मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

भास्कर केन्डे · · काथ्याकूट
सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते. काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे! पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील. भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही. १. भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही. २. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही... मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे. ३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने). ४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने. (सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे. वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्‍यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्‍यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे. आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?

वाचने 7148 वाचनखूण प्रतिक्रिया 20

आजानुकर्ण 28/08/2008 - 02:35
पोप महाशय कोण लागून गेले आहेत ज्यांच्या माफीने मला भले बुरे वाटावे? मात्र मिशनरी शाळेत न शिकल्याने ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. हिंदू सणांना सुटी देणे आवश्यक आहे. त्याशिवाय मुलांना संक्रातीचे तीळगूळ, गुढीपाडव्याचे श्रीखंड, होळीची पुरणपोळी वगैरे गोष्टींचा आनंद लुटता येणार नाही. आणि ही मुले समाजापासून, नातेवाईकांपासून वेगळी पडतील. मात्र त्या शाळांमध्ये येशूची देवाची प्रार्थना करायला लावतात काही वावगे वाटत नाही. या प्रार्थनेवरून आठवले, मी ज्या शाळेत जात होतो तिथे या कुंदेन्दु तुषारहार धवला वगैरे प्रार्थना सकाळी म्हणत असत. त्याच्या शेवटी 'नि:शेष जाड्यापहा' असे आले की वर्गातल्या जाड्या मुलाकडे पाहत मुलेमुली हसू दाबत असत. (असे केल्याने त्या प्रार्थनेची विटंबना होते असे मला वाटते) डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे हे तर फारच भयंकर. म्हणजे शाळेत अभारतीय असे कोणते जेवण आणायला लावतात? पिझ्झा/बर्गर/स्यांडविच का? अरेरे. मात्र गावातील काही जॉन कांबळे वगैरे नावाचे कन्व्हर्टेड ख्रिश्चन आमचे मित्र होते. त्यांनी घरात येशू/मेरीचे फोटो आणि गणपतीचा फोटो एकाच लायनीत लावलेले पाहिले आहेत. आपले हिंदू लोक मोठे च्याप्टर आहेत पैशासाठी धर्म बदलून घेतील आणि घरात गुपचूप गणपतीचीच पूजा करतील आपला, (हिंदू) लाझारस आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

टारझन 28/08/2008 - 02:39
आपले हिंदू लोक मोठे च्याप्टर आहेत पैशासाठी धर्म बदलून घेतील आणि घरात गुपचूप गणपतीचीच पूजा करतील सहमत आहे ... =)) जॉन कांबळे(भाउ लुईस कांबळे ) नावाचा कन्वर्टेड आमच्या बी वर्गात होता... त्याच्या घरी येशू+मेरी+आंबेडकर्+बुद्ध्+मा दुर्गा एकाच लायनीत लटकवलेले होते. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 28/08/2008 - 02:40
मोठ्या वर्गातली मुले 'धवला' ऐवजी वेगळा शब्द वापरत असत. मात्र आणीबाणीमुळे त्या शब्दाचा उल्लेख करत नाहीये. आपला, (शिशुवर्गातला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

