मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'ती' कोमातून बाहेर आली

वेल्लाभट · · काथ्याकूट
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास. दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा. पोलिसांनी स्कीचेस वगैरे जारी केली, असं सगळं झालं. जरी स्वप्नाली यातून काही भयानक न होता बचावली असली, तरी दिल्ली, मग शक्ती मिल पासून प्रकाशझोतात येऊ लागलेल्या अशा अनेक घटनांपेक्षा ही घटना कमी भयानक आहे असं नक्कीच नाही. यामागची कारणं, समाजाची विचारधारा, हे कधी थांबणार वगैरे प्रश्न चायनल वाल्यांवर सोडायचे म्हटले, तरी याविरुद्ध सामान्य; माफ करा, असामान्य जनता (म्हणजे सारासार विचार करणारी, योग्यायोग्य भेद जाणणारी, सुशिक्षित, सुविचारी, जनता; जी असामान्यच झालेली आहे) कधी एकत्र येऊ शकेल का? रिक्षावाल्यांवर कडक बहिष्कार, किंवा, एखाद दिवस कुणी कामालाच न जाणे, मुलांना शाळेतच न पाठवणे, या, अशा किंवा याहून अधिक योग्य मार्गांनी लोकं कधीतरी उठाव करतील का? आमची मुंबई आम्हाला सुरक्षितच रहायला हवी, तिची दिल्ली व्हायला नको, म्हणून कधी आग पेटेल का? की समाज सतत कोमातच रहाणार? हे प्रश्न या क्षणी त्रास देतायत.

वाचने 9063 वाचनखूण प्रतिक्रिया 21

In reply to by आशु जोग

शिद 22/08/2014 - 17:57
मला देखील तसंच वाटलं. असो. हि मुलगी कोमातून बाहेर आली हे एक बरं झालं. आजच्या म.टा. मध्ये आलेली हिच बातमी : स्वप्नाली कोमातून बाहेर

रेवती 22/08/2014 - 20:30
अवघड आहे जगणं! मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी डोकं उठलय. एक मुलगी म्हणून जलमल्याबरोब्बर इतक्या काळज्या, चिंता त्या जिवाला चिकटतात की पोखरूनच सोडतात. ही मुलगी बरी झाली ते एक चांगलं झालं.

भिंगरी 22/08/2014 - 23:10
आताच काही दिवसांपूर्वी आमच्या इथेही नवविवाहितेवर नवऱ्याच्या देखत काही जणांनी बलात्कार केला. आज त्या बाईला बसताही येत नाही अशी परिस्थिती आहे. पकडले गेले ३ पण अत्याचार करणारे जास्त होते. घराचे पत्रे काढून आत शिरण्याची हिम्मत होते कशी? आवाज कसा होत नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. तसेच कापुरबावडी नाक्यावर नेहमीचे रिक्षावाले असतात. एखादा नवीन आला तरी इतर रीक्षावाल्यानंचे लक्ष असतेच आणि आमचा नेहमीचा अनुभव आहे कि ज्याच्या रिक्षात एखादी तरुण मुलगी बसली की इतर रिक्षावाल्यांची नजर असतेच असते. त्यामुळे 'त्या' रिक्षावाल्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते असे वाटत नाही.

स्वप्नाली लाड हिची स्मृती, दुर्दैवाने, पुसली गेली आहे असे बातम्यांमध्ये पाहिले. अशा नराधम रिक्षा चालकास चौकात फाशी दिले पाहिजे.

