Skip to main content

समानता

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 06/11/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
समानता आम्ही(सह कुटुंब आणि सह परिवार) मागच्या वर्षी आमचे पासपोर्ट काढायला पासपोर्ट सेवा केंद्र मालाडला गेलो होतो. आम्हाला वेळ सकाळी ११ ची दिली होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या फाटकाच्या बाहेर १०.५० ला रांगेत उभे राहिलो.आमच्या मागे रांगेत पासपोर्ट काढायला एक मुसलमान माणूस उभा होता. त्याच्या बरोबर त्याची बुरखाधारी बायको, दोन मुली वय वर्षे पाच आणि साडेतीन आणि एक मुलगा वय वर्षे दोन असे उभे होते. त्या माणसाने एक कॅड्बरी( मिल्क चॉकलेट) आणली आणि त्या मुलाला दिली. त्या दोन्ही मुलीनी थोडा वेळ ते मुल कॅडबरी खात होते तेथे पहिले आणि नंतर पाहणे सोडून दिले. त्या दोन निरागस आणि निष्पाप मुलींकडे पाहून माझ्या पोटात कुठेतरी तुटत होते. एक क्षण आपण दोन कॅडबरी आणून त्या मुलीना द्याव्या असेही वाटले परंतु त्या माणसाचा अहं दुखावला गेला असता म्हणून गप्प बसलो. जो माणूस पासपोर्ट काढायला उभा होता त्याला दहा रुपयाच्या दोन कॅडबरी दोन मुलीना देण्यासाठी नव्हते हे तर शक्यच नाही. आश्चर्य म्हणजे त्याच्या बायकोनेही एक चकार शब्द काढला नाही. मी माझ्या बायको आणि दोन्ही मुलांना( मुलगा आणि मुलगी) ते दाखवले आणि सांगितले कि केवळ मुलगा म्हणून त्याला कसे वेगळे वागवले जाते ते पहा. असे करणे किती चुकीचे आहे तेही सांगितले. दुर्दैवाने मी तेथे काहीच करू शकत नव्हतो. तीन दिवसांपूर्वी माझ्याकडे एक उत्तर भारतीय स्त्री तिच्या गरोदरपणाची सोनोग्राफी करायला आली होती. तिच्या बरोबर तिची बहिण, त्या बहिणीची ३-४ वर्षाची गोड मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा सुद्धा आले होते. त्या सर्वाना मी आतल्या खोलीत( जेथे सोनोग्राफी यंत्र आहे) तेथे घेतले. माझ्याकडे आलेल्या सर्व लहान मुलांना मी एक चॉकलेट देतो. ती माझ्या ड्रोवरमध्ये एका बरणीत भरलेली असतात. त्या दोन्ही मुलांना मी एक एक चॉकलेट दिले आणि सोनोग्राफी चालू केली. त्या मुलाने आपले चॉकलेट खाल्ले आणि अजून हवे म्हणून तो रडू लागला. त्यावर त्या रुग्णाच्या बहिणीने(मुलीच्या आईने)त्या मुलीला तिचे चॉकलेट त्या मुलाला द्यायला सांगितले. त्या इतक्या निरागस मुलीने ते त्याला दिले सुद्धा. मला जरा धक्काच बसला. तो "मुलगा" म्हणून लाडावलेलाच वाटत होता. दुसरे चॉकलेट खाल्ल्यावर थोड्या वेळाने त्या मुलाने परत चॉकलेट हवे म्हणून मागणी केली. मी "अजून" चॉकलेट देणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले. त्या मुलाने रडायला सुरुवात केली. मी वैतागून त्याच्या आईला सांगितले कि त्याला बाहेर घेऊन जा. त्याच्या रडण्याने मला डिस्टर्ब होतोय आणि माझी काही चूक झाली तर तुमच्या बहिणीला ते महाग पडेल. त्यावर ती बहिण मुलाला घेऊन बाहेर गेली. मी सोनोग्राफी सुरु केली . मग माझ्या मनात एक विचार आला. मी त्या छोट्याशा मुलीला विचारले, "आपका चॉकलेट तो आपका भाई खा गया ना? आपको चॉकलेट चाहिये?" त्यावर ती घुटमळली. मी तिला एक चॉकलेट काढून दिले. ते ती खिशात टाकणार होती. मी तिला म्हणालो आप अभी ये खा लो. नाही तो आपका भाई फिरसे मांग लेगा. तिला ते पटले आणि तिने ते खाल्ले आणि माझ्याकडे बघून गोड असे स्मित केले. मला पण छान वाटले. मला राहून राहून एक गोष्ट डाचत राहिली कि इतक्या लहान निष्पाप आणि निरागस मुलींवर त्यांचे आईबाप इतक्या सहजतेने अन्याय का करतात. केवळ त्या मुली आहेत म्हणून? आपल्याला समान हक्क मिळाला पाहिजे हि जाणीव त्या बिचार्या मुलींची कलीकावस्थेतच अशी का खुडून टाकली जाते? लहानपणी असेच वागवले गेले असल्याने त्यांच्या आया सुद्धा कदाचित मुलाला मुलीपेक्षा जास्त झुकते पारडे देत असाव्यात. कदाचित यामुळेच मुलीसुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांच्या मनात खोल रुजलेली पुरुष श्रेष्ठत्वाची भावना काढून टाकणे अशक्य होते. स्त्री पुरुष समानता हि लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली पाहिजे तरच पुढच्या पिढीत समानते साठी लढ्याची गरज पडणार नाही.