भास्कर केन्डे 28/08/2008 - 20:40
मित्रवर्य अजानुकर्ण, बर्‍याच महिन्यांनी आपला चर्चा-संपर्क पुन्हा सुरु झाल्याचा आनंद होत आहे. पोप महाशय कोण लागून गेले आहेत ज्यांच्या माफीने मला भले बुरे वाटावे? - - तसे सुदैवाने अजूनतरी भारतात (काही राज्ये वगळता) दैनंदिन जीवनात त्यांच्या वक्तव्याचा जास्त परिणाम होत नाही. परंतू जागतिक स्तरावर त्यांच्या वक्तव्याच्या मोठमोठ्या बातम्या होतात व करोडो लोक या बातम्यांवरून त्यांची मते बनवत असतात. या बातमी मध्ये जागतीक स्तरावर असे मत बनत आहे की भारतीय लोक (हिंदू) ख्रिश्चनांना खूप त्रास देत आहेत. कारण बहुतांश बातम्यांमध्ये स्वमीजींच्या हत्येचा पुसटसा उल्लेख असतो. मात्र चर्चेस जाळल्याला खूप मोठे महत्व देऊन सांगितले जाते. ग्राहम स्टेन्सच्या हत्येच्या वेळी नेमके उलटे झाले होते. त्याच्या हत्येची बातमी खूपच मोठी करुन सांगितली जात होती मात्र त्याचवेळी ख्रिश्चनांच्या धर्मपरिवर्तनाच्या कृत्यांचा साधा उल्लेखही नव्हता. याचा उपयोग करुन पाश्चात्य देशातल्या चर्चेसने भारतीय ख्रिश्चनांबद्दल सहानुभुतीची लाट निर्माण करून मोठमोठे निधी उपलब्ध करुन भारतात पाठवले होते. बिचार्‍या पाश्चात्य श्रद्धाळूंच्या पैशांचा वापर कसा होत आहे ते आपण पाहतोच. पिझ्झा/बर्गर/स्यांडविच का? - -हो, बर्गर, स्यांडविच, ब्रेड-बटर, वगैरे.मागच्या महिन्यात मी स्वतः जालन्याच्या सर्वांत नामांकित शाळेत हे चित्र पाहून आलो. मागच्या वर्षी याच शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता ती बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या शाळेत अजूनही टिकल्या, बांगड्या, टिळा याला बंदि आहे. आपले हिंदू लोक मोठे च्याप्टर आहेत पैशासाठी धर्म बदलून घेतील आणि घरात गुपचूप गणपतीचीच पूजा करतील - - दुर्दैवाने हे केवळ एक्-दोन पिढ्यांपुरतेच राहते. पुढे ते कट्टर हिंदूविरोधक बनतात हा अनुभव आहे. आमच्या गावचे उदाहरण - ५-६ पिढ्यांपूर्वी निजामाच्या दरबारात नोकरीला असणारे एक कुटुंब मुसलमान झाले होते तरी ते सगळे सणवार साजरे करीत. (आता त्यांची ७-८ घरे आहेत) पण मागच्या २०-२५ वर्षात हे सगळे पालटले आहे. त्यांची मुले शिकायला शहरात गेली व त्यांना इतर मुस्लिमांचा सहवास मिळाला. आता ते सण-वार साजरे करीत नाहीत तर रोजे करतात. त्यांनी नवीनच बांधलेल्या छोटेखाणी मशिदीसमोरुन गणपतीच्या मिरवनुकीतल्या वाद्यांना बंद करण्याची मागच्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विनंती केली. लक्षात घ्या, मी स्वतः त्यांच्या बाप्-काकांना गणपतीत नाचताना बघितले आहे. त्यांची संख्या वढल्यास विनंती ही संघर्षात बदलू शकते असे नाही वाटत का आपल्याला? त्यामुळे तुम्ही सांगितलेले उदाहरण जरी सुखवाह असले तरी ते क्षणभंगूर आहे. त्याने धोका टळत नाही.

मदनबाण 28/08/2008 - 03:59
भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही. १००% सहमत..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
>>मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही... मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे. मला वाटतं की, वर उल्लेख केलेले प्रकार सर्वच मिशनरी शाळांमधून होत नसावेत. मी स्वतः एका मिशनरी शाळेत शिकलो आहे. परंतु, माझ्या शालेय जीवनातील अनुभव वर उल्लेख केलेल्या अनुभवांपेक्षा फारच वेगळे होते. वरिलपैकी कोणताही अनुभव मला तरी कधीही आलेला नाही किंवा कोणाहि सहविद्यार्थ्यां/विद्यार्थिनीं कडून कधी ऐकला नाही. उलट, आमच्या शाळेत सर्वधर्मसमभावाचीच शिकवण दिली जात असे. कोणाही विद्यार्थ्याला केवळ त्याच्या धर्मामुळे त्रास झाला, हे मी तरी पाहिले किंवा ऐकले नाही. आमच्या शाळेत सगळ्या धर्मांचे सण तेव्हढ्याच ऊत्साहाने साजरे होत. तसेच, सगळ्या वर्गांना नितीशास्त्राचाही एक तास असे. त्यात बर्‍याचदा सगळ्या धर्मांबद्दल खुली चर्चा होत असे. आमचे शिक्षकही कोणासही त्याच्या धर्मामुळे वेगळे वागवत नसतं. इतकचं काय तर आमच्या बहुतेक सगळ्या ख्रिस्ति शिक्षिकासुद्धा हिंदु शिक्षिकांप्रमाणेच गळ्यात मंगळसुत्र इत्यादी दागिने घालत. आणि आमच्यावर बायबल वाचण्याची देखिल कधी सक्ति झाली नव्हती. बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" वगैरे तर दुरचं राहिलं. तेव्हा तुम्ही केलेलं विधानं सर्वच मिशनरी शाळांबद्दल खरे नाही. मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

