Skip to main content

इतिहास बदल !

लेखक चिनार
सोमवार, 22/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
१९९५ ते २००१ या काळात मी पाचवी ते दहावी शिक्षण पूर्ण केले. माझ्यापेक्षा ३ वर्ष मोठय असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सातवी /आठवीला (नक्की आठवत नाही) इतिहासाच्या पुस्तकात पेशव्यांचा इतिहास अभ्यासाला होता. त्यानंतर १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध आणि नंतर भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असा त्यांना अभ्यासक्रम होता. पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर मधला २00-३०० वर्षांचा काल वगळून डायरेक्ट १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध होते. पाचवी ते दहावी या काळात आम्ही फक्त भारतीय स्वातंत्र्ययुद्ध शिकलो. त्यातही जास्तीत जास्त भर फक्त महात्मा गांधी यांच्यावर. म्हणजे धड्याचा नाव आणि क्रमांक सुद्धा बदलत नसे. पेशव्यांचा गौरवशाली इतिहास का वगळण्यात आला यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का ?

वाचने 8754
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आम्हाला पेशव्यांचा इतिहास होता.

मी २००३ साली दहावी पासौट झालो. मला आठवते त्याप्रमाणे यत्ता ५वी, ८वी आणि १०वीला हा स्वातंत्र्यलढा अभ्यासाला होता-त्यातही पहिले ५ धडे महायुद्ध होते, मग नंतर तेच ते नेहमीचे दळण. नववीत वर्ल्ड हिस्ट्री, इजिप्त, पिरॅमिड, नेपोलियन, वगैरे वगैरे. सहावी-सातवीला शिवाजीमहाराज चौथीनंतर पुन्हा एकदा होते. तेव्हा पेशवेही बहुधा होते, कारण फक्त शिवाजीमहाराज नव्हते इतके आठवतेय...पाहिले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

आमच्या अभ्यासक्रमात पेशवे नव्हते. मी अमरावतीला शिकलो. पुणे , सातारा इथल्या समवयस्क मुलांना सुद्धा पेशवे अभ्यासक्रमात असल्याचे आठवत नाही. १८५७ च्या लढ्यात नानासाहेब पेशव्यांचा पुसटसा उल्लेख होता. पण पहिले बाजीराव, दुसरे बाजीराव, नाना फडणवीस , "काका मला वाचवा" वैगेरे गोष्टींचा उल्लेखही नव्हता.

In reply to by बॅटमॅन

७ वी ला होता मध्ययुगीन भारताचा इतिहास अगदी चोळ, पांड्य पासून १८१८ पर्यत. त्यात पेशव्यावरती १ का २ धडे होते आणि पेशव्याच्या काळच्या मराठा सरदाराचा १ धडा होता. त्या पुस्तकातल पहिल्या बाजीराव पेशव्यांच चित्र छान होत

नेमकी पेशव्यांकडे सर्व सत्ता कधी आली? राजारामनंतर सत्तेचा क्रम ( आणि पेशव्यांचाही) कसा राहिला हे कूणी तरी सांगावे. मी २०१० ला दहावी पास झालो. पेशव्यांबद्दल तुलनेने काहीच नव्हते आम्हाला.

