मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक वर्षानंतर . . .

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचने 311403 वाचनखूण प्रतिक्रिया 1265

In reply to by श्रीगुरुजी

अर्धवटराव Sun, 02/07/2016 - 01:13
महाराष्ट्रापलिकडे होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांशी साहेबांचा किती संबंध आहे माहित नाहि, पण इये म्हराटीये देशी होणार्‍या घडामोडी साहेबांच्या हाताखालुन जातात हे निर्वीवाद. आणि महाराष्ट्रात काहि जिल्ह्यांपलिकडे मतदार यादीवर साहेबांचा प्रभाव असो किंवा नसो, साहेब नेहेमी केंद्रीय मंत्र्याची पॉवर उपभोगतात... अगदी आजच्या मोदी सरकारमधे देखील... कुठलंही ऑफीशयल पोर्टफॉलीओ हाती नसताना...

दिवाकर देशमुख Sat, 02/06/2016 - 17:51
वाटलेच होते मोदीच्या १२ वर्षाच्या काळात बरेच काही प्रपंच झाले आहे ते आता बाहेर येऊ लागले आहे तर त्यावर श्रीगुरुजीसारख्या महाभक्तांकडून अळीमिळी गुपचिळी साधली जाणार होती. असे ही कुठे ऊत्तरे आहे यांच्याकडे म्हणा. भाजपाचे सगळे प्रवक्ते विचारलेल्या प्रश्नावर उत्तर न देता भलताच जुना मुद्दा उकरून काढून त्यावर चर्वण करण्यात एक्स्पर्ट असतात. इथेही याची प्रचिती आली. जर भाजप नेत्यांची भ्रष्टाचार केला असेल तर संबंधितांनी खटले भरावेत. > जगातील महाभ्रष्टाचार व्यापम रुपी मध्यप्रदेशात झालेला आहे तिथे तर लोकांना ठार सुध्दा केले जात आहे. पण मोदींनी एक अक्षर सुध्दा काढले का? यावरून भाजपाचे भ्रष्टाचारी हे धुतल्या तांदळासारखे समस्त भक्तांना वाटतात हे आता सगळ्या देशाला कळून चुकले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी Sun, 02/07/2016 - 14:35
बापूराव, साजूक तूप घालून लिंबू पिळलेला गरमगरम वाफाळता वरणभात हा जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे. एकदा खाऊन बघा.

मोगा Sat, 02/06/2016 - 19:42
http://hindi.eenaduindia.com/News/TopNews/2016/02/06164052/Modi-and-Dawood-meets-in-Lahore--Azam-Khan.vpf मोदी दाउद भेट

In reply to by श्रीगुरुजी

मोगा Sun, 02/07/2016 - 07:25
तुमचे राजे त्या अफझलखानाला कडकडुन मिठी मारुन परत आले म्हणे. तुमको कुछ पताही नही चला ! संघाला गाणे बदलायला सांगा.. यंदाच्ञा वीजयादशमीला देशभर वाजवा ! केसरी मोदीसमीप मस्त दाउद चालला !

राजेश घासकडवी Sun, 02/07/2016 - 02:10
१० मे २००४ ते १० मे २०१४ - सेन्सेक्स वाढून ५०७० वरून २२९०० वर गेला. म्हणजे दहा वर्षांत साडेचारपट. वर्षाला १६ टक्के. १० मे २०१४ ते ६ फेब्रुवारी २०१६ - सेन्सेक्स २२९०० वरून २४६०० वर गेला. म्हणजे २१ महिन्यात फक्त साडेसात टक्के वर. वर्षाला जेमतेम ४.२ टक्के. मार्केटला हे सरकार फार आवडतंयसं दिसत नाही. तेवढ्या काळात पाकिस्तानचा कराची स्टॉक इंडेक्सदेखील २८५०० वरून ३२५०० वर गेला! म्हणजे १४% वर! आपण पाकिस्तानच्याही मागे पडतोय. हेच का अच्छे दिन?

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी Sun, 02/07/2016 - 14:07
जर सेन्सेक्सच्या आकड्यांवरूनच अच्छे दिन का बुरे दिन हा अंदाज काढायचा असेल तर १० मे २००४ ते १० मे २०१४ या काळातल्या सेन्सेक्सच्या बदलाची तुलना १० मे २०१४ ते १० मे २०२४ या काळातील सेन्सेक्समधील बदलाशी करायला हवी आणि त्यासाठी थोडे थांबायला हवे. नाही का?

In reply to by श्रीगुरुजी

राजेश घासकडवी Sun, 02/07/2016 - 14:51
नाही हो, पहिल्या एकवीस महिन्यांची तुलना पहिल्या एकवीस महिन्यांशी करायची. १० मे २००४ ते ६ फेब्रुवारी २००६ - सेन्सेक्स ५०७० वरून ९७४२ वर गेला. ८६ % वाढ! १० मे २०१४ ते ६ फेब्रुवारी २०१६ - सेन्सेक्स २२९०० वरून २४६०० वर गेला. ७.५ % वाढ! नाहीतर गेल्या एकवीस महिन्यांची तुलना पाकिस्तानच्या इंडेक्सशी केलेली आहेच. तिथ्थेही आपण मार खातोय हो. फार वाईट वाटतं. म्हणजे ग्लोबल परिस्थिती आत्ता वाईट आहे वगैरेपण म्हणता येत नाही. एकदा तरी, किमान एकदा तरी कबूल करा की, मार्केटला हे सरकार आवडलेलं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी Sun, 02/07/2016 - 14:59
मार्केट हे कोणता पक्ष सत्तेवर आहे किंवा कोणता पक्ष सत्तेवर नाही यावर सेन्सेक्स वरखाली करीत नाही किंवा आपल्या आवडीचे सरकार सत्तेवर आहे म्हणून सेन्सेक्स वर न्यायचा व आपल्या आवडीचे सरकार नसेल तर सेन्सेक्स खाली न्यायचा असे कधीच नसते. कोण सत्तेवर आहे याच्याशी मार्केटला घेणेदेणे नसते. सेन्सेक्स वरखाली जायची असंख्य कारणे असतात व ज्या कारणांचा प्रभाव जास्त पडतो त्यानुसार सेन्सेक्स बदलतो.

In reply to by श्रीगुरुजी

राजेश घासकडवी Sun, 02/07/2016 - 21:17
कोणता पक्ष सत्तेवर आहे किंवा कोणता पक्ष सत्तेवर नाही यावर सेन्सेक्स वरखाली करीत नाही किंवा आपल्या आवडीचे सरकार सत्तेवर आहे म्हणून सेन्सेक्स वर न्यायचा व आपल्या आवडीचे सरकार नसेल तर सेन्सेक्स खाली न्यायचा असे कधीच नसते.
निवडणुकीचे निकाल लागल्यावर मोदी सरकार आलं म्हणून मार्केट उत्साहाने वर गेलं होतं त्याच्या बातम्या झाल्या होत्या. त्यावेळी कोणीच 'अहो नाही हो, मार्केटचा आणि सरकारचा काही संबंधन नसतो' असं म्हटलं नव्हतं. आता गेलं वर्षभर प्रचंड घसरगुंडी चालू आहे म्हटल्यावर हा युक्तिवाद सुरू झाला. फारच मजेदार आहे सगळं प्रकरण. दोन वर्षांनी म्हणाल की 'जीडीपी ग्रोथचा आणि कुठचं सरकार आहे याचा काही संबंध नसतो.' किंवा 'महागाई किती आहे याचा आणि सरकारचा संबंध नसतो.' जेव्हा म्हणाल तेव्हा वाचायला मजा येईल.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 21:22
महागाई किती आहे याचा आणि सरकारचा संबंध नसतो.' जेव्हा म्हणाल तेव्हा वाचायला मजा येईल. >> अल्रेडी डन दॅट ... डिड यु मिस् तुरिची डाळ....?

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी Mon, 02/08/2016 - 14:19
बर्‍याच गोष्टींची गल्लत होते आहे. २-३ उदाहरणे देतो. (१) १९९८-९९ या काळात वाजपेयी सरकार असताना मार्केट वर जात होते. यामागचे मुख्य कारण मार्केटचे आवडते सरकार नसून आंतरजाल/आयटी बूम हे कारण होते. (२) एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार केवळ १ मताने पडल्यावर त्याच दिवशी मार्केट पडले. याचा संबंध कदाचित आवडते सरकार गेल्याशी लावता येईल. परंतु नंतर ऑक्टोबर १९९९ पर्यंत काळजीवाहू सरकार असताना व ऑक्टोबर मध्ये नक्की कोणाचे सरकार स्थापन होईल याची अजिबात खात्री नसताना सुद्धा मार्केट जोरदार वर होते. याच काळात कारगिल युद्ध व सर्बिया-क्रोएशिया वर नेटो बॉम्बफेक करीत असताना सुद्धा मार्केट वर होते. म्हणजे सध्या कोणतेही (आवडते किंवा नावडते) सरकार नाही व भविष्यात कोणते सरकार येणार आहे (आवडते की नावडते) याची अजिबात खात्री नसताना सुद्धा मार्केट वर जात होते कारण मार्केटच्या हालचालीमागे सरकार हा मुद्दाच नव्हता. (३) ऑक्टोबर १९९९ मध्ये वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यावर मार्केट वर जाणे सुरूच राहिले. यामागे ते वाजपेयींचे सरकार आहे व ते आवडते सरकार आहे हे कारण नसून पुन्हा एकदा इतर कारणे होती. (४) समजा क्षणभर असे गृहीत धरले की वाजपेयी सरकार मार्केटचे नावडते सरकार होते. तर मग १९९८ पासून सातत्याने मार्केट का वर जात होते? समजा असे धरले की वाजपेयी सरकार मार्केटचे आवडते सरकार आहे व त्यामुळे मार्केट वर जात आहे, तर मग १२/०९/२००१ या दिवसापासून मार्केट प्रचंड कोसळले यामागे काय कारण होते?. ११/९/२००१ या दिवशी इन्फोसिसचा समभाग रू. ४००० वर बंद झाला होता. मॅस्टेकचा समभाग रू. ५६० वर बंद झाला होता. हे दोन्ही समभाग १२/९/२००१ या दिवशी अनुक्रमे २४०० व २८० वर बंद झाले असावे. यामागे काय कारण असावे? सरकार तर तेच होते व सर्वकाही सुरळीत सुरू होते. (५) नंतर डिसेंबर २००३ पर्यंत सेन्सेक्स जोरदार घसरला होता. तेच आवडते सरकार असताना सेन्सेक्स का बरे घसरत होता? तेच सरकार मार्च १९९८ पासून सत्तेवर असताना काही काळ मार्केट जोरदार वर होते व काही काळ जोरदार घसरत होते. का बरे? यात सरकारचा काही संबंध होता का अजून काही गोष्टींचा परीणाम होता? (६) तेच सरकार मे २००४ मध्ये पायउतार झाल्यावर सुद्धा २००७ पर्यंत सेन्सेक्स वर जात होता. म्हणजे नंतर आलेले मनमोहन सिंग सरकार मार्केटचे आवडते होते म्हणून सेन्सेक्स वाढत होता का? तसे असेल तर २००७ नंतर २-३ वर्षे सेन्सेक्स का बरे खाली गेला? मार्केटवर परीणाम करणारे अनेक घटक असतात. आनंद राठीसारख्या एका महाब्रोकरकडे तांत्रिक विश्लेषणाचे काम करणार्‍या (हा स्वतः सीए आहे) एकाशी बोलताना त्याने सांगितले की कोणत्याही कंपनीच्या समभागाची भविष्यातील वाटचाल बघताना ते तब्बल वेगवेगळ्या ९९ घटकांचा अभ्यास करून अंदाज काढतात. कोणते सरकार आहे हा त्या ९९ मुद्द्यातला एक मुद्दा असतो व इतर अनेक मुद्द्यांच्या तुलनेत तो तितकासा महत्त्वाचा नसतो. सरकार कोणतेही असले तरी गुंतवणूक करणारे या अनेक घटकांचा विचार करून मगच निर्णय घेतात. मग ते सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे. सरकार धर्मनिरपेक्ष आहे का जातीयवादी, सरकार सहिष्णु आहे का असहिष्णु, सरकारमध्ये वाचाळ मंडळी आहेत का प्रगल्भ मंडळी आहेत, सरकार आपले आवडते आहे का नावडते इ. गोष्टींवर मार्केट चालत नसते.