भास्कर केन्डे 28/08/2008 - 20:46
मला वाटतं की, वर उल्लेख केलेले प्रकार सर्वच मिशनरी शाळांमधून होत नसावेत. - - खरं आहे. पण दुर्दैवाने हे असले प्रकार आताशा बरेच 'कॉमन' झाले आहेत. वरिलपैकी कोणताही अनुभव मला तरी कधीही आलेला नाही किंवा कोणाहि सहविद्यार्थ्यां/विद्यार्थिनीं कडून कधी ऐकला नाही. - - तुम्ही नशिबवान आहात. सद्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर एखाद्या नवीन व महागड्या मिशणरी शाळेत जाऊन बघा. ख्रिस्ति शिक्षिकासुद्धा हिंदु शिक्षिकांप्रमाणेच गळ्यात मंगळसुत्र इत्यादी दागिने घालत. - - कदाचित नवख्रिस्ती (म्हणजे २-३ पिढ्यांच्या आतले) असतील. तेव्हा तुम्ही केलेलं विधानं सर्वच मिशनरी शाळांबद्दल खरे नाही. - - बरोबर आहे. पण ज्यांच्याबद्दल खरे आहे त्यांना या समाजविरोधी वागण्यांपासून रोखायला नको का? आम्हाला तुमच्या शाळेसारख्या शाळांचा मनापासून आदर आहे.

रामदास 28/08/2008 - 07:58
नागपूरला मिशन बोर्डाच्या शाळेत झालं. असे नियम तिथं नव्हते. प्रार्थना हे आकाशातल्या बापा... प्रभू तू माझा मेंढपाळ वगैरे होत्या पण त्या खटकल्या नाहीत. या शाळेनी दिलेलं शिक्षण मला कदाचीत दुसर्‍या शाळेत मिळालं नसतं.असं म्हणण्याचं कारण असं की १९६७ साली त्यांनी आमच्यासाठी स्कॉलरशीपचे क्लासेस सुरु केले होते. ख्रिस्ती शाळेत असल्याचा जाच कधीच झाला नाही.

In reply to by रामदास

भास्कर केन्डे 28/08/2008 - 20:46
आम्हाला तुमच्या शाळेसारख्या शाळांचा मनापासून आदर आहे.

