Skip to main content

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.

लेखक यनावाला यांनी बुधवार, 17/01/2018 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला ............................................................................................................. भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत : 1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥ अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति । अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान मिळाल्यावर लौकरच त्या श्रद्धाळूला परम शांतीचा लाभ होतो. 2) अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोSस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥40॥ अन्वय :- अज्ञ: च अश्रद्दधान: च संशयात्मा विनश्यति । संशयात्मन: न अयं लोक: अस्ति, न पर: (लोक: अस्ति) न च सुखं (अस्ति)। अर्थ :-- श्रद्धारहित असलेला माणूस अज्ञानी आणि शंकेखोर असतो. तो नाश पावतो. ज्याच्या मनात (धर्मग्रंथातील वचनांच्या सत्यतेविषयी ) शंका येतात तो इहलोकाला तसेच परलोकालाही मुकतो. त्याला कधी सुख लाभत नाही. गीतेच्या चौथ्या अध्यायातील या दोन श्लोकांचा मथितार्थ असा की, गीतेतील वचने खरी आहेत यावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो तो ज्ञानी होतो. त्याला विनाविलंब परमशांती लाभते. जो शंकेखोर असतो तो अज्ञानी आणि अश्रद्ध होय. त्याचा नाश होतो. या वचनांच्या सत्यतेविषयी ज्याच्या मनात शंका उद्भवते त्याला ना अरत्र ना परत्र असे होते. त्याला कधीच सुख लाभत नाही. यावरून गीतेत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे, श्रद्धेचे उदात्तीकरण केले आहे हे स्पष्ट होते. गीतेतील ही वचने "श्रीभगवान् उवाच " म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आली आहेत. म्हणून ती सत्य असलीच पाहिजेत असा समज निर्माण केला आहे. (गीतेत "धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच " असे म्हटले आहे. मात्र "श्रीकृष्ण उवाच" असे लिहिले नाही. "श्रीभगवानुवाच" असे म्हटले आहे. महाभारतात श्रीकृष्णाला श्रीभगवान असे केवळ गीतेतच म्हटले असावे. इतरत्र कुठे नसावे. हे इथे लक्षात घ्यावे.) वरील दोनांतील पहिल्या श्लोकात श्रद्धाळूला ज्ञान आणि परमशांती यांच्या लाभाची आशा दाखवली आहे. तर दुसर्‍या श्लोकात अश्रद्धाला भीती घातली आहे की त्याचा विनाश होतो. तो इहलोक आणि परलोक या दोघांनाही मुकतो. प्रत्येक धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. एकदा हे कळले की धार्मिकांची श्रद्धा उडून जाईल. मग धर्मग्रंथांना, धार्मिक कर्मकांडांना, धर्मगुरूंना आणि धर्माला कोण मानणार ? श्रद्धाळूच नसले तर मंदिरांपुढे रांगा कोण लावतील ? मग देवापुढच्या दानपेट्या तुडुंब कशा भरतील ? देवस्थानांची उत्पन्ने कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतील ? देवाला सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू कोण वाहतील ? सोने मोठ्या प्रमाणात जमले नाही तर लंपास कसे करता येईल ? श्रद्धांचे विसर्जन झाले तर होम-हवने, अभिषेक-अनुष्ठाने, एकादष्णी-लघुरुद्र अशी निरर्थक कर्मकांडे कोण करतील ? मग पुरोहित-पुजार्‍यांना फुकाफुकी लक्षावधी रुपये कसे मिळतील ? स्वबुद्धीने विचार केला की श्रद्धा संपते. मग दहावे-अकरावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध अशी अन्त्यविधी कर्मकांडांची लांबच लांब माळ कोण कशाला करून घेतील ? म्हणून धार्मिकांची श्रद्धा दृढ राहायला हवी. ती मुळीच ढळूं देता नये. समाजसुधारक प्रबोधन करू लागले तर प्रखर विरोध करायला हवा. तात्त्विक विरोध करता आला नाही तर त्यांना धमक्या द्यायला हव्या. त्यालाही बळी पडले नाहीत तर त्यांचे खून पाडायला हवेत. पण काही करून श्रद्धा टिकवायलाच हवी. नाहीतर आपले अस्तित्वच टिकणार नाही. असे धर्ममार्तंडांना वाटणे साहजिक आहे. यासाठी धार्मिकांनी धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील वचनांविषयी शंका उपस्थित करायची नाही. संशय घ्यायचा नाही. केवळ श्रद्धा ! ती ढळू द्यायची नाही. श्रद्धेचे बळ मोठे असते. असे हितसंबंधी धूर्तांनी श्रद्धाळूंच्या मनावर सतत बिंबविले आहे. सत्य शोधनाची नावड निर्माण केली आहे. त्यामुळे ,"श्रद्धा म्हणजे अज्ञानात गुरफटून राहण्याची आवड आणि सत्यशोधनाची तीव्र नावड " अशी समर्पक व्याख्या करता येते. अर्थात श्रद्धाळूंना लुबाडण्याचे