Skip to main content

पहा पटलं तर!!!!

लेखक धोंडोपंत यांनी सोमवार, 27/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आपण सर्व मराठीप्रेमाने बांधले गेलेलो आहोत. त्यामुळेच आपण मिसळपाववर येतो. वाद घालतो, भांडतो, चेष्टामस्करी करतो, कविता ऐकवतो, विचार मांडतो, आनंद लुटतो. आपणा सर्वांना येथे एकत्र आणणारा धागा म्हणजे महाराष्ट्रावरील आणि मराठीभाषेवरील आपले प्रेम. किंबहुना मिपाकरांचा उद्देशच मुळी ज्यांना मराठीत संवाद साधायचे आहे, त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे हाच आहे. जो जो महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम करतो, तो मराठी. त्याचा धर्म कोणताही असो. त्याच्या घरात जर मराठी भाषा बोलली जात असेल तर तो मराठी. विविध धर्मीय लोक महाराष्ट्रात आहेत. जे मूळचे महाराष्ट्रातीलच आहेत. कुणी जैन असेल, कुणी इलाही जमादारांसारखा मराठी भाषेला "वाहून घेतलेला" मुसलमान असेल, कुणी फादर फ्रांसिस दिब्रीटोंसारखा मराठीप्रेमी ख्रिश्चन असेल. या लोकांच्या मराठीप्रेमाबद्द्ल शंका घेण्यास जागाच नाही असा आमचा अनुभव आहे. आम्ही मराठी भाषेतले बारकावे एका मुसलमानाकडून शिकलो आहोत, ज्यांचे नाव आहे ईलाही जमादार. तर सांगायची गोष्ट ही की, धर्मापेक्षा मराठीपणा हा सर्वात जवळचा दुवा आहे. त्यामुळे मिसळपाववर धर्माच्या पलिकडे जाऊन आपले मराठीपण जपणारे लेखन व्हावे, असे आम्हाला वाटते. गेले काही दिवस मिपावरील चर्चा वाचून जे वाटले ते लिहिले आहे. आमचे विचार अनेकांना पटणार नाहीत याची खात्री आहे. तरी सुद्धा मायमराठी साठी धार्मिक मतभेद बाजूला ठेवून लेखन व्हावे असे आमचे मत आहे. दादांच्या शब्दात सांगायचे तर, लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी || जय महाराष्ट्र|| पहा पटलं काही तर! नाहीतर चालू द्या..... आपला, (मराठीप्रेमी) धोंडोपंत

वाचने 6454
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मिसळपाववर धर्माच्या पलिकडे जाऊन आपले मराठीपण जपणारे लेखन व्हावे, असे आम्हाला वाटते. सहमत आहे !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाववर धर्माच्या पलिकडे जाऊन आपले मराठीपण जपणारे लेखन व्हावे, असे आम्हाला वाटते.
असेच म्हणतो ... अतिशय योग्य मत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पुर्ण सहमत दीपक गुप्त

पंत सहमत आहे आपल्याशी 'आमचे विचार अनेकांना पटणार नाहीत याची खात्री आहे.' असं अजिबात वाटून घेऊ नका लवकरचं भेटू आपला अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

तर सांगायची गोष्ट ही की, धर्मापेक्षा मराठीपणा हा सर्वात जवळचा दुवा आहे. त्यामुळे मिसळपाववर धर्माच्या पलिकडे जाऊन आपले मराठीपण जपणारे लेखन व्हावे, असे आम्हाला वाटते. पंत, मुद्द्याचं बोललात! वास्तविक मिपाचा मुख्य उद्देशही "मराठीपण" हाच आहे... आपला, (मराठी) तात्या.

पुर्ण सहमत.....मराठी म्हणुन सर्व मिपाकर ओळखले जावेत. मिसळ बनवताना खुप काही एकत्र करावे लागते. मोडाची उसळ,चवीला बटाटा, झणझणीत कट,त्यावर पेरलेली कोथिंबीर,थोडासा फरसाण,लिंबाची एक फोड,बारीक चिरलेला कांदा व सोबत ब्रेडचे काप मग हि मिसळ तयार होते.तशी आपली मराठी भाषा आहे.सर्व जातीधर्माला सामावुन घेत आज इथवर पोहचली आहे. त्या मराठी भाषेवर निर्मळ प्रेम करणारी माणसे इथे मिपावर भेटतात म्हणुन आपसुक मी मिसळलो.वैचारीक मुद्दयावर वाद होणे हितकारक आहे पण त्यात धार्मिक मुद्दे वापरणे चुकीचे आहे. मिपावर येताना धर्माचे जोड बाहेर काढुन आत यावे असे आपले स्पष्ट मत आहे. वेताळ रिकामा टेबल नसला तरी उभे राहुन मिसळपाव खाउ.

अगदि सहमत्.मी वसईकर marathi christian aahe.

