मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक वर्षानंतर . . .

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचने 311403 वाचनखूण प्रतिक्रिया 1265

In reply to by संदीप डांगे

मदनबाण Tue, 05/26/2015 - 13:30
च्यामारी अमित शहा आता त्याला "जुमला" म्हणुन टाळताना दिसतो आहे... हा कुठला जुमला ? मी विचार केला चांगले १५ लाख मिळाले असते तर भविष्यासाठी काही योग्य तरतुद करता आली असती ! एखादा सोम्यागोम्या खासदार झाला तरी आयुष्यभरासाठी पेंशनची सोय होते...आमच्या सारख्या आयटीमाथाडी कामगारांना साधे पेंशन सुद्धा नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by मदनबाण

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 10:27
सगळ्यांना १५ लाख दिले तर त्या पैशाची किंमत नलिफाय होवून सगळ्यांच्या किंमती वाढतील आणि तो फायदा शून्य होईल.
आमच्या सारख्या आयटीमाथाडी कामगारांना साधे पेंशन सुद्धा नाही !
पेंशन स्कीम चालू आहे (एन.पी.एस) आणि त्यात या वर्षी पासून ५०,००० रुपयांपर्यंत करमुक्त रकमेचा फायदा आहे.

In reply to by कहर

dadadarekar Fri, 06/26/2015 - 22:51
इलिजिबिलिटी ३.१ बघा. सरकारचे काँट्रीब्युशन नॉन ट्याक्सपेअर लोकाना आहे. वीस वर्षानी त्या पाच हजार मासिक पेन्शनीत रोजचा चहा तरी सुटेल का?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:57
काळ्या पैशांच्या बाबतीत मोदींच्या भाषणाची लिंक तूनळी वर उपलब्ध आहे. दुसर्‍या एका धाग्यावर पूर्वी मी ती लिंक दिली होती. त्या भाषणात मोदी असे म्हटले होते की, "परदेशात एवढा काळा पैसा आहे की जर तो सगळा परत आणला तर भारतातल्या प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला सरासरी १५-१६ लाख रूपये येऊ शकतील." भारतातल्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही १५ लाख रूपये देऊ असे मोदी कधीही म्हटले नव्हते. असे कोणतेही आश्वासन त्यांनी दिलेले नव्हते. ते खरोखरच असे म्हटले असल्यास त्याची लिंक द्यावी. कोणतेही सरकार जप्त केलेला काळा पैसा जनतेला रोख वाटत नसते. तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो, हे लक्षात घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

dadadarekar Fri, 06/26/2015 - 22:54
बेंबट्या , बाजारातुन वीस आंबे आणले तर प्रत्येकाला चार येतील बघ. असे बाप म्हणतो तेंव्हा यदाकदाचित आंबे आणले तर वाटले जातील हाच अर्थ असतो. चार नाही निदान दोन आंबे तरी बेंबटा खाइलच ना ?

In reply to by मदनबाण

नाव आडनाव Tue, 05/26/2015 - 13:19
डाळ ही एक गोष्ट झाली. दुधाचं तसंच. दूध उत्पादकांना मिळणारा सरकारी भाव आधी २७ रुपये होता तो काहि महिन्यांआधी १७ रुपये केला. तेंव्हा (भाव कमी होण्याआधी) तुमच्या - आमच्या सारख्या लोकांना दूध ~५० रुपये लिटर मिळत होतं, ते आजंही ~५० रुपये लिटर भावानेच मिळतंय. हा फरक (१०+ २३) रुपये जातोय कुठे? पुरवठादारांची एक साखळी असते आणी त्यांचा नफा होणं अपेक्षित आहे, पण तो इतका? किंमत तिप्पट? "महंगाई कम हो गई. शून्य प्रतिशद महंगाई." अश्या बातम्या नभाटा मध्ये जेंव्हा येतात आणी सामान्य माणूस बघतो कि काय कमी झालंय तेंव्हा त्याला कळणार देखील नाही. याच बातम्यांचा पाच वर्षांनी "एक सालमे कर दिखाया" असा रेफरन्स दिला जाइल.

In reply to by नाव आडनाव

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 11:40
महागाई हा आधीची किंमत आणि आताची किंमत यातल्या फरकाचा ग्राफ असतो. महागाई कमी झाली याचा अर्थ किंमत कमी झाली असा होत नाही, तर किंमतीमध्ये होणार्‍या फरकातला बदल कमी झालाय असा त्याचा अर्थ असतो. महागाई १०% वरून ५% झाली याचा अर्थ असा की किंमती हळू वाढतील. महागाई उणी जेव्हा असते, तेव्हा किंमती कमी होतात. पण ती स्थिती अर्थव्यवस्थेला धोकादायक असू शकते.

In reply to by काळा पहाड

नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 11:52
जसं मी लिहिलं की थोडयाफार फरकाने तुम्हाला - आम्हाला मिळणारी किंमत तीच राहिली पण त्याचवेळी दूध उत्पादकाना मात्र तोटा झाला. २७ मधले १० रुपये म्हणजे ~४० टक्के तोटा. त्यांचा तोटा हा मधल्यांचा फायदा :) असा माझा मुद्दा आहे. डाळींच्या कीमती वाढल्या आहेत, ती गोष्ट अजून वेगळी. बिनडोक - नाव आडनाव. (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )

In reply to by नाव आडनाव

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 12:18
मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल लिहिलं होतं
"महंगाई कम हो गई. शून्य प्रतिशद महंगाई." अश्या बातम्या नभाटा मध्ये जेंव्हा येतात आणी सामान्य माणूस बघतो कि काय कमी झालंय तेंव्हा त्याला कळणार देखील नाही. याच बातम्यांचा पाच वर्षांनी "एक सालमे कर दिखाया" असा रेफरन्स दिला जाइल.
आता
२७ मधले १० रुपये म्हणजे ~४० टक्के तोटा. त्यांचा तोटा हा मधल्यांचा फायदा
बद्दल. याला केंद्र सरकार कसं जबाबदार असू शकतं? सरकार प्रत्येक गोष्ट कंट्रोल करत नाही. केंद्र सरकार तर नाहीच. मधला फायदा व्यापार्‍यांचा होता. ते पैसे सरकारला थोडेच गेले? सरकार आधारभूत किंमती ठरवून देतं, मार्केट मधल्या किंमती ठरवत नाही. त्या किंमती या डिमांड-सप्लाय वर ठरतात. (माझ्या अंदाजानं पूर्वीच्या एनडीए सरकारनं तेही करून पाच वर्षं किंमती स्थिर ठेवल्या होत्या, पण ती गोष्ट मुळातच योग्य नव्हे). तेव्हा या बाबतीत दुसरं काहीतरी करण्याची गरज आहे. चीन मधलं स्वस्त दूध उपलब्ध करता येवू शकतं. त्यावरचा बॅन (http://profit.ndtv.com/news/economy/article-india-extends-ban-on-import-of-milk-and-milk-products-from-china-571663) जून २०१५ मध्ये संपतोय. अर्थात हे दूध धोकादायक असणार(च) पण "मधल्यांचा फायदा" होवू द्यायचा नसेल तर हे ही करूया.

In reply to by काळा पहाड

नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 13:05
सरकार आधारभूत किंमती ठरवून देतं, मार्केट मधल्या किंमती ठरवत नाही. जर मार्केट मधल्या किंमती तेव्हढ्याच राहिल्या (जे मी लिहिलंय), तर त्याचा अर्थ होईल डिमांड - सप्प्लाय बदलला नाही. तर, आधारभूत किंमती कमी करून काय फ़ायदा? हा फ़ायदा कुठे जाणार आहे हे सरकारला माहित असणारच की. हे न बघता चीनी दूध कशाला पाहिजे. अश्याने आधारभूत किंमती कमी केल्या की हळू हळू सगळ्याच गोष्टी चीन मधून आणायला लागतील :) बिनडोक - नाव आडनाव (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )

In reply to by नाव आडनाव

खंडेराव Wed, 05/27/2015 - 13:55
कडे बरिच आयुधे असतात किंमती कमी करण्याची १) आयात वाढवा, इंपोर्ट डुटी कमी करा. २) निर्यात कमी करा, निर्यात कर वाढवा ३) स्टॉक लिमिट कमी करा, काळाबाजार कमी होतो. ४) धाडी घालणे ५) स्वतःचे स्टॉक खुले करणे ६) PDS 7) Subsidies त्यामुळे सरकार काय करेल असे म्हणता येणार नाही. माझा वैयक्तिक अनुभव, शेतीमालाशी संबंधीत भाववाढीबद्दल असा आहे ( त्यात दुध ही आले ) कि शेतकरी सोडुन बाकी सर्व पैसे कमवतात. हे मार्केट दलांलाच्या हिताचे आहे, शेतकरी व ग्राहकाच्या नाही.

In reply to by नाव आडनाव

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 13:57
आधारभूत किंमती कमी करून काय फ़ायदा?
आधारभूत किंमत कमी केलेलीच नाहीये. कारण दुधाला आधारभूत किंमतच नाहीय. सध्या व्यापारी शेतकर्‍यांना कमी देतायत. त्याचं कारण आहे की सरकारचा यावर कंट्रोल नाहीये. म्हणून तर खडसेंना खालील स्टेट्मेंट करावं लागलं. Khadse said that the government is also prepared to promulgate an ordinance for providing a fixed rate of Rs 20 per litre to milk-producing farmers who are facing difficult times owing to the steep fall in milk prices.
हा फ़ायदा कुठे जाणार आहे हे सरकारला माहित असणारच की.
डेअरीला आणि व्यापार्‍यांना.
हे न बघता चीनी दूध कशाला पाहिजे. अश्याने आधारभूत किंमती कमी केल्या की हळू हळू सगळ्याच गोष्टी चीन मधून आणायला लागतील :)
व्यापारी त्यांचा तोटा करून व्यापार करणार नाहीत. एक तर शेतकर्‍यांनी स्वतः दूध पाश्चराईझ, पॅकेज करून ते मार्केटिंगची व्यवस्था करायला शिकावं अन्यथा व्यापारी मधल्या आर्बिट्रेशनचा फायदा घेणारच. शिवाय ते लोकांना परवडायला पाहिजे. जर पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल तर मार्केट त्याचा फायदा घेतंच. तुम्हाला शेतकर्‍यांना पुरेसे पैसे देवून ग्राहकालाही स्वस्तात गोष्टी उपलब्ध करायच्या असतील तर तशी व्यवस्था उभी करणं गरजेचं असतं. सध्याची व्यवस्था तशी नाही. आणि व्यापार्‍यांना सक्ती करणं म्हणजे दुधाच्या वितरणाची संपूर्ण साखळी बंद पडून देशात दुधाचा काळाबाजार सुरू होईल. तो व्यापार्‍यांनाच फायद्याचा असेल हे लक्षात ठेवा. आणि हे फक्त दुधाबाबतीतच होतंय असं नाही. हा फ्री इकॉनॉमीचा एक पैलू आहे. त्यात सुधारणा करणं शक्य आहे पण त्यात गुडघा मनोवृत्ती वापरणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 14:48
शेतकरी आणि ग्राहक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. शेतकर्‍यांना जास्त भाव मिळाला तर किंमती वाढून ग्राहक हैराण होतात आणि शेतकर्‍यांना पिकाची किंमत कमी मिळाली तर अन्नधान्यांचे भाव कमी राहिले तरी शेतकरी नाराज होतात. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही एकाच वेळी आनंदी ठेवणे अवघड आहे. परंतु यात एक वेगळा व्ह्यू आहे. शेतकरी हा प्रत्येक धान्य, प्रत्येक भाजी, प्रत्येक फळे आपल्या शेतात पिकवू शकत नाही. तो आपल्या शेतात काही मर्यादित पिकेच घेऊ शकतो. उर्वरीत मालासाठी त्याला बाजारात जावे लागते. शेतकरी हा एकाच वेळी शेतकरी असतो आणि ग्राहकही असतो. परंतु ग्राहक हे ग्राहक असताना शेतकरी असतीलच असे नाही. त्यामुळे शेतमालाला जास्त भाव देऊन भाववाढ झाली तर जरी शेतकर्‍याला जास्त उत्पन्न मिळाले तरी भाववाढीची झळ इतर ग्राहकांप्रमाणेच सर्व शेतकर्‍यांना सुद्धा पोहोचते. त्यामुळे शेतमालाला भाव कमी मिळाला किंवा जास्त मिळाला तरी शेतकर्‍याला दोन्ही बाजूने झळ पोहोचते.

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव Wed, 05/27/2015 - 15:02
शेतकरी आणि ग्राहक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात.
बहुतांशी पिकांच्या बाबतीत ग्राहक जे देतो त्यातले ३०-३५% शेतकर्यापर्यंत पोहोचते. यात मी प्रक्रिया उद्योग ग्रुहित धरला नाहीये. जेव्हा भाववाढ होते, तेव्हा शेतकरी सोडुन इतरच पैसे कमावतात. कांद्याची भाववाढ हे उत्तम उदाहरण आहे. याला कारण म्हणजे चुकीची वितरण व्यवस्था. भाव कमी असतात तेव्हा, आणि वाढतात तेव्हाही दलालच पैसे कमावतात. जर ही व्यवस्था निट असेल, तर ती ग्राहक आणि शेतकरी दोघांना योग्य किंमत देइल.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 16:00
शेतकरी नसलेल्या सामान्य शहरी ग्राहकांचे असेच बाळबोध विचार असतात. शेतकरी राहत असलेल्या गावात इतर शेतकर्‍यांनी पिकवलेले धान्य, भाजीपाला, त्याला अतिशय स्वस्तात घेता येतो. बरेचदा ह्या सगळ्यांचा खर्च नगण्य असतो. शहरी लोकांप्रमाणे मंडईत जाऊन खरेदी करत नाही शेतकरी. त्यामुळे त्याला भाववाढीची झळ बसत असेल हा निष्कर्ष कल्पना म्हणून ठिक आहे. एका खेड्यात असलेली पावकिलो वांग्याची किंमत २ रुपये असेल तर तालुक्याच्या ठिकाणी ७-८ रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी १२-१५ रुपये तीच मुंबईसारख्या शहरात २५ रुपये असते. माझ्या एका शेतकरी मित्राने ६०-८० पैसे किलोने व्यापार्‍याला विकलेला कांदा किरकोळ बाजारात ८-१० रुपयांनी विकल्या जातांना स्वतः बघितलंय. किमान २५ ते ३० फ्लॉवर भरलेलं एक पोतं आजही शेतावर फक्त ५० रुपयांत उचललं जातं. किरकोळ बाजारात त्याच एका फ्लॉवरची किंमत ३०-५० रुपयांपर्यंत जाते. शेतीमालाचा काय दर असावा हे उत्पादक नाही तर दलाल ठरवतात. दलालांशिवाय शेतीमाल विकता येत नाही. अशी जीवघेणी व्यवस्था इतरत्र कुठल्याही उत्पादनक्षेत्रात नाही. एवढी क्रूर व्यवस्था बदलण्याची हिंमत हे तरी सरकार दाखवेल तो सुदिन. पण हे होणे नाही. गरिबांना जीवनावश्यक वस्तू स्वस्तात मिळणार नाहीत ही भीती घालून शेतकरी आणि ग्राहक दोघांचीच लूट चालू आहे, दलाल गब्बर होतायत, पैसे नीट पोचतायत. यावर सरकारने करण्यासारखं असूनही काहीही केलेलं नाही. आणि म्हणे भ्रष्टाचार आणि महागाई कमी झाली.

In reply to by काळा पहाड

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 13:18
हे महागाई निर्देशांक वैगेरे मला तरी फारसं कळत नाही. पण तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढला तर असा आहे की मार्केटमधल्या किंमतीवर सरकारचा अंकुश नसतो. तेव्हा वाढणार्‍या घटणार्‍या महागाईबद्दल सरकारला का धरतात नेहमी? महागाईबद्दल सरकारच्या हातात काहीच नाही तर मग आम्ही महागाई कमी केली असे सरकारचे म्हणणे याला काय आधार? एखाद्या बाबतीत भ्रष्टाचार होतो म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीत जातो असं नसतं ना? सरकारी धोरणांना वाकवण्याची मुभा मिळावी म्हणून संबंधीत लोकांकडे पैसे पोचते होतात. यालाच भ्रष्टाचार किंवा घोटाळा म्हणतात बहुधा. याची पावती मिळत नसते. साठेबाजी करणार्‍यांवर, कॄत्रीम पद्धतीने भाव वाढवणार्‍यांवर सरकारला कडक कारवाई करण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. ते न करण्याबद्दल योग्य ठीकाणी पैसे पोचतात. (मध्यंतरी साखरेचे दर वाढत होते तेव्हा मोठ्या काकांकडे त्यांचे खोके व्यवस्थित पोचवणारा एक व्यापारी माझ्या संपर्कात... ... ... असो.)

