Skip to main content

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

लेखक यनावाला यांनी शनिवार, 07/10/2017 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! " " गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?" " अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले. " गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो. मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले, " असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?" " शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला. " शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते. " वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !" ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता." " रागावू नका. मी सत्य तेच सांगितले." " आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले. सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. ****************************************************************

वाचने 90529
प्रतिक्रिया 285

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी आपला मुद्दा अंधश्रद्धांची वर्गवारी अशा स्वरुपात येतो. खर तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखे आहे. सश्रद्ध व अश्रद्ध या दोन्ही कडे अतिरेकी प्रवृत्तीचे लोक आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) नुकतेच डॉ मिलिंद वाटवे यांच्या विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावरील व्याखानाला गेलो होतो. त्यात त्यांनी अंधश्रद्धा टिकून राहण्याचे कारण त्याची उपयुक्तता हा मुद्दाही मांडला होता. जिज्ञासूंनी सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान हे प्रकरण ही वाचावे.

In reply to by पिलीयन रायडर

बाबा आमटे पुल ही मंडळी नास्तिक म्हणता येईल अशा विचारश्रेणीची होती. पण त्यांच नास्तिक्य समाजाला खटकल नाही. कारण ते इतरांच्या अस्तिक्याला डिवचणार नव्हत. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. नास्तिकांचीही वर्गवारी करावी लागेल. नुस्त नास्तिक म्हणून चालणार नाही. देवाला न मानणारे आणि देवाला शत्रू मानणारे तसे देवाला मानणार्‍यांना शत्रू मानणारे यात फरक केला पाहिजे. आम्ही तर देवाला मानत नाहीच पण तुम्ही मानत असाल तर तुम्ही मूर्ख अंधश्रद्धाळू अज्ञानी सनातनी निर्बुद्ध अशा विशेषणांना पात्र आहात हे वारंवार दाखवून देणे हे अस्तिकांना खटकत. तुम्ही अस्तिक असा नास्तिक असा अज्ञेयवादी असा नैतिक असा म्हणजे झाल अशी भूमिका घेतली तर सगळ्यांना बरोबर घेता येते. खाली एक दुसरा प्रतिसाद चिकटवत आहे कारण चर्चा त्याच त्याच असतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टिंब मधे जातात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अत्यंत उत्कृष्ट व संतुलित प्रतिसाद! काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. या वाक्यांना पुष्टी देणारी अनेक वाक्ये या लेखात आहेत. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. लेखातील वरील वाक्यातून लेखक असे दाखवून देत आहे की श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ. आणि मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करतो, मी बुद्धीप्रामाण्यवादी, तुम्हाला सुधारायची जबाबदारी माझ्यावर आहे इ. इ. आपण काहीतरी महान कृत्य करीत आहोत असा आव आणून एक काल्पनिक कथा रचून लेखकाने लेख टाकून श्रद्धावाल्यांची हेटाळणी केली. परंतु काही थोडे अपवाद वगळता इतर सर्वांनी लेखाची व लेखकाची पिसे काढल्यानंतर लेखकाने कोणतेही स्पष्टीकरण न देता धाग्यावरून काढता पाय घेतला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ.
कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाणार्‍या लोकांसाठी कठोर विशेषणांचा वा उपायांचा एका हद्दीपर्यंत स्वीकार्य मानायला हरकत नाही. व्यक्तिशः मला वैज्ञानिक दृष्टीकोनाचं आजचं नि भविष्यातलं स्वरुप हे धार्मिक दृष्टिकोनापेक्षा भयंकर घातक वाटतं. इथे कुणाच्याही विचारशक्तीला काहीही झालेलं नाही मात्र फॅशन पाळायची आणि होलिस्टिक विचार करायचा नाही हा चॉइस दिसतो. ===================== बाय द वे, यनावाला, त्या विचारशक्ती बधीर दत्तभक्ताला त्याची प्रॉपर्टी मला दान करायचं सांगता का जरा? बुद्धी विचार आणि तर्क यांच्या बाबतीत त्यांची अवस्था पाहून हे अवघड नसावं. आणि नसलात तर तुमची करा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद आवडला. एका वाक्यात मात्र थोडासा बदल करेनः म्ही मूर्ख अंधश्रद्धाळू अज्ञानी सनातनी निर्बुद्ध अशा विशेषणांना पात्र आहात हे वारंवार निर्बुद्धासार्खे बरळत राहणे हे अस्तिकांना खटकत

In reply to by पिलीयन रायडर

लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.
त्याच वेळी स्त्रीयांचे पोटासाठी, चोचल्यांसाठी, हौसेसाठी, देहासाठी वा स्वतःचे स्वातंत्र्य म्हणून वेश्या बनण्याचे समर्थन करेन, मांसाहारासाठी दररोज कारखान्यांत प्राण्यांचे जीव जात असतील त्याला पाठींबा देईन? ते सगळं देवदासी आणि बळी यांच्यापेक्षा फिजिकली वेगळं नाही, नास्तिकांचं त्याच पापांचं व्हर्जन आहे, आणि त्याला धर्माचं लेबल नाही म्हणून सोईचं आहे. धर्माचं कवच काढलं की सगळी पापं कशी आधुनिक दिसतात!! कायदेशीर!!! ============================ मंदिरात जाऊन पाया पडण्यावर घेतलेलं ऑब्जेक्शन हेच अस्तिकांवरचं सर्वश्रेष्ठ ऑब्जेक्शन आहे.

In reply to by arunjoshi123

एका वाक्यातून इतके (विपरीत) अर्थ काढण्याचं तुमचं कसब माझ्याकडे नाही बुवा. देवदासींना ऑब्जेक्शन घेतलं पण वेश्या व्यवसायाला समर्थन आहे वगैरे.. अहाहा!! पाया पडण्याविषयी मी इतका काथ्याकुट करणार नाही ह्यातून पाया पडण्याला माझं समर्थन आहे वगैरे अर्थ काढले नसतील अशी अपेक्षा. पण काढलेत तरी चालेल. बाकी तुम्ही कशावरही ऑब्जेक्शन घ्या, त्याला सर्वश्रष्ठ म्हणा, काय फरक पडतो? तुम्ही कोण लागुन गेलात वगैरे वगैरे.. आणि हाच मुद्दा आहे. असो.. आपले मोनोलॉग सुरु होऊ देत!

In reply to by पिलीयन रायडर

एका वाक्यातून इतके (विपरीत) अर्थ काढण्याचं तुमचं कसब माझ्याकडे नाही बुवा. देवदासींना ऑब्जेक्शन घेतलं पण वेश्या व्यवसायाला समर्थन आहे वगैरे.. अहाहा!!
तुमची स्वतःची भूमिका काय आहे यावर माझा प्रतिसाद नव्हता. प्रतिसाद आपल्याला उद्देशून आहे हा भाग वेगळा, त्यामुळे माझं मत तुमच्या विचारांवरच आहे असं वाटणं साहजिक आहे, ते मला मान्य आहे. मी एक सामान्य निरिक्षण मांडलं - भौतिक स्वरुप तेच असलेल्या गोष्टि जेव्हा धर्माच्या नावाने होतात तेव्हा पुरोगामी विरोध करतात, अन्यथा करत नाहीत हा दांभिकपणा आहे. लैंगिक स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य या नावांखाली पुरोगामी लोकांत जेव्हा देवदासी आणि बळी हे प्रकार होतात तेव्हा ते राजरोसपणे खपतात, त्यांना आधुनिक मानण्यात येतं, ते पुरोगाम्यांच्या रडारवर नसतात हा मी मांडलेला छोट्टासा मुद्दा आहे. हे माझं जनरल समाजातलं निरिक्षण आहे. ===================================================== तुमची व्यक्तिगत मतं कशी चूक आहेत हे सिद्ध करण्यात मला काही रस नाही. ती गैर, अवाजवी आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. "तुम्ही" हा माझ्या प्रतिसादाचा विषय नाही. ======================= अंततः पुन्हा सांगतो, तुमच्या विधानाचा तुम्हाला अभिप्रेत नसलेला कोणताही अर्थ काढण्याची मला इच्छा नाही. नसते. दॅट इज नॉट हाऊ आय आर्ग्यू. ज्या विचारसरणींस ते लागू आहे त्यांनी प्रतिवाद करावा.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर तुम्ही अगदी परफेक्ट लिहले आहे. शब्दाशब्दाशी सहमत.
पुन्हा आत्मा, पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी असे काही प्रकार असतील असं मला वाटत नाही.
नेमके हे सगळेच खोटे ठरल्याने फार मोठी मौज आयुष्यातून निघून गेली आहे हे मात्र खरे! आता पुढचा जन्म पक्ष्याचा नाही किंवा ८४ लक्ष जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून ईश्वरत्त्वात सामावणे नाही. छ्या बुवा! गंमतीचा भाग सोडला तर बाकी चर्चेत बहुतेक लोकांचा सूर म्हणतोय तसे, तर्ककर्कश नास्तिक आणि तर्ककर्कश आस्तिक, दोघेही, तुमचा फक्त वेळ वाया घालवतात, बाकी काही नाही.

