मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचने 80494 वाचनखूण प्रतिक्रिया 272

स्पार्टाकस 25/11/2020 - 23:07
भारताने पहिली डे-नाईट टेस्ट ऑलरेडी ईडन गार्डन्सला बांग्लादेशविरुद्ध खेळलेली आहे.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 25/11/2020 - 23:35
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण नसता तर आपण ती सिरीज नक्की जिंकलो असतो. या बकनर च्या लीलांवर एक वेगळाच लेख होईल आणि या सिरीजवर पण. असो विराट बाबा होणार म्हणून कदाचित काही कसोटीसाठी उपलब्ध नाही. रहाणेकडून खूप अपेक्षा आहेत पण IPL मधला त्याचा फॉर्म एकदमच बकवास होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला लवकर लय सापडणे महत्वाचे आहे. फलंदाजी खूपच कमकुवत वाटत आहे. बघू पुढच्या आठवड्यात. गुरुजी हाच धागा अपडेट करावा ही विनंती, जमेल तशी हजेरी लावेन.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्टीव्ह बकनरच्या लीलांवर मी लेख लिहीलेला आहे ऑलरेडी. http://www.misalpav.com/node/38364

In reply to by स्पार्टाकस

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 25/11/2020 - 23:56
येस्स, पूर्वी वाचला होता आणि आता विसम्रारणात गेला होता. तुमचे मिपावरील सर्व लेख वाचले आहेत आणि नवीन लेखांची बरेच दिवसांपासून वाट बघतोय.

स्पार्टाकस 25/11/2020 - 23:43
मॅरेनस लबुशेन - मूळ दक्षिण आफ्रीकन उच्चार लबुस्काग्ने - गेल्या सिरीजला सिडनीच्या टेस्टमध्ये खेळला आहे भारताविरुद्ध. २०१८ ऑक्टोबरपासूनच टेस्टमध्ये खेळतोय, गेल्या वर्षी नाही. कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून खेळलेला पहिला बॅट्समन लबुशेनच आहे गेल्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये.

श्रीगुरुजी 25/11/2020 - 23:56
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण नसता तर आपण ती सिरीज नक्की जिंकलो असतो. ते २००७-०८ मध्ये. तेव्हा मालिका हरण्याऐवजी बरोबरीत सुटली असती. मालिका जिंकण्याची सर्वोत्कृष्ट संधी १९८६ मध्येय होती. एका कसोटीत भारताला विजयासाठी ५ व्या दिवशी भोजनानंतरच्या खेळात १२६ धावा करायच्या होत्या व गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर, अझरूद्दीन, वेंगसरकर असे तगडे फलंदाज संघात होते. चहापानानंतर तासाभरात पाऊस येईल असा अंदाज होता. त्यामुळे भारताने दुसऱ्या सत्रातच १२६ धावा करून सामना व मालिका जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु दुसऱ्या सत्रात गावसकर (५४ चेंडूत ८), मोहिंदर (२७ चेंडूत ३) व वेंगसरकर (१२ चेंडूत १) यांनी अत्यंत संथ फलंदाजी केल्याने २५ षटकात फक्त २ बाद ५९ धावा झाल्या. चहापानानंतर लगेच पाऊस आल्याने पुढे खेळ न होता सामना अनिर्णित राहिला. श्रीकांतने ६१ चेंंडूत ३८ धावा केल्या होत्या. कपिल आधी आला असता तर १२६ धावांसाठी २५ षटके पुरेशी होती.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 26/11/2020 - 00:01
पृथ्वी शॉ ला कसोटीत संधी मिळायला पाहिजे, मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यात त्याचा पाय मुरगळला आणि तो बाहेर पडला. पण त्याआधी त्याने चमकदार कामगिरी केली होती.

स्पार्टाकस 26/11/2020 - 00:19
बकनर २००४ मध्येही भारताला नडला होता. ब्रिस्बेनच्या टेस्टमध्ये बॉल स्टंपच्या किमान फूटभर वरुन जात असताना त्याने सचिनला ढापला होता. त्यापेक्षाही सिडनी टेस्टच्या चौथ्या इनिंग्जमध्ये आगरकर आणि कुंबळेच्या बॉलिंगवर जस्टीन लँगरला आणि इरफान पठाणच्या बॉलिंगवर डॅमियन मार्टीनला प्लम्ब एलबीडब्ल्यू असताना बकनरने नॉटआऊट दिलं होतं. कुंबळेच्याच बॉलिंगवर सायमन कॅटीचलाही बकनरने एलबीडब्ल्यू दिलेलं नव्हतं आणि टेस्ट ड्रॉ झाली होती नाहीतर स्टीव्ह वॉची शेवटची तीच सिरीज भारताने २-१ जिंकली असती.