In reply to by संदीप डांगे

खंडेराव Wed, 05/27/2015 - 14:01
सोपे उदाहरण घ्या..जेव्हा वायदेबाजारात एखादा निर्णय होतो ( हे केंद्र सरकारशीच संबंधीत असतात ) तेव्हा हजारो कोटिंची उलाढाल होते, आणि ज्याला निर्णयाची आधी माहीती मिळते तो अक्षरशः पैसे छापतो.

In reply to by संदीप डांगे

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 14:13
हे महागाई निर्देशांक वैगेरे मला तरी फारसं कळत नाही. पण तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढला तर असा आहे की मार्केटमधल्या किंमतीवर सरकारचा अंकुश नसतो. तेव्हा वाढणार्‍या घटणार्‍या महागाईबद्दल सरकारला का धरतात नेहमी? महागाईबद्दल सरकारच्या हातात काहीच नाही तर मग आम्ही महागाई कमी केली असे सरकारचे म्हणणे याला काय आधार?
अहो साधी गोष्ट आहे, युपीए सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की महागाईमुळे आपल्याला जनता रिटायर करणार आहे, तेव्हा त्यांना महागाई कमी करावी वाटत नसेल का? त्यांनी सगळे हातपाय आपटूनसुद्धा महागाई ढिम्म हलली नाही. सरकारच्या हातात अगदीच काही नसतं असं नाही पण त्यांचे उपाय हे काही जागी चांगला परिणाम करतात पण बाकीच्या ठिकाणी वाईट परिणाम करतात. किंमती कमी झाल्या तर शेतकरी नाराज होतो आणि वाढल्या तर ग्राहक. शिवाय हे उपाय 'मॅक्रो' या सदरात येतात. सरकार मायक्रो मॅनेजेमेंट करू शकत नाही. व्याजाचे दर कमी करणे, अर्थव्यवस्थेत पैसा ओतणे, बाँड वितरीत करून पैसा कमी करणे वगैरे सारख्या गोष्टी सरकार केंद्रीय बँकेच्या माध्यमातून करू शकतं. पण याचा हवा तसा परिणाम होतोच असं नाही. कारण अर्थव्यवस्था हे एक जटिल जनावर आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक हे सर्व गोष्टींवर परिणाम करतात. फक्त कांद्याचे भाव कमी होतील असं नसतं. जेव्हा अर्थव्यवस्था उसळी घेत असते, तेव्हा ती सर्वांसाठी उसळी घेवू शकते. मग भाव वाढू शक्तात. जेव्हा ज्यादा नोकर्‍या निर्माण होतात, तेव्हा हे नवीन नोकरदार खरेदी करून उपलब्ध वस्तू कमी करू शकतात आणि भाववाढ होवू शकते. म्हणून नोकर्‍या वाढाव्यात असं वाटणं आणि भाव कमी व्हावेत असंही वाटणं हे रिआलिस्टीक एक्स्पेक्टेशन नाही.

In reply to by काळा पहाड

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 15:33
अगदी बरोबर. त्यामुळेच महागाई आपल्यामुळेच कमी झाली असा दावा सरकारने करू नये किंवा वाढली तर विरोधकांनी सरकारविरूद्ध बोंब मारू नये असं मला वाटतं. महागाई ही एक फारच विचित्र संकल्पना आहे. १०० वर्षांआधीही महागाई होती आणि ती कायम राहणार आहे. त्याला हजारो अर्थशास्त्रीय कारणं आहेत. पण महागाई म्हणजे धनाढ्यांचा गरिबांविरुद्धचा कट असा काही समज जनमानसांत पसरून आहे. गरिबांच्या, सामान्य लोकांच्या अर्थविषयक अज्ञानाचा राजकिय फायदा उकळण्यासाठी राजकिय पक्ष याचे भांडवल करत असतात. वाढणारी भरमसाठ लोकसंख्या हे एक फार महत्त्वाचे कारण राजकिय पक्ष जनतेस सांगत नाहीत. माझा आक्षेप फक्त साठेबाजांवर, कृत्रिम भाव अचानक वाढवणार्‍यांवर, मधल्या अनावश्यक दलालांवर सरकारतर्फे न होणार्‍या कारवाईवर आहे. तिथे भाजप सरकारच काय कोणतेच सरकार काहीच करू शकत नाही. कारण निवडणुकीला उभे राहण्यास हेच लोक मदत करतात आणि निवडून यायला गरिब लोक. तेव्हा दोघांचीही तोंडदेखली मर्जी राखणे एवढेच सरकारचे काम उरते. ठराविक कालाने एक एक कमोडीटीची किंमत योजनाबद्ध पद्धतीने वाढत असते. आज काय तर दाळ, त्याच्याविरूद्धची बोंबाबोंब शांत झाली की साखर, मग तेल, मग धान्य. बोंबाबोंब होत राहते, भाव वाढत राहतात. लोक सहन करत राहतात. हे अर्थशास्त्राबाहेरचे चक्र आहे. त्यावर सरकारी अंकुश अपेक्षीत आहे. दुधाची किंमत वाढवू नये म्हणून दुधविक्रेत्यांवर, उत्पादकांवर दबाव आणला. पण इतर महागाई वाढत असतांना त्यांना त्यांचे दर वाढवणे अपरिहार्य होते. त्यांनी संगनमताने दुधाचा दर्जा कमी केला आहे. नाशिकमधल्या मी मी म्हणणार्‍या सगळ्या दुधउत्पादकांचे दुध आणून बघितले. आधी जेवढी साय निघायची ती ३०% नी कमी झाली आहे. सामान्य नागरिकांस हा फरक लक्षात येत नाही. पण मोठ्या प्रमाणावर हा एक घोटाळा आहेच. अन्न आणि औषध प्रशासन, दुध महामंडळ यात कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही.

In reply to by नांदेडीअन

कहर Tue, 05/26/2015 - 16:07
मानले राव तुम्हाला … तुमच्या लिंक मध्ये मुख्य बातमीच्या आजूबाजूस असलेल्या बातम्यांवरून त्या झालेल्या प्रकाराची आणि चित्रांची बातमी कशी तयार केली गेली असेल याचा अंदाज आला… रच्याकाने सुर्या वहिनींची बातमी खाशी आहे … शौकीनांनी नक्की वाचा

नांदेडीअन Tue, 05/26/2015 - 12:26
खाद्य मंत्रालय की प्राइस मॉनिटरिंग सेल के पास मौजूद आंकड़ों के मुताबिक, 26 मई 2014 से 22 मई 2015 के बीच दिल्ली में उड़द दाल 71 रुपये प्रति किलो से बढ़ कर 109 प्रति किलो यानी 54% महंगी हो गई । यही ट्रैंड अरहर की कीमतों में भी दिखा । अरहर दाल पिछले साल 26 मई 2014 को 75 प्रति किलो थी, जो 22 मई 2015 को बढ़ कर 108 रूपये प्रति किलो हो गई, यानी 44% की बढ़ोत्तरी । चना दाल पिछले एक साल में 50 रुपये प्रति किलो से बढ़कर 68 प्रति किलो यानी 36% महंगी हुई । मसूर दाल इस दौरान 70 प्रति किलो से 94 प्रति किलो यानी 35% महंगी हुई । - NDTV

In reply to by नांदेडीअन

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 12:48
आणि हे भाव एका दिवसात वाढले आहेत. तुरदाळ एका दिवसात ८० रुपयांवरून १२० रुपये किलो झाली. तीन दिवसांनी वर्तमानपत्रात भाव १०० रुपयांपर्यंत उतरल्याची 'बातमी' होती पण खर्‍या बाजारात (मॉल आणि किरकोळ) उतरले नव्हते. मी वर म्हटल्याप्रमाणे चोराची ष्टाईल बदलली म्हणून चोरीच झाली नाही असे म्हणणे आंधळी भक्ती आहे. एलबीटी व टोलविरुद्ध गगनभेदी गर्जना करणारे भाजप नेते पावसात भिजलेल्या मांजरासारखे घाबरून बसले आहेत. हा सरळ जनतेचा विश्वासघात आहे.

In reply to by संदीप डांगे

जीएसटी आल्यानंतर एलबीटी जाईल असे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात ऐकले होते. जीएसटी विधेयक सध्या संसदेत अडकले आहे काँग्रेसमुळे. ते तेथून निघाले की काय होते ते पाहता येईल.

In reply to by संदीप डांगे

नाव आडनाव Wed, 05/27/2015 - 11:33
"सत्तेत आल्यानंतर टोल बंद करू" म्हणणारे वाक्य फिरवून "अन्यायकारक टोल बंद करू" (चंद्रकांत पाटील - सहकारमंत्री) म्हणू लागले. त्यानंतरच्या कोणत्याच चर्चेत (टीवी / पेपरातल्या) मुंबई-पुणे टोल - जिथे मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त टोल कलेक्शन असेल - बद्दल चर्चा / बातमी मी तरी ऐकली नाही. रोज या रास्तावरून काही शेकडो / हजारो वाहनं जातात. एमएसआरडीसी ला हा ९४.५ कि.मी. चा रस्ता बांधायचा खर्च कधीच वसूल झाला असेल कारण रोज काही लाख रुपये तर नकीच जमा होत असणार. जर फक्त डागडुजीचा खर्च ते घेत असतील तर तो आता असलेल्या रेट इतका असावा का? कांग्रेस - राष्ट्रवादी असताना त्यांनी काही केलं नाही, टोलविरोधकह्रदयसम्राट काही बोलत नाहीत आणि सरकारला हा टोल अन्यायकारक वाटत नाही. असं का असेल बरं? बिनडोक - नाव आडनाव. (राजकारणातल्या चर्चेसाठी माझी सही. नंतर सुद्धा तितकीच ऍप्प्लिकेबल :) )

In reply to by नांदेडीअन

कहर Tue, 05/26/2015 - 16:20
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घटले… सरकारने काय केले ? दुष्काळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले … म्हणल्याप्रमाणे महागाई कमी होऊ शकली नाही … सरकार काय करतंय … एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही करत नाही म्हणायचे … दुसरीकडे शेतकी मालाचे भाव कमी करा म्हणून दंगा करायचा … आणि सगळे एका वर्षात झाले पाहिजे अशी डेडलाइन पण लावायची… चांगली नीती आहे राव … म्हणजे काटा पडला तर मी जिंकलो नि छापा पडला तर तू हारला असेच ना … यालाच विरोधासाठी विरोध करायचा असे म्हणतात

In reply to by कहर

मदनबाण Tue, 05/26/2015 - 16:25
पेट्रोल चे भाव कमी झाले कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घटले मागच्याच आठवड्यात भरले ! ७५ रु / प्रति लिटर.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

ग्रेटथिंकर Tue, 05/26/2015 - 12:27
श्रीगुरुजी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.ते प्रचारकी थाटाचे लेखच टाकणार.कागदावर जरी आकडेवारी योग्य वाटत असली तरी ती दिशाभूल करणारी आहे,ग्राउंड रीएलीटी मदनबाण यांनी मांडली आहे.टोलमुक्ती,महागाई,शेतकरी आत्महत्या या सर्व आघाड्यांवर मोदी सरकारला भक्तच शुन्य मार्क देत आहेत.

पिलीयन रायडर Tue, 05/26/2015 - 14:24
मला एक गोष्ट कळत नाही की आता मिळालं ना सरकार? दिलं ना बहुमत? मग काय करायचं ते करुन दाखवा की.. एक वर्ष झालं अजुनही प्रचारकी लेख का लिहत आहेत? फेसबुक, वॉट्सअ‍ॅप सगळी कडे काही ना काही फिरत असतंच की मोदी किती महान. अनेकदा ठोकुनही दिलेलं असतं. अशाने आता खर्‍या गोष्टींवरचाही विश्वास उठत चाललाय माझा तर. आता हा लेखही काही दिवसांनी वॉट्सअ‍ॅपवर फिरेल.

In reply to by पिलीयन रायडर

खंडेराव Tue, 05/26/2015 - 14:34
जशी मागची निवडणुक जिंकली तगड्या प्रचाराने आणि कॉंग्रेसच्या एकुणच गलथानपणामुळे, तशी पुढचीही जि़ंकायची आजपासुनच सोय आहे ही. दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. हो, आणि हे कंटेट आता कुठे कुठे वापरतील, याचा हिशेब नाही. अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 15:13
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. ते भाजप बघून घेईल हो. तोंडावर पडायचं का दुसर्‍याला पाडायचं ते भाजपलाच ठरवू देत. >>> हो, आणि हे कंटेट आता कुठे कुठे वापरतील, याचा हिशेब नाही. समजा वापरले तर तो काय गुन्हा आहे का? >>> अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने. भाजप बघून घेईल हो ते. आपण कशाला काळजी करायची? एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव Tue, 05/26/2015 - 15:27
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. ते भाजप बघून घेईल हो. तोंडावर पडायचं का दुसर्‍याला पाडायचं ते भाजपलाच ठरवू देत.
तुम्ही कशाला उत्तर देताय मग? तुम्ही भाजपा आहात का?
>>> अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने. भाजप बघून घेईल हो ते. आपण कशाला काळजी करायची? एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.
माझा वरचा प्रतिसाद परत लागु इथे!

In reply to by पिलीयन रायडर

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 15:10
तुम्हाला असे लेख वाचून काय खटकतंय ते समजलं नाही. आजच्या गतिमान युगात प्रत्येक गोष्ट ही लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचविली जाणारच आणि प्रत्येक गोष्टींवर चर्चा होणारच. हे फक्त मी एकट्याने लिहिलेले नाही. जवळपास सर्व वृत्तपत्रांतून या विषयावर लेख येत आहेत व उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, इंडिया टुडे इ. दैनिकातून्/साप्ताहिकातून याच विषयावर अनेक तज्ज्ञांच्या लेखमालिका येत आहेत. आजच दैनिक सकाळ ने याच विषयावर पानेच्या पाने भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्व हिंदी/इंग्लिश/मराठी वृत्तवाहिन्यांवर "मोदी सरकारची १ वर्षातील कामगिरी" या एकमेव विषयावर जोरदार चर्चासत्रे होत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पिलीयन रायडर Tue, 05/26/2015 - 15:16
होत आहेत आणि व्हावीत. पण सामान्य माणुस म्हणुन सांगते की मी सुद्धा भा.ज.प समर्थक आहे, मोदींवर माझाही विश्वास आहे. पण त्यांचा इतका उदो उदो कशाला हे कळत नाही. गरज नसताना मार्केटींग होतेय. तुमचाही लेख मला तरी बायस्ड वाटला (आहेच तो). थोडक्यात प्रचारकीच वाटला. पण दुर्दैवानी समतोल कुणी लिहीतच नाहीये. सगळ्यांनी काही ना काही बाजु पकडली आहेच.

In reply to by पिलीयन रायडर

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 15:33
माझं सोडा हो. खालील लेख वाचा आणि मोदींविषयी मत ठरवा. हा लेख लिहिणारी व्यक्ती ही अत्यंत समतोल, निष्पक्षपाती व सभ्य विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मराठी वाहिन्यांवरील चर्चेत अ‍ॅंकरसकट इतर सर्वजण एकमेकांना बोलून न देता स्वतः बोलत राहून गोंधळ माजवून देतात. परंतु ही व्यक्ती काटेकोरपणे थोडक्यात आपले मुद्दे मांडून इतर बोलत असताना अडथळे न आणता शांतपणे ऐकत असते. हा लेख प्रचारकी आहे का अभ्यासू हेही ठरवा. http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=545620&boxid=12411328&pgno=4&u_name=0 याच लेखात १५ लाख रूपयांबद्दल स्पष्टीकरण आले आहे (लेखात चुकुन १५ हजार रूपये असे छापले गेले आहे) तेही वाचा.

