गाडीवरची पाटी
परवा गावातल्या परसूआबाचे दाजी जे मुंबईला असतात ते आले होते. दाजीसाहेब मुंबईला पोलिसात मोठ्या हुद्यावर आहेत. चारचाकिने संपुर्ण परिवारासोबत ते आले होते. असाच परसुआबाला भेटायला गेल्यावर त्यांची भेट झाली. गाडित बसुन मुंबईला परत जायची त्यांची तयारी चालली होती. अचानक माझी नजर गाडिच्या काचेला आतुन लावलेल्या पीवीसी पाटीवर गेली. त्या पाटीवर मोठ्या लाल अक्षरात पोलिस असे लिहले होते. मला खुप विचित्र वाटलं. तुमच्या खाजगी प्रवासात, जेव्हा तुम्ही कामावर (ड्युटीवर) नाहीत तेव्हा तुम्हाला तुमच्या नोकरीच्या हुद्याची पाटी लावुन फिरावेसे का वाटावे?
शहरात गेल्यावर मला बर्याच गाड्यांवर पोलिस, आर्मी, डिफेन्स, इत्यादि असे नावे लावलेली दिसतात. या सगळ्यामागे त्याना त्यांच्या नोकरीचा अभिमान असावा हे कारण असु शकते. पण याव्यतिरिक्तही काही उद्देश असु शकतो का? असा मनात विचार येतो. जसे 'पोलिस' हे नाव लावल्याने त्याना विशेष वागणुकीची अपेक्षा तर नसावी? जसे गाडीवर अँबुलंस असे लिहिले असेल तर त्या गाडीला सगळ्यानी वाट करुन द्यावी असा नियम आहे. तसं काहीसं अपेक्षित असावं का? रस्त्यावर चालणारी सारीच वाहने वाहन कर भरुन चालवली जातात. त्यामुळे तुम्ही पोलिस, आर्मी, डिफेन्स लिहुन काही अतिरिक्त कर भरुन विशेष अधिकार प्राप्त करतात काय? असा सवाल मनात येतो. बरं सरकारने स्वतः तुम्हाला तसे वाहन दिले आणि त्यावर तुमचा हुद्दा लिहिला तर आपण मानु शकतो कि याना काही विशेष अधिकार आहेत. पण उगाच आपण आपल्या हाताने अशी नावे टाकण्यात काय अर्थ आहे. पण असो, तुम्ही लाखो रुपये खर्चुन गाड्या विकत घेतात म्हणजे तो तुमचा खाजगी प्रश्न आहे कि त्या गाड्यांवर तुम्ही काय लिहावे आणि काय नको.
अजुन असे बरेच प्रकार बघण्यास मिळतात. जसे, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, अध्यक्ष, भावी आमदार, इत्यादी. आमच्या गावच्या सरपंचाने मागे जुनी अँबेसेडॉर विकत घेतली आणि लगोलग गाडीवर "सरपंच, खवचटवाडी बु." नावाची पाटी लावुन घेतली. हे बघुन सरपंचाचा सालदार आणि माझा परममित्र काभ्या (खरं नाव कारभारी) याने उस्फुर्तपणे सरपंचाच्या म्हशीच्या पाठीवर सफेदीने "सरपंच, खवचटवाडी बु." लिहीलं आणि गावभर म्हशीला फिरवलं. सार्या गावात हश्या झाला. काभ्याला बिचार्याला काही कळत नव्हतं. सरपंचाने त्याला बोलावून कामावरुन काढुन टाकलं.
तुम्हाला ह्या पाटी लावण्याच्या प्रकाराबाबत काय वाटते? राग येतो? चांगलं वाटतं? काहीच वाटत नाही? जरुर कळवा.
वर्गीकरण
वाचने
5351
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
राग येतो.... वांझोटा. शहरांमध्ये तर नगरसेवक (?) हे त्यांच्या गाड्यांवर नगरसेवक हे बिरूद लावून शहराचे राजे असल्यासारखे अथवा रस्ते यांच्या तीर्थरुपांचे असल्याप्रमाणे वावरत असतात. गाडीवर वाघाचे चित्र काढलेले अथवा एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा लावलेले अनेकजण टोलनाक्यावर हुज्जत घालताना आढळतात.
बेक्कार म्हणजे लै च बेक्कार राग येतो.. मग आम्ही डोळे लावतो.. थोड्या वेळात समाधीत जातो.. .. ह्या अश्या पाट्या लावणाऱ्यांना एका मोठ्या पोत्यामध्ये बांधून घेतो.. मग ते पोते आमच्या गोठ्यामागच्या अंधाऱ्या खोलीत नेवून आधी लाईट लावतो ( आपल्याला तर दिसले पाहिजे ना...) मग एक लै मोठ्ठा ओला बांबू घेतो... तो चांगला तासून घेतो...तो पर्यंत ते पोत्यातले बेणं कोकलत असते ....मजा येते.. मग त्या बांबूचा एक फटका रापकन बसतो त्या पोत्यावर ... ते बेणं किंचाळते ....तरी आम्ही मागे हटत नाही....असे साधारण एक तास खच्चून मार खाल्ल्यावर ते पोत्यातले बेणं म्हणते कि माझे वाल्मिकीकरण करा ...मग आम्ही त्याला आमच्या साइडला करून घेतो.. आणि मग हे असे प्रश्न मिपा वर विचारणाऱ्यांना म्हणतो..." जस्ट चिल ..आपण कशा कशाचा त्रास करून घ्यायचा? द्या सोडून "!!!