In reply to by शब्दानुज

माझ्या तोकड्या माहितीनुसार साधारण असे झाले: १. राजाराम महाराजांनंतर ताराराणीकडे सत्ता गेली. ताराराणीदेखील मुघलांना शरण गेली नाही. २. साधारण त्याच सुमाराने मराठ्यांमध्ये दुही माजवण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने त्याच्या कैदेत असलेल्या शाहूला सोडले (मात्र त्यांच्या आईला नाही) ३. शाहू महाराज संभाजीराजांचे पूत्र असल्याची सरदार मंडळींची खात्री झाली. मात्र इतका केळ औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या शाहूला राज्य देण्यास बर्‍याच सरदारांचा विरोध होता. ४. याकाळात त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या काही लोकांमध्ये पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट होता. त्यांनाच पुढे पेशवा केले गेले. ते पहिले पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ भट यांच्या काळात स्वतः शाहू राजे बर्‍यापैकी सक्रीय होते. नंतर त्यांनी हळूहळू सत्ता पुर्णपणे पेशव्यांच्या ताब्यात दिली. ५. शाहूंना पुर्ण साम्राज्याची सत्ता मिळाली नव्हती. ताराराणीने कोल्हापूरची गादी स्वतःकडे ठेवली तर सातार्‍याच्या गादीवर शाहूने हक्क प्रस्थापित केला. ६. ताराराणीने तिच्या मुलाला शिवाजी २ याला गादीवर बसवले. शिवाजी २ चे पुढे काय झाले माहिती नाही पण बहुधा ते अकाली मृत्यु पावले. ७. ताराराणीच्या एककल्ली कारभाराला वैतागलेल्या सरदारांनी नंतर राजाराम महाराजांच्या दूसर्‍या पत्नीला राजसबाईला पुढे केले. राजसबाईने ताराराणीला पदच्युत करत तिच्या मुलाला म्हणजे संभाजी २ ला गादीवर बसवले. शिवाजी २ आणी संभाजी २ यापैकी एक कुणीतरी मानसिक दृष्ट्ञा अपात्र होते तर दूसरे अकाली मरण पावले ( याबाबत नक्की माहिती नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा) ८. ताराराणी शाहूच्या आश्रायाला गेली आणी शाहूच्या मृत्युपर्यंत सातार्‍यातच राहिली अर्थात तिच्याकडे कुठलेही पद नव्हते. शाहूच्या मृत्युनंतर तिने तिचा नातू रामराजा याला गादीवर बसवले. नंतर तो तिचा नातू नाहिच असा कांगाव करत त्याला मरेपर्यंत तुरुंगात देखील डांबले (याबद्दलदेखील अजुन माहिती हवी). ९. शाहू महाराजांच्या हयातीतच बाळाजी विश्वनाथ भट आणि पहिला बाजीराव मरण पावले. १०. बाळाजी विश्वनाथ भटांनी शाहू महाराजांना राज्य मिळवण्यास मदत केली होती. हे कार्य त्यांनी धनाजी जाधवांच्या (संताजी - धनाजी पैकी) आज्ञेवरुन केले होते. धनाजी जाधवांचे मन शाहू महाराजांना मदत करण्यासाठी वळवण्यामागे बाळाजी विश्वनाथ होते असे म्हणतात. ११. धनाजी जाधव शाहू महाराजांच्या राज्यात सेनापती झाले तर बाळाजी विश्वनाथ अमात्य. धनाजी जाधवांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलाकडे चंद्रसेन जाधव यांच्याकडे सेनापतीपद गेले. त्याच्यात आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात मतभेद होते. त्यांनी तीव्र स्वरुप धारण केले आणि चंद्रसेन जाधवने बाळाजी विश्वनाथ ला मारण्यासाठी मारेकरी सोडले. बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांकडे आश्रयाला गेले. शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवला ते राजे