In reply to by श्रीगुरुजी

राजेश घासकडवी Tue, 02/09/2016 - 20:04
कोणत्याही कंपनीच्या समभागाची भविष्यातील वाटचाल बघताना ते तब्बल वेगवेगळ्या ९९ घटकांचा अभ्यास करून अंदाज काढतात. कोणते सरकार आहे हा त्या ९९ मुद्द्यातला एक मुद्दा असतो
तुम्ही भाषा फार तोलूनमापून वापरता याबद्दल तुमचं अभिनंदन करावं की ती वापरून तुम्ही मुद्दा डावलण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल तक्रार करावी हे कळत नाही. अहो, कंपनी वेगळी, ती मायक्रोइकॉनॉमीत येते. आख्खं मार्केट हे मॅक्रोइकॉनॉमीचा भाग असतं. आणि त्यावर सरकारचा प्रचंड प्रभाव असतो. द व्होल इज बिगर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स. असो. मग आता तुमच्याच युक्तिवादानुसार जीडीपीदेखील कंपन्या आणि व्यक्तींनी मिळवलेल्या उत्पन्नाने ठरतं आणि त्यात किती वाढ होईल हे सरकारच्या हाती नसतं. मग तुम्ही या लेखात आलेख काढून जीडीपी ग्रोथ रेट का दाखवला आहे? आणि हो, तोही घसरला आहे. सरकारनेच आपला जीडीपी ग्रोथ ८+ टक्के होणार नाही ७ ते ७.५ टक्के होईल असं म्हटलेलं आहे. युनोनेही म्हटलेलं आहे. हे आत्ता. २०१६ च्या शेवटी काय होतं पाहूया. जरा तो वरचा चार्ट बदलण्याची संपादकांना विनंती कराल का?

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी Tue, 02/09/2016 - 23:18
सेन्सेक्स किंवा निफ्टी हा वेगवेगळ्या क्षेत्रातील काही ठराविक कंपन्यांच्या समभागाच्या किंमतीच्या बदलावरच अवलंबून असतो. कंपनीच्या समभागाच्या किंमतीत बदल होण्यामागे सरकार आवडते आहे का नावडते या घटकाचा अत्यल्प वाटा असतो. त्यामुळेच तुमच्या मूळ प्रतिसादातील "सेन्सेक्स फारसा वाढलेला नाही कारण मार्केटला हे सरकार आवडलेले दिसत नाही" असा अर्थाचे वाक्य चुकीचे ठरते. गुंतवणुकदार गुंतवणुक करताना सरकार कोणते आहे, आवडते का नावडते, जातीयवादी की निधर्मी, सहिष्णु की असहिष्णु इ. गोष्टींचा कधीच विचार करीत नाहीत. यावर्षी आधीच्या अंदाजापेक्षा जीडीपी काहिसा कमी असणारच आहे आणि त्यामागे पावसाचा चुकलेला अंदाज हे एक मुख्य कारण आहे. वेगवेगळ्या संस्थांनी २०१५-१६ या वर्षासाठी जीडीपीचा सुधारीत ग्रोथ रेट ७.२% - ७.८% असा दिलेला आहे. लेखातील मूळ चार्टमध्ये मे २०१५ मध्ये तोच अंदाज ८.१-८.५% असा दिला होता. लेखातील चार्टमध्ये जो जीडीपी ग्रोथ रेट आहे त्यात आधीच्या वर्षांचा प्रत्यक्ष रेट व २०१५-१६ चा अंदाज आहे. तो चार्ट कशाला बदलायचा? तो चार्ट मी बनविलेला नाही. वर्ष तर पूर्ण होऊ देत ना. मग बघू किती डेव्हिएशन आहे ते.

In reply to by श्रीगुरुजी

राजेश घासकडवी Wed, 02/10/2016 - 00:07
गुंतवणुकदार गुंतवणुक करताना सरकार कोणते आहे, आवडते का नावडते, जातीयवादी की निधर्मी, सहिष्णु की असहिष्णु इ. गोष्टींचा कधीच विचार करीत नाहीत.
जातीयवाद? सहिष्णुता? हे कुठून काढलंत तुम्ही? मी फक्त आर्थिक विकासाविषयी बोलतो आहे. परदेशातून किती गुंतवणुक आकर्षित झाली, जीडीपी ग्रोथ रेट काय आहे, भारतांतर्गत पैसा किती खेळता आहे, सरकारी धोरणं व्यापारउदीमासाठी किती चांगली आहेत या सगळ्यावर उत्पादन, कंपन्यांचा फायदा आणि पर्यायाने सेन्सेक्स अवलंबून असतो. माझा मुद्दा असा आहे की जे आहे ते मान्य करत जा. दरवेळी 'जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला कारण सरकारची चूक नाही, पाऊसच मेला कमी झाला' 'मार्केट आपटलं ते मार्केटच्या दोषामुळे, सरकारमुळे नै कै' असले युक्तिवाद करत राहिलात तर तुमची जी आहे ती विश्वासार्हताही कमी होईल. एकदातरी जर तुम्ही 'हम्म्म, हा गंभीर मुद्दा आहे खरा. इथे सरकार कमी पडलं खरं.' असं मोकळेपणाने म्हणा की. नाहीतर तुम्ही स्वतंत्र विश्लेषक वाटण्याऐवजी सरकारचे प्रवक्ते वाटता.

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 17:27
मी फक्त आर्थिक विकासाविषयी बोलतो आहे. परदेशातून किती गुंतवणुक आकर्षित झाली, जीडीपी ग्रोथ रेट काय आहे, भारतांतर्गत पैसा किती खेळता आहे, सरकारी धोरणं व्यापारउदीमासाठी किती चांगली आहेत या सगळ्यावर उत्पादन, कंपन्यांचा फायदा आणि पर्यायाने सेन्सेक्स अवलंबून असतो.
बरोबर आहे. याव्यतिरिक्त इतरही घटक असतात. परंतु यातल्या नक्की कोणत्या घटकांमुळे सेन्सेक्स कमी झाला किंवा फारसा वाढला नाही याविषयी अवाक्षर न काढता युपीएच्या काळातील पहिल्या २१ महिन्यात इतकीइतकी वाढ होती आणि मोदी सरकारच्या पहिल्या २१ महिन्यात त्या तुलनेने वाढ कमी आहे कारण मार्केटला हे सरकार आवडलेले दिसत नाही असा निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे झालात. इतकेच नव्हे तर अगदी कराचीच्या एक्स्चेंजचे देखील उदाहरण देऊन आपण पाकिस्तानच्या मागे आहोत असाही निष्कर्ष काढलात. 'हेच का अच्छे दिन' अशी उपरोधिक कॉमेंटही केलीत. तुमची प्रतिक्रिया ही सागरिका घोषच्या ट्विटसारखीच होती.
माझा मुद्दा असा आहे की जे आहे ते मान्य करत जा. दरवेळी 'जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला कारण सरकारची चूक नाही, पाऊसच मेला कमी झाला' 'मार्केट आपटलं ते मार्केटच्या दोषामुळे, सरकारमुळे नै कै' असले युक्तिवाद करत राहिलात तर तुमची जी आहे ती विश्वासार्हताही कमी होईल. एकदातरी जर तुम्ही 'हम्म्म, हा गंभीर मुद्दा आहे खरा. इथे सरकार कमी पडलं खरं.' असं मोकळेपणाने म्हणा की. नाहीतर तुम्ही स्वतंत्र विश्लेषक वाटण्याऐवजी सरकारचे प्रवक्ते वाटता.
काय नक्की मान्य करायचे? मार्केटला हे सरकार आवडले नाही हे मान्य करायचे का भारत पाकिस्तानच्या मागे आहे हे मान्य करायचे का अच्छे दिन आले नाहीत हे मान्य करायचे का मोदी सरकार पेक्षा युपीए सरकार जास्त चांगले होते हे मान्य करायचे? पाऊस २०१४ मध्ये आणि २०१५ मध्ये खूप कमी झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतीउत्पादनावरही परीणाम झाला ही देखील वस्तुस्थिती आहे. भारताच्या जीडीपी मध्ये शेतीक्षेत्राचा सुमारे १८% वाटा आहे. त्यामुळे शेतीउत्पादन घटले की त्याचा जीडीपीवर त्या प्रमाणात परीणाम होणार ही वस्तुस्थिती आहे. हे जर मान्यच करायची तुमची तयारी नसेल तर कितीही सांगून काहीही उपयोग नाही.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे Wed, 02/10/2016 - 12:25
घासू गुरुजी आपण फक्त एक विशिष्ट काळ आपल्या "सोयीप्रमाणे" पाहत आहात. ९ मार्च २००९ ला सेन्सेक्स सर्वात तळाला म्हणजे ८१६० ला आला होता. तेंव्हा कोणी मनमोहन सिंह यांना दोष दिला नव्हता कि त्यांचे सरकार गरीबंविरुद्ध आहे किंवा "बुरे दिन" लाये पुढील एक वर्षात तो २१०००पर्यंत गेला म्हणून मनमोहन सिंह यांच्या आर्थिक धोरणांचा "उदो उदो" केला नव्हता. तेंव्हा जागतिक मंदी पुढे सरकार काहीही करू शकत नव्हते तशीच परिस्थिती आजही आहे. एक वर्षापूर्वी नवीन सरकार आले तेंव्हा उद्योगांना असे वाटले कि आता धोरण लकवा संपला( policy paralysis) आणि आर्थिक उदारीकरण चांगले राबवले जाईल म्हणून बाजार जोरदार वर गेला. परंतु दुर्दैवाने जागतिक बाजारात परत आर्थिक मंदीची चाहूल चाहूल लागल्याने लोकांनी आणि अर्थसंस्थांनी आपले पैसे काढून घेतल्याने बाजार कोसळत आहे. युरोप अमेरिकेत मंदी आहे त्यामुळे निर्यात सतत कमी होत आहे. एक वर्षात निर्यात २५ % ने कमी झालेली आहे. http://www.hindustantimes.com/business/exports-hit-india-s-growth-story-in-2015-fall-to-be-steeper-in-2016/story-4TaGhZSIN8gR7knnojBN5M.html अशा परिस्थितीत वित्तीय तुट कमी करण्यासाठी सरकारने काय करावे अपेक्षित आहे. डीझेल पेट्रोलचे भाव कमी करावे? आणि मग ते वाढले कि परत विरोधक बोंब मारायला तयारच असतील. मग आत्ताच मारू द्याकी बोंब. या परिस्थितीत "कोणतेही" सरकार काहीही करू शकत नाही. असे स्वच्छ दिसत असताना याचा दोष मोदी सरकारला देणे हे द्वेषमूलक आहे हे स्पष्ट आहे. अंध भक्ती नसावी तसाच अंध द्वेषही नसावा. विचार करून पहा. मेगाबायटी प्रतिसाद फाट्यावर मारला जाईल.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 17:13
सहमत. काही जणांच्या इच्छेविरूद्ध मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे भारतातील प्रत्येक वाईट गोष्टींसाठी त्यांना मोदींनाच दोष द्यायचा असतो. जून-जुलै २०१५ मध्ये पाऊस फारसा पडत नव्हता, तेव्हा सागरिका घोष यांनी खालील ट्विट केले होते. "fter unseasonal rains now deficient monsoon/drought forecast. Achche Din!" या असल्या विचित्र ट्विट्वर इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी खालील उत्तर दिले होते. "Very bad taste Sagarika! Just not done. Pl maintain your standards. We respect you not when you are flippant like this." भांडवली बाजारात पूर्वीच्या एका विशिष्ट काळाच्या तुलनेत कमी वाढ झाल्याने 'मार्केटला हे सरकार आवडलेले दिसत नाही' हा असाच विचित्र निष्कर्ष आहे.

In reply to by सुबोध खरे

राजेश घासकडवी गुरुवार, 02/11/2016 - 05:54
तुमचे सगळे मुद्दे साधारण मान्य आहेत, अगदी शंभर टक्के मान्य नसले तरीही.
९ मार्च २००९ ला सेन्सेक्स सर्वात तळाला म्हणजे ८१६० ला आला होता. तेंव्हा कोणी मनमोहन सिंह यांना दोष दिला नव्हता
त्या दिवशी आख्ख्या जगातले मोजून सर्व इंडेक्सेस चाळीस पन्नास टक्क्यांनी आपटलेले होते. ती त्सुनामी होती. त्यामुळे खाली जाण्याचा दोष, आणि त्यातून सावरून वर येण्याचं श्रेय देण्यात अर्थ नाही.
तेंव्हा जागतिक मंदी पुढे सरकार काहीही करू शकत नव्हते तशीच परिस्थिती आजही आहे.
हे मात्र खरं नाही. अमेरिकन मार्केट या काळात जैसे थे आहे. बीआरआयसी पैकी रशिया आणि चायना मार्केटं सुमारे तीस टक्के वर आहेत, ब्राझिलचे इंडेक्स वीस टक्के खाली आहेत. आणि आपला सेन्सेक्स पुन्हा जवळपास जैसे थे आहे. आपल्या परिसरात बघितलं तर, पाकिस्तान, बांग्लादेशचे स्टॉक्स आपल्या पुढे आहेत, श्रीलंका जवळपास बरोबरीला आहे. म्हणजे ब्रिक देशांत चारापैकी तिसरा नंबर, आपल्या परिसरात चारांपैकी तिसरा नंबर... ही काही चांगली चिन्हं नाहीत इतकंच म्हणणं आहे. आपल्या देशाचा 'आर्थिक विकास हा अग्रक्रम' अशी प्रतिमा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. ते होत नाहीये. (हा प्रतिसाद शब्दसंख्येने तुमच्या प्रतिसादाइतकाच किंवा कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा तो फाट्यावर मारला जाणार नाही अशी आशा आहे.)