रस्त्याला बर्याच वेळेला कट मारने , दाबने, असे प्रकार घडतात , ते होऊ नये म्हणून हे लोक आपली अश्या प्रकारे ओळख दाखवीत असावेत.
१. टोल भरावा लागत नाही.
२. मन मानेल तिथे पार्क करता येते.
३. रस्त्यातुन जाता येताना दिशानिर्देश पाळणे याची जबर्दस्ती नसणे.
४. फुकटचा रोब झाडता येतो. अरेरावीचे परमीट मिळते.
५. रुटीन हॉटेल्/ढाब्यावर स्पेशल आणी नॉर्मल रेट्ला (बर्याचदा फुकट) ट्रीट्मेंट मिळणे.
तत्सम काही कार्य करावयास मिळतात.
एखादा हुद्दा /नोकरी मिरवावेसे वाटू शकते. मलातरी काही गैर वाटत नाही. ते मिरवून अरेरावी वर्तन करणं मात्र चुकीचं.
'मी मोठा..माझ्याकडे आदराने बघा' हेच ह्या मंडळीना सुचवाय्चे असते असे ह्यांचे मत. पूर्वी सरकारी अँबेसेडर गाड्यांवर पुढे बाण असत.वर केशरी वा लाल दिवा. तेच सुचवायचे असते.
मोदी सरकारने गाडीवर लाल दिवा लावून मिरवण्याची आणि रहदारीत सवलत मिळवण्यची प्रथा रद्द केली. त्या ऐवजी यूपी सारख्या राज्यात हूटर वाजवत गाडी फिरवण्याची आणि मिरवण्याची प्रथा निर्माण झाली आहे असे ऐकले. आता हा पर्याय बंद व्हायला किती दिवस लागतील ?
एकंदर पाहता असे दिसते कि जवळपास सगळ्यानांच ह्या गोष्टीचा त्रास होतो, जर कोणी विशिष्ट वागणुक मिळावी ह्या हेतूने अशी नावे टाकत असतील. हूटरचा प्रकार पहिल्यांदा ऐकतोय. गावाकडे यायला वेळ लागेल बहूतेक हूटरला!
पोलीस चे काय घेऊन बसलात काही दिवस मागे एका नो एन्ट्री वरून समोरून गाडी आली. वर त्या महिला ड्रॉयव्हरची अपेक्षा कि मी माझी गाडी बाजूला घेऊन वाट करून द्यावी. मी अजिबात हलले नाही. तर हि महिला बाहेर आली. दोन महिला कदाचित catfight करतील म्हणून बघ्यांचा घोळका जमला.
"गाडी वर लिहिलेले दिसत नाही का ? " तिने विचारले. मी पहिले तर नंबर प्लेट वर "काँग्रेस महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष" असे काही तरी लिहिले होते. "अहो अश्या वागणुकीमुळेच तुमच्या पक्षाला सगळीकडे माती खायला पडत आहे. अशीच अरेरावी सुरु राहिली तर तुम्हालाच तोंड लपवून फिरावे लागेल" मी असे म्हणताच बघ्यांनी अक्षरशः टाळ्यांचा पाऊस पाडला. तिने रागाने फोन केला आणि काही मिनिटांनी पोलीस दाखल झाले. "म्याडम च म्हणणं बरोबर आहे बाई, तुम्हीच wrong बाजून आला आहात" असे त्यांनी सांगताच त्या महिलेचा पार आणखीन वाढला. काही लोकांनी फोन बाहेर कडून रेकॉर्ड करायाला सुरु करतंच ती गुपचूप गाडीत बसून रिवर्स घेऊन पळून गेली.
थोड्क्यात काय तर लायकी असो नसो आपला हुद्दा मिरवून इतरांना कमी दाखवण्याचा हा प्रयन्त आहे. पूर्वी पेशवाईत म्हणे काही विद्वान ब्राह्मणांना दिवसा मशाली घेऊन पालखी नेण्याचा अधिकार होता. हा तसाच प्रकार आहे. हे आधुनिक सवर्ण आणि आमच्या तुमच्या सारखे साधारण करदाता म्हणजे अस्पृश्य असे त्यांना भासवायचे होते.
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
आणी शेवटचा पॅरा.....अय्या तिकडची धुणी ईकडे का बरे आणताय. तिथलं तेल पाणी संपल का?
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
साहना जी आपण एकदम बरोबर केलेत.
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
सही किस्सा..
ह्या केस मधे दोन्ही पुरूष असते तर काय झाले असते :)
राग येतो...