यान्ना वालाल्ला, अहो हे आस्तिक अन नास्तिक (त्यात आता अज्ञेयवादींची भर), मूर्तिपूजक अन मूर्तिभंजक इत्यादी इत्यादी हि त्याचीच लीला आहे हो ! तो मस्त आपल्या मध्ये भांडणे लावून मजेत बघतो आहे. तुम्ही कशाला त्रास करून घेता आणि इतरांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करता? जस्ट चिल.

In reply to by चामुंडराय

तो मस्त आपल्या मध्ये भांडणे लावून मजेत बघतो आहे. तुम्ही कशाला त्रास करून घेता आणि इतरांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करता? जस्ट चिल. त्यांचा दोष नाही. कदाचित, त्यानेच त्यांची (त्यांच्या नकळत) भांडणांचे कॅटॅलिस्ट म्हणून निर्मिती केली असेल. ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यान्ना वालाल्ला कॅटॅलिस्ट कॅटॅलिस्ट हा रिअक्शन चा वेग वाढवतो मात्र तो प्रत्यक्ष त्यात भाग घेत नाही, अलिप्त असतो. या धाग्यावरची यान्ना वालाल्ला यांची अलिप्तता बघता ते नक्कीच कॅटॅलिस्ट असावेत :). त्यांचा, त्यानेच, त्यांची, त्यांच्या च्या गुंत्यात अडकलेला परंतु प्रयत्नपूर्वक अर्थ समजावून घेतलेला चामुंडराय....

In reply to by चामुंडराय

कॅटॅलिस्ट हा शब्द मी हेतूपुर्रसर वापरला होता. कारण यनावाला, नेहमीच, लेखाची काडी टाकून आस्तिक-नास्तिकांत वादविवादाची सुरूवात करून देतात आणि स्वतः मात्र... जर प्रतिसाद वाचत असले तर, अलिप्तपणे मजा पाहत राहतात; प्रतिसाद वाचण्याचीही तसदी घेत नसले तर बहुदा पुढच्या काडीच्या तयारीला लागत असावेत ;) . लेखावरच्या वादविवादाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही असेच त्यांच्या प्रतिसाद न देण्याच्या तटस्थ वृत्तीवरून दिसते =)) =))

लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.+++१११ इतकं मुद्देसूद मांडणी करून लिहायला कधी येणार कुणास ठाऊक? व्यक्तिगत आयुष्यात​ कठीण प्रसंगी देव भले करेल म्हणुन कायम प्रयत्नशील असलेला भोट. (दिवंगत सहचरीचा देवावर असिम श्रद्धा होती आणि माझा तिच्यावर ठाम विश्वास)

In reply to by नाखु

लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही ... +१ काम्य भक्ती किंवा अडचणीच्या काळात आर्ततेने केलेली उपासना ही गौंण मानली जाते. अडचणीत असलेले लोक मार्केटिंगच्या भूलथापांना सहज बळी पडतात, त्यामुळे 'अमुक दिवशी अमुक तत्व जास्त असते' अशा प्रकारचे मार्केटिंग अलीकडेच सुरू झाले असावे. हा थोडासा इतर मुलांपेक्षा अमुक एका ब्रँडचे फूड सप्लिमेंट घेणारा मुलगा उंच, चपळ, हुशार वगैरे असतो असे दाखवण्यासारखा किंवा अमुक एका संस्थळावरून ठराविक उत्सवी कालखंडात वस्तु खरेदी केल्याने त्या स्वस्तात मिळतात असा आभास निर्माण करण्यासारखा काहीतरी प्रकार आहे. अशा गोष्टी फारश्या सत्य नसल्या तरी बर्‍यापैकी निरूपद्रवी असतात. व्यक्तीपरत्वे ज्या धारणा असतील त्याप्रमाणे त्या कुणाला कमीअधीक प्रमाणात खटकू शकतात. टोकाच्या धारणा असलेल्या एखाद्या साम्यवाद्याचा/ समाजवाद्याचा एखाद्या ईकॉमर्स संस्थळाच्या इन्डियन फेस्टिवल सेलवर अशाच धाटणीचा लेख आला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. असो

In reply to by नाखु

लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही ... +१ काम्य भक्ती किंवा अडचणीच्या काळात आर्ततेने केलेली उपासना ही गौंण मानली जाते. अडचणीत असलेले लोक मार्केटिंगच्या भूलथापांना सहज बळी पडतात, त्यामुळे 'अमुक दिवशी अमुक तत्व जास्त असते' अशा प्रकारचे मार्केटिंग अलीकडेच सुरू झाले असावे. हा थोडासा इतर मुलांपेक्षा अमुक एका ब्रँडचे फूड सप्लिमेंट घेणारा मुलगा उंच, चपळ, हुशार वगैरे असतो असे दाखवण्यासारखा किंवा अमुक एका संस्थळावरून ठराविक उत्सवी कालखंडात वस्तु खरेदी केल्याने त्या स्वस्तात मिळतात असा आभास निर्माण करण्यासारखा काहीतरी प्रकार आहे. अशा गोष्टी फारश्या सत्य नसल्या तरी बर्‍यापैकी निरूपद्रवी असतात. व्यक्तीपरत्वे ज्या धारणा असतील त्याप्रमाणे त्या कुणाला कमीअधीक प्रमाणात खटकू शकतात. टोकाच्या धारणा असलेल्या एखाद्या साम्यवाद्याचा/ समाजवाद्याचा एखाद्या ईकॉमर्स संस्थळाच्या इन्डियन फेस्टिवल सेलवर अशाच धाटणीचा लेख आला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. असो

ओरिजिनल पेक्षा बाटगे कट्टर असतात, व त्यांनीच हिंदू धर्म सुधारायचा ठेका घेतलाय. तिरंगा मधला ठराविक भाग यांनी वेगळा वाटून घेतलाय.