असल्याची आठवण करुन दिली आणि हाजीर होण्यास फर्मावले. पण चंद्रसेन जाधव उलट ताराराणीला जाउन मिळाला. त्याच्या बरोबर अर्थात फौज होती. १२. शाहू महाराजांच्या आज्ञेवरुन बाळाजी विश्वनाथ यांनी जाधवांचे काही सरदार फितवले, नविन सैन्य उभे केले आणी मग चंद्रसेन जाधवांना हरवले. १३. चंद्रसेन जाधवांना ताराराणीने मदत केली होती हे लक्षात घेउन शाहू महाराजांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची आज्ञा बाळाजी विश्वनाथ यांना केली. त्यातुनच जे कारस्थान घडले त्यामुळे राजसबाईंकडे सत्ता गेली. १४. बाळाजी विश्वनाथ भट यांनी शिवाजी महाराजांची नीती पुढे चालवली आणी मुघलांची नामधारी सत्ता मान्य करण्याच्या बदल्यात गुजरात आणी सौराष्ट्र ची सरदेशमुखी आणी चौथ मराठ्यांच्या पदरात टाकली. याच काळात कर्नाटकावरची मराठ्याची सत्तादेखील मान्य करवुन घेतली. मुघल साम्राज्य खिळखिळे करुन आपले पित्तु दिल्ली दरबारात बसवण्याचा पहिला मान बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे जातो. १५. बाळाजी विश्वनाथांना दोन मुले होती बाजीराव आणि चिमाजी आप्पा. चिमाजी थोर रणधुरंधर होता मात्र बाजीराव केवळ सेनानी नव्हता तर प्रचंड मुत्सद्दी देखील होता. दोन्ही भावांमध्ये कमालीचे सख्य असुनही कर्तबगार असुनही दोघांमध्ये दुही माजु शकली नाही. बाजीरावाचे आणि चिमाजीचे कर्तुत्व सर्वांना माहितीच आहे. या बंधुद्वयीने मिळुन संपुर्ण मध्ये, पश्चिम आणी दक्षिण भारत (कर्नाटक आणि पुढील थोडा भाग) मराठा साम्राज्यास जोडले. दुर्दैवाने दोघेही भाऊ एका वर्षाच्या अंतराने अकाली निधन पावले. अन्यथा मराठी साम्राज्य चिरकाल टिकले असते. १६. पहिल्या बाजीरावाला नानासाहेब पेशवे आणि रघुनाथराव पेशवे असे दोन औरसपुत्र होते तर समशेर बहाद्दुर हा अनौरर पुत्र होता (मस्तानीपासुन). तर चिमाजी आप्पाला केवळ एक पुत्र होता सदाशिवराव भाऊ. १७. रघुनाथरावांनी अटकेपार झेंडे पटकावले. मात्र त्यांनी पानिपतच्या युद्धातुन अंग काढुन घेतले. त्यामुळे युद्धात इतर मान्यवर सरदारांबरोबर नानासाहेब पेशव्यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि सावत्रभाऊ समशेर बहाद्दर होते. सैन्याचे नेतृत्व सदाशिवरावभाऊंनी केले. भाऊ मोठे मुत्सद्दी आणी शूर खरे पण नियतीचे काही फासे उलटे पडले, काही सरदारांनी दगा दिला आणि काही निर्णय चुकले. सगळ्याचा परिपाक म्हणजे एक आख्खी पिढी पानिपतावर धारातीर्थी पडली. भाऊ, समशेर बहाद्दर आणि विश्वासराव तिघेही पडले. तेव्हापासुनच "विश्वास गेला पानिपतावर" ही म्हण रुढ झाली. १८. पानिपताच्या पराभवाचे आणी मुलाच्या आणी भावाच्या मृत्युचे दु:ख अनिवार होउन नानासाहेब पेशवे देखील वयाच्या ४१ व्या वर्षीच मृत्यु पावले. त्यांच्या पश्चात माधवराव आणि नारायणराव ही दोन मुले होती. १९. नानासाहेब पेशव्यांनंतर माधवराव पेशवेपदी आरुढ झाले. हा राजकीय अस्थैर्याचा काळ होता. नानासाहेब फडणवीसांचा राजकीय पटलावरचा उदय जरी आधीच झाला असला तरी उत्कर्ष याच काळातला. माधवरावांचा काळ मराठी साम्राज्यासाठी आर्थिकदृष्ट्य सुवर्णकाळ समजला जातो. माधवरावांना देता येइल तितका सर्व त्रास रघुनाथरावांनी दिला. दोघांनी एकमेकांना अटक करवुन पदच्युत