Skip to main content

गायत्री मंत्राचा सोपा अर्थ

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 24/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला. "गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?" चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली. तेवढ्यात मेहुणे रावांनीच खुलासा केला. "या प्रश्नचा उद्देश तुझे संस्कृत ज्ञान वगैरे तपासणे हा नसून सोप्या भाषेत त्या मंत्राचा अर्थ हवाय हा आहे." "वा रे बच्चू! मनात एक तोंडी दुसरे काय?" मी विचारले, "अशी वेळ तुमच्यावर का यावी?" उत्तर आले "आमचे चिरंजीव!" मी संभ्रमात पडलो. यांचे चिरंजीव मला चांगलेच माहिती होते. वय वर्षे ४. अतिशय चिकित्सक. तूफान धुडगूस. पण संस्कार चांगले. वडिलांचा म्हणजे आमच्या मेहुणेरावांचा त्यांना धाक. मग अशा मुलाला काय पडले आहे या गायत्रीमंत्राच्या अर्थाचे? तर पुढच्या उत्तराने शंकासमाधान झाले. "शाळेमध्ये यांना दररोज प्रार्थनेबरोबर गायत्री मंत्र म्हणायला लावतात. हा ते म्हणतो. परंतु गेले काही दिवस त्याने भुणभुण लावली आहे कि त्याचा अर्थ काय? मी नेट वर वगैरे शोधले परंतु त्याला समजावता येईल अशा सोप्या भाषेत तो काही मला सापडला नाही. " हे एवढे ऐकून मी सुद्धा विचारात पडलो. संस्कृत चे ज्ञान आमचे यथातथाच. ९ वी १० वी ला जेवढे काही संस्कृत विषय शिकलो होतो तेवढेच. त्यामुळे खालील मंत्र मनात १० वेळा म्हटला परंतु तरीही त्यात सोप्या भाषेत समजावण्यासारखे काहीच दिसेना. एवढेच कळले कि सूर्याची प्रार्थना केलेली आहे. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ मग काही दिवस इकडे तिकडे हातपाय हलवल्यावर तसा अर्थ तर सापडला परंतु सोप्या भाषेमध्ये विशेषतः चिरंजीवांना समजेल असा कसा सांगणार? मिपाकरांनी थोडीशी मदत केली तर खरच छान होईल. एका ४ वर्षाच्या मुलाला याचा अर्थ त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कसा सांगणार? शब्दाची फोड करून जर जमले तर अजूनच छान म्हणजे या शब्दच अर्थ हा असे सांगता येइल.

वाचने 28229
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

हे संपूर्ण विश्व निर्माण करणारया परमात्म्याच्या[सूर्य] सर्वश्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो, तो सूर्यदेव आमच्या बुद्धीला [सत्कर्माची] प्रेरणा देवो." सौजन्य- चेपु. जरा गुगलले तर अजून सविस्तर माहिती मिलेल.

In reply to by खेडूत

धन्यवाद खेडूत. तुम्ही दिलेल्या या अर्थाने शोधास चांगली दिशा मिळाली आहे. फक्त शब्दांचा मेळ घालायचा प्रयत्न करतोय

ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो.. ते तेज आमच्या बुद्धिला चेतना देवो!!! पिडां म्हणे आता, उरलो उपदेशापुरता!!! :)

मला शिकविलेला गायत्री मंत्र अजून जरा मोठा होता. ॐ भूर्भुवः स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ तो लहान का आणि कसा झाला ह्या बद्दलही मला उत्सुकता आहे. तसेच पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?
असे ऐकले आहे खरे. कारण माहित नाही! आयरनी अशी की, गायत्री मंत्राच्या अनेक CDs मध्ये कदाचित सर्वात लोकप्रिय CD अनुराधा पौडवाल यांची असावी! अवांतर - मात्र अनुराधा पौडवाल शेवटच्या प्रचोदयात् चा उच्चार प्रचोदया असा करतात, ते मात्र खटकते!

In reply to by सुनील

पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?
याचं एक कारण हे असु शकेल.. गायत्री मंत्राच्या जपाने अंगात निर्माण होणारी उष्णता.. उष्णतेमुळे होणारे त्रास टळावेत म्हणुन ते तसं सांगितलं जात असेल. तो जस्त करुन उपाया पेक्षा अपाय होण्याची शक्यता जास्त. याचा अर्थ स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप करु नये असा होत नाही.

In reply to by मनराव

गायत्री मंत्राचा जाप करायला स्त्रियांना बंदी आहे,परंतु गायत्री हे नाव सर्रास ठेवले जाते... हा हिंदू द्रोह आहे ..गायत्री नावाने तिची ,अथवा तिचे नाव घेणारे आई बाबा भावंडे मित्रमैत्रीणी यांची उष्णता वाढली तर त्याला जबाबदार कोण????....प्राचीन मुनींना याचे थर्मोडीनामिक्स माहित असणार ,उगाच का ते असं काहीबाही लिहतील!फक्त त्यांनी ते गुप्त ठेवले.