श्रीगुरुजी 26/11/2020 - 10:13
बकनर पक्षपाती होतेच. पूर्वी श्रीलंका व न्यूझीलंडचे पंच सुद्धा पक्षपाती निर्णय द्यायचे. शकूर राणा व खिजर हयात ही पक्षपाती पाकड्या पंचांची जोडी तर क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक कुप्रसिद्ध पंच असावे.

तुषार काळभोर 26/11/2020 - 17:57
केवळ भारतातील प्रेक्षकवर्ग प्रक्षेपण करणार्‍या वाहिनीला मिळावा म्हणून सामने दीड दोन तास उशीरा सुरू होणारेत! म्हणजे कसोटी स्थानिक वेळ ११.३० आणि दिवस रात्र सामने पावणे चारला! आणि यंदा पर्थ - वाका मध्ये एकही सामना नाही! ताजा कलमः इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सामने कधी सुरू होतात?

श्रीगुरुजी 26/11/2020 - 18:49
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असल्याने स्थानिक वेळेनुसार दुपारी १:४० वाजता सुरू होतील. ट-२० सामने कमी वेळ चालत असल्याने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:१० वाजता सुरू होतील. एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. उर्वरीत ३ कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होतील.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर 26/11/2020 - 19:54
आता इथे 7.55 pm झालेत. सिडनी मध्ये 1.25 am झालेत. सिडनी मध्ये सकाळी 9.30 म्हणजे आपल्याकडे पहाटे 4.00 ना? अन् दुपारी 1.40 म्हणजे आपल्याकडे सकाळी 8.10 ना?

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी 26/11/2020 - 20:14
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असल्याने स्थानिक वेळेनुसार दुपारी २:४० वाजता सुरू होतील. ट-२० सामने कमी वेळ चालत असल्याने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७:१० वाजता सुरू होतील. एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. उर्वरीत ३ कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होतील.

श्रीगुरुजी 26/11/2020 - 18:51
ताजा कलमः इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सामने कधी सुरू होतात? याच वेळी सामने सुरू होतात.

सुबोध खरे 26/11/2020 - 20:28
काही तरी गल्लत होते आहे का? उद्याचा एक दिवसीय सामना GMT ३. ४० AM ला सुरु होत आहे म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ ०९. ४० ला

सुबोध खरे 26/11/2020 - 20:29
क्षमा करा सकाळी ०९. १० वाजता ०९.४० ला नव्हे

प्रसाद_१९८२ 27/11/2020 - 13:53
आज ऑस्ट्रेलियन फलंदाजानी, भारतीय बोलर्सची येथेच्छ धुलाई करत, भारताला जिंकण्यासाठी ३७५ धावांचे आव्हान दिले आहे.

श्रीगुरुजी 27/11/2020 - 14:07
भारतीय गोलंदाजाची प्रचंड धुलाई झाली. स्मिथचे भारताविरुद्ध अजून एक शतक. ऑस्ट्रेलिया ३७४/६ (५०), भारत ३९/० (३)

प्रसाद_१९८२ 27/11/2020 - 17:10
हातातून गेल्यात जमा आहे. संघर्ष करणारा हार्दीक पंड्या ९० वर आऊट झाला.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 28/11/2020 - 00:29
भारताच्या गोलंदाजांची पिसे काढली. नवदीप सैनी आणि चहलला खूपच फोडून काढलं. पंड्या हल्ली दुखपतीनंतर गोलंदाजी का करत नाही? ऑस्ट्रेलियामध्ये तो चांगला विकल्प होऊ शकतो.

श्रीगुरुजी 29/11/2020 - 12:17
२९२/२ (४१.१) या सामन्यात सुद्धा स्मिथचे बरोबर ६२ चेंडूत शतक.

श्रीगुरुजी 29/11/2020 - 19:52
दुसऱ्या सामन्यातही पराभव. गोलंदाजी अत्यंत प्रभावहीन आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराह आणि ऑस्ट्रेलियचा प्रमुख गोलंदाज स्टार्क अत्यंत वाईट गोलंदाजी करताहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज चंगळ करताहेत तर भारतीय फलंदाज चांगली सुरूवात करून बाद होताहेत. आज जडेजाने सुद्धा अतिशय सोपा झेल सोडला. एकदिवसीय सामन्यांची मालिका गेली. कसोटी मालिका जिंकणे जवळपास अशक्य आहे. ट-२० मालिका जिंकण्याची बरीच शक्यता आहे.

गामा पैलवान 01/12/2020 - 20:34
श्रीगुरुजी, हे दोन एकदिवसीय सामने खेळण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळला का? आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी 02/12/2020 - 13:52
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ५९ षटकांंत ३०२/५ धावा केल्या. भारताने सलग ३ सामन्यात ३००+ धावा केल्या. म्हणजे मालिकेत फलंदाजी चांगली झाली. बरेच फलंदाज जम बसल्यानंतर बाद झाले. ऑस्ट्रेलियाने सलग २ सामन्यात ३७४+ धावा केल्या. म्हणजे भारताची गोलंदाजी अत्यंत वाईट झाली. परदेशी भूमीवर ३७४+ धावांचा यशस्वी पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी जवळपास अशक्य असते. त्यामुळे भारत सामने हरला यात आश्चर्य नाही.