करुन झाले. परंतु तांत्रिकदृष्ट्या माधवराव सर्वकाळ पेशवेपदी होते (काही काळासाठी रघुनाथरावाने त्याच्या मुलाला पेशवाईची वस्त्रे दिली होती पण सातार्‍याच्या गादीने त्याला मान्यता दिली नव्हती. हा मुलगा देखील काही काळात वारला). माधवरांवांच्या काळात पानिपताची झालेली सर्व हानी भरुन निघाली आणि मराठी साम्राज्य वैभवपदी पोचले. २०. माधवरावांच्या मृत्युनंतर नारायणरावांना पेशवे करण्यात नानासाहेब फडणविसांचा मोठा वाटा होता. मात्र नारायणराव अल्पजीवी ठरले. रघुनाथरावांनी त्यांच्या खून घडवुन आणला. तेव्हापासुन शनिवारवाड्यावर "काका मला वाचवा" अशी हाक ऐकायला मिळते असे म्हणतात. नारायणरावांचा खून ते रघुनाथरावांच्या हातात असतानाच झाला. असे म्हणतात की शेवटच्या क्षणी रघुनाथरावांनी गारद्यांना नारायणरावांना सोडवण्याची आज्ञा केली होती. परंतु बेफाम झालेल्या गारद्यांनी ती ऐकली नाही. नारायणरावांना मारण्यात गारद्यांचा स्वार्थदेखील होताच. २१. नारायणरावांनंतर रघुनाथराव स्वतः पेशवे झाले पण त्यांना नानासाहेब फडणवीसांनी पदच्युत करवले (बारभाई कारस्थान). त्यांच्याजागी सवाई माधवराव पेशवे झाले. परंतु ते देखील अल्पायुषी ठरले. २२. सवाई माधवरावांच्या काळात तांत्रिकदृष्ट्या सर्व कारभार साडेतीन शहाण्यांच्या ताब्यात होता. ( माझ्या माहितीप्रमाणे सखारामबापू, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठ्ल सुंदर असे तीन शहाणे आणि नानासाहेब फडणविस अर्धे शहाणे कारण ते तलवारबहाद्दर नव्हते. काही तज्ञांच्या मते ते इतर तिघांपेक्ष वयाने फार कमी होते म्हणुन त्यांना अर्धे शहाणे समजले जाते.) २३. सवाई माधवरावांनंतर पेशवेपदाला कुणी औरस वाली न उरल्याने नाइलाजाने नानासाहेब फडणवीसांनी रघुनाथरावांच्या दुसर्‍या मुलाला म्हणजेच दूसर्‍या बाजीरावाला पेशवेपद देवविले. सत्तेत जम बसवल्यावर बाजीरावाने पहिले काम केले म्हणजे नानासाहेबांना कैदेत टाकले. नानासाहेबांनी कैदेतच प्राण सोडले. २४. नानासाहेबांच्या मृत्युनंतर राजकारणावर पकड असणारे फारसे मुत्सद्दी उरले नव्हते. जे उरले होते त्यांना दूसर्‍या बाजीरावाने संपवले. इंग्रजांनी हळुहळू साम्राज्यावर पकड बसवली. बाजीराव काही काळ पुरता असहाय्य होता. शेवटी त्याने उचल खाल्ली आणि इंग्रजांविरुद्ध एक निकराचा लढा दिला. पण बिनीच्या सरदारांनी केलेला विश्वासघात आणि काही फिसकटलेले क्षण यांमुळे त्याचा पराभव झाला (१८१८ साल). आयुष्याची अखेरची काही वर्षे (तब्बल ३३) त्यांनी नजरकैदेत काढली. २५. दुसर्‍या बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब पेशवेपदी आरुढ झाले. हे पेशवेपद अर्थात नामधारी होते. जिथे राजाच नव्हता तिथे पेशवेपदाचा काय उपयोग. पण नानासाहेबांकडे १८५७ च्या उठावात मराठ्यांचे नेतृत्व आले. तात्या टोपे आणी त्यांनी मिळुन जोरदार लढत दिली. नंतर नानासाहेबांचे काय झाले ते माहिती नाहि. बहुधा त्यांनी संन्यास स्वीकारला. तात्या टोपे पकडले गेले आणि त्यांंना इग्रजांनी फाशी दिली. शेवटचा मराठा सरदार पडला आणी मराठी राज्य पुर्णपणे संपुष्टात आले. तसे ते १८१८ सालीच संपले होते. तळटीपः वरील माहितीत काही चुका असु शकतील. तरी ढोबळमानाने बरोबर असावे.

