Skip to main content

काही प्रश्न सतावणारे...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 07/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१. असे वाचले आहे कि औरंगजेबाच्या काळात (किंवा त्या आधीही कदाचित)भारत युरोप ह्यांच्यात व्यापार होता ..म्हणजे भारतीय व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात युरोपात ये जा करत... हे खरंय? असेल तर कसा कोणता ? २. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ? २.१ भारतात आलेला पहिला पाश्चात्य कोण? तो व्यापाराकार्तच आला कि अजून काही.. ३. a-> सावरकरांच्या इंग्लंड मधील अटके वेळी , ब-> मीना प्रभू ह्यांचे पती सुधाकर जेव्हा इंग्लंड ला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांच्या प्रवास युरोपच्या मुख्यभूमिवरून लंडनपर्यंत ट्रेन नि झाला असे उल्लेख आहेत..हा नक्की काय प्रकार आहे.? ४. वास्को दि गामा किंवा जे कुणी तत्सम प्रवासी अगदी पहिल्यांदा आपल्या भूमीवर उतरले तेव्हा त्यांनी स्थानिकांशी संवाद कसा साधला? कोणती भाषा? समोरच्याला आपली आणि आपल्याला त्याची भाषा अजिब्बात येत नसतांना एकमेकांची भाषा त्याकाळी कसे शिकले असतील? ५. शिवबांच्या राज्याभिषेक प्रसंगी किंवा त्याकाळी अनेक परभाषिक परदेशी इथे वावरत ..ह्यांची आपापसात संवादांची भाषा कोणती होती? ६. आपण आपली मातृभाषा (किंवा कोणतीही भाषा अनौपचारिक रित्या) शिकतांना बोलणे, वाचणे, लिहिणे आणि मग व्याकरण असे असतांना, वर्गात नवीन भाषा शिकतांना/शिकवतांना हा क्रम उलट सुलट का होतो?

वाचने 11448
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

४. वास्को दि गामा किंवा जे कुणी तत्सम प्रवासी अगदी पहिल्यांदा आपल्या भूमीवर उतरले तेव्हा त्यांनी स्थानिकांशी संवाद कसा साधला? कोणती भाषा? समोरच्याला आपली आणि आपल्याला त्याची भाषा अजिब्बात येत नसतांना एकमेकांची भाषा त्याकाळी कसे शिकले असतील? सुरूवातीला साईन लँग्वेज आणि नंतर हळूहळू जनमताधिक्य / प्रमुखाच्या आवडीच्या भाषेकडे वाटचाल. ५. शिवबांच्या राज्याभिषेक प्रसंगी किंवा त्याकाळी अनेक परभाषिक परदेशी इथे वावरत ..ह्यांची आपापसात संवादांची भाषा कोणती होती? आपापलीच. पण समजण्यासाठी दुभाषे असावेत. ६. आपण आपली मातृभाषा (किंवा कोणतीही भाषा अनौपचारिक रित्या) शिकतांना बोलणे, वाचणे, लिहिणे आणि मग व्याकरण असे असतांना, वर्गात नवीन भाषा शिकतांना/शिकवतांना हा क्रम उलट सुलट का होतो? थोडा बदल. भाषा शिकताना सुरूवात ऐकण्यापासून होते. ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे असा क्रम असावा. वर्गातही थोड्याफार फरकाने हाच क्रम असतो मात्र भर लिखाणावर असतो. बहुदा आठ तास ऐकून / बोलून किती लक्षात राहणार किंवा एकदा लिहिणे म्हणजे तीनदा वाचणे असे काहीतरी लॉजीक असावे.

In reply to by मोदक

आपापलीच. पण समजण्यासाठी दुभाषे असावेत. दुभाषे निर्माण कसे झाले... थोडा बदल. भाषा शिकताना सुरूवात ऐकण्यापासून होते. ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे असा क्रम असावा मान्य पण...मूळ प्रश्न तसाच!

