Skip to main content

राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा, सोली सोराबजींचे PIL आणि सुप्रीम कोर्टाचा निर्देश

लेखक बहुगुणी
Published on शुक्रवार, 12/12/2008
आजच्या बातम्यांनुसार वरिष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांनी PIL दाखल करून भविष्यातील अतिरेकी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिस व इतर सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला निर्देश मागितला आहे, आणि त्यावर असा निर्देश सरकारला देऊन न्यायमूर्तींनी एका आठवड्यात सरकार काय उपाययोजना करणार आहे त्याची माहिती देण्यास सांगितले आहे. याचं उत्तर आल्यावर जानेवारीत सर्वोच्च न्यायालय याचा पाठपुरावा करील असं न्यायमूर्तींनी म्हंटलं आहे. (उदाहरणार्थः ही बातमी) हे वाचून मिपा वरील या धाग्यात क्लिंटन यानी म्हंटलेल्या या विधानांची आठवण झाली: 'जर आपण सगळ्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री चिदंबरम, नवे मुख्यमंत्री चव्हाण आणि नवे उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या कार्यालयावर ई-मेल आणि पत्रांचा मारा केला आणि त्यांना आपल्या मागण्या कळवल्या तर? त्यांना दुर्लक्ष करता येणार नाहीत इतक्या प्रमाणावर पत्रे आणि ई-मेल गेले तर वेंकटरामन परदेश दौरा प्रकरणात झाले त्याप्रमाणे काही चांगला बदल होऊ शकेल का?'. मला वाटतं केंद्र सरकारकडून उत्तर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येईल तेंव्हा येईल, पण एक चांगली सुरुवात सोराबजींनी केली आहे, तिचा आपण महाराष्ट्रात तरी सक्रिय पाठपुरावा करायला हवा, नव्याने आलेले मंत्रिमंडळ त्यांच्या खुर्च्यांमध्ये विसावून नेहेमीच्याच साठमारीत गुंतायच्या आत! या तिघांच्या कडून विवक्षित वेळात (३ महिने?) महाराष्ट्रातल्या पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्रे, firing practice ranges आणि स्वसंरक्षणाची bullet-proof jackets सारखी साधने, या ३ नेमक्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. त्याकरता काय काय पावले उचलली जातात ते दर महिन्याला जाहीरपणे सांगण्याची मागणी केली पाहिजे, यासाठी विरोधी पक्षातल्या नेत्यांचही सक्रिय सहकार्य आहे हे (यासाठी आवश्यक असणारा निधी वेळेवर उपलब्ध करण्यासाठी केलेल्या राजकीय मदतीवरून) स्पष्ट व्हायला हवं, आणि मुख्य म्हणजे वरिष्ठ पोलिस आधिकार्‍यांकडून जाहीर पणे या सुधारणा खरोखरच होत आहेत हे कळलं पाहिजे. आता नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री हे गृहमंत्री नाहीत, तेंव्हा नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या तिघांवरही अशा पत्रांचा भडिमार करावा (इ-मेल ही हरकत नाही, पण त्या delete/block करता येतील, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं तितकं सोपं होईल, पोस्ट कार्डांचा वर्षाव दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. शिवाय सरकारचे servers multiple hits नी बंद करण्यात नागरिकांचंच नुकसान आधिक.) पुढच्या काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका आहेत, तेंव्हा या नेमक्या मुद्द्यांवर या पुढार्‍यांनी प्रगती न करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं हे त्यांना महागात पडेल हेही या पत्रांमधून त्यांना स्पष्टपणे कळवलं पाहिजे, तेंव्हा हीच वेळ आहे सुजाण नागरिकांनी आपल्या संरक्षणासाठी अशी मोहीम हातात घेण्याची. या पत्राचा मसुदा एकसारखा असल्यास उत्तम, त्यासाठी लेखण्या सरसावायला मिपा वरची आणि इतरत्र असलेली मराठी मंडळी नक्कीच तयार होतील असा विश्वास आहे. हजारोंनी अशी छापील पोस्टकार्डे गर्दीच्या ठिकाणी (छ. शि. टर्मिनस, पुणे व इतर शहरांतील स्थानके, वगैरे) सह्या करून पोस्टाच्या पेटीत टकली जावीत. एकाच मजकुराची अशी पोस्टकार्डे छापण्यासाठी जो खर्च येईल तो वर्गणीस्वरूपातून सहज गोळा करता येईल. आपण आपल्या, आणि आपल्या प्रियजनांच्या संरक्षणासाठी इतकं नक्कीच करू शकतो.