In reply to by मृत्युन्जय

माहितीपुर्ण उत्तम प्रतिसाद. यातील बर्‍याच गोष्टी माहिती नव्ह्त्या. मुद्दा क्र. १ ते १४ यासाठी एखादी लेखमाला सवड काढुन लिहा ही विनंती. अधिक तपशीलात वाचायला आवडेल.

In reply to by मृत्युन्जय

तब्बल काही शतकाचा इतिहास इतक्या संक्षिप्तपणे आणि तो ही इतका मुद्देसुद मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद . दंडवत स्विकारा महाराज !

In reply to by मृत्युन्जय

सत्तेत जम बसवल्यावर बाजीरावाने पहिले काम केले म्हणजे नानासाहेबांना कैदेत टाकले. नानासाहेबांनी कैदेतच प्राण सोडले. ......... अरेरे ! किती वैट हे ! सत्तेसाठी काहीही !

In reply to by मृत्युन्जय

काय सुरेख संकलन ...वा बुवा !!! फक्त २२. सवाई माधवरावांच्या काळात तांत्रिकदृष्ट्या सर्व कारभार साडेतीन शहाण्यांच्या ताब्यात होता. ( माझ्या माहितीप्रमाणे सखारामबापू, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठ्ल सुंदर असे तीन शहाणे आणि नानासाहेब फडणविस अर्धे शहाणे कारण ते तलवारबहाद्दर नव्हते. काही तज्ञांच्या मते ते इतर तिघांपेक्ष वयाने फार कमी होते म्हणुन त्यांना अर्धे शहाणे समजले जाते.) थोरल्या माधवरावांच्या विरुध्द निजामाकडून लढतांना विठ्ठल सुंदर महादेव सितोळे ह्याच्या कडून मारला गेला असा स्वामी काद्म्ब्रीत उल्लेख आहे ...

In reply to by मृत्युन्जय

चांगली माहिती!! फक्त काही मुद्दे मांडतो… राजाराम यांचा मृत्यू हि तत्कालीन मराठी साम्राज्यात पोकळी निर्माण करणारी घटना होती… १. १६८९ला संभाजी महाराजांना कैदेत टाकल्यावर काही महिन्यातच येसूबाई आणि शाहू महाराज यांनाही कैदेत टाकण्यात आले. राजाराम यांची शिताफीने रायगडावरून सुटका करण्यात आली त्यामुळे ते जिंजी ला जाऊ शकले. २. राजाराम यांची प्रकृती फारशी ठीक नव्हती पण तरीही त्या कालखंडात संताजी-धनाजी यांनी मुघल सैन्यावर आक्रमण करणे सुरु ठेवले होते ३. राजाराम यांच्या मृत्यू नंतर भक्कम नेतृत्व उप्लब्ध नव्हते तेव्हा ताराबाईनी कारभार आपल्या हातात घेतला (त्यांचा मुलगा शिवाजी मानसिक दृष्ट्या सक्षम नव्हता) ४. या कालखंडात शाहू महाराज तब्बल १८ वर्षे मुघल कैदेत राहिले. अर्थात त्यांना मान-सन्मान दिला गेला होता. बहुतेक ते सात हजारी मनसबदार होते. ५. पुढे १७०७ मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला, त्यावेळी शाहू महाराज आझम शाहच्या सोबत अहमदनगर येथे होते. आता दिल्ली मध्ये सत्तासंघर्ष अटळ होता, आझम शाह, बहादूर शाह या औरंगजेबाच्या मुलांमध्ये सत्तास्पर्धा होणार होती. त्यामुळे आझम शह ने उत्तरेकडे कूच केले. या दरम्यान मुघल सत्तेला मराठ्यांपासून धोका नको म्हणून त्याने नर्मदेच्या जवळ शाहू महाराजांची सुटका केली कि जेणे करून मराठ्यांमध्ये सत्तेवरून संघर्ष होईल . ६. अपेक्षेप्रमाणे ताराबाई आणि शाहू यांच्यात संघर्ष सुरु झाला. शाहू हा संभाजी राजांचा मुलगा होता आणि त्यामुळे सत्तेवर त्याचा हक्क होता. पण अनेक सरदार या मुद्द्यांवर विभागले गेले. ७. खंडो बल्लाळ यांनी संभाजी तसेच ताराबाई दोघांसोबातही काम पहिले होते त्यामुळे शाहू चा हक्क त्यांना माहिती होता. ते शाहूला सामील झाले. ८. पुढे खेडच्या युद्धात धनाजी यांचे मन वळविण्यात त्यांनी मोठी मदत केली. ९. बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आंग्रे यांना शाहुच्या बाजूने आणण्यात मोठी भूमिका बजावली.