In reply to by अत्रन्गि पाउस

दुभाषे निर्माण कसे झाले.. गूड क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर श्री बॅटमॅन देतील. ;) थोडा बदल. भाषा शिकताना सुरूवात ऐकण्यापासून होते. ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे असा क्रम असावा मान्य पण...मूळ प्रश्न तसाच! उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. """""वर्गातही थोड्याफार फरकाने हाच क्रम असतो मात्र भर लिखाणावर असतो. बहुदा आठ तास ऐकून / बोलून किती लक्षात राहणार किंवा एकदा लिहिणे म्हणजे तीनदा वाचणे असे काहीतरी लॉजीक असावे."""""

२. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ?
माहिती नाही. पण इजिप्तमध्ये इ.स. पहिल्या शतकातील एक मातीचे भांडे सापडलेय ज्यावर तमिऴ अक्षरे कोरलेली आहेत. अल्क्झांड्रिया इथे अनेक भारतीयांची वस्ती होती तेव्हा. पण प्रॉपर युरोपियन देश पाहिजे असतील तर ग्रीस-रोममध्ये इजिप्तहून गेलेले असणे अगदी शक्य आहे. पण इंग्लंडचे माहिती नाही. सोळावे ते अठरावे शतक या कालावधीत रशियात अनेक भारतीय व्यापारी होते. इंडियन्स इन १८थ सेंच्युरी रशिया नामक पुस्तकच उपलब्ध आहे. इराण, इराक, अन अरब देश इथे तर भारतीय व्यापार्‍यांचा मोठा अड्डा होता कैक ठिकाणी. शिवाय एका उल्लेखानुसार वाट चुकून काही इंडियन्स इ.स.पू पहिल्या शतकात जर्मनीत गेले होते.
२.१ भारतात आलेला पहिला पाश्चात्य कोण? तो व्यापाराकार्तच आला कि अजून काही..
पाश्चात्य म्हणजे नक्की कोण? ग्रीक-रोमन लोक सातवाहनकाळापासून भारताच्या पश्चिम किनार्‍यावर येतजात होते. त्याच्या आधी दोनेक हजार वर्षे हडप्पा संस्कृतीतल्या लोकांचा इजिप्तशी व्यापार होता. हे ब्रिटिश इ. लोक मात्र गेल्या चारपाचशे वर्षांतच आलेले असावेत. अन गेल्या दोनशे वर्षांत विलायतेस गेलेल्या अगदी पहिल्या गृहस्थांपैकी म्हणजे दादाभाई नौरोजी, सातारकर छत्रपतींचे वकील रंगो बापूजी (१८५९) यांची नावे घ्यावी लागतील.

In reply to by बॅटमॅन

सोळावे ते अठरावे शतक या कालावधीत रशियात अनेक भारतीय व्यापारी होते.
फार कशाला, एका डच पत्राप्रमाणे अगदी आपल्या संभाजी राजांचे एक जहाज पोर्टो नोव्हो (पाँडीचेरीजवळचे एक बंदर) येथून १६८१ च्या ऑक्टोबर महिन्यात मलाक्काला कापड घेऊन गेले होते. तेथे जहाजातील सर्व माल विकण्यात आला. कोरोमँडलचा डच गव्हर्नर पिट याच्या विनंतीमुळे या जहाजाच्या नावाद्यास सर्व प्रकारचे साहाय्य देण्यात आले.

In reply to by प्रचेतस

व्वा! हे रोचक आहे. मलाक्काचा उल्लेख ऐकला होता पण संदर्भ विसरलो होतो. शिवाजीराजांची कैक जहाजे सौदी अरेबिया, दुबई, एडन, इ. ठिकाणी जायची. प्रतिवर्षी आठदहा जहाजे आपल्या बंदरांतून पाठवायचे. सौदीच्या किनार्‍यावर त्यांची जहाजे वादळात भरकटून आल्याचा उल्लेख ब्रिटिश साधनांत आहे, तसेच मस्कतच्या इमामाशी त्यांनी संधान बांधून पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख पोर्तुगीज साधनांत आहे.