श्रीगुरुजी 02/12/2020 - 13:53
धवनने स्लिपमध्ये फिंचचा सोपा झेल सोडला. पंड्याने स्मिथला धावबाद करण्याची सोपी संधी सोडली. स्मिथ खेळपट्टीच्या मध्यात असताना शॉर्ट मिडविकेटवरून यष्टीवर चेंडू मारता आला नाही (लहानपणी बैदूल खेळला नसावा). आता बुमराहने स्वतःच्या गोलंदाजीवर फिंचचा सोपा झेल सोडला.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 02/12/2020 - 15:54
सामना रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाला ८४ चेंडूत १०६ धावा करायच्या आहेत, अजून ५ विकेट बाकी आहेत, मॅक्सवेल अजून बाकी आहे. पंड्या आणि जडेजाच्या फटकेबाजी मुळे ३०० चा आकडा कसाबसा पार झाला. रोहीतची उणीव खूपच जाणवत आहे.
श्रीगुश्री,
नाही
हा बक्कीचा हावरटपणा आहे. सराव सामने खेळवले नाहीत तर खेळाडू तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणार कधी? पहिल्या दोन सामन्यांत? ही साधी गोष्ट बक्कीला निश्चितच कळते. पण पैशांवर पाणी सोडणार कोण! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 02/12/2020 - 21:37
श्रीगुरुजी म्हणायचं होतं. चुकून श्रीगुश्री टंकलं. क्षमा असावी. -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 09/12/2020 - 09:44
तुमचा अंदाज बरोब्बर आला. सराव कसोटी सामन्यात रहाणे, पुजारा सोडून सर्व ढेपाळले.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 04/12/2020 - 21:15
रविंद्र जडेजाला फलंदाजीत चांगला सूर मिळालाय. कसोटी खेळला तर भारताला चांगला फायदा होईल

गोंधळी 09/12/2020 - 10:29
ऑस्ट्रेलिया ही नेहमीच माझी फेवरेट टिम राहीली आहे. १९९९ ते २०१८/१९(ऑस्ट्रेलियात) पर्यंत ६ टेस्ट सिरीज मध्ये आपण फक्त १ जिंकलो आहोत तर ते ४ वेळा. त्यात दोन सिरीज मध्ये आपल्याला व्हाईटवॉश दिला आहे. स्टार्क,कमिंस,हेजल्वुड हे त्रिकूट व आता वॉरनर , स्मिथ हि आहेत. स्मिथच्या वेगळ्या शैलीमुळे त्याला आउट करण आपल्या गोलंदाजाना नेहमी कठीण जात. मला तरी ही टेस्ट सिरीज ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वाट्ते.

श्रीगुरुजी 09/12/2020 - 12:36
मला तरी ही टेस्ट सिरीज ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वाट्ते. ऑस्ट्रेलिया ही कसोटी मालिका किमान २-० या फरकाने जिंकेल. ४-० या फरकाने सुद्धा जिंकण्याची बरीच शक्यता आहे.

श्रीगुरुजी 16/12/2020 - 20:42
उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता ऍडलेड येथे भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र असा खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताने खालील ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. १) शॉ २) मयंक आगरवाल ३) पुजारा ४) कोहली ५) रहाणे ६) हनुमा विहारी ७) साहा ८) अश्विन ९) उमेश यादव १०) शमी ११) बुमराह मागील बहुसंख्य सामन्यात पूर्ण अपयशी ठरलेल्या शॉला संघात घेणे धक्कादायक आहे. विशेषतः राहुल व गिल या दोघांना बाहेर बसवून शॉ कसा काय संघात येऊ शकतो? तसेच हनुमा विहारी हा कामचलाऊ गोलंदाज आहे. त्याच्याऐवजी कुलदीप यादव किंवा जडेजा योग्य ठरले असते.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 16/12/2020 - 20:59
शॉ कडून मला अपेक्षा आहेत. मी आधी पण म्हणालो होतो, कसोटीसाठी शॉ पाहिजे. विहारी बाबत सहमत. त्याच्या ऐवजी जडेजा पाहिजे होता असं माझं मत. बघू उद्या काय होतंय.

गोंधळी 17/12/2020 - 09:39
शॉ ला फक्त शॉ गिरीच येते. त्याच्या पेक्षा राहुल ला घेतल पाहीजे होते.

