Skip to main content

म न से.................

लेखक विजुभाऊ
मंगळवार, 03/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( म न से) : काही वर्षापूर्वी वाजत गाजत गर्जत स्थापन झालेल्या या पक्षाबद्दल मराठी लोकांना फार अपेक्षा होत्या. विषेषतः मुम्बैतील बिहारी/बांगलादेशीय लोकांबद्दलच्या राज ठाकरेंच्या पावित्र्यामुळे हा पक्ष नेहमीच चर्चेत राहिला. राज ठाकरेंचे भाषण कौषल्य हे बाळासाहेबांच्या प्रमाणेच आहे. त्यांची एखाद्या प्रश्नास थेट भिडण्याची शैली लोकाना आवडायची.या पक्षास सुरुवातीला उत्तम यश मिळाले. त्यावेळेस काँग्रेस च्या विरुद्ध जनमत असूनही शरद पवारानी केलेल्या खेळीत प्यादे म्हणून मनसे ला वापरले गेले आणि सेनाभाजपाच्या उमेदवारांची मते कमी झाली. काँग्रेस -राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर आले. मध्यंतरी मनसे ने लोकसभे साठी उमेदवार उभे केले. त्यात तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे मतदारानी त्याना भ्रमनिरास होण्याइतपत लांब ठेवले. विधानसभे साठी मनसे चे पानिपतच झाले. राज यांच्या पेक्षाही सर्वार्थाने नवख्या केजरीवालानी मोदिंसारख्या विरोधकावर मात करत दिल्ली सर केली. पण मनसे त्याच्या एक विसांशही यश मिळाले नाही. कल्याण डोंबिवली म न पा च्या निवडणूकीत पुन्हा तेच चित्र ठळक झाले. मनसे पुढे सध्या कसलाच अजेंडा नाही. शिवसेने वर टीका करावी तर शिवसेना हा काही फार मोठा मुद्दा उरलेला नाही. तेलकट वडे की चिकन सूप असल्या घरगुती भांडणाचे संदर्भ देवून राज यानी स्वतःचेच हसे करून घेतले आहे.राज यांची भाषणे अजूनही शैलीदार होतात पण त्यात कोणतेच मुद्दे असत नाहीत. खरेतर सरकार ला धारेवर धरता येतील असे अनेक मुद्दे असताना ( उदा: रस्ते , शिक्षण , शेतकर्‍यांच्या आत्महत्या , बेरोज्गारी , बंद पडणारे उद्योग, पोलीसांच्या समस्या , पाण्याचा वाटपाचा प्रश्न ) असतानाही मनसेने टोल सारखा दुय्यम मुद्दा उगाळलाय. एक मात्र मान्य करायला हवे राज ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात अजून ही प्रेम आहे. उद्धव ठाकरेंकडे त्यांच्यासारखा करिष्मा नाही हे सर्वमान्य आहे. मनसे मधे प्रभावी नेत्यांची दुसरी फळी सेनेतही तीच अवस्था आहे.अशा परिस्थितीत "मनसे" चे भावितव्य काय असेल असे तुम्हाला वाटते?

वाचने 4942
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कार्यशैली बदलल्याशिवाय काही भवितव्य नाही मनसेला.

करून दाखवा ! मग ठरेल भवितव्य. आणि ते नेहमीचं पूर्ण सत्ता वालं आवाहन तेंव्हाच पूर्ण करतील लोकं जेंव्हा सत्तेत नसूनही तुम्ही गोष्टी कराल.

खरयं .. राजला पाठींबा आहे लोकांचा पण काहितरी करून दाखवल्याशिवाय नुसत्या पोकळ भाषणांनी त्याचा मतपेटीवर प्रभाव पडणार नाही ...

राज ठाकरेंचे व्यासपिठावरुन केलेले प्रेझेनटेशन, कल्पना नाविन्यपूर्ण असली तरी, प्रयत्न अती सामान्य होता. काही दमच नाही दिसला. परत, मी सर्वज्ञ हा आविर्भाव जो पर्यंत जात नाही तो पर्यंत वाट पहावी लागणार .