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 09:50
बीआरआयसी पैकी रशिया आणि चायना मार्केटं सुमारे तीस टक्के वर आहेत, हे अनुमान आपण कुठून काढलं? वस्तुस्थिती वेगळीच आहे. Chinese stocks enter bear market http://money.cnn.com/2016/01/15/investing/world-markets-stocks/ moscow-markets-fall- http://www.cnbc.com/2016/01/11/moscow-markets-fall-after-russian-christmas-break.html सध्याची जागतिक बाजाराची मंदी हि चीनचा बाजार आपटल्यामुळे आहे आणि तुम्ही म्हणता आहात चीनचा बाजार ३० % नि वर. रशियाचा बाजार ११ फेब्रुवारी २०१५ ला १७६३ होता आणि आज दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ ला आत्ता १७३० आहे. रशियाचा माईसेक्स इंडेक्स गेल्या एक वर्षात १६०० ते १८५० या टप्प्यातच फिरतो आहे. आपण केवळ सांख्यिकीचे हस्तचलाखी दाखविता आहात असे वाटते. राहिली गोष्ट पाकिस्तानची त्यांचे GDP BSE च्या एक दिवसाच्या उलाढालीइतकं आहे. दहा लाख रुपयात पाच टक्के खाली आणि चाळीस पैशात १० टक्के वर यात काही फरक आहे का ? कि केवळ शाब्दिक कोलांट्या

In reply to by सुबोध खरे

राजेश घासकडवी गुरुवार, 02/11/2016 - 14:08
मी सतत १० मे २०१४ ते आत्तापर्यंत अशी तुलना करत होतो. याचं कारण या धाग्यावर १० मे २०१४ पासूनच्या काळाबद्दल बोलणं चालू आहे. अॅपल टु अॅपल कंपॅरिझनसाठी सर्वच देशांचे आकडे त्याच कालखंडासाठी तपासून पाहिलेले आहेत. तुम्हाला वेगळे आकडे सापडले तर जरूर दाखवून द्या. मी आकडेवारी खूप गंभीरपणे घेतो. आणि जर माझ्याकडून नजरचूक झाली तर कबूल करायला निश्चित आवडेल.
राहिली गोष्ट पाकिस्तानची त्यांचे GDP BSE च्या एक दिवसाच्या उलाढालीइतकं आहे.
हे विधान चुकीचं आहे. पाकिस्तानचं जीडीपी सुमारे २४३ बिलियन डॉलर्स आहे. बीएसइची दिवसाची उलाढाल अर्धा बिलियनची आहे.
दहा लाख रुपयात पाच टक्के खाली आणि चाळीस पैशात १० टक्के वर यात काही फरक आहे का ?
पाकिस्तानचं जीडीपी भारताच्या सुमारे एक सप्तमांश ते एक अष्टमांशच्या दरम्यान आहे (गेली अनेक दशकं), आणि दरडोई उत्पन्न भारताशी तुलनात्मक आहे (पंधरावीस टक्के कमी). तेव्हा दहा लाख आणि चाळीस पैसे ही दिशाभूल करणारं विधान आहे.
आपण केवळ सांख्यिकीचे हस्तचलाखी दाखविता आहात असे वाटते.
कि केवळ शाब्दिक कोलांट्या
अशा टिप्पणी आल्या नसत्या तर बरं झालं असतं. आधीच्या प्रतिसादातही 'मेगाबायटी प्रतिसाद फाट्यावर मारले जातील' वगैरे म्हटलं होतंत. अशा गोष्टी टाळाव्यात. तुमचे अनेक मेगाबायटी प्रतिसाद मी मनापासून वाचतो. तेव्हा किती लिहिलं आहे यापेक्षा बरोबर लिहिलंय की चूक लिहिलंय हे महत्त्वाचं.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 20:08
राजेश घासकडवी जी मुळात धाग्याचे शीर्षक "एक वर्षानंतर" आहे. तेंव्हा तुलना १० मी २०१४ ते १० मी २०१५ हवी होती. कारण मोदी साहेबांचे सरकार आले तेंव्हा लोकांची अपेक्षा होती कि बर्याच वर्षांनी स्थिर एका पक्षाचे सरकार आले आहे तेंव्हा अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल. त्याप्रमाणे १० मे २०१४ ला सेन्सेक्स २२३८० होता तो एका वर्षात म्हणजे १० मे २०१५ ला २७२५० होता.हि २१. ७ % वाढ आहे. बरोबर याच काळात रशियाचा निर्देशांक १४२६ वरून १६९१ गेला होता हि १८. ५८% वाढ आहे. म्हणजे दोन्ही देशांची परिस्थिती जवळ जवळ सारखी होती. कहर तर भारताची परिस्थिती जास्त चांगली होती. हि वाढ आपण दाखवली असती तर ते "प्रामाणिक कथन" झाले असते. (३०जानेवारी १५ रोजी सेन्सेक्स २९८४४ इतका वर चढला होता ते सोडून द्या). यानंतर भारतात पाऊस कमी झाला जागतिक परिस्थिती बदलली यामुळे आपली निर्यात कमी झाली आणि अन्नधान्य( डाळी) आयात करायची गरज पडली हे सर्वाना माहित आहे.यामुळे आपल्या उद्योग्धन्द्यांवर परिणाम झाला. पण यावर मोदी द्वेष्ट्या लोकांनी भु भूः कर करून अच्छे दिन कहां है म्हणून आरोळ्या ठोकल्या. आपण त्यांची कास धरण्यासाठी एक वर्षाच्या ऐवजी १० मे ते आजपर्यंतची री ओढता आहात हे पाहून वरील शब्द मला वापरावेसे वाटले. आपले एकंदर प्रतिसाद समतोल असत पण या वेळेस आपण मोदी द्वेष्ट्यांच्या नादाला लागलात याबद्दल सखेद आश्चर्य वाटले बाकी मोदी द्वेष्ट्यानि ज्यांनी कांद्याचे भाव वाढले म्हणून एवढा आरडा ओरडा केला होता ते आज कांद्याचा भाव १५ रुपये किरकोळ बाजारात आहे याबद्दल मुग गिळून बसले आहेत. डाळींचे भाव वाढले तेंव्हा सरकार जबाबदार म्हणता तर कांदा स्वस्त झाला तर ते सरकारचे श्रेय म्हणा की. मोदी द्वेष्ट्याना हे माहित आहे कि पाउस आणि निसर्ग कोणत्याही सरकारच्या मेहेरबानी वर नसतो तर उलट असते पण एकदा कावीळ झाली कि कोणत्याही रंगत पिवळी छटा येतेच. असो.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 20:19
मार्केटला हे सरकार फार आवडतंयसं दिसत नाही. तेवढ्या काळात पाकिस्तानचा कराची स्टॉक इंडेक्सदेखील २८५०० वरून ३२५०० वर गेला! म्हणजे १४% वर! आपण पाकिस्तानच्याही मागे पडतोय. हेच का अच्छे दिन? हे आपले शब्द GDP (Nominal) of India and Pakistan is $2050 billion and $250 billion respectively in 2014. On PPP basis, GDP of India and Pakistan is $7,376 billion and $882 billion respectively. India is 9th largest of the world in nominal method and 3rd largest economy in ppp method. Nominal ranking of Pakistan is 43 and PPP ranking is 26. India's economically largest states Maharashtra has GDP ($289 billion) greater than Pakistan. GDP of India is 8.19 and 8.36 times more than Pakistan at nominal and ppp terms, respectively Growth rate of Pakistan is estimated at 4.14% in 2014. India's growth rate is estimated at 7.17% in 2014. During period 1980-2014, Average GDP growth of Pakistan was 5.02% compare to India's 6.23% in same period. http://statisticstimes.com/economy/india-vs-pakistan-gdp.php असे असताना आपण केवळ शब्दशः अर्थ काढायचा प्रयत्न करता. धन्य आहे. मला यापुढे काहीच म्हणायचे नाही.

In reply to by सुबोध खरे

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 20:27
बाकी सगळे बरोबर आहे डॉक्टर साहेब, अन घासकड़वी ह्यांचे बोलणे काही एजेंडाला धरून असणे चुकच आहे, अन त्याला तुम्ही दिलेले उत्तर समर्पक तरीही डाळी बद्दल मला तुमचा मुद्दा अमान्य आहे, डाळी संबंधी आधीच भरपुर लिहून चुकलोय त्यात पेरा ते डाळ उद्योग सगळे मांडले आहे, लाभ घ्यावा (इच्छा असल्यास). काही उणे अधिक वाटल्यास आगाऊ माफ़ी मागतो __/\__ बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 20:57
बाकी मोदी द्वेष्ट्यानि ज्यांनी कांद्याचे भाव वाढले म्हणून एवढा आरडा ओरडा केला होता ते आज कांद्याचा भाव १५ रुपये किरकोळ बाजारात आहे याबद्दल मुग गिळून बसले आहेत. डाळींचे भाव वाढले तेंव्हा सरकार जबाबदार म्हणता तर कांदा स्वस्त झाला तर ते सरकारचे श्रेय म्हणा की. बापूसाहेब माझे अजिबात असे म्हणणे नाही कि डाळींच्या बाबतीत सरकार चुकले नाही.त्यांनी डाळींची आयात कदाचित अगोदर करायला हवी होती. पण द्वेष करायचा म्हणजे फक्त राईचा पर्वतच करायचा का? कांदा महाग झाला तेंव्हा या लोकांनी आरडा ओरड केली होती तर आता कांदा स्वस्त झाला त्याबद्दल काय म्हणणे आहे एवढेच मला म्हणायचे आहे. भाजप मध्ये सुद्धा स्वार्थी आणि खाबू लोक आहेत. आणि अशा बर्याचशा लोकांना मोदी किंवा फडणवीस साहेबांनी सरकारच्या "बाहेर" ठेवलेले आहे आणि त्यांची मधून मधून कोल्हे कुई चालूच असते. यामुळेच दोन्ही सरकारांमध्ये जम्बो मंत्रिमंडळ नाही. परंतु सरकारमध्ये येण्यासाठी तुमच्या कडे बहुमत असणे आवश्यक आहे यासाठी अशा बोकडांशी सलोख्याने वागावे लागते. सत्तर वर्षाती खा आणि खाऊ द्या हि मनोवृत्ती एका वर्षात बदलत नाही. सर्वच कामे करत असताना चुका या होणारच. जन धन योजना किंवा स्वच्छ भारता अभियान बद्दल मी दुवे दिलेले आहेत. ते एकदा पहा म्हणजे किती प्रचंड काम बाकी आहे ते लक्षात येईल. एकटे श्री. मोदी किती आणि काय करतील? तरी बरं या माणसाला आगा ना पीछा. श्री सुरेश प्रभून्सारखा विद्वान(C A) आणि अडगळीत टाकलेल्या माणसाला रेल्वे मंत्रालय दिले आहे. त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या लेखा जोख्यात लालू प्रसाद आणि ममता दिदींनी स्वार्थासाठी रेल्वे ची प्ररीस्थिती कशी भयावह करून ठेवली आहे ते पहा. श्री मनोहर पर्रीकर सारख्या माणसाला संरक्षण मन्त्रालय दिले आहे. त्यांचे काम किती कठीण आहे. श्री ए के एन्तनी हे स्वच्छ होते परंतु त्यांच्या कारकिर्दीत घोटाळ्याच्या भीतीने कोणतेही कंत्राट दिले गेले नाही. आता हा अनुशेषही भरून काढायचा आहे. या दोन्ही गोष्टींसाठी किती प्रचंड पैसा लागतो ते आपल्याला माहित आहे. तो एका रात्रीत उभा राहील का? द्वेषासाठी द्वेष करणाऱ्या माणसांची कीव करावी तेवढी थोडीच आहे असो लिहावे तितके थोडे आहे.