भावना मूर्तीमध्ये नसतात, माणसात असतात. त्या माणसाच्या भावनेला आडून हात घालण्याने त्याला दुखावण्यापेक्षा काहीही सध्या होत नाही. देवत्वसुद्धा त्या मूर्तीत नाही तर त्या व्यक्तीच्या मनात, त्याने त्या देवाला मनोमन बहाल केलेल्या स्थानात असते. श्रद्धांबद्दल म्हणाल तर खुपश्या श्रद्धा आपण सगळेच बाळगून असतो मग तो आस्तिक असो कि नास्तिक. भारताची बॉर्डर, चलन, (इव्हन बिटकॉईन्स ) घड्याळाच्या काट्यावर मोजलेली वेळ, विषुववृत्त- कर्कवृत्त -मकरवृत्त हे सगळे श्रद्धेवरच आधारलेले आहेत अर्थात ते मान्यता मिळलेले असल्यामुळे आपण त्याला ''डोळस श्रद्धा '' म्हणू शकतो. भारतातील लोकांना बांधव मानणे (इतर देशवासियांना नाही?) हे पण तर श्रद्धेवरच तर आधारलेले आहे. एखादा भाऊ मानतो त्याचप्रमाणे इतर काही देव मानतात. (खरं तर इथे मानणे हा शब्दच 'मानणे आणि असणे' यातला फरक सांगतोय). वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि फीलिंग्स / beliefs चा तर फारसा संबंधच नाही. काही नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना . शास्त्रीय दृष्ट्या असे काही (देव वगैरे ) सिद्ध व्हायची शक्यता आजच्या घटकेला तर जवळजवळ नाहीचे, कधीच तो सिद्ध झाला नाही. मग जे सध्या नाहीये किंवा कधीच नसणार आहे असे वाटण्याच्या आजच्या फीलिंग्समुळे त्याच्या भूत-भविष्य-वर्तमानकाळातील असण्या-नसण्यावर भाष्य करण्यापेक्षा देव मानणे किंवा न मानणे हे फक्त लोकांच्या (आस्तिकांच्या आणि नास्तिकांच्या) फीलिंग्स आणि beliefsशी निगडित आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. जेंव्हा हे नास्तिकाला आस्तिक (किंवा vice-versa) व्हावेसे वाटेल तेंव्हा त्याने ते स्वतः विचार करून व्हावे. आस्तिकता असो किंवा नास्तिकता (किंवा मधले काही ) कोणावरही लादले जाऊ नये आणि इतरांच्या स्टॅन्ड मुळे दुसऱ्यावर ते मानायचे बंधन येऊ नये असे मला वाटते. मात्र आस्तिक लोकांची कर्मकांडे खूपदा दुसर्यांना त्रासदायक ठरतात यावर त्यांनी नक्कीच विचार करावा. जैन- बुद्ध धर्मात देवपूजा नाही तरी ते आंबेडकरांना , गौतम बुद्धांना दैवत्व बहाल करतात, म्हणजे त्यांचे विचार follow करतच नाहीत. देवाच्या नावाचा business वेगवेगळ्या प्रकारे सुरूच राहतो, कोट्यवधी देव आणि त्याची मंदिरे यांचा अवाढव्य खर्च. एवढे करून एका तरी ठिकाणी त्यांना शांती मिळते का याचा विचार करावा. धर्माच्या नावावर सुरु असलेल राजकारण, बुवाबाजी, प्रथा-रीती , गुरु करणे आणि दहशतवाद वगैरे जगजाहीरच आहे, हा सगळाच भावनेचा business आहे. तो बदलायला हवा पण त्याचबरोबर नास्तिकांचा वादासाठी घातलेला वाद हाही अट्टाहासच दर्शवतो. अर्थात नास्तिकांपेक्षा आस्तिक विचारसरणीच्या अतिधार्मिक लोकांचा त्रास आपल्याला नेहमीच जास्त होत आला आहे हे मान्य. त्यामुळे आपली आस्तिकता किंवा नास्तिकता आपल्या स्वतःपुरतीच असणेच इष्ट. त्यामुळे : '' स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.'' हे तुम्ही सांगितलेले सर्व ज्याच्या त्याच्या इचछेनुसार कुवतीनुसार घेतील, घ्यावे.

In reply to by सप्तरंगी

पहिले दोन परिच्छेद सोडून उरलेला प्रतिसाद पटला.
काही नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना .
यात जरा गोंधळ आहे. उद्या मी म्हणालो मी एका नवीन मूलद्रव्याचा शोध लावलाय. हे मूलद्रव्य पाहिजे तो आकार धारण करू शकते. त्याला मर्यादा नाही. त्याचा एक अणू हा कधी एका आकाशगंगे इतका विशाल असू शकतो तर कधी न मोजता येण्याइतका लहान असतो. या मूलद्रव्याचे नाव मी "अराजक" ठेवतो. तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील. मी का मानतो हे मूलद्रव्य आहे आणि कशा प्रकारे त्याची सिद्धता करतो हे प्रयोगाने सिद्ध करावे लागेल. आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये. उद्या कोणी समाज "वांग" आमच्यासाठी देवासमान आहे म्हणाले आणि ते खाणारे सगळे आमच्या भावना दुखावत आहेत म्हणाले तर तुम्ही काय कराल? भावना वांग्यात नाही पण त्याला देव मानणाऱ्या लोकात आहेत म्हणून सोडून द्याल? वांग्याला देव मानणे वेडगळ वाटत असेल ना? मग दगडाला देव मानण्याबाबत काय म्हणाल? टीप: मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते. मंदिरे नसावीतच असे माझे म्हणणे नाही पण तिथेच देव आहे म्हणून जावे किंवा माझ्या इच्छा आकांशा पूर्ण करून घ्याव्यात म्हणून जावे असे पण नाही. त्यामुळे ठराविक दिवशीच जावे असे काही करावे लागत नाही. पण पुढच्याची उपेक्षा केल्याने त्याची अशा गोष्टींवर विचार करण्याची इच्छा देखील मरू शकते, त्यामुळे तुच्छ कोणाला लेखू नये वाटत.

In reply to by शब्दबम्बाळ

मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते.
तुम्हाला केळाचा रंग आवडतो. भूक नसताना तुम्ही ते खाता. त्यातलं आहारतत्त्व तुम्हाला मान्य नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये.
एखादी गोष्ट आहे असं, तुमच्या पद्धतीप्रमाणे कधी/कसं/कशाच्या आधारावर्/कसोटीवर मानतात, म्हणतात? मंजे अस्तित्व कसं सिद्ध करतात?

In reply to by शब्दबम्बाळ

तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील.
विज्ञानात या अराजक तत्त्वाला सिंग्यूलॅरिटी म्हणतात. तुम्ही म्हटलेत तेच गुण आहेत त्याचे. (तसे त्याही पेक्षा वाह्यात आहेत पण ते असो.) त्याचा काहिही पुरावा नाही. शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते. त्यामानाने अस्तिक "विरोधाभासांबद्दल" इतके विसंगत आणि आग्रही नाहीत.

In reply to by arunjoshi123

वांगे आणि दगड हे सोडून बरे लिहिलंत, असो!
शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते.
मनू नका ना मग, सोप्प आहे! पण मग ते नक्की काय आहे हे तुम्ही शोधू शकता आणि नवे नियम सिद्ध करू शकता कोण अडवतंय! गंमत म्हणजे इथे तुम्हाला जे वाटलं ना तेच बऱ्याच लोकांना देवाच्या बाबतीत पण वाटत आणि मग बुद्धी नको म्हणते! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमचे सर्वच प्रतिसाद अतिशय सुंदर आहेत. त्यातील तर्कयुक्तता तर भावतेच पण ते मजेदारही आहेत. असे क्वचितच जुळुन येते. शिवाय तुमच्या आयडी नावाच्या फ़ारच विरोधी ही पण एक गंमतच आवडले तुमचे सर्व प्रतिसाद ब्रिलियंट !

In reply to by शब्दबम्बाळ

मूलद्रव्य सिद्ध करून पुराव्यासकट दाखवावे लागेल. नुसते आहे म्हणून चालणारच नाही. अर्थातच ते सिद्ध होईपर्यंत ते अस्तित्वात नव्हतेच असेही म्हणता येणार नाही, मूलद्रव्य असण्याचा पुरावा नव्हता एवढेच म्हणता येईल. देवाच्या बाबतीत लोक तेवढे हुशार आहेत, किमान आस्तिक माणूस तरी पुरावा शोधायच्या फंदात पडणार नाही. आजतादात निरनिराळ्या ताकदी, गुणवैशिष्ट्ये देत त्या त्या काळातील गरजांनुसार माणसाने नव-नवीन देवांची , धर्मांची निर्मिती केली आहे. उद्याच्या अजून वेगळ्या गरजेनुसार अजून नवीन देव निर्माण होऊच शकतात. अस्तित्वात असलेल्या वांग्याला बहुतेक कोणी मानणार नाहीत कारण पण त्याची पॉवर दाखवताना अडथळे येतील. देव मान्यता मिळालेला आहे , सध्यातरी वांगे त्याची बरोबरी करू शकत नाही:)

In reply to by सप्तरंगी

देवाच्या नावाचा business वेगवेगळ्या प्रकारे सुरूच राहतो, कोट्यवधी देव आणि त्याची मंदिरे यांचा अवाढव्य खर्च. एवढे करून एका तरी ठिकाणी त्यांना शांती मिळते का याचा विचार करावा. धर्माच्या नावावर सुरु असलेल राजकारण, बुवाबाजी, प्रथा-रीती , गुरु करणे आणि दहशतवाद वगैरे जगजाहीरच आहे, हा सगळाच भावनेचा business आहे.
देव नावाचा बिझनेस नगण्य आकाराचा आहे. "अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.

In reply to by arunjoshi123

याबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा. लिंक्स द्या.
"अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.

In reply to by सप्तरंगी

भावना मूर्तीमध्ये नसतात, माणसात असतात.
भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.

In reply to by arunjoshi123

तुम्ही काहीही म्हणा रसायन किंवा भावना मूळ अर्थ बदलत नाही. काहीही पाहून, वाचून, समजून घेऊन वगैरे जे भाव, विचार create होतात त्या भावना. त्या भावना नसल्याशिवाय तुम्ही इतके सगळे रिप्लाय देणार नाही, यावर अजून एक नवीन धागा / विडंबन वगैरे नक्कीच करणार नाही.
भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.