श्रीगुरुजी 17/12/2020 - 13:47
ऑस्ट्रेलियातील मालिकेत १९७७ पासून एक विशिष्ट सातत्य (१९८३ चा अपवाद सोडून) दिसले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल हाच मालिकेचा अंतिम निकाल असतो. १९७७, १९९१, १९९९, २००७, २०११, २०१५ - ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला व मालिकाही जिंकली. २०१८ - भारताने पहिला सामना जिंकला व मालिकाही जिंकली. १९८६, २००३ - पहिला सामना अनिर्णित व मालिकाही अनिर्णित अपवाद १९८३ - पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला पण मालिका अनिर्णित (चूभूदेघे)

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 17/12/2020 - 14:08
पुजारा बाद, रहाणे आलाय, सराव सामन्यातील फॉर्म पुढे चालू राहिला तर बरं. पहिल्या सत्रात ऑसी गोलंदाजांनी खूपच भेदक मारा केला. पुजारा कोहलीची भागीदारी होतेय असे वाटत असतानाच पुजारा बाद झाला. आता चांगल्या फलंदाजांची ही शेवटची जोडी. मोठी भागीदारी व्हायलाच पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 18/12/2020 - 12:43
कसोटीत भारताचे फलंदाजीतले शेपूट नेहमीच ठेचले जाते आणि प्रतिस्पर्ध्याचे (कोणीही असो) नेहमीच वळवळ करते. बुमराहने दोन बळी घेतले आहेत बघू आता काय होतंय. महत्वाचा दिवस आज आणि उद्या.

नीलस्वप्निल 18/12/2020 - 16:11
मस्त चालु आहे सामना

गोंधळी 18/12/2020 - 21:01
जिंकायची संधी आहे. बघुया काय होत ते.

In reply to by गोंधळी

गामा पैलवान 18/12/2020 - 21:06
अगदी खरंय. बक्कीने उद्या दिवसभर खेळून फक्त २०० धावा काढल्या तरी चालेल. २६३ चं आव्हान ऑस्ट्रेलियाला पार करणं अवघड आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 18/12/2020 - 22:26
कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट दिले पाहिजे आणि स्मिथ लवकर बाद झाला पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी 18/12/2020 - 23:13
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी 18/12/2020 - 23:39
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 19/12/2020 - 10:03
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची नांगी. १५/४ आता कोहली रहाणे शेवटची जोडी

श्रीगुरुजी 19/12/2020 - 10:07
१५/५ रहाणे व पुजारा शून्यावर बाद.

गोंधळी 19/12/2020 - 10:21
कठीण आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना __/\__

नीलस्वप्निल 19/12/2020 - 10:44
खुपच वाईट हारणार :(

प्रसाद_१९८२ 19/12/2020 - 12:51
अवघ्या ३६ धावात संपूर्ण भारतीय संघ गारद. निचांकी धावांचा विक्रम असावा बहुतेक हा. सामन्याचा निकाल आजच लागणार बहुतेक. फक्त ९० धावा हव्यात ऑस्ट्रेलियाला जिंकायला.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 19/12/2020 - 22:59
श्रीगुरुजी, कोण म्हणतो आयपीएल प्रभावशाली नाही? आयपीएल नामे चेंडूफळी खेळाने क्रिकेटची वाट लावलीये. गोलंदाजीवर असलेले अतिरिक्त निर्बंध हटवले की फलंदाजांची भंबेरी उडते. तिचा सामना कसा करायचा ते शिकण्यासाठी परिश्रम व विश्रांती दोन्हींची निकड असते. पण पैसे हापसायच्या नादात तिथं लक्ष देणार कोण. आ.न., -गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/12/2020 - 15:17
आज ३६ धावांवर उजेड पडला तेव्हाच आपलं सर्व संपलं. दुस-या इनिंगला एकेक महारथी धारातीर्थ पडले तेव्हा सामना बघावा सुद्धा वाटत नव्हते. लैच बेक्कार हरले. हारजीत चालायचीच म्हणून तान हलका करुया. -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 19/12/2020 - 22:42
शमीच्या हाताचे हाड मोडल्याने दौऱ्यातून बाहेर. कोहली पुढील सामने खेळणार नाही. ०-४ असा मार खाण्याची बरीच शक्यता आहे.

तुषार काळभोर 20/12/2020 - 09:25
1 0 0 0 0 0 0 3 0 2 0 1 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 4 0 0 2 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 W 0 0 0 W 0 0 0 4 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 1 0 0 2 0 0 2 0 0 0 0 0 0 W W 0 0 4 0 0 1 0 W 0 1 0 4 0 0 0 And That's All Folks!