भिंगरी 23/08/2014 - 11:50
हा विषयच असा आहे कि यावर बोलू तेव्हडे कमीच,पण उपाय मात्र काय? यावर निश्चित उत्तर नाही. मुळात स्त्री हि उपभोग्य वस्तू आहे हि संकल्पना पूर्वापार रुजलेली आहे.आणि आता आपण तिचे समूळ उच्चाटन करू पाहत आहोत. यात यश किती मिळाले हा भाग निराळा,पण दिवसेंदिवस बलात्काराच्या बातम्या फारच ऐकू येऊ लागल्या. पण खरे पाहता स्त्रियांवरील अत्याचार आत्ताच वाढले आहेत का? की आत्ता प्रसिद्धी माध्यम,तसेच न घाबरता पुढे येउन अत्याचाराला वाचा फोडण्याची हिम्मत यामुळे या गोष्टी जास्त वाटतात? अगदी पूर्वी पासूनच स्त्रियांवर अत्याचार होत होते,लहान मुलींवरही होत होते,पण अब्रूचे खोबरे होऊ नये म्हणून या गोष्टी लपवल्या जात होत्या. मात्र एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की या आधी मला वाटायचे सहसा हे अत्याचार रात्री बेरात्री एकट्या, मित्राबरोबर फिरणाऱ्या मुलींवर,एकांतात बसून प्रणय करणाऱ्या जोडप्यावर,किंवा मादक उत्तेजित करणारे कपडे घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलेवर होतात.पण आता तर ६ महिन्याच्या छकुली पासून ६० वर्षाच्या आजीवरही होतात. अशा गोष्टींवर सरकार काय उपाय करू शकते?यावर काथ्याकुट करण्यापेक्षा 'आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा,स्त्रीचा आदर करायला शिकवा' हा असा मार्ग काढला आहे. हा उपाय चांगलाच आहे पण आपण पाहतो अशा घटनांमधले आरोपी एकतर श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यातले असतात किंवा स्पष्टच बोलायचे झाले तर ठराविक जाती समूहाचे असतात.(मला यात जातीयवाद आणायचा नाही याची कृपया नोंद घ्यावी पण आरोपींची नावेच ही गोष्ट स्पष्ट करतात.) संस्कार म्हणजे काय?या गोष्टीशी सूतराम संबंध नसल्यासारखे यांचे वागणे असते. एकीकडे गरिबी आणि जागेची कमी त्याच बरोबर वासनेचा आगडोंब,व्यसन ,यामुळे नको त्या वयात नको त्या गोष्टी मुलांना पाहायला मिळतात, तर एकीकडे भरपूर पैसा,प्रत्येक मुलाला स्वतंत्र रूम,उपभोगाची नवनवीन साधने,त्यांच्यावर नसलेला अंकुश या साऱ्याचा परिपाक म्हणजे या घटना असेही असू शकते. बाकी इतरही घटक याला जबाबदार आहेतच. चित्रपटातील सवंग गाणी,नाच त्यातील कपडे आणि कामुक हावभाव. खरंच सांगा आपण सहकुटुंब हे पाहू शकतो का? पैश्यासाठी व प्रसिद्धीसाठी शरीराचे प्रदर्शन करून समाज बिघडवण्याचे काम करणाऱ्या या अभिनेत्रीन्पेक्षा मला नाईलाज म्हणून शरीरविक्रय करणाऱ्या महिलाच श्रेष्ठ वाटतात (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, कृपया यावर कुणीही वाद घालू नये.)

In reply to by भिंगरी

नाव आडनाव 23/08/2014 - 13:34
महाराष्ट्रात एका समाजातील काही आडनावं सोडली तर बाकीची बरीचशी आडनावं वेगवेगळ्या समाजात कॉमन आहेत आणि फक्त आडनाव वाचून मला नाही वाटत कुणाच्या जातीचा अंदाज येऊ शकतो. पुण्यात एकाच आडनावाच्या दोन बर्यापैकी वय झालेल्या माणसांनी थोड्या फरकाने अशीच कामं केल्याच्या बातम्या मी वाचलेल्या आहेत, पण मला या दोन गोष्टीवरून त्या समाजातल्या (जर तुमच्या पद्धतीप्रमाणे जायचं झाला तर) लोकांविषयी मत बनवावं असा वाटलं नाही. त्याच वेळी हिंजेवाडीतही एक घटना झाली होती आणि त्यातल्या माणसाचं आडनाव वेगळं होतं, म्हणून त्याचा गुन्हा कमी होतो का? तो ड्रायवर माझ्या समाजाचा असेल / तुमच्या समाजाचा असेल तरीही त्याचा गुन्हा तोच राहतो. यात माणसाची वृत्ती चुकीची आहे जात नाही. जातीयवाद करायचा नाही असा तुम्ही म्हणताय आणि त्याच वेळेला बलात्कार मात्र "या" एका जातीचे लोक करतात असं तुमचा म्हणणं आहे हे थोडं विसंगत वाटतंय. तुम्ही काय लिहिताय यावर माझा काही कंट्रोल नाही आणि तसा असण्याची माझी इच्छाही नाही. फक्त मिसळपाव पब्लिक फोरम आहे आणि मराठी वाचकांमध्ये प्रसिद्ध आहे, इथून काही चुकीचा संदेश जात नाही एव्हढा बघा. अर्थात ही विनंती आहे सल्ला नाही.