In reply to by श्रीगुरुजी

मदनबाण Tue, 05/26/2015 - 15:57
श्री. अविनाश धर्माधिकारी सरां बद्धल मला प्रचंड आदर आहे ! If you promised Rs 15 lakh each to Indians, fulfil it: Anna to Modi टिप :- मोदींनी कुठलेही "आश्वासन" दिले नाही,परंतु सामन्य व्यक्तीस किंवा ज्यांनी हे भाषण ऐकले नसेल त्यांचा तसा "समज" होण्याची मात्र दाट शक्यता निर्माण होते. असो... गरिबांची चिंता दर्शवणारे पंतप्रधान जेव्हा १० लाखाचा सुट घालतात तेव्हा मात्र नक्की "जुमला" कुठला समजावा हे मात्र कळत नाही ! १ वर्ष गेले, आता पुढील ४ वर्षात काय काय होते ते पाहण्यास उत्सुक असलेला तुमच्या सारखाच एक अतिसामान्य हिंदूस्थानी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 16:03
>>> मोदींनी कुठलेही "आश्वासन" दिले नाही,परंतु सामन्य व्यक्तीस किंवा ज्यांनी हे भाषण ऐकले नसेल त्यांचा तसा "समज" होण्याची मात्र दाट शक्यता निर्माण होते. नक्कीच. आणि लोकांचा तसा गैरसमज व्हावा यासाठी विरोधी पक्षांकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिपावरील काही आयडी देखील स्वतः ते भाषण न ऐकता मोदींनी प्रत्येकी १५ लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले होते ही बाजारगप्प खरी मानून प्रतिसाद देत आहेत. >>> असो... गरिबांची चिंता दर्शवणारे पंतप्रधान जेव्हा १० लाखाचा सुट घालतात तेव्हा मात्र नक्की "जुमला" कुठला समजावा हे मात्र कळत नाही ! तो सूट १५ लाखांचा नव्हता. मोदींना भेट मिळालेल्या कापडाचा सूट त्यांनी शिवला. त्याच्या किंमतीचा पावती देखील वाहिन्यांवरून नंतर दाखविली गेली. या सूट प्रकरणावर दिल्ली निवडणुकीच्या धाग्यावर लिहिलेले आहे. ते परत टंकायची इच्छा नाही. >>> १ वर्ष गेले, आता पुढील ४ वर्षात काय काय होते ते पाहण्यास उत्सुक असलेला तुमच्या सारखाच एक अतिसामान्य हिंदूस्थानी. सेम हिअर

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे Wed, 06/03/2015 - 14:39
मला एक गोष्ट कळत नाही की आता मिळालं ना सरकार? दिलं ना बहुमत? मग काय करायचं ते करुन दाखवा की
एक्झॅक्टली.. प्रचाराच्या हँगओव्हरमधून बाहेर आले तर काम करायला जरा सवड मिळेल.. काँग्रेसला त्यांची जागा दाखवलीये निवडणूकित.. मग अजूनही "MNREGA will continue, it is living example of Congress's failure" हा अ‍ॅटीट्युड का??

बबन ताम्बे Tue, 05/26/2015 - 17:40
मागच्याच आठवड्यात दिल्लीचा पाहुणा येऊन गेला. संभाषणाची गाडी शेवटी केजरीवाल सरकारकडे गेली. मी विचारले "केजरीवाल सरकार कैसे चल रही है. मेडिया मे अरविंद केजरीवाल के बारे मे बहुत हंगामा चल रहा है ". ते ग्रुहस्थ उत्तरले " बहोत अच्छी चल रही है. बिजली का बिल बहुत कम आता है. और भी काम चल रहे है. प्रॉब्लेम ऐसा है की बाकी लोग टांग डाल रहे है. उनको काम करने नही देते है. दिल्ली की जनता तो केजरीवाल सरकार से संतुष्ट है " खरे खोटे दिल्लीवालेच जाणे .

ग्रेटथिंकर Tue, 05/26/2015 - 18:26
केजरीवालांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरु आहेत, चांगले काम करणार्यालाही मोदी जर असे खिंडीत पकडणार असतील तर कसे येतील अच्छे दिन.

In reply to by ग्रेटथिंकर

मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 12:08
खरे आहे. पण चांगले काम करणार्‍यांना कोंडीत पकडल्याचे दिसत नाही. तुम्ही केजरीवालांना कोंडीत पकडले असे काय ते म्हणालात ना?

जानु Tue, 05/26/2015 - 23:07
आजकाल शासनकर्ते मंडळी मग ती कोणतीही असो संशयाचा सर्वाधिक फायदा आपल्यालाच मिळाला पाहिजे आणि विरोधी पक्षाने मात्र संशयातीत असावे असे सांगत असते. मान्य आहे की मा. मोदी शासन करतांना पर्वाश्रमीच्या ममो सरकार पेक्षा वेगळे काम करीत असेल. पण ममो यांच्याशी तुलना हे मोदी साहेब व त्यांच्या वतीने काम करणार्‍यांना शोभत नाही. अपेक्षा तुम्हीच वाढवायच्या आणि काम करतांना वेळ मागायचा, सरळ होणार नाही, हे तर सहजच बोलणे असते असे सांगायचे हे तर शासकीय कामातील ठेकेदारासारखेच झाले की. टेंडर भरतांना वेगळे आणि काम सुरु झाल्यावर फुगवटा!

तिमा Wed, 05/27/2015 - 10:16
भारतातील भाबड्या जनतेला कायम कोणीतरी युगपुरुष हवा असतो. पण काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे, दरवेळेस त्यांचा भ्रमनिरास होतो. केजरीवालांवर आशा ठेवावी तर त्यांनाही भांडणात गुंतवून ठेवले आहे. या देशांत येत्या ५० वर्षांत खरे चांगले सरकार येईल अशा भ्रमात जर कोणी असेल तर तो त्यांनी बाजूला टाकावा. साधनसंपती मर्यादित आणि लोकसंख्या अमर्यादित, अशा देशाला चांगले दिवस कसे येतील? भारतीय जनतेने आता वास्तववादी होण्याची जरुर आहे.

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 10:18
दैनिक सकाळने काल या विषयावर अनेक पाने खर्ची घातली होती. त्यात विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करून रेटिंग दिले होते. 'सकाळ'चे सरासरी रेटिंग ६.५५/१० इतके आहे. माझे रेटिंग त्याच्याच जवळपास म्हणजे ६.८/१० इतके आहे. मी या लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे अविनाश धर्माधिकारींच्या लेखात जास्त व्यवस्थितपणे मांडले आहेत. काही जणांना हा लेख अभ्यासू नसून प्रचारकी स्वरूपाचा वाटला असला तरी एकंदरीत लेख प्रचारकी स्वरूपाचा नसून बर्‍यापैकी जमला आहे असे दिसत आहे. काल या लेखावर बर्‍याच प्रतिक्रिया आल्या. खंडेराव, मदनबाण, मृत्युंजय यांचे बरेच प्रतिसाद विषयाशी सुसंगत होते. मात्र आज इथे शुकशुकाट आहे. विषयाशी सुसंगत नवीन प्रतिसाद आले तर उत्तर देईनच. असो.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी मोठ्या साहेबांची राष्ट्रवादी आणि नमोंची कमळाबाई सध्या दो बदन एक जान असल्यामुळे सकाळ मधून असले अनुकूल लेख येणारच .

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 11:29
दैनिक सकाळने काल या विषयावर अनेक पाने खर्ची घातली होती. त्यात विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करून रेटिंग दिले होते. 'सकाळ'चे सरासरी रेटिंग ६.५५/१० इतके आहे. माझे रेटिंग त्याच्याच जवळपास म्हणजे ६.८/१० इतके आहे. फक्त दैनिक सकाळचं एवढं काय कौतुक? अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या धंद्याचा एक भाग म्हणून ही सगळी उठाठेव केली आहे. मी या लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे अविनाश धर्माधिकारींच्या लेखात जास्त व्यवस्थितपणे मांडले आहेत. हो. पण अविनाशजींच्या लेखात कोणतेही खोटे चित्र, दिशाभूल करणार्‍या बातम्या व उल्लेख, जाहिराती भाषा नाही. जे तुमच्या लेखात तुडूंब भरून वाहत आहे. इथल्या सदस्यांनी उघड केलेल्या त्या गोष्टी तुम्ही सोयिस्करपणे टाळल्यात. शिवाय अविनाशजींच्या लेखात विद्यमान सरकार कोणत्या बाबतीत कमी पडलंय तेही आहे जे तुमच्या लेखात नाही. त्यामुळे थोरामोठ्यांचे दाखले देऊन स्वत:ला त्यांच्या पातळीवर नेऊन बसवायचे प्रयत्न हास्यास्पद आहे. काही जणांना हा लेख अभ्यासू नसून प्रचारकी स्वरूपाचा वाटला असला तरी एकंदरीत लेख प्रचारकी स्वरूपाचा नसून बर्‍यापैकी जमला आहे असे दिसत आहे. इसे कहते है अपने मुंह मिया मिठ्ठू बनना. हा लेख फक्त प्रचारकीच नसून चक्क जाहिरातबाजी आहे. खंडेराव यांनी या लेखातली कितीतरी वाक्यं वानगीदाखल दिली आहेत. काल या लेखावर बर्‍याच प्रतिक्रिया आल्या. खंडेराव, मदनबाण, मृत्युंजय यांचे बरेच प्रतिसाद विषयाशी सुसंगत होते. मात्र आज इथे शुकशुकाट आहे. विषयाशी सुसंगत नवीन प्रतिसाद आले तर उत्तर देईनच. असो. विषयाशी सुसंगत प्रतिसादावर नव्हे तर जिथे सोयिस्कर आहे तिथेच प्रतिसाद दिले आहेत. पुढेही तेच करणार आहात. म्हणून इथे शुकशुकाट आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 13:34
तुमचा एकच प्रतिसाद विषयाला धरून होता परंतु त्यातील निष्कर्ष चुकीचा होता (ऐच्छिक विमा योजनांमध्ये स्वशुषीने भरलेले पैसे सरकार नागरिक त्यांच्या नकळत काढून घेत आहे असा तुमचा चुकीचा उत्कर्ष होता). त्या प्रतिसादाला योग्य ते उत्तर दिलेले आहे. तुमचे बाकीचे प्रतिसाद म्हणजे निव्वळ त्रागा आणि आदळआपट होती.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 14:06
पाकिस्तानी गोळीबार आणि खलिता? ब्रिक्स बँक? इथे तुमच्याकडे काहीच उत्तर नाही म्हणून तोंड चुकवत आहात. उपलब्धी मांडल्यात तशा चुका आणि आव्हानंही मांडायची असतात संतुलित लेखांमधे. अन्यथा त्याला प्रचारकी आणि जाहिरातबाजीच म्हटल्या जाते. वर्तमानपत्रीय भाषेत पेड न्युज, पेड आर्टिकल. म्हणून म्हणतो गुरुजी, रहने दो बेटा, तुमसे ना हो पायेगा.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 14:55
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि प्रचार राहू देत थोडा वेळ बाजूला. मीही तुमचा त्रागा आणि आदळआपट थोडा वेळ बाजूला ठेवतो. मोदी सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे ते सांगता का. सांगायचं नसेल तर नका सांगू. तशी अजिबात सक्ती नाही. पण सांगायचं असेल तर त्रागा आणि आदळआपट न करताना सांगा. नाही, म्हणजे इतका वेळ तुम्ही मोदी सरकारविषयी फारसं न बोलता माझ्यावरच डूख धरलाय आणि त्यामुळे धागा भरकटत चाललाय म्हणून विचारतोय. आणि सांगायचं नसेल तर नका सांगू, तशी अजिबात सक्ती नाही याचा पुनरूच्चार करतो.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरुजी - अस कस जाऊ दे भाऊ ? एकतर प्रचारकी खोट ठासून बोलायच आणि ते खोट उघडकीला आल की जाऊ जाऊ दे अशी सारवासारव करायची . नही चलेगा भाई ऐसे . इथे तुम्ही एक चूक तर मान्य केलीच आहे . रादर खंडेराव यांनी कबूल करून घेतली आहे http://www.misalpav.com/comment/699572#comment-699572 ब्रिक्स बँक च्या मुद्द्यावर तुम्ही मुग गिळून गप आहेत . इतरही धाग्यावर पुरेसे वस्त्रहरण झाले आहेच . माझा मुद्दा जरा लार्जर स्केल वर आहे . मोदी सरकारच्या एक वर्षातल्या उपलब्धी एवढ्या कमी आहेत का एवढ्या धादांत खोट्यांचा वापर कराव लागत आहे . एवढी दीनवाणी परिस्थिती का आली भक्तांवर ? तुम्ही मोदी सरकार वर असले तोंडावर पडलेले धागे काढण्यापेक्षा वर कुणीतरी सुचवल्याप्रमाणे काही दिवस सन्यास घेतला तर तेच मोदी सरकारसाठी जास्त उपकारक राहील .

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 16:30
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि प्रचार राहू देत थोडा वेळ बाजूला.
का बुवा बाजूला ठेवायचं? तुम्हीच खोटं बोलायचं आणि ते बाजूला ठेवा म्हणायचं? वेरी गुड.
मीही तुमचा त्रागा आणि आदळआपट थोडा वेळ बाजूला ठेवतो.
कुठे आहे त्रागा आणि आदळआपट? चष्मा काढा साहेब.
मोदी सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे ते सांगता का. सांगायचं नसेल तर नका सांगू. तशी अजिबात सक्ती नाही. पण सांगायचं असेल तर त्रागा आणि आदळआपट न करताना सांगा.
माझं काय मत आहे ते पाच वर्ष पुर्ण झाल्यावर सांगेनच. कारण माझ्या लेखाची दखल घेऊन आता सरकारी धोरणं बदलायला मी काही अविनाश धर्माधिकारी नाही. जेव्हा लिहिन तेव्हा ते मतदारांच्या जनजागृतीसाठी असेल, प्रचार आणि जाहिरातबाजीसाठी नाही.
नाही, म्हणजे इतका वेळ तुम्ही मोदी सरकारविषयी फारसं न बोलता माझ्यावरच डूख धरलाय आणि त्यामुळे धागा भरकटत चाललाय म्हणून विचारतोय. आणि सांगायचं नसेल तर नका सांगू, तशी अजिबात सक्ती नाही याचा पुनरूच्चार करतो.
मी तुमच्यावर डूख धरलाय हा तर अतिशय पांचट आणि आक्षेपार्ह आरोप आहे. तुम्हीच काय अगदी कुणीही असा जाहिराती धागा काढला असता तर हेच माझे प्रतिसाद असते. इतरही मुद्दाहीन धाग्यांवर मी योग्य ते प्रतिसाद दिलेत. धागा भरकटवण्याचे मटेरिअल लेखातच भरपूर भरलेले आहे, बाहेरच्या मदतीची अजिबात गरज नाही. मीच नाही तर इतरांनी या लेखावर टीका केली आहे. तेव्हा कुणावरही आरोप करतांना जरा सांभाळून. फॉर योर इन्फोर्मेशन. हे मोदी सरकार नाही. भारत सरकार आहे. माझं सरकार आहे. ह्याच्यासाठी मी मतदान केलंय. फक्त इथं सत्ताधारी पक्षाचं सरकार नसतं, विरोधी पक्षही सरकारात असतात. त्यांचं मिळून भारत सरकार बनतं. जेवढी सत्ताधार्‍यांची जबाबदारी तेवढीच विरोधी पक्षांचीही. दोघांच्याही चांगल्या-वाईट गोष्टींवर टीका करण्याचा, न करण्याचा माझा अधिकार अबाधित आहे. उगाच उतावीळपणा करून, खोटं बोलून आपल्याच सरकारचं जनमानसात मत बिघडवण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 16:38
आणि हो, एक भाजप समर्थक म्हणून अशा धाग्यांवर योग्य ते प्रतिसाद देऊन आपल्या पक्षाची होणारी हानी टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे योग्यच आहे. नाही का?