In reply to by सप्तरंगी

https://experiencelife.com/article/emotional-biochemistry/ नास्तिक झाल्यावर भौतिकतेच्या पलिकडे काहीही नाही असं मानावं लागतं.

In reply to by सप्तरंगी

सप्तरंगी जी, आपल्या सबंध लिखाणाशी सहमत आहे! योग्य आणि चांगले मत मांडले आहेत. जैन- बुद्ध धर्मात देवपूजा नाही तरी ते आंबेडकरांना , गौतम बुद्धांना दैवत्व बहाल करतात, म्हणजे त्यांचे विचार follow करतच नाहीत. व्यक्तीचे दैवतीकरण विचारांना संपवणारे असते आणि हे समाजासाठी खूप त्रासदायक ठरणार आहे!

नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना +१ नास्तिक असणे मान्य आहे पण आस्तिकद्वेष्टेपण हे करंटेपण अजून काय ! आस्तिकांच्या भावविश्वाची कधीच बरोबरी होऊ शकणार नाही. त्यांचे विशेषतः कला क्षेत्रातील योगदान केवळ ते आस्तिक होते म्हणूनच इतके महान आहे. कलात्मक मंदिरे, संगीत रचना, काव्य, नृत्य, पाकशास्त्र, हस्तकला, अलंकार यात असलेले असीम वैभव यांचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर या भावविश्वात बुडी मारणे हा एकच मार्ग आहे. क्षणभर का होईना 'भावाने' ओले व्हावे, मग जा हवे तर आपल्या जगात. स्वबुद्धीला मान्य नसेल तरी काही गोष्टी करून पाहाव्यात मी तर म्हणेन...आपल्यासारखे नसणाऱ्यांविषयी मद आणि मत्सर मूलक भावना केवळ स्वतःचेच नुकसान करतील. किंवा फायदा तरी नक्कीच चुकवतील...

In reply to by समर्पक

नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना +१
याविषयी कुठेतरी ऐकले होते की आपल्या नास्तिकतेवर अशा लोकांची इतकी श्रध्दा असते की त्यापुढे हजारो आस्तिकांची श्रध्दा फिकी पडेल :)

श्रीगुरुजी,
असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे.
Sad but true. पूर्वी या विधानाशी मी असहमत होतो. पण आधुनिक विज्ञान आणि पुंजवाद यासंबंधी यनावालांचं मौन कानठळ्या बसवणारं आहे. इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही. डोळ्यांस दिसेल ते खरं समजणं ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही.
विज्ञानाचं अज्ञान असणं नास्तिक असण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे.

अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते.
ही त्यांची श्रद्धा झाली. तसे अन्य दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्ट ( डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन) ला पुरोगामी विज्ञानवादी विवेकवादी व समविचारी लोकांची ताकद सहस्त्रपटींने वाढते हे देखील खरे आहे अशी आमची श्रद्धा? आहे

मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal).
लेखकांनी बहुदा डॅनिएल कॅनेमन आणि डॅन एरिअली यांची पुस्तके वाचलेली दिसत नाहीत :)
श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते.
साफ अमान्य. आपण समजतो तितके तर्कनिष्ठ आपण (म्हणजे सगळेच-- त्यात आस्तिक आणि नास्तिक दोन्ही गट आले) अजिबात नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर्कनिष्ठतेचा अभाव आपल्याऐवजी इतरांमध्ये आहे हे आपल्याला लगेच जाणवते :) आणि मग त्यामागचे कारण श्रध्देचा भडीमार वगैरे दिले जाते. त्यात अगदी अजिबात अर्थ नाही. पण असले काहीतरी बोलले की आपण फार मोठे शास्त्रीय दृष्टीकोन असलेले किंवा विज्ञानवादी असा आव मात्र आणता येतो.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यनावालांसारखे कठोर नास्तिक लोक समाजात आवश्यक देखील असतात. त्यामुळे समाजाला एक गती येते. कठोर सश्रद्धतेतुन सामूहिक वेडाचार करणारे लोक कायद्याला वेठीस धरतात. त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि. अशा धारणेतून ते लिहित असतात. प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे त्यांना शक्य नाहि हे आपणही जाणतो. त्यामुळे ते ब्रॉडकास्ट स्वरुपाचे लेखन करतात. त्यांच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद पहाता हे लेखन अनेकांना किमान विचार करायला तरी भाग पाडते असे म्हणता येईल. टोकाचे सश्रद्ध आहेत म्हणून त्याला समायोजित करायाला टोकाचे अश्रद्ध आहेत, नमो भक्त व नमोद्वेष्टे जसे आपण सोशल मिडियावर पहातो तसे. जणु काही मधलि काही भानगड नश्शे! असो

In reply to by प्रकाश घाटपांडे

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यनावालांसारखे कठोर नास्तिक लोक समाजात आवश्यक देखील असतात. त्यामुळे समाजाला एक गती येते. कठोर सश्रद्धतेतुन सामूहिक वेडाचार करणारे लोक कायद्याला वेठीस धरतात. त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि. अशा धारणेतून ते लिहित असतात. प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे त्यांना शक्य नाहि हे आपणही जाणतो. त्यामुळे ते ब्रॉडकास्ट स्वरुपाचे लेखन करतात. त्यांच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद पहाता हे लेखन अनेकांना किमान विचार करायला तरी भाग पाडते असे म्हणता येईल. टोकाचे सश्रद्ध आहेत म्हणून त्याला समायोजित करायाला टोकाचे अश्रद्ध आहेत, नमो भक्त व नमोद्वेष्टे जसे आपण सोशल मिडियावर पहातो तसे. जणु काही मधलि काही भानगड नश्शे! असो कठोर किंवा मृदुमुलायम नास्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले नास्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत. कोणत्याही नास्तिकांमुळे समाजाला गती आल्याचे पाहण्यात नाही. समाज आपल्या गतीने हालचाल करीतच असतो. जेव्हा हालचाल करायची असते तेव्हा समाज हालचाल करतो आणि जेव्हा स्वस्थ बसायचे असते तेव्हा समाज स्वस्थ बसतो. त्याला नास्तिकांची किंवा आस्तिकांची गरज नाही. सामूहिक वेडाचार हा कठोर सश्रद्धतेतूनच येतो असे नाही. तो अश्रद्धतेतून सुद्धा येतो. सामूहिक वेडाचार हे सामूहिक गुन्हेगारीचे कृत्य आहे. त्याचा श्रद्धेशी संबंध नाही. यनावालांच्या लेखातून कठोर प्रहार वगैरे काही नसून फक्त आस्तिकांची हेटाळणी व स्वतःची लाल केलेली आहे. असले लेख कायमच बूमरँग होतात. हा लेखसुद्धा बूमरँग झाल्यामुळे यनावाला कोणालाही उत्तर न देता निघून गेले आहेत. जर प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे शक्य नसेल तर असले लेख लिहून स्वतःची लाल करण्याची गरज काय? आस्तिक नास्तिकांना पटेल असा देवाचा अनुभव देऊ शकत नाहीत. मग आस्तिक व नास्तिकांमध्ये फरक काही नाही कारण दोघेही एकमेकांचे समाधान करू शकत नाहीत. त्यांचा धागा वाचून कोणीही विचारात पडले असेल असे मला वाटत नाही कारण हा लेख म्हणजे कोणतेही वैचारिक लेखन नसून निव्वळ दांभिकपणा आहे. ज्यांनी हा लेख लिहिला त्यांनी आधी स्वत:च्या आयुष्यात विज्ञानवादी व्हावे आणि नंतर जगाला फुकटचे सल्लामृत पाजावे.

In reply to by श्रीगुरुजी

कठोर किंवा मृदुमुलायम नास्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले नास्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत. वरचे वाक्य मी बदल करून लिहून वाचतो.. (जरी मला वाक्य पटत नसले तरीही...) जिथे नास्तिक शब्द वापरला तिथे आस्तिक वापरावा आणि जिथे आस्तिक शब्द वापरला तिथे नास्तिक वापरून पाहावा.. म्हणजे खालीलप्रमाणे - कठोर किंवा मृदुमुलायम आस्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले आस्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत... भारतात साधारणत: ४० च्या आसपास टीव्ही चॅनल्स २४*७ देव आणि धर्म यावर आधारित आहेत. शिवाय १-२ अपवाद वगळता न्यूज चॅनल्स कोणत्याना कोणत्या देवाची आरती दाखवत असतात.. त्यानंतर आजचे भविष्य सांगणाऱ्याची रीघ! हे सर्व आस्तिकजन इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे मास लेवलवर सल्ले देत आहेत असे मानायचे का? आस्तिक नास्तिकांना पटेल असा देवाचा अनुभव देऊ शकत नाहीत. .....दोघेही एकमेकांचे समाधान करू शकत नाहीत. तुमच्या सर्व प्रतिक्रियांपैकी (प्रतिसादांपैकी नव्हे..) केवळ या प्रतिक्रियेचा मात्र मी मनापासून आदर करतो. तुमचे वरील वाक्य पटण्यासारखे आहे.