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी 20/12/2020 - 09:51
चालायचंच. प्रत्येक देशाचा संघ कधीतरी अशा परिस्थितीतून गेला आहे. केपटाऊन येथे २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती दुसऱ्या डावात २१/९ व नंतर सर्वबाद ४७ अशी दारूण होती. पॉंटिंग, मायकेल हसी, मायकेल क्लार्क, शेन वॉटसन, शॉन मार्श असे दिग्गज फलंदाज संघात असूनही वाट लागली होती. https://www.espncricinfo.com/series/australia-tour-of-south-africa-2011-12-514013/south-africa-vs-australia-1st-test-514029/full-scorecard

In reply to by श्रीगुरुजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/12/2020 - 11:53
द्वारकानाथ संझगिरीचा आज लेख आहे दै. सामनात. त्यांनीही अशीच आठवण दिली आहे. १९७४ मधे इग्लंडविरुद्ध लॉर्डसवर खेळतांना तेव्हा भारतीय दुसरा डाव असाच ४२ धावात गुंडाळला गेला होता. लाजीरवाणा पराभव झाला. तेव्हाही अशीच हाराकिरीवर चर्चा झाली. हायकमिशन बी.के.नेहरुंनी त्यांना बोलावलं तेव्हा संघ उशिरा पोहचला तेव्हा ते भडकले आणि कर्णधार वाडेकरला अद्वात्द्वा बोलले ''तुम्हाला बॅटींग करता येत नाहीच, पण तुम्हाला वेळेवर कार्यक्रमालासुद्धा येता येत नाही'' हे शब्द संघाला फार झोंबले वाडेकर आपली टीम घेऊन पुन्हा बसमधे येऊन बसला. भडकलेली माथी थंड झाल्यावर संघाची समजूत घालण्यात आली पुढे अनेक दिवस संघावर टीका होत होती. इग्लंडमधे तेव्हा एक चित्रपट येऊन गेला ''समर ऑफ ४२ टू '' हिंदुस्थानच्या संघाला समर ऑफ ४२ टू म्हटल्या जात होते. ( सामनाच्या लेखातून साभार) -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/12/2020 - 12:03
एक बेशरमाचं ओलं फोक घेऊन भारतीय फलंदाजी ज्या अनुक्रमाने आले त्या अनुक्रमे एकेक फलंदाजाच्या ढुंगावर चार-चार निब्बर फटके द्यावेत असा विचार येत आहे. -दिलीप बिरुटे (भडकलेला भारतीय क्रिकेट फॅन) -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 20/12/2020 - 14:56
शांत व्हा डॉक्टरसाहेब. होतं असं कधीतरी. सर्वच देश या परिस्थितीतून गेलेत. कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या नीचांकी धावा २६ आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नीचांकी धावा ३०, ३०, ३५, ३६, ४३, ४५, ४७ अशा आहेत. ऑस्ट्रेलियाची नीचांकी धावसंख्या ३६ व ४२ आहे. विंडीज व इंग्लंडची ४७ तर पाकड्यांची ४९ आहे. श्रीलंका वगळता सर्व प्रमुख देश कधी ना कधी ५० धावांच्या आत आटोपले आहेत. दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु हा खेळाचाच भाग आहे.

तुषार काळभोर 20/12/2020 - 13:43
जर सहा वर्षांनी त्याच संघासाठी, त्याच संघाविरुद्ध, तोच लेख जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून चालत असेल तर.. ये रे माझ्या मागल्या........ - जे पी मॉर्गन बाबांनो आम्हाला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पण जीव तोडून केलेला प्रयत्न नक्कीच कळतो. तुम्ही वर्षातले तीनशे दिवस क्रिकेटच खेळत असता, प्रेशर असतं सगळं मान्य.... आयपीएल खेळा, जाहिराती करा... आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यासाठी आम्ही क्रिकेट बघतो ती मजा नका हिरावून घेऊ! तुम्ही पण लाइव्ह कार्यक्रमात lip synch करणार्‍या त्या चिर्कुट महागायकांसारखे आयपीएलच्या तमाश्यात नाचण्यात खुश असाल तर लक्षात ठेवा.... अजून ५ - ७ वर्षांत ते खूळ उतरेल आणि दुसर कुठलंतरी वेड लागेल क्रिकेटला. पण अजून दोन पिढ्यांनी तेव्हाचे आजोबा त्यांच्या नातवंडांना क्रिकेटच्या गोष्टी सांगतील तेव्हा तुम्ही त्यात असाल का हा विचार करा. हरायला आमची ना नाही... पण हरलात तरी अभिमानाने दाखवण्यासारखे घाव तरी अंगावर असले पाहिजेत रे! पहिल्या कसोटीत पहिल्या दोन दिवसातच माना नका टाकू! डोळ्यांला डोळे भिडवून लढा रे....दात ओठ खाऊन तुटून पडा....धीरोदात्तपणे त्यांच्या आक्रमणाचा सामना करा.....नवे डावपेच लढवा.... झोकून द्या स्वतःला. बाकी काही नाही... तुम्ही असं केलंत ना तरच मी माझ्या पोराला सांगू शकीन "लेका ठेव ते पुस्तक बाजूला.... आपली लोकं बघ काय लढताहेत! ह्यांच्याकडून जास्त शिकशील!"

