Skip to main content

रिअल इस्टेट : दुर्दशा आणि दिशा

रिअल इस्टेट : दुर्दशा आणि दिशा

Published on 31/01/2018 - 16:47 प्रकाशित
१) बांधकाम क्षेत्रात जबरदस्त लिक्विडिटी क्रंच आहे, हे वेगळे सांगायला नको. २) मोठ्या शहरामध्ये, याच शहरांच्या उपनगरांमध्ये, अगदी छोट्या शहरामध्येपण खूप मोठ्या प्रमाणावर तयार सदनिका बांधून रिकाम्या पडलेल्या आहेत. निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी पुण्यासारख्या शहरात व उपनगरात मिळून किमान ७,००,००० च्या आसपास फ्लॅट, रो हाऊसेस, बंगलो हे ग्राहकांच्या प्रआवाजात बोललं जातयं. ३) अडचणीत आलेले बिल्डर ग्राहकाबरोबर काहीच्या काही बार्गेन करत आहेत. काही ठिकाणी तर चक्क ३० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्कौंट मिळत आहे. तुमची फक्त मागण्याची तयारी पाहिजे. ४) विक्री नसल्याने अनेक बिल्डर्स बांधलेले रिकामे फ्लॅट / ऑफिसेस / शोरूम्स भाड्याने देऊ लागले आहेत; तेही खूप कमी दरात. निदान बॅंकेचे व्याज तरी काही प्रमाणात वसूल व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. ५) Demonetization मुळे तर अनेक गुंठामंत्री आणि कॅश फायनान्सर लोक गायब झाले आहेत. त्यामुळे बिल्डर्सला खेळत्या भांडवलाचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शब्दशः दुष्काळात तेरावा महिना चालू आहे. ६) त्यात आवाक्याबाहेरच्या एनपीएमुळे बॅंकांनी एकूणच पतपुरवठ्यात हात आखडता घेतला आहे किंवा त्याचे निकष खूप कडक केले आहेत. थोडक्यात आई जेऊ घालेना आणि बाप भिक मागू देईना अशी बिल्डरांची परिस्थिती आहे. ७) रोखीने खरेदी विक्री व्यवहार करणारा एक खूप मोठा वर्ग Demonetization आणि सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये धारातीर्थी पडला आहे. याचा प्रचंड परिणाम एकूणच मागणीवर झालेला दिसून येत आहे. ८) रेरा आणि महा रेरामुळे दोन – पाच प्रोजेक्ट करून काळ्याचे पांढरे करणाऱ्या ज्या फर्म कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवायच्या त्या आता गायबच होतील. कारण संबंधित कायद्याचे पालन करणे असंघटीत क्षेत्रासाठी खूपच अवघड आहे. ९) सरकारच्या जनघर योजनेमुळे ज्या चालू प्रोजेक्टवर सबसिडी मिळणार नाही असे अनेक प्रोजेक्ट मार खातील. १०) ज्यांनी भविष्यकाळात विकण्यासाठी घरे घेऊन ठेवली आहेत; त्यांच्यासाठी प्रधानमंत्री जनघर योजनेत मिळणारी सबसिडी आणि जीएसटी खूप मोठा अडसर ठरणार आहे. सरकार सरळ सरळ डिस्कौंट देत आहे. त्यामुळे जुने घर विकणे खूप कठीण जाणार आहे. ११) जीएसटीमुळे यापुढे रोखीने चालणारा बहुतांश धंदा बंद होईल. बांधकामाला लागणारे सगळे आयटम बिलासहच घ्यावे लागतात आणि विक्री करताना जीएसटी न लावताच विकायचं अशी विचित्र गोष्ट घडणं खूपच अवघड दिसतयं... १२) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जीएसटीमुळे या क्षेत्रात नक्की प्रॉफिट मार्जिन किती हे सरकारी यंत्रणेला स्पष्ट होईल आणि ग्राहकांनापण. १३) आय.टी. क्षेत्रातील तरूण ग्राहक हा बांधकाम व्यावसाईकांचा हक्काचा ग्राहक होता. लॅविश फ्लॅट असणे आणि दोन- तीन फ्लॅट नावावर असणे हे या आय टी वाल्यांचं स्टेटस सिम्बॉल होते. परंतु ट्रम्प तात्यांच्या कोपामुळे एच १ व्हिसाचे नियम कडक झाल्याने या क्षेत्रात बेरोजगारीची आणि पगार – कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळणार आहे. पुण्यातील आय टी मधील १.