ऋषिकेश 28/08/2008 - 22:35
भास्करराव सर्वप्रथम विषयाच्या नेटक्या मांडणी बद्दल अभिनंदन. मी ही लेखात म्हटलेले प्रकार ऐकलेले / पाहिलेले आहेत. तेही मुंबईत. सणः मी स्वतः मराठी माध्यमात (८वी नंतर सेमी इंग्रजी) शिकलो. शाळेत कर्ण म्हणतो त्याप्रमाणे याकुन्देच होतं असे. परंतू समाजात साजरे होणारे सण शाळेत साजरे होतच असत. जसं संक्रांत, दहिहंडी (अगदी मटका लाऊन फोडण्याचा कार्यक्रम असे), गणपती, ख्रिसमस सारे सण साजरे होत असतं (अर्थात ईद साजरी केल्याचं आठवत नाहि. पण तीच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी त्यासंबंधी फळ्यावर माहिती वगैरे असायची ). मिशनरी शाळांमधे मी तरी अजून संक्रांत, गणपती, दहिहंडी, ईद हे सण साजरे झालेले ऐकले नाहिए. दिवाळीला केवळ १ दिवस सुट्टी बर्‍याच मिशनरी शाळांना असते. (त्यातही भाऊबीजेच्याच दिवशी पेपर दाखवण्याचा कार्यक्रम ठेऊन आमच्या जवळच्या एका शाळेने ७-८ वर्षांपूर्वी रोष ओढवून घेतला होता.) याशाळेतील मुलांना एखाद गोष्ट अशी मिळायची की आम्हाला त्यांचा हेवा वाटायचा. पण आम्ही जो प्रत्येक सणाचा आनंद शाळेतही लुटला त्याला ते नक्कीच मुकले भारतीय व्यंजनं: बर्‍याच मिशनरी शाळांमधे सध्या डबा द्यायची गरज नसते (मुंबईत). शाळेत मुलांना सकाळी केक्स, कॉर्न्फ्लेक्स, सँडविचेस, सलाड्स असे खाणे मिळते. बाकी मराठी शाळांमधेही सरकार सक्तीमुळे जेवण मिळू लागले आहे. साधारणतः त्यात डाळ-तांदुळाची खिचडी- कोशिंबीर वगैरे प्रकारचा मेनु असतो. सध्याचे शहरी राहणीमान बघता दोन्ही ठिकाणच्या खाण्याला योग्य म्हणता येईल / यावे. परंतू निमशहरी/ग्रामीण भागातही मिशनरी शाळांत असे होत असल्यास नवल वाटले. इतर धर्मांची ओळखः आमची शाळा इ.४थीच्या विद्यार्थ्यांसाठी २ दिवसांचे निवाशी शिबीर भरवते. त्यात एक भाग धर्माची ओळख असा असतो. त्यासाठी दरवर्षी एक या क्रमाने हिंदू/मुसलमान/ख्रिश्चन/पारशी या धर्माच्या अभ्यासकांना (जे मुलांना त्यांच्या भाषेत थोडक्यात माहिती देऊ शकतील/शकतात) बोलावले जाते. कोणत्याही मिशनरी शाळेत असे होत असल्याचे ऐकीवात नाहि टिपः मी इंग्रजी माध्यमांच्या शाळांबद्दल म्हणत नसून मिशनरी शाळांबद्दल लिहिले आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

छोटा डॉन 28/08/2008 - 22:46
ॠषिकेशा, एकदम फक्कड लिहले आहेस ...
सध्याचे शहरी राहणीमान बघता दोन्ही ठिकाणच्या खाण्याला योग्य म्हणता येईल / यावे. परंतू निमशहरी/ग्रामीण भागातही मिशनरी शाळांत असे होत असल्यास नवल वाटले.
लै लै लै वेळा सहमत ...
टिपः मी इंग्रजी माध्यमांच्या शाळांबद्दल म्हणत नसून मिशनरी शाळांबद्दल लिहिले आहे
अगदी परफेक्ट !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वेताळ 29/08/2008 - 10:41
इंग्रजी माध्यमातील शाळा व मिशनरी शाळा ह्या बाबत गल्लत करु नका. आज काहिजणाना मिशनरी शाळेचा चांगला अनुभव आला असेल म्हणुन त्यांना त्या शाळा विषयी प्रेम निर्माण झाले आहे. हिच सहानुभुती त्याना तुमच्या कडुन अपेक्षीत होती. आता तुमच्या मुलांकडुन त्याना ह्याच्या पुढची पायरी म्हणजे येशु बद्दल प्रेम आणि ख्रिसमस साजरा करणे अपेक्षीत आहे.म्हणजे तुम्ही ख्रिच्नन व्ह्ययला त्याना सुपिक भुमी देत आहात.मला खुप अनुभव आला आहे मिशनरी शाळेत शिकणारया बरयाच जणाना हात जोडुन नमस्कार करतात हे माहित नाही तर देवळात गेल्यावर देखिल ते छातीवर क्रोसची खुण करतात हे सगळे नकळत घडत असते.म्हणुन सावध राहणे गरजेचे आहे.

In reply to by वेताळ

भास्कर केन्डे 29/08/2008 - 19:16
वेताळबाबा, तुम्ही आगदी मोजक्या शब्दात कळीचा मुद्दा समजाऊन सांगितलात. मला पण हेच सांगायचे होते पण तुमच्याप्रमाणे चपखल जमले नाही. धन्यवाद! आपला, (सहमत) भास्कर आम्ही येथे वसतो.
फक्त धर्म बदलला तर कही फर्क पडत नाही .. पण ९९.९९ % वेळा धर्मान्तर हे राष्ट्रान्तर होते .. ही खरी समस्या आहे RNI (Resident NON Indian) तयार होतात :((( मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

भास्कर केन्डे 29/08/2008 - 19:19
मनोरंजनाच्या अनभिषक्त राजा, तुमचे म्हणने बरोबर आहे. पण जरा खुलासा करून उदाहरणांसहित सांगायचा प्रयत्न केलात तर तो जास्त उमगेल. आपला, (एन. आर. आय.) भास्कर आम्ही येथे वसतो.