In reply to by बॅटमॅन

म्हणजे अश्या पद्धतीने व्यापार चालला होता?...म्हणजे एक सेट बिझिनेस मोडेल तेव्हा अस्तित्वात असावे... आता पुन्हा असे के हे पहिल्यांदा कुणी कसे केले असेल? काय आहे कि आपल्या डॉक्युमेंटेशन च्या आळसामुळे कदाचित अचूक उत्तर मिळणार नही पण असं समजायला हरकत नही कि परदेशी (किमान अरबस्तान/युरोप तरी)जायचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा त्याच्या बर्याच आधी झालं असावा आणि तो यशस्वी पण झालं असावा.... आणि नुसता कुणी निघाला पोहोचला आणि तिथेच राहिला अस नही तर ये-जा सुरु झाली.. (चुकतोय का कुठे तर्कात मी ?)

In reply to by अत्रन्गि पाउस

पहिल्यांदा कुणी केले असेल??? तर इसपू २००० सालापासून इराणच्या आखाताकडून जहाजे गुजरातपर्यंत येत होती. याला पुरावा सारगॉन नामक अक्कादियन राजाच्या तेव्हाच्या शिलालेखांत सापडतो. बाकी इजिप्तहून डैरेक्ट भारतीय व्यापार हा इ.स.पू. पहिल्या शतकापासून जास्त वाढला याचे कारण मौसमी वार्‍यांचा लागलेला शोध हे आहे. अगोदर व्हायचं कसं की ग्रीक-रोमन जहाजं इजिप्तहून तांबडा समुद्र अन मग येमेन ओमान असे करत एडनपर्यंत यायची. भारतीय जहाजे एडनपर्यंत यायची अन दोघांचा व्यापार तिथे व्हायचा. आता एडनपासून भारतीय किनारपट्टी लै लांब असल्याने ते अंतर डैरेक्ट समुद्रातून पार करणे धोक्याचे वाटायचे. त्यामुळे किनार्‍यालगत हळूहळू कुचकुचत यावे लागायचे. पण इसपू १०० च्या आसपास कुणी युडोक्सस नामक ग्रीकाने एका भारतीय खलाशाकडून तो मार्ग समजावून घेतल्यावर मग ग्रीक जहाजे भसाभस भारतापर्यंत येऊ लागली. त्यात परत मान्सून वार्‍यांच्या दिशेचा वापर करून भारताकडे कमीतकमी वेळात पोचण्याचा प्रकारही सुरू झाला. http://en.wikipedia.org/wiki/Eudoxus_of_Cyzicus

In reply to by बॅटमॅन

व्यापार तर कचकून चालायचाच. गौतमीपुत्र सातकर्णीचा मुलगा वाशिष्ठिपुत्र पुळुवामीने पाडलेले हे शिडाच्या जहाजाचे चिन्ह असलेले नाणे. (चित्र विकिपेडियावरून) a

In reply to by बॅटमॅन

तसेच मस्कतच्या इमामाशी त्यांनी संधान बांधून पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख पोर्तुगीज साधनांत आहे
. मस्कत मधुन पोर्तुगालवर प्रेशर ____/\____ आज महाराजांबद्दलचा आदर परत एकदा दुणावला आता परत एकदा रायगडावर जावुन चरणधुळ माथी लावुन घ्यावी म्हणतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

येस :) सौदीपर्यंत व्यापारी जहाजे पाठवणे आणि मस्कतला इमामाशी संधान बांधणे या गोष्टी लै जबर्‍या आहेत पण तुलनेने अज्ञात आहेत. वल्ली म्हणतो तसे संभाजीराजांनीही इंडोनेशियातील मलाक्का इथे जहाज पाठवले होते. ते वाचून शिवाजी-संभाजी पितापुत्रांबद्दलचा आदर अजून एक्स्पोनन्शिअली वाढतो.

'सत्याचे प्रयोग'मधे गांधी म्हणतात त्याप्रमाणे भारतीय व्यापारी बर्‍याच वर्षांपासून आफ्रीकेत होते. या लिंकवर काही माहिती मिळेल. या लोकांना गिरमिटे किंवा कुली म्हणत. गुलाम/कामगारांशी जे 'अ‍ॅग्रीमेंट' असायचे त्याचा अपभ्रंष होउन ते लोक गिरमिटे झाले. बाकी भारतीयांना (हिंदुंना) अटकेपार जायची बंदी नसती तर कदाचीत आज पिच्चर लैच बेस असते. बिच्चार्‍या गांधींना आणी स्वामी विवेकानंदांना त्रास झाला. :(

In reply to by यसवायजी

म्हणूनच मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद, सुरीनाम अशा वाट्टेल त्या कानाकोपर्‍यात भारतीय वंशाचे लोक सापडतात. या विषयावर अमिताव घोष यांची "आयबिस" कादंबर्‍यांची ट्रिलॉजी आहे. फार मस्त. हिंदूंना समुद्र पार करायची बंदी होती असं वाचल्यासारखं वाटतंय. तरीपण "जगायला" बाहेर पडलेले लोक कुठे कुठे गेलेच की.