५ लाख नोकऱ्या कमी होतील की २ लाख अशा पैजा लागत आहेत. इन्फोसिस, टीसीएससारख्या दिग्गज कंपन्यासुद्धा नोकरकपात करत असून त्यामुळे नवीन घरांची मागणी आणखीन कमी होणार आहे आणि नोकरी सोडून जाण्याऱ्यांची अनेक भाड्याची घरे रिकामी पण होतील. त्यामुळे भाड्याचे दर भविष्यात आणखीन कमी होऊ शकतील, याचा अर्थ घरांचे Rent yield कमी होईल.. १४) सतत वाढणारे शेअर मार्केटसुद्धा काही प्रमाणात बांधकाम व्यवसायाला त्रासदायक ठरत आहे. HNI, UHNI आणि Institutional Investors चा पैसा बांधकाम व्यवसायातून निघून शेअर मार्केटचा मार्ग चोखाळणार आहे. शेवटी भांडवलाचा प्रवाह नेहमी नफ्याची वाट शोधत असतो. Liquidity, tax free returns, अगदी किमान रू. ५०००/- सुद्धा गुंतवणूक करण्याची मुभा, या सर्वाबद्दल माध्यमातून होणारी जागरूकता, दर मिनिटाला म्युचल फंडमार्फत येणारा ६५ लाख रु. इतका प्रचंड निधी, एसआयपीच्या माध्यमातून ४७१६ करोड रु. च्या दरमहा येणारा निधी ही वस्तूस्थिती स्पष्ट करायला पुरेसा आहे. या गोष्टी लक्षात घेता पुढील काही दशके तरी हा ओघ असाच सुरू राहील. १५) अनेक जागतिक चलनांच्या तुलनेत भारतीय चलन मजबूत होत आहे, परिणामी युरोप-अमेरिका-मध्यपूर्व येथून फ्लॅट, रिअल इस्टेटसाठी येणारी गुंतवणूक कमी होत आहे, हीपण या क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. १६) २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही योजना सरकार राबवत असताना कुठल्याही परिस्थितीत घरांच्या किंमती स्वस्त ठेवणे सरकारला भाग आहे. मुळात हा फुगा फुगला तो काळ्या पैशांला लावलेल्या टाचणीमुळे. अजूनही हे क्षेत्र राजकारण्यांच्या काळ्या पैशांच्या गुंतवणुकीवर कसेबसे तग धरून आहे. एवढ्या प्रॉपर्ट्यांची विक्री करून आलेल्या पैशांचं नेमकं करणार काय, या प्रश्नांचं उत्तर कुणालाच मिळेनासं झालंय. कारण एक एक करत काळ्या पैशांचे दरवाजेच अर्थमंत्रालयाने बंद केलेत. सध्यातरी सोन्यात व प्रॉपर्टीतच थोडा फार स्कोप होता. तोही जीएसटीने पूर्णपणे नाही तरी ६०-७० % बंद करून टाकला. १७) एकूण बांधकाम व्यवसायातील मंदी किमान अजून 6 ते 7 वर्ष कमी व्हायची शक्यता खूपच कमी आहे. त्यानंतर काही नवीन घडामोडी घडल्यास हे क्षेत्र कदाचित परत उभारी घेऊ शकेल. १८) सध्या मंदीचा जो टप्पा चालू आहे, त्यात प्रामुख्याने बिल्डर्स -व्यावसायिक भरडले जात आहेत, परंतु यापुढच्या टप्प्यात त्याचा परिणाम सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचेल. १९) वरील सर्व कारणांमुळे स्थावर मालमत्तेतून येणारे भाडे कमी होईल आणि मालमत्तेतून येणारे नियमित उत्पन्न कमी झाल्यास मालमत्तेचे अवमूल्यन अपरिहार्य ठरते.. त्यामुळे प्रामुख्याने ज्यांनी भविष्यात विक्री करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी मालमत्तेत गुंतवणूक केलेली आहे, त्यांना काही प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.... Source - Real estate research report 2017