वाचने 13226
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

अजूनही बर्‍याच स्त्रिया ह्या गरोदर मातांना आशिर्वाद देताना,'मुलगा होऊ दे' असा आशिर्वाद देतात. म्हणजे मूल जन्मायच्या आधिपासूनच हे संस्कार चालू.

पूर्वी जेवणाच्या बाबतीत स्त्रियांवर जेवणाच्या बाबतीत स्त्रियांवर अन्याय व्ह्यायचा . घरातील पुरुष , मुले आधी जेवणार आणि मग उरलेल्यामध्ये बायका जेवायच्या . घरातले दुध , तुप पुरुषांसाठी राखीव असायचे. नॉन व्हेज जेवणामधे सुद्धा बायकांच्या वाट्याला उरले तरच मिळायचे . त्यामुळे कुपोषणाला बळी पडायच्या . सध्या या बाबतीत मॉडर्न घरांमध्ये सुधारणा असली तरी ग्रामीण भागात अजून समानता नाहिये

In reply to by कपिलमुनी

कसली डोंबलाची मॉडर्न घरं... परवाच बावधन मधल्या हाय फाय कुटूंबातली गोष्ट.. कसलासा कार्यक्रम होता. इडली वडा सांबाराचा बेत होता. आधी पुरुषांनी आडवा हात मारला. मग उरलेल्या ४ इडल्या आणि ८ वड्यांमध्ये ७-८ जणी जेवल्या. त्यातही तुम्ही घ्या.. तुम्ही घ्या करत १/२ वडा उरवला. कारण नक्की तो उचलायचा कुणी ही धास्ती... पुरुषांना ह्या गोष्टीचा पत्ताच नाही.. लग्न झाल्यापासुन मी पहिल्या पंगतीला माझ्यामते फक्त अबीर लहान होता तेव्हा एखाद वेळेस बसले असेन.

In reply to by पिलीयन रायडर

अश्या वेळेला डायरेक्ट ३-४ पिझ्झे मागवायचे आणि डिलीव्हरी आली रे आली की त्या घरच्या आधी खाउन नंतर सुस्तावलेल्या गृहपुर्षास पुढे करावे. पुढच्या वेळेला असा प्रश्ण कधीचं येणार नाही ह्याची लेखी ग्यारंटी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

फार्फार धन्यवाद!! मी आता एकदा हे करणारचे.. एका घरात एक चांगलही उदाहरण पाहिलय की बायकांच्या पंगतीला पुरुष वाढत होते. मी सवयीप्रमाणे म्हणलं की मागुन बसते तुम्ही मोठ्या जेवा, तर त्या काकु म्हणाल्या की "अगं बस, बघ आमच्या घरातले पुरुष कसे वाढतात ते." आणि खरंच आग्रह करकरुन वाढलं. अर्थात त्या घरात पुजा झाली की एक काका लगबगीने झाडु घेऊन आले आणि झाडायला लागले.. सकाळची नाश्त्याची मिसळ त्यांच्या भावाने पार मसाला बनवण्यापासुन एकहाती केली होती.. वगैरे वगैरे.. असे अपवाद आहेत.. बरं वाटतं अशा घरात.. उन्हाळ्यात आंब्याच्या रसांच्या पंगती असायच्या.. त्यात लोक वाट्या वाट्या रस टाकुन द्यायचे इतका अघोरी आग्रह व्हायचा.. ताट घेऊन पळायचे काय, लोक त्यांच्या मागे लागायचे काय. पार उलटी होईल अतिजेवणाने इतका आग्रह. आणि त्याच नंतर बायकांच्या पंगतीला वाटीभर रसही रहात नसे. :( म्हणुन मग काही हुषार बायका आपला स्वयंपाक वेगळा (चुलीजवळ उबेला) काढुन ठेवतात. "माझं जेवण काय.. चुलीत.." अशी म्हण तिथुनच आली म्हणतात.

In reply to by पिलीयन रायडर

उन्हाळ्यात आंब्याच्या रसांच्या पंगती असायच्या.. त्यात लोक वाट्या वाट्या रस टाकुन द्यायचे इतका अघोरी आग्रह व्हायचा.. ताट घेऊन पळायचे काय, लोक त्यांच्या मागे लागायचे काय. पार उलटी होईल अतिजेवणाने इतका आग्रह. आणि त्याच नंतर बायकांच्या पंगतीला वाटीभर रसही रहात नसे. :(
बिनकामी आग्रह करणारांचा लै राग येतो. इथे वजनं कमी करतोय त्याची ना दाद ना फिर्याद. "या वयात काहीही खाल्लेलं पचतंय," "तुमच्याएवढे होतो तेव्हा जिलब्यांची परात आणि भाकर्‍यांची चवड खायचो, तुम्हांला काय धाड भरलीय" (परातभर जिलब्या खाऊन मग ओवा किती किलो खाल्ला, झालंच तर दुसर्‍या दिवशी किती लीटरने वजन कमी झाले वगैरे बारीक तपशील सांगत नाहीत लोक अशावेळेस.) "डायट वगैरे नुसती नव्या पिढीची फॅडं आहेत, आमच्यावेळी" एक ना दोन अनेक वाक्ये. अशा लोकांना केळाच्या शिकरणात ग्लासभर कार्ल्याचा ज्यूस घालून त्यात चिंचेच्या कोळासोबत थोडं तिखट घालून दिलं पाहिजे.

In reply to by बाबा पाटील

अगदी अगदी....पिव्वर आयुर्वेदिक आणि पवित्र होईल मग ते सर्वच. हाच काढा रोज मनोभावे घेत जा असा सल्ला दिला पायजे अशा लोकांना च्यामारी.

