मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोघे जुळे भाऊ

mrcoolguynice · · काथ्याकूट
आटपाट नगर होतं. तिथं दोघे जुळे भाऊ, आपआपल्या बायकापोरांसोबत नांदत होते. म्हाताऱ्या बापाच्या निधनानंतर, वडिलोपार्जित संपत्तीचे समसमान वाटप होईल, असे ठरलं होतं. म्हाताऱ्याची एक दुध देणारी गाय, एवढीच काय ती तुटपुंजी संपत्ती होती. एक गाय दोघांत कशी वाटावी ? गहन प्रश्न. पहिला भाऊ हुशार, तो दुसऱ्याला म्हणाला... गाईच्या नाकापासून ते मध्यापर्यंतचा भाग तुझा... आणि मध्यापासून शेपटापर्यंत अर्धा भाग माझा. पहिल्या भागात तोंड येतं, त्यामुळे गाईला चारा पाणी औषधोपचार तुझा जिम्मा... माझ्या अर्ध्या भागात गाईची कासोळी, त्यामुळे दुधाचा वाटा माझा.. एवढंच काय या पवित्र गोमातेचे, पूजेसाठी गोमूत्र , घर सारवायला शेण, माझ्याच वाट्याचे... दुसरा भाऊ दुखावला, परंतु प्रतीलॉजि व ते पटवून देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू शकला नाही, मुकाट्याने पाहिल्याची मनमानी सहन केली. दर ५ वर्षांनी भरणाऱ्या महाजत्रेत एका साधूची, गाठभेट होता, त्याने आपली व्यथा व्यक्त केली. साधूने एक कानमंत्र त्याला दिला. दुसऱ्या दिवशी, दूधवाला भाऊ दूध काढायला बसला तोच, या भावाने गायीच्या तोंडावर जोरात पाण्याचा हबका मारला, गाय लाथा मारू लागली, एक दोन तर दूध काढणाऱ्या भावाच्या कमरेखाली लागल्या, कपाळात गेल्या... अरे काय हा पोरकटपणा लावलाय, विव्हळून त्याने विचारले... तू तुझ्या अर्ध्या भागात मनसोक्त भोगवटा घेतोयस , तसेच मी माझ्या... अरे असं काय, भाऊ ना आपण, वाटल्यास गोमूत्र शेणाचे भोगवटा पत्र तुझ्या वाटे करतो...पण पोरकटपणा सोड, मला समजून घे.... क्रमशः

वाचने 3402 वाचनखूण प्रतिक्रिया 4

शुभांगी दिक्षीत 07/11/2019 - 05:47
काही कारणाने घराला आग लागते. गाय सगळीकडे धावत असते त्यामुळे तिच्या कपाळाला, नाकाला, पोटाला तसेच आचळांच्या बाजूलाही खरचटते. आता याचा खर्च कोण करेल असा वाद होतो. मग तो वाद गावत पंचांसमोर जातो. पंच म्हणतात की गार चारही पायांवर पळाली मग जो खर्च आहे तो अर्धा वाटून घ्या आणि कोणी किती खर्च केला याचा हिशोबही दाखवा. मोठा भाऊ लहान भावाला दटावतो आणि खर्च करायला लावतो नंतर खर्ची देतो असं सांगून. पण तो देत नाही. मग पुन्हा पंचाईत झाली. शेवटी पंच म्हणतात तुम्ही दोघे भाऊ आहात. युती करा आता. भांडणं बस झाली. हा निर्णय ऐकून गावकरी टकामका बघत राहतात. (असं होईल असं मला वाटतं.)

mrcoolguynice 28/11/2019 - 14:53
क्रमशः पुढे, अश्या रीतीने पहिला भाऊ, लालची भावाला धडा शिकवतो. कारण आता गाय लालची भावाला दूध काढायला जवळ येऊ देत नाही, लाथाळी मारते. नाहीतरी दूध थोडंस आंबट, असे म्हणून, लालची भाऊ, जोरजोरात मोठ्या आवाजात बोलतो की येत्या नजीकच्या काळात, योग्य वेळी योग्य ते बोलेन....