In reply to by संदीप डांगे

खंडेराव Wed, 05/27/2015 - 16:48
हे मोदी सरकार नाही. भारत सरकार आहे. माझं सरकार आहे. ह्याच्यासाठी मी मतदान केलंय. फक्त इथं सत्ताधारी पक्षाचं सरकार नसतं, विरोधी पक्षही सरकारात असतात. त्यांचं मिळून भारत सरकार बनतं. जेवढी सत्ताधार्‍यांची जबाबदारी तेवढीच विरोधी पक्षांचीही. दोघांच्याही चांगल्या-वाईट गोष्टींवर टीका करण्याचा, न करण्याचा माझा अधिकार अबाधित आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 23:43
अंदाजाप्रमाणे याही प्रतिसादात इतर प्रतिसादातला नेहमीचाच त्रागा आणि आदळआपट झाली आहे. एखादा प्रतिसाद तरी अपवाद असावा अशी इच्छा होती. पण . . . असो. चालायचंच.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे गुरुवार, 05/28/2015 - 00:09
अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे मूळ प्रश्नांना सोयिस्कर बगल दिलीच आहे. एखादाही प्रतिसाद अपवाद असणार नाही याची खात्री होती... असो. चालायचंच.

In reply to by hitesh

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 14:18
स्र्कारी तेल कंपन्या मेल्या का ?
Sources said that Reliance has offered a discount of about INR 1.50 a litre to the Railways. बाकी रिलायन्स चा क्रूड शुद्धीकरण प्रकल्प सरकारी तेल कंपन्यांना सुद्धा पुरवठा करतो.

In reply to by hitesh

काळा पहाड Wed, 05/27/2015 - 18:54
सव्वा रुपया वाचवायला
हे बघ, तुझी जळजळ तू दुसर्‍या कुणाच्या तरी रिप्लाय ला व्यक्त कर. मूर्ख प्रतिसादांना मी प्रतिसाद देत नाही. तेव्हा नमस्कार.

नांदेडीअन Wed, 05/27/2015 - 17:30
आइये आपको समझाते हैं अम्बानी और मोदी मिल कर कैसे देश को चूना लगा रहे हैं । थोडा लम्बा है पर ये आपकी आँखें खोल देगा अम्बांनी की रिलायंस को 7 साल के अंतराल के बाद रेलवे को डीजल सप्लाई करने का ठेका मिला है। m.thehindubusinessline.com/companies/reliance-ind-beats-ioc-in-race-to-supply-diesel-to-railways/article6831084.ece ये ठेका इस आधार पर दिया गया है के रिलायंस IOC (सरकारी कम्पनी) के मुकाबले डीजल पर प्रति लीटर 1.50 रुपये का डिस्काउंट देगी। अब आप पूछोगे के इसमें गलत क्या है? मैं समझाता हूँ के क्या गलत है। गलत इस बात में है के क्यों रिलायंस तो 1.50 रुपये का डिस्काउंट दे सकती है और सरकारी कंपनी क्यों नहीं? देखिये कैसे: ● सरकारी कंपनियां अधिकतर कच्चा तेल बाहर से आयात करती हैं जिस पर बाकी टैक्स के साथ साथ एक्साइज ड्यूटी भी लगती है। रिलायंस अधिकतर कच्चा तेल अपने देश में ही पैदा करती है जिस पर एक्साइज ड्यूटी नहीं लगती। ● ये सारा फर्जीवाड़ा एक्साइज ड्यूटी के जरिये ही किया गया है। समझिये कैसे। जब सारे विश्व में कच्चे तेल के दाम कम हो रहे थे तब मोदी जी ने बाजार के हिसाब से दाम कम नहीं किये परन्तु कुछ दाम कम किये और बाकी की एक्साइज ड्यूटी बढ़ा दी। रिलायंस को ये ठेका 28 जनवरी को दिया गया। लेकिन उसकी रूप रेखा 2 महीने पहले ही तैयार होनी शुरू हो गयी थी। अक्टूबर तक डीजल पर एक्साइज थी करीब 1.46 रुपये प्रति लीटर। ●● 14 नवम्बर 2014 को एक्साइज ड्यूटी बढाई गयी 1.50 ₹ wap.business-standard.com/article/economy-policy/government-hikes-excise-duty-on-diesel-and-petrol-114111301000_1.html ●● 2 दिसम्बर 2014 को एक्साइज बढाई गयी 1 रुपये m.ndtv.com/profit/government-hikes-excise-duty-on-diesel-petrol-707175 ●● 2 जनवरी 2015 को एक्साइज बढ़ाई गयी 2 रुपये wap.business-standard.com/article/economy-policy/petrol-and-diesel-excise-duties-hiked-third-time-in-seven-weeks-115010100735_1.html ●● 16 जनवरी 2015 को एक्साइज ड्यूटी बढ़ाई गयी 2 रुपये। m.moneycontrol.com/news/business/govt-hikes-excise-dutydiesel-petrol-by-rs-2litre_1276455.html इस तरह कुल 6.50 रुपये एक्साइज ड्यूटी बढ़ा दी गयी। 1.46 रुपये प्रति लीटर से बढ़ा कर 7.96 रुपये प्रति लीटर कर दी गयी। इस कारण से सरकारी कंपनियों को कच्चा तेल रिलायंस से महंगा पड़ने लगा। और मोदी द्वारा लगायी गयी अत्यधिक एक्साइज ड्यूटी लगाने के कारण और इसी कारण कच्चा तेल महंगा पड़ने के कारण सरकारी कंपनियां वो डिस्काउंट नहीं दे सकती। ------------- इस से आपको कैसे नुक्सान होता है?? 1) अपने पर्सनल इस्तेमाल के लिए भी जो डीजल आपको 7 रुपये सस्ता मिलना चाहिए वो आपको महंगा मिलता है। 2) डीजल से ही अधिकतर ट्रक और ट्रांसपोर्टेशन होती है। डीजल महंगा होने से फल, सब्जियां, गेहूं, खाना, कपडे, सब कुछ महंगा मिलता है। अम्बानी के कारण आपके पेट पर लात पड़ती है 3) जो मुनाफा सरकारी कंपनी के पास जाना चाहिए वो अम्बानी की जेब में जाता है। अगर मुनाफा सरकार के पास आता तो सरकार आपके लिए सडकें बनाती, हस्पताल बनाती, स्कूल बनाती। लेकिन अब उन पैसों से अम्बानी की प्रॉपर्टी बनेगी। तो सब लोग, जिन्होंने अच्छे दिन के लालच में वोट किया उनको ये जानकारी दो। क्योंकि ये बात आपको मीडिया कभी नहीं दिखायेगा। क्योंकि 1 साल पहले अम्बानी ने 4000 करोड़ खर्च करके कई सारे चैनल्स को भी खरीद लिया है।
व्हाट्सऍपवर एका ग्रूपमध्ये हा मेसेज वाचला. मला यातले फार काही कळाले नाही. कुणी सोप्या भाषेत हे समजावून सांगेल का ? व्हाट्सऍपवर व्हायरल होणारे ९९% पोस्ट खोटे असतात हे मला माहित आहे. हाही त्यापैकी एक असेल, तर कृपया दुर्लक्ष करा. पण हा उर्वरीत १ टक्क्यामधला पोस्ट असेल, तर प्लीज मला समजाऊन सांगा.

In reply to by नांदेडीअन

कहर गुरुवार, 05/28/2015 - 11:43
यांनी तर निरीक्षण परीक्षणावरून तर्क आणि अनुमान लावण्यात चक्क शेरलोक होम्स ला मात दिली राव. भारताच्या खुफिया विभागात घ्या साहेबांना (ज्यांनी हा message बनवला)

In reply to by नांदेडीअन

चिनार Mon, 06/08/2015 - 12:10
नांदेडीयन साहेब.. ज्याने कोणी ही पोस्ट तयार केली असेल त्याला एक्साइज ड्यूटी मधलं काहीही कळत नाही हे उघड आहे. (माझा पुढील प्रतिसाद हा वरील पोस्ट मधील संज्ञा स्पष्ट करण्यासाठी आहे. पंतप्रधान मोदी आणि अंबानी यांच्या संबंध यावर मला वाद घालायचा नाही.) एखादी कंपनी जेंव्हा कोणताही माल भारतात उत्पादित करून भारतातच विकते तेंव्हा त्यांना त्यावर एक्साइज ड्यूटी (उत्पादन शुल्क किंवा कर) भरावी लागते. त्यामुळे रिलायंस ला भारतात तेल उत्पादन केल्यावर एक्साइज ड्यूटी भरावी लागत नाही या वाक्यात काहीही तथ्य नाही. (अर्थात एक्साइज ड्यूटी आकारणे अथवा न आकारणे हे कंपनीचा टर्न ओव्हर आणी इतर काही गोष्टी यावर अवलंबून आहे.) थोडक्यात भारतात तयार करून भारतात विकण्यात येणाऱ्या तेलावर रिलायंस किंवा अन्य कोणत्याही कंपनीला एक्साइज ड्यूटी + VAT भरावे लागते .( इतरही काही कर आहेत ज्याविषयी मला पूर्ण माहिती नाही) एखादी कंपनी जेंव्हा कच्चा माल परदेशातून आयात करते तेंव्हा तिला आयात शुल्क (Custom duty )भरावे लागते. आयात शुल्काचे तीन भाग आहेत आयात शुल्क = इम्पोर्ट ड्यूटी + एक्साइज ड्यूटी + VAT ह्याची बेरीज साधारण २६ % आहे. आयात शुल्क आकारताना एक्साइज ड्यूटी + VAT लावण्याचे कारण असे आहे की तसे न केल्यास प्रत्येकच कंपनी कच्चा माल आयात करायला लागेल आणि सरकारचे एक्साइज ड्यूटी + VAT मधून मिळणारे उत्पन्न कमी होईल. वरील लिखाणाचे सार असे की सरकारी कंपन्यांना एक्साइज ड्यूटी + VAT भरावे लागते म्हणून त्यांना तेल महाग पडेल आणि रिलायंस ला भरावे लागत नाही (त्यांना भरावे लागतेच!) म्हणून त्यांना स्वस्त पडेल या निष्कर्षाला काही अर्थ नाही. आता..जर रिलायंस भारतातील जमिनेतले तेल बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून भारतात तेल विकू शकते तर सरकारी कंपन्या का करू शकत नाहीत याचे उत्तर माझ्याजवळ नाही. तसे केल्यास इम्पोर्ट ड्यूटी वाचू शकेल. कदाचित भारतातले तेल बाहेर काढण्याची परवानगी फक्त रिलायंस जवळ असेल. आणी ही परवानगी त्यांना मोदी सरकारने दिली असे माझ्यातरी वाचनात आलेले नाही. आणखी एक गोष्ट..माझ्या माहितीप्रमाणे एक्साइज ड्यूटी ही वाट्टेल तेंव्हा वाढवता येत नाही. ती वर्षातून एकदाच तेही बजेट च्या वेळी कमीजास्त करण्यात येते.

In reply to by चिनार

विनोद१८ Mon, 06/08/2015 - 12:54
भारतात प्रत्येक उत्पादकाला 'एक्साइज ड्यूटी' (उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर) ही भरावीच लागते त्यापासुन कोणाचीही सुटका नसते. फक्त '१००% निर्यातदार उत्पादक' व काही छोटे उद्योजक ज्यांचा टर्न ओव्हर हा कमी असतो व जे एक्साइज ड्यूटीच्या किमान कक्षेमध्ये येत नाहीत अशांनाच फक्त त्यामधुन सूट आहे.

In reply to by विनोद१८

चिनार Mon, 06/08/2015 - 13:50
बरोबर आहे आपले..मी जास्त तपशील दिला नाही .. एक अवांतर माहिती..जर एखादी कंपनी माल आयात करून त्यावर प्रकिया करून ठराविक कालावधीत निर्यात करणार असेल तर तिला आयात शुल्क, एक्साइज ड्यूटी वैगेरे सगळं माफ होते.

खंडेराव Wed, 05/27/2015 - 17:38
धाग्याला २०० पुर्ण केल्याबद्दक, धागा टाकणारे, आणि वाचणारे आणि खेचणारे यांचे १ कर्णा ( प्रचारासाठी ), एक एक्सेल शीट ( हिशोबासाठी ), एक ब्रॉड बॅण्ड कन्नेक्शन ( गुगलण्यासाठी ), एक लिटर थंड दुध ( देशी गायीचे, थंड होण्यासाठी ) एक अनुविद्युत केंद्र ( संगणक चालवण्यासाठी ) एक खलिता,साडी आणि दंबुक ( पाकिस्तानला दम देण्यासाठी ), एक विट ( ब्रिक्स बँकेच्या बांधकामासाठी ), १२ रुपये ( विमा काढण्यासाठी ), एक समन्स ( वड्राला पाठविण्यासाठी ), एक पांढरा डब्बा ( काळा पैसा परत आल्यावर ठेवण्यासाठी ) इत्यादि इत्यादि..ज्याला जे पाहिजे ते निवडुन घ्यावे!

धर्मराजमुटके Wed, 05/27/2015 - 19:45
मुळ धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. एकंदरीत यापुढची निवडणूक जिंकण्यासाठी फार मोठे कार्य करावे लागणार नाही. ज्या पक्षाच्या भक्त मंडळींची संख्या जास्त राहील तो निवडून येईल. सारासार विचार करु शकणारे नागरीक नेहमीप्रमाणे अल्पमतातच राहतील.

गम्मत आहे ! अन्नसुरक्षा बिलाची पाठराखण करताना "बिलाला विरोध करणारे गरीबाच्या तोंडचा घास काढून घेत आहेत" असा आरडाओरडा करणारे लोक "सालाना १२ रुपये दराच्या गरीबांच्या विमासंरक्षणाला विरोध करत आहेत" हे पाहून या देशात विनोदाची कधीच कमतरता नव्हती हे परत एकदा दिसले ! :) ;)

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 09:04
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). एक फरक आहे . राहुल गांधी यांनी पुनरागमना नंतर थोडी तरी चमक दाखवली . इथ सगळा आनंदी आनंद आहे . : )

खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 10:00
आणि काही प्रश्न
दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल
१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( गुगलुन सापडले नाही, १०० मार्काचे संस्क्रुत ही कामाला आले नाही ) २) शय्यासोबत आणि मळवट भरणे अ) भाजपने शिवसेनेबरोबर वरिल काय केले? ब) भाजपने पिडिपी बरोबर वरिल काय केले? क) जे रास्त्रवादी भाजपमधे गेले, त्यांनी वरिलपैकी काय केले? ड) एनडीए मधील पक्ष भाजपाचा मळवट भरतात की शय्यासोबत करतात? ( प्रश्न विचारण्याचा हेतु हाच आहे की हे शब्द मला हीन वाटले, अर्थात तुम्हाला वाटले नाहीत, कारण तुम्ही ते लेखात वापरले) उत्तरांच्या अपे़क्षेत.. खंडेराव

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 12:58
१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( गुगलुन सापडले नाही, १०० मार्काचे संस्क्रुत ही कामाला आले नाही ) Blue Eyed Boy अर्थात अत्यंत लाडका २) शय्यासोबत आणि मळवट भरणे अर्थ उघड आहे. अ) भाजपने शिवसेनेबरोबर वरिल काय केले? काहीच नाही. ब) भाजपने पिडिपी बरोबर वरिल काय केले? काहीच नाही. क) जे रास्त्रवादी भाजपमधे गेले, त्यांनी वरिलपैकी काय केले? काहीच नाही. ड) एनडीए मधील पक्ष भाजपाचा मळवट भरतात की शय्यासोबत करतात? दोन्ही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 13:02
हे फारच झाले आता, दुसरे दोन बरोबर आले की शय्यासोबत, मळवट भरणे, आणि भाजपने केले की काहीच नाही? तुम्हाला स्वतःला आता प्रचारकी लिखाणाचा अर्थ कळाला असेलच! तुमचा अभ्यास कळायला लागलाय आता!