In reply to by Duishen

भारतात साधारणत: ४० च्या आसपास टीव्ही चॅनल्स २४*७ देव आणि धर्म यावर आधारित आहेत. शिवाय १-२ अपवाद वगळता न्यूज चॅनल्स कोणत्याना कोणत्या देवाची आरती दाखवत असतात.. त्यानंतर आजचे भविष्य सांगणाऱ्याची रीघ! हे सर्व आस्तिकजन इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे मास लेवलवर सल्ले देत आहेत असे मानायचे का?
आपला देश चालवणे = शेजारच्या देशावर हल्ला करणे असं श्रीगुरुजी म्हणत नाहियेत. हा लेख दुसर्‍या देशाचं आक्रमण या स्वरुपातला आहे, असं म्हणायला लागणारे निकष इथे लागू आहेत.

त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि.
कठोर नास्तिकांच्या कळपात कठोर अस्तिक अमान्य असतो. त्याला कुत्र्यासारखं हुस्कावून लावतात. रेडीट वरचा अथेइझम सबरेडिट गरजूंनी ट्राय करावा.

यनावाला महाशयांना काहीतरी सकारात्मक बदल करायचा आहे. वैज्ञानिक दृष्टीकोण , असे काहीतरी करायचे आहेत म्हणताहेत ते. त्यांना असे का वाटते की असे केल्याने जगाचे कल्याण होईल? खरतर जगात कुणी काही ही कितीही केले तरी चांगले आणि वाईट यांचे द्वंद्व म्हणजे द्वैत सदोदीत असणारच. नव्हे ते आहेच. वाईट नष्ट करता येणार नाही. कारण मुलतः वाईट, वाईट नसतेच. ते आपण म्हणतो , मानतो म्हणुन वाईट. वाईट सापेक्ष आहे. चांगले नसेल तर वाईट नसणारे. आणि वाईट नसेल तर चांगले नसणारेय. म्हणजेच काय तर दोन्ही ही अस्तित्वात होते, आहेत आणि असणारेत. इतिहास पहा. तथाकथित पुराणे पहा. रामकृष्ण ही आले गेले...पण जग बदलले का? नाही बदलले. बरोबर ना? चला तुम्हा नास्तिकांना राम कृष्ण नकोयेत तर तुम्ही सांगा एखादे नाव की ज्यामुळे जग बददले आहे. सर्वत्र सुख शांती समाधान आले आहे. आठवा ....आणि सांगा.. . . . . . . नाही ना सांगता येत? इतिहासाचे अवलोकन करा..तर्क वापरा आणि सांगा समाज बदलला आहे का कधी? . . . . . . नाही बदलला. समाज बदलला नाही हे चिरंतन सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे तरी तुम्ही का म्हणुन समाजास बदलण्यासाठी एवढा आटापिटा करताय? तुम्ही हा उपदव्याप करताय कारण तुम्हाला आशा आहे की समाज बदलेल. प्रयत्न करने तुम्ही सोडीत नाही कारण तुमची श्रध्दा आहे समाज बदलेल. श्रध्दावंत ते दत्त भक्त असतील नसतील माहीत नाही. पण तुम्ही पक्के श्रध्दावंत आहात. झणभर असे मानले की तुम्ही समाज बदलण्यासाठी लिहित नाही, तर मग लिहिताय कशासाठी? दत्तभक्त किती अज्ञानी आणि मी किती ज्ञानी असे काही तरी मिरविण्यासाठी? की तुमच्या सारख्याच अन्य नास्तिक लोकांकडुन शाब्बाशीची थाप पाठीवर मारुन घेण्यासाठी? की तर्क फक्त तुम्हालाच माहीती आहे, भक्तांना तर्क माहीत नाही हे दाखवण्यासाठी? तीन पैकी कारण काही ही असले तरी ही तुम्ही श्रध्दावंतच ठरता...म्हणजेच काय तुम्ही श्रध्दावंतच आहात. आणि तुमची श्रध्दा अशी आहे की तुम्ही समाजामध्ये चांगले (चांगले - वाईट सापेक्ष आहेत, सुरुवातीची वाक्ये पुन्हा वाचा.) बदल करणार आहात. अस्तु...

In reply to by हेमंत ववले

जग बदलणे इतकी मोठी उडी यनावालांची नसावी बहुतेकं. ( वर श्री घाटपांडे काकांनी म्हटल्याप्रमाणे) काही थोड्या चालीरीती/रूढीमध्ये बदल होणे इष्ट आहे हे brodcast करण्याइतपतच त्यांचा इरादा दिसतो. आणि बदल तर होतच आले आहेत. कालची संस्कृती, रीतीरिवाज, भाषा, बोलणे - वागणे, पेहराव आज नाहीत. बदल हा निसर्गनियम आहे. तो घडतोच . कोणी अडवू शकत नाही त्याला. फक्त थोडासा nudge दिला तर तो सुरळीत आणि लवकर घडतो. आणि हो, ' त्याविण जग का ओसचि पडले?' असे म्हटले तरी रामकृष्णांचे अवतारकार्य थांबत नाहीं. आपल्याविना जग ओस पडत नाही हे जाणूनही त्यांचे अवतारकार्य थांबत नाही. (इथे यनावाला आणि राम कृष्ण यांना समान मानण्याचा अजिबात उद्देश नाही. गैरसमज नसावा. )

In reply to by राही

जग बदलणे इतकी मोठी उडी यनावालांची नसावी बहुतेकं.
पण असल्या एकूण उड्यांची संख्या महत्त्वाची आहे. ============ स्वतःचा पाय न मोडून घेणे, कोणाच्या अंगावर पडून त्याला न दुखवणे, काही न तोडणे, हे ही महत्त्वाचं.

In reply to by हेमंत ववले

तुम्ही हा उपदव्याप करताय कारण तुम्हाला आशा आहे की समाज बदलेल. प्रयत्न करने तुम्ही सोडीत नाही कारण तुमची श्रध्दा आहे समाज बदलेल. श्रध्दावंत ते दत्त भक्त असतील नसतील माहीत नाही. पण तुम्ही पक्के श्रध्दावंत आहात.
जग बदलणार नाहीच हि एक श्रद्धा आहे. म्हणून यनावाला श्रद्धावंत नाहीत. - इति त्यांचे वकील.

मी आस्तिक का नास्तिक हे मला ठाऊक नाही. मी ते जाणून घ्यायच्या फंदातही पडत नाही. बरेचसे लोक मला नास्तिक म्हणतात.. काही लोकांना हे माहितेय की मी वर्षातून एकदातरी आमच्या कुलदैवताला जातोच जातो... ते लोक हा धागा पकडून मला आस्तिक 'म्हणतात... मी सगळ्यांनाच " यू आर राईट " म्हणतो... " मी आस्तिक आहे.. " असं बोंबलणार्‍यांइतकेच " मी नास्तिक आहे " असं बोंबलणारेही गोंधळलेले असतात.....

तुमचा लेख मायक्रो पातळीवरून मॅक्रो पातळीकडे जातो. या सर्व बाबी आंतरसंबंधित आहेत. यातील मला शेवट महत्त्वाचा वाटला .... माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. मला तरी असे जाणवले की हा शेवट गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मुळातून आणि व्यक्ती(गत) पातळीवर बदल घडवणे आवश्यक आहे असे आपल्याला मनापासून वाटते. खूप जणांना पचवण्यासाठी अवघड आहे कारण व्यक्ती(गत) पातळीवर अनेक संस्कारांचे मिश्रण वागणुकीतून दिसते. शिवाय धर्म आणि देव या संकल्पना खाजगी असूनही त्या सार्वजनिक पद्धतीने मिरविण्याची संस्कृती रुजली आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये जे विविध निकष लावले जातात (आरोग्य, शिक्षण, जीवनमान इ.) - त्यात असे दिसून आले आहे की ज्या देशात (उदा. नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड इ.) नास्तीकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे मानवी विकास निर्देशांक पण (इतर देशांच्या तुलनेत) चांगला आहे. देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदात संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत.