धोंडोपंत, लाख बोललात. आपल्या भाषेचा मान आपण राखला तर इतरही राखतील. अनेक अमराठी लोक थोडेफार का होइना, प्रसंगी का होइना पण मराठी बोलतात. आपणही अन्य प्रांतातील मित्रांशी वा संबंधितांशी बोलताना त्यांच्याशी चार शब्द त्यांच्या भाषेत बोलतो, त्यांना आनंद होतो व मग तेही आपल्याशी काहीतरी मराठी बोलायचा प्रयत्न करतात. आपले हिंदीशीही वैर नाही. हिंदी भाषिक परिचितांशी आपण हिंदीत बोलतो की. पण कुणी ती भाषा सक्तिने आमच्या डोक्यावर थापू पाहिल तर ते आम्हाला का रुचावे? हिंदी ही राष्ट्राभाषा असा प्रचार सरकारकडुन केला जातो, सरकारी कचेर्‍या, बँका इत्यादी ठिकाणी सर्रास 'राष्ट्रभाषा का प्रयोग करे' असा प्रचार असतो. पण मी असे ऐकले आहे की घटनेत सर्व भाषा समान दर्जाच्या असून कोणत्याही एका भाषेला काही खास स्थान नाही. यातील सत्य काय हे कुणी सांगेल का?

In reply to by सर्वसाक्षी

पंत आणि सर्वसाक्षींशी सहमत आहे.
हिंदी ही राष्ट्राभाषा असा प्रचार सरकारकडुन केला जातो, सरकारी कचेर्‍या, बँका इत्यादी ठिकाणी सर्रास 'राष्ट्रभाषा का प्रयोग करे' असा प्रचार असतो. पण मी असे ऐकले आहे की घटनेत सर्व भाषा समान दर्जाच्या असून कोणत्याही एका भाषेला काही खास स्थान नाही. यातील सत्य काय हे कुणी सांगेल का?
भारतीय प्रजासत्ताकाची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. कामकाजाच्या अधिकृत भाषा आहेत. या विषयावर मनोगतावर झालेली चर्चाहे पान पाहा आपला, (मराठी) आजानुकर्ण

मायमराठी साठी धार्मिक मतभेद बाजूला ठेवून लेखन व्हावे धोंडोपंतांशी सहमत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आदरणीय धोंडोपंत, आपल्या ओघवत्या लेखन शैली मुळे विषय गळी उतरयला खूप सोपा झाला आहे हे वरील प्रतिसादांवरुन दिसते आहे. माय मराठी ही धर्माच्या पलिकडे जाऊन जपायला हवी हे आपले मत मान्य. जसे शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्राचे राजे समजने अयोग्य आहे तसेच. काही लोक असा दावा करत असतात की शिवाजी महाराजांच्या दरबारी तसेच सैन्यात मुसलमान होते म्हणून त्यांचे राज्य म्हणजे हिंदवी राज्य नव्हते. ते आपणास पटते का? दुर्दैवाने आपण दिलेली इलाही जमादार व फादर फ्रांसिस दिब्रीटों सारखी सन्माननीय उदाहरणे फार कमी आहेत. सर्वसाधारण पणे महाराष्ट्रातील मुसलमान घरात तसेच समाजातही उर्दू (हिंदुस्तानी?) वापरतात असे निरिक्षण आहे... अगदी मराठवाड्यातल्या छोट्याश्या अशा आमच्या गावातल्या मुस्लीम कुंटुंबापर्यंत. कदाचित मराठवाड्यतील प्रमाण निजामी मुळे जास्त असेल. परंतू माझा मुद्दा हा नाही. याउलट मराठी हिंदूंचे बघा, म्.प्र. असो वा आंध्र वा कर्नाटक वा तमिळनाड पिढ्या न पिढ्या ही कुटुंबे मराठीशी नाळ जोडून आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या मराठी मुस्लीम कुटुंबानी मराठीशी नाळ जोडून ठेवलेली मी तरी अद्याप पाहिलेली नाही. शिकागोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका डॉक्टर कुटुंबाच्या घरी गेल्यावर त्यांच्या मुलांना आम्ही कौतुकाने म्हटले, "अरे वा, आपको तो हिंदी भली भांती आती है! मराठी आती है की नाही?" तर उत्तर मिळाले, "नही, हम इंग्लिश के अलावा सिर्फ उर्दू ही जानते हैं!" तात्पर्य हे की बहुतांश मराठी हे हिंदूच आहेत. त्यामुळे मराठी भाषा व मराठी लोकांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होणार तेव्हा तेव्हा त्यात धर्म येणारच. मागच्या महिन्यात आबा पाटलांनी एका कार्यक्रमात म्हटले,"महाराष्ट्रात सर्व भाषांचे तसेच धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने रहात आलेले आहेत. मराठी भाषा न येणारा खूप मोठा अल्पसंख्यांक समाज येथे त्यांच्या भाषेवर कुठलेही आक्रमण न होता राहिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्राला संकुचित करण्याचा प्रयत्न करू नका."... या वाक्याला अनेक कांगोरे आहेत हे मान्य. पण त्यातच त्यांनी हे ही मान्य केलेले आहे की येथला अल्पसंख्याक मराठी नाही. (तो व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य व ते आपण केलेच पाहिजे). आणखी एक मुद्दा - जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांच्या कार्यक्रमांकडे बघा. दिवाळी, पाडवा, संक्रांत, गणपती अशा हिंदू संणांच्या अनुशंगानेच सगळे कार्यक्रम असतात. एवढेच काय... मराठी भाषेचा इतिहास बहुतकरुन ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, अभंग, गाथा अशा धार्मिक साहित्याभेवतीच गुंफलेला आहे. मराठी विषयी बोलताना आपल्याला कोणाचाही द्वेश करायचा तर नाहीच पण कोणालाही कमीही लेखायचे नाही. पण धर्म वा भाषा या जीवनातल्या अविभाज्य घटकांना कृत्रीम रित्या वेगवेगळे करणे शक्य होणार नाही असे वाटते. आपला, (हिंदू-मराठी) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

