मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवडंबर (कथा)

भास्कर केन्डे · · काथ्याकूट
१. कथा काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्ति वा परिस्थितीशी साम्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. २. तात्या, लेखन प्रकारात "कथा" सापडली नाही म्हणून काथ्याकुटात टाकली आहे. चुक झाली असल्यास कथा योग्य त्या प्रकारात हलवण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती. वार्‍याची हळुवार आलेली झुळूक जशी मावळत्या उन्हात लांबच लांब कललेल्या झाडांच्या सावल्यांना झाडाच्या फांद्यांपेक्षा जास्तच हलवत होती तशीच ती लक्ष्मीच्या तगमगत्या देहावर हळूच गारव्याचा भासही देत होती. नेहमीच वक्तशीर असणारी लक्ष्मी आज उशीर होऊ नये म्हणून धडपडत होती. 'कशाला मी त्या जुनाट ट्रंकेतून या सगळ्या आठवणींच्या गाठोड्याला काढत बसले?' असे स्वगत विचारत ती एकएक वस्तू पुन्हा तीत ठेऊन देत होती. लग्नात माहेरुन आलेला बाळकृष्ण कितीतरी दिवसांनी पाहताना तिला अंमळ चुकल्यासारखे वाटत होते. पेटारा बंद केला पण बाळकृष्णाचा हाताला झालेला स्पर्श बर्‍याच आठवणींना जागा करून गेला होता. काळोख दाटून येऊ लागला तसे लक्ष्मीनं दिवाणखान्यातले व माडीतल्या प्रशस्त खोल्यांचे मंद दिवे लावले. तशी आज तिच्याकडे लोकांची वर्दळही नव्हती. - - - - - लक्ष्मी जीवनात आली अन कालपर्यंतच्या गोरक्याला गाव हळूहळू गोरख म्हणू लागले . आई-बापाची, बायकोची काळजी घेणारा गोरख कष्टाळू होता. बहिनीच्या लग्नातले कर्ज या सालात मोकळे करुन पुढच्या पाडव्याला एखादी बैलजोडी घ्यायच्या जिद्दीनं रानात राब-राब राबत होता. बायको पण पदर कमरेला खोऊन साथ देत होती. म्हातारे आई-बाप होईल तेवढं जनवार-ढोर, खुरपनी, राखनी करायचे. सगळ कसं सुखात चाललं होतं. पण नदीला महापूर काय आला आणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई-बापाला वाचवायला गोरख्यानं पुरात उडी मारली आणी सगळ्यांवरच काळानं झडप घातली. पण मागे उरलेल्या लक्ष्मीला काम मिळालं ते बरं झालं. पोटचा अंकूर रोपटं बनू शकला. पुरग्रस्तांना मदत करायला परदेशातून पैसे आणलेल्या संस्थेने दवाखाना काढला. त्यात लक्ष्मीला काम मिळालं. डॉक्टरच्या हाताखाली काम करता करता, पुढं नर्स झाली. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच संस्थेचा मोठा दवाखाना झाला. तिथं बढती मिळाली. दवाखान्यात व्यवस्थापनाची तसेच धर्मप्रचाराची धुरा मोठ्या नेटाने पुढे चालविली. पुढे संस्थेचा व्याप वाढला. संस्थेनं मोठी शाळा सुरु केली. तिथल्या बर्‍याच जबाबदर्‍या आल्या. पोर सुद्धा मोठं होत गेलं. संस्थेने पुढं त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. चार गावात नाव झालं. हे सगळं मिळवताना लक्ष्मीला काय कमी कष्ट पडले? पण आता हा कष्टाचा रगाडा ओढवत नव्हता. तसेही आजूबाजूच्या गावातल्या अनेक लक्ष्म्यांना पोटापाण्याची भ्रांत होती. त्यातली एक मालन. तिची गरज, तिची गुणवत्ता, हे सगळं बघता ती यापुढे आपली कामे यशस्वी रित्या करील अशी लक्ष्मीची खात्री होती. म्हणूनचा आज तिला लक्ष्मीनं खास बोलावून घेतलं होतं. लेकरांना चांगलं शि़क्षण, रहायला संस्थेची जागा, नोकरी, हे सगळं मिळणार म्हणून मोठ्या आशेनं आलेली मालन दारात वाट पहात उभी होती. ती दिसली तशी लक्ष्मी तिला सामोरी गेली. मालनला नोकरी, पगार, कामे हे सगळं समजाऊन सांगितलेलं होतच. बर्‍याच वर्षापूर्वी त्या पूरग्रस्त गावात तिच्याही जीवनाला अशीच नवी दिशा देणारा असा दिवस उगवला होता. त्यावेळीही असेच या संस्थेत मान असलेले, फादर रोड्रीग्ज कलकत्याहून पूरग्रस्त गावात आले होते. त्यांच्याशी ओळख करुन देऊन झाली. एवढा दीर्घ अनुभव पाठीशी असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सतत नवनवीन उपक्रम राबत राहणे ही त्यांची खासीयत होती. अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले.