In reply to by रंगीला रतन

रात्रीचे चांदणे 20/12/2020 - 15:16
ह्या धाग्यात काही चुकीचे आहे का? सध्या चालू असलेल्या मालिके विषयी चर्चा चालु आहे. ह्या मध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे?

In reply to by रात्रीचे चांदणे

रंगीला रतन 20/12/2020 - 20:29
चुकीचे काहीच नाही. असे धागे मिपावर शोभत नाहीत एवढेच म्हणायचे होते. ज्यांना क्रिकेटची आवड आहे ते सामने बघतात. त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे?

कानडाऊ योगेशु 20/12/2020 - 20:04
बरं झालं क्रिकेटमधला इंटरेस्ट फार आधीच संपला. मोअर प्रिसाइजली सचिन जेव्हा उतरणीला लागला होता व केवळ विक्रमासाठीच पेन्शनरासारखा खेळत होता तेव्हाच इंटरेस्ट संपला होता. त्यामुळे ह्या पराभवामुळे फार काही दु:ख झाले नाही. नाहीतर मनस्थिती फारे बेक्कार झाली असती.

श्रीगुरुजी 25/12/2020 - 18:27
दुसरा कसोटी सामना उद्या शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे सुरू होईल. भारताने संघात ४ बदल केले आहेत. संघ असा आहे. - मयंक आगरवाल, शुभमन गिल, पुजारा, हनुमा विहारी, रहाणे, पंत, जडेजा, अश्विन, यादव, बुमराह, महंमद सिराज राहुलला संघात स्थान न देणे व हनुमा विहारी संघात कायम ठेवणे आश्चर्यकारक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 25/12/2020 - 23:19
एक स्पेशालिस्ट फलंदाज सरळ सरळ कमी आहे. विहारी किंवा जडेजाच्या ऐवजी के एल राहुल पाहिजे होता. ही कसोटी अनिर्णित राहिली तरी भारताच्या दृष्टीने मोठा विजयच म्हणावा लागेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/12/2020 - 23:58
हाल पाहात राहु. माझ्या मनात सर्व वाइटच येत आहे. तरीही उत्तम खेळू असे वाटते. भारतीय संघाला शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ॲबसेंट माइंडेड… 26/12/2020 - 01:08
मनाचे खेळ लैच वाईट असतात बरेका.... चांगला खेळ करणाऱ्या संघाला शुभेच्छा...! --ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

श्रीगुरुजी 26/12/2020 - 08:35
भोजनवेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया ६७/३. स्मिथला अश्विनने शून्यावर बाद केले. आता १०३/३. लाबूशेन व हेड स्थिरावलेत. पंतचे यष्टीरक्षण चिंताजनक आहे. आतापर्यंत १० बाईज गेल्यात. फिरकी गोलंदाजांंनी लेगच्या बाजूला टाकलेले चेंडू पकडण्यात पंतला समस्या येताना दिसताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/12/2020 - 09:49
अस्ट्रोलिया १३६ - ५, गोलंदाज चांगली गोलंदाजी करीत आहेत, दोनशे आत गुंडाळले पाहिजे असे वाटते, सिराजच्या गोलन्दाजीवर शॉर्ट लेगला घेतलेला झेल मस्त होता. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/12/2020 - 11:33
अष्ट्रोलिया सर्वबाद १९५. आता आपल्या परिक्षेची वेळ आहे, कमीत कमी एक मोठी धावसंख्या उभारावी असे वाटते. एकही भरवशाचा फलंदाज माझ्या नजरेसमोर नाही जो खेळ्पट्टीवर उभा राहील. खेळपट्टीवर दमदारपणे उभे राहीलं की धावा येत राहतील. खेळपट्टीवर संयम आवश्यक आहे. बुमराचा मारा जबरा होता. ४ विकेट्स बळकावल्या. अश्वीन ३, सिराज दोन तर जडेजाला एक विकेट्स मिळाली. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/12/2020 - 11:49
भारताची पहिली विकेट पाचव्या चेंडुवर मयंक अग्रवालची पडली. वेगाने चेंडू येत असतांना बॅटलिफ्ट पार डोक्याला लागून येते.बॅट खाली येईपर्यंत कार्यक्रम झालेला असतो अशी चर्चा क्रिकेट समालोचक करत असतांना पायचितचा निर्णयाने मयंक बाद झाला. चेंडु दोन्ही बाजूला वळतोय. रिव्ह्यू वाया गेला. प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 26/12/2020 - 12:16
प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते. खी खी खी सर घाबरवू नका हो मला तर वाटते जडेजा, बुमराह ला वर पाठवून फटकवायला सांगायला पाहिजे. ३० ४० धावा झाल्या तरी ऑसी वर दबाव वाढेल. बाद झाले तरी काही विशेष फरक पडणार नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/12/2020 - 13:33
पहिल्या विकेट् नंतर वेगात येणा-या चेंडुना खेळत आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ०७ तर गिल २८ धावावर खेळत होते. गीलचा कॉन्फिडेंस चांगला होता. उद्या सकाळच्या सत्रात आपण पहिल्या तासभर विकेट गमावली नाही तर आपली धावसंख्या वाढलेली असेल, तसे झाले नाही तर आपण जेव्हा डोळे चोळून उठू तेव्हा शेपुट वळवळ असेल असेही होऊ शकते. क्रिकेट तज्ञ आजच्या अभ्यासावर ना ड्रॉची शक्यता ३० टक्के म्हणत आहेत. देखेंगे आगे आगे होता है क्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 26/12/2020 - 14:24
ड्रॉ होण्याची शक्यता नाही. सामना निर्णायक होणार. चौथ्या डावात भारताला फलंदाजी करावी लागणार असल्याने अवघड आहे.