भिंगरी 23/08/2014 - 14:06
माझे म्हणणे असे नाही कि ठराविक जातीतील लोकच अत्याचार करतात,पण जास्तीत जास्त नावे पहिली तर माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल. तरीही माझ्याकडून काही चुकीचा संदेश गेला असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!

चैदजा 23/08/2014 - 15:25
यात काही तरुणांवर आरोप ठेवले आहेत/होते, त्यांचे म्हणणे आहे, ते तिला मदत करत होते. त्यांच्या म्हण्ण्यात काही प्रमाणात तथ्य असावे. काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीच्या एका सिनियर सिटीझनने, एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली, तर त्यांना व मदत करण्यार्‍या ईतर २ जणांवर कापुरबावडी पोलिसांनी आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त व्यक्ती च्या जबाबांमुळे ते वाचले.

नाव आडनाव 23/08/2014 - 16:35
"वन स्मॉल इन्सिडेण्ट ऑफ रेप इन डेल्ही", "बलात्काराचे आरोप करणं फ्याशन झाली आहे", "लडके गलती करते है"...... जनतेने कितीही मोर्चे काढले, फेसबुक वर निषेध नोंदवला, टी व्ही वर चर्चा झाल्या तरी या गुन्हेगारांना त्याने काय फरक पडतो. काहीही नाही. जोपर्यंत त्यांना हे असं बोलणारे राजकीय "पालक" आहेत, तोपर्यंत त्यांना काही भीती नाही. सरकार बदललं कि यांचे पालक बदलतात आणि हेच गुंड प्रत्येक पक्षाला पाहिजेच असतात. मी विशालनगर(पिंपळे निलख) ला राहायला येण्या आधीची एक गोष्ट आइकलि - अंदाजे ३ वर्षाआधीची आहे. मी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जातो त्याच स्टोप वर एक आजी त्यांच्या नातीला सोडण्यासाठी येतात. त्यांनी माझ्या बायकोला सांगितला कि त्यांच्या कडे घर कामाला ८ वि / ९ वि त शिकत असलेली एक मुलगी होती. तिच्या घरी फक्त मोठी बहीण होती आई वडील नव्हते. एका झोपडपट्टी सारख्या घरात या दोघी बहिणी राहायच्या. एकदा ही मुलगी काम करून रात्री ८ वाजता यांच्या घरातून बाहेर पडली आणि १० च्या आसपास तिची मोठी बहीण तिला विचारायला आली. नंतर रात्री उशिरा त्या आजींच्या घराची बेल वाजली. दोन मानसं त्या मुलीला सोडून पळून गेले. मुलीला दारू पाजली होती आणि ती जे सांगत होती त्यावरून त्यांना कळल कि तिच्यावर बलात्कार झाला होता. ती दारूच्या नशेत होती, तरी तिला विचारल तर तिने सांगितला १२ - १३ लोक होते . आजींच्या घरचे सगळे घाबरले. त्यांनी त्या मुलीला तिच्या बहिणी कडे सोडल. दुसऱ्या दिवशी कळलं दोघी बहिणी पुणे सोडून गेल्या होत्या. मला हे ऐकल्यानंतर बरेच दिवस डोक्यात हीच गोष्ट होती.मोठी बहीण (अंदाजे १५ - १६ वर्षाची असेल) किती घाबरली असेल, आई बाप नसलेली ती लहान बहिणीला घेऊन कुठे गेली असेल? अशी सुरक्षित जागा / शहर कोणतं आहे?आणि असलं तरी या बिन आई बापांच्या पोरीना कुणी तिथे येऊ देईल?

देव मासा 07/09/2014 - 13:29
मटाच्या बातमीनुसार स्वप्नालीला त्या दिवशी काय घडले काहीच आठवत नाही परंतु तिने आपल्या मोबईल फोनचा पासवर्ड बरोबर टाकला म्हणे . ….