In reply to by आदूबाळ

@ वाट्टेल त्या कानाकोपर्‍यात भारतीय वंशाचे लोक सापडतात. >> सहमत. मलेशीया हे नावसुद्धा तमीळ शब्दांवरुन आल्याचं ऐकलंय. @हिंदूंना समुद्र पार करायची बंदी होती असं वाचल्यासारखं वाटतंय >> समुद्र पार करायची बंदी होतीच, पण त्याचबरोबर एकंदरीत परदेश प्रवासाचीच बंदी. कुठेतरी वाचलंय की हिंदूंना बाहेरच्या धर्मांचं वारं लागू नये म्हणून असा डाव केला गेला.

In reply to by यसवायजी

बंदी असली तरी ती कधी पाळली गेल्याचे दिसत नाही. धर्मशास्त्रे काहीही सांगोत, शेवटी अर्थस्य पुरुषो दासः हेच खरे आहे.

In reply to by बॅटमॅन

हेच म्हणायला आलो होतो ... राजराजा चोळ आणि त्याची नेव्ही हे क्लासिकल एक्झॅम्प्ल आहे ! आय येम सुपर इम्प्रेस्ड बाय थिस किन्ग !

In reply to by प्रसाद गोडबोले

एकदम क्लासिक एक्झांपल आहे खरेच!!!! जबराट नेव्ही तेच्यायला नादच खुळा. बाकी चोळ-चालुक्य युद्धात हे चोळ सैन्य हाणामारी करताकरता कोल्हापूरला आल्याचा उल्लेखही मिळतो.

३. a-> सावरकरांच्या इंग्लंड मधील अटके वेळी , ब-> मीना प्रभू ह्यांचे पती सुधाकर जेव्हा इंग्लंड ला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांच्या प्रवास युरोपच्या मुख्यभूमिवरून लंडनपर्यंत ट्रेन नि झाला असे उल्लेख आहेत..हा नक्की काय प्रकार आहे.?
हा प्रकार असा होता: लंडन हे मोठं व्यापारी केंद्र होतं (आहे), पण ते "नैसर्गिक बंदर" नाही. पूर्व लंडनचा थोडकाच भाग समुद्राशी जोडला आहे. या गोद्यांमध्ये मालवहातुकीला प्राधान्य दिलं जाई, कारण प्रवाशांपेक्षा मालवहातूक किफायतशीर होती. पोर्ट्समथ, ब्रिस्टॉल, कार्डिफ असे काही पर्याय होते, पण ते जरा महागात पडत. स्वस्ताईचा, पण जास्त जिकीरीचा मार्ग म्हणजे फ्रान्समध्ये उतरणे (कुठे ते विसरलो) आणि लंडनचं रेल्वेचं तिकीट काढणे. मग एक फ्रेंच रेल्वे कंपनी पॅरिसपासून कॅलेपर्यंत सोडते. कॅलेपासून डोव्हरपर्यंत (इंग्लिश चॅनल पार करायला) फेरीबोट घ्यायची. डोव्हरपासून लंडन ब्रिटिश रेल्वे कंपनी. डोव्हर-कॅले अंतर फेरीबोट दोन तासात कापते, आणि दोन्ही बाजूला एकमेकांशी टायअप असलेल्या रेल्वे. म्हणून लोकभाषेत "मी लंडन-पॅरिस रेल्वे केली" असं सर्रास म्हणायचे. --- आजही स्वस्तातल्या लंडन-मेनलॅड युरोप बस कंपन्या हाच मार्ग वापरतात, कारण चॅनल टनेलला जबरदस्त टोल आहे. शक्यतोवर हा मार्ग वापरू नये, कारण गाड्या रात्रीच्या असतात, आणि दर दोन दोन तासांनी झोपेतून उठावं लागतं आणि झोपेचं खोबरं होतं. रेल्वे अर्थातच गुमान टनेलातून जात असावी.