*मराठी माणसाला प्रोत्साहन फक्त मनसेच देऊ शकतो असं काही नाही. *नेता एकच-राज.दुसरी फळी कोण बनवणार? *टोलनाके तोडफोड करणे ही स्टंटबाजी ( आणि गुप्तहेतू ) हे ओळखायला लोक मूर्ख नाहीत.त्यांच्या अगोदरच्या सरकारच्या बरोबरच्या कराराप्रमाणे कायदेशिररित्या टोल वसुली करत राहणार हे सत्य आहे. *महाराष्ट्र नवनिर्माण या संकुचित नावाने लोकसभेत उमेदवार आणणे कठीण आहे.फक्त नवनिर्माण सेना हे नाव ठेवावे."नसेना" अशी टिंगल होईल या भीतीने ते नाव बदलत नाहीत.

नकलांनी करमणूक होते, मते मिळत नाहीत. बाळासाहेबही नकला करायचे, धडक विधाने करायचे. त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. तो काळ आणि परिस्थिती वेगळी होती. मराठी समाजाला आलेली मरगळ बाळासाहेबांनी झटकून काढली. मराठी माणसांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्या काळच्या बेरोजगारीसारख्या समस्येमुळे मराठी सामान्य माणसांना बाळासाहेब हे एखाद्या देवदूता सारखे भासले. शिवसेनेला शिवसेनेच्या विचारधारेची ध्येयधोरणे असणारा दूसरा पक्ष स्पर्धेत नव्हता. आज ती परिस्थिती नाही. त्यामुळे नुसतेच बाळासाहेबांसारखे दिसणे, भडक भाषा वापरणे आणि नकला करणे ह्याला (तेही मूळ शिवसेना स्पर्धेत असताना, मराठी मते विभागलेली असताना) 'तसे' यश येणार नाही. भावनिक मुद्द्यांपेक्षा आजचा मतदार 'कृती' पाहतो. शिवसेनेच्या भरभराटीच्या काळात जन्मलेली मुले आज तरूण आणि शिकले सवरलेले मतदार आहेत. सुरुवातीला राज ठाकरेंना भरघोस पाठिंबा मिळाला पण कृतीशून्य बाष्फळ बडबडीने त्यांच्याकडे आलेल्या संधीची त्यांनी माती केली. अजूनही आक्रमकता आणि कृती ह्याची व्यवस्थित सांगड त्यांनी घातली तर मराठी माणसाचे ते आशास्थान ठरतील.

बद्दल सुरूवातीला सुशिक्षित लोकांचा पक्ष अशी प्रतिमा होती. पण त्यांच्या खळ्ळ खटॅक कल्चरमुळे हा पक्ष म्हणजे शिवसेनेची बी टीम आहे असं वातावरण सगळीकडे तयार झालं. मध्येच राज ठाक-यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगून प्रचंड खळबळ उडवून दिली पण नंतर स्वतःच तो निर्णय फिरवला. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला. मुळात मनसे हा कुणाचा पर्याय म्हणून उभा राहू इच्छिणारा पक्ष आहे याबाबतीत स्वतः मनसेच्या नेत्यांमध्येच गोंधळ आहे, त्यामुळे चांगले, सुशिक्षित लोक पक्षात ब-यापैकी मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा अजून पक्षाचा जम बसलेला नाही आणि आता तो तसा बसवणं कठीण आहे.

मनमानी करत दुकान चालवणारा मराठी दुकानदार आणि त्याचं दुकान. आज दूकान पहाटे, उद्या दुपारी परवा संध्याकाळी कधीही. इतर वेळी दुकान चालवायचं सोडून दुकानदार आपले शौक आणि इतर बांधकाम व्यवसाय बघतो. कधीतरी दुकानाची आठवण येते. समोरचे चार मारवाडी मस्त दूकान चालवत असतात. या दुकानदाराला तसा काही फरक पडला नाही तरी गर्दी खेचायला काही स्कीम काढतो. लोक येतात बघतात... मजा येते. खरेदी मात्र काही करत नाहीत. माल कसा निघेल ग्यारंटी नाही, परत बदलून मिळायला दुकान कधी सुरु असेल असलं तरी दुकानदार कसा प्रतिसाद देतो याची हमी नाही. दुकान दिसतं भारी! आमचे काही मित्र आहेत. गिऱ्हाइक.