हे प्रकार गेल्या पाच-सहाशे वर्षांत ऊर्जितावस्थेला आले. तत्पूर्वी अशी लुबाडणूक नसावी. मात्र श्रद्धेच्या आधारे जनसामान्यांवर नियंत्रण ठेवलेले असे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सर्वाधिकार जनता विनाअट मान्य करील याची दक्षता घेतलेली असे. या सत्ता अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग केला होता. तर्कशुद्ध युक्तिवादाला, सुसंगत विचारसरणीला , डोक्यात उद्भवलेल्या शंका उपस्थित करण्याला धर्माच्या क्षेत्रात स्थानच नसते. तिथे अपेक्षित असते संपूर्ण शरणागती आणि असीम श्रद्धा. जो श्रद्धेचे विसर्जन करतो, गतानुगतिक होत नाही , स्वबुद्धी वापरतो, परंपरांची चिकित्सा करतो, आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरतो त्याचीच बौद्धिक प्रगती होऊ शकते. श्रद्धावंत जन्मभर अज्ञानीच राहतो. तसा सुखी असतो. कारण तो त्या अज्ञानातच सुख मानतो. "श्रद्धावान् लभते ज्ञानम्।" हे गीता वचन न पटणारे आहे. माणसाने अज्ञानी राहावे, धर्माला शरण जावे, धर्मगुरूंना पूज्य मानावे. म्हणून अशी वचने सर्व धर्मग्रंथांत असतात. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन असूच शकत नाही. श्रद्धा हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू माणसे अज्ञानालाच ज्ञान समजतात. अतूट श्रद्धेविषयी कोणी काही म्हणो, श्रद्धेची कितीही वाखाणणी करो, गोडवे गावो, मला तर श्रद्धा ही माणसासाठी लाजिरवाणी भावना आहे असेच वाटते. श्रद्धावंत हा त्या श्रद्धाविषयाचा दास बनतो. तो श्रद्धेची चिकित्सा करूच शकत नाही. तसेच श्रद्धा ही अतिशय घातक असू शकते. निष्पाप, निरागस बालकांच्या संस्कारक्षम, संवेदनशील मेंदूत श्रद्धेचे संस्कार बिंबविणे हा मोठा अपराध आहे. बहुसंख्य माता-पिता शिक्षक हा अपराध करतात. श्रद्धा आणि भक्ती यांमुळे माणसाला मानसिक आधार मिळत असेल. मानसिक समाधान लाभत असेल. पण ते केवळ मानीव असते. श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगे ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. अगदी वेदकाळापासून आपल्या पूर्वजांची सूर्यावर श्रद्धा होती. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यामुळे प्रकाश मिळतो, उष्णता मिळते एवढे अनुभवाने समजत होते. ते प्रतिदिनी सूर्याला अर्घ्य देत असत. त्याची स्तुतिगीते गात असत. संध्या करताना म्हणायचा गायत्री मंत्र हा सूर्याच्या तेजाविषयी आहे. ते त्रिकाल संध्या करीत. (सकाळ-दुपार -संधाकाळ) . या श्रद्धेने, भक्तीने, स्तुतीने त्यांच्या मनाला बरे वाटत होते एवढेच. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही. सूर्यदेवाने दिले नाही. वैज्ञानिकांनी शोधून काढले. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हेही त्यांना श्रद्धेने समजले नाही. भूमातेचीसुद्धा ते स्तुती, भक्ती करीत. "समुद्रवसने देवि, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।" असे म्हणत. पण पृथ्वीविषयी सत्यज्ञान त्यांना झाले नाही. ते ज्ञान "संशयात्मा" असणार्‍या वैज्ञानिकांना झाले. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही हे यावरून दिसून येते. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही. श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते. माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते. दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस रानटी अवस्थेत होता. गुहेत राहात होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे हे त्याच्या उपजीविकेचे मार्ग होते. त्याकाळी त्याची तर्कबुद्धी विकसित झाली नव्हती. प्राथमिक अवस्थेत होती. विचार करायला वेळच नव्हता. अन्न शोधार्थ सबंध दिवस जात होता. हींस्र श्वापदांची , साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची सतत भीती होती. त्याकाळीं त्याला श्रद्धेचा आधार वाटला असेल. श्रद्धेमुळे जगणे सुसह्य झाले असेल. पण आतां गतानुगतिक श्रद्धा , धार्मिक कर्मकांडे , इत्यादि सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंपरेच्या नावाखाली आता त्यांना कवटाळून राहणे योग्य नाही. त्यात मानव समाजाचे हित नाही. म्हणून असल्या गोष्टींचा त्याग करायला हवा. त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे. जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे." *****************************************************************************************