In reply to by Duishen

देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात.
जागतिक महायुद्धं युरोप चर्चच्या अधिपत्याखाली होता तेव्हा झाली कि सेक्यूलर , धर्मनिरपेक्ष सत्तांखाली होता तेव्हा झाली? ज्या रेसेसना युरोपिय लोकांनी संपवलं, मिलियन्सनि मारलं त्यांना न मारता ख्रिश्चन करून घ्यावं अशी चर्चची भूमिका होती. ==================== लोकांचा गैरसमज वाढेल अशी विधानं करू नयेत. ====================================== देव धर्माच्या कत्तलींमधे राजकारण्यांनी केलेले हायजॅकिंग वजा करायला पाहिजे. मंजे अगदी २००२ चे दंगे पण अधार्मिक मानावे लागतील काही विभक्तांना.

In reply to by Duishen

(उदा. नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड इ.)
सोयीच्या उदाहरणाचं उदाहरण. अमेरिका आणि चीन याच जगात आहेत. त्यांच्यात जास्त लोक आहेत म्हणून ती जास्त सुयोग्य उदाहरणे असतील. ---------------- यांच्यातला सर्वात मोठा ऑस्ट्रेलिया, आणि त्यांची लोकसंख्या = भारताची १ वर्षाची लोकसंख्यावाढ. ----------------------------- सौदी अरब समोर देखिल हे देश टुच्चे आहेत. एच डि आय मधे सौदी अरब खूप अग्रगण्य आहे. ============================== सर्वात जास्त श्रद्धा आणि विकास यांचा ग्राफ प्लॉट केलात तरी कोरिलेशन तेच येतं. तो प्लॉट करणारा कोण ते महत्त्वाचं!!! ================================================
शिवाय धर्म आणि देव या संकल्पना खाजगी असूनही त्या सार्वजनिक पद्धतीने मिरविण्याची संस्कृती रुजली आहे.
देव आणि धर्म खाजगी आहेत? कसं ठरलं म्हणे हे? =================================================
किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
घटनाकारांना विज्ञानाच्या मर्यादा माहित नव्हत्या. असत्या तर त्यांनी एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगून दुसरिकडे सर्वांना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले नसते.

In reply to by arunjoshi123

नास्तिकता ही लोकसंख्येची मोजतात शासन व्यवस्थेची नाही...त्यामुळे चीनचे उदाहरण लागू पडत नाही.तरीसुद्धा माहितीस्तव चीन एच. डी.आय. च्या एकूण १८८ देशात ९१ व्या क्रमांकावर आहे. अमेरिका ही नास्तिकांची आहे हा मोठा अपसमज आहे.. तरीसुद्धा माहितीस्तव ... अमेरिकेत पश्चिकडील राज्यात नास्तिकता वाढत आहे आणि तिथे एच. डी.आय. चांगला आहे जेंव्हा की दक्षिणेकडील राज्यातील एच. डी.आय. त्यांच्या इतर राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. सौदी 3८ व्या क्रमांकावर आहे. देव आणि धर्म खाजगी आहेत? कसं ठरलं म्हणे हे? जर देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल, स्थितप्रज्ञता मिळवणे असेल तर ते एकांतात होऊ शकते, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन शक्य आहे. एकांत सामाजिक कसा असू शकतो!? स्व-देव आणि स्व-धर्म विधी सामाजिक बनवून कदाचित इतरांवर श्रेठत्व गाजवता येऊ शकते पण स्थितप्रज्ञता मिळू शकत नाही. मला देवाशी लीन व्हावयाचे म्हणून मी उपवास करणे योग्य / ध्यान करणे योग्य पण मी करतोय म्हणून घरातल्यांनी केलेच पाहिजे / समाजातील लोकांनी केलेच पाहिजे या भूमिकेत काही देवपण राहत नाही. एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगून दुसरिकडे सर्वांना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले नसते. कदाचित 'वैज्ञानिक दृष्टीकोन' या शब्दाची व्याख्या आपण खुप अगम्य / वेगळ्या पद्धतीने करीत असणार....

In reply to by Duishen

नास्तिकता ही लोकसंख्येची मोजतात शासन व्यवस्थेची नाही.
असं मानूनच उत्तर दिलं आहे. शिवाय मोर नंबर ऑफ टूच्चड पॉप्यूलेशन्स लाइक नॉर्वे डोन्ट मेक सेन्स. प्लॉट बिग नेशन्स, तिथले नास्तिक टक्केवारी आणि विकासांक टूगेदर.
देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल
हा एक हेतू असेल. एकमात्र नाही. शिवाय हा एक हेतू कंपल्सरी अजिबातच नाही.
जर देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल, स्थितप्रज्ञता मिळवणे असेल तर ते एकांतात होऊ शकते, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन शक्य आहे. एकांत सामाजिक कसा असू शकतो!?
समाजात एकांत नसतो म्हणजे समाज नास्तिक आहे? --------------- आदिवासी धर्म जास्त चांगले अध्यात्मिक असतात का? ------------------- शास्त्रज्ञ देखील जंगलात गेले पाहिजेत. त्यांना पण लागणारा एकांत समाजात कसा मिळेल? एकांत आणि समाज हे विरोधी शब्द ना!?
स्व-देव आणि स्व-धर्म विधी सामाजिक बनवून कदाचित इतरांवर श्रेठत्व गाजवता येऊ शकते पण स्थितप्रज्ञता मिळू शकत नाही.
वारकरी संप्रदायाबद्दल आहे का हे? सुफी संतांबद्दल?
मला देवाशी लीन व्हावयाचे म्हणून मी उपवास करणे योग्य / ध्यान करणे योग्य पण मी करतोय म्हणून घरातल्यांनी केलेच पाहिजे / समाजातील लोकांनी केलेच पाहिजे या भूमिकेत काही देवपण राहत नाही.
केलेच पाहिजे असे नको या तत्त्वाला अपवाद फक्त यनावाला सारख्या नास्तिकांचा! ========================================== लोक धार्मिक असण्याचा आग्रह अत्यंत सुयोग्य आणी आवश्यक आहे.

In reply to by arunjoshi123

शिवाय मोर नंबर ऑफ टूच्चड पॉप्यूलेशन्स लाइक नॉर्वे डोन्ट मेक सेन्स. प्लॉट बिग नेशन्स, माफ करा! हे इंग्रजी वाक्य मराठीत दिल्यामुळे अर्थ लागत नाहीये! कदाचित शब्दोच्चार पद्धती वेगवेगळी असू शकेल... हा एक हेतू असेल. एकमात्र नाही. शिवाय हा एक हेतू कंपल्सरी अजिबातच नाही. इतर हेतूबाबत जाणून घ्यायला आवडेल. समाजात एकांत नसतो म्हणजे समाज नास्तिक आहे? माझे असे मत नाही. एकांताची संकल्पना ऋषी-मुनींनी व्यक्तिगत उदाहरणातून समोर ठेवली. एकदा ज्ञान प्राप्ती झाली की यातील बरेच समाजात परतले आहेत पण तत्पूर्वी त्यांनी एकांत मिळवला आहे हे नक्की! आदिवासी धर्म जास्त चांगले अध्यात्मिक असतात का? अध्यात्मिक असतात की नाही हे माहिती नाही पण धर्माच्या नावाने तिथे गोंधळ आणि श्रेष्ठत्व आणि हिंसा नाही हे नक्की. पण बदलत्या काळात त्यांचे जीवन आपण मनात असलेल्या धर्म आणि संकृतीने ढवळून निघते आहे. वारकरी संप्रदायाबद्दल आहे का हे? सुफी संतांबद्दल?. माझ्या डोळ्यासमोर ९० च्या दशकातील रस्त्यावरचे नमाज आणि रस्त्यावरच्या महाआरत्या अशा प्राथमिकतेने समोर होत्या. तुम्हाला याची खात्री आहे का असे स्पर्धात्मक वागून दोघांनाही इच्छित अल्लाह किंवा देवाची प्राप्ती झाली असेल! ...आणि जेंव्हा कुणीही आणि कुठल्याही धर्मातील आस्तिक त्याला / तिला वाटणाऱ्या देवाशी लीन होऊ इच्छितो त्याला/तिला कर्मकांडांची गरज भासत नाही. रोजच्या जगण्यातील उदाहरणे पण देता येतील! वारकरी आणि सुफी हे संप्रदाय अश्या कर्मकांडांच्या विरोधातून जन्मले आणि पुन्हा वारकरींची वाटचाल हळूहळू कर्मकांडांकडे होत आहे. लोक धार्मिक असण्याचा आग्रह अत्यंत सुयोग्य आणी आवश्यक आहे. तुमची धार्मिक असण्याची व्याख्या काय?... कदाचित मी धार्मिक असण्याची जी व्याख्या करतोय आणि तुम्ही जी व्याख्या करताय त्यात मुलभूत फरक असू शकेल कारण तुम्ही तुमच्या अनुभवातून बोलताय आणि मी माझ्या...