राज बद्दल आमचे काही निरीक्षण ते अगदी तंतोतंत साहेबांसारखे बसतात , अगदी त्यांच्याप्रमाणेच हातावर उलटे घड्याळ बांधायची शैली, व्यंगचित्रांचा लागून आलेला वारसा, अगदी डोळ्यात तशीच आग, तशीच काहीश भाषणाची पद्धत, तोच भिडस्त स्वभाव... मोठ्या साहेबांच्या नंतर हेच ते प्रभावी नेते... सुरुवातीला आम्हाला त्यांच्या बद्दल खूपच अपेक्षा होत्या, कदाचित खरच त्यांच्यावर" अन्याय " झालाय अशी आमचीही भावना होती... असो ... वा नसो... नंतर स्वतंत्र पक्ष उघडल्यानंतर आधी सावरकरांचा आदर्श घेऊन सुरुवात, मग मुंबईत यश न मिळाल्याने सावरकरांना सोयीस्करपाने बगल देऊन परप्रांतीयांचा मुद्दा घेतला पक्ष स्थापन केल्यापासून शिवसेनेला टार्गेट केले, आणि बाळासाहेबांचे नाव घेऊन मत मागायला सुरुवात... जिथे शिवसेना मजबूत आहे तिथेच आपले उमेदवार उभे केले, माझे भलेही निवडून न येवो, पण सेनेचे मी पाडणार , हि यांची विचारसरणी ( १० वर्षापूर्वीची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आठवा..) मोठ्या साहेबांनी माझे नाव घेऊ नकोस असे सांगून सुद्धा अजूनही हे त्यांच्या नावाने मत मागतात... १३ आमदार निवडून आले तेव्हा १)" तुमने हमको इतना मारा, लेकिन हमने दोइच मारा लेकिन सोलिड मारा के नाही?" २) सत्या सिनेमातील मौका सबको मिलता है हे यांचे डायलॉग आठवा गरेज असेल नसेल उगाच आपले शिवसेनेबद्दल गरळ ओकायची उगाच हिणवायचे,...जानुबुजून... सुरुवातीला सेनेला यांनी घाम फोडला, तेव्हा सेनेने यांना टाळीसाठी हात दिला तेव्हा हे टाटा करत होते, जाहीर सभेत यांनी टाळीची खिल्ली उडवली... सेनाभवन पासून हाकेच्या अंतरावर त्यांना डिवचण्यासाठी यांनी राजगड हे मुख्यालय उघडले, ( नंतर नारळ युद्ध झाल्यावर त्यांनी ते बंद केले,) मोठ्या साहेबां बद्दल मलाच किती काळजी आहे हे सांगण्याच्या नादात घरातील भांडणे आणि गोष्टी लोकांना सांगत सुटले, चिकन सूप , वडे खायला कोणी कोणाला घातले ... टोलचा मुद्दा घेतला आणि नंतर सगळ शांत.. टोलमध्ये कोणाचा झोल मोठा होता,,हे सुज्ञास सांगणे न लागे मुद्दा घ्यायचा रान उठवायचे आणि नंतर अचानक पलटी मारायची... ठोक आणि ठोस असा कुठलाच कार्यक्रम नाही...एकन धड भाराभर चिंध्या. विधानसभेत आज एकाच आमदार ... तोही यांच्या नावाने नाही तर स्वताच्या कर्तुत्वाने निवडून आलेला..नवी मुंबई महापालिकेत गेल्या २ निवडणुकीत १० वर्षात एकही सदस्य नाही.. कांडोमापात २७ चे ९ झाले, विधानसभेत १३ च १ झाल .. खासदार एकही नाही... थोडक्यात काय...विचार चांगले होते पण कृती नाही... मोठ्या भावाबाद्दल्ची असूया बाजूला ठेवून त्याला नको ते सल्ले देण्यापेक्षा स्वतः काही काम केले असते तर आज हे दिवस आले नसते... लोकांसमोर हसे झाले नसते...