वाचने 46525
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by यनावाला

यना कृत तथा कथित व्याख्या मुलतः टिका आणि टिका ज्यात निष्कर्ष आधीच ठरवले आणि टिकेचे मुद्दे तेवढे शोधले सकारात्मक मुद्द्यांवर पाणी सोडले त्या मांडणीस ना परीपूर्णतेचा प्रयास होत ना समतोल येत ना व्याख्येच्या दर्जास प्राप्त होत. एकांगी पुर्वग्रहीत टिकेस व्याख्येचा दर्जा मिळू शकत नाही

अती विज्ञाननिष्ठ लोक असले काहीतरी लिहितात त्यामुळे मुळातच असल्या लोकांविषयी कधीही नसलेला आदर अजूनच कमी होतो. डिजगस्टींग

मी अलीकडेच विख्यात संतूरवादक पं शिवकुमार शर्मांची एक मुलाखत ऐकली. पंडितजींचे वय आता ८० असेल. ते सांगत होते की कित्येक वेळा संतूर उचलून मांडीवर ठेवणे आणि तिच्या तारांचा स्वरमेळ साधणे अत्यंत कर्मकठीण वाटावे इतकी त्यांची प्रकृती कधीकधी खालावते. पण कार्यक्रम सादर करताना त्यांना असा अनुभव येतो की एखादी 'दैवी शक्ती ' त्यांच्याकडून काही काम करून घेत आहे. त्या प्रभावाखाली ते तास दोन तास अत्यंत दर्जेदार वादन सादर करतात. तो प्रभाव ओसरला की पुन्हा वाद्य उचलणे जड जावे अशा स्थितीत परत जातात. वानगीदाखल हे एक उदाहरण दिले. तात्पर्य असे की टोकाची सश्रद्ध/ आस्तिक असलेली किंवा उघडपणे काहीशा अंधश्रद्धेकडे झुकलेली माणसे क्रीडा, संगीत, चित्रकला ते किरकोळ आकडेमोड लागणारे दैनंदिन व्यवहार ते मूलभूत विज्ञानातील अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणार्‍या संशोधन क्षेत्रापर्यंत सगळ्याच क्षेत्रात लीलया संचार करताना, यशस्वी होताना आणि भरीव कार्य करताना दिसतात. त्यांच्या चिकीत्सा करण्याच्या, विश्लेषण करण्याच्या, सतत नवनवीन प्रयोग करण्याच्या किंवा आपल्या कार्यक्षेत्रात सतत काहीतरी शिकत राहण्याच्या क्षमतेत काडीमात्र उणीव येत नाही. क्रीडाक्षेत्रासारख्या अत्यंत बेभरवशाच्या आणि कमालीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात सातत्य टिकवण्यासाठी आणि मनोबळ वाढवण्यासाठी श्रद्धाच कामी येते. कलेच्या प्रांतात अत्यंत आवश्यक असलेल्या सृजनशीलतेला, उत्कट भावदर्शनाला तर श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पाठबळावरच बहर येतो. तळहातावर शिर घेउन निघालेल्या सैनिकालाही 'हर हर महादेव' ही गर्जनाच प्रेरणा देते. कधी काळी हाडाची काडे झालेल्या माउलीला आपल्या कुटुंबासाठी दळण दळण्याचे कष्टप्रद काम करतानाही 'जात्यावरच्या ओव्याच' पाठबळ देत असत. भारतात किती टक्के बायका जात्यावर दळण दळतात, दरवर्षी किती सैनिक धारातीर्थी पडतात किंवा किती कलाकारांना पद्म पुरस्कार मिळतात यांचा 'विदा' वाचून त्यापासून या सामान्यातल्या असामान्य माणसांना कुठलीच प्रेरणा मिळताना दिसत नाही. थोडक्यात 'भाव