In reply to by सुबोध खरे

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 21:49
बरोबर बोललात सर! मोदी एकटे काही करू शकत नाहीत हे सूर्यप्रकाशी सत्य आहे, माझे त्या बाबतीत काहीच म्हणणे नाहिये, किंवा माझा मोदींना अंधविरोध सुद्धा नसेल, तुम्ही रेगुलर फ़ोर्स अन पैरामिलिटरी दोन्ही कडला अनुभव घेतला आहे अन मी सद्धया पैरामिलिट्री ला आहे मी सुद्धा निश्चित सांगतो की हो एकंदर भारतीय नेवी ब्लू वॉटर करणे ते डिप्लोमेसी अन रेलवे ते रस्ते बांधणी उत्तम घोड़दौड़ होते आहेच, ती नाकारण्यात हशील नाही हे रास्त आहेच फ़क्त जसे उठसुठ मोदींना झोड़पणे बरोबर नाही तसे त्यांना त्राता किंवा मेसायापद बहाल करणे सुद्धा चुक, ते एक उत्तम मनुष्य आहेत त्यांना तसेच ठेवणे मला इष्ट वाटते, आता म्हणजे काय? तर टिकेला ओपन ठेवावे वाटते, जिथे मी कौतुक करतोय तिथे मी संवैधानिक भाषा वापरत माझे आक्षेप नोंदवले तर माझ्यावर मोदी विरोधी अन पर्यायाने राष्ट्रविरोधी असा शिक्का बसु नये ही अपेक्षा जास्त आहे काय? हे मी वैयक्तिक माझ्यापुरते बोलतोय, अन स्पष्ट शब्दात बोलायचे झाले तर मला मोगा होण्यातही इंटरेस्ट नाही किंवा श्रीगुरुजी सुद्धा (मोगा शुद्ध गॉन केस आहेत) डाळीवरुन विषय सुरु झाला म्हणून सांगतो, तुरडाळ पुरवठा ह्यात असलेला तुटवडा नैसर्गिक नाही हे सिद्ध केल्यावर सुद्धा हळूच "चतुर व्यापारी फायदा घेणारच" असे म्हणायचे तरीही ही साठेबाजी आहे हे मान्य करायचे नाही ही ती adamant अंधभक्त फेज वाटते मला, एखादा नेता लाडका असणे म्हणजे "तो शंभर टक्के बरोबरच आहे" हे नसते न? उलटे धमक असायला हवी जे चुक ते चुक म्हणायची, प्रसंगी जो जवळच्या मित्राला (इथे राजकीय विचारसारणी) दोन खड़े बोल सुनाऊ शकत नाही त्याला ती राजकीय विचारसरणी समजली आहे का? अन त्याने कुठल्या बेसिस वर तिला अब्सॉल्युशन द्यायचे ठरवले ? हे कुतूहल वजा प्रश्न उद्भवतात , एखाद्याने जर अनुभव सिद्ध असा काही मुद्दा मांडल्यास एकतर त्याच्या विरोधात एककल्ली म्हणणे रेटणे हे अति नाही वाटत? १० वर्षे तुरीची शेती केली तेव्हा कुठे बोललो त्या मुद्द्यावर, जिथे शंका होती (गोहत्या बंदी अन डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी) तिथे मृत्युंजय भाऊ ह्यांच्या लीगल नॉलेज चा फायदा करून घेतला माझी लाइन ऑफ़ थिंकिंग चुक होती हे मानुन माझे समज अपडेट केले मी, तेच जेव्हा मी असेच बोललो तेव्हा एका वाक्याने तरी ती साठेबाजी होती इतके मान्य केले होते का? ह्याला हेकेखोरपणा नाही म्हणता येणार का?? उद्या जरका एखादा क्रूज शिप वर आठ दिवस सात रात्रीची क्रूज करुन आलेला एखादा नग तुम्हाला स्टारबोर्ड काय अन स्टर्न काय हे शिकवायला लागला तर त्याची जी काही कीव (मनातल्या मनात उघड तुमच्या प्रकृतीनुसार) तुम्ही कराल तेच फीलिंग आले एक्सक्टली! म्हणून म्हणतो मला अंधद्वेष तर पटणार नाहीच पण अंधभक्तिही पटणार नाही इतका सहज मुद्दा आहे माझा मुद्दा so I guess we are sailing the same boat here if I may dare to say so sire. प्रतिसाद जरासा मेगाबाइटी झाला खरा पण एक जूनियरचा हट्ट म्हणून एवढा ह्यावेळी घ्या प्लीज चालवुन :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 23:14
Yes we are in same boat. मोदी साहेब यांचे गुण बरोबर अवगुण आहेतच पण सद्य स्थितीत त्यांच्या इतका चांगला नेता मला तरी दिसत नाही. चाचाः

In reply to by राजेश घासकडवी

श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2016 - 23:02
आज सेन्सेक्स ८०७ ने तर निफ्टी तब्बल २५० ने पडला. हे सरकार मार्केटचे फारच नावडते झालेले दिसत आहे. तसे नसते तर मार्केट का पडले असते?

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव गुरुवार, 02/11/2016 - 01:11
१० मे २००४ ते १० मे २०१४ - सेन्सेक्स वाढून ५०७० वरून २२९०० वर गेला. म्हणजे दहा वर्षांत साडेचारपट. वर्षाला १६ टक्के
सामान्य भाषेत विज्ञान लेखमाला रंगवणारे घासकडवी गुर्जी तुम्हीच ना?? :प मलाही असच वाटायचं पुर्वी... वय वर्षे १ ते २० एव्हरेज १०% टक्क्यानी वाढणारी बॉडी पुढल्या १ वर्षातं एकच ट्क्का वाढली म्हणजे यंदाचा तांदुळ, गहु, दुध, शिग्रेट, व्हॉडका बॉडीला आवडला नाहि :ड

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी गुरुवार, 02/11/2016 - 15:03
उदाहरण गमतीदार आहे. मात्र ते गैरलागू आहे. शरीराची वाढ एका विशिष्ट वयानंतर जास्त होऊच शकत नाही. मार्केटचं तसं नाही. असो. माझा मुद्दा साधारण असा आहे. 'या लेखात नवीन राजवट आल्यावर सगळं कसं बहुतांश सुधारलेलं आहे असा युक्तिवाद आहे. मात्र इतर काही पॅरॅमीटर्स ढासळलेलेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्केट. चांगल्याचं श्रेय घ्यायचं, आणि वाईटाला इदं न मम म्हणायचं हे चालणार नाही.' या व्यापक मुद्द्यापलिकडे, हो, प्रत्येक वर्षी १५-१६ टक्के वाढ नाही व्हायची, आणि बऱ्याच गोष्टी सरकारच्या हाताबाहेर असतात हा मुद्दाही मला मान्य आहे. मात्र मार्केटची वाढ होते की नाही यावर सरकार कुठचं आहे, त्याची धोरणं काय आहेत याचा काही प्रमाणात परिणाम होतो. ही आकडेवारी पाहून 'हम्म, परिस्थिती वाईट आहे खरी, पण ती सुधारण्यासाठी सरकार अमुकअमुक गोष्टी करत आहे.' या स्वरूपाचं काही उत्तर आलं तर सर्वांच्याच ज्ञानात भर पडेल. ते न होता आकडेवारी कशी निरर्थक आहे असाच युक्तिवाद येतो आहे. असो. माझा मुद्दा मांडून झालेला आहे. यापुढे मार्केट या विषयावर या धाग्यावर चर्चा करणं कंटाळवाणं होत चाललेलं आहे. आपण अजून चार महिने थांबून दुसऱ्या वर्षाबद्दलच्या धाग्याची, नव्या सोनेरी पानाच्या वर्णनाची वाट पाहू.

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव Fri, 02/12/2016 - 00:06
"मार्केटवर सरकारी धोरणांचा प्रभाव" हा फार व्यापक विषय आहे आणि प्रस्तुत धाग्यावर त्यावर काहिही हाती लागणार नाहि. माझा तो मुद्दाच नाहि. विज्ञाव विषयावर इतके छान लेख लिहीणारे तुम्ही स्टॅटिस्टीकल इन्फरन्सच्या बाबतीत इतकी गफलत कशी करु शकता हा माझा मुद्दा आहे.
या लेखात नवीन राजवट आल्यावर सगळं कसं बहुतांश सुधारलेलं आहे असा युक्तिवाद आहे. मात्र इतर काही पॅरॅमीटर्स ढासळलेलेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्केट. चांगल्याचं श्रेय घ्यायचं, आणि वाईटाला इदं न मम म्हणायचं हे चालणार नाही
हे थोडं अवांतर होईल, पण अधोगती रोखणं हे देखील प्रगतीच्या आलेखात काऊण्ट करावं लागतं. आणि एकुणच भारतीय व्यापाराला पाव-अर्धा शतकानंतर येणार्‍या उभारणीच्या नादात या सरकारने नियर फ्युचरशी तडजोड केली हे मला वैयक्तीकरित्या काहि चुकीची वाटत नाहि. अर्थात, आता उशीर होत चालला आहे असं दिसतय. टाटा सारख्या संयमीत व्यक्तीने कानपिचक्या द्याव्या म्हणजे प्रकरण गंभीर होत चाललं आहे.

मार्केट वर सत्ताधाऱ्याचा प्रभाव नसतो??? कॉलिंग प्रगो, मदनबाण अन सगळे एक्सपर्ट! पात्राव मार्मिक गोडसे खैसर गेलेत ? (वाक्य रचना बरोबर आहे का??)

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Tue, 02/09/2016 - 14:05
हजार प्रतिसाद व्हावेत म्हणून आमचा पण एक प्रतिसाद.....
मुवि, कितीही धागे येवोत, तुमच्या १४०५ प्रतिसाद मिळालेल्या धाग्याची बरोबरी कोणताही धागा करू शकणार नाही. तुमच्या धाग्याचा विक्रम अबाधितच राहील.

श्रीगुरुजी Mon, 02/08/2016 - 20:57
डिसेंबर २०१४ मध्ये जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभेची निवडणुक झाल्यावर नेहमीपेक्षा एकदम वेगळेच चित्र दिसले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते व कोणताही पक्ष बहुमताच्या जवळपास सुद्धा नव्हता. ८७ सदस्यांच्या विधानसभेत सर्वाधिक २८ जागा पीडीपीला मिळाल्या. आश्चर्य म्हणजे दुसर्‍या क्रमांकाच्या जागा भाजपला मिळाल्या (एकूण २५). नॅकॉला १५ व काँग्रेस १२ अशी स्थिती राहिली. बहुमतासाठी ४४ जागा आवश्यक होत्या. भाजपला हिंदू बहुसंख्य असलेल्या जम्मू विभागातल्या जवळपास सर्व जागा मिळाल्या तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या श्रीनगर खोर्‍यात एकही जागा मिळाली नाही. पीडीपीला श्रीनगर खोर्‍यातल्या जवळपास सर्व तर जम्मूत काहीच जागा मिळाल्या नाहीत. एकंदरीत निवडणुकांचे निकाल पूर्ण धार्मिक विभाजन दाखवित होते. अशा परिस्थितीत जवळपास २ महिन्यांनंतर भाजप व पीडीपीचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यावर सर्वांना प्रचंड धक्का बसला. दोन पूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेले पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले अशी टीका होऊ लागली. पीडीपी हा काहीसा पाकिस्तानकडे झुकलेला, भारतविरोधी, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेला पक्ष तर भाजपची भूमिका याच्या बरोबर उलटी. परंतु जम्मू-काश्मिर राज्यातील सरकारमध्ये भाजप असणे हे पीडीपीवर म्हणजे पर्यायाने विभाजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळेच स्वतःच्या अटींवरच भाजप सरकारमध्ये सामील झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेचे अध्यक्षपद व गृहमंत्रीपद भाजपकडे आले. भाजपच्या सहभागामुळे पीडीपी पक्ष कसा नियंत्रणात राहिला याचे खालील लेखात वर्णन आले आहे. भाजपऐवजी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर पीडीपीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसते व काँग्रेसने पीडीपीच्या कोणत्याच कृतींना विरोध केला नसता. http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-mufti-jk-bjp-pdp-bjp-pdp-mufti-mohammad-sayeed-to-bjp-or-not-to-bjp-the-ifs-and-buts/ या लेखातील काही परिच्छेद - ________________________________________________________________ This time, Mufti started on the same lines and ordered the release of separatist leader Masarat Alam. Within a month, not only was the government forced to rearrest Alam, there was a stricter watch on separatists with the Public Safety Act invoked against more and more separatists and even minor protesters. _________________________________________________________________ The agenda of alliance said the partners would not rake up controversial issues — such as Article 370, and a separate state flag for Jammu and Kashmir. BJP leader Farooq Khan, in fact, challenged a J&K High Court decision that all constitutional authorities must respect and hoist the state flag. After the Mufti government issued a circular asking constitutional authorities to hoist the state flag on official cars and buildings, it had to retract within 24 hours. __________________________________________________________________ After the Muftis formed the PDP in 1999, Mehbooba was key to the rise that took the party to power within three years of its inception. She used a clever mix of mainstream and separatist politics, turning up among mourners for slain militants wearing a green abbaya, voicing her concern on human rights violations and seeking a resolution to the Kashmir issue through dialogue. The party advocated self-rule. Over the past nine months, Mehbooba was watching the results of 17 years of hard work slipping away. ____________________________________________________________________

संदीप डांगे Tue, 02/09/2016 - 20:57
जागतिक घडामोडींच्या धाग्यावरचा हा प्रतिसाद मननीय वाटला म्हणून इकडे आणला: http://www.misalpav.com/comment/801915#comment-801915
बाणराव सुबोध खरे - Tue, 09/02/2016 - 20:33 बाणराव जर गुरुजींच्या "एक वर्षानंतर" धाग्यावर चक्कर मारा. काही लोक कसे "बाजार आणि सरकार" यावर (काहीच्या) काही प्रतिसाद टाकत आहेत ते पाहण्यासाठी. अंमळ मनोरंजन होईल.
>>दोन वर्षांआधीपर्यंत "बाजार आणि सरकार" ह्याबद्दलच ह्या इथल्या 'काही लोकां'पेक्षा, जरा जास्तच मनोरंजन आज सत्तेत असणारे करत होते, नाही का डॉक्टरसाहेब? त्या मनोरंजनामुळेच आपल्याला सत्ता मिळाली हेही ते कबूल करतात. पण बहुतेक आता 'त्यांना' कळले असावे की बाजार आणि सरकारचा तसा फार काही संबंध नसतो. दोन वर्षांआधी कळत नव्हते अडाण्यांना बिचार्‍यांना. :-)

In reply to by संदीप डांगे

चेक आणि मेट Tue, 02/09/2016 - 22:54
अगदी खरं आहे, बाजार आणि सरकारचा तसा फारसा सबंध नसतो. भक्तांनी आंधळी भक्ती ठेवू नये आणि द्वेष्ट्यांनी आंधळा द्वेष करू नये,असे एकूणच काहींच्या प्रतिक्रिया वाचून सांगावेसे वाटते. पण एकूणच धोरणात्मकदृष्ट्या आताचे सरकार मागच्या सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहे,हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि धाग्याच्या हजारी वाटचालीला शुभेच्छा देतो.