प्रभाकर पेठकर 30/08/2008 - 17:55
श्री. भास्कर केन्डेह्यांच्या मुळ लेखाशी सहमत आहे. टिकली न लावणे, बांगड्या न वापरणे आदी हिन्दू धर्म चिन्हांना मुंबईतल्याही मिशनरी शाळांत बंदी आहे. बोरिवलीच्या मेरी इमॅक्यूलेट शाळेत माझ्या भाचीने हे अनुभव घेतले आहेत.

विकास 31/08/2008 - 02:15
आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते? (या प्रतिसादात धर्म हा शब्द रिलीजन, रुढी या मर्यादीत अर्थी वापरत आहे) सर्व प्रथम माझ्या मते (आणि तसेच मी आचरण पण करतो), धर्म ही व्यक्तिगत बाब आहे. याचा अर्थ केवळ "इतरांच्या धर्मात अथवा रुढीपद्धतीत" आपण/मी लक्ष घालू नये इतका मर्यादीत घेऊ नका. जे काही देव, धर्म, पूजाअर्चा, आणि त्या संबंधात मी करेन त्याचा इतरांना त्रास होता कामा नये आणि इतरांचा मला त्रास होता कामा नये. मग जेंव्हा वरील अर्थाने मी भास्कररावांनी वर पोप संदर्भात विचारलेला प्रश्न पहातो तेंव्हा सर्वप्रथम मी एक हिंदू म्हणून स्वतः काय करतो, करू शकतो याचा विचार करतो:
  1. मी देवदेवतांची पूजा करतो पण इतर कोणी त्यांच्या व्यैतिरीक्त कशाची पूजा करत असतील अथवा कशाचीच करत नसतील तर त्याला विरोध करत नाही, त्यांना माझ्या सारखे वागायला सांगत नाही. पण त्यांनी तसे करायचा प्रयत्न केला तर तो मात्र विरोधून मोडायचा किमान माझ्यापुरता प्रयत्न करतो.
  2. मला संतमहंत आवडत असतील बरेचसे शतकांपूर्वीचेच आहेत आणि त्यांची सारासार शिकवणूक ही भूतदया आहे मग ती शिकवताना कधी त्यात राम तर कधी विठोबा का आला असेना.
  3. मला आठवत तरी नाही की मी कुठल्या संतमहंताला अथवा साधूपुरूषाला ज्याच्या मागे बरीच लोकसंख्या आहे असे आणि जे हयात आहेत असे, कधी भेटलो. अपवाद फक्त सहावी-सातवीत असताना ठाण्याला कांचीकामकोटीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आले होते त्यांच्या समोर तमाम शाळांतील मुलांचा कार्यक्रम झाला त्यात होतो. पण त्यांनी थोडेफार त्यावेळेस अध्यात्मिक प्रवचन केले असेल - आठवण्यासारखे काहीच नाही...
  4. अमेरिकेत आल्यावर माझे दोघां-तिघांना बघणे/भेटणे झाले आहे. त्यात स्वामी चिन्मयानंद होते, आर्शविद्यागुरूकुलमचे (पेन्सिल्व्हेनियात आहे) स्वामी दयानंद सरस्वती आहेत आणि रामकृष्ण मिशनचे आता ९३+ असलेले स्वामी सर्वगतानंद आहेत. स्वामी सर्वगतानंदांना २-३ वेळेस व्यक्तिगत भेटायचा योग आला आहे. यातील शेवटच्या दोघांनी मला (अध्यात्मिक दृष्ट्या नाही, पण) विशेष प्रभावित केले. तरी तिघांनिही असे कधी काहीच या हिंदू धर्मासाठी, परक्या देशात सांगितले जेणे करून मी इतर धर्मियांना अथवा,मला असलेल्या परधर्मांनाच तुच्छ मानेन तसेच त्यांनी या परक्या देशासंदर्भात पण कधी काही चुकून देखील वाईट अर्थ निघेल, त्याचे वाईट होईल असले विचार चिंतले नाहीत.
  5. जर असे धर्मगुरू मला भेटले असते जे स्वधर्मियांना शहाणे आणि परधर्मियांना कमी लेखत आहेत, स्वतःच्या अनुयायांमधे इतरांसंदर्भात चुकीचा अर्थ सांगत आहेत तर त्यांना मीच काय पण अनेक श्रद्धावंतांनी (मी स्वतः या संदर्भात श्रद्धावंत आहे का या संदर्भात मला खात्री नाही) धुडकावून लावले असते.