तेथे देव' इतकेच नसून भाव तेथेच मानवी जीवनातले सारे सत्य, शिव आणि सुंदर प्रकट होते असे म्हणावे लागेल. निव्वळ डॅटॉलने हात धुवून स्वच्छतेची काळजी घेणे वेगळे आणि त्यापलीकडे जाउन धूप दीप लावून, रांगोळी घातलेल्या पानावर जेवायला बसताना मांगल्य आणि पावित्र्य अनुभवणे वेगळे. असो. सश्रद्ध माणसे अत्युच्च बौद्धिक आणि तार्किक क्षमता अनिवार्य असलेल्या क्षेत्रात लीलया वावरू शकतात. वेदांतात व्यावहारिक, प्रातिभासिक आणि अध्यात्मिक सत्य असे म्हणतात ती संकल्पना कळत नकळत त्यांना उमगून जाते. त्यानुसार आवश्यक तेथे तर्क, चिकित्सा, विश्लेषण इत्यादिंचा वापर करून व्यावहारिक जीवन सफल करतानाच गुरूप्रचिती, आत्मप्रचिती वगैरे 'सब्जेक्टिव्ह' प्रचितीच्या गोष्टींना थोतांड न ठरवता आपापल्या रूचीनुसार, परंपरेनुसार किंवा प्रचितीनुसार एखाद्या सत्पुरूषावर श्रद्धा ठेवत आणि नित्यनेमाने ध्यान/ उपासना वगैरे करत जीवन अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतात. उलट श्रद्धेचा तिरस्कार करणार्‍या आणि चिकीत्सेला फाजील महत्व देणार्‍यांना इहवाद्यांना त्यांनी बांधलेल्या काल्पनिक भिंतीपलीकडल्या भावविश्वाबद्दल काडीमात्रही प्रचिती नसते, अनुभव नसतो. त्यामुळे अशा लोकांनी श्रद्धेच्या बुरख्याआडून होणारी बुवाबाजी, फसवणूक, शोषण अशा अपप्रकारांबद्दल टीका करणे अगदी सयुक्तिक असले तरी सरसकट श्रद्धानिर्मूलनाचे त्यांचे प्रयत्न मात्र सत्य, शिव आणि सौंदर्याचेच निर्मूलन ठरत असल्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकांगी, अतिरेकी आणि दुर्दैवी वाटतात इतकेच. बाकी श्रद्धानिर्मूलनालाच कुणी आपल्या जीवनाचे ध्येय मानत असेल तर 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या उक्तीप्रमाणे समाजात काही प्रमाणात अशा व्यक्ती आणि त्यांचे अनुमोदक असणे साहजिकच आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांचा बुवाबाजी आणि शोषणापासून सामान्यजनांना सावध करण्यासाठी सदुपयोग होउन त्या योगे सतश्रद्धेच्या विराट वृक्षावर पोसलेल्या बांडगुळांचे काही प्रमाणात तरी निर्मूलन व्हावे अशी ईश्वरचणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

धाग्याचं फलित म्हणजे: मार्कृस लिहायला लागले यना किमानपक्षी दोनदा तरी धाग्यावर अवतरले जाता जाता मना यांना आणि कट्टर भक्त यांना विनम्र विनंती कुणालाही कसल्याही शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा वेळ वाया घालवू नये,, कारण तो सगळा कल्पनेच्या भावभावनांचा खेळ आहे अगदी दु:खद्द प्रसंगी सांत्वन असल्या मनाच्या शब्द बुडबुडे यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये जुनाट नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

