मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे प्रेरणा साम्य आणि फरक कोणते ?

माहितगार · · काथ्याकूट
आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्‍याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे. १) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे. २) सधारणतः १०० च्यावर प्रतिसाद गेलेल्या सर्वच मराठी संकेतस्थळांवरील धाग्यांचा अभ्यास या निमीत्ताने सुरु होऊ शकल्यास हवा आहे ३) फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे यावर (पडीक) मराठी लोकांच्या वाचक आणि लेखक म्हणून प्रेरणांतील साम्य आणि फरक कोणते ? ४) फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे यातील आशय व्यवस्थापन सॉफ्टवेर (कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेर) मधील ठळक साम्य आणि फरक कोणते जाणवतात त्याचा तुमच्या फेसबुक अथवा संवादक्षम मराठी संकेतस्थळं यातील एकाच्या निवडीवर नेमका काही परिणाम होतो का ? * विषयांतरे टाळण्याची आग्रहाची विनंती. आपले लेखन कदाचित मराठी विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकते म्हणून आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. प्रतिसादांसाठी आणि विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद

वाचने 10022 वाचनखूण प्रतिक्रिया 16

लंबूटांग Fri, 08/15/2014 - 21:22
फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे (म्हणजे मिपा, ऐसी, माबो इ.इ. फोरम्स सदृश स्थळे असे समजतो आहे) ह्या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साम्य असे काहीच नाही.

कवितानागेश Fri, 08/15/2014 - 23:28
फेसबुक फोटो शेअर करण्यापलिकडे अजून कशासाठी लोक वापरतात का? मराठी संकेतस्थळांवर 'संवाद' जास्त सोयीचा होतो असंवाटतय. शिवाय अनेक साहित्यप्रेमी बर्‍याच ठिकाणी फक्त वाचनमात्रही असतात. त्यांना वाचनाची भूक भागवायला फेसबुकचा उपयोग नाही.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार Sat, 08/16/2014 - 10:34
विसंवादी भूमीकांची पाठराखण ही मंत्रचळासाठी पडीक रहाण्या मागची प्रेरणा असण्याची शक्यता वाटते का ? प्रतिसादांसाठी धन्यवाद .

चौकटराजा Sat, 08/16/2014 - 05:49
फेसबुक वर फोटो टाकण्याखेरीज बरेच काही होते. पण दीर्घ लेखन होत नाही.एक प्रकारचे गप्पा टप्पा व्यासपीठ आहे ते. मला फेसबुक पेक्षा आजही ऑर्कुट आवडते. ( गेले बिच्चारे ) कारण त्याचा ढाचा अधिक मोड्यूलर होता. तिथे मी काही लेख लिहिलेले आहेत.पण फेसबुकवर असे सलग मोठे लिखाण केलेले दिसत नाही. तिथे प्रतिसादाचाच भाग जास्त असतो.बाकी मराठीत मी फक्त मिपावरच आहे. मिपात माझे स्पष्ट निरिक्षण असे आहे की.मिपावर विचारगर्भ लोकांपेक्षा खादाड लोक जास्त आहेत. सबब पाककृति चे धागे मस्त चालतात. मुंबई विरूद पुणे असे धागे असतात ज्यातून हाती काहीही पडत नाही. तांत्रिक धाग्याना त्रीटक प्रतिसाद असतात. त्यांची ( प्रतिसादांची) गुणवत्ता सो सो च असते.आता रहाता राहिले भटकंती चे धागे . यात आपली नवी माहिती टाकणारे प्रतिसाद नसतातच तर मस्त वर्णन ! आवडते ! येउ द्यात ! असेच प्रतिसाद जास्त असतात.राजकारणावर तीच तीच माणसे प्रतिसाद देताना दिसतात.

फेसबुकावर अनेक चांगले समुह आहेत जे निरनिराळ्या विषयाशी बांधलेले आहेत..पाककृति,,सिनेमा..गप्पा..जात समुह..विवाह एक ना अनेक...फेसबुकाला तोड नाहि.. अर्थात तुम्हि त्यचा कसा वापर करायाचा ते ठरवा.. स्वताची भिंत असते त्यावर तुम्हि व्यक्त होवु शकता..नातेवाईक मित्र याच्या संपर्कात राहु शकता अनेक गेट टुगेदर होतात..राजकारण धर्म समाज यावर इतरांची मते कळतात.. अनेक फायदे आहेत..