मी १९८५ मध्ये दहावी झालो. माझ्या आठवणीप्रमाणे-- इयत्ता ३ री-- थोरांची ओळख. पहिला धडा दादाभाई नौरोजींवर होता.त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पुढार्‍यांवर एकेक धडा होता. ४ थी--- शिवाजी महाराज. पुस्तकातील अनेक चित्रे बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुस्तकातील होती. ५ वी-- आर्यांच्या आक्रमणापासून सुरवात होऊन हडाप्पा संस्कृती, प्राचीन भारत-- गौतमीपुत्र सातकर्णी, विक्रमादित्य वगैरे ६ वी-- सुरवात शिवाजी महाराजांपासून होऊन मग संभाजीराजे, राजाराम, ताराबाई, पेशवे--- पानिपत ते वसईचा तह आणि पेशवाई बुडणे इथपर्यंत ७ वी-- इंग्रज आल्यापासून स्वातंत्र्यापर्यंत ८ वी-- फार आठवत नाही ९ वी-- अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द, फ्रेंच आणि रशियन क्रांती, जर्मनी आणि इटलीचे एकीकरण आणि शेवटी परत एकदा काँग्रेसची स्थापना वगैरे भारतीय इतिहास. लोकमान्य टिळकांच्या निधनापर्यंत १० वी-- पहिले महायुध्द, दुसरे महायुध्द आणि १९२०-१९४७ या काळातील स्वातंत्र्यलढा, थोडाफार क्रांतिकारकांचाही उल्लेख होता

जरा सर्वच सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद लिहावेत ही विनंती. दुसर्‍यावर चिखलफेक करण्याच्या नादात आपलेही हात बरबटतात त्याकडे लक्ष द्या. संमं, या धाग्यावरील अयोग्य ते प्रतिसाद काढून टाकावेत ही विनंती.

अहो, पेशवे काय किंवा शिवाजी महाराज काय आपल्या सर्वांचा गौरवशाली इतिहास आहे तो. काही चुका झाल्या असतील पण त्यामुळे का पूर्ण इतिहास झाकाळतो ?

हल्लीचा शालेय इतिहास अभ्यासक्रम CBSE च्या अभ्यासक्रमाशी अधिक मिळता जुळता असण्याची शक्यता आहे का ? हल्लीच्या शालेय इतिहास अभ्यासक्रमात एकुणच मराठा इतिहासावरील भर एकुणच पुर्वी पेक्षा बराच कमी केला गेला असण्याची शक्यता संभवते असे माझे प्राथमीक निरीक्षण राहीले आहे. (चुभूदेघे)

'रमा माधव ' या चित्रपटांत जर चित्रविचित्र आयटेम साँग दाखवले जाते , तर मग कुठेही काहिही घडु शकते .