In reply to by Duishen

आपले सारे प्रतिसाद वाचले. आपण सत-हेतूप्रेरित नास्तिक आहात. म्हणजे निष्कारण सज्जन आहात. असल्या नास्तिकपणाचा विरोध करायची अजिबात गरज नाही. त्याचं (म्हणजे सज्जनपणाचं) लॉजिक विचारायची पण गरज तशी नाही. जोपर्यंत आपण सज्जन आहात, अस्तिक असा नैतर नास्तिक, फरक पडत नाही. पण कोणी दुर्जन असेल तर: १. दुर्जन अस्तिक बांधलेल्या गुंडासारखा असतो. २. दुर्जन नास्तिक सैराट अधमासारखा असतो. दुर्जन नास्तिकाचं डॅमेज पोटेंशिअल दुर्जन अस्तिकापेक्षा हजारो पट असतं. का हा वेगळा विषय आहे. एकूणातच नास्तिक वाढले तर दुर्जन नास्तिक पैदा व्हायची शक्यता वाढते.
इतर हेतूबाबत जाणून घ्यायला आवडेल.
ईश्वर आणि धर्म यांचं काम मनुष्याच्या सिविलाईज्ड, नागरी/सुसंस्कृत जीवनात एक ओवर-आर्किंग, सर्वस्पर्शी फ्रेमवर्क उपलब्ध करून देणे हे आहे.
तुम्हाला याची खात्री आहे का असे स्पर्धात्मक वागून दोघांनाही इच्छित अल्लाह किंवा देवाची प्राप्ती झाली असेल!
ईश्वरप्राप्तिसाठी स्पर्धा करण्यात काय चूक आहे?
वारकरी आणि सुफी हे संप्रदाय अश्या कर्मकांडांच्या विरोधातून जन्मले
धर्मातून , धर्मासाठी जन्मले.
तुमची धार्मिक असण्याची व्याख्या काय?
तुमची नास्तिक असण्याची व्याख्या सोय म्हणून मला द्या. तितकीच परिपूर्ण वा त्रुटी असलेली धार्मिकतेच्ची व्याख्या मी देईन.

In reply to by Duishen

देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदात संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत. काहीही. पूर्ण नास्तिक असलेल्या चीनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली, पूर्ण नास्तिक असलेल्या रशियातील स्टॅलिनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली या देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने केलेल्या कत्तलीपेक्षा कमी होत्या का?

In reply to by श्रीगुरुजी

जात व्यवस्था आणि पितृसत्ताक व्यवस्थेविषयी आपले अनुकूल मत आहे असे वाटत नाही.....अर्थात मी असा समज करून घेतो आहे. चीन आणि रशिया यांच्या अवघ्या ७०-१०० वर्षाची तुलना धर्म आणि समाज इतिहास यांच्या २५००-३००० वर्षांशी होऊ शकेल काय! हिंदू धर्म हा काहींच्या मते ५००० वर्ष जुना तर काहीच्या मते १०००० वर्ष जुना आहे. म्हणजे जात व्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती तितकी जुनी असा निष्कर्ष निघतो! कर्म सिद्धांतांचा मुलामा देऊन जातींची; शील आणि सहनशीलतेचा मुलामा देऊन स्त्रियांची गुलामगिरी ही कत्तलीपेक्षा कमी आहे का! उलट एकवेळेस शारिरीक कत्तल केली तर माणूस संपतो पण शतकानुशतके.आणि पिढी दर पिढी देव आणि धर्माच्या नावावर चालणारी ही 'कत्तल' यथोचित मानावयाची का? कत्तली चीन, रशियामधील साम्यवाद्यानंनी केलेल्या असो किंवा आस्तिकतेच्या नावावर '१०,०००' वर्षापासून झालेल्या असोत त्या नैतिकतेच्या कुठल्याच कासोट्यांनंवर समर्थनीय असू शकत नाहीत.

In reply to by Duishen

हिंदू धर्म हा काहींच्या मते ५००० वर्ष जुना तर काहीच्या मते १०००० वर्ष जुना आहे. म्हणजे जात व्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती तितकी जुनी असा निष्कर्ष निघतो!
धर्माच्या बाबतीत १००००-५०००=५००० वर्षे इतका घोळ होतो. उत्क्रांती कधी झाली हे सांगण्यात थेट ३० कोटीचा!!!!!!!!!!!!! https://www.sciencealert.com/life-on-earth-originated-300-million-years…
उलट एकवेळेस शारिरीक कत्तल केली तर माणूस संपतो पण शतकानुशतके.आणि पिढी दर पिढी देव आणि धर्माच्या नावावर चालणारी ही 'कत्तल' यथोचित मानावयाची का?
याही पुढे जाऊन मी म्हणेन मानवाचं नुसतं असणं हेच त्याच्यावरचा मोठा अन्याय आहे. काय ती भूक, भिती, रोग, त्रास, पर्यावरण, रानटीपणा आहे निसर्गात. नसणे म्हणजे यापासून सुटका. अणुबाँब टाकून मानवता मिटवणारा मानवतेचा एक ज्येष्ठ उपकारकर्ता अशी आपली विचारसरणी असेल. ------------------ अत्यंत गलिच्छ असं नास्तिकतेचं समर्थन.
कत्तली चीन, रशियामधील साम्यवाद्यानंनी केलेल्या असो किंवा आस्तिकतेच्या नावावर '१०,०००' वर्षापासून झालेल्या असोत त्या नैतिकतेच्या कुठल्याच कासोट्यांनंवर समर्थनीय असू शकत नाहीत.
हा मुद्दा नाही. अशा असमर्थनीय कत्तली करोडोनी कुणी केल्या तो आहे.
कर्म सिद्धांतांचा मुलामा देऊन जातींची; शील आणि सहनशीलतेचा मुलामा देऊन स्त्रियांची गुलामगिरी ही कत्तलीपेक्षा कमी आहे का!
लोकशाहीचा, कायद्याचा, भांडवलवादाचा, ह्यूमन रिसोर्सवादाचा, राष्ट्रवादाचा, सर्वलिंगसमभाववादाचा, इ इ मुलामा देऊन होत असलेली गुलामगिरी धार्मिक गुलामगिरीपेक्षा घाणेरडी आहे.

