Skip to main content

तुकोबांचे अभंग (चौकशी)

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 20/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काही दिवसांपासून तुकोबांचे काही अभंग शोधत आहे. तुकारामांना समर्थ आणि एक संत एकदा भेटतात आणि त्यांना तुकाराम थोडक्यात आपल्या बद्दल सांगतात अशी एक कथा आहे. तुकोबांचे त्या वेळचे पंधरा एक सुंदर अभंग आहेत. त्या मध्ये ते आपली पहिली बायको गेली, व्यवसायात खोट आली, दुष्काळ पडला वगैरे सांगतात. त्यांना झालेल्या सद्गुरुच्या दृष्टांताबद्दल सांगतात. आणि शेवटी म्हणतात, आता आहे तैसा वाटतो विचार पुढील प्रकार देव जाणे आणि मग विष्णू माझ्या कडुन हे करवून घेतो आहे आणि त्या प्रमाणेच सर्व घडत आहे असा शेवट आहे. नेटावर ते अभंग कुठेतरी आहेत. मला पूर्वी मिळाले होते पण आता मिळत नाहियेत. आपल्याला हे अभंग माहित आहेत का? आपण ते अभंग इथे दिलेत तर आभारी राहीन. --लिखाळ.

वाचने 10978
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

तुकारामांना समर्थ भेटतात याविषयी शंका आहे. मात्र दुष्काळात बायको व मुले मृत्यूमुखी पडल्याने संसाराबद्दल आलेल्या एकंदर विरक्तीबद्दल तुकारामांचे अभंग वाचल्याचे आठवत आहेत खालीलप्रमाणे. बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥ विठो तुझें माझें राज्य । नाही दुसऱ्याचें काज ॥धृ॥ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥ माता मेली मजदेखतां । तुका म्हणें हरली चिंता ॥४॥ आपला, (स्मरणशील तुकोबाप्रेमी) आजानुकर्ण आंबिले

नेटावर संत तुकारामांचे अभंग इथे मिळू शकतील. पण तुम्हाला हवेत ते आहेत ते मला माहित नाही .. http://www.tukaram.com/ - अभिजीत

प्राजु याबाबतीत नक्की मदत करू शकेल अस वाटत.तीचा बराचसा अभ्यास आहे या विषयावर. मीनल.

लिखाळा, समग्र तुकाराम गाथा (देहू प्रत) खाली दिलेल्या दुव्यावर अपलोड केले आहे. उतरवून घे. तुला हवे असलेले अभंग त्यात मिळतील अशी आशा करतो. :) http://www.sendspace.com/file/wr4v5s त्यात एक फाँट आहे तो आधी इन्स्टॉल कर. बिपिन कार्यकर्ते

आपण त्वरेने माहिती पुरवल्याबद्दल अनेक आभार. खरेतर तुकाराम डॉट कॉम या स्थळाला मी वारंवार भेट देत असतो. आणि तेथेच मी ते अभंग मागे पाहिले होते. ते जालावर आहेत हे पाहून मी सुखावलो होतो. मध्यंतरी बरेच महिने मी ते अभंग वाचले नाहित आणि तो विषय विसरून गेलो. गेले काही आठवडे मला पुन्हा इच्छा झाली आणि ते अभंग मिळेनात म्हणून आपली मदत मागितली. आता शांत डोक्याने पुन्हा शोध घेतला आणि ते अभंग मिळाले. मी या अभंगांसाठी अशी आख्यायिका ऐकली होती की समर्थ आणि अजून एक संत तुकोबांना भेटायला येतात. आणि त्यांना स्वतःच्या पूर्वेतिहासाबद्दल काही सांगण्याची विनंती करतात. तेव्हा तुकोबा अभंगरुपात त्यांना आपले संक्षिप्त चरित्र सांगतात. ते पुढील प्रमाणे... याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥ नयें बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं ॥धृ॥ संवसारें जालों अतिदु़खें दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥ लज्जा वाटें जीवा त्रासलों या दु:खें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभी कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं । कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गातीं पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली॥९॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सहुदांचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्य असत्यासीं मन केलें ग्वाहीं । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥ यावरि या जालीं कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिलें चित्तीं विठोबाचें ॥१४॥ निषेधाचा कंहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलो धरणें । केले नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरें ॥१७॥ आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणें ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणें माझें सर्व भांडवल । बोलविलें पांडुरंगें ॥२०॥ यातल्या शेवटल्या ओळी मला फार आवडतात. आपण सर्वांनी नेटावर शोध घेऊन मला मदत केलीत याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. बिपिन, तुकोबांची गाथा उतरवून घेईन नक्की. -- (आनंदित)लिखाळ.

एका संकेतस्थळावर एक चर्चा वाचत होतो की, जेवणापूर्वी हात साबणाने धुतले पाहिजे त्यामुळे शरिराला आजार होत नाहीत. पण मनातल्या विकृतीचे / किटाणूंचे काय ! ते कशाने धुणार ? त्यावरुन आमच्या लाडक्या तुक्याचा अभंग आठवला !!! :) नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥1॥ तैसी चित्तशुद्ध नाहीं । तेथें बोध करील काइऩ ॥ध्रु.॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥2॥ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥3॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥4॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥5॥ तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥6॥ (अभंग संदर्भ जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे (संत तुकारामाचा फॅन )