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 13:09
काँग्रेसने लालूबरोबर जाऊन त्याच्या सर्व अटी मान्य करून तो देईल त्याच आणि तेवढ्याच जागा लढविण्यात संतोष मानणे आणि भाजपने स्वबळावर निवडणुक लढवून प्रथम स्थान प्राप्त करून नंतर स्वतःच्या अटींवर शिवेसेनेबरोबर युती करणे यातला फरक लक्षात आला तर मी वापरलेल्या शब्दांचे आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 15:05
पीडीपी बरोबर युती करण्याआधी भाजपने स्वबळावर लढून दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर पीडीपी + नॅकॉ + अपक्ष किंवा पीडीपी + काँग्रेस + अपक्ष अशी कुठलीच बेरीज बहुमतापर्यंत जात नसल्याने पीडीपीला भाजपची साथ घ्यावी लागली. त्यांची बोलणी तब्बल २ महिने सुरू होती. पीडीपीच्या जाहीरनाम्यातील मुख्य अटी (अ‍ॅफ्स्पा रद्द करणे, सीमेच्या दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांचा सुलभ भेटीसाठी व्हिसा इ.) भाजपने मान्य न केल्याने चर्चा लांबली. शेवटी भाजपने आपल्या अटींवर युती केली. भाजपला मंत्रीमंडळात स्थान मिळालेच. पण त्याबरोबरीने उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाचे सभापतीपद सुद्धा मिळाले. पीडीपीने जेव्हा जेव्हा हुरियतबरोबर मवाळ भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तेव्हातेव्हा भाजपने डोळे वटारले. आता मी वापरलेल्या शब्दांचा अर्थ समजला असेल.

In reply to by श्रीगुरुजी

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 15:24
पुन्हा तेच आणि तेच खोटे . पीडीपी आणि भाजप मधली चर्चा लांबली ती त्याचवेळेस तोंडावर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे . हि अनैतिक युती झाली तर दिल्ली विधानसभेत जनमतावर प्रतिकुल परिणाम होईल अशी भीती भाजप नेतृत्वाला होती . त्यामुळे हि अभद्र युती लांबवण्यात आली . अर्थात दिल्ली विधानसभेत हे सगळे करून पण एका ऑटो रिक्षात बसतील एवढेच आमदार निवडून आले तो भाग वेगळा . दिल्लीत दणदणीत पराभव होताच पीडीपी भाजप युती झाली . मस्रत आलम प्रकरण , काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावणे , सैन्यावर दगडफेक प्रकार या अभद्र युतीमुळे अजूनच सुखनैव सुरु झाले . मुलीच अपहरण झाल म्हणून अतिरेक्यांना सोडून देणारे आणि कंदाहार इथे अतिरेक्यांना सोडून येणारे स्वार्थी पक्ष एकत्र येणे यापलीकडे या दोन पक्षात कुठलेही साम्य नाही

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 15:27
तुमचे ग्रुहितक मान्य केले तर असा अर्थ निघतो, की भाजपाने शिवसेनेबरोबर शय्यासोबत केली नाही, मळवटही भरला नाही. शिवसेनेने भाजपाबरोबर शय्यासोबत केली, मळवट ही भरला. संदर्भासहीत स्पष्टीकरण : पक्ष अ ने प़क्ष ब बरोबर युती केली, परंतु जे पक्ष ब ला पाहिजे होते ते दिले नाही. ( भाजप शिवसेना, तुमच्या म्हणण्यानुसार ) पक्ष य ने व बरोबर युती केली, पक्ष व ला जे पाहिजे होते ते सर्व दिले. आता, व हा इथे अ बनतो. ( लालु आणि कॉन्ग्रेस्स )

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 20:12
शिवसेनेबाबत तसे म्हणता येणार नाही, कारण मंत्रीपदाचे वाटप कोणत्याही एका पक्षाच्या बाजूला जास्त झुकलेले नाही. शिवसेनेचे भाजपच्या तुलनेत निम्मे आमदार आहेत. त्या प्रमाणात शिवसेनेला मंत्रीपदे मिळाली आहेत. त्याच्याबरोबरीने विधानसभा व विधानपरीषदेचे उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले आहे. आपल्या एकूण आमदारांच्या प्रमाणात शिवसेनेकडे लाल दिव्यांच्या गाड्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

नाव आडनाव गुरुवार, 05/28/2015 - 14:02
शिवसेनेला खंडणी मागणाऱ्यांचा पक्ष कोण म्हणालं होतं बरं - भाजपाच काय की? त्यांच्या बरोबर "स्वतःच्या अटींवर" युती केली :) छान छान :)

In reply to by नाव आडनाव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 15:08
महाराष्ट्रात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद व त्याच्या बरोबरीने अर्थमंत्रीपद, गृहमंत्रीपद, सभापतीपदासहीत मंत्रीमंडळात निम्मा वाटा हवा होता. त्याच्या बरोबरीने केंद्रात अजून २ मंत्रीपदे हवी होती. प्रत्यक्षात भाजपने काय दिले ते माहिती असेलच.

In reply to by खंडेराव

संदीप डांगे गुरुवार, 05/28/2015 - 13:14
असं काय करताव खंडेराव, समझा करो ना यार की सिर्फ तारिफ सुनायी देती है टिका नही. कंडीशनल बहिरेपण आणि बधीरपण आहे.

In reply to by संदीप डांगे

खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 14:01
मला योग्य उत्तर अपेक्षित होते. पण ते काय मिळणार नाही. लिखाणाचा तोल हुकलेला आणि चुकलेला आहे. अर्थात, जर हे जाहिर प्रचारकी लिखाण असते तर हे प्रश्न आले नसते, पण अभ्यासपुर्ण असल्याचा दावा असल्यामुळे येत आहेत.

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 14:21
गुरुजीनी इथल्या प्रामाणिक आणि निरपेक्ष भाजप समर्थकांना पण खाली मान घालायला लावली धादांत खोटें दाखले देऊन आणि सोयीस्कर पणे पळ काढून .

In reply to by पिंपातला उंदीर

hitesh गुरुवार, 05/28/2015 - 15:31
लोक म्हणत्यात की गुर्जींचा मायबोलिवर मास्तुरे असा एक आय्डी होता म्हणुन. गुर्जी मोदींच्या तमाशात तुणतुणं घेउन हुभे आहेत असे क्षणभर चित्र तरळुन गेले.

In reply to by hitesh

संदीप डांगे गुरुवार, 05/28/2015 - 15:42
तुणंतुणं वाजवायला पण तालासुराची अक्कल लागते. ज्याला तेवढीही अक्कल नसते त्याला गावात तमाशाचा प्रचार करायला कर्णा घेऊन दवंडी पिटायला पाठवतात. अर्थात त्याला दवंडी पिटायचीही अक्कल नसेल तर लोकांना गावात नक्की लावण्यवतींचा तमाशा आलाय का तोंड रंगवलेल्या जोकरांची सर्कस ते काही कळत नाही.

नांदेडीअन गुरुवार, 05/28/2015 - 16:31
"जर हे जाहिर प्रचारकी लिखाण असते तर हे प्रश्न आले नसते, पण अभ्यासपुर्ण असल्याचा दावा असल्यामुळे येत आहेत." अभ्यासपुर्ण ?? :O वेगवेगळ्या इंग्रजी वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा सरळ सरळ मराठी अनुवाद आहे.

नांदेडीअन गुरुवार, 05/28/2015 - 18:27
RTI reply poses serious questions to PM’s ambitious “Smart City” Project http://www.jantakareporter.com/india/rti-reply-poses-serious-questions-to-pms-ambitious-smart-city-project/1605

In reply to by पैसा

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 20:45
@पैसा ताई - तुम्ही पण सगळे प्रतिसाद वाचले असतीलच . लेखकाचे धादांत खोटे पुर्ण धाग्यावर आम्ही काही लोकांनी लोकांनी सिद्ध केले आहेत . धागाकर्त्याने जर लेखात आपण धादांत खोटे लिहिले आहे किंवा माझ्या (धागकर्त्याच्या ) अज्ञानामुळे मी चुकीचे लिहिले अशी कबुली दिली तर आम्ही हा धागा (आणि पर्यायाने धागकार्त्याचे होणारे वस्त्रहरण ) इथेच थांबवु . काय म्हणता खंडेराव , संदीप डांगे , नांदेडीयन, नाव आडनाव ?

In reply to by पिंपातला उंदीर

पैसा गुरुवार, 05/28/2015 - 20:54
धागा १००% खोटा आहे असे म्हणता येणार नाही. आणि आक्षेप खोटे आहेत असेही नाही. दोघेही थोडे बरोबर थोडे चूक आहेत. कोणीच आपली जागा सोडायला तयार नाही, मग हिरीरीने प्रतिसाद द्यायचा तुम्हा लोकांना कंटाळा येत नाही का? या चर्चेतून कोणाचे मत बदलते आहे असे दिसले नाही. इतक्या प्रतिसादांनंतर फार काही नवी माहिती समोर येते आहे असेही नाही. मग मुविंच्या धाग्याचे रेकॉर्ड मोडायचे आहे असे तरी सांगा ना! =))

In reply to by पैसा

श्रीगुरुजी Fri, 05/29/2015 - 13:29
बापरे! काल संध्याकाळपासून मी इथे नव्हतो तर मी इथून पलायन केले या जाणिवेने काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. मी हिरीरीने प्रतिसाद द्यायचा प्रश्नच नाही. मी फक्त मोजक्याच, विषयाशी सुसंगत असलेल्या व सभ्य प्रतिसादांना उत्तर दिले आहे. याउलट इथे व्यक्तिगत आकसातून वैयक्तिक पातळीवर उतरलेल्या व निव्वळ त्रागा आणि आदळआपटीने भरलेल्या प्रतिसादांची भाऊगर्दी आहे. अशा प्रतिसादांकडे मी संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. इतक्या प्रतिसादांनंतर फार काही नवी माहिती समोर येते आहे असेही नाही कारण प्रतिवाद करण्यापेक्षा वैयक्तिक आकस हाच प्रतिसाद देण्यामागचा प्रधान हेतू आहे. मी हा धागा लिहिला हे चांगलेच केले. या धाग्याच्या निमित्ताने बिळात लपलेले अनेक डूआयडी कार्यरत झाले व प्रतिसादांच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मनातील मळमळ ओकून टाकली. इथले काही प्रतिसाद बघता मला काही प्रश्न पडले आहेत. फक्त संपादक मंडळानेच स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे. (१) मिपावर राजकीय धाग्यांना बंदी आहे का? बंदी असेल तर हा लेख काढून टाकावा. (२) जर बंदी नसेल तर भविष्यात मी अजून राजकीय लेख लिहिणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवर नक्की लिहिणार आहे (जर क्लिंटन लिहिणार नसतील तरच), केजरीवाल लवकरच लेख लिहायची संधी देतील असं दिसतंय, युवराज सध्या मोदींवर दुगाण्या झाडत मुक्ताफळे उधळीत आहेत त्यावर एक लेख लिहावासा वाटतोय. जर या विषयांवर लिहायला बंदी असेल तर तसे स्पष्ट करावे. (३) या धाग्यावर काही जणांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वैयक्तिक पातळीवर घसरले आहेत. मी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले तरी मी एकदा तरी प्रतिसाद देईन या आशेने ते आशाळभूतपणे सातत्याने वैयक्तिक प्रतिसाद लिहीत आहेत. असे प्रतिसाद मिपा धोरणात बसतात का हे स्पष्ट करावे. मी इथे काल संध्याकाळपासून नसल्याने काहीजण खूपच अस्वस्थ झालेले दिसताहेत. मी आज संध्याकाळपासून सोमवार दुपारपर्यंत इथे नसणार. संध्याकाळपर्यंत योग्य त्या प्रतिसादांना उत्तर देईनच. जर पुढील २-३ दिवसात काही योग्य प्रतिसाद आले तर सोमवारी दुपारनंतर उत्तर देईन (तोपर्यंत धागा जिवंत असला तर). अवांतर - माझ्या या प्रतिसादानंतर संध्याकाळपर्यंत धाग्याचे नक्कीच त्रिशतक होणार.

In reply to by पिंपातला उंदीर

संदीप डांगे गुरुवार, 05/28/2015 - 21:23
धागाकर्त्याने काहीही लिहावे, आपली त्यास अजिबात ना नाही. सर्वच खोटं आहे असं मी कुठेच म्हटलं नाही. जे खोटे आणि प्रचारकी आहे त्यावरच आक्षेप होते. पण आ़क्षेपांना एकही सरळ उत्तर न देणे हे न पटण्यासारखे होते. माझ्यातर्फे या धाग्यावर योग्य ते प्रतिसाद देऊन झालेत. त्याची उत्तरे मिळाली नाहीत याचा अर्थ ती देण्याची धागाकर्त्याला गरज वाटत नाही, इच्छा नाही किंवा भय वाटत असेल. असा वा तसा, जाहिरात करून प्रसिद्ध व्हायचा हेतू सिद्ध झाला आहे. त्यांची कामगिरी फत्ते झाली आहे. यापुढे अशा महत्त्वहीन कामात आपला तरी सहभाग राहू नये. त्यामुळे मी तरी इथेच थांबतो. भाजप बहुमताच्या बळावर सत्ता करत आहे. कार्यकाळ पूर्ण करेल. पण असले धागे आणि त्याचे लेखक मात्र आपली पत गमावून बसतील. असो. त्यांचे ते पाहून घेतील. वस्त्रहरण आपोआप होत आहे. यापुढे तरी अशा धाग्यांना अभ्यासू, माहितीपूर्ण म्हणण्याआधी लोक आपले चष्मे उतरवून ठेवतील अशी अपेक्षा आहे. चष्मे उतरवले की मस्त मनोरंजन होते. माझेही या धाग्यावर भरपूर झाले. धन्यवाद! जसं बंद घड्याळ दिवसातून दोनदा योग्य वेळ दाखवतं तसंच एका बाबतीत तरी या लेखाला १०० पैकी ११० गुण. मी एक जाहिरात व्यवसायिक आहे. माझ्या दृष्टीने हा लेख एक उत्कृष्ट जाहिरात आहे. चुकीच्या जागी प्रदर्शित केलेली. :-)

In reply to by पिंपातला उंदीर

नाव आडनाव गुरुवार, 05/28/2015 - 21:36
सहमत. सरकार कोणाचं आहे यामुळे सामान्य जनतेला फरक पडत नाही. तसा फरक झेंडे घेऊन पळणाऱ्या कार्यकर्त्यांना पडत असेल. सामान्य जनतेला त्यांच्या कामाचं काही होत आहे / नाही एव्हढच बघायचं असतं. वर दिल्यासारखी काही खोटी माहिती का दिली जाते हे मला तरी कळत नाही. इथे ना मी विरोधी पक्षाचा आहे ना धागा काढणारा सरकारात असणाऱ्या पक्षाचा (असं मला वाटतंय). तेंव्हा फक्त चर्चा आणि ती सुध्धा एका लिमिट पर्यंतच होऊ शकते.