वाचन संख्या 3348
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आपण म्हणता ते खरं आहे. जर विधायक कामांसाठी आपण असा दबावगट निर्माण करू शकलो, तर भारताचं आणि पर्यायाने आपलंही भलचं होईल! नाहीतर कोणत्याही घटनेनंतर नुसत्या पोकळ चर्चा करण्यात काय अर्थ आहे? निदान, यानिमित्ताने ही एक चांगली सुरवात म्हणजे दहशतवादाविरुद्ध लढताना हुतात्मा झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. इतर मिपाकरही योग्य प्रतिसाद देतील अशी आशा आहे. मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

...आतापर्यंत १३५ वाचने आणि केवळ एक उघड आणि एक खरडवहीतील असे दोनच प्रतिसाद यावरून इथल्या बहुतांश मिपाकरांना एकतर वेळ नसावा, किंवा मी सुचविल्याप्रमाणे पत्रांद्वारे क्रियाशील प्रतिसादाची गरज भासत नसावी (चर्चाच पुरेशा आहेत असं वाटतं) असं समजावं काय? I hope not. मला वाटतं की असा पत्र-रुपाने मंत्र्यांवर दबाव टाकण्यासाठी फार उशीर करून चालणार नाही, राजकारणी मंडळींची (आणि दुर्दैवाने सामान्य जनतेचीही) स्मरणशक्ती फार कमी असते, त्यामुळे फारतर आणखी आठवड्यात जितक्या समविचारी मंडळींची सहमती मिळेल, त्यांना मदत मागून मी हे काम हाती घेईन. आपल्या सहकार्याच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

बहुगुणीजी, प्रथम क्षमस्व. आधीच धागा वाचला होता, पण कामाच्या रगाड्यात विचार करायला वेळ मिळाला नाही. यु कॅन काऊंट मी इन! आणि आता विषय निघाला आहेच तर, क्लिंटन यांच्या धाग्यावरही प्रतिसाद द्यायला जमलं नाही, पण तिथेही हाच प्रतिसाद, यु कॅन काऊंट मी इन!

In reply to by स्वप्निल..

...माझ्या लिखाणाची स्फुर्ती होती, आणि मी माझ्या दुसर्‍याच परिच्छेदात तसं म्हंटलं आहे. माझा त्यांच्याशी असं महाराष्ट्राच्या मंत्र्यांना पत्र लिहिण्याविषयी संपर्क चालू आहेच. आपणही मदत कराल का?