बहुसंख्य श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू हिंदू, स्वतःस नास्तिक सम़जणारे, अज्ञेयवादी आणि कायद्याने हिंदू (म्हणजे बौद्ध, शिख, जैन आदी) असलेले, असे सर्वच थोड्याफार फरकाने वरील प्रकारात मोडत असतील. अर्थात तसेच अनेक इतर धर्मियपण असतील असे वाटते. शिखांच्या संदर्भातपण अगदी १९८०-९० च्या दशकातील अतिरेकी कारवाया लक्षात घेतल्या तरी असेच म्हणावेसे वाटते. आता या संदर्भात मी पोप-ख्रिश्चॅनिटी यांचा भारतासंदर्भात विचार करतो. मला नक्की त्यात काय गंभिर वाटते?
  1. सर्वप्रथम कॅथलीक ख्रिश्चॅनिटी हा धर्म म्हणून "जागृक (लाईव्ह)" धर्मसंस्थेच्या आदेशावर चालणारा धर्म आहे. त्याच्या ऐतिहासीक मूळात पण धर्मांतर करून स्वत:च्या (म्हणजे धर्मसंस्थेच्या) अख्त्यारीत जग आणणे - थोडक्यात नियंत्रण / कंट्रोल आणणे दिसते...
  2. याचाच दुसरा अर्थ असा की धर्मसत्ता, ती ही परकीय, ज्याला आपल्या संदर्भात, भारतीय भूभाग, त्यातील माणसे, इथली सांस्कृतीक श्रीमंती याचे कशाचेच काही पडलेले नाही. सर्वात मुख्य म्हणजे राजसत्तेवर नियंत्रंण जिथे जिथे शक्य आहे तेथे आणण्याचा प्रयत्न करते.
  3. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की पोप आणि व्हॅटिकन ही जशी धर्मसत्ता आहे तशीच त्यालाच राजसत्ता म्हणून २०व्या शतकात मानले गेले आहे. थोडक्यात जेंव्हा रोमन कॅथलीक ख्रिश्चन व्यक्ती जेंव्हा पोपचे नेतृत्व मानते तेंव्हा ते नेतृत्व हे एका परकीय राजसत्तेचे पण असते. त्यात मध्यपूर्वेतील येशूचे देवपण अथवा देवपुत्रपण मानण्याच्या धार्मिक भागपेक्षा नकळत युरोपातील इटालीयन राजकीय भाग जास्त आहे - जरी ते जनसामान्यातील ख्रिश्चनांना समजत नसले तरी. (यातील "इटालीयन" हा केवळ योगायोग!)
  4. माझे अनेक ख्रिश्चन मित्र अगदी कुटूंबमित्र आहेत जे मला मोठ्या भावासारखे आहेत आणि माझ्या रक्ताच्या नात्यातील इतर अनेकापेक्षा देखील ते जास्त जवळचे आहेत. त्यांचे देश हा देवा आधी आणि पोपचा त्यात काही संबंध न ठेवणे स्पष्टपणे जाणवते. पण ते झाले मुंबई-पुण्याचे.... तीच कथा गोव्याच्या ख्रिस्ती बांधवांची, थोड्याफार फरकाने असावी.
  5. पण हेच जेंव्हा आपण पूर्वेकडे आणि वनवासि भागात जातो तेंव्हा गोष्टी बदलतात. आज इशान्येकडील राज्ये आणि त्यात चालू असलेल्या अतिरेकी कारवाया या जशा कम्युनिस्ट अतिरेक्यांशी संबंधीत आहेत तशाच त्या ख्रिस्ती अतिरेक्यांशी संबंधीतपण आहेत. त्यांना हा देश, ही संस्कृती आपली न वाटावी इतके त्यांचे "ब्रेन वॉशिंग" करण्यात आले आहे.
  6. यावर असे कोणी म्हणू शकेल की हिंदूंनी आधी दुर्लक्ष केले मग मिशनर्‍यांनी त्यांना जवळ केले तर त्यात काय चुकले? याच संदर्भात माझे म्हणणे आहे की धर्म हा व्यक्तिगत आहे.
  7. तेथे कॅथलीक मिशनरी केवळ धर्मप्रचारासाठीच गेले नाहीत तर त्याचा संदर्भ हा राजकीय महत्वाकांक्षेशी आणि सांस्कृतिक नाळ तोडण्यासाठी लावला. मग ते केवळ नावच जॉन होत नाही तर लिपीपण रोमनच असावी हा हट्ट सुरू होतो. मग येशूलाच मानणे म्हणजे बरोबर, मुर्तिपूजक वाईट अथवा मागासलेले असे म्हणत जे काही तत्वज्ञान तयार झाले ते रसातळाला नेण्याचा सातत्याने यत्न करणे चालू होते.