मार्मिक गोडसे Tue, 02/09/2016 - 23:55
पण एकूणच धोरणात्मकदृष्ट्या आताचे सरकार मागच्या सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहे,हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो
ह्या सरकारचे एखादे असे धोरण सांगा ज्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सुसह्य झाले आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे Wed, 02/10/2016 - 13:52
रस्ते बांधणीचा दर वाढलेला आहे. विजिबली. माझ्या रोजच्या यायच्या-जायच्या रस्त्यावर २०१०मध्ये सुरू झालेली दोन कामं २०१५ मध्ये संपली. यातलं निम्याहून अधिक काम ऑक्टोबर २०१४ नंतर झालय. याने माझा कम्यूट टाइम अर्ध्या तासाने कमी झालाय. हा फायदा त्या रस्त्याने जाणार्‍या हजारो लोकांना झालाय. हे एक. २०१३ मध्ये कोल शॉर्टेजमुळे पॉवर.प्लांट बंद होणार होते. आता ते नाही. रुरल एलेक्ट्रिफिकेशनचा दर २०१२-१३-१४ च्या तुलनेत खूप वाढला आहे. एलीडी दिवे वाटले. बील कमी होइल. सौर उर्जेवर बराच फोकस आहे. याचा फरक भविष्यात दिसेल. डिझेल सबसिडी काढली. आजचीच ही बातमी दिसली. http://www.hindustantimes.com/india/27-cr-kids-covered-india-begins-world-s-largest-deworming-exercise/story-LIet9PJkAmJt3ram1yGVSL.html अजूनही चांगल्या गोष्टी काढता येतील. वाईटही भरपूर काढता येतील. (विद्यापिठांतले हस्तक्षेप वगैरे, सेंसॉर बोर्ड वगैरे वगैरे.) प्रवक्ते गुरुजींसारखे आहेत म्हणून काहीच होत नाही हे बरोबर नाही.

In reply to by अनुप ढेरे

चैतन्य ईन्या Wed, 02/10/2016 - 17:46
छ्या हे काही बरोबर नाही. मोदी काही चांगले करूच कसे काय शकतो. तुम्हाला दिसतेच कसे म्हणतो मी? इथे भले भले दिग्गज घासूगुरुजी वगैरे मोदीला मोडीत काढतायत आणि तुमचे आपले भलतेच. मोदी फक्त वाईट करू शकतो. तरच तुम्ही पुढार्लेले व्हाल नाहीतर तुम्ही एकदम भक्त व्हाल.

चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 01:26
ह्या सरकारचे एखादे असे धोरण सांगा ज्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकाचे जीवन सुसह्य झाले आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होणे हा एकच विकासाचा मापदंड आहे का?? मुळात माणसाने सर्वसामान्य असूच नये,असामान्य असावे. आणि ते सर्वस्वी स्वतःवर अवलंबून आहे,सरकार/प्रशाषन निमित्तमात्र असते, म्हणजे बघा,शौचालय बांधा म्हणून सरकारने लोकांना सांगावे लागते.पण तरीही मुर्दाडपणे लोकं उघड्यावर बसतातच ना!! आता अशा लोकांचे जीवन आणखी कसे सुसह्य करायचे?

In reply to by चेक आणि मेट

मदनबाण Wed, 02/10/2016 - 07:11
सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होणे हा एकच विकासाचा मापदंड आहे का?? अर्थातच ! विकास हा सामान्य नागरिकांच्या आयुष्याचा भागच आहे. मुळात माणसाने सर्वसामान्य असूच नये,असामान्य असावे. तुम्ही विवेकानंद आहात का ? नसाल तर का नाही ? सर्वस्वी स्वतःवर अवलंबून आहे,सरकार/प्रशाषन निमित्तमात्र असते, तसे म्हणाल तर जगणेच निमित्तमात्र आहे,जितके वर्ष आयुष्य परमेशवराने दिलेले असते तितकेच जगता येते,वेळ झाली की यमदुत शरीराचा पेपर काढुन घेतात. { कारण आयुष्य ही माणसाची न-संपणारी परिक्षाच आहे.} शौचालय बांधा म्हणून सरकारने लोकांना सांगावे लागते.पण तरीही मुर्दाडपणे लोकं उघड्यावर बसतातच ना!! आता अशा लोकांचे जीवन आणखी कसे सुसह्य करायचे? महाराष्ट्रात जिथे महिन्यातुन एकदाच पाणी येते, तिथे लोक उघड्यावर जाणार नाहीत तर काय करणार ? ढुंगण धुणे ही सुद्धा तिथे चैन समजली जात असावी ! अवांतर :- मी हा धागा फॉलो करत नाही,इकडचा दुवा तिकडच्या धाग्यावर दिल्या नंतरच माझे या धाग्याकडे लक्ष गेले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

In reply to by मदनबाण

सुबोध खरे Wed, 02/10/2016 - 19:17
महाराष्ट्रात जिथे महिन्यातुन एकदाच पाणी येते, तिथे लोक उघड्यावर जाणार नाहीत तर काय करणार ? ढुंगण धुणे ही सुद्धा तिथे चैन समजली जात असावी ! बाण राव, हे काही पटले नाही. शौचासाठी उघड्यावर जाण्यात स्त्रियांची किती कुचंबणा होते हे आपल्याला ठाऊक नाही काय? यास्तव अनेक स्त्रियाना रात्रीचे शौचासाठी जावे लागते यातून बलात्कारासारखे प्रकार घडू शकतात ( प्रत्यक्ष किती घडतात हा वादाचा मुद्दा असू शकतो) परंतु कोणतीही स्त्री रात्रीची बाहेर एकटी जाण्यास किती भयभीत असते हे पुरुषांना समजणे अवघड आहे. त्यातून स्त्रियांना हगवण लागली तर किती वाईट परिस्थिती होते. शिवाय मासिक पाळीच्या वेळेस कपडे बदलणे यासाठी साधा आडोसा मिळवणे हि फार मोठी गोष्ट आहे. खालील दोन दुवे वाचून पहा अशी तुम्हाला विनंती आहे. https://en.wikipedia.org/wiki/Open_defecation http://unicef.in/Whatwedo/11/Eliminate-Open-Defecation

In reply to by सुबोध खरे

मदनबाण Wed, 02/10/2016 - 19:37
डॉक,ओके. ठीक आहे. मध्यंतरी कुठल्याश्या वाहिनीवर मी एक मुलाखात पाहिली होती ज्यात असे त्रास बोलुन दाखवले होते.बहुतेक ती महिलाच होती { नक्की आठवत नाही.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

मार्मिक गोडसे Wed, 02/10/2016 - 08:29
मुळात माणसाने सर्वसामान्य असूच नये,असामान्य असावे.
एकंदरीत तुम्हाला तत्वज्ञानाचा अखाडा उघडण्यातच अधिक रस आहे असे दिसते. तुमच्या आयडीला शोभेल असे प्रतिसाद देण्याऐवजी तुम्ही Castling करून राजाला किल्ल्यात लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.

चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 10:23
तुम्ही Castling करून राजाला किल्ल्यात लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.
पहिली गोष्ट मी भक्त नाही,व्यक्तीपूजा मला सर्वस्वी अमान्य आहे. दुसरी गोष्ट तटस्थपणे विचार करावा लागतो,म्हणजे बघा दोन बाजू असतात आणि त्याअनुषंगाने आपण प्रकट होत असतो.पण तिसरी सुद्धा एक बाजू असते हे आपण विसरतो बरं का!! देशात असणार्या बहुतांश लोकांचा जीवन जगण्याबाबतच्या दृष्टिकोन 'आपण गरीब आहोत' असाच असतो. आणि आपली सोच(हिंदी शब्द) जशी असते तसाच माणूस बनत असतो आणि तशाच प्रकारचे आयुष्य आपण जगतो. भारतीय जनमानस आणि प्रगत पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. म्हणजे बघा "thoughts become things" आपण जसा सकारात्मक विचार करतो तशाच घटना आयुष्यात घडतात आणि जीवन सुखकर होते. प्रगत राष्ट्रांनी पण कोठून तरी सुरूवात केली असेलच ना?? तर मुद्दा असा कि 'भारतीय जनसामान्यांची विचार करण्याची पद्धती'कशी असते?? पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये असणारा तो अवगुण आहे,बर ते जै दे. आता शौचालयाचा मुद्दा-
महाराष्ट्रात जिथे महिन्यातुन एकदाच पाणी येते, तिथे लोक उघड्यावर जाणार नाहीत तर काय करणार ? ढुंगण धुणे ही सुद्धा तिथे चैन समजली जात असावी !
हे मात्र कायतरीच!! सरकारी शौचालये असताना त्यांचा वापर न करणारी लोकं पाहिलेली आहेत.आहात कुठे?? आणि किती पाणी लागतं ओ?? बरं पाणी असणार्या ठिकाणी पण तीच परिस्थीती. बरं थांबतो आता,सरकारची कातडी वाचण्याचा काहीही हेतू नाही. असच आपलं सांगितलं सहज,बाकि काय नै आणि हे तत्वज्ञान सांगतोय असं वाटू शकतं, शेवटी 'आदमी कि सोच' हा मुद्दा येतोच. . . . . -- चेक आणि मेट

In reply to by चेक आणि मेट

मदनबाण Wed, 02/10/2016 - 10:49
दुसरी गोष्ट तटस्थपणे विचार करावा लागतो,म्हणजे बघा दोन बाजू असतात आणि त्याअनुषंगाने आपण प्रकट होत असतो.पण तिसरी सुद्धा एक बाजू असते हे आपण विसरतो बरं का!! ब्वॉर... तर मुद्दा असा कि 'भारतीय जनसामान्यांची विचार करण्याची पद्धती'कशी असते?? तुम्ही विवेकानंद आहात का ? नसाल तर का नाही ? याचे उत्तर ध्या ना प्लीज. हे मात्र कायतरीच!!सरकारी शौचालये असताना त्यांचा वापर न करणारी लोकं पाहिलेली आहेत.आहात कुठे?? आणि किती पाणी लागतं ओ?? बरं पाणी असणार्या ठिकाणी पण तीच परिस्थीती. तुम्ही दोनच बाजू पाहिल्यात ! वापरणारे आणि असुन ते न-वापरणारे. तिसरी बाजू वास्तव आहे, जे मी लिहले आहे. यात सरकारी धोरण आणि वास्तविकता यांच्यातला फरक दाखवणे हाच उद्देश आहे. जिथे पाणी ही मूलभुत सुविधाच मिळणे शक्य नाही तिथे सरकारी योजनेस सफलता कशी मिळेल ? पाण्याचे दुर्भिक्ष असणार्‍या ठिकाणी जाउन रहा, मग पाणी किती आणि कसं लागत ते लगेच कळुन येइल.

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 12:50
तुम्ही विवेकानंद आहात का ? नसाल तर का नाही ? याचे उत्तर ध्या ना प्लीज. प्रश्नच हास्यास्पद आहे,मी विवेकानंद कसा असेन? विवेकानंद केव्हाच गेले. बरं त्यांच्यासारखे आहात का?आणि नसल्यास का नाही? याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे. प्रत्येक माणूस वेगळाच असतो,तुम्ही तसेच का नाही आहात?? हा निरर्थक प्रश्न आहे. मुद्दा असा कि प्रत्येकजण विवेकानंद बनू शकत नाही,पण त्यांचे अनुकरण करून त्यांच्याजवळपास तरी पोहचू शकतो! तुम्ही दोनच बाजू पाहिल्यात ! वापरणारे आणि असुन ते न-वापरणारे. तिसरी बाजू वास्तव आहे, जे मी लिहले आहे. यात सरकारी धोरण आणि वास्तविकता यांच्यातला फरक दाखवणे हाच उद्देश आहे. जिथे पाणी ही मूलभुत सुविधाच मिळणे शक्य नाही तिथे सरकारी योजनेस सफलता कशी मिळेल ? पाण्याचे दुर्भिक्ष असणार्‍या ठिकाणी जाउन रहा, मग पाणी किती आणि कसं लागत ते लगेच कळुन येइल. उघड्यावर बसल्यावर किती लागतं?? तेवढचं शौचालयात पण वापरायचं.तशी शौचालये उपलब्ध आहेत,अगदी रेडीमेड आहेत,विकत घ्यायचं(सवलत असतेच)आणि उचलून नेवून ठेवायचं.

In reply to by कपिलमुनी

चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 18:47
बाजीराव मोड आॅन आयडी नया है तो भी चुबता है,काय म्हणता? चीते कि चाल, बाज कि नजर और मेरे आयडी पर संदेह नही करते.कभी भी मात दे सकती है| बाजीराव मोड ऑफ

In reply to by चेक आणि मेट

कपिलमुनी Wed, 02/10/2016 - 15:13
तुम्हाला शौच करणे आणि त्यासाठी लागणारा पाणी याबद्दल काहीही माहीत नाही. तुमचा ग्रामीण जीवनाचा अनुभव शून्य आहे. बाकी तिथे टिश्शू पेपर नसतात आणि परवडत नाहीत.