In reply to by बॅटमॅन

यात किमान चार ते पाच कडुनिंबाच्या निंबोळ्या चेचून टाकणे अनिवार्य ! काढा प्यायलाचा चेहराप्रतीमामुख्चंद्र्परिणाम किमान पुढचे ३-४ दिवस दिसला पाहिजे इतकी मात्र दिलीच पाहिजे ! आग्रह कर-करून फक्त अन्न नासाडीच करणार्या लोकांना जागेवर "फाट्यावर" मारणारा फाटका नाखु

In reply to by बॅटमॅन

प्रकार १:- टाईमपास म्हणुन किंवा उगाच लक्षवेधी शाइनिंग मारु प्रकार करायचे म्हणुन.. उगाच वैताग येईस्तोवर आग्रह.. आणि आग्रह म्हणुनजे हुकुमच.. कुणी विचारलं आणि आपण नाही म्हणलं असं नाहीच.. घ्या म्हणलं की आपण पानात घेतलच पाहिजे ही इच्छा... प्रकार २:- चांगले तिशी चाळीशीचे झाले तरी आपल्याला नक्की किती अन्न लागतं हे अजुनही न समजु शकणारे गाढव लोक. काहीही वाढायला गेलं की "वाढा थोडं" म्हणुन घेत रहायचं आणि सरते शेवटी अर्धं ताट तसंच टाकुन द्यायचं. ह्यांना आपण पान नीट स्वच्छ केलं तर आपल्याला लोक भिकारी समजतील अशी भीती वाटत असावी. ताटात टाकुन दिलं की कसं श्रीमंत माजोरडेपणा दिसतो... ह्या दोघांनाही रट्टे मारायला हवेत..

In reply to by पिलीयन रायडर

दोन्ही प्रकारातल्यांना रट्टे दिलेच पाहिजेत यात शंका नाही. मात्र जास्त त्रास होतो तो प्रकार क्र. १ वाल्यांचा. त्यांना एकतर गोमूत्र किंवा शिवांबुमिश्रित काढा रोज पाजला पाहिजे. =))

In reply to by पिलीयन रायडर

लग्नाच्या पंक्तीत, कोणी गोडाचा अती आग्रह करू लागला तर मी अत्यंत हळू आवाजात त्याला 'मला मधूमेहाचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी गोडाचा विचारही मनांत आणू नकोस असे सांगितले आहे' अशी थाप मारायचो. ९९ टक्के लोकं 'काय बिचार्‍यावर तरूण वयात अशी वेळ आली' असा एक दयार्द कटाक्ष टाकून पुढे जायचे. इथे आल्यावर लग्न, पंगती इत्यादीचा ससेमिरा सुटला पण नविन त्रास सुरु झाला. पार्टी मधून नाचण्याचा. दारू ढोसून झाल्यावर ह्यांच्या अंगात येतं. ढाणढाण संगीत(?) लावायचं आणि वेगवेगळे अंगविक्षेप करीत नाचायचं. मला नाचता येत नाही आणि प्रमाणा बाहेर मोठ्याने लावलेल्या म्युझिक सिस्टमचा मला त्रास होतो. अशा वेळी मी नुसता बसून राहतो आणि निरिक्षण करीत बसतो. कोणी तरी शहाणा मला हाताला धरून ओढायला लागतो आणि तोंडाने 'अरे चल, नाच जरा मजा येते बघ' असा आग्रह असतो. त्याला टाळण्यासाठी 'मला हृदयविकार आहे आणि डॉक्टरांनी नाचायला मनाई केली आहे' असे सांगायचो. मग कोणी आग्रह करीत नाही. (उगीच ह्याला आग्रह केला, हा नाचला आणि कांही अघटीत घडलं तर आपल्या माथी ब्रह्महत्येचे पातक येईल, असा विचार असावा)

In reply to by प्रभाकर पेठकर

छान उपाय. टिपः लग्नाळू मुलांनी हा उपाय करू नये, हकनाक अपप्रसिद्धी होते आणि मोक्याची स्थळे हातची जाण्याचा प्रसंग उद्भवतो.

In reply to by बॅटमॅन

अशा लोकांना केळाच्या शिकरणात ग्लासभर कार्ल्याचा ज्यूस घालून त्यात चिंचेच्या कोळासोबत थोडं तिखट घालून दिलं पाहिजे. च्यायला, मारताय काय?

In reply to by आनंदराव

तुम्ही माझी लुंगी खरेदी हा लेख वाचलाय का? त्यातली लुंगीच्या रंगाची उपमा पुढीलप्रमाणे:
आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर जर एखादं आजारी मांजर ओकलं ' तर कसं दिसेल

मला राहून राहून एक गोष्ट डाचत राहिली कि इतक्या लहान निष्पाप आणि निरागस मुलींवर त्यांचे आईबाप इतक्या सहजतेने अन्याय का करतात. केवळ त्या मुली आहेत म्हणून?
अगदी हेच मनात येते जेव्हा असे प्रसंग मलाही दिसतात आजूबाजूला!
कदाचित यामुळेच मुलीसुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांच्या मनात खोल रुजलेली पुरुष श्रेष्ठत्वाची भावना काढून टाकणे अशक्य होते. स्त्री पुरुष समानता हि लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली पाहिजे तरच पुढच्या पिढीत समानते साठी लढ्याची गरज पडणार नाही.
शत प्रतिशत सहमत!