In reply to by बहुगुणी

नमस्कार बहुगुणी, 'क्लिंटन यांचा विचार' हा शब्दप्रयोग वाचून अंगावर मूठभर मास चढलं. अर्थात पंतप्रधान आणि इतरांच्या कार्यालयावर पत्रांचा पाऊस पाडून लोकशाहीतील आपले म्हणणे मांडायचा तो एक मार्ग आहे. आणि ती कल्पना माझी स्वतःची नाही.तर ती माधव गडकरींनी पूर्वी वापरली आहे. तर मा. अविनाश धर्माधिकारी हे सह्यांच्या मोहिमेतून थोड्याबहुत प्रमाणावर तोच मार्ग वापरणार आहेत. पण धर्माधिकारी हे स्वतः भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होते.तेव्हा त्यांच्या शब्दाला नाही म्हटले तरी सरकारदरबारी वजन आहे. पण असे वजन नसलेल्या सामान्यांनी काय करावे यावर विचार केला असता गडकरी आणि धर्माधिकारी यांची कल्पना आपण वापरून काही चांगला बदल झाला तर जरूर व्हावा म्हणून तो माझा एक प्रतिसाद होता. तरीही त्याला माझा 'विचार' म्हटल्यामुळे पु.लं च्या शब्दात सांगायचे तर मला माझ्या दिड रुपयेवाल्या टोपीला 'मुकुट' म्हटल्याप्रमाणे वाटले. असो. आपल्या compliment बद्द्ल धन्यवाद. आता वळू या मूळ विषयाकडे. सर्वांनी एकच मुद्द्याचे पत्र पाठवले तर त्याचा नक्कीच जास्त उपयोग होईल. पण 'किमान समान कार्यक्रम' ठरवणे थोडे जड जाऊ शकेल. उदाहरणार्थ फाशीच्या शिक्षेला विरोध म्हणून अफजलला फाशी देऊ नये असे म्हणणारे कोणी असेल तर ते त्या मुद्द्याचा समावेश पत्रात करू द्यायला राजी असतीलच असे नाही.हे एक उदाहरण झाले. तरीही त्यातून सर्वांना संमत असा मसुदा तयार झाला तर उत्तमच्.मी इंग्रजीतून मसुदा मिसळपाव वरील काही गावकर्‍यांच्या सहकार्याने तयार केला आहे.त्यात केंद सरकारच्या अखत्यारीतील मुद्दे काढून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना पाठवायचा मराठी मसुदा आपण तयार करू शकू. त्यात माझे सहकार्य असेल याची खात्री बाळगा. चिंता एकच गोष्टीची वाटते की या गोष्टीला आणि पत्रे पाठवायला उशीर नको नाहीतर त्याचा पाहिजे तितका उपयोग होणार नाही. आणि ही पत्रे हजारोंच्या संख्येने गेली तरच त्याचा उपयोग होईल.उगीच ५०-१०० पत्रे गेली तर काहीच फायदा होणार नाही. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनता जागृत आहे आणि आपण वाटेल तसे वागलो तर ते आता यापुढे खपणार नाही असा धडा राजकारण्यांना मिळायला हवा.अज अमेरिकेत कोणी राजकारण्याने ओसामाचे जाहिर समर्थन केले किंवा इस्त्राएलमध्ये हमासचे कोणा राजकारण्याने जाहिर समर्थन केले तर त्या राजकारण्याला स्वतःचे सोडून बहुदा एकही मत मिळणार नाही.पण भारतात मात्र राजकारण्यांवर तसा दबाव का नाही?याचे कारण आपली जनता जागृत नाही.तेव्हा या पत्र प्रकरणातून पुढे जाऊन जनतेत जागृती करण्यासाठी माझ्यासकट सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मिसळपाव सारख्या संकेतस्थळांवर लिहिण्यापेक्षा बरेच काही करण्याची गरज आहे.आणि खरे सांगायचे तर नक्की काय करावे याचा मार्ग कोणालाच सापडत नाही.तेव्हा आपण प्रयत्न करत राहू. तेच आपल्या हातात आहे. शक्य झाल्यास माहितीचा अधिकार वापरून आपण बर्‍याच गोष्टी साध्य करू शकतो. पण देशाची अंतर्गत आणि बाह्य संरक्षणाबद्दलच्या गोष्टींविषयीची माहिती त्या कायद्यानुसार मागता येत नाही तेव्हा त्याचा कितपत फायदा होईल हा पण एक प्रश्नच आहे. असो.आपली इच्छा प्रबळ असेल तर नक्कीच मार्ग सापडेल अशी आशा करू या. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

मी चर्चा वाचली . या नेक कामाकरता मी माझी वर्गणी देईन. बहुगुणी यांनी पुढील योजनेबद्दल कळवावे ही विनंती.

... पत्राचा मसूदा आणि योजना काय आहे ते व्य. नि. ने कळवेन. इतरही ज्यांना ज्यांना सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांनी कृपया या धाग्यात, माझ्या खरडवहीत किंवा व्य. नि. ने मला कळवावे हि विनंती, त्या सर्वांना मी पुढील माहिती कळवेन.

२/३ दिवसापूर्वी आनंद महिंद्रा यांचे टाईम्स मधे एक लेख आला होता. त्याचा सारांश असा होता की भारतीय राजकारण्यामध्ये काही उणीवा असतीलही. तरीपण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा दबाब त्यांच्या कामगीरीवर प्रभाव पाडु शकतो. भारतातील मुत्सद्दी जगात मानले जातात आणि ते योग्य त्या डावपेचाने पाकिस्तानावर दबाब आणतीलच. भारताकडे सध्या जनतेच्या मागणीप्रमाणे युद्ध करणे अथवा भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून सर्व राजनैतिक उपाय वापरणे असा पर्याय आहे. ( विकसनशील देशाचे कंबरडे युद्धाने मोडु शकते.) त्यामुळे प्रतिनिधीक पत्रे पाठवा आणि आपल्या राजकारणी लोकांवर विश्वास ठेवा असा मतितार्थ होता.

माझे सहकार्य असेल. कृपया लिहीण्यात/संपादनात मदत हवी असल्यास व्य.नि. अथवा खरडीत कळवा.