प्रतिसाद धागे सोडून वैयक्तिक आहे (म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही.) यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात. मी पूर्वीचे सर्व धागे वाचले आहेत, आणि खरंच खूप मज्जा येते. (दोघांचाही उपमर्द करायची ईच्छा नाहीये, प्रामाणिक काय वाटते ते सांगितले.) खरेतर यनावालांची वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्रे यापेक्षा जास्त चांगली असतात. (Assuming that दोन्ही यनावाला एकच व्यक्ती आहेत.) यनावालांचे मुद्दे बर्‍याचदा तत्वत: योग्य असतात पण ते ज्या प्रिमायसेसवर आधारित असतात ते भयंकरच गंडलेले असते. ज्यांनी अंशत: तरी सहमती दाखवली आहे अशांनाच ते सिलेक्टीव्हली प्रतिसाद देतात, आणि काहीवेळा अशा उपप्रतिसादात, विरोधकांवर टीका करतात. हे चूक आहे, पॅसिव-ॲग्रेसिव आहे. एकेरीने संबोधणे जसे चूक आहे तसेच, मी अज्ञानी आहे-तुमच्या प्रश्नांना नाही बाबा उत्तरे, किंवा जोशींबरोबर संवादात एंगेजच व्हायचे नाही हे एकेरीवर येवून अपमान करण्याएवढेच चूक आहे. जोशींचे मुद्दे फारफेच्ड वाटले तरी त्यावर सविस्तर उत्तरे देणे आवश्यक आहे. तेवढा वेळ नसेल (कारण ते प्रचंड बारीक तपशिलवार लिहीतात.) तर किमान मुख्य एक-दोन मुद्द्यांवर रितसर संवाद करावा. (आत्तापर्यंतचे जोशींचे ॲटीट्यूड बघता त्यांना असेही मान्य असावे) On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.

In reply to by पिगी

On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.
सहमत आहे. कथित पुरोगामी लोकांचा (extreme right सारखाच असलेला) एकांगी हेकेखोरपणाची जोड, ज्यांना बदलण्याची इच्छा आहे त्यांच्याशी संवाद नाकारणे, extreme right विचारसरणीस साहाय्यकारी होते.

In reply to by पिगी

यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात.
वास्तविक मिसळपाववर बरेच लेखक अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, तार्किक, सयंत, शुद्ध भाषेतील, तसेच संतुलित इ इ लिहित असतात. यातलं एकही विशेषण मला लागू होत नाही. मी फक्त टाईमपास म्हणून लिहित असतो. जालावर लिहिताना तुम्ही कुठेही मधेच तुमचा प्रतिसाद खुपसू शकता हे अशा फोरमचं अडव्हांटेज आहे. हेच प्रत्यक्ष बोलणं चाललं असतं तर मी बावरून साईडला उभा राहिलो असतो. आपल्यासारख्या तटस्थाचं मनोरंजन व्हावं असाच उद्देश ठेवून मी लिहित असतो.

न हि द्न्यानेन सदृशं पवित्रं ए विदयते - आवडले श्रद्धावान लाभते ज्ञानं - न आवड्लेले आता खरे तर काहीही लिहिणार नव्हतो तरीही - जून महीना आहे. पश्चीम भारतात एक जागी चार जण बसलेले आहेत . चारही जन तापल्या उन्हात बसलेले आहेत . आकाशात एक ही ढग नाही . शुद्ध तर्क वाला - ( अॅण्ड आणि ऑर गेट चा फरक समजणारा ) - अहो तीच्र ताप आहे तरीही अचानक ढग येणे ५० टक्के शक्य आहेच ना ! विश्वास वाला - जून आहे , प भारत आहे उन असले म्हणून काय झाले पाउस येइल . अभ्यास वाला -माझा मोबाईल सांगतोय ढग अगदी मुंबई पर्यंत सरकत आहेत इतर घटक जुळले तर पाउस पडेल . श्रद्धा वाला - निसर्ग ( देव शब्द मुद्धाम काटला आहे ) इतका निर्दय नक्कीचं नाही . पाउस जरूर पडेल . असो सूद्न्यास अधिक काय सांगावे ?