In reply to by पिंपातला उंदीर

खंडेराव गुरुवार, 05/28/2015 - 21:46
मिपावर नविनच आहे. हे संकेतस्थळ उत्तम दर्जाचे, वाचनिय आणि विश्वासार्ह आहे हा माझा समज आहे. जेव्हा कोणि अभ्यासाच्या नावाखाली प्रचारकी आणि चुकीचे लिहितो त्याची हि जागा नसावी. त्यासाठी व्हाट्स अ‍ॅप वगैरे आहे, जिथे हजारो लोक असे सर्व पुढे ढकलतात. मिपावर संदर्भहिन, खोटे आणि तुछ्छतेने लिहिलेले लिखाण येउ नये ( उदा - शय्यासोबत, मळवट भरणे). काय आहे, लिहितांना लेखकाचा हेतु महत्वाचा असतो. तो स्वच्छ नसेल तर चर्चा होणारच.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Fri, 05/29/2015 - 13:11
शय्यासोबत आणि मळ्वट हे दोन शब्द वृत्तपत्रातील राजकीय लेखात, राजकीय विषयांवरील पुस्तकात अनेकदा उपरोधिक अर्थाने वापरले जातात. हे शब्द तुम्हाला का खटकले ते समजले नाही. उदा.
कारगिलचे दुस्साहस आणि त्या मागची फौजी चांडाळ-चौकडी
-
मूळ लेखक: खलीक कियानी, अनुवाद सुधीर काळे, जकार्ता
या पुस्तकातील हे खालील उतारे पहा. सुधीर काळे मिपावर सुद्धा नियमितपणे लिहितात. __________________________________________________________________________ पाकिस्तानची निर्मितीच भारतद्वेषातून झाली व हा द्वेष या देशाने अद्यापपर्यंत नेटाने टिकवून धरलेला आहे. हा द्वेष चालू ठेवायला या देशाने स्वत:ला अमेरिकेसारख्या देशाकडे गहाण टाकले व तिथली सद्दी संपल्याची जाणीव झाल्यापासून आता तो चीनशीसुद्धा शय्यासोबत करू लागला आहे. त्यामुळे मला या देशाबद्दल प्रचंड कुतुहल आहे. गंमत म्हणजे सर्वसाधारण पाकिस्तान्यांच्या मनात ही द्वेषभावना दिसत नाहीं. एकाच वेळेला अमेरिका आणि चीन या जागतिक महसत्तांबरोबर उघडपणे शय्यासोबत करून आपले उखळ पांढरे करून घेणार्‍या पाकिस्तानला गनिमीकाव्यात किंवा कूटनीतीत बिनडोक समजण्यात आपली चूकच होईल. भारताकडे पाकिस्तानबाबत दूरदर्शी आणि एकसूत्री परराष्ट्रधोरण नक्कीच नाहीं, सत्तेवर येणार्‍या पक्षाबरोबर ते बदलत जाते. या विरुद्ध चीनचे धोरण खूपच सातत्यपूर्ण असते. _________________________________________________________________________ हे शब्द जर असभ्य, असंसदीय असतील तर संपादक मंडळाने ते काढून टाकावेत.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Mon, 06/08/2015 - 14:22
(१) बिहारमध्ये राजद व संजद या दोन पक्षांमध्ये जागावाटप व युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत काँग्रेसला सहभागी करून घेतलेले नाही. (२) संजदने असा प्रस्ताव दिला आहे की २४३ पैकी राजद व संजदने प्रत्येकी १०० जागा लढवाव्यात व उर्वरीत ४३ जागा काँग्रेस, माकप व भाकप यांना दिल्या जाव्यात. या प्रस्तावासाठी काँग्रेसचे मत विचारलेले नाही. काँग्रेसने किती जागा लढवायच्या याचा निर्णय काँग्रेस घेणार नसून हे दोन पक्ष घेणार. (३) जागा वाटपासाठी ६ सदस्यांची एक समिती नेमण्यात येणार असून त्यात राजद व संजदचे प्रत्येकी ३ सदस्य असतील. या समितीतही काँग्रेसला स्थान नाही. बिहारमध्ये भाजप पराभूत झाला तर फायदा राजद व संजदला होईल. कॉंग्रेसच्या झोळीत फारसे काही पडणार नाही. उलट बिहारमध्ये भाजप जिंकला तरीही काँग्रेसचा तोटाच आहे. एकंदरीत काँग्रेससाठी दोन्ही बाजूने तोटाच आहे. काँग्रेस स्वतंत्र लढली तरच बिहारमध्ये स्वतःचे महत्त्व थोडेफार वाढविण्याची काँग्रेसला संधी आहे. अन्यथा तोटाच आहे. परंतु हे दोन पक्ष जेवढे तुकडे फेकतील तेवढेच तुकडे चघळण्यावर काँग्रेस खुष राहणार असून त्याविषयी कृतज्ञता म्हणून काँग्रेस भाजपवर भुंकणे सुरूच ठेवेल. काँग्रेससंदर्भात वापरलेल्या शब्दांचा अर्थ आता समजला असेल.

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 20:59
कोणीच आपली जागा सोडायला तयार नाही यावर थोडी असहमती . विरुद्ध पक्षाने / धागकर्त्याने कधीच या धाग्यावर काढता पाय घेतला आहे . तुम्ही बघितलं असेलच .

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय Fri, 05/29/2015 - 13:22
विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की कोणी हे कळाले तर खुप बरे होइल. धागा प्रचारकी थाटाचा आहे म्हणजे तो चुकीचा आहे हे अजुनही मान्य नाही. प्रचारकी थाट केला नसता तर बरे झाले असते हे नक्की. आता आक्षेपांकडे वळूयातः
१. एफडीआय म्हणावे तसे वाढले नाही
चूक १२ टक्यांची वाढ भरघोसच म्हणायला लागेल खासकरुन १२, १३ चा रद्दी परफॉर्मन्स बघता. हा आकडाही चुकीचा असेल तर चर्चा करता येइल. जर नाही तर परकीय गुंतवणुकीत आणि परदेशी गुंतवणुकदारांच्या दृष्टीकोनात प्रचंड फरक पडला आहे. अनेक परदेशी बँकांशी नेहमीच संबंध येत असल्याने त्यांच्या चर्चेतुन भारताविषयीचा बदललेला दृष्टीकोन सध्या नेहमीच सकारात्मक दिसुन येतो. राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणुन सध्या केवळ भाजपाच स्थिर सरकार देउ शकते हे मत तर अनेकवेळा ऐकलेले आहे. राहुल गांधीला उगाच बकरा बनवला आहे अस्से मत एकदा व्यक्त केले होते तर एका गोर्‍यानेच मला वेड्यात काढले होते. असो. लोकांचा बदललेला दॄष्टीकोन हा मापदंड कदाचित या मुद्द्यासाठी होउ शकत नाही. पण १२% घशघशीत वाढ हा नक्कीच चर्चेचा मुद्दा होउ शकतो. २००८ ते २०१३ या काळातली सरासरी हा तुलनेचा निकष होउ शकत नाही कारण त्यावेळेस वातावरण एकुणच सकारात्मकच होते. नकारात्मक वातावरणातुन ग्रोथ घडवण्यात येत नव्हती. गांगुली समर्थक त्याच्या नेतृत्वगुणाचे समर्थन करताना जो मुद्दा मांडतात नेमका तोच मुद्दा आहे हा. पहिल्या वर्षात लगेच परिस्थिती सुधारणार नव्हतीच. त्या पार्श्वभूमीवर १२% हा उच्चा आकडा आहे. २०१२ नंतर परिस्थिती का बदलली हे ही लक्षात घ्यावे. २०१२ नंतर ममो सरकारने अनेक उफराटे निर्णय घेतले हे कारण तर आहेच पण न्यायसंस्थेसमोर २जी ची बाजू योग्य प्रकारे धसास न लावल्याचा रागही कॉर्पोरेट क्षेत्रात होता. चूका सरकारने कराव्यात आणि त्याचा भुर्दंड उद्योगांना बसावा हे न समजण्यासारखे होते. २जी मध्ये क्लीन चीट मिळालेल्या कंपन्यांचे लायसंस रद्द होणे हे देखील न कळण्याजोगे होते. या संपुर्ण प्रकरणात सरकारने अगदीच पडती बाजू घेतली, कॉर्पोरेट्सना वार्‍यावर सोडले म्हणुन जगभरातुन टीका झाली आणि गुंतवणुकदारांचा विश्वास गमवावा लागला. त्यानंतरच्या कोळसा घोटाळ्यामध्येही काही वेगळे घडले नाही. गुंतवणुकदारांच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होणे खुप गरजेच आहे. ते मोदी सरकारने केले. याची परिणिती सध्या १२% मध्ये झाली आहे. उद्या हा आकडा वाढेल (वाढल्यावरच बोलणे योग्य ठरेल). आधी घसरण होत होती ती थांबुन जर वाढ सुरु झाली असेल तर ते नक्कीच सकारात्म आके.
२. भ्रष्टाचाराने महागाई ३०% ने वाढते. भ्रष्टाचार नाही तर ती वाढलेली महागाई कमी कशी नाही झाली?
महागाई जगभर वाढते आहे. ती केवळ भ्रष्टाचाराने वाढते असे म्हणणे हास्यास्पद आहे. १९४७ पासून आजपावेत महागाई सलग वाढतेच आहे. मोदी सरकारने स्वच्छ प्रशासन दिल्याने किंमती १९४७ च्या पातळीवर जातील असे कोणाला वाटत असेल तर तो मुर्खपणा आहे. शिवाय हा ३०% मापदंड कुठुन आणला तेही कळेना. जर हा मापदंड असेलच तर फारतर इतकेच म्हणता येइल की स्वच्छ प्रशासन असेल, भ्रष्टाचार नसेल तर महागाई वाढणार नही (असे म्हणणे देखील चुकीचेच आहे). पण म्हणून जे भाव वाढले आहेत ते कमी होणार नाहित. ते आहेत तसेच राहतील. महागाई जर वर्षानुवर्षे चालत आलेल्या शासकीय तुटीचा अथवा "स्पेंडिग पॅटर्नचा" (मराठी शब्द सुचवा कृपया) परिपाक असेल तर ती महागाई एका वर्षात संपायची नाही. त्याची वाढ आटोक्यात यायला थोडा वेळ लागेल. संपुर्ण संपणार तर कधीच नाही. वर्षानुवर्षे वाढत असलेल वजन एका महिन्यात कमी होइल का आणी संपुर्ण संपेल का? २०१३ नोव्हेंबर मध्य जो महागाईचा दर ११ टक्क्याच्या पुढे गेला होता तो आज ५ टक्क्याच्या खाली असेल आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये तर साडेचार टक्क्याच्या खाली पोचला असेल तर सामान्य ज्ञान सांगते की महागाई कमी झालेली आहे. डाळींचे भाव वाढले आहेत? असतील. तर मग इतर कुठेतरी कमी झाले आहेत हे नक्की त्याशिवाय हा दर कमी झालेला नाही. २०१३ मध्ये महागाईने भीषण स्वरुप धारण केले होते ते आता नाही. म्हणजे आता महागाईची झळ बसत नाही असे नाही पण २०१३ च्या तुलनेत तर नक्की कमी. महागाईचा आलेख उतरता आहे. जेव्हा तो शून्याच्या खाली पोचेल तो सुदीन पण तुलनेत "अच्छे दिन" आले आहेत असे तरी दिसते. आणि मुख्य म्हणजे वरचे आकडे हे हवेत मारलेले तीर नाहित. आंजावर हे आकडे मिळतील. स्वतः तपासून घ्यावेत. लहानपणी १ रुपयाला मिळणारा समोसा आत्ता १२ रुपयाला मिळतो. कुठे आणली मोदींनी स्वस्ताई असे उगा कंठ शोष करायचा असेल तर गोष्ट वेगळी.
३. पाकिस्तानची आगळीक कुठे थांबली?
गुर्जींचे मुद्दे एकाप्रकारे तर हे विधान दुसर्‍या प्रकारे प्रचारकी. नाही थांबलेली पाकची आगळीक आणि कधी थांबणारही नाही. पण त्यांनी १ मारल्यावर आता आपण किमान २ मारतो आहोत ना? किमान तशी माहिती लष्करप्रमुख, सेनानी आणि सरकारने आपल्याला दिली आहे. अ‍ॅग्रेसिव्ह भूमिका घ्यायचे आदेश सरकारने दिले आहेत ना? सरकार केवळ निषेध खलिते पाठवुन थांबले का? २०००० पाकड्यांना विस्थापित व्हायला लागले असेल सरकारी कारवाई नुसार (हा आकडा याच धाग्यावर कुठेसा वाचला. माझ्याकडे याचा विदा नाही) तर हे धोरण अ‍ॅग्रेसिव्ह ठरते. मनमोहन सरकारने इतकी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. घेतली असेलच तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोचली नाही. कारवाई करणे आणि लोकापर्यंत ती पोचवणे हे मोदी सरकारने उचललेले योग्य पाऊल आहे. शिवाय मुद्दा फक्त पाकपुरता मर्यादित नाही. सरकारने परराष्ट्र धोरणात घेतलेली ठोस आणि आक्रमक भूमिका चीनबद्दलदेखील दिसते. इतर एका धाग्यात यावर सविस्तर लिहिलेले आहेच. परत लिहिण्यात काही हशील नाही.
४. काळा पैसा सरकारने परत आणला नाही. प्रत्येक माणसाला मिळणारे १५ लाख कुठे गेले
काळा पैसा परत आणण्याची प्रक्रिया १ वर्षात पुर्ण होइल अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे. परंतु आधी त्याबद्दल काहिच होत नव्हते. आता हालचाली दिसत आहेत. हे सकारात्म पाउल आहे. १०० दिव्सांच्या वल्गना मुर्खपणाच्या होत्या. अजुनही काही गर्जना वल्गना या स्वरुपात मोडतील आणी भाजपा या वल्ग्नांची फळे एक ना एक दिवस नक्की भोगेल. मी याआधीही लिहिले होते की ममो सरकारच्या काळात खुपच औदासीन्याचे वातावरण होते आणि मोदींनी अपेक्षा अवास्तव वाढवुन ठेवल्या आहेत. याआधीही भाजपाने काही गोष्टीत पलटी मारलेली आहे जे त्यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण होते. आजही आहे. पण काळा पैसा परत आणण्याच्या प्रक्रियेतील त्यांनी उचललेली पावले नक्कीच महत्वपुर्ण आहेत. त्यांचे परिणाम यथावकाश दिसतील अशी अपेक्षा आहे. १०० दिवसात पैसे भारतात आले नाहित (जे अपेक्षितच होते) आणि तश्या वल्गना केल्याने भाजपा आज अडचणीत आली आहे हे दिसतेच आहे. पण त्यांनी योग्य पावले उचलली आहेत हे देखील नक्की. दुसरा मुद्दा म्हणजे अजुन माझ्या अकाउंट मध्ये १५ लाख रुपये दिसत नाहित. तर मुख्य मुद्दा हा प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचा नव्हता तर " परदेशातला काळा पैसा भारतात आणला तर प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख जमा करता येतील" असा होता. मोदींनी १५ लाख जमा करु असे म्हटले नव्हते. आता भाजपाचा वाचाळपणा हा की उगाच अव्वाच्या सव्वा आकडा सांगायचा. मी चुकत असेल तर सांगा पण हा आकडा होतो ७५०० बिलियन डॉलर्स (३० कोटी कुटुंबे * १५ लाख रुपये). भाजपावर हल्ला करायचा झाल्यास तो या मुद्द्यावर करता येतो की हा आकडा प्रचंड अव्यवहार्य होतो. ही जनतेची दिशाभूल आहे. पण मुळात १५ लाख खात्यात जमा होतील हे म्हणणे देखील चुकीचे आहे.
५. (अ) विम्याचे पैसे सरकारने घशात घातले. (ब) या पैशाची काही अकाउंटेबिलिटी नाही (क) एलआयसी ला डावलुन परदेशी कंपन्यांना प्राधान्य दिले (ड) प्रत्यक्ष पैसे मिळतील तेव्हा खरे
(अ) विमा योजना सरकारने जाहीर केली म्हणजे ते पैसे सरकारच्या घशात गेले हा शोध कसा लागला देव जाणे. जर गेलेच असतील तर त्यात नक्की चूक काय ते देखील देव जाणे. विमा मोफत हवा असेल तर ती म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फारच अवास्तव अपेक्षा झाली. सध्या मिपावर उपरोध कळत नाही म्हणुन स्पष्टच सांगतो की हा पैसा विमा कंपन्यांना जाइल. १२ अणि ३०० रुपयात २ लाखाचा जो विमा मिळतो आहे तो मुळात प्रचंड स्वस्त आहे. याहुन जास्त स्वस्ताईची अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे आणि सरकारच्या सांगण्यावरुन विमा कंपन्यांनी पदराला खार लावुन तुम्हाला मोफत विमा द्यावा हे सध्या अव्यवहार्य आहे (भविष्ञात तसे होउ शकते). तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे की पैसे विमा कंपन्यांना जातील आणि त्याला घशात घालणे असे न म्हणता दिलेल्या सेवेचा मोबदला मिळवणे असे म्हणता येइल. (ब) सरकार अकाऊंटेबल नाही हा मुद्दा घेउयात. मुळात पैसे सरकारला जाणार नाहित हे सांगितलेले आहेच. त्यामुळे हा मुद्दाच खरे म्हणजे रद्दबातल होतो. तरीही उगा बोंबाबोंब करण्यासाठी थोड्याकाळासाठी मान्य करुयात की पैसा सरकारकडे जाणार. तरी सरकार असे प्रत्येक उत्पन्नाचा वेगळ तपशील देत नाही. आजपावेतो कुठल्याच सरकारने दिलेला नाही. जगभर इतरत्र देतात की नाही ते माहिती नाही. पण बहुधा देत नसावेत ते अव्यवहार्य आहे. सरकारकडे अजुन बरीच कामे असतात. शिवाय पैशाला एक मुख्य नियम लागू होतो "फंजिबिलिटी" त्यामुळे अमुक पैसा अमुक ठिकाणी वापरला असे होत नाही. त्यासाठी वेगळे "एस्क्रॉ" अकाउंट उघडावे लागते. प्रत्येक स्कीमला असे करणे अति अव्यवहार्य आहे आणि असे फक्त तेव्हाच करतात जेव्हा असे केल्याने काही विशेष हेतु साध्य होणार असेल. त्यामुळे सरकार असा प्रत्येक उत्पन्नाचा वेगळा हिशोब देत नाही. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. (क) भारतीय विमा निगमला डावलले - अतिशयच चुकीचा मुद्दा. माझ्या माहितीनुसार भारतात विमा उद्योग करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक कंपनीकडे हा बिझनेस जाउ शकतो. त्यात एलायसी देखील आली. इतरही अनेक कंपन्या आहेत. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उद्योग आहे ते लक्षात घेता आणि अश्याप्रकारच्या बिझनेसचे बिन्झनेस मॉडेल लक्षात घेता यात बर्‍याच कंपन्या असणार हे ओघानेच आले. यात कोणालाही डावलण्यात आलेले नाही. भारतीय विमा निगमला नाही. वादासाठी असे मान्य जरी केले की भारतीय विमा निगमला डावलण्यात आले आहे तरी हे नेहमीच चूक असेल असे नाही हे देखील लक्षात घ्यावे. कदाचित भारतीय विमा निगमला डावलणे त्यांच्या आणि भारताच्या हिताचे देखील असू शकते. त्यामुळे केवळ या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करणे चुकीचे आहे. सरकारच्या प्रयत्नाने सामान्य जनतेला जे एंड प्रॉडक्ट मिळते आहे ते सामान्य जनतेच्या फायद्याचे आहे की नाही ते बघा. (ड) प्रत्यक्ष पैसे मिळतील तेव्हा खरे - खरे सांगा तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट वाचले आहे का? की न वाचताच पैसे भरले अथवा न भरण्याचा निश्चय केला? ते काहिही अस्सो म्हणा पण प्रत्येक पॉलिसी मध्ये कुठे ना कुठे तरी पाचर मारुन ठेवलेली असते, या पॉलिसीमध्येही असणार. म्हणजे सरसकट सगळे क्लेम नाकारले जातील असे नाही पण काही नक्कीच नाकारले जातील. केवळ त्याच मुद्द्यांवरुन उद्या सरकारला धारेवर देक्खील धरले जाइल. योजना सरकारच्या अंगलट कशी येइल हे बघितले जाइल. सरकारने याचा विचार आधीच करुन ठेवला असेल अशी आशा आहे. पण जोवर सरसकट सगळे किंवा अधिकतर क्लेम नाकारले जात नाही आहेत तोपर्यंत योजना यशस्वी झाली असे म्हणायला लागेल. हे लक्षात घेणे महत्वाचे की अगदी एलाअयसी सुद्धा १००% क्लेम स्वीकारत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत काही क्ल्मे सुद्धा नाकारले जातीलच. मुळात घर बसा नही और लुटेरे आ गये हा अ‍ॅटिट्ञुड कशाला? आधी योजना उपलब्ध तर होउ देत. त्याचे रिझल्ट येउ देत. थोडे प्ल्स मायनस साठी वेळ जाउ द्यात मग निष्कर्ष काढा ना. आधीपासूनच हा निराशावादी सूर का?
६. हा धागा प्रचारकी आहे
शंकाच नाही. प्रचारकी थाटाचाच आहे. पण म्हणुन तो पुर्णपणे अस्वीकारणीय आहे का? नाही. काही आकडे चुकीचे असतील पण त्यामागचे एंड आर्ग्युमेंट चुकते आहे काय? सगळेच मुद्दे निकाली काढण्याजोगे आहेत काय? नाही. तर मग मी म्हणेन की जे काही बरोबर चुकीचे लिहिले आहे त्याची गोळाबेरीज करता या धाग्याचा आशय मान्य होण्यासारखा आहे. सगळेच मुद्दे मान्य होतील असे नाही. प्रचारकी थाट तर होता होइतो टाळायला हवा होता.