In reply to by चेक आणि मेट

lakhu risbud Wed, 02/10/2016 - 18:11
ओ भाऊ तुमाले कलत कसं न्हाई, या धाग्यावर काय बी झालं तरी मोदीस्नी श्या देयाच्या.....आणि तुमी म्हणून रायले की आंधळा इरोद नको.....नवीन आयडी हाय तुमचा......असा सल्ला देनं शोभतं का तुमाला ?ह्ये येकादि लांबालचक लेकमाला लिवायची,तुमी सौता किती इद्वान,जानकार हैत हे लोकास्नी मेगाबैटी परतिसादातून पटवून द्याचे आणि मंग चालू कराचे मला तर खात्री हाय बगा, हे सगळं तुमी क्येलं ना तुमच्या कांपूटरच्या कि बोर्डातुन आपलेआपंच श्या येनार........न्है आल्या म्हंजे तुमी आंदळे मोदी भक्त !

In reply to by चेक आणि मेट

मदनबाण Wed, 02/10/2016 - 18:59
प्रत्येकजण विवेकानंद बनू शकत नाही,पण त्यांचे अनुकरण करून त्यांच्याजवळपास तरी पोहचू शकतो! मुद्द्दा स्पष्ट केल्या बद्धल धन्यवाद. उघड्यावर बसल्यावर किती लागतं?? तेवढचं शौचालयात पण वापरायचं.तशी शौचालये उपलब्ध आहेत,अगदी रेडीमेड आहेत,विकत घ्यायचं(सवलत असतेच)आणि उचलून नेवून ठेवायचं. कठीण आहे, अहो पाणी रोज नाही येत तिथे महिन्यातुन १दा. असो. मी इथे थांबतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

In reply to by मदनबाण

सुबोध खरे Wed, 02/10/2016 - 19:31
http://www.susana.org/en/resources/library/details/1758 http://www.huffingtonpost.com/entry/open-defecation-india_b_7898834.html?section=india http://www.worldbank.org/en/news/feature/2015/12/15/ending-open-defecation-achieving-clean-and-healthy-rural-india हे काही दुवे वाचून पहा कि ७० वर्षे झाली तरी आपल्या देशात ५० % लोकसंख्या "घराबाहेर" जाते. याच्याबद्दल लाज वाटण्याऐवजी मोदी द्वेष्टे लोक मोदी साहेबाना या गोष्टीवरून दुषणे देत आहेत.एक वर्ष झाले स्वच्छ भारत योजनेचे काय झाले आणी अच्छे दिन केंव्हा येणार? सत्तर वर्षांची घाण एक वर्षात साफ होणार का? हा विचार नाहीच. वाईट म्हणजे सरकारनेच आपल्याला सर्व काही गोष्टी दिल्या पाहिजेत या मनोवृत्तीतून लोक बाहेर आणणेच कठीण झालेले आहे. असे आरोप पाहून शरम वाटली. द्वेष किती आंधळा असू शकतो?

चेक आणि मेट Wed, 02/10/2016 - 17:09
@कपिलमुनि मी एक वर्षापासून मिपाला फाॅलो करतोय, सक्रीय सदस्य होण्याचा विचार परवाच डोक्यात आला, तुमचा आणि गुरूजींचा वाद मला माहित आहे,तसेच इतर बर्याच आयडींचे लेखन ओळखीचे आहे. मी वर काय म्हणलं होतं ते परत सांगतो भक्तांनी आंधळी भक्ती ठेवू नये आणि द्वेष्ट्यांनी आंधळा द्वेष करू नये. स्वतःला मोदीफोबिया होऊ देवू नका,तटस्थ रहा. . . _ तुमच्या लेखनाचा फ्यान

In reply to by चेक आणि मेट

श्रीगुरुजी Wed, 02/10/2016 - 17:36
मुनीवर्यांच्या आधीच्या प्रतिसादावरून असं दिसतंय की "चेक आणि मेट" हा माझा डुप्लिकेट आयडी आहे असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कठीण आहे.

सौंदाळा Wed, 02/10/2016 - 18:02
मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या कामगिरीचे मुल्यमापन याच धाग्यात व्हावे आणि ह्या धाग्याने मराठी आंतरजालावरचा सर्वाधिक प्रतिसादांचा धागा असा विक्रम करावा अशी इच्छा व्यक्त करुन मी माझ्या एका प्रतिसादाची भर या धाग्यात घालतो ;)

मार्मिक गोडसे Wed, 02/10/2016 - 23:15
पहिली गोष्ट मी भक्त नाही,व्यक्तीपूजा मला सर्वस्वी अमान्य आहे.
असे मी म्ह्टलेच नाही.
एकूणच धोरणात्मकदृष्ट्या आताचे सरकार मागच्या सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहे,हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो
सांगा आताच्या सरकारची 'एक पाऊल पुढे' कथा.

संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 00:56
विशेष सूचना: ज्याचा ह्या धाग्यावर शेवटचा प्रतिसाद असेल त्याला भारतरत्न घोषीत करण्यात येणार आहे. फक्त प्रतिसाद १००० वा असावा. हजार प्रतिसादानंतर कुणी प्रतिसाद टाकल्यास स्पर्धा कॅन्सल.

पक्षी Mon, 02/15/2016 - 14:55
ह्या धाग्याला १००० कडे नेण्यासाठी माझाही हाथभार.

मोगा Mon, 02/15/2016 - 22:45
मेक इन इंडिया कार्यक्रमात आग

मोगा Mon, 02/15/2016 - 22:45
मेक इन इंडिया कार्यक्रमात आग

सुबोध खरे Wed, 02/17/2016 - 11:20
सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि त्यांनी "दिल्लीच्या" जनतेच्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असल्याच्या चार पाच पानी मोठ्या मोठ्या जाहिराती "मुंबईच्या" वृत्तपत्रात येत आहेत. याचे पैसे कोण देणार आहे याचे कुतूहल लागून राहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/17/2016 - 12:45
दिल्लीच्या वार्षिक अंदाजपत्रकात आआप सरकारच्या जाहिरातीसाठी अंदाजे ५२५ कोटी रूपयांची तरतूद केलेली होती. त्याच पैशातून जाहिराती होत असणार. दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर सुद्धा मोठमोठ्या लांबलचक जाहिराती येत आहेत. जाहिरातींसाठी इतके पैसे वापरल्यावर कचरा खात्यातील कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनासाठी पैसे न उरणे अगदी स्वाभाविक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नाना स्कॉच Wed, 02/17/2016 - 13:37
म्हणायला तर बीजेपी न पण १० हजार कोटी खर्च केलेत इलेक्शन वर! सरकारी यंत्रणा वापरुन मन की बात च्या टाइम स्लॉट साठी पैसा देते का सरकार? का होऊ दे खर्च चॅनल आहे घरचं प्रकार आहे? (माहीती नाहीये म्हणून विचारतोय गैरसमज नको)

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी गुरुवार, 02/18/2016 - 20:45
सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि त्यांनी "दिल्लीच्या" जनतेच्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असल्याच्या चार पाच पानी मोठ्या मोठ्या जाहिराती "मुंबईच्या" वृत्तपत्रात येत आहेत. याचे पैसे कोण देणार आहे याचे कुतूहल लागून राहिले आहे.
आआप जाहिरातीत सुद्धा असत्य माहिती पुरवित आहेत. इंडियन एक्सप्रेस मध्ये १७ फेब्रुवारीच्या अंकात आआपची २ पूर्ण पाने जाहिरात आहे. आआपने वर्षभर काय केले याचे वर्णन आहे. एका कॉलमचा मथळा "Delhi gov scraps management quota in private schools" असा असून त्यात खालील वाक्ये आहेत. Much to the respite of parents running for nursery admission, the Delhi government has scrapped the management quota in the private schools. त्या जाहिरातीत आपल्या सरकारने नर्सरी प्रवेशातील व्यवस्थापन कोटा स्क्रॅप केल्याबद्दल केजरीवालांनी स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे सविस्तर वर्णन आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. http://indiatoday.intoday.in/story/delhi-high-court-stays-delhi-governments-order-to-scrap-management-quota-in-private-schools/1/587515.html The Delhi High Court today has put a stay on Delhi Government's circular that scrapped many criteria for nursery admissions, including management quota. The high court today ruled that management quota will continue this year for nursery admissions. ही बातमी ४ फेब्रुवारीची असून सुद्धा १७ फेब्रुवारीच्या जाहिरातील आआप सरकार पूर्णपणे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्याच १५ फेब्रुवारीच्या आवृत्तीत आआपच्या अजून एका जाहिरातीचा मथळा आहे "Kejariwal proven right: CAG audit confirms scam of crores in private power distribution companies". प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे हे ऑडिट झालेलेच नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने कॅगला हे ऑडिट करण्याचा दिल्ली सरकारचा आदेश रद्द केला आहे. जर ऑडिट झालेलेच नाही आणि रद्द झालेले आहे तर कॅग ऑडिटने वीज वितरण कंपन्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला आहे असे केजरीवाल कशाच्या जोरावर म्हणतात. इथेही जनतेची पूर्ण दिशाभूल केली जात आहे. http://www.ndtv.com/delhi-news/cag-cannot-audit-discoms-accounts-high-court-1238109 The Delhi High Court today cancelled the AAP government's decision to get the accounts of three private power distribution companies audited by the Comptroller and Auditor General (CAG). न्यायालयाचा हा निर्णय ऑक्टोबर २०१५ मध्ये दिलेला आहे. परंतु १५ फेब्रुवारी २०१६ च्या जाहिरातील केजरीवाल त्याविषयी असत्य माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. यात आश्चर्य काहीच नाही. असत्यकथन, खोटे आरोप, कांगावा, जनतेची दिशाभूल, भ्रष्टाचार्‍यांना पाठिंबा हीच आआपवाल्यांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Fri, 02/19/2016 - 10:40
बापरे इतके धडधडीत खोटं? मला वाटलं होतं कि निदान वीज कंपन्यांचे ऑडिट करून सामान्य जनतेला स्वस्तात वीज पुरवायचे ( एक तरी) महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. इतकी धूळफेक? एके काळी केजरीवाल साहेबांबद्दल माझ्या बर्याच अपेक्षा होत्या. सनदी सेवेतील हुशार माणूस आहे भ्रष्टाचारा बद्दल व्यवस्थित माहिती असलेला त्यामुळे या विषवल्लीच्या मुळापर्यंत जाण्याचे ज्ञान असलेला आहे. पण गेल्या काही वर्षात ज्या तर्हेने आआप मध्ये त्यांनी सवता सुभा निर्माण केला त्यामुळे त्यांचा आलेख खाली उतरत गेला. आत्तापर्यंत तरी तो अधिक मध्ये होता या नंतर तो उणे मध्ये गेला असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 02/19/2016 - 10:46
SC issues notice to three Delhi discoms over CAG audit row A Supreme Court bench led by Justice J. Chelameswar listed the matter for final hearing on 2 March http://www.livemint.com/Politics/eeMuPO39br2iOmDEpQFlaP/SC-issues-notice-to-three-Delhi-discoms-over-CAG-audit-row.html हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेला असताना स्वच्छ खोटं?