कंजूस Sat, 08/16/2014 - 11:53
चौकटराजा ,अविनाश कुलकर्णी यांचे पूर्ण पटतंय . बाकी भटकंतीच्या धाग्यांवर गडकिल्ले चढणारे सर्वजण नाहीत अथवा आज आल्प्स उद्या अलमोरा इतके फिरणारे नाहीत त्यामुळे आणखी येउद्या यापलिकडे काय प्रतिक्रिया लिहिणार ?पर्यटनविषयक वाचणाऱ्यांसाठी अपुर्वाईच . संस्थळांबद्दल बोलायचे तर मराठी स्थळांवरचे विषय ,प्रतिक्रिया ,इतरांशी संपर्क आणि 'मी' असा प्राधान्यक्रम आहे .फेसबुकवर हा क्रम उलट आहे .किंबहुना पोस्टला पंधरा दिवसात कोणी लाईक केले नाहीतर मित्रमैत्रिंणींना आपल्याबद्दल आवड (इंटरेस्ट) आटली असे वाटून दु:खी होतात .

सुधीर Sat, 08/16/2014 - 17:32
फेसबुकावरील मित्र-मंडळींशी अधी कुठल्या ना कुठल्या मार्गाने संपर्क झालेला असतो. मिपावर (वा मराठी संस्थळावर) नव्याने ओळखी होतात. फेसबुकमुळे संपर्क तुटलेल्या मंडळींच्या आयुष्यात काय चालू आहे एवढे मात्र कळते. एरव्ही खास फोन करून अपडेटस दिले-घेतले जाण्याची शक्यता कमीच असते. बहुतांश "अ‍ॅक्टीव्ह" मंडळी खाजगी वा व्हायरल फोटोज, जोक्स, व्हिडीओज, छोटेखानी (बहुतेक वेळा वाचनमूल्य नसलेले) लेख लाइक्स वा शेअर करतात. तरीही माझ्या संपर्कातली बरीच मंडळी फेसबुकावर "सायलेंट" असतात, "लाईफ इव्हेंट" सारख्या घटनांवर लाईक करताना दिसतात. कदाचित मागे पालघर येथील घटनेमुळे समुहभावना दुखावणार्‍या पोस्टच काय पण राजकारण वा इतर सामाजिक विषय यावर माझ्या संपर्कातली मित्रमंडळी मौन धारण करून राहतात. त्याचबरोबर हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या मित्रांकडून संवेदनशील प्रश्नांवर एकदम टोकाच्या भुमिका घेतलेल्या पोस्टना लाईक्स आणि शेअर जातात. मिपावर मात्र विषयाच्या वेगवेगळ्या बाजू असतील काथ्याकुट मध्ये खडाजंगी होताना दिसते. परिचय (आयडेंटीटी) लपविल्यामुळे लोक नाजूक विषयावर अभिव्यक्त होताना कचरताना दिसत नाही. अनुभवातून आलेले काही प्रतिसाद/धागे नक्कीच वाचनीय असतात. अर्थात दोन्ही ठिकाणी, कुणी किती वेळ घालवावा हे वैयक्तिक आहे. चार दिवस गावी होतो तेव्हा संपर्क कक्षेच्या बाहेर होतो. परत आल्यावर फेसबुकची "न्यूज फिड" मारुतिच्या शेपटा सारखी लांबली. मग अर्धवट सोडून दिली. असाच अनुभव कधी कधी मिपा बाबतही येतो (पण फार दिवस खेप टाकायला जमलं नाही तर).

एस Sat, 08/16/2014 - 23:36
१) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.
याने साध्य काय होणार आहे? मराठी माणसांना चर्चा करायला आवडते, पण इतका किस कशासाठी आणि विकीपीडियाच्या सर्वरवर अजून काही निरर्थक ज्ञानाचा ताण का?

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार Mon, 08/18/2014 - 08:29
हे भाषांतर बरोबर आहे का शब्दशः कदाचित बरोबर नसावे, इतर कुणी वापरलेले पाहून मी ते तसेच वापरले असावे एवढेच.