जौ द्या ना डॉक.. सणवार आलेत.. घरातल्या कर्त्या पुरुषांना तेल लावुन, अंघोळ घालुन, फराळ आणि ताजा नाश्ता हातात देऊन, तासा दोन तासानी झोपेतुन उठवुन परत गोडाधोडाचं जेवण देऊन.. मग काही उरलंच तर एकटं स्वयंपाक्घरात बसुन खाऊन, खरकटं उष्टं काढुन घरासमोर रांगोळ्या काढायला निघायचे दिवस आलेत... तयारीला लागु द्यात...

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई आपण या गोष्टी लक्षात ठेवून जेंव्हा शक्य आहे तेंव्हा त्यावर अंमल करणे शक्य आहे. माझ्या घरी जेंव्हा कोणाला बोलावले असते तेंव्हा शक्यतो माझ्या बायकोला आम्ही आमच्याच पंगतीत बसवून एकत्र जेवतो. आमच्या घरी स्वयंपाक घरात माझ्या मुलाला सुद्धा पाणी भरणे किंवा घासून झालेली भांडी ताटाळयात लावणे हि कामे आम्ही आमच्या मुलीच्या बरोबरीने करायला लावतो. मी जोधपूरला गेलो असता माझ्या तमिळ मित्राने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. तेंव्हा माझी अट एकच होती. एक म्हणजे तुमचे रसम भात सांबार भात आणि दही भात हाच मेनू हवा आणि त्याच्या बायकोला सांगितले तू जर आमच्या बरोबर पंगतीला बसणार असलीस तरच मी जेवायला येणार. त्यांच्या कडे गेल्यावर मी तिला मुलांची जेवणे आटपायला सांगितली. तिने मुलांची जेवणे आटपून त्यांना झोपवले तेंव्हा आम्ही तिघे जेवायला बसलो. आणि साडे दहा पर्यंत सर्व आवरून शेवटचे पायसम खायला ती आणि आम्ही दोघे बाहेरच्या खोलीत गप्पा मारत बसलो होतो. बर्याच ठिकाणी पुरुष साडे दहा अकरा पर्यंत दारू पीत बसतात. मुले जेवणासाठी ताटकळत असतात. शेवटी अकरा साडे अकरा ला मुले कंटाळून न जेवता किंवा जेमतेम जेवून झोपतात. मग हे पुरुष पुंगव जेवायला बसतात दाबून जेवतात आणि उठून जातात. मागचे सर्व आवरून जेवण होईपर्यंत घरच्या बाईला साडे बारा एक वाजतात. असे अनेक ठिकाणी पहिले आहे आणि याचा मला तिटकारा आहे. त्यामुळे मी जेथे जातो तेथे घरच्या बाइला सांगतो तुम्ही मुलांना जेवायला वाढा. पुरुषांना चखना वाढायला थांबलात तरी चालेल. यानंतर मी घरची बाई जेवायला एकत्रच बसेल असा आग्रहच धरतो. यामुळे ती स्त्री सुद्धा व्यवस्थित जेवते. उगाच काही उरले नाही असे होत नाही. जेवण झाल्यावर आपले ताट मी स्वतः उचलतो यामुळे इतर पुरुषांना तसे झक्कत करावे लागते. यामुळे घरच्या बाईचा एक तास तरी वाचतो. बर्याच चांगल्या घरच्या पुरुषांना हे लक्षातहि येत नाही कि आपली बायको सुद्धा नोकरी करते. तिला सुद्धा उद्या कामावर जायचे आहे किंवा शनिवार असेल तर तिला सुद्धा उद्या सुट्टी एन्जॉय करायची आहे. आपण जर तिला थोडा हातभार लावला तर चालेल. ( यामुळेच बर्याच स्त्रिया आजकाल कुणाला घरी बोलवण्या ऐवजी हॉटेलातच घेऊन जाणे पसंत करतात) या गोष्टी आपण आपल्या मुलाच्या मनावर आजपासून बिम्बवल्या तर पुढे त्याचा फायदा होईल.

In reply to by टवाळ कार्टा

या ÷111 च अर्थ तू हे सगळ अणि तसच करतोस असा आहे का? माझ्या महितिप्रमाने तर तू अजुन उभाच आहेस ;)

In reply to by सुबोध खरे

हे अगदी खरं. समारंभात पुरुष पंगती आधी उरकण्या मागे अनेक प्रॅक्टिकल सोयी असु शकतात पण घरातल्या पुरुषाने देखील तिथेच बसून किती उरलंय नाही याची शहानिशा न करता केवळ यजमानपदाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी बायकांना वेठीला धरणे हे चुकीचं आहे. पण ते त्यांन कळणार कधी आणि कसं? संवेदनशीलता काही बाहेरुन टोचता येत नाही. तुम्ही म्हणता तसं लहानपणापासून वळण हवं, मुलांना करणार्‍याचे कष्ट दिसायला हवेत, सहज पानात पडणारी पोळी मागे घरातल्या बाईचे किती कष्ट असतात हे जर दाखवलंच नाही तर ते गृहीत धरायला शिकतो माणुस. सण समारंभ फक्त एक भाग झाला, खाली पै ताई म्हणते तसं बायकांनाच वाटत नाही की मी पण दमुन आले आहे, आधी आलेल्याने थोडा दम खाऊन निदान चहा करावा. उलट कौतुकाने बायका सांगतात आमच्या कडे ना माझ्याशिवाय काही काम व्हायचं नाही ! अरे ही कौतुकाची गोष्ट आहे का? उद्या तुम्हाला नोकरीनिमित्त बाहेर गावी राहावं लागलं, काही अपवादात्मक परिस्थितीत कुटुंबाजवळ राहय्चं म्हणुन नवरा इकडे बायको तिकडे असं झालं तर काय करणार? अशा वेळी "सेकंड लाईन इन डीफेन्स" तयार नको का? यावर उपाय बर्‍याचदा मी बदलीची किंवा फिरतीची नोकरी घेणार च नाही. प्रत्येकाचे प्राधान्यक्रम असतात पण घरच्यांना स्वतःचा चहा करुन घ्यायची सवय नाही म्हणुन करीअर वर स्वखुशीने बॅक फुट वर जाणार्‍यांना आणि त्यांना जाऊ देणार्‍यांना काय म्हणायचं कळत नाही. भारतात अनेक असे म्हातारे काका पाहिले जे बायको गेल्यावर अगदी हेल्पलेस होतात. मुलं परदेशी असतात नाही तर दुर गावात असतात, काम वाल्या बायका करतील ते यांना आवडेल च असं नाही. एकाला मागे राहयचंय हे लक्षात ठेवुन तरी थोडं फार शिकुन घ्यायला हवं. दोघांनी , पुरुषांनीच असं नाही. पण एवढे ढळढळीत दुष्परिणाम दिसत असताना देखील खोट्या अहंकाराला आज ही अनेक जण चिकटुन राहतात. पुरुषसत्ताक चा एवढा भयावह विपर्यास होईल असं त्याकाळी कुणाच्या मनात ही आलं नसेल !