वाचने 5802 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by प्राजु

भास्कर केन्डे 12/09/2008 - 02:50
मी प्रथमच कथेला (कदाचित अति) लघुरुप देऊन परिणाम साध्य होतो का हे पहायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रतिसादावरुन तो फसला आहे असे दिसते. बाकी मिपा करांच्या प्रतिक्रिया काय येतात ते बघू. अर्थात पुढच्या कथेची लांबी व ठेवण व्यवस्थित येईल याची काळजी घेईन. आपला, (शिकाऊ) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

प्राजु 13/09/2008 - 03:16
अगदी प्रामाणिक मत असं आहे माझं की, मला हि कथेची प्रस्तावना वाटली.. आणि कथेतील लक्ष्मी आता त्या मालनला तिचे प्रश्न सोडवायला मदत करेल आणि त्याचं म्हणजे तिच्यावर ओढवणार्‍या संकटांचं अवडंबर तुम्ही इथे लिहीणार आहात असाच समज झाला. आणि कथा सुरू कुठे झाली आणि संपली हे नाही समजले. प्रामाणिक मताबद्दल राग नसावा. कथा लक्ष्मीच्या भोवती गुंफलेली असेल तर पूरांत गेलेलं लक्ष्मीचं कुटुंब, घराची वाताहात यांची तीव्रता आणखी दाखवता आली असती. माझा असा समज झाला की, लक्ष्मी आता ज्या दु:खातून गेलेली आहे तीच दु:खे मालन ला भोगावी लागू नयेत म्हणून तीने केलेली धडपड पुढील भागांत असेल. कदचित माझा कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकला असेल. म्हणून मला असे वाटले असावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 12/09/2008 - 04:51
कथानक म्हणून प्रवाह रुद्ध होतो आहे, असे वाटले. (कथानकातले काही तपशील फक्त चिह्नासाठी आहेत, कथेच्या ओघात सामावले नाहीत, असे वाटले.) नवीन साहित्यप्रकार असाच प्रगत करत राहावे. कथानक आणि चिह्ने दोन्ही ओघवती राहिलीत, दोन्ही पातळ्यांवर कथा सहज-परिपूर्ण वाटली तर अधिक मजा आहे. (पैशांनी लालूच दाखवून धर्मांतर झाले, न झाले तरी माझ्या मते काही फरक पडत नाही. [१] पैसे घेऊन धर्म 'बदलणार्‍या'ची आदली धर्मश्रद्धाच सखोल नसते, त्यामुळे त्याचा तो आदला धर्मच नसतो [२] मनापासून समजून-उमजून धर्मांतर केले असेल, तर शिवाय पैसेही घेतले ही बाब केवळ अवांतर आहे, [३] पैसे घेऊन मूळ धर्माविषयीच श्रद्धा ठेवणार्‍या लक्ष्मीचे धर्मांतर मुळी झालेलेच नाही. त्यामुळे तुमचा आशय समजला तरी काही मोठा घात झाला आहे, हा भाव पोचला नाही. मुलाचे धर्मांतर कसे झाले हे सांगता येत नाही - लालसेने, की मुळातच तो त्या वेगळ्या धर्मात वाढला? त्या आईच्या वागण्याचा चांगलाच अर्थ घेणे मला सहज आहे - कुमाता न भविष्यति! यावरून आठवले - लुइझियाना राज्याचे राज्यपाल श्री. जिंदल हे कॅथोलिक आहेत, पण त्यांचे आईवडील हिंदू आहेत. श्री. जिंदल यांचे ख्रिस्तीपण लालसेने झाले की ओघाओघाने - याबद्दल मला माहीत नाही. तुमचे काय मत आहे? [श्री. जिंदल यांच्या स्वतःच्या म्हणण्याचा/मुलाखतींचा दुवा])