याद्या 9111
प्रतिक्रिया 30

पुर्वीचा ६ % टॅक्स जी एस टी च्या नावाने १२ % केला आहे, तो कमी करावा

वाचनीय. पण एकंदरीतच लेखाचा फोकस शहरांवरच आहे असे दिसते. फुगा फुटतो आहे त्याबद्दल मोदी सरकारचे आभारच मानायला हवेत असे ह्यांचे मत. सध्या मंदीचा जो टप्पा चालू आहे, त्यात प्रामुख्याने बिल्डर्स -व्यावसायिक भरडले जात आहेत, परंतु यापुढच्या टप्प्यात त्याचा परिणाम सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचेल. हेही बरे. खरे तर तीन/चार जणांच्या कुटुंबाला दोन-तीन घरे हवीतच कशाला? ज्या फ्लॅटची किंमत खरे तर २५-३० लाखापेक्षा अधिक नाही ते फ्लॅट ५०-६० लाखाला विकले जात होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगे माई , २५ लाख लायकीचा फ्लॅट ५० लाखाला जात होता आणि या सगळ्या मोदींच्या चतुराईने पुन्हा तो २५ लाखाला आला , असे खरेच कुठे घडत आहे का ? असेल तर सर्वाना सांग. स्वत: मोदी सरकारने ६ % चा टॅक्स १२ % करायचा आणि लोकानी दुप्पटीची अपेक्षा ठेवली तर त्याना मात्र हावरट म्हणायचे. तुमच्या ह्यान्ना विचार हे योग्य आहे का ?

In reply to by manguu@mail.com

अरे बाबा, सरकारची व आपली तुलना करून कशी चालेल? कर जास्त गोळा झालाच पाहिजे ह्यात दुमत नसावे. भाजपाच्या विचार्धारेला आमचा विरोध आहे पण हे सरकार चांगले काम करते आहे हे नक्की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सरकारच्या ताळेबंदाला जमा खर्च असे दोन कॉलम्स असतात. आपल्यालाही दोनच असतात ना ?

In reply to by manguu@mail.com

सरकार कर्जमाफी करते,तोटा सहन करून संस्थाही चालवते.. आपणही गरीब लोकांना कर्ज देऊन मग कर्जमाफी करायची का ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई माई .... सरकार कर्जमाफी करते ती जनतेला मिळालेल्या ट्याक्समधून्स् जनता कर्जमाफी करत नाही , म्हणून जनतेने कमोडिटी कमी नफ्यात विकायची ? मग घरच कशाला , टोमॅटो , मोबाइल , फुगे , फर्निचर , वडापाव ... सगळ्याच कमोडिटी निम्म्या दरात विकायला लावा. .... फार्फार वाइट वाटले. माई पूर्वी भाजपाविरोधात लिहायच्या. माईंच्या ह्यान्नी पार्टी बदलली , ( की माईंचे 'हे'च बदलले ??) विरोधी पक्षातला एक तडफदार आयडी पक्षांतरास बळी पडला.

घरांच्या किमती जरा जरी उतरल्या तरी लोक आनंदतात , याचाच अर्थ buyers are more , sellers are less ! अन्यथा , सेंटिमेंट्स उलट असायला हवे होते ना ?

स्पेक्युलेशन्स खूप आहेत, मला प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी गेल्यावर्षी नोटांबंदी, जीएसटी आणि रेरा यामधून पार वाट लावली.. पण साधारण दिवळीपासून मार्केट पुन्हा हळूहळू उचल घेतंय.. पण मोठे मासे छोट्या माशाना खाणार हे नक्की.. तुमच्या मेसेजमध्ये बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्या कायप्पवर एक वर्ष फिरतायत.

पंधरा वर्षात दहापट किंमत झालेल्या व्यवसायाचे दुसरे काय होणार? अगदी क्षेत्रफळानुसार बांधकाम व जमीन खरेदी खर्च वसूल होईल इतक्या किमतीत घरे विकली तरीही ४०% नफा आहेच आहे. कारण खर्च प्रत्यक्ष क्षेत्रफळावर होतो आणि विक्री विकाऊ क्षेत्रफळाची केली जाते. १००० चौरस फूट अशी जाहिरात केलेला फ्लॅट प्रत्यक्ष ६००-६५० चौरस फूट इतकाच असतो. मुंबई उपनगरात २ बीएचके जर एक कोटीच्या खाली नसेल तर महिना लाखभर हप्त्याचे कर्ज कितीजण घेतील? नवी जागा घेणे मध्यमवर्गाच्या आवाक्या बाहेर आहे आणि गुंतव्णुकदारांना आता या व्यवसायात पहिल्यासारखा परतावा दिसत नसल्याने ते उत्साही नाहीत. नोकरीची शाश्वती वाटत नसताना भारी पगार असलेले नोकरदारही चार वेळा विचार करतात. उरले ते सरकारी अधिकारी व राजकारणी ज्यांच्या कडे बेहिशोबी मालमत्ता आहे पण सद्य परिस्थितीत त्यांना कुणाच्या डोळ्यात येईल अशी घरं घेणं जोखमीचं वाटत असावं, शिवाय आता पूर्वीईतके गपचूप व बेनामी व्य्वहार करता येत नसावेत. बांधकाम व्यावसायिक सरकारला कर कमी करायला सांगतात, माफ करायला सांगतात, बँकांना गृहकर्ज दर कमी दराने द्यायचे आवाहन करतात मात्र स्वतः भाव बेसुमार वाढवतात. २००० साली रुपयाला असलेली वस्तू आज फार तर तीन रुपये झाली आहे, जागांचे दर दहापट! हे लोक दर कमी न करता सोयी सुवीधा देऊ करतात ज्या दिखाऊ असतात पण मूल्य फार नसते. अगदी फ्लॅट्मागे पन्नास हजार रुपये आधुनिक सुविधांवर खर्च केले तरी एक कोटीच्या मानाने ते अवघा अर्धा टक्का! आकर्षक उद्यान, तरण तलाव, सभागृह, व्यायामशाळा हे दाखवुन ग्राहकाला आकर्षित केले जाते व ग्राहकही भुलतो आणि मग ग्राहक समजून चुकतो की सकाळी घराबाहेर पडलेली चाकरमानी रात्री परतत्तात आणि या सुविधा कधीच वापरत नाहीत मात्र देखभालीचा भुर्दंड सोसतात.

