसे भावले नाही.

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 08/08/2023 - 13:04
सहमत आहे. माझी फिल्लमबाजी आणि कणेकरी हे कार्यक्रम एकेकाळी तिकीट काढून पाहिले होते. तेंव्हा हसू आले होते. पण काल फिल्लमबाजी यू ट्यूबवर पहाताना त्याम्च्या इनोदांना हसणे येत नव्हते. ते अगदीच केवीलवाणे वाटत होते.

In reply to by विजुभाऊ

गवि 08/08/2023 - 14:20
कालबाह्य तर झालेच आहे. प्रत्येकाचे होते. आणखी एक. आताच्या स्टँड अप कॉमेडीच्या जगात जेव्हा प्रत्येक गल्लीतून एक कॉमेडियन उभा रहात आहे तेव्हा व्हरायटी देखील खूप झाली आहे. हे सर्व मुख्यत: तरुण कॉमेडियन ताजे आणि नव्या काळाशी सुसंगत असे विनोद घेऊन येताहेत. त्यात पाच टक्के तरी कोणालाही हसू आणण्याचे कौशल्य असलेले आहेत. पण बहुतांश लोक विनोद निर्मितीत प फ ब भें मा इत्यादि व्यंजने भरपूर वापरत असल्याने त्या मानाने कणेकरांचा कौटुंबिक प्रोग्राम अगदीच गुळमट वाटू शकतो. त्यांचा जास्तीत जास्त बोल्ड जोक म्हणजे "इंग्रजी चित्रपटात आपण जे काही पाहायला जातो.. तुम्ही पण??!.. ती गोष्ट देखील अशी चटावरले श्राद्ध उरकल्यासारखी उरकून टाकतात ". किंवा "लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत असते. माझा कार्यक्रम त्यातलाच एक आहे. दोन तास लोकांना गुंतवून ठेवायचं आणि कार्यरत होण्यापासून रोखायचं. म्हणून माझ्या कार्यक्रमातून कोणी जोडपं उठून गेलं ना की मी नर्व्हस होतो." आताचे खत्री , बनात्वाला, वरुण ग्रोवर यांच्या मानाने हे म्हणजे अगदीच सौम्य म्हणावे लागेल. तो अमित टंडन हा एकमेव क्लीन कॉमेडी (म्हणजे एफ वर्ड विरहीत.. फॅमिलीसकट बिनधास्त बघावी अशी) देतोय. दुर्मिळ ..

भावपूर्ण श्रद्धांजली 'माझी फिल्लमबाजी' प्रेक्षकाना खळखळून हसवणारा प्रयोग होता. जगभर त्याचे १००० च्यावर प्रयोग झाले असावेत. क्रिकेट आणि हिंदी सिनेमांवरील त्यांचे कार्यक्रम म्हणजे निखळ मनोरंजन. लोकप्रिय कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल लोकांना सुप्त आकर्षण असायचे/असते. आपल्या खास कणेकरी शैलीतून लोकाण्ची ती इच्छा कणेकर पूर्ण करायचे. ह्या कणेकरी शैलीत कधी भक्तीभाव तर कधी चिमटे/ओरखडे दिसायचे. पण त्याकडे लोक केवळ करमणूक/कणेकरी किस्से म्हणून पहायचे. राजेश खन्ना/लीना चंदावरकर्/शत्रुघ्न..ह्यांच्याबद्दलचे मजेशीर किस्से वाचल्याचे आठवतात. खुद्द देवानंदला " मान कापलेल्या कोंबड्यासारखा तिरकी मान करत चालतो" हे देवानंदच्या समोरच म्हणण्याचे धैर्य कणेकरच दाखवायचे आणि देवानंदही त्यांना हसून दाद द्यायचा.

सिरुसेरि 01/08/2023 - 21:17
शिरीष कणेकर यांची स्वत:ची वाचकांना खिळवुन ठेवणारी एक लेखन शैली होती . त्यामुळे त्यांचे लेख , सदरे , पुस्तके वाचक आवर्जुन वाचत असत . आपली आई लहानपणीच गेल्यामुळे आईचा फारसा सहवास , प्रेम न मिळाल्याचे दु:ख अनेकदा त्यांच्या लेखनात जाणवत असे . तसेच आपली लोकप्रियता , यश बघण्यापुर्वीच वडीलांचे निधन झाल्याचा सलही समजत असे . त्यांचे वडील हे एक प्रख्यात डॉक्टर होते . त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे याचा त्यांना अभिमान होता . भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by चलत मुसाफिर

गवि 02/08/2023 - 08:40
अ. शिरीष कणेकर यांचे वडील डॉक्टर होते ब. शिरीष कणेकर यांचा मुलगाही डॉक्टर आहे. अ आणि ब या मुद्द्यांचा शिरीष कणेकर यांना अभिमान होता. असे असावे (असावे काय? आहेच ते.)

In reply to by चलत मुसाफिर

मिडिया बातम्यांसाठी एखाद्या वक्तव्याचं/घडामोडींचं इंटर्प्रिटेशन करते तसं झालं हे. कित्ती... कित्ती! =)) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चलत मुसाफिर 02/08/2023 - 13:28
पहिल्या वाक्याचा कर्ता 'वडील' हा असल्यामुळे पुढील वाक्यातील सर्वनामरूपी कर्ताही वडीलच असणार असा गैरसमज झाला.