In reply to by प्रचेतस

भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटते. ? असे बोलणे खुप घाईचे ठरेल. राहुल ला विहारीच्या जागी घ्यायला हवे होते अस मलाही वाटत. उमेश यादव मला अजिबात आश्वासक वाटत नाही. स्ट्रेटेजी करुन गोलंदाजी करतो असे दिसत नाही. विकेट मिळाली तर मिळाली.

प्रचेतस 27/12/2020 - 05:55
६१/२ शुभमन गिलने कमिन्सला ड्राइव्ह करायच्या नादात विकेट फेकली.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 27/12/2020 - 14:18
मस्त खेळले आज. मागच्या मानहानीकारक पराभवानंतर तर आजची फलंदाजी अजूनच उठून दिसली. राहणेची संयमी फलंदाजी आणि शतक त्याला जडेजाची भक्कम साथ यामुळे ८२ धावांची चांगली आघाडी मिळाली आणि उद्या ती अजून वाढवून १५० किंवा अधिक धावांची व्हायला पाहिजे. हनुमा विहारी परत अपयशी ठरला, पुढच्या कसोटीत त्याला संधी मिळणे अवघड वाटतेय. उद्याचा दिवस महत्वाचा आहे, सामना कुठे झुकतोय हे दिवस अखेरीस स्पष्ट होईल असं वाटतंय.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी 27/12/2020 - 14:21
पुढील सामन्यात रोहीत शर्मा आत येईल व मयंक किंवा विहारी यापैकी एकजण बाहेर जाईल. कदाचित दोघेही बाहेर जातील व राहुलसुद्धा आत येईल.

श्रीगुरुजी 28/12/2020 - 14:19
पहिल्या डावात १३१ धावांनी मागे पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १३३/६. भारताला सामना जिंकण्याची उत्कृष्ट संधी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 28/12/2020 - 14:33
शेपुट ६०-७० धावांच्या आत गुंडाळले तर विजयाची शक्यता वाटते, शेपुट वळवळत राहिले तर कठीण होईल....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 28/12/2020 - 17:26
प्राडॉ, तुमच्या तोंडात साखर पाहे. रहाणेची कर्णधारकी आश्वासक वाटते आहे. तो पन्नासच्या आत शेपूट गुंडाळवून देईल. असा माझा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.

देशपांडे विनायक 28/12/2020 - 18:20
पहिला दिवस ११ विकेट  दुसरा दिवस ०५ विकेट तिसरा दिवस ११ विकेट चौथा  दिवस ०५ विकेट पडतील म्हणजे भारत ०९ विकेटने जिंकेल माझा अंदाज 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/12/2020 - 08:57
आष्ट्रोलियाचा संघाने ७० धावांचं आव्हान दिले आणि त्या धावांचा पाठलाग करतांना आपल्याला दम लागतोय, आपण दोन फलंदाज गमावले. अजिंक्यचा कॉन्फिडंन्स भारी आहे, मस्त खेळतोय. मयंक अग्रवाल आणि पुजारा अनुक्रमे ०५ आणि ०३ वर पॅव्हीलियनमधे जमा झाले. गील आणि अजिंक्य आपल्या जिंकून देतील अशी अपेक्षा करुया. मागच्या सामन्यातील पराभवाची वेदना जरा कमी होईल. ४२ वर दोन जिंकण्यासाठी २८ धावा हव्या आहेत. आता विजय फार दूर नाही. चिवटपणाने खेळा, अशा शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार 29/12/2020 - 09:18
हे हे हे जिंकले हे धड्डड तत्तड, जिंकले, भारी वाटले बघताना, विजयाचे सगळे श्रेय रहाणेच्या संयमी खेळीला. पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/12/2020 - 09:25
सर्व भारतीय संघांचं अभिनंद्न. पाठीराख्याचंही अभिनंदन. मिपा धाग्यावर क्रिकेट सामन्याबद्दल लिहून क्रिकेट सामना पाहण्यास, लिहिण्या बोलण्यास प्रेरीत करणा-या धागा लेखकाचेही आभार आणि अभिनंदन. पुन्हा भेटू याच धाग्यात ७ जानेवारी २०२१. सकाळी पावनेपाचला. -दिलीप बिरुटे