  8. परीणामी भारतासाख्या देशाची महासत्ता होण्याच्या आधीच महाशकले करण्याचा डाव रचणे असे उद्देशा आहेत असे जर कुणाला वाटले तर त्यात गैर काय?
  9. याचा अर्थ मी काही ख्रिस्ती धर्माच्या विरोधात आहे अथवा भारतात केवळ हिंदूधर्मच असावा अथवा भारत फक्त हिंदूंचाच आहे असे म्हणतोय असा कृपया घेऊ नका. कारण तो स्वप्नात देखील उद्देश नाही.
  10. पण मला असे वाटते की जर इंग्लंड स्वतःला पोप पासून बाजूला लोटून स्वत:चे ख्रिश्चनत्व टिकवू शकते, कॅथलीक रहाण्याऐवजी प्रोटेस्टंट होवून एक प्रबळ आअणि स्वतंत्र राज्य होऊ शकते तर भारतातील ख्रिस्ती बांधवांना तसेच भारत हा देश मानून आणि आकाश सर्वत्र सारखे आहे तर आकाशातील बाप सर्वत्र जमिनीवरील धर्मसत्तेच्या मदतीविना केवळ धर्म आचरूनपण भेटू शकतो असे का वाटू नये?
  11. "आमचा देव/प्रेषित येशू तर आमचा देश हा भारत आहे. पोप आमचा धर्मबांधव असू शकेल पण त्याचे वर्चस्व मानणे हे एका स्वतंत्र देशाचे मूळचे नागरीक म्हणून परतंत्र असल्यासारखेच वाटते" इतके वाटायला काहीच हरकत नाही.
  12. कधी काळी दक्षिण अमेरिकेत मिशनरी गेले आणि स्थानिक संस्कृती लयास गेली - तेथे दडपशाही आणि कृर हिंसा ही ख्रिस्ताची करूणा आणि सेवाभाव समजवण्यासाठी वापरली गेली. तीच अवस्था कधीकाळी गोव्यात पण झाली. तेच अफ्रिकेत. थोड्याफार फरकाने तेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका/कॅनडा मधील नेटीव्ह अमेरिकन्सच्या संदर्भात. ..
  13. कारणे अनेक आहेत, विविध आहेत पण भारतात ह्याला हवे ते यश येउ शकले नाही. पोर्तुगिजांची कृर राजवट गोव्यातील मंगेशीला दूर लोटू शकली नाही की ब्रिटीशांची सत्ता ही संकृतीचा र्‍हास करू शकली... किंबहूना या संस्कृतीनेच ब्रिटीशांना आजही ६१ वर्षांनी भारताबद्दल आकर्षित ठेवले आहे, असे जेंव्हा ब्रिटीश भेटतात अथवा त्यांचे वाचले जाते तेंव्हा माझ्या मर्यादीत निरीक्षणावरून वाटते.
  14. तरी देखील आज पोपसंदर्भात आणि परकीय म्हणून, पण परधर्म म्हणून नाही, हीच "रोमन कॅथलीक" या नावाखाली पोपचे वर्चस्व मानणारी धर्मसत्ता, आपली जिद्द न सोडता भारताचा, इतर विकसनशील राष्ट्रांप्रमाणेच कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात यावेळेस त्यात दडपशाही नसून ज्या गोष्टीचा तमाम सुशिक्षित भारतीयांना अभिमान आहे, गर्व आहे त्याचा व्यवस्थित वापर करून - ते म्हणजे आम्ही कसे निधर्मी, आदर्श, बुद्धीवादी आहोत, ह्या अहंकाराचा.
  15. थोडक्यात एका वाक्यात मला वाटते की गेले काही दशके आपल्यावर "इंटलेक्च्युअल इन्वेजन" होत आहे....मॅकॉलेची यशस्वी खेळी - या वेळेस ब्रिटीश साम्राज्यापेक्षा ख्रिस्ती धर्मसत्तेच्या स्वार्थासाठी -भौगोलीक वर्चस्वापेक्षा वैचारीक ताबा घेऊन
असो.... भास्कररावांच्या चर्चेतील पोप संदर्भातील मुद्दे हे पोटतिडकीने लिहीले असल्याने त्यातील विचार न समजता आपण त्यातील भावनांच्या उद्रेकासंदर्भातच काही अंशी चर्चा करत नाही आहोत ना?