In reply to by आदूबाळ

"डोव्हर-कॅले अंतर फेरीबोट दोन तासात कापते, आणि दोन्ही बाजूला एकमेकांशी टायअप असलेल्या रेल्वे. म्हणून लोकभाषेत "मी लंडन-पॅरिस रेल्वे केली" असं सर्रास म्हणायचे" हे फारच बरे झाले कळले...कधी कधी काही प्रश्न फारच छळत राहतात दातात अडकलेल्या सुपारी सारखी... फारच आभार हो आपले...धन्यवा....

मला सतावणारा एक प्रश्न.. निसर्गात प्रत्येक जीवाच्या अस्तित्वामागे काहीतरी कारण आहे. काहीतरी काम असल्याशिवाय तो जीव इतक्या उत्क्रांतीमधून जिवंत आहे.. तर केंबरे, चिलटे, माशा आणि डासांचे काय..? ते का तयार झाले असावेत..? गिधाडांसारखे मांसाची विल्हेवाट लावणारे म्हणावे तर तसेही काही वाटत नाहीये. की झुरळ, माशी, चिलट, केंबरे अशा उतरत्या क्रमाने यांचा र्‍हास होत आहे..?

In reply to by मोदक

मला कोंबडी ह्या जीवाबद्दल नेहेमी असेच वाटते कि जन्माला यायच्या आधी पासून (अंडे) ते जन्म झाल्यावर...माणसाचे (किंवा आणि कुणाचे) भक्ष्य ह्याव्यतिरिक्त काय प्रयोजन असावे ?

In reply to by अत्रन्गि पाउस

कोंबडी, मांजर, कुत्रा, शेळी, गाय, म्हैस हे प्राणी माणसाने शेती करण्यास सुरूवात केल्यानंतर उपयोगी + माणसाळणारे अशा गरजेतून पाळायला सुरूवात केली असावी. कोंबडी हा दिसायला ठीकठाक आणि तुलनेने कमी उपयुक्ततेचा असल्याने मानवाचे अन्न म्हणून सोय झाली असावी. (दिसायला ठीकठाक म्हणजे उंदरासारखा किळसवाणा नाही किंवा शेळीसारखा दुग्धोत्पादक नाही. असे काहीतरी) हा संपूर्णपणे माझा अंदाज आहे. चुकीचा असू शकतो.

In reply to by मोदक

क्या बात है मोदक...एकदम मनकी बाता बोला रे तू ! आजच एक केंबर नजरेस पडले होते,त्याला पाहुन टकुर्‍यात इचार आला,की सुइच्या अग्रापेक्षा थोडासा मोठा असलेला जीव,पण भगवंताने त्याच्याही पोटा-पाण्याची सोय करुन ठेवली आहे !त्याचे आकारमान पाहुन याचे आयुष्य किती दिवस असावे ? असा दुसरा विचार आला.मध्यंतरी मला वाटत इथ मिपावरच मला वाचल्या सारखं वाटतय की सध्या पॄथ्वीवर मनुष्य प्रजातीची संख्या अतोनात वाढली आहे, मग काही तरी जिवांच्या गुणोत्तरा बद्धल होत की कायस ! साला रोज सगळ्या जगात किती कोंबड्या मारल्या जातात याचा विचार केला असावा की नाही ते त्यांनाच ठावुक हो. कधी कधी असंही मनात प्रश्न मनात येतो... की विश्व निर्माण करुन्,ते नष्ट करुन परत निर्माण करण या मागे भगवंताचा काय विचार असावा ? त्याचा टाइमपास होत नसावा काय ? बरं उत्क्रांतीच म्हणावं तर मनुष्य जन्म हा सर्व श्रेष्ठ मानला गेला आहे,आहार,निद्रा, भय आणि मैथुन या इतर क्रिया तो करतोच पण अभ्यास करण्याचे बैद्धिक सामर्थ त्याला लाभल्याने तो कुठल्याही विषयावर अभ्यास करु शकतो,जर त्याने स्वतःचा अभ्यास केला तर मग आत्मज्ञान व ते झाल्यावर परमेश्वराचे ज्ञान देखील तो मिळवु शकतो.पण मग जर मग त्याला हे साध्य करणे शक्य आहे तर मायेचा प्रभाव कोणत्या कारणास्तव निर्माण झाला असेल ? आणि जर माया त्याला प्रभावित करण्यास समर्थ असेल तर असे किती जन्म त्या जीवाने धडपडीत घालावे ? नक्की या विश्वाचा उद्देश काय ? परत समोर केंबर नजरेस आला... ;)