In reply to by स्रुजा

परवा आमच्याकडे एक काका आले होते; ते सांगत होते कि एका बघण्याच्या कार्यक्रमात मुलीने मुलाला विचारले, 'तुला स्वयंपाक येतो का?' तर मुलगा भलताच चिडला म्हणे. यावर मुलगी म्हणाली, 'जरी समजा मी रोजचा स्वयंपाक केला, तरी मी जर आजारी पडले तर तू मला जेवण्यापुरते तरी करून घालू शकशील का?'

की माझ्या कुटुंबात स्त्रियांची पंगत आधी असते. आणि जेव्हा स्त्रिया पहिल्यांदा जेवतात, तेव्हा नंतर जेवणा-यांना कमी पडतंय असं कधीच झालेलं नाही. पण इतर नातेवाईकांकडे पुरूष आकंठ जेवतात आणि बायका उरलेलं. वर परत इतकं छान झालं होतं की आम्ही सगळं संपवलं असंही निर्लज्जपणे सांगतात. माझ्या वडिलांनी आमच्याकडे होणाऱ्या समारंभांमध्ये हे सुरु केलं. ते तर वाढायचेही. मीही प्रयत्न करतो पण आई-काकू-आत्या जेवढं व्यवस्थित आणि नेमकं वाढतात ते मला जमत नाही.

ह्या असल्या मानापमानामुळे आम्ही कोणालाच घरी बोलावत नाही. शक्यतो आम्हीच त्यांच्या घरी जातो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हया बाबतीत तुमचे आणि आमचे जमेल. पण आपल्या दोघांची ही आवड लक्षांत घेता, एखादा बियर कट्टा बाहेरच करू या. पुण्यात असाल तर मी जमवतो आणि डोंबोलीला आलात तर, फार उत्तम....

In reply to by परिकथेतील राजकुमार

ह्या असल्या मानापमानामुळे आम्ही कोणालाच घरी बोलावत नाही. शक्यतो आम्हीच त्यांच्या घरी जातो.
आमच्या 'प्रतिसाद जीपीएस' या यंत्रणेद्वारे हा प्रतिसाद सदाशिव पेठेतून उमटल्याचे दिसून येत आहे.

In reply to by चित्रगुप्त

पण... पराशेठ तयार व्हायला हवेत....
आम्ही तयारीतच असतो. ;)
आमच्या 'प्रतिसाद जीपीएस' या यंत्रणेद्वारे हा प्रतिसाद सदाशिव पेठेतून उमटल्याचे दिसून येत आहे.
यंत्रणा चो़ख कार्य बजावत आहे =))

(अनुभव) वाचुन वाइट वाटले. स्त्रियांवर त्यागचह्या उदात्त कल्पना का लादल्या जातात ? माझ्या घरताही लहानपणी मला विषेश वागणूक मिळत असे व बहीणीला कमी विषेश. पण जसे आमचे वय वाढु लागले व माझे गुण दिसुन येउ लागले तस तसे हळू हळू मला कमी विषेश अन बहीणीला विषेश वागणूक मिळायला सुरुवात झाली. अर्थात बहीणीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला असेच मी मानतो. :) आत्ता ती तिच्या संसारात सुखी आहे आणी मी मजेत (अन अधुन मधुन सुखी :D). या स्वानुभवावरुन मला वाटते मुलांना ही विषेश वागणूक वा लळा पालक मुद्दाम देतात त्यामागे मुलासोबत बाँड विकसीत करणे हा उद्देश असतो. कारण तसे झाले तर उतारवयात मुलगा सोबत राहील व्यवस्थीत काळजी घेइल सांभाळ करेल ही भावना त्यामागे असते. आजसुधा कोणताही प्रश्न समोर आला तर प्रथम माझ्याशी सल्ला मसलत होते नंतर आवश्यक वाटते तेथे बहीण व भावजींना सांगीतले जाते.. थोडक्यात स्त्रीलींगी आहे म्हणून नाही तर सोबत कोण राहील याचा विचार करुन मागील पिढ्या मुलगा व मुलीला वेगवेगळी वागणुक देतहोते हे नक्कि पण मुलाला महत्वच द्यायचे अन मुलीला कमी लेखणे हळु हळु प्रथा बनली. व त्यामुळे आज अनेक मुलींचे मानसीक आरोग्य धोक्यात आले आहे.