In reply to by विकास

३_१४ विक्षिप्त अदिती 31/08/2008 - 08:37
विकास, तुमचा प्रतिसाद आवडला. वाचून एक प्रश्न पडलायः कायद्याने हिंदू (म्हणजे बौद्ध, शिख, जैन आदी) हे मला नीटसं समजलं नाही. याचा अर्थ काय? हिंदू विवाह कायदा आणि संपत्ती वाटप कायदा बौद्ध, शीख आणि जैनांना लागू होतो असं का? अदिती "इटालीयन" हा केवळ योगायोग .... मस्त!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 31/08/2008 - 09:24
धन्यवाद अदिती! कायद्याने हिंदू (म्हणजे बौद्ध, शिख, जैन आदी) हे मला नीटसं समजलं नाही. याचा अर्थ काय? हिंदू विवाह कायदा आणि संपत्ती वाटप कायदा बौद्ध, शीख आणि जैनांना लागू होतो असं का? आठवते त्या प्रमाणे घटनेच्या कलम २५(?)(?) मध्ये आंबेडकरांनीच बौद्ध, शिख आणि जैन यांना हिंदू नागरी कायद्यामधे सामिल केले. हे त्यांनी स्वतः धर्मांतर करण्याच्या आधी केले. जेंव्हा शिखांनी त्याला विरोध केला/नाराजी दाखवली तेंव्हा त्यांनी सांगितले की बुद्धानी हिंदू धर्म (रिलीजन)शी जी फारकत घेतली ती तत्वज्ञानापुरती मर्यादीत होती, त्याने इतर सांस्कृतिक अलगतावाद केला नाही. तीच गोष्ट महाविराची आणि दहा शिख गुरूंची होती. म्हणून त्यांना कायद्याने हिंदू नागरीकच समजले आहे. तसेच, जे स्वतःला नास्तिक समजतात अथवा कम्युनिस्ट असल्याने धर्मच मानत नाहीत त्यांना नागरी कारणानिमित्ताने धर्मग्रंथावर आधारीत नसलेल्या हिंदू सिव्हील कोडमधेच सामिल केले. थोडक्यात (दोन्ही बाजूंना) आवडो न आवडो, ते हिंदूच!

In reply to by विकास

भास्कर केन्डे 03/09/2008 - 02:11
श्री. विकास, आपल्या लेखनात खोली असते ती ही अशी. एक महत्वाचा मुद्धा व्यवस्थीत व सोप्या भाषेत उकल करून सांगितलात. ख्रिस्ती धर्माचे पालन करने व पोपला मानने या गोष्टी वेगवेगळ्या कशा आहेत व त्याची नाळ राष्ट्रधर्माशी कशी जोडली गेलेली असते हे चांगले समजले. प्रतिसाद प्रभावी आहे हे सांगने न लगे. आपला, (प्रभावित) भास्कर आम्ही येथे वसतो.