In reply to by मदनबाण

हायजॅक! . . . . ते पाच-सात सेकंद विमानातले सगळे स्तब्ध. चेहर्‍यावर चिंता, धास्ती नि काळजी. काय हो णार नि कसं होणार बद्दल अत्यंत भीतीचं काहूर. नि तेवढ्यात तिकडून आवाज आला... 'हे जॉन! हाऊ आर यु?' ब्रेक संपला. चला. मूळ मुद्द्याकडं वळू या. ;)

In reply to by प्यारे१

चिलटाची एक जात असते. चिलटापेक्षाही लहान. चिरडूनही मारता येत नाही इतके लहान असते. पण सतत भुणभुण करत असते. आणखी उदाहरणे हवी असतील तर अंतर्जालावरचीच उदाहरणे समोर आणा. "अंगात नाही बळ आणि चिमटा घेवून पळ" अशा म्हणी सार्थ करणारी. केंबरेच ती! ;)

In reply to by मोदक

माझा पण एक प्रश्न आहे. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी काही काळाने मरते. ती मृता पेशी शरीरातून काढून टाकली जाते. तशीच मेंदूची पेशी पण काढून टाकली जात असणार. मग मेंदू आठवणी कशा काय साठवून ठेवत असेल. का तेथे पण रेप्लिकेशन होत असेल?

माझ्या मते हिंदू धर्मात परदेशगमनाचा पूर्वी मज्जाव असला तरी अनेक भारतीय राजांनी ज्यात हिंदू व मुस्लिम दोन्ही आले त्यांनी मुस्लिम किंवा बुद्ध जमातीच्या व्यक्तीस व्यापारी किंवा वकील म्हणून परदेशी का नाही पाठवले , मुघल दरबारात व शिवाजी महाराजांच्या कडे परदेशी वकील होते तर त्याचे वकील युरोपात का नव्हते. आणि त्यांनी त्यांचे व्यापारी युरोपात का नाही पाठवले , त्यावेळी कदाचित युरोप एवढा प्रगत नसावा ,पण जी लोक एवढ्या लांबून आपल्या देशात व्यापाराला येतात त्या लोकांची संस्कृती , देश कसा आहे हे जाणून घेणे कोणालाच कधी का वाटले नाही. युरोपातील वकिलांनी भारतातील घडामोडींचे सर्वांगाने वर्णन करून ते आपापल्या देशातील सरकारला कळवले. माहितीच्या हा डेटा इंग्रजांना भारतावर राज्य करण्यासाठी खूप उपयोगी पडला. भारतीय समाजजीवन , वर्ण व्यवस्था त्यांना कळली म्हणूनच फोडा आणि राज्य करा ह्या तत्त्वाचा त्यांना वापर करता आला ,

मला मुळात भाषा वेगळ्या का नि कशा झाल्या असाव्यात ह्याबद्दल प्रश्न आहे. अत्यंत वेगळे उच्चार, लिप्या, अर्थ, बोलण्याच्या पद्धती.... का? बाकी माझं मतः वेगळेपणा कृत्रिम दिसतो. निसर्गतः सगळीकडं बरंचसं साम्यच नजरेस येतं. हिरवी झाडं, निळे समुद्र, नि माणसातल्या मूळ प्रेरणा सगळीकडं सारख्याच दिसतात. खाणं, पिणं, कुटूंब, जीवनमान ह्या सगळ्यात तपशीलात फरक दिसतो. आईचं प्रेम, मुलांचा दंगा, कुतूहल, निरागसता, मोठ्यांचा डांबरटपणा, इच्छा, वासना, एखाद्या कृतीमागची प्रेरणा सारख्याच. त्वचेच्या रंगात बदल आहे, विचारांच्या प्रकटीकरणामध्ये बदल आहे, समाज जीवनामध्ये बदल आहे पण त्यामागच्या भावना नि प्रेरणा सारख्याच दिसतात, जाणवतात. वेगळेपणा बघायचा, वाढवायचा का साम्य बघायचं हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असावं.