In reply to by धनंजय

भास्कर केन्डे 12/09/2008 - 20:21
कथानक म्हणून प्रवाह रुद्ध होतो आहे, असे वाटले. -- स्पष्टोक्तीबद्दल धन्यवाद! मी पण एक त्रयस्थ म्हणून आज पुन्हा कथा वाचली आणी मला सुद्धा हेच जाणवले. १००% मन्य. नवीन साहित्यप्रकार असाच प्रगत करत राहावे. कथानक आणि चिह्ने दोन्ही ओघवती राहिलीत, दोन्ही पातळ्यांवर कथा सहज-परिपूर्ण वाटली तर अधिक मजा आहे. -- पुढील कथेत नक्की प्रयत्न करीन. आपणही असाच लोभ असू द्यावा. आपल्या सारख्यांच्या प्रतिसादाने पुन्हा लिहिण्यास हुरुप येतो. पैसे घेऊन धर्म 'बदलणार्‍या'ची आदली धर्मश्रद्धाच सखोल नसते, त्यामुळे त्याचा तो आदला धर्मच नसतो -- पटले. पण मुळात धर्मांतर करणार्‍यांची सुद्धा ही अपेक्षा नसते. ते मुळात धर्मांतर टप्प्या-टप्प्याने करतात. पहिले - "ग्राऊंड वर्क" करणे जसे की जे काही चांगले काम करत आहोत याची भरपूर प्रसिद्धी देणे. चित्रपट तसेच इतर प्रभावी माध्यमांमध्ये गळ्यात क्रॉस घातलेले हिंदू लोक दाखवने वगैरे (अर्थात हा एक वेगळा चर्चा विषय होऊ शकतो, तुर्तास एवढेच). दुसरे - लक्ष्मी/मालन सारखी धर्मांतरे करुन आणने. हे लोक तसेच कदाचित यांची मुले सुद्धा हिंदू धर्माशी नाळ ठेऊन राहतील परंतू ३-४ पिढ्यात ते पूर्णपणे हिंदू धर्मापासून तुटलेले असतील असे करने. पैसे घेऊन मूळ धर्माविषयीच श्रद्धा ठेवणार्‍या लक्ष्मीचे धर्मांतर मुळी झालेलेच नाही. -- कदाचित तिची पुर्वाश्रमीच्या धर्मावरची श्रद्धा मिशनर्‍यांना सुद्धा चालेल. वर म्हटल्या प्रमाणे त्यांची अपेक्षा भविष्यातल्या पिढ्यांकडून आहे. एकंदरीत, प्रतिसादाबद्दल आभार! आपला, (आभारी) भास्कर

ऋषिकेश 12/09/2008 - 10:55
कथा आवडली .. खरंतर आशय चांगला पण अधिक नेटकी बांधता येईल असे वाटून गेले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

भास्कर केन्डे 12/09/2008 - 20:23
वरील प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे लघु करण्याच्या नादात बरेच राहून गेले व प्रभाव हरवला. यापुढे आपली निराशा होणार नाही यासाठी प्रयत्न करीन. आपला, (स्नेहाभिलाषि) भास्कर

सहज 12/09/2008 - 13:57
धर्मप्रचार, फादर रोड्रीग्ज हे शब्द व लेखक यावरुन एक अंदाज आला होताच :-) धनंजय यांच्या प्रतिसादावरुन अजुन स्पष्ट झाले. ललीत लेखनाचा बाज असला तरी गंभीर चर्चा अपेक्षीत आहे का भास्करराव? :-) स्वतंत्र भारतात अश्या किती लक्ष्मी व मालन आहेत त्यांना त्वरीत शोधून "देशी" धर्मप्रचारकांनी त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे नवे पर्व सुरु करावे ही सदिच्छा! सरकार व "देशी" धर्माला हे आव्हान झेपले नाही तर हे काम आउट्सोर्स होणार हे नक्की. शेवटी माणुस जगला पाहीजे, माणूस आहे म्हणुन धर्म आहे. माणुसच नसेल तर... बाकी कथा संक्षीप्त, नक्की काय अंगाने आहे, काय सुचवायचे आहे, हे नक्की कळत नसल्याने ना धड आवडली म्हणु शकतोय ना धड नावडली. :-(