अडचणीत आलेले बिल्डर
ह्याच लोकांनी वर्षानुवर्ष ग्राहकांना अडचणीत आणले आहे जे अजुन ही चालु आहे. अफाट नफा कमावला आहे. अभद्र युत्या करुन हे क्षेत्र बदनाम केलेले आहे.

फ्लॅट घ्यायचा असेल तर नवीन घ्यावा की रीसेलचा? प्रॉब्लेम असा आहे कि नवीन घ्यायला गेले तर प्राईम एरियात बिल्डर अव्वाच्या सव्वा रेट लावतो, आणि रीसेल वाला पण तोच रेट मला हवा म्हणुन हट्ट धरतो. रीसेलवाला रेडी पझेशन मिळतो पण कागदपत्रे नीट बघावी लागतात, बिल्डरकडे ती सहसा क्लिअर असतात कारण बँक लोन त्याशिवाय होणार नाही. बिल्डर बांधकाम चालु करतात पण ताबा वेळेवर मिळेल याची खात्री नाही. एक ना दोन. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कोणतेही घर घेताना खिशात पैसे असले तरी एच डी एफ सी सारख्या गृह कर्ज संस्थेचे कर्ज घ्यावे मग ते पुनर्विक्रीचे असले तरीही. कारण एच डी एफ सी एखादा कागद जरी कमी असेल तरी कर्ज मंजूरच करत नाही. सर्व प्रथम घराच्या कागदपत्रांची झेरॉक्स मागवा ती एच डी एफ सी कडे पाठवून खात्रीशीर आहेत याची पुष्टी करून घ्या. कर्ज मंजूर झाले कि मगच आपले पैसे भरा. मग कर्ज घ्या. सगळे हप्ते त्यांनी (एच डी एफ सी) भरले आणि घर संपूर्ण ताब्यात आले कि नंतर खिशातले पैसे टाकून कर्जमुक्ती करून घ्या.

In reply to by सुबोध खरे

हा एक चांगला पर्याय आहे. पण अशी एखादी एजन्सी नाही का की जी फी आकरुन सर्व कागदपत्रांची शहानीशा करुन प्रमाणपत्र देते आणि जे ग्राह्य धरले जाते.

In reply to by manguu@mail.com

हेच म्हणणार होतो. वकील लोक ४ ते ५ हजार घेऊन मागच्या १५ वर्षांपर्यंतचा सर्च रिपोर्ट देतात. जनरली बँकांच्या पॅनल वरचे वकील पकडायचे म्हणजे व्यवस्थित सर्च रिपोर्ट मिळतो.