In reply to by arunjoshi123

अरुणजी, चर्चेचा पाया आपला आणि माझा मुळातच वेगळा आहे. माझे मुद्दे हे आस्तिकतेच्या दृश्य भीषण परिणामांचे आहेत जेव्हा की आस्तिकता हीच खरी श्रद्धा मानवाचे जीवन परिपूर्ण करू शकते असे तुमचे मत दिसून येते आहे. शिवाय आपण जी उदाहरणे विज्ञानाच्या नावाने देत आहात ती विविध विषयातील लागलेले शोध याची देत आहात आणि माझे मत हे वैज्ञानिक दृष्टीकोनाशी संबंधित आहे. विज्ञान विषयातील शोध आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वत;ची मांडणी चुकली तर किंवा निकष चुकले तर विज्ञानवाद्यांची तयारी असते त्यात बदल करण्याची... तसे अस्तीकांचे आणि ते मानीत असलेल्या धर्मग्रंथांचे आहे काय? धर्म आणि देव यांच्या व्युत्पत्तीचा इतिहास आपणास ज्ञात आहे हे गृहीत धरतो. कितीजणांना असे वाटेल की वेदामधील नमूद पुरुषसूक्तातील मानवाची व्युत्पती चुकली आणि त्याहूनही भीषण म्हणजे त्या व्युत्पत्तीमधील उच्च-नीच ही भावना चुकली? आजही वेद हे अपौरुषेय आणि सनातन आहेत असेच आस्तीकांकडून मानल्या जाते ना! विज्ञान स्वत:च्या चुका कबूलही करत आणि पुन्हा नवशोधाच्या मार्गाला निघत, कुठलाही धर्म अशी कबुली देईल काय? ...पेक्षा आजही त्याचे समर्थन करील. याच मिपावर दुसऱ्या एका धाग्यात काही उल्लेख हे अजूनही मनुस्मृतीच्या समर्थनार्थ असल्याचे दिसून आले..विज्ञानवादी असे म्हणणार नाहीत की आमच्या वैज्ञानिक भावना दुखावल्या पण आस्तिकांच्या भावना लगेच का दुखतात... अस्तीकातील ही असहिष्णुता मानवी समाजाला मारक की तारक? धर्माच्या बाबतीत १००००-५०००=५००० वर्षे इतका घोळ होतो. उत्क्रांती कधी झाली हे सांगण्यात थेट ३० कोटीचा!!!!!!!!!!!!! पुरावे सापडत गेले त्यामुळे नवीन निष्कर्ष जगाच्या समोर आणला यात चुकीचे ते काय! हा दृष्टीकोन आस्तिक धर्माच्या/ देवाच्या बाबतीत देतील काय.... काय हरकत आहे इथे निर्माण झालेले ग्रंथ आणि देव संकल्पना किती जुनी आहे हा शोध घेतला तर! ...पण त्याऐवजी स्व-श्रेष्ठत्व सांगण्यासाठी ५०००-१००००० असा कालावधी वाढवून सांगितल्या जातो... यातून केवळ अहं सुखावतो आणि त्याचा वापर इतर कनिष्ठ आहेत ये सांगण्यासाठी केल्या जातो! याही पुढे जाऊन मी म्हणेन मानवाचं नुसतं असणं हेच त्याच्यावरचा मोठा अन्याय आहे. काय ती भूक, भिती, रोग, त्रास,... यावर अस्तीकांचे उपाय काय आणि विज्ञानाने दिलेले उपाय काय याचा तुम्ही आसपास शोध घेतला तरी बरे! आस्तीकानी 'दरिद्रीनारायण' अशी गरिबीची भलामण केली तर तिकडे कार्व्हर नावाच्या वैज्ञानिकाने अन्न उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले... रोजच्या जीवनातील सुरक्षितता वाढावी हे वैज्ञानिकांचे प्रयत्न आणि विविध शोध आणि आस्तिकतेच्या अहंते खाली दंग्यांची भीती... अजून बरेच लिहिता येईल.. लोकशाहीचा, कायद्याचा, भांडवलवादाचा, ह्यूमन रिसोर्सवादाचा, राष्ट्रवादाचा, सर्वलिंगसमभाववादाचा, इ इ मुलामा देऊन होत असलेली गुलामगिरी धार्मिक गुलामगिरीपेक्षा घाणेरडी आहे. 'लोकशाहीचा, कायद्याचा, सर्वलिंगसमभाववादाचा' हे तीन मुद्दे सोडले तर माझे तुमच्या इतर मुद्द्यांना समर्थन आहे. भांडवलवाद, ह्यूमन रिसोर्सवादाचा, राष्ट्रवाद यांचेही दृश परिणाम भीषण आहेत. ...पण हो ! तुमचा या संकल्पांना का विरोध आणि माझा का विरोध आहे याचे मुद्दे वेगवेगळे असू शकतील.

In reply to by Duishen

चर्चेचा पाया आपला आणि माझा मुळातच वेगळा आहे. माझे मुद्दे हे आस्तिकतेच्या दृश्य भीषण परिणामांचे आहेत जेव्हा की आस्तिकता हीच खरी श्रद्धा मानवाचे जीवन परिपूर्ण करू शकते असे तुमचे मत दिसून येते आहे.
नै हो. ==================== अस्तिकता, नास्तिकता, प्रत्येकीचे भीषण परिणाम, जीवनाची परिपूर्णता इ इ लक्षात घेऊन निरुपद्रवी नास्तिकवाद सोडला तर नास्तिकवादाच्या सर्व रुपांना माझा कडाडून विरोध आहे. अस्तिकता असो नैतर मरो, विशुद्ध नास्तिकता पृथ्वितलावरून नष्ट केली पाहिजे असं माझं मत आहे.

In reply to by Duishen

विज्ञान विषयातील शोध आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
मी जिथे असं केलं आहे, तिथे सोदाहरण सांगा. मी दुरुस्ती करेन.

In reply to by Duishen

स्वत;ची मांडणी चुकली तर किंवा निकष चुकले तर विज्ञानवाद्यांची तयारी असते त्यात बदल करण्याची... तसे अस्तीकांचे आणि ते मानीत असलेल्या धर्मग्रंथांचे आहे काय?
प्रत्येक धर्मात प्रत्येक तत्त्वावर इतकं चिंतन झालं आहे ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? प्रत्येक धर्मात इतके उपधर्म, संप्रदाय, जाती, इ इ निर्माण झाल्या ते काय बदलाची तयारि शून्य असल्यानं? सगळे धर्म जगात सुखाने एकत्र नांदतात. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? अस्तिकांच्या कितीतरी पिढ्यांच्या जिवनाची शैली विज्ञान, व्यवसाय यांनी बदलली आणि त्यांना ते चाललं. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? अस्तिकांचे खरे दुश्मन नास्तिक. ते आहेत असंच नव्हे तर एक्सपोनेंशिअली वाढत आहेत. पण अस्तिक त्यांना सामावून घेतात. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं?

In reply to by Duishen

विज्ञान स्वत:च्या चुका कबूलही करत आणि पुन्हा नवशोधाच्या मार्गाला निघत, कुठलाही धर्म अशी कबुली देईल काय?
धर्म विश्वात काही ना काही शाश्वत आहे असं मानतात. पण म्हणजे ते चूका कबूल करत नाहीत असं होत नाही. विज्ञान काहीही शाश्वत सत्य म्हणून मांडत नाही. म्हणून काय मी "सज्जनपणे वागणे" ही माझी """"""टेंपररी पोझिशन""""""" म्हणून वागू? सॉरी. ती माझी पर्मॅनंट पोझिशन आहे.

In reply to by Duishen

...पेक्षा आजही त्याचे समर्थन करील. याच मिपावर दुसऱ्या एका धाग्यात काही उल्लेख हे अजूनही मनुस्मृतीच्या समर्थनार्थ असल्याचे दिसून आले..विज्ञानवादी असे म्हणणार नाहीत की आमच्या वैज्ञानिक भावना दुखावल्या पण आस्तिकांच्या भावना लगेच का दुखतात... अस्तीकातील ही असहिष्णुता मानवी समाजाला मारक की तारक?
तुम्ही फ्लेक्सिबल आहात तर मनुस्मृतीवरची नविन चिकित्सा ऐकून घ्या ना. तुमच्याही भावना दुखतच आहेत हे स्पष्ट आहे.

In reply to by Duishen

काय हरकत आहे इथे निर्माण झालेले ग्रंथ आणि देव संकल्पना किती जुनी आहे हा शोध घेतला तर!
वैज्ञानिकांनी कशाचाही शोध घ्यावा, अस्तिकांचं काही म्हणणं नसतं (वास्तविक असायला हवं.). नास्तिकांना अस्तिकांचा एकतर्फी द्वेष असतो. काय किती जुनं आहे (ते असोच, काही होतंच का) याचा भक्कम पुरावा (नास्तिकांचा प्रिय शब्द) मिळत नाही तोपर्यंत भावनिक अंदाज ऐकायची तयारी ठेवा ना.

In reply to by Duishen

यावर अस्तीकांचे उपाय काय आणि विज्ञानाने दिलेले उपाय काय याचा तुम्ही आसपास शोध घेतला तरी बरे! आस्तीकानी 'दरिद्रीनारायण' अशी गरिबीची भलामण केली तर तिकडे कार्व्हर नावाच्या वैज्ञानिकाने अन्न उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले... रोजच्या जीवनातील सुरक्षितता वाढावी हे वैज्ञानिकांचे प्रयत्न आणि विविध शोध आणि आस्तिकतेच्या अहंते खाली दंग्यांची भीती... अजून बरेच लिहिता येईल..
धार्मिक कर्मकांडांमधले सगळे आयटम हटवून जगाची कल्पना करा. विज्ञानाच्या जन्माआधी धर्म पाळायला जे जे काही केलं गेलं त्यापुढे कार्व्हर तुच्छ आहे.