In reply to by सुबोध खरे

नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 11:18
डॉक्टर साहेब, ऐकिव माहीती ही पण आहे की केजरीवाल ह्यांची पत्नी ही स्वतः एक भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी असुन वर्षोंवर्षे दिल्लीत ठाण मांडून बसलेली आहे (खरे खोटे देव अन केजरीवाल साहेब जाणोत) तसेच ह्या महाशयांनी सनदी सेवे मधुन राजीनामा द्यायचे एक कारण म्हणजे रॅमन मॅगसेसे पुरस्काराची रक्कम (जी बरीच घसघशीत असते) मिळाल्यावर ती पुर्णपणे आपल्या गैरसरकारी स्वयंसेवी गट (NGO) मधे कर न भरता वळती करणे ह्यासाठी असल्याचे सुद्धा ऐकून आहोत. अर्थात ह्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत म्हणून साध्यातरी ही सांगोवांगी म्हणतो आहे आम्ही, तरीही ह्यांचे मोदी विरोधी अन एंटी एस्टेब्लिशमेंट पराक्रम पाहता त्यात किमान एक टक्का सत्यांश असण्याची संभावना बरीच वाटते

In reply to by नाना स्कॉच

सुबोध खरे Fri, 02/19/2016 - 11:27
असू द्या हो नानासाहेब. प्रामाणिक अधिकारी आहेत कुठे दिल्लीत? India Against Corruption (IAC) activist Arvind Kejriwal, while accepting that he and his wife Sunita Kejriwal (both belong to the Indian Revenues Services-IRS) were never transferred out of Delhi, said that this happened due to shortage of honest and competent officers with technical skills.While Kejriwal forgot to take note of Ashok Khemka (the IAS officer from Haryana, who cancelled the mutation of the over three-acre plot that Robert Vadra's company allegedly sold to DLF last month, has been transferred for 43 times during his 20 years service), he pointed a finger towards IAS officer Pulok Chatterjee, who shares good relations with the first family of the Congress party. http://www.moneylife.in/article/kejriwal-wife-never-transferred-out-of-delhi-but-points-finger-at-pulok-chatterjee/29199.html

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 02/19/2016 - 14:28
बापरे इतके धडधडीत खोटं?
अजून एक. त्याच जाहिरात मालिकेत एका जाहिरातीत असे वाक्य आहे.
"दिल्लीच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभर वीज दर वाढले नाहीत."
आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की Delhi Electricity Regulatory Commission (DERC) या कंपनीने ९ जुलै २०१५ ला वीज दरात ६% वाढ केलेली आहे.
DERC hikes power tariff by 6%
- http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-power-tariff-hiked-by-up-to-6-per-cent-to-come-into-effect-from-monday/

कपिलमुनी Wed, 02/17/2016 - 13:49
महिला आआपची आहे असे ती घटना घडल्यावर सर्व वृत्तपत्रातून आले होते.
याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिला तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या . बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो. इथे माझ्या म्हणण्याची दखल मिपाकरांनी घेतली आणि खोटेपणा उघडा पाडला याबद्दल आभार

In reply to by कपिलमुनी

नाव आडनाव Wed, 02/17/2016 - 13:59
इथे माझ्या म्हणण्याची दखल मिपाकरांनी घेतली १०० %. तुम्ही देऊ शकत असलेला सगळ्यात चांगला पुरावा दिला आहे आणि त्यानंतरचे श्रीगुरूजिंचे प्रतिसाद ते एखादी गोष्ट किती अ‍ॅक्सेप्ट करतात याचा पुरावा देणारे आहेत :) एखादी गोष्ट खोटी असेल तरी रेटून सांगायची आणि खरं असल्याचं भासवायची राजकारण्यांची कला काय असेल याचा थोडा अंदाज आला :)

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Wed, 02/17/2016 - 23:03
याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिला
हहपुवा. आआपकडून आलेले स्टेटमेंट म्हणजे पुरावा कधीपासून झाला? उद्या तुम्ही काँग्रेसच्या अधिकृत ईमेल आयडीवर ईमेल पाठवून विचाराल की २-जी तरंगलहरी वाटपात घोटाळा झाला होता का किंवा कोळसा खाण वाटप करताना भ्रष्टाचार झाला होता का? आणि त्यांचे उत्तर पुरावा म्हणून वापराल.
तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या
. आम आदमी सेना व आआप हे एक नसून आम आदमी सेना ही आआपमधील लोकांनीच सुरु केलेली संघटना आहे हे मी सुरवातीपासूनच सांगत आहे. एक संघटना आहे व एक राजकीय पक्ष आहे. परंतु त्या राजकीय पक्षातीलच मंडळी या संघटनेत आहेत. भावना अरोरा ही एकाच वेळी आआपची सदस्य असून आम आदमी सेनेची सुद्धा सदस्य आहे. अशी 'दुहेरी निष्ठा' असलेले नेते सर्व पक्षात असतात. इथेही तसेच आहे. तरीही शंका असेल तर खालील वृत्त वाचा. http://www.indiasamvad.co.in/Special-Stories/INSIDE-STORY-Who-is-Bhawna-Arora-and-conspiracy-behind-ink-attack-on-CM-Kejriwal-10343 त्याच वृत्तातून, According to information, Bhawna Arora is the in-charge and member of Aam Aadmi Party's (AAP) rebel group Aam Aadmi Sena. Also, Aam Aadmi Sena's Punjab wing had sent Bhawna to launch an ink attack on Kejriwal. The woman claimed to be a member of AAP's Punjab wing and mentioned that the party has betrayed her.
बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो.
पुन्हा एकदा हहपुवा. २-जी तरंगलहरी घोटाळा बाहेर आल्यावर काँग्रेसची कपिल सिब्बलांनी त्यात घोटाळा झालाच नाही. झिरो लॉस झाला अशी काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडली होती. ती भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याने न्यायालयाने स्वीकारली असती तर? एखाद्या पक्षाने मांडलेली भूमिका हे कोणीच पुरावा म्हणून विश्वास ठेवत नाहीत कारण कोणताही पक्ष नेहमी स्वतःचाच बचाव करतो व त्यासाठी संपूर्ण असत्य विधाने सुद्धा सांगितली जातात. झोपेचे सोंग तुम्हीच घेतले आहे. मुळात ज्या पक्षाचा अध्यक्ष वारंवार असत्यकथन करीत असतो त्या पक्षाची अधिकृत भूमिका कधीच विश्वासार्ह नसते.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी Wed, 02/17/2016 - 23:43
http://www.indiasamvad.co.in/ च्या बातमीनुसार according to sources , according to information असे म्हणले आहे ते सोर्स काय आहे , कोण आहे याची खातरजमा नाही. आणि आख्खा नेट शोधून काय आणलीत तर http://www.indiasamvad.co.in/ यांची बातमी रिलायबल आणि आप ने सांगितलेले खोटे. आप ला फक्त आम आदमी सेना त्याचा अधिकृत भाग आहे का नाही तेच विचारला .त्यानी आम आदमी सेनाचा कार्यकर्ता आपचा अधिकृत सदस्य नाही हे सांगितला आहे हेआता तुम्हाला न्यायालयात जायचा असेल तर जा बॉ !

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Wed, 02/17/2016 - 23:48
तुम्हाला थर्ड पार्टी पुरावा हवा होता तो मी दिला. तुम्ही मात्र थर्ड पार्टी पुरावा न देता आआपवाल्यांचे स्टेटमेंट हे पुरावा समजून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहात. आआप पक्ष व त्यांच्या अध्यक्षासकट त्यांचे नेते हे असत्यकथन, बनावट चित्रफिती तयार करणे, खोटे आरोप करणे इ. साठी प्रसिद्ध आहेत. ते जे सांगत आहेत त्यावर कणभरही विश्वास ठेवता येणार नाही. भावना अरोरा ही आआपचीच सदस्य आहे याचा थर्ड पार्टी पुरावा मी दिला आहे. आता तुम्ही ती आआपची सदस्य नाही याचा थर्ड पार्टी पुरावा द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by कपिलमुनी

ट्रेड मार्क Wed, 02/17/2016 - 23:40
कपिलमुनींनी पुरावे देण्यासाठी श्रीगुरुजींचा केवढा पाठपुरावा केला. आत्ताचा शाई हल्ला झाल्याझाल्या केजरीवालांनी आरोप केला या हल्ल्यामागे भाजप आहे. तेव्हा ही बाई भाजपशी कशी संबंधीत आहे याचे पुरावे कपिलमुनींनी दिले तर श्रीगुरुजींचा मुद्दा लगेच बाद होईल. महामहीम केजरीवालांनी आत्तापर्यंत जेवढे जवढे आरोप केले, मग ते शाई/ चप्पल फेकणे, कानाखाली मारणे असो वा केंद्र सरकार काम करू देत नाही असा आरोप असो, शिबिआयनी टाकलेली धाड असो, त्या प्रत्येक वेळी कपिलमुनींनी एवढा पाठपुरावा करून पुरावे मागितले का केजरीवालांकडे? असतील तर ते पण इथे सदर करावेत.

In reply to by ट्रेड मार्क

श्रीगुरुजी Wed, 02/17/2016 - 23:51
छे छे! असल्या गोष्टींचे पुरावे ते कसे देतील? त्यांच्या दृष्टीने केजरीवाल म्हणतील तेच वैश्विक सत्य. मग ते कितीही असत्य का असेना. जर केजरीवाल म्हणत असतील की त्यांना थोबाडीत मारणारा भाजपचा होता, तर मग तो भाजपचाच होता. पिरियड. ते जर म्हणत असतील की त्यांच्यावर शाई फेकणारे व त्यांना थोबाडीत मारणारे भाजपचे होते, तर मग ते भाजपचेच होते. पिरियड.

In reply to by ट्रेड मार्क

कपिलमुनी Wed, 02/17/2016 - 23:55
ती महिला भाजपची आहे हा आरोप केजरीवालन् केलाय मी नाही . . त्यांचे आरोप मी का सिद्ध करु ? त्यांची धुणी त्यांनी धुवावी . केजरीवाल यांचा आरोप चुकीचा आहे कारण ती महिला भाजपची नाही .आम आदमी सेनाची आहे. केजरीवाल खोटा बोलत असतील तर तुम्ही पुरावे मागा.मला का मागताय ? बादवे त्यांनी मिपावर खोटा लिहीला तर त्यानाही मागेन माझा आक्षेप खोटे आरोप करण्यावर आहे.

In reply to by कपिलमुनी

ट्रेड मार्क गुरुवार, 02/18/2016 - 02:16
भारी पळवाट आहे. म्हणजे पुरावे मागणे वगैरे तुम्ही फक्त मिपावरच करता तर. मला वाटला जसं आआप च्या अधिकृत इमेल आयडी वर विचारणा केलीत आत्ता तशी इतर वेळी पण केली असेल. असो। जाऊ दे तर मग.

In reply to by ट्रेड मार्क

कपिलमुनी गुरुवार, 02/18/2016 - 07:24
मी पोलीटीकल कार्यकर्ता नाही. गुर्जींनी मागितला म्हणून मेलवर माहिती मागवली. बादवे तुम्ही मागा पुरावे कोणी थांबवला आहे ?

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 02/19/2016 - 14:36
मुनीवर्य, तुम्ही आआपच्या ज्या अधिकृत ईमेल आयडीला ईमेल पाठवून माहिती विचारली होती तो इथे द्याल का? जाहिरातीत ते खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल का करीत आहेत ते विचारीन म्हणतो.

In reply to by श्रीगुरुजी

नाव आडनाव Fri, 02/19/2016 - 14:45
त्या इमेलवरून दिलेली माहिती खोटीच आहे असं तुमचं मत असतांना त्या इमेल आयडीचा काय उपयोग? त्यापेक्षा माहितीचा अधिकार वापरणं हा सोपा आणि खात्रीशीर उपाय होइल. बरोबर ना?

In reply to by नाव आडनाव

श्रीगुरुजी Fri, 02/19/2016 - 15:13
मी माहिती मागणारच नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वरील लिंक्समध्ये दिलेलीच आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की दिशाभूल करणारी माहिती का देता असे विचारल्यावर ही मंडळी कशी सारवासारव करतात ते.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी Sat, 02/20/2016 - 23:52
धन्यवाद! नर्सरीतील मॅनेजमेंट कोटा व कॅग ऑडिट हे दिल्ली सरकारचे दोन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केलेले असताना व सर्वोच्च न्यायालयात याबाबतीतील खटला प्रलंबित असताना, दिल्ली सरकार वर्षपूर्तीच्या जाहिरातींमध्ये आम्ही हे केलं असे सांगून लोकांची दिशाभूल करणारे दावे का करीत आहेत असे मी वरील ईमेल आयडीवर ईमेल पाठवून विचारल्यावर खालील उत्तर आले.
There is nothing false published in ad provided by Delhi government. 1. AAP Government had taken a decision and published it as a government order. This decision has not ruled out by court. A stay has been brought to this decision for current academic year after some challenges to it by oppositions. This came after considering the delay in a process of courts final decision on completely scrapping the management quota. We have put our stand on the same and very much confident to win this case. 2: We request you to read the decision of Hon. Supreme court issued on 18th January 2016 about the CAG Audit of Delhi discoms. That will clarify the validity of our advertisement.
पहिला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला असून नर्सरीसाठी मॅनेजमेंट कोटा या वर्षासाठी सुरूच राहील असा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आआपने अपील केले असून ते प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत "नर्सरीतील मॅनेजमेंट कोटा आमच्या सरकारने रद्द केला" हा जाहिरातीतील दावा चुकीचा ठरतो. आआप सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागण्याचा कितीही आत्मविश्वास असला तरी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. समजा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय? दुसरा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासंबंधी आपले म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी २०१६ ला दिल्लीतील ३ वीज वितरण कंपन्यांना नोटिस पाठविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला आहे. उच्च न्यायालयाने कॅगने ऑडिट करण्याचा निर्णय रद्द केल्याने हे ऑडिट होऊ शकले नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने कॅगच्या ऑडिटला हिरवा कंदिल दाखविला तरच त्यानंतरच ते सुरु होईल. परंतु त्याबाबतीत आताच "वीज वितरण कंपन्यांमध्ये प्रचंड घोटाळा असून या ऑडिटच्या अहवालामुळे ते सिद्ध झाले आहे" असा आआपचा जाहिरातीत केलेला दावा चुकीचा ठरतो. जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय?

In reply to by श्रीगुरुजी

नाना स्कॉच Sun, 02/21/2016 - 08:49
पहिला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला असून नर्सरीसाठी मॅनेजमेंट
रद्द
अन
स्थिगिती
मधले अंतर आता आम्हाला तुम्हांस सांगावे लागेल काय गुरूजी??