In reply to by बिटाकाका

एच डी एफ सी चा कायदा विभाग हा अत्यंत कसलेला आणि मुरलेला आहे.ते अगदी कसून तपासणी करतात. केवळ १५ वर्षांचा सर्च रिपोर्ट पुरेसा नाही हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. त्यामुळे एखादा खाजगी वकील जो कोर्टात केसही लढतो कायद्याचा सल्लाही देतो आणि टायटल सर्चही करून देतो अशापेक्षा एच डी एफ सी कडे जाणे सोयीस्कर आहे. मागच्या वर्षी मी एच डी एफ सी कडून कर्ज मंजूर करवून घेतलं होतं तेंव्हा त्यांनी त्या मालमत्तेचा पूर्ण लेखाजोखा करून घेतला होता. बिल्डरला सर्वच्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स द्यायला लावली ती महापालिकेतून छाननी करवून घेतली. नंतर काही कारणामुळे मला ती मालमत्ता घेणे जमले नाही तेंव्हा त्यांनी माझी सर्वच्या सर्व प्रोसेसिंग फी पण परत केली. मी अगोदर घरासाठी आणि दवाखान्याची एच डी एफ सीकडून कर्जे घातली आहेत( शिवाय आय डी बी आय, ठाणे भारत सहकारी आणि आय सी आय सी आय बँक यांच्या कडून हि कर्जे घेतलेली आहेत) आणि या सर्वात एच डी एफ सीचा व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन अतिशय शास्त्रशुद्ध आहे. त्यामुळेच एखाद्या प्रकल्पाला एच डी एफ सीचे कर्ज आहे अशी बिल्डरहि जाहिरात करताना दिसते.

In reply to by सुबोध खरे

मी आता ज्या ठिकाणी रहातो त्या बिल्डरकडे अगोदर लोन घेतलेल्या लोकांचे पेपर्स पहायला मागितले. त्याने ते दाखवले. मला कायदेशीर सल्ला घेण्याचा वेगळा खर्च करावा लागला नाही. हे म्हण्जे तू शुक्रवारी सिनेमा पाहून ये फसलास तर मी जाणार नाही हसलास तर सोमवारी पहातो असे आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रिसेलवाला घ्यायला हरकत नाही. पण इमारत किती जुनी आहे. अंतर्गत बदल आणि रंगरंगोटी कशी केली आहे. हे पाहून घ्या. कधी कधी रिसेलवाला फ्लॅटमधील अंतर्गत सजावट तुम्हाला फुकट मिळते. शेवटी तुमची गरज काय आहे ते पहा. जसे की, कुटुंबाला लागणारी जागा, हवा असणारा मजला, मेंटेनन्स, खेळती हवा. बाकी कर्जाच्या बाबतीत डॉक्टरांनी सांगितलेच आहे, एचडीएफसी ला पर्याय नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब आणि खटपट्या

In reply to by राजाबाबु

दुय्यम निबंधक कार्यालयात अजूनही दस्तनोदणीला तोबा गर्दी असते आणि वरचे पैसे देणे राजरोस चालू आहे.

नामांकित DSK बिल्डर तर अक्षरशः झोपले ह्या धंद्यात... त्याला इतर हि काही कारण आहेत हजारो FD होल्डर्स चे पैसे अडकलेत(त्यात माझे सुद्धा थोडे पैसे आहेत). मला वाटत कि लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणून २-३ फ्लॅट्स घेणे परवडत नाही आता. IT मध्ये सुद्धा आधीसारखे दिवस नाहीत... जे अर्थात सर्व बिल्डर्स चे मोठे ग्राहक होते... त्याचबरोबर बाहेरील बऱ्याच देशांनी(अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, new Zealand ) ह्यांनी आपले नियम कडक केलेत... त्यात सरकार चे टॅक्स रेट सुद्धा वाढलेत, काळा पैसे काही प्रमाणात कमी फिरतो आहे बाजारात. फ्लॅट/प्लॉट घेऊन तो विकून ४-५ वर्षात दुप्पट पैसे मिळवण्याची सूत्र बदलली आहेत.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/5-lakh-houses-in-the-metropolitan-area/articleshow/62987155.cms परवडणाऱ्या घरांसंदर्भात विकासकांची संघटना असलेल्या 'नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल'ने (नरेडको) सोमवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केल्यामुळे तीन ते चार वर्षांत मुंबई महानगर परिसरात साडेपाच लाख घरे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. या घरांची किंमत साधारणपणे १५ ते ६० लाखांदरम्यान असेल. यामध्ये नरेडकोतर्फे तीन लाख तर एमसीएचआयतर्फे अडीच लाख परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. घरबांधणी खासगी जमिनीवर या प्रकल्पासाठी राज्य सरकार विविध परवानग्यांचे सुलभीकरण करेल. परवानग्या लगोलग मिळून रखडपट्टी होणार नाही, याकडे लक्ष देईल. जमीन मात्र खासगी विकासकच उपलब्ध करतील, गुंतवणूक त्यांचीच असेल आणि विक्रीही तेच करतील. ......... मुम्बैत म्हणजे नेमके कोठे ? सगळे भरले आहे.. कर्जतला का ? जमीन खाजगी , विकणारही तेच , मग सरकार नेमके काय करणार ? बिल्डरना स्वस्तात घरे बांधून देउन विकायला देणार ?