In reply to by सहज

भास्कर केन्डे 12/09/2008 - 20:42
धर्मप्रचार, फादर रोड्रीग्ज हे शब्द व लेखक यावरुन एक अंदाज आला होताच - - शाल** समजला बरं का! ललीत लेखनाचा बाज असला तरी गंभीर चर्चा अपेक्षीत आहे का भास्करराव? -- लेखन ललीत प्रकारातच ठेवायचे होते. पण चर्चा कोणत्या दिशेने न्यायची हे आपण मायबाप ठरवणार. विषयाला धरुन राहिली म्हणजे मिळवले. काय म्हणता? स्वतंत्र भारतात अश्या किती लक्ष्मी व मालन आहेत त्यांना त्वरीत शोधून "देशी" धर्मप्रचारकांनी त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे नवे पर्व सुरु करावे ही सदिच्छा! --दुर्दैवाने हे शक्या नाही असे वाटते. देशी धर्मप्रचारकांकडे अंगावरील कपडे सुद्धा धड नसतात. विदेशी धर्मप्रचारकांशी त्यांची तुलना कोणत्याच अंगाने होऊ शकत नाही. ना पैसा, ना जागतिक पाठिंबा, ना प्रसारमाध्यमे... काय आहे हो यांच्याकडे? या सगळ्या सोई त्यांच्या मात्र मुठीत आहेत. सरकार व "देशी" धर्माला हे आव्हान झेपले नाही तर हे काम आउट्सोर्स होणार हे नक्की. शेवटी माणुस जगला पाहीजे, माणूस आहे म्हणुन धर्म आहे. --नाही पटत बॉ आपल्याला हे. हे बघा, जर त्यांचा धर्म सेवा करा, प्रेम करा असे सांगतो तर त्यांनी ते खुशाल करावे. आम्हा गरिबांना/पिडीतांना धर्मांतर केल्याशिवाय त्यांच्या गोळ्या-औषधी लागू पडत नाहीत का त्यांच्या तंबूंमध्ये राहिल्यावर महारोग होईल? बाकी कथा संक्षीप्त, नक्की काय अंगाने आहे, काय सुचवायचे आहे, हे नक्की कळत नसल्याने ना धड आवडली म्हणु शकतोय ना धड नावडली. -- आपल्याला तुमचा रोखठोक प्रतिसाद मात्र आवडला बॉ. पुढच्या वेळी याची परतफेड (चांगली कथा देऊन बरं का) करण्याचा प्रयत्न करु. आपला, (प्रयत्नवादी) भास्कर आम्ही येथे वसतो.

प्रभाकर पेठकर 12/09/2008 - 14:11
कथा चांगली आहे. पण महापूरात घरदार, नवरा वाहून गेल्यावर आलेली अगतिकता अधोरेखित झाली नाही. पोटात मुल वाढविण्यार्‍या लक्ष्मीला तिच्या समाजाने हात दिला नाही? (तसे दिसतेच आहे) ती इतकी अगतिक का झाली? कोणी सुखासुखी धर्मांतर करीत नाही. (असं मला वाटतं) एवढ्या मोठ्या बाईच्या मनात मूळ धर्माची वीण फार घट्ट असते. तरी पण ती धर्मांतरास तयार झाली त्या अर्थी तिच्यावर तसेच काही प्रसंग आले असतील. अंधःकारमय भविष्याच्या भेसूर सावल्यांनी तीला घाबरवले असेल. अशा खूप काही गोष्टी असतील. त्या कथेत यायला पाहिजे होत्या. म्हणजे लक्ष्मीची भूमिका अजून स्पष्ट झाली असती. पण लेखकाचा उद्देश मिशनर्‍यांच्या 'काळ्या' कृत्यांना हायलाईट करण्याचा दिसून येतो. त्यामुळे लक्ष्मीचे पुर्वायुष्य, हिन्दू धर्मावरील श्रद्धा, पण नियतीच्या घाल्याने तिचे मानसिक तुटलेपण आणि असहाय्य लक्ष्मीचे दुसर्‍या धर्माच्या दाराशी (स्वतःच्या तत्त्वांच्या विरुद्ध) जाणे ह्या सर्व स्थित्यंतरांकडे दुर्लक्ष झाले आहे. कथा लहान ठेवण्याची इच्छा समजली तरी परीणामकारकतेला बाधा आणण्याइतकी लहान ठेवली आहे. असो. पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by प्रभाकर पेठकर