In reply to by नाना स्कॉच

श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 12:57
दोन्हीत फरक आहेच. परंतु नर्सरीतील प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने स्थगित केला असला तरी २०१६-१७ या वर्षासाठी मॅनेजमेंट कोटा सुरूच राहील असा आदेश दिलेला आहे. एक तर हा कोटा पुढील शैक्षणिक वर्षासाठी सुरूच राहणार आहे आणि तो रद्द होणे किंवा आहे तसा सुरू राहणे या दोन्ही शक्यता आहेत. अशा परिस्थितीत आपल्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीत "आमच्या सरकारने नर्सरी प्रवेशातील मॅनेजमेंट कोटा रद्द केला" हे वाक्य दिशाभूल करणार आहे. वीज वितरण कंपन्यांचे कॅगकडून होणारे ऑडिट उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. बातमीत तसा स्पष्ट उल्लेख आहे. The Delhi High Court today cancelled the AAP government's decision to get the accounts of three private power distribution companies audited by the Comptroller and Auditor General (CAG). मुळात ते ऑडिट पूर्ण झालेलेच नव्हते व त्यामुळे त्याचा अहवालही कॅगने पूर्ण केलेला नाही. अशा अपूर्ण अवस्थेत असतानाच ती प्रकियाच रद्द झाली. त्यामुळे ऑडिट संबंधात जेवढे काम झालेले होते ते देखील रद्द झाले आहे. या निर्णयाविरूद्ध दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून तिथे ते प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत "Kejariwal proven right: CAG audit confirms scam of crores in private power distribution companies" हा जाहिरातीचा मथळा दिशाभूल करणारा आहे. या प्रकरणात देखील ऑडिटला मान्यता देणे किंवा ऑडिटला परवानगी नाकारणे हे दोन्ही निर्णय होऊ शकतात. समजा सर्वोच्च न्यायालयाने ऑडिटला परवानगी दिली तर कॅगला संपूर्ण ऑडिट पुन्हा एकदा पहिल्यापासून करावे लागेल. त्यामुळे पूर्वीचे अर्धवट काम आपोआपच निरूपयोगी ठरते. जर सर्वोच्च न्यायालयाने ऑडिटला परवानगी नाकारली तर वरील संपूर्ण जाहिरात खोटी ठरते.

तर्राट जोकर Wed, 02/17/2016 - 15:42
सध्या मिपावर दोनच विषय सगळ्या धाग्यांवर कुटल्या जातेत. स्त्रियांचा ओरगॅजम आणि केजरीवालचे शाईप्रकरण. दोन्ही चा लागल का निक्काल कदी... पुचता हूं उबा रै के चौकामदी. - तर्राट आठवले.

तुषार काळभोर Wed, 02/17/2016 - 17:26
१७ फेब्रुवारी या दिवशी मिपावर इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र मिपाच्या ८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी धाग्याने स्पष्ट १००० प्रतिसाद मिळविले. 1

In reply to by होबासराव

तुषार काळभोर गुरुवार, 02/18/2016 - 08:45
ते धाग्याचीच पहिली २-३ वाक्ये चोप्य पस्ते केली ना.. म्हणून बाकी शब्दांबरोबर तो शब्द राहून गेला. माझ्या प्रतिसादात तो अनावश्यक आहे, हे खरे.

सौंदाळा गुरुवार, 02/18/2016 - 10:39
आगामी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आणि २०१७ च्या उ.प्र. निवडणुकांवर डोळा ठेवुन कुमार विश्वास आप सोडणार आहे आणि भाजपा मधे प्रवेश करणार आहे अशा वावड्या उठत आहेत. जर असे झाले तर आपसाठी मोठा धक्का असेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाना स्कॉच गुरुवार, 02/18/2016 - 11:41
बीजेपी शाहणी असल्यास हे वासु पात्र दुरच ठेवलेले बरे! कारण ते आत येता धक्का आप पेक्षा आपल्यालाच बसण्याचा धोका जास्त आहे

तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 14:57
केजरीवालच्या वर्षपुर्तीचा दुसरा धागा काढा. इथे भाजपच्याच प्रॉमिसेस्चं काय झलं त्याबद्दल चर्चा होऊ द्या. 'आपलं ठेवा झाकून दुसर्याचं पाहा वाकून' हे वागणं सोडा आता.

माहितगार Sun, 02/21/2016 - 09:25
अरेवा गुरुजींचा धागा म्हणे आआप बद्दल असेल असे वाटले होते पण चक्क भाजपा बद्दल आहे की ! आणि एकुण मिपा प्रतिसाद संख्येत सध्या दोन नंबरवर आहे चार-सहा महिन्यात हा धागा पयला माझा नंबर म्हणेल तर नवल नाही. तेव्हा श्रीगुरुजींचा मिपाकर विवीध भेटवस्तुंनी सत्कार करतीलच. जाता जाता मे महीणा तसा अद्याप लांब आहे तरीपण मे महिण्यात धागा लेखाचे शिर्षक बदलण्याची आठवण संपादकांनी ठेवावी.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 12:58
धागा मोदी सरकारबद्दल होता. परंतु एका प्रतिसादात आआपच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातींबद्दल लिहिले गेल्याने विषय आपोआपच तिकडे वळला.

श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 13:11
हरयानातील जाटांना राखीव जागा देण्यासाठी अचानक आंदोलन सुरू झाले आहे. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाचे टायमिंग संशयास्पद आहे. युपीए सरकारने मे २०१४ मध्ये पायउतार होण्यापूर्वी व आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २०१४ च्या सुरवातीला घाईघाईत अचानक जाटांसाठी राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामागे मतांची बेगमी करणे हा एकमेव उद्देश होता. त्याविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. त्याविरूद्ध रालोआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर मे २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाटांचा समावेश इतर मागासवर्गियात करण्याच निर्णय रद्द केला व जाटांसाठी असलेल्या राखीव जागांचा निर्णयही रद्द केला. एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेऊन निर्णय घेतल्यावर फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक पुन्हा एकदा जाटांसाठी राखीव जागा मागण्याचे आंदोलन सुरू होणे आश्चर्यकारक आहे. राखीव जागांचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही हे स्पष्ट दिसत असताना आंदोलन करून हिंसाचार करण्याचे कारणच काय? याच महिन्यात संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु होत आहे. या आंदोलनाचे निमित्त करून हेही अधिवेशन उधळून लावण्याची योजना यामागे असावी का? किंवा नुकत्याच यशस्वी झालेल्या मेक इन इंडिया उपक्रमामध्ये खोडा घालण्याचा हा प्रयत्न असावा का? अजून एक वेगळी शक्यता आहे. हरयानाच्या इतिहासात प्रथमच मनोहरलाल खट्टर हे जाट नसलेले मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जाटांच्या अस्मिता दुखावल्या गेल्या असाव्यात. यापूर्वी सातत्याने देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल, भूपिंदरसिंह हूडा, चौताला इ. जाट असलेले मुख्यमंत्री हरयानाला मिळाले. अचानक जाट नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी हे आंदोलन असावे का? न्यायालयाने यापूर्वी आंध्र प्रदेशातील मुस्लिम आरक्षण, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण, उत्तरेतील जाट आरक्षण इ. राजकीय निर्णय रद्द केले आहेत. तरीसुद्धा पुन्हापुन्हा तोच खेळ करून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, अशांतता पसरविणे इ. करणे सुरू आहे.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 20:36
http://indianexpress.com/article/india/india-news-india/jat-reservation-agitation-haryana-live-updates-rohtak/ कोणत्याही जातीने राखीव जागा मागितल्या की तसे करणे हे कायदेशीर व घटनात्मकरित्या अशक्य आहे हे माहित असूनसुद्धा कोणताही पक्ष त्याला विरोध करू शकत नाही. जर एखाद्या पक्षाने एखाद्या विशिष्ट जातीला राखीव जागा द्यायला विरोध केला तर ती राजकीय आत्महत्या ठरते. त्यामुळेच राखीव जागांचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची पूर्ण जाणीव असतानासुद्धा राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता तोडगा काढला जातो. यथावकाश कोण तरी न्यायालयात जाऊन तो निर्णय रद्द करून आणतो. राजकीय फायद्यासाठी हा खेळ पुन्हापुन्हा खेळला जातो व त्यात अगदी ठरलेल्या चाली होऊन खेळाचा शेवट नेहमीच न्यायालयात होऊन खेळ संपतो. कालांतराने हा खेळ पुन्हा सुरू होतो व अपेक्षित शेवट होऊनच खेळ संपतो. आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार सर्व राजकीय पक्ष बंद करतील तो सुदिन.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Sun, 02/21/2016 - 20:49
आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार सर्व राजकीय पक्ष बंद करतील तो सुदिन. >> ह्या सर्व मध्ये भाजप आहे ना?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 21:06
भाजप एकंदरीत प्रतिक्रियावादी पक्ष आहे. भाजप यात प्रतिक्रिया मोड मध्ये असतो. म्हणजे मुस्लिमांना राखीव जागा द्यायचा प्रयत्न केला तर भाजप त्याला विरोध करतो. एम एफ हुसेन सारख्यांनी हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह चित्रे काढल्यावर भाजप त्याला विरोध करतो. परंतु भाजपच्या विरोधामुळे, भाजपचे विरोधक मूळ प्रश्न आपोआपच हिंदू वि. मुस्लिम असा करून टाकतात व त्यातूनच अशांतता माजते . वास्तविक भाजपचा फक्त एम एफ हुसेनच्या आक्षेपार्ह चित्रांना विरोध होता. परंतु असे चित्र रंगविले गेले की भाजप हा अभिव्यक्ती, कलाकाराचे स्वातंत्र्य इ. च्या ठाम विरोधात आहे. धर्माच्या आधारावर सवलती देण्याला भाजपचा विरोध आहे. परंतु हा विरोध फक्त सवलती देण्याला असला तरी भाजप हा त्या धर्माच्या संपूर्ण विरोधात आहे अशी हूल उठवून वातावरण तापविले जाते व त्यातून समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार आपोआपच सुरू होतात. त्यामुळे रूढार्थाने भाजप यात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 02/22/2016 - 12:45
बघा बरं गुरुजी. आता ह्या विषयावर मी धागा काढवे, तुम्ही तिथे चर्चेला याल अशी अपेक्षा करतो. त्याआधी हे फक्त प्रतिक्रियावादी म्हणजे काय त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगा.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 12:52
प्रतिक्रियावादी म्हणजे काय हे आधीच्या प्रतिसादात ३-४ उदाहरणे देऊन लिहिले आहे. तुम्ही धागा काढा, तिथे सविस्तर लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 19:07
प्रतिक्रियावादीचे उदाहरण ... बाबराने १४ व्या शतकात बांधलेली मशीद भाजपाप्रेमीनी २१ व्या शतकात पाडणे. बरोबर ना गुरुजी ?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी Sun, 02/21/2016 - 23:57
फडणवीस यांनी आज मराठा समाजाला २५% पर्यंत देण्याचा आश्वासन दिलाय. राजनाथ सिंगांनी सुद्धा आरक्षण देणार असे कबूल केले आहे भाजपा नेत्यांची भूमिका काय आहे? आरक्षण शक्य नाही तर खोटी आश्वासन का ?

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 12:41
जाट, मराठा, पटेल इ. जातींना आरक्षण देता येणे शक्य नाही हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. आरक्षण मागणार्‍यांनासुद्धा ते माहिती आहे. आरक्षण आंदोलन हे एक राजकीय आंदोलन आहे व त्यावर राजकीय तोडगा हेच उत्तर आहे. आरक्षणाचे निमित्त करून स्वतःचे महत्त्व वाढविणे व सत्ताधारी पक्षाला पेचात पकडणे या राजकीय खेळाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे व आंदोलन थंड करणे हेच योग्य राजकीय उत्तर आहे. आपण आरक्षण देऊ शकणार नाही हे सत्ताधारी पक्षाला पक्के माहित असते व सत्ताधारी पक्षाला आरक्षण देता येणे शक्य नाही हे आरक्षण मागणार्‍यांना पक्के माहित असते. हा एक राजकीय खेळ असल्याने त्यावर उत्तर हे राजकीयच असते.

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Mon, 02/22/2016 - 12:48
मुनिवर आताच झालेल्या बिहारच्या निवडणुका पूर्वी रा स्व संघाचे श्री मोहन भागवत इतर मागासवर्गीयांच्या राखीव जागांचा पुनर्विचार करायला पाहिजे म्हणाले तर त्यांच्या वर आणि सगळ्या भाजप नेत्यांवर डावे, हिरवे. निळे, आडवे, तिडवे असे समस्त लोक मध्माशांसारखे तुटून पडले आणि बिह्हार मधील भाजपच्या पराभवाला ते एक कारण आहे असे म्हणतात. असे असताना कोणता पक्ष साधन शुचीतेसाठी आत्महत्या करेल? मुळात हरयाणात "जाट आरक्षण" आणि महाराष्ट्रात "मराठा आरक्षण" हे कॉंग्रेसने आपल्या मावळत्या काळात न्यायालयाकडून मान्यता मिळणार नाही हे स्पष्ट दिसत असूनहि "मतांवर डोळा" ठेवूनच दिले होते. टी एन सेशन स्पष्टपणे म्हणाले होते कि एकदा तुम्ही आरक्षण दिले कि ते काढून घेणे तुमच्या हयातीत शक्य होणार नाही. भाजपने "उगाच वास्तववादी" होऊन आत्महत्या करावी अशी आपली अपेक्षा आहे का? राजकारणात करावी लागणारी हि स्पष्ट तडजोड आहे.