In reply to by सिरुसेरि

चौथा कोनाडा 02/08/2023 - 22:42
शिरीष कणेकर तीन वर्षाचे असतानाच त्यांची आई देवाघरी गेली.आईच्याच संदर्भात ' खुमखुमी ' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्या आई विषयी अनावर हृदय भावना व्यक्त केल्या आहेत. त्या ह्रुदयस्पर्शी प्रस्तावनेचे उस्फुर्त वाचन पुढील लिंक मध्ये : आई, तुझी आठवण येते ! https://www.youtube.com/watch?v=5Vsfp5j0ajs

चौकस२१२ 03/08/2023 - 10:06
एका मर्यादेनंतर त्यांचे लेखन, त्यातील नकारात्मकता, टोमणे, भक्तिभाव हे सर्व कंटाळवाणे होई. अनेकांचा रागही त्यांनी ओढवून घेतला. बघितले आहे त्यांचा सिंगापुर दौरा तेथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केला होता .. दौर्यांनंतर भारतात परत आल्यावर त्यांनी त्यांचे सिंगापोरे मधील यजमान आणि त्यांचं घरचं चौकोनी पोळया आणि मंडळाचे अजून एक अधिकारी यांचाच स्थूलपणावर लिहिले होते ... शोभले नवहते

In reply to by चौकस२१२

चलत मुसाफिर 03/08/2023 - 13:33
कणेकर यांचे चाहते व वैयक्तिक स्नेही असलेले पत्रकार मुकेश माचकर यांनी कणेकरांच्या अतिरेकी शैलीतील लेखनाबद्दल एक मोठा टीकालेख लिहून चांगली तासली होती. तो लेख इथे वाचू शकता. "नॉस्टॅल्जिया को मारो गोली" http://maayaabaazaar.blogspot.com/2011/12/blog-post_1682.html?m=1 **** तरुण वयात दिवंगत झालेले पत्रकार अभिजीत देसाई हे कणेकरांचे पट्टशिष्य. त्यांची लेखनशैली अतिरेकीपणात कणेकरांच्याही दोन पावले पुढे होती. असो

In reply to by चलत मुसाफिर

रामचंद्र 03/08/2023 - 20:37
या दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! लेख झकासच आहे, खुसखुशीत, खमंग शेव, चकली, कडबोळीसारखा. यानिमित्ताने माचकरांच्या दोन्ही ब्लॉगचा परिचय झाला त्याबद्दल पुनश्च धन्यवाद! अर्थात काही झालं तरी कणेकरांच्या मस्त जमलेल्या लेखनाची मजा काही कमी होत नाही हेही खरंच. उदा. दिलू राजे इ. व्यक्तिचित्रं, ज्या सुनील दत्तचा एकेकाळी मेषपात्र म्हणूनच उल्लेख केला त्याचीच नंतर कठीण जबाबदाऱ्या धीराने पार पाडणारा म्हणून केलेलं सुधारित मूल्यमापन, पत्रकारितेत असताना तोंड द्यावे लागलेले प्रदीर्घ न्यायालयीन प्रकरण, आई, सावत्र आई, वडील आणि मनःस्थिती - नातेसंबंध, वडलांशी अडनिड्या वयात कसे वर्तन होते, अविनाश खर्शीकरसारख्या मित्रांच्या आपल्या लेखनात घेतलेल्या मस्त बारक्या, आणि अर्थातच चित्रपट क्षेत्रात पूर्वीची शान गेल्यानंतरही आपला आब कायम ठेवण्याचा प्रयत्न करणारे कलावंत यांबद्दलचे त्यांचे लेखन. अभिजित देसाई आणि काही प्रमाणात द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनावर कणेकरांचा प्रभाव नक्कीच जाणवतो.

अमर विश्वास 03/08/2023 - 10:49
यादोंकी बारात हे पुस्तक माझ्यामते शिरीष काणेकरांचा मास्टरपीस आहे ... त्यांच्या खास काणेकरी शैली नसलेले लिखाण .. खरे हृदयातून आलेले ... बाकी त्यांची पुस्तके आनंद देणारीच आहेत .. वाढत्या वयाबरोबर (काणेकरांच्या) नकारात्मकता आणि टोमणे वाढत गेले असले तरीही आवडत्या लेखकांपैकी रक श्रद्धांजली

गवि 03/08/2023 - 10:53
सर्वाधिक प्रचंड एकरकमी हसू आणणारे एक पुस्तक अशी निवड करायची तर वैयक्तिक मत "एकला बोलो रे" या पुस्तकाला. त्यात एकपात्री प्रयोग करायला गावोगावी जातानाचे अनुभव, तेथील निवास भोजन व्यवस्था, मानधन, विविध प्रकारचे आयोजक, अत्यंत विचित्र परिस्थितीत करायला लागलेले प्रयोग असे सर्व अतिशय धमाल पद्धतीने उतरवले आहे लेखांमध्ये. __/\__

In reply to by गवि

सर्वाधिक प्रचंड एकरकमी हसू आणणारे एक पुस्तक अशी निवड करायची तर वैयक्तिक मत "एकला बोलो रे" या पुस्तकाला.
आपला प्रतिसाद वाचून .. लगेच ऑनलाईन ऑर्डर केलं पुस्तक ...