भास्कर केन्डे 12/09/2008 - 20:55
नमस्कार पंत, नेहमी प्रमाणे आपला प्रतिसाद म्हणजे आम्हाला आवडत्या गुरुजींच्या सल्ल्यासारखा वाटला. पण महापूरात घरदार, नवरा वाहून गेल्यावर आलेली अगतिकता अधोरेखित झाली नाही. --हो, मान्य. येथे परिणामकारकतेत खूपच कमतरता राहून गेली आहे. कथा लहान ठेवण्याची इच्छा समजली तरी परीणामकारकतेला बाधा आणण्याइतकी लहान ठेवली आहे. --१००% मान्य. वरील प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे पुढील कथेत आवश्यकते येवढे शब्द टंकन्याचा आळस करणार नाही :) पुढील लेखनास शुभेच्छा! -- आभार! एक प्रश्न - समजा कथा संक्षिप्त न करता व्यवस्थित लांबीची लिहिली असती जेणेकरुन आपण म्हटल्या प्रमाणे "लक्ष्मीची भूमिका अजून स्पष्ट झाली असती" तर पुढील शेवट कितपत परिणामकारक ठरला असता असे आपल्याला वाटते?... --आज रात्री अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले. --हा "मेसेज" सद्य शेवटामध्ये वाचकांना कळण्याजोगा अधोरेखित झाला आहे का? वरील दोन शब्द टाकून कथेचा प्रकार बदलण्याची शक्यता वाटली म्हणून टाकले नाहीत. आपले मत जाणून घ्यायला उत्सुक. आपला, (चाहता) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

प्रभाकर पेठकर 13/09/2008 - 11:48
श्री. भास्करराव, कथानकात लक्ष्मी आणि लक्ष्मी सारख्या अनंत असहाय्य अबलांचे 'शारिरीक शोषण' अधोरेखित झालेले नाही असे मला वाटते. त्याच बरोबर असाही प्रश्न मनात उद्भवतो की प्रत्येक धर्मांतरीत स्त्रीला 'ह्या' दिव्यातून जावे लागतेच का? कथेच्या परिणामकारकतेसाठी कथानकाच्या विस्ताराची जेवढी गरज आहे त्याहून जास्त तपशीलाची गरज आहे. लेखकाचा उद्देश 'फादर' चे हिंस्त्र रूप दाखविणे आहे, धर्मांतराचे अक्राळ-विक्राळ रूप दाखविणे आहे की हिन्दू धर्मातील अशा धर्मांतराबद्दलची उदासिनता दाखवून देणे आहे (की तिन्ही आहे) ह्यावर विचार करून त्या अनुषंगाने कथा सादर व्हायला हवी असे वाटते.

सर्वसाक्षी 12/09/2008 - 22:31
भास्करराव, कथा थोडी विस्ताराने लिहिली असतीत तर बरे झाले असते. संक्षिप्ततेमुळे तिला 'स्फुट' असे स्वरुप आले आहे. माझ्या मते लक्ष्मीचे धर्मांतर हे कथानकात उशीरा आले आहे असे वाटते. शिवाय आपल्या शैलित धर्मांतरापूर्वीची लक्ष्मिच्या मनाची उलघाल व निर्णय काही निकषाने वा नाईलाजाने झाला हे जाणुन घ्यायला आवडेल. हे मानवतेचे दूत फक्त धर्मांतरीतांनाच का बरे उद्धरतात? लक्ष्मिची एखादी सखी जीने धर्म सोडायला नकार दिला तिचे काय झाले हेही जाणुन घ्यायची उत्सुकता आहे. लवकर लिहिते व्हा, वाट पाहतोय.