In reply to by चैदजा

आपण एकमेकांचे भाऊ-बहिण तर नाही ना, खात्री करून घ्या. मिपावर काही कळत नाही हो म्हणून म्हाटलं.

लग्नानंतर बरेच वर्ष एकाच ताटात जेवत होतो,म्हणजे कॉलेज चे ३ वर्ष आणी नंतर लेक होइपर्यंतचे २ वर्ष पण आता दोन्ही लेकी एका ताटात जेवन काय एकमेकांच्या शेजारी पण बसुन देत नाय राव. बाकी लेकी आहेत पण मुलगा नाही असला प्रकार आमच्या खानदानात त्यांना कुणी जानवुन देत नाहीत्,घरची सगळी कार्ये,अगदी दसर्‍याचा आणी होळीचा नारळाचा मान पण माझ्या मोठ्या लेकीकडे असतो, गावकडे तर मोठीला सगळे पाटील या आदरार्थी नावानेच हाक मारतात्,अगदी पंचायतीचे सभासद सुद्धा. हे पुर्वीचा प्रकार नाही राहिला फारसा,जग बदलतय आपण ही बदलल पाहिजे.

बालपणी तरी लाड होतात... पुढील आयुष्यात मात्र, पुरुषांचे हाल काही बघवत नाहीत. जावू द्या....

In reply to by मुक्त विहारि

आता आपण बदलाची सुरुवात करुयात, पोरींना मुलाच्या ताकदीने वाढवा,गड किल्ले फिरवा, सगळ्यात महत्वाच जिजाउ आणी शिवाजी त्यांच्या नसानसात भिनवा तुमच्या लेकी आयुष्यात कधीच अन्याय सहन करुन जगणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

In reply to by टवाळ कार्टा

+११ "बाबा" असलेल्या पाटलांना सलाम

हे होते हे दुर्दैवी आहे पण खरे आहे... नक्कीच थांबवायला पाहिजे. सुदैवाने, आमच्या आईवडीलानी लावलेल्या सवईने, आमच्या लहानपणापासून घरचे सगळे एकाच पंगतीत जेवायला बसताना बघितले आहेत. दुसर्‍यांकडे जेवायला गेल्यावर आमचा शक्यतो हाच आग्रह असतो. कधी फार मोठा गोतावळा जमलेला असला तर प्रथम मुला-मुलींना आणि मग सगळ्या स्त्री-पुरुषांना एकाच पंगतीत जेवण वाढले जाते. फक्त काही खास समारंभात निमंत्रितांना मान देण्यासाठी यजमान जोडी सगळ्या निमंत्रित मुले-स्त्री-पुरुषांना आग्रहाने जेवण करवून झाल्यावरच जेवते. आमच्या पिढीत (मी व भाऊ) आता तसे झाले नाही तर आश्चर्य समजले जाईल.

अनेकदा हां संस्कार घरात च बिंबवलेला असतो. बायकांनी साधी मांडी घालून बसायचं नाही, उगाच पाय मुडपुन. ताट म्हणून एखादी झाकणी घ्यायची, शिळं अन्न खायचं वगैरे उद्योग सुरु असतात. जेवताना मोठं ताट घ्या, व्यवस्थित बसा, शिळयाची सामान वाटणी किंवा त्याला सजवून किंवा अगदी बाहेर टाकून देणं किंवा कुठल्या प्राण्याला खाऊ घालणं. शक्यतो एकत्र च जेवायला बसणं हे प्रकार आमच्या घरी सुरु असतात.

हे जेवण्याचे झाले. माझ्या क्लिनिकमधला एक नेहमीचा अनुभव आहे.मुलीच्या दाताच्या ट्रीटमेंटवर लोक खर्च करायला लवकर तयार होत नाहीत.उपटून टाका.असा मलाच सल्ला देतात.हेच लोक मुलाचा दात दुखत असेल तर मात्र वाचवा मॅडम.कितीपण खर्च येऊ दे! त्या घोड्या झालेल्या मुलाला घेऊन आईबाप दोघे काय येतात.त्याला इंजेक्शन देताना डोळे झाकून घेतात.त्याचा हात पकडून बसतील.मुलींना असे प्रेमाने ट्रीटमेंटला आणताना हा अनुभव क्वचितच दिसतो. त्यातही लग्नाची मुलगी असेल तर गोळ्या द्या.तिचा नवरा घेईल बघून असाही अॅटिट्युड अनुभवला आहे.लग्न होऊन पोरगी गेली आणि तिचे बरेच डेंटल प्राॅब्लेम निघाले तर सासरचे लोक माहेरी जाऊन करुन ये म्हणतात.या चक्रात वर्ष वर्ष गोळ्या खाऊन दुखणं सहन करणाऱ्या मुली नित्य पाहण्यात येतात :(कदाचित् अामचा निमशहरी भाग म्हणून हे चित्र जास्त दिसत असावे. म्हातारपणी मुलींकडून सर्व सेवा करुन घेऊन मुलगा आहे म्हणून मुलग्याच्या नावाने सर्व करून जाणारे एक नातेवाईक पण आहेत.