सहमत, पुर्णपणे धर्मविरहीत लिखाण जवळजवळ मुश्कील आहे. दुसर्‍याच्या धर्मावर टाच न आणता धर्मिक बाबी लिहायला हरकत नसावी. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.

In reply to by भास्कर केन्डे

सहमत, पुर्णपणे धर्मविरहीत लिखाण जवळजवळ मुश्कील आहे. दुसर्‍याच्या धर्मावर टाच न आणता धर्मिक बाबी लिहायला हरकत नसावी. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.

मिसळपावाचे चालक जेव्हा मुखपृष्ठावर नाताळ, ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती , रोश हशान्ना, बुद्धपौर्णिमा, धम्मपरिवर्तन दिन वगैरे सर्व सणांबद्दल शुभेच्छा देऊ लागतील, तेव्हा मिसळ्पाव हे स्थळ कुणा एका धर्माविषयी नसून सर्वधर्मीय मराठी विषयी आहे, ह्याची सदस्यांना आपोआपच जाणिव होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नाताळ, ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती , रोश हशान्ना साजरे करणारे कोणी वाचक आहेत का? व असण्याची शक्यता किती आहे. अर्थात हे असे व्हावे ही मनोमन ईच्छा! आपला, (मर्‍हाटी) भास्कर

असा उपयोग करण्यासाठी मी येतो. सध्यातरी "दुर्लक्ष"ढालीचा वापर करून मला तसा वापर करणे फारसे कठिण जात नाही. आतातरी जमते आहे. पण दुसर्‍या कोणाला कठिण जाऊ शकेल, हे मान्य. शिवाय मिसळपावावर नवेनवे सदस्य सारखे येत असतात. मराठी भाषाप्रेमावेगळाच अजेंडा असलेला एखादा लोंढा आला, तर मलाही कठिण जाईल, हे मान्य. त्या परिस्थितीत संपादनमंडळाने, आणि शेवटी मालकानेच हे ठरवायचे आहे, की संकेतस्थळ उद्देश्यापासून ढळते आहे, की नाही. सारांश : चर्चाप्रस्तावाला थोडेफार समर्थन देत आहे.

माझ्या मते भाषा अन् धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात राहणारे इतरधर्मीय लोक मराठी बोलतात तसे ते बंगाल मधे बंगाली अन् आंध्र प्रदेशात तेलुगु बोलतात. धर्म म्हनुन कुनी आपली एखादी भाषा वापरु शकतो. परंतु ती त्या धर्माची पुस्तके वाचे पर्यन्त मर्यादीत असते. त्या त्या प्रांतातील भाषा हीच लोकांची खरी ओळख असते. मराठी बोलनारा मराठी , बंगाली बोलणारा बंगाली तशीच गुजराथी, तेलुगु, कन्नड अशी सर्वांची ओळ्ख असते. त्यात कुठेही धर्म दिसत नाही. खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपापल्या द्रुष्टीकोनातुन पाहुन आपला फायदा करुन घेण्याची व्रुत्तीच अशे फाटे फोडायला कारणीभुत असते. आम्ही जात पात मानत नाही म्हणनारे मग आपल्या सोयीसाठी ब्राम्हन, मराठा, . . वगेरे तत्सम जातीविषयक फाटे फोडतो. अन याचेच आमचे गुणी राजकारणी भांडवल करतात. भाषा अन् धर्म यांची सरमिसळ होउ नये हेच माझे मत आहे. त्यामुळे धोंडोपंतांशी मी पुर्ण सहमत आहे. अवांतर : माझ्या गावी एका मुस्लीम मौलवीच्या तोंडुन जेव्हा मी शुध्द मराठी ऐकली होती तेव्हा आपल्याला अशी मराठी का बोलता येत नाही याचा विषाद वाट्ला होता. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मायमराठी साठी धार्मिक मतभेद बाजूला ठेवून लेखन व्हावे पूर्ण सहमत.