In reply to by मृत्युन्जय

चैतन्य ईन्या Fri, 05/29/2015 - 21:15
मुद्दे बरेचसे बरोबर आहेत फक्त मला राहून राहून लोकांची गम्मत वाटते कि काळा पैसे बाहेर आहे. इथे प्रत्येक जण कधी ना कधी काळा पैसा जमावातोच आहे. किती लोक प्रामाणिक पणे सगळ्या यफडी दाखवतात? किती लोक कॅश मध्ये घर घेतात? किती आर्किटेक्ट, डॉक्टर, सिए, दुकानदार, वकील आणि सरकारी नोकर जे रोजच्या रोज पैसे ओरबडतात ते सगळे प्रामाणिकपणे सांगतात? ज्याला संधी मिळेल तो इथे भ्रष्टाचार करतोय. आपला पगार आता दाबता येत नाही म्हणून नाहीतर लोक ते पण कमीच सांगतील. ते जावू देत. जवळपास सगळे नोकरदार लोक खोटा एलटीए नाहीतर खोटी रेंटची बिले, तेही नाहीतर निदान एकतरी मेडिकल बिल दाखवून पैसे काढतातच. गम्मतच वाटते लोक बाहेरून काळा पैसा आणण्याच्या मागे लागतत आणि त्यावर वाद घालतात. ते स्विस बँकेच्या कोटीत काळा पैसे इथे रोज तयार होतोय त्यावर काही कोणी बोलत नाहीये. सगळे नियम १८५७ काळाचे ज्यांचा हल्लीच्या जमान्याशी संबंध फार नाही ते बदलायची एछाच दाखवत नाहीयेत. त्यावर फार काही भाष्य होत नाहीये.

पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 21:38
या असल्या फिआस्को नंतर तरी श्रीगुरुजी आणि त्यांच्या लिखाणाला छान , अभ्यासपूर्ण , तटस्थ म्हणणारे लोक थोड आत्मपरीक्षण करतील ही अपेक्षा . एखाद्या पक्षाला सपोर्ट करणे म्हणजे त्याच्या 'कसलेतरी ' हितसंबंध असल्यामुळे सपोर्ट करणाऱ्या एखाद्या इसमाला पण चान चान म्हणे हे त्या पक्षासाठीच खड्डा खोदणारे असते हे कळले तरी खुप झाले . बाकी बेटा तुमसे हो ना पायेगा हे तर आहेच . पण असल्या 'प्रचारकी ' लोकांची 'कह के लेंगे ' हा वादा आहे

श्रीरंग_जोशी Mon, 06/01/2015 - 08:05
श्रीगुरुजींचा अनुभव, चतुरस्र वाचन, खोल अभ्यास अन मुद्दे मांडण्याची हातोटी, प्रत्युत्तर देण्याचे / प्रतिप्रश्न विचारण्याचे कसब यात मिपावर तरी त्यांचा कुणी हात धरणारा नाही. त्यातही राजकारण व क्रिकेट याखेरीज गुरुजी दुसऱ्या विषयाकडे ढुंकूनही बघत नाहीत. माननीय पंतप्रधानांबाबत अन भाजपबाबत श्रीगुरुजींची निष्ठा वादातीत आहे. पण समस्या अशी आहे की वर पासून खाल पर्यंत सरकारची प्रतिमा चमकवणारे हजारो लोक असताना श्रीगुरुजीही त्यांची ऊर्जा त्याच कामात वापरत आहेत. या सरकारला खरी गरज आहे ती कुणीतरी हे सांगण्याची की ते कुठे कमी पडताहेत. भाजपचे पक्ष म्हणून धोरणच आहे की राष्ट्र प्रथम, मग पक्ष, मग व्यक्ती. त्यामुळे या सरकारच्या धोरणांमधले कच्चे दुवे व अमंलबजावणीमधल्या चुका दाखवून देणे हे देश प्रथम या धोरणासाठी महत्त्वाचे आहे. एक वेळ पक्षाचे तात्पुरते नुकसान झाले तरी चालेल पण देशाचा दीर्घकालीन फायदा करून दिल्यास भाजप राजकीय पक्ष म्हणून जगात आदर्श निर्माण करेल. मिपावर या कामासाठी श्रीगुरुजींचा हात कुणीही धरू शकणार नाही. कदाचित सुरुवातीला हे काम करणे त्यांना अवघड जाईल. पण समजण्यापुरते सध्याचे पंतप्रधान काँग्रेसचे आहेत असे समजल्यास न जमण्यासारखे काहीच नाही. ही कामगिरी श्रीगुरुजींनी यशस्वीपणे करून दाखवल्यास रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे धुरीण देखील मिपा आयडी बनवून श्रीगुरुजींना त्यांच्या प्रबोधिनीत व्याख्यानासाठी आमंत्रित करतील. श्रीगुरुजींचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून अधिक लोक हीच कामगिरी करून दाखवण्यासाठी पुढे येतील.

नांदेडीअन Mon, 06/01/2015 - 18:10
Modi sarkar fails Kargil martyr: NDA WON'T take Captain Saurabh Kalia's case to international court... despite evidence he was tortured by Pakistan http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3104945/Modi-sarkar-fails-Kargil-martyr-NDA-WON-T-Captain-Saurabh-Kalia-s-case-international-court-despite-evidence-tortured-Pakistan.html याबद्दल काय बोलावे आता ? :(

In reply to by नांदेडीअन

श्रीगुरुजी Mon, 06/01/2015 - 20:41
कोणी खालील माहिती देईल का? आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अशा प्रकरणात हस्तक्षेप करता येतो का? भूतकाळात अशा कोणकोणत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चाललेला आहे व त्यात कोणत्यातरी देशाच्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे? यापूर्वी १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने आपल्या हद्दीत आलेले पाकिस्तानचे एक विमान क्षेणपास्त्र/रॉकेट सोडून पाडले होते. त्यातील १६ पाकिस्तानी लष्करी जवान मृत्युमुखी पडलेले होते. त्यावर पाकिस्तानने असा कांगावा केला की भारताने आंतरराष्ट्रीय सीमेचा भंग करून आमच्याच हद्दीतील विमान पाडले व हे प्रकरण पाकड्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले होते. तिथे निकाल भारताच्या बाजूने लागला. समजा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकड्यांच्या बाजूने निकाल दिला असता तर पुढे काय झाले असते? भारताने क्षेपणास्त्र सोडणार्‍या आपल्या सैनिकी अधिकार्‍यांना शिक्षेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या हवाली केले असते? का आपण स्वतःच आपल्या न्यायालयात शिक्षा दिली असती? का पाकिस्तानला नुकसानभरपाई दिली असती? सद्दामने १९९१ च्या युद्धानंतर कुर्दिश बंडखोरांशी युद्ध करून त्यांना परा़जित केले होते. नर्व्ह गॅस व रासायनिक अस्त्रे सोडून त्याने काही कुर्दिशांवर अत्याचार केले होते. त्या प्रकरणाचे पुढे काहीही झाले नाही. नुकतेच रशियाने आपल्या शेजारी देशावरून जाणारे मलेशियाचे विमान पाडले. त्यातही पुढे काही झाले नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्रसंघ इ. संस्था नखे, केस, शेपूट, आयाळ, दात नसलेल्या वाघसिंहासारख्या आहेत. इस्राइल सारखे अनेक देश त्यांना अजिबात भीक घालत नाहीत. उद्या भारताने सौरभ कालिया प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले तरी पाकडे त्या न्यायालयाला अजिबात भीक घालणार नाहीत. पूर्वी वाजपेयी सरकारने व नंतर मनमोहन सिंग सरकारने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास नकार दिला होता कारण त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

नांदेडीअन Tue, 06/02/2015 - 11:13
तिकडे दबावापुढे नमते घेऊन सुषमा स्वराज म्हणाल्या की केंद्र सरकार सुप्रिम कोर्टाची परवानगी घेऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाण्याचा विचार करत आहे, पण तुमचे इकडचे ‘सुपरलॉजिक’ काही संपत नाहीये.
उद्या भारताने सौरभ कालिया प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले तरी पाकडे त्या न्यायालयाला अजिबात भीक घालणार नाहीत.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात काहीही होऊ द्या हो, किमान प्रयत्न तरी करायला पाहिजेत की नाही ? नाहीतर पुढच्या वेळी "मैं देश नही झुकने दुंगा...", "एक सिर के बदले दस सिर..." वगैरे डायलॉग मारता येणार नाहीत. There is no question of insulting our martyrs who give everything to the nation. I would rather quit politics than insult our martyrs. - Narendra Modi (29 Apr 2014) हा व्हिडिओसुद्धा बघा. यात पाकिस्तानचा एक सैनिक स्वतः कबूल करतोय की त्यांनीच सौरभ कालिया यांना मारले. https://www.youtube.com/watch?v=OCR88DAxKJ0 आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल तुम्हाला खूप माहित आहे. ही व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून वापरता येऊ शकते का तेसुद्धा सांगा, कारण पाकिस्तान आजवर म्हणत होता की आम्ही सौरभ कालिया यांना मारलेच नाही.

In reply to by नांदेडीअन

श्रीगुरुजी Tue, 06/02/2015 - 14:56
>>> आंतरराष्ट्रीय न्यायालयात काहीही होऊ द्या हो, किमान प्रयत्न तरी करायला पाहिजेत की नाही ? करणार आहेत ना ते प्रयत्न. काल मी दिलेली दुसरी लिंक वाचली नाही का? तुम्हाला मोदी सरकारला नावे ठेवायची इतकी घाई झाली होती की पुढचे अपडेट्स येण्याच्या आतच इथे येऊन लिहून मोकळे झालात.

In reply to by नांदेडीअन

श्रीगुरुजी Mon, 06/01/2015 - 20:49
>>> याबद्दल काय बोलावे आता ? :( केजरीवालांना हा प्रश्न उचलायला सांगा. आपले अपयश झाकायला आणि काम टाळायला त्यांना एखादी नवीन सबब हवीच आहे. बंगलोरला जाऊन निसर्गोपचार, योगेंद्र यादव/प्रशांत भूषण इ. ची हकालपट्टी, भूसंपादन विधेयकाविरूद्ध मोदींविरूद्ध हल्लाबोल, गजेंद्रसिंहला आत्महत्येची चिथावणी, त्याच्या आत्महत्येनंतरच्या माफीनाम्याचे नाटक, उपराज्यपालांविरूद्धची व केंद्र सरकारविरूद्धची लढाई इ. 'महत्त्वाच्या' विषयांवर त्यांनी साडेतीन महिने निभावून नेले. त्यामुळे त्यांना दिल्लीचे अंदाजपत्रक इ. किरकोळ विषयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता सौरभ कालियाचा विषय त्यांना महिनाभर तरी पुरेल आणि मोदींनाही भरपूर शिव्या देता येतील.