सत्तर वर्षापूर्वी माझ्या आईच्या घरात समानता होती. त्याचा आज अभिमानच वाटतो. घरची गरिबी होती. वर्षभराचं सामान एकदम घेतलं की स्वस्त पडत असे. तांदूळ, गहू वगैरे निवडायला आजोबा आजी आई आणि तिचे तिनही भाऊ असे सगळेच बसत. रोजच्या भाजी निवडण्यातही सर्वांचा नंबर असे. मुलगा मुलगी असा भेद झालाच नाही. आजोबा स्वतः पातेल्यात बघून जेवणारे होते. तेच वळण पुढे राहिले. आमच्या घरातही, समारंभ असला की पुरूष बसतात आधी पण बायकांना उरले नाही असे होत नाही, आणि आम्ही भाऊ आमचे काका असे सगळेच वाढायला उभे राहातो. हात धुवून पानसुपारी करत लवंडायचे हा शिरस्ताच नाही.

चांगलं लिहिलंत! स्वतःपासून सुरुवात करावी हे उत्तम. त्या त्या घरातला मुलगा/मुलगी पुढच्या आयुष्यात अजून एक घर सुधारतील. माझ्या नातेवाईकांतच पाहिलेले दोन प्रसंग डोक्यात घट्ट रुतून बसलेले आहेत. आठवलं तरी संताप होतो. यातली सर्व पात्रे उच्च विद्या विभूषित आहेत. एका ठिकाणी घरातला १३/१४ वर्षाचा एकुलता एक मुलगा आधी पोळ्या मागून घेत होता आणि मग त्या नको म्हणून उशिरा त्याच्या बाजूला जेवायला बसलेल्या आईच्या पानात अक्षरशः कुत्र्या-मांजराला घातल्यासारख्या फेकत होता. मी न राहवून त्याच्यावर ओरडले, तर त्याची आई आजी उलट "कचर्‍यात टाकत नाही ना" म्हणून त्याची कौतुकं करत होत्या. त्याच्या आईला असे सगळे नको असलेले खाऊन आता वजन आणि बीपीचा भयानक प्रॉब्लेम झाला आहे. ही आई नोकरी करणारी. ती नवरा आणि मुलगा दोघांच्या नंतर घरात शिरली तर बापलेक दमून खुर्चीत तंगड्या वर करून बसलेले असतात. मग फ्रीजमधले पाणी आईने त्यांच्यानंतर येऊन ग्लासात ओतून त्यांच्या हातात द्यायचे. वर ते दमून येतात म्हणून नखरे. अग, तू नाही का दमून आलीस?? दुसर्‍या एका ठिकाणी आम्ही ७/८ जण एका मुलीकडे जेवायला गेलो होतो. तिने दीड वर्षाच्या मुलाला सांभाळून स्वयंपाक तयार ठेवला होता. म्हटले लहान मुले आधी जेवू देत मग आपण जेवू. तर आमच्याकडे तशी पद्धत नाही म्हणे. आणि आम्हाला सगळ्याना जेवायला बसवून ती रडणार्‍या मुलाला सांभाळत एकटी वाढत राहिली. तिचा नवरा पण आरामात गप्पा हाणत जेवत राहिला. मला तर तिथून पळून जावेसे वाटत होते. बरं हे वाढणं साधं नव्हे. गॅसवर उसळ आणि आमटी गरम करत ठेवलेली सतत. आणि ती तशीच वाफा येणारी वाढायची म्हणे. आमच्याकडे अशी पद्धत आहे याचं कौतुक वरून. या प्रसंगानंतर पुन्हा कधी तिच्याकडे जेवायला गेले नाही. आमच्याकडे लै भारी प्रकार आहे. मी कुठे बाहेरगावी गेले आणि मुले घरात दोघेच असतील तर मुलगा मुलीपेक्षा लहान असूनही रोटी मेकरवर रोट्या करून आम्लेट वगैरे करून स्वतःचे पोट भरतो आणि बहिणीला पण जेवू घालतो. =))

In reply to by श्रीगुरुजी

खरंय. हे मी पण माझ्या एका मैत्रिणी च्या सासरी बघितलंय. या मैत्रिणीचा नवरा आणि दीर कुठल्यातरी प्रतिष्ठित शाळेत आणि नणंद साध्याशा शाळेत. ते पैसे वाचून मोठा दहेज देणार आहेत म्हणे मुलीच्या लग्नात.

आमच्या घरी छोटासा कार्यक्रम असेल तर सगळे एकत्रच बसतात . माफक आग्रह चालतो, पण उगा तडस लागेपर्यंत नसतो आग्रह . वर ताटात अन्न टाकून देण्याचे अनुभव वाचले त्यावरून माझ्या पहिल्या संघाच्या शिबीरातला अनुभव आठवला...मी असेल पाचवी किंवा सहावीत, पहिलेच जेवण आणि वाढप्याने चुकून २ चपात्या जास्त वाढल्या . आता त्या जाणारच नव्हत्या . सगळ्यांची जेवणे झाली . मी ताटात तसंच अन्न ठेवून उठू लागलो तर हातात दंड घेतलेला स्वयंसेवक उठूच देईना ! अगदी रडकुंडीला आलो . तरी ताट साफ केल्याशिवाय उठू देत नव्हते . माझ्यापेक्षा थोडा मोठा असलेला एक "अनुभवी" मित्र आला भाजी तांब्यात टाकली पोळ्या कनातीखालुन बाहेर आणि नेलं ताट धुण्यासाठी ! तेव्हापासून सवय पडली पंगतीत थोडं कमीच अन्न ताटात घ्यायचं . रच्याकने संघाचे प्रचारक लोक कधीच ताटात भाताचा एक शित सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत.