In reply to by प्यारे१

गुड क्वेश्चन. पण जरा शोधाशोध केल्यास दिसलं की गायी आणि बदकांचीही प्रादेशिक उपबोली असते. त्यामुळे 'का?' या प्रश्नाचे उत्तर ठौक नसले तरी माणूस सोडून अन्य सजीवांतही हा प्रकार दिसतो इतके जरूर म्हणता यावे. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/5277090.stm http://news.bbc.co.uk/cbbcnews/hi/animals/newsid_3776000/3776023.stm आणि यात फरक तुलनेने कमी असायचे कारण म्हणजे मुळात यांच्या भाषेची शब्दसंपदा कमी असणे हे होय. पण कमी शब्दसंपदा असूनही फरक जर जाणवतो तर माणसाच्या केसमध्ये फरक पडणारच.

१. असे वाचले आहे कि औरंगजेबाच्या काळात (किंवा त्या आधीही कदाचित)भारत युरोप ह्यांच्यात व्यापार होता ..म्हणजे भारतीय व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात युरोपात ये जा करत... हे खरंय? असेल तर कसा कोणता ?
भारतातील शिडाची जहाजे आपल्या कोची बंदरातून अरबस्थानात बसरा येथे export व्हायची. "सिंदबादची साहसी सफर" यात वापरलेली जहाजे हि भारतीय बनावटीची आहेत व सर्व प्रवास वर्णने हि त्या वेळची खरी प्रवास वर्णने आहेत.
२. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ?
पुराणातल्या वर्णनाप्रमाणे बळी राजा १६५०० इसा पूर्व हा मेक्सिको येथे गेलेला भारतीय आहे. पण तो पहिला भारतीय नसावा!

In reply to by प्रसाद गोडबोले

विनोदाचा भाग सोडा पण अशक्य आहे काय ? पाताळ म्हणजे अमेरिका हे एक गणित मांडलं गेलंय म्हणे. कोलंबस युरोपातनं भारतात यायलाच निघालेला ना? वास्को द गामा भारताकडंच येत होता ना ? ही आताची दोन पाचशे वर्षामागची उदाहरणं. व्यापार गच्च सुरु होता भारतात. सध्याचे लोक अमेरिकेकडे धाव घेतात (घेत होते म्हणा) तसं पूर्वी भारताकडं धाव घेत होते लोक. कर्मठपणामुळं समुद्र उल्लंघन बंद होण्यापूर्वी बर्‍याच लोकांनी ट्रीपा मारल्या असतील की इकडच्या तिकडच्या. आपल्याला युरोपियनांनी शिकवलेला इतिहास मान्य होतो. वास्को द गामा अमुक तारखेला कालिकत बंदरात आला त्याचं आम्हाला कौतुक. (थोडं कोल्लापूर स्टाईल बोलावंसं वाटतंय.) तो रां*चा आपली आ* नि***ला आला होता का इथं? व्यापारालाच आला ना? भारत समृद्ध होता हे मानायला काय अडचण? ते कोलंबस भैताड चुकलं नसतं तर भारतातच आलं असतं ना? वेस्ट इंडिज चं नाव कसं पडलं? हुश्श्श्श! झालं. (गोडबोले हे जनरल आहे बरंका! वैयक्तिक न्हाई) बाकी माणसाची 'के हेच्च ए ए जे' त्याला पूर्वापारपासून इकडून तिकडे भटकायला भाग पाडतेच.

In reply to by प्यारे१

जोपर्यंत काहीच पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत भाकडकथाच मानणे भाग आहे. आता पुराव्याची इतकी काय मातब्बरी असे म्हटले तर मी ओबामाचा बॉस आहे.

ज्ञान आणि मनोरंजन! झ्क्कास!!