"२२. सवाई माधवरावांच्या काळात तांत्रिकदृष्ट्या सर्व कारभार साडेतीन शहाण्यांच्या ताब्यात होता. ( माझ्या माहितीप्रमाणे सखारामबापू, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठ्ल सुंदर असे तीन शहाणे आणि नानासाहेब फडणविस अर्धे शहाणे कारण ते तलवारबहाद्दर नव्हते. " विठ्ठ्ल सुंदर हे जरी पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाण्यांपैकी एक असले तरी ते पेशव्यांचे सेवक नव्हते तर , हैदराबाद येथे निजामाचे प्रमुख सरदार/कारभारी होते . अनेक कर्तबगार / हुशार / शुर /कर्तुत्ववान मराठी लोकांना त्यांनी निजामशाहीतील राज्यात मानाची पदे / नोकरी / धंदा यांद्वारे सामावुन घेतले होते . आजही हैदराबादमधील (कोटी , नामपल्ली ) व आजुबाजुच्या अनेक ठिकाणांमध्ये (नारायणपेट , नारायणगुडा) मोठ्या प्रमाणात खुप पुर्वीपासुन स्थायिक असलेली मराठी माणसे आढळुन येतात त्याचे मुळ यांतच आहे .

रावबाजींनी ( दुसरा बाजीराव - यांचा स्वभाव हा पहिल्या बाजीरांवांच्या स्वभावापेक्षा पुर्ण वेगळा होता त्यामुळे त्यांना रावबाजी असे म्हणले जाते ) ब्रम्हावर्त / बिठुर येथे स्थलांतर करुन आपले उर्वरीत आयुष्य तेथेच ब्रिटिशांच्या नजरकैदेत काढले . त्याकाळी त्यांच्याबरोबर पुण्यातील त्यांच्या बरयाच विश्वासु लोकांनी ब्रम्हावर्त / बिठुर येथे स्थलांतर केले . हि सर्व मंडळी मग तेथेच स्थायिक झाली . त्यामुळेच ब्रम्हावर्त / बिठुर येथेही मोठ्या प्रमाणात खुप पुर्वीपासुन स्थायिक असलेली मराठी माणसे आढळुन येतात .

आम्हाला पेशव्यांचा इतिहास होता, पहील्या बाजीरावापासून ते दुसऱ्या बाजीराव पर्यंत पेशव्यांचा इतिहास होता. तसेही पाठ्यपुस्तके बदलले म्हणून इतिहास बदलत नसतो. काही विषयावर जाणकारांचे मत हवे आहे. अर्थातच जाणकर कादंबरीपेक्षा इतिहासाच्या पुस्तकावरुन सांगतील ही आशा. कुठेतरी वाचले होते की पहील्या बाजीरावांपर्यंत पेशव्यांनी रणांगाणावर पराक्रम गाजवला, सचोटीने कारभार केला. पण नानासाहेब पेशव्याच्या काळात कारभारात कुठेतरी शिथिलता आली होती. पानिपत मधील पराभवामागे तेही एक कारण होते. हे खरे आहे का? तीच गोष्ट रणांगणावरील पराक्रमाविषयी पानिपतच्या पराभवानंतर पेशव्यांनी रणांगणावर मोठा पराक्रम गाजवल्याचे वाचण्यात नाही. माधवराव पेशव्यांनी कारभार उत्तम केला यात काही शंका नाही. खरेच युद्ध झाले नाही की पेशवे त्यापासून दूर राहीले? आंतरीक बंडाळीने खिळीखिळी झालेली मराठेशाही आणि मराठ्यांनीच कमकुवत केलेली मोगलाइ याचमुळे कदाचित इंग्रजांना भारतात पाय रोवता आले असे नेहमी वाटते. नानासाहेब पेशव्यांनी १८५७ च्या लढाईत इंग्रजांविरुद्ध उडी घेतली. दुर्दैवाने तो प्रयत्न फसला पण त्यानंतर काय झाले फार माहीती नाही. कोणाला माहीती असेल तर त्याने द्यावी. अवांतर: २०१३ च्या लोकसत्ताच्या दिवाळी अंकात जुऩ्या राजांची सद्य परिस्थिती यावर लेख होते. त्यात पेशव्यांवरही लेख होता.

sandarbh इतिहासविषयक पाळावयाचे लेखनसंकेत कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी, ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्ट पणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *इतिहास विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्यबद्दल सजग रहावे.