In reply to by उगा काहितरीच

राजाभाऊ खाडिलकर म्हणून संघाचे विभाग प्रचारक आमच्याकडे जेवायला आले होते. त्यांनी जेवल्यानंतर ताट असं काही स्वच्छ केलं होतं की जणू जेवायला ताट वाढलंय. आमटीची वाटी स्वच्छ केली त्यात प्यायचं पाणी घालून ती पयाले. (असं साधारणत: कुणी करत नाही म्हणून लक्षात राहिलंय) बा द वे फोकस जेवण वाया घालवू नये वर आला आहे समानतेकडून. -फोकस्ड होण्याच्या प्रयत्नात

माझ्या दोन्ही मुलांना सर्व चारी ठाव स्वयंपाक उत्तम करता येतो, परंतु हल्लीच्या अनेक शिक्षित लग्न झालेल्या मुलींना मात्र येत नाही, परिणामी नवरे स्वयंपाक करतात किंवा पिझे मागवून लठ्ठ होत अपचनादि रोगांना बळी पडत असतात, असेही बरेच बघायला मिळते. स्वतः स्वयंपाक करून 'प्रेमाने खाऊ घालणे' हे अलिकडे फार मोठ्या शहरातून फार कमी बघायला मिळते.

In reply to by चित्रगुप्त

. स्वतः स्वयंपाक करून 'प्रेमाने खाऊ घालणे' हे अलिकडे फार मोठ्या शहरातून फार कमी बघायला मिळते.
१००% सत्य. स्वतः कमावुन होम डीलीवरी मागवणे हेच सुरु आहे. त्यात अजुन एक फॅड म्हणजे फक्त होम डीलीवरी देणार्‍या हॉटेल्सचा उदय. मस्त चमचमीत जाहीरात छापायची, वितरीत करायची. मागवा घरपोच बिर्याणी, चिकन वगैरे वगैरे पाहीजे तेवडे. हॉटेल नाही, जागा भाड्याने घ्यायची कटकट नाही राहत्या जागेत स्वयंपाक करुन ऑर्डरी पुर्ण करायच्या.

In reply to by भाऊंचे भाऊ

मुद्दा अगदी बरोबर आहे. पण धाग्याचा हा विषय नाही. नाही म्हणाजे आता चर्चा "आजकालच्या बायका स्वयंपाकच करत नाहीत" ह्या विषयाकडे वळेल म्हणुन म्हणलं. बाकी मिपा आपलंच आहे!

माझ्या निरिक्षणानुसार सुशिक्षित व आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गात आजही जोडप्याला एक मूल असते - मुलगा असो वा मुलगी. फार तर दोन. मात्र आर्थिक दृष्ट्या खालच्या वर्गात पैसा, जागा, वेळ या सर्वाची कमतरता असतानाही अनेकदा मुलगा होइपर्यंत मुलीना जन्म दिले जातात. नवरा बायको तीन चार मुली आणि कुलदिपक अशी अनेक कुटुंबे आजही दिसतात. या कुलदिपकाला कुठली जहागीर राखण्यासाठी जन्म देतात ते त्याचे आईबापच जाणे मुलगा - मुलगी असा फरक मात्र अगदी सुशिक्षित व सुस्थितील कुटुंबातही केला जातो. मुलीला वैद्यकिय शिक्षण घ्यायची हौस व बुद्धी असतानाही जर देणगी प्रवेशाची वेळ आली तर तो घेतला जात नाही, मुलाला मात्र घेतला जातो. कदाचित मुलगी उद्या लग्न होउन जाईल, एव्हढा पैसा तिच्यावर कशाला खर्च करायचा असा विचार केला जात असावा

In reply to by सर्वसाक्षी

सहमत आमच्या एका नातेवाईकांच्या कडेच असे दिसले. मुलगा आणि मुलीत एक वर्षाचेच अंतर आहे. पण मुलाला आय बी स्कूल मध्ये आणि मुलीला सी बी एस इ मध्ये. मुलाला तुला करियर करायचे आहे म्हणून आठवी पासून घोड्यावर बसवलेलेआणि मुलीला मात्र तुला काय आराम करायचा आहे. हे इतके कि तो मुलगा सुद्धा आपल्या बहिणीला नववीत म्हणाला तुला काय सासरी जाऊन ऐश करायची आहे. मला मात्र करियर केल्याशिवाय गत्यंतर नाही. मुलाला यासाठी दरवर्षी ३५ लाख भरून अमेरिकेत इंजिनियरिंगला पाठवले आहे. आणि मुलगी पुण्यात सप (का गरवारे) मध्ये कला शाखेत आहे.

In reply to by सुबोध खरे

मागे मी एकदा शैक्षणिक कर्जाची चवकशी करण्यासाठी बँकेत गेलेलो असता त्या खात्याचा प्रमुख म्हणाला की हे कर्ज जरी विद्यार्थांनी शिक्षण संपल्यावर सुमारे सात वर्षात फेडायचे असले, तरी आम्ही ते तुम्हीच फेडायचे आहे असे गृहित धरून चालतो, आणि त्याप्रमाणे तुमची मिळकत, मालमत्ता वगैरेंचे पुरावे मागत असतो. कारण विशेषतः मुलींचे बाबतीत असे घडते, की शिक्षण संपल्यावर त्यांचे लग्न झाले तर वीस-चाळीस लाखांचे कर्ज डोक्यावर असलेली मुलगी सासरच्यांना नको असते, आणि तिने नोकरी करून हे कर्ज फेडावे हेही मान्य नसते. उत्तर भारतात मुळात मुलीचे लग्न हा अतिशय खर्चिक प्रकार असतो, त्यातून हे कर्ज फेडणे बर्‍याच पालकांच्या आवाक्याबाहेरचे असते.