In reply to by आदूबाळ

दोन्ही पक्षांचे मुख्यालय दादरमध्ये हाकेच्या अंतरावर होते, आणि त्यांच्यामध्ये स्वामी समर्थांचे एक मंदिर आहे, एकदा वाद झाला, आधी दगड फेकले एकमेकांवर ,ते संपले म्हणून दोन्ही कडच्या सैनिकांनी मंदिराच्या आवारातील नारळाच्या गोण्या पळवल्या , आणि शस्त्र म्हणून वापर केला,,, दे दाणादाण दे ठेऊन...

राज ठाकरे : उत्तम वक्तृत्व असलेले आळशी आणि बेभरोशी नेते !

नाशिक मध्ये संधी मिळुन योग्य उपयोग करुन घेता आल नाही. महानगर पालिका आणि ४ आमदार हातात असुनही काहिच केल नाही. फक्त वाचाळवीर म्हणुन स्वताहाची शोभा करुन घेतली आहे. स्वबळावर सत्ता मागतांना कुठल्या अधिकाराने हे बोलत आहेत किंवा होते हेच कळत नाहीये.

पुरोगामी वा नावापुरती तशी विचारसरणी बाळगणारे पक्ष राज्यात दोनच, काँग्रेस व एनसीपी, यांच्या विरोधातली जी स्पेस होती त्यात भाजप शिवसेना मनसे अश्या तीन पक्षांची भाऊगर्दी झाली आहे.या त्तीन पक्षांचा मतदार वर्ग साधारण सारख्या विचारसरणीचा ,थोडा हिंदुत्वाकडे झुकणारा आहे.आधीचे भाजप व शिवसेना हे एस्टॅब्लिस्ट पक्ष आहेत, यांच्याकडे प्रभावी स्थानिक नेते, पैसा व चांगले नेटवर्क आहे ,जे मनसेकडे नाही.त्यामुळे राज ठाकरे समोर दोन पर्याय आहेत. १ .प्रभावी नेते पक्षात आणने ,नेटवर्क तयार करणे व ॲन्टीसेक्युलर स्पेस थोडी बळकावणे. २.तिसरीच एखादी स्पेस निर्माण करणे व त्याचे संस्थापक होणे. केजरीवाल यांनी anti corruption ही नवी स्पेस तयार करुण सत्ता काबिज केली आहे,mim च्या ओवैसीने exclusiveमुस्लिम स्पेस तयार करुण मुसंडी मारली आहे. केजरीवाल आणि ओवैसी दोघेही राज ठाकरे पेक्षा हुशार आहेत हेच यातुन दिसते.

मोहरा शिनेमाचे नस्रुद्दीन शहा. पण सोंग व्यवस्थीत वठलं नाही. सत्तेचा चेकही वठला नाही. पक्षाचं झाड मात्र वठलं. .... कोटीबाज मोगा देशपांडे.

अशा परिस्थितीत "मनसे" चे भावितव्य काय असेल असे तुम्हाला वाटते?
भविष्यात 'विकासाचे राजकारण' हाच मुद्दा असेल.सीमा-प्रश्न,मराठी-अमराठी असल्या मुद्द्यांत तरूण व एकंदरितच सर्व मतदारांना रस आहे असे वाटत नाही. मनसेने नाशिकमध्ये काही प्रमाणात चांगले काम केले आहे असे वाचले आहे.अर्थात विकासाचे,विधायक राजकारण करून निवडून येता येईल असेही नाही. १९५२ च्या लोकसभा निवडणूकीत बाबासाहेब आंबेडकरांचाही मुंबईतून पराभव झाला होता.!