In reply to by श्रीगुरुजी

कारगिल च्या वेळी तथाकथित 'राष्ट्रवादी' सरकार होत ? काय केल त्यांनी सौरभ कालिया च्या हत्येवर? तर शुन्य ! प्रत्यक्ष संसदेवर हल्ला झाला काय केल यांनी ? शुन्य ! कंदाहार विमान अपहरण प्रकरणात काय केल यांनी ? इथ शुन्य नाही बर का ? इथे तर ते चक्क मायनस मध्येच गेले . आपले तात्कालिक परराष्ट्र मंत्रीच अतिरेक्यांना सोडायला जातीने घेऊन गेले . एवढी 'दैदिप्यमान ' परंपरा असणारा पक्ष सत्तेवर आल्यावर असले वाभाडे होणारच

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 11:38
कारगिल च्या वेळी तथाकथित 'राष्ट्रवादी' सरकार होत ? काय केल त्यांनी सौरभ कालिया च्या हत्येवर? सौरभ कालियाच्या हत्येवर अजुन नक्की काय करायला हवे होते ते कळाले तर बरे होइल. एक मान्य की त्याच्या खुन्यांना जगाच्या पाठीवर जिथे असतील तिथे शोधुन मारले पाहिजे होते. वाजपेयी सरकारने तसे काहिच केले नाही. कदाचित कारगिल युद्धाने आधीच कंबरडे मोडले होते त्यामुळे जे गेले ते परत मिळवण्यात धन्यता मानली गेली. सूड अपुर्ण राहिला हे मान्य. अर्थात तो सूड नंतरच्या सरकारनेही घेतला नाही. कदाचित तोपर्यंत खुप उशीर झाला होता. जिनिव्हा कन्व्हेंशन नुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतरच्या युपीए सरकारने बहुधा ती मागे घेतली आणी मोदी सरकार पण तसा विचार करत होती पण त्या ऐवजी आधी कायद्याचा अभ्यास करुन आणि सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेउन पुढे जाण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. तर शुन्य ! प्रत्यक्ष संसदेवर हल्ला झाला काय केल यांनी ? शुन्य ! सग्ळे अतिरेकी मारले गेले. एकही निसटला नाही. असल्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात म्हणुन हात झटकले नाहित. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात काय केल यांनी ? इथ शुन्य नाही बर का ? इथे तर ते चक्क मायनस मध्येच गेले. इसराएल सारखे काही का केले नाही हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि असे मलाहा नेहमीच वाटते. पण ते तत्कालिन परिस्थितीत शक्य नव्हते हे ही खरेच. जसवंत सिंग स्वतः अतिरेक्यांना घेउन गेले यात त्यांचे मोठेपण आले. एखाद्या लष्करी अधिकार्‍यालाही ते पाठवु शकले असते. प्राप्त परिस्थितीत अतिरेक्यांना सोडणे किंवा लोकांना मरु देणे एवढेच त्यांच्या हातात होते. तुम्ही त्यांच्या जागी या दोनपैकी काय केले असते, एवढी 'दैदिप्यमान ' परंपरा असणारा पक्ष सत्तेवर आल्यावर असले वाभाडे होणारच कसले वाभाडे? याधीच्या सरकारचीए दैदीप्यमान परंपरा सांगु: १. चीनचे युद्ध हारले. आपल्या सैन्याकडे शस्त्रच नव्हती कारण तत्कालीन संरक्षणमंत्र्याची आणि पंतप्रधानांची अशी धारणा होती की हिंदी चीनी भाई भाई. ते आपल्याला का मारतील? २. युद्ध हारल्यावर महान पंतप्रधान म्हणाले "जाउ द्यात त्या भूमीवर नाहितरी काही उगवतच नव्हते. हे यांचे देशप्रेम आणि ही यांची अक्कल. ३. काश्मीरमधील कुरबुर आणी दहशतवाद यांच्या काळात सुरु झाले. ४. पंडित यांच्याकाळात विस्थापित झाले. हजारोंचे जीव गेले. अनेक स्त्रियांची अब्रु गेली. ५. हाती आलेले ३ लाख पाकडे यांच्या काळात जाउ दिले गेले. अजुन शेकडो गोष्टी सांगु शकतो. इथे मिपाची बँडविड्थ कमी पडेल. दैदीप्यमान परंपरेच्या गोष्टी कसल्या करताय. खांग्रेसच्या काळ तर इतिहासात कोरुन ठेवावा लागेल. असो. वाजपेयी सरकारच्या काळात चुका झाल्याच नाहित असे नाही. चूका झाल्या आणि सरकारने त्याचे फळ भोगले. देशाने भोगले कारण नंतर १० वर्षे भाजप सत्तेबाहेर राहिला आणी ममोकाळ आला.

In reply to by मृत्युन्जय

वाजपेयी सरकारने तसे काहिच केले नाही. कदाचित कारगिल युद्धाने आधीच कंबरडे मोडले होते त्यामुळे जे गेले ते परत मिळवण्यात धन्यता मानली गेली. जे गेल ते पण पुर्ण मिळाल नाही . असो . सांगायचा मुद्दा हा की काँग्रेस -भाजप या असल्या गलथानपणात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . बर यांना सौरभ कालिया आणि इतर जवानांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असती तर यांनी कारगिल चा खलनायक मुशरफ़ ला आग्र्याला बोलवून त्याची शाही बडदास्त ठेवली असती का ? सग्ळे अतिरेकी मारले गेले. एकही निसटला नाही. असल्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात म्हणुन हात झटकले नाहित. साक्षात लोहपुरूष देशाचे गृहमंत्री असताना अतिरेकी देशाच्या काळजावर घाव घालतात यापेक्षा तात्कालिक सरकार च्या गलथानपणाचे अजून वाईट उदाहरण कुठले असू शकते . बर नंतर ऑपरेशन पराक्रम च्या नावावर लाखो सैनिक नुसते सीमेवर जमा करून ठेवले आणि काहीच कृती केली नाही . या घटनेमुळे आपले बरेच हसे झाले . बर या हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी कालाचुक येथील लष्कराच्या तळावर हल्ला करून ३१ जणांची निर्घुण हत्या केली यात १८ लष्करी जवानांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश होता . त्यावेळेस पण 'प्रखर राष्ट्रवादाचे ' ढोल बजावणाऱ्या पक्षाचे रक्त उसळले नाही . मग हे पक्ष काँग्रेस पेक्षा वेगळे कसे ? इसराएल सारखे काही का केले नाही हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि असे मलाहा नेहमीच वाटते. पण ते तत्कालिन परिस्थितीत शक्य नव्हते हे ही खरेच. जसवंत सिंग स्वतः अतिरेक्यांना घेउन गेले यात त्यांचे मोठेपण आले. एखाद्या लष्करी अधिकार्‍यालाही ते पाठवु शकले असते. प्राप्त परिस्थितीत अतिरेक्यांना सोडणे किंवा लोकांना मरु देणे एवढेच त्यांच्या हातात होते. तुम्ही त्यांच्या जागी या दोनपैकी काय केले असते, विरोधी पक्षात असताना कॉंग्रेस सरकार नादान आहे आणि त्यांनी इसराएलकडून काही शिकायला हवे असे उपदेशाचे डोस देणाऱ्यांचे हातपाय स्वतः चे सरकार असताना कसे थंडगार पडतात . पण हे नेहमीचेच आहे . ममो पंतप्रधान असताना पाकिस्तानचे तात्कालिक राष्ट्राध्यक्ष अजमेर शरीफ ला धार्मिक दौर्यावर आले असताना मोदी यांनी सीमेवर जवान शहीद होत असताना भारत सरकार शत्रू राष्ट्राच्या लोकांना बिर्याणी खाऊ घालत आहे असा आक्रोश केला होता . याच मोदी यांनी सत्तेवर आल्यावर पहिल काम काय केल ? तर शरीफ यांना शपथविधी ला बोलावून त्यांना बिर्याणी खाऊ घातली . नंतर तर सीमेवर भारतीय जवान शहीद होत असताना तर ते चक्क शरीफ यांच्यासोबत साड्या आणि आंबे यांची देवाण घेवाण करण्यात गुंग होते . सांगायचा मुद्दा हा की सत्तेत असल्यावर काँग्रेस आणि भाजप सारखेच असतात . कंदाहार प्रकरणात अजून एक मुद्दा वाजपेयी सरकारच्या धोरण लकव्याचा होता . अपहरण झालेलं विमान कंदाहार ला जाण्यापूर्वी अमृतसर विमानतळावर थोड्या वेळासाठी अतिरेक्यांनी उतरवल होत . त्याला तिथून उड्डाण करू देऊन परमुलखात जाण्याची संधी नादान सरकारने दिली . याधीच्या सरकारचीए दैदीप्यमान परंपरा सांगु: १. चीनचे युद्ध हारले. आपल्या सैन्याकडे शस्त्रच नव्हती कारण तत्कालीन संरक्षणमंत्र्याची आणि पंतप्रधानांची अशी धारणा होती की हिंदी चीनी भाई भाई. ते आपल्याला का मारतील? २. युद्ध हारल्यावर महान पंतप्रधान म्हणाले "जाउ द्यात त्या भूमीवर नाहितरी काही उगवतच नव्हते. हे यांचे देशप्रेम आणि ही यांची अक्कल. ३. काश्मीरमधील कुरबुर आणी दहशतवाद यांच्या काळात सुरु झाले. ४. पंडित यांच्याकाळात विस्थापित झाले. हजारोंचे जीव गेले. अनेक स्त्रियांची अब्रु गेली. ५. हाती आलेले ३ लाख पाकडे यांच्या काळात जाउ दिले गेले. अजुन शेकडो गोष्टी सांगु शकतो. इथे मिपाची बँडविड्थ कमी पडेल. दैदीप्यमान परंपरेच्या गोष्टी कसल्या करताय. खांग्रेसच्या काळ तर इतिहासात कोरुन ठेवावा लागेल. असो. वाजपेयी सरकारच्या काळात चुका झाल्याच नाहित असे नाही. चूका झाल्या आणि सरकारने त्याचे फळ भोगले. देशाने भोगले कारण नंतर १० वर्षे भाजप सत्तेबाहेर राहिला आणी ममोकाळ आला. काँग्रेस सरकार नादान होतेच . त्यांनी अनेक ऐतिहासिक चुका केल्या . पण धोरण लकवा , रणभिरुपणा, बोटचेपे धोरण , विनाकारण पाकिस्तान आणि चीन ला दबून राहणे या गोष्टींमध्ये भाजप ही काँग्रेसचीच बी टिम आहे . मला वाटत हे सिध्द करण्यासाठी मी पुरेशी उदाहरण दिली आहेत

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय Wed, 06/03/2015 - 12:44
तुमच्या मुद्द्यांचा सारांश मांडतो: १. पाकिस्तानने केलेली आगळीक लक्षात घेता त्यांच्याबरोबरचे सर्व राजनैतिक संबंध संपवायचे. बरोबर? कारण मुशर्रफला बोलावणे आणी त्याला बिर्याणी खायला घालणे ही राजकीय अपरिहार्यता आहे. तसे करायचे नसेल तर सर्व राजनैतिक संबंध संपवणे आले. तुमचीही हीच इच्छा आहे काय? कारण याचे वेगळे राजनैतिक तोटे देखील आहेत. २. कंदाहार प्रकरण पुर्णपणे आपल्या हाताबाहेरचे होते. अमृतसरहुन विमान उडु देणे आपल्या हातात नव्हतेच. ते उडु दिले नसते तर सगळ्याच लोकांना मारले गेले असते. त्य लोकांना तालिबानच्या ताब्यातुन सोडवुन आणणे देखील शक्य नव्हतेच. तसे काही झाले असते तर खुप आनंद होता, पण तसे झाले नाही म्हणजे तो सरकारचाच दोष होता असे नाही. अश्या हायजॅक प्रकरणात एक एसराईल सोडले तर इतर कुणाला फारसे यश आलेले नाही. एकदातर एका इसरायली सैनिकाला सोडवण्यासाठी स्वतः इसराइलनेच हजारो पेलिस्टिनी सोडले होते (त्यात अतिरेकी देखील होते). कंदाहार दुर्दैवी होते. सरकार यात मानहानी न होता तोडगा काढण्यात अपयशी ठरले पण त्यावेळेस तरी सरकार समोर दुसरा पर्याय नव्हता. जसवंत सिंग लोकांना सोडवण्यासाठी जातीने गेले यातच त्यांचा मोठेपणा आला. धोरण लकवा , रणभिरुपणा, बोटचेपे धोरण , विनाकारण पाकिस्तान आणि चीन ला दबून राहणे या गोष्टींमध्ये भाजप ही काँग्रेसचीच बी टिम आहे मोदी सरकार तसे नाही हे तर त्यांनी सिद्ध केलेच आहे. मोदी सरकारच्या अ‍ॅग्रेसिव्ह परदेश धोरणाबाबत आणी चीनबरोबरच्या संबंधाबाबत आधीच लिहिले आहे. त्यामुळे याबाबत अजुन टिप्पणी करायची गरज नाही..

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Wed, 06/03/2015 - 13:34
या प्रतिसादाशी सहमत. शाळेत जसे इतिहासात फक्त लढायाच शिकवल्या गेल्यामुळे इतिहासाकडे एकांगी दृष्टिकोनातून बघितल्या जाते त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांतून एकांगी बातम्या आल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोनही एकांगी होतो. दोन राष्ट्रांमधे अनेक पातळीवर व्यवहार होत असतात. भारत-पाकिस्तान म्हटले की सीमा आणि गोळीबार हेच सामान्यपणे कोण्याही भारतीयाच्या डोळ्यासमोर येते. पण वस्तुस्थिती तशी नसते. बराच व्यापार-उदिम, नागरिकांची ये-जा, संयुक्त मोहिमा, चर्चा, इत्यादी नेहमी दृष्टीस न पडणार्‍या गोष्टी बिनभोबाट सुरू असतात. त्या सगळ्यांवर कुठल्या एका कारणाने विरजण पडू नये म्हणून दोन्ही देश पडद्यामागे कार्यरत असतातच. शत्रूराष्ट्रात हेरगीरी, राष्ट्रविरोधी कारवाया करणे आणि त्याचवेळेला आपसात व्यापार करणे हेही चालते. पाकिस्तानात होणार्‍या घातपातांच्या कारवायांत भारताचा काहीच हात नाही असे मानणे जरा बाळबोध आहे. कोणताही देश असं सांगून काही करत नाही. म्हणजे तो करतच नाही असेही नाही. त्याचे परिणाम सामान्य नागरिकाला अनुभवास येणे शक्य नसते. राष्ट्रीय पातळीवर घेतले गेलेले निर्णय एकाच डोक्यातून आलेले नसतात. अनेक खात्यांच्या अनुभव, माहिती आणि सल्ल्यांतून सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आपल्या वकुबानुसार पर्याय निवडत असते. कुठल्याही पर्यायाचे काय संभाव्य परिणाम होऊ शकतील याचाही सल्ला त्यांना दिला जात असतो. त्यातून निवड करणे 'आज कोणती भाजी करावी' इतके सोपे कधीच नसते. घेतलेल्या निर्णयांवर माध्यमांनी टिका करणे फार सोपे. पण त्या जागी उभे राहून तो पचंड दबाव सहन करून निर्णय घेणे कठीण असते. त्यामुळे फक्त वर्तमानपत्रीय बातम्यांमधून निष्कर्ष काढणे फसवे असू शकतं. बाकी चालु द्या...

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Wed, 06/03/2015 - 15:22
>>> कारण मुशर्रफला बोलावणे आणी त्याला बिर्याणी खायला घालणे ही राजकीय अपरिहार्यता आहे. तसे करायचे नसेल तर सर्व राजनैतिक संबंध संपवणे आले. पूर्वी मला असे वाटायचे की पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडावेत. नंतर लक्षात आले की त्यातून फार काही साध्य होणार नाही. त्याचे कारण असे की दहशतवाद निर्मूलन हा मुख्यत्वेकरून लष्कराने/पोलिसांनी हाताळायचा प्रश्न आहे. राजकीय पातळीवर कोणताही देश आपण दहशतवादाला पाठिंबा देतो हे मान्य करणार नाही व त्यामुळे या प्रश्नावर राजकीय चर्चेतून तोडगा निघणे अवघड आहे. या प्रश्नावर लष्कराला/पोलिसांनाच काम करावे लागेल. मुद्दा क्र. २ आणि उर्वरीत प्रतिसादाशी सहमत.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Tue, 06/02/2015 - 15:18
>>> इसराएल सारखे काही का केले नाही हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि असे मलाहा नेहमीच वाटते. पण ते तत्कालिन परिस्थितीत शक्य नव्हते हे ही खरेच. मृत्युंजय, भारताने त्या वेळी योग्य तीच पावले उचलली होती. काठमांडू ते कंदाहार हा धागा वाचा. या धाग्यात बरीच नवीन सविस्तर माहिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नांदेडीअन Tue, 06/02/2015 - 11:16
केजरीवालांना हा प्रश्न उचलायला सांगा.
आला का केजरीवाल मध्येच ! कॉंग्रॅट्स, आता दोन घास जास्त जेवण जाईल तुम्हाला. :)

In reply to by नांदेडीअन

मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 11:40
तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये आणता त्याचे काय? या न्यायाने तुम्ही आत्तापावेतो एका राज्यातला सगळा दाणापाणी संपवला असायचा मग.

In reply to by मृत्युन्जय

नांदेडीअन Tue, 06/02/2015 - 13:15
तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये आणता त्याचे काय? या न्यायाने तुम्ही आत्तापावेतो एका राज्यातला सगळा दाणापाणी संपवला असायचा मग.
असा एक कमेंट दाखवा माझा, जिथे मी विषयबाह्य बोललोय किंवा संबंध नसतांना मोदींचे नाव घेतले आहे.