सुजित जाधव 29/12/2020 - 09:51
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय... वेल डन राहणे अँड कंपनी...हा विजय खास आहे कारण ह्या सामन्यात विराट, भुवनेश्वर, शमी, ईशांत, रोहित हे अनुभवी खेळाडू नव्हते...गिल आणि सिराज ची कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय आहे..

In reply to by सुजित जाधव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/12/2020 - 09:57
पहिल्याच सामन्यामधे पदार्पण करणारा पहिल्या इनिंगमधे दोन विकेट्स तर दुस-या इनिंगला ३ विकेट्स घेऊन मोहम्मद सिराजने लक्ष वेधले आहे. पहिला इनिंगमधे फार उशिरा त्याला गोलंदाजी देण्यात आली तरीही त्याने उत्तम गोलंदाजी केली. -दिलीप बिरुटे

गोंधळी 29/12/2020 - 11:50
आता पुढील सामन्यात मनोबल सकारात्मक असेल. पण पंतचे यष्टीरक्षण व शेपटाला लवकर गुंडाळणे यावर लक्ष देण्याची गरज वाटते.

गामा पैलवान 29/12/2020 - 16:14
माझ्या लहानपणापासून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याची रड सतत चालू असे. यावेळेस मात्र गोलंदाची अतिशय तिखट आहे. अगदी पहिल्या कसोटीतही गोलंदाजी व्यवस्थित होती. जर शंभरेक धावा आजून मिळाल्या असत्या तर गोलंदाजांनी यजमानांना २०० च्या आत उखडायचा कसोशीने प्रयत्न केला असता. या कसोटीतही गोलंदाजी एकदम धारदार व सफाईदार होती. क्या जमाना सचमुच इतना सारा बदला है? -गा.पै.

खेडूत 29/12/2020 - 16:22
अभिनंदन!! पुढच्या दोन्ही कसोटी जिंकण्यास शुभेच्छा!! एक मजेशीर ढकल या निमित्ताने... अजिंक्य रहाणे बाबत उद्याचे मुखपत्र 1. अजिंक्यने "करून दाखवले" 2. ऑस्ट्रेलिया को "उखाड दिया" 3. सामनावीर अजिंक्यने कांगारूंचा "कोथळा काढला" 4. लक्षात ठेवा, भारतीय संघ कोणाच्या बापाचा नाही 5. शेवटी विजयी कप्तान महाराष्ट्राचाचं 6. महाराष्ट्राच्या नेतृत्वाशिवाय देशाला गत्यंतर नाही 7. अजिंक्य राहण्यासाठी महाराष्ट्र नेहमीचं दिशादर्शक 8. कांगारूंनो सावधान : आ देखे जरा किसमे कितना हैं दम 9. मराठी रहाणे समोरून वार करतो 10. मर्द मराठा रहाणे 11. एकट्या रहाणेने 11 ऑस्ट्रेलियन घरी बसवले 12. जगातील बेस्ट कप्तान 13. कांगारूरुपी गिधाडांनो रहाणे तुमचा बाप आहे 14. हीच ती वेळ : रहाणेचे कौतुक करण्याची 15. पुढील 50 वर्षे अजिंक्यचं राहणार कप्तान #IndvsAus2020 #अजिंक्य #राहणे #रहाणे #कोणाचाराहणेतरकोणाचारहाणे

कपिलमुनी 29/12/2020 - 19:35
जिंकलो असलो तरी संघात काही बदल हवेत अगरवाल = रोहित शर्मा विहारी = के एल राहुल हे बदल गरजेचे आहेत.

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 29/12/2020 - 23:53
सहमत उमेश यादवची दुखापत गंभीर असेल तर नवदीप सैनी किंवा नटराजनला संधी मिळू शकते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कपिलमुनी 30/12/2020 - 01:10
स्विंग ला मिळणारी मदत बघता नटराजनला संधी मिळायला हवी

In reply to by कपिलमुनी

गोंधळी 30/12/2020 - 10:33
उमेश तिसर्या सामन्यात खेळु शकणार नाही आहे त्याबदली नटराजन उत्तम पर्याय वाटतो.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 30/12/2020 - 11:35
बरोबर आहे, पण बदली खेळाडू म्हणुन तो आत येऊ शकतो. तो अजुन ऑस्ट्रेलियामधेच आहे. बातमी