मनसे हा संपण्याच्या मार्गावर असलेला पक्ष आहे. २००९ मध्ये भाजप-सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने या पक्षाने जन्म घेतला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत किमान ८ लोकसभा मतदारसंघात व विधानसभा निवडणुकीत किमान ३८ मतदारसंघात मनसेने युतीच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणल्यानंतर या पक्षाचे अवतारकार्य समाप्त झाले. हा पक्ष आता कोमात गेला असून काही दिवसातच तार येईल.

यांची भाषणे खूप आवडली सुरुवातीला खूप आश्वासक नेते वाटले होते, पण पेठकर काका म्हणतात त्याप्रमाणे 'केवळ नकला करुन मते मिळवता येत नाहीत' हेच खरे. ठोस कार्यक्रम पुढे ठेवणे आवश्यक होते तेही जमले नाही. राष्ट्रीय पातळीवर कोणताही मुद्दा नसतांना लोकसभा लढवणे, 'मराठी माणूस' हा मुद्दा अनावश्यकपणे अतिशय आक्रमकपणे हातात घेऊन अचानकपणे सोडून देणे, पक्षावर पकड असणे केव्हाही चांगले पण प्रभावी दुसरी फळी तयार करणे जमले नाही. समजा अशक्य कोटीतील घटना घडून मनसेचे सरकार आले असते तर सर्व खात्यांसाठी आवश्यक मंत्रीमंडळाची यादी करता येते का पहा? कारण या बाजूने कधीच विचार केला गेला नाही. 'संपूर्ण बहुमत द्या' अशी मागणी करतांना आपल्याकडे तेवढी पात्र माणसे आहेत का याचा कधी विचार केला गेला का? या सर्वामुळे सुरुवातीला वाटलेली आपुलकी ओसरत गेली असे वाटते. शिवसेनेचा आणि मनसेचा मतदार समान आहे त्यामुळे दोघांनी किमान वेगळे अस्तित्व ठेऊन तरी समन्वयाची भूमिका घ्यावी असे वाटते. मनसेबद्दल मनापासून आपुलकी असणारा लाटो.

सुरुवातीला यांना मुख्यमंत्र्याच्या रुपात पहात होतो. आता मात्र ते सरपंच म्हणुन पण नको आहेत. असो :)

In reply to by विजुभाऊ

इथेपण पवारांच्या राजकारणाचा बळी चा भाव का ? अरे वा, हे बर्य, निवडून आले तर ''जनतेची पसंती / विश्वास'', पडले तर लगेच ''पवारांच्या राजकारणाचा बळी'',(मला पवारांविषयी सॉफ़्ट कॉर्नर नाही, पण बळच ओढून ताणून नावं पण नै ठेवू.)

परवा कल्याणला सभेत राजनी नाशिकच्या विकासाचे सादरीकरण केले. बघायला तरी ठिक वाटले. किमान शिवसेना व भाजपच्या फालतू वाघ, जबडा, पंजा वगैरे पाशवी प्रचारापेक्षा वेगळा विकासाधारीत प्रचार हा चांगला बदल होता. पण त्यांनी सांगीतले तसा काही थोडा तरी विकास झाला आहे का? कि नुसत्या हवेतल्या गप्पा? कोणी नाशिककर आहेत का?

कोणी नाशिककर आहेत का? सजग नाशीक मिपाकरच उत्तर देऊ शकतील. (उत्सुक) पण मनसेकडून भ्रमनिरास झालेला नाखु

सोनी टीवी वर पुर्वी शेखर सुमन याचा मुवर्स अ‍ॅन्ड शेकर्स नावाचा शो असायचा. त्यामधे तो राजकिय घडामोडींवर विनोद करायचा, नकलापण करयाचा. त्याचा उपहास पटायचा आणी मनोरंजनही व्हायचे. शो चांगला हिट होता. राज ठाकरेंची भाषणे म्हणजे त्याची मराठी आवृत्ती (हलवा आणि "टोल"वा) वाटते . राज साहेबांचे मुद्देही पटतात आणी मनोरंजनही होते. आणी मराठी व्रुत्तवाहिन्यांना ही चांगला टिआरपी मिळ्तो. बाकी ब्लु प्रिंटची कल्पना छान होती.