In reply to by प्रभाकर पेठकर

ॐ भूर्भुवः स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम
भु: - पृथ्वी भुवः - आकाश स्वः - सूर्य महः - तारे बाकीच्याचा अर्थ नाही माहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीनच माहिती! खरंच आत्तापर्यंत हा पूर्ण श्लोक असा आहे हे माहीतच नव्हते. *SCRATCH* का कात्री लावतात श्लोकांना काय माहिती?

गायत्री मंत्र म्हणायला स्त्रियांना बंदी असल्यास माहिती नाही. जर बंदी असेल तर ती तद्दन बिनडोक आहे. थंडीत बसून मंत्र म्हटला तर घंटा काही उष्णता वैग्रे वाढत नाही. ही असली मुक्ताफळे सनातन प्रभातसारख्या दैनिकांत छापून येतात आणि बिनडोकागत लोकही त्यावर विश्वास ठेवतात.

In reply to by बॅटमॅन

थंडीत बसून मंत्र म्हटला तर घंटा काही उष्णता वैग्रे वाढत नाही.
गायत्री मंत्र एकदा म्हटला तर लगेच उष्णता वाढली अस नाहिये...... तसं असत तर सगळेच थंडीत गायत्री म्हणु लागले असते....... आणि मानवाने उत्तर दक्षीण ध्रुवावर सुद्धा वसती केली असती आणि १२ महिने तिथेच राहिले असते.... जप करुन बघा काहि लाख तरी आणि अनुभव घ्या. तसही असल्या गोष्टी स्वःताच्या अनुभवाने पटण्यासारख्या असतात. इतर कोणी कितीहि पटवून सांगितल तरी त्या पटत नाहीत.. असो.. धागा भरकटायला लागला....

In reply to by मनराव

तुम्ही किती लाख जप केला? त्याने अंगात किती किलोक्यालरी उष्णता वाढली? याचा विदा द्या मग पाहू काय ते. आणि तसेही अनुभवण्याच्या गोष्टी या नावाखाली वाट्टेल ते खपवता येते. इतर कोणी कितीही पटवून सांगितलं तरी ते पटत नाही.

In reply to by बॅटमॅन

मी एकदा 'आचमन' करताना गायत्री मंत्र म्हटला होता. मला शरीरातील कॅलरीज वाढल्याचे जाणवले होते.

In reply to by माहितगार

खरंच मिपा वरती मदत मागितल्याचा आता मला अभिमान वाटतोय. किती तरी नवीन नवीन माहिती कळते आहे. गायत्री मंत्राची पूर्ण कहाणीच येथे वाचावयास मिळाली. आता चिरंजीवांना अगदी गोष्टीच्या स्वरुपात सुद्धा सांगता येईल! लिंकसाठी धन्यवाद माहितगार!

In reply to by अमित खोजे

मग आधी गूगलून नक्की काय घं* माहिती मिळवली होती हो तुम्ही ? (लब्बाड!) उगी साध्या गोष्टीवरून मिपाकरांना हरभर्‍याच्या झाडावर टांगु नका राव.. ( वाईट दत्त्या.. ;) )

जर शरीरात उष्णता निर्माण झाली (गायत्री मंत्रामुळे किंवा अन्य काहीही कारणामुळे) तर तुम्हाला गरम वाटेल की थंडी वाजेल? जेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते (उदा. ताप आला) तर खरे तर हुडहुडी भरते. स्वेटर घालावासा वाटतो. आणि जेव्हा शरीरातील उष्णता कमी होते ("थोडी" घेतल्यावर) तर गरम वाटू लागते. न्यूटन साहेबांनी याची कारणमिमांसा ४०० वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे! तेव्हा गायत्री मंत्राने नेमके काय होते? जाणकारांनी प्रकाश टाकावा!!

In reply to by सुनील

काठेवाडी असेल तर माझा प्रतिसाद आहे तस्सा लागू. कोकणातील असेल तर शेर=१ थेंब/१ वाटी इ.इ. मल्टिप्लायर अ‍ॅडजस्ट करून घेणे ;)

In reply to by आनन्दा

घाम येण्यासाठी पळायला कशाला पाहिजे? पंखा बंद करून आराम खुर्चीत बसलात तरी येईल हो घाम ;) शरीराची तपमान वाढल्यावर (उदा १०० च्या वर ताप) तुम्हाला गरम कपडे घालावेसे वाटतात की नाही?

In reply to by सुनील

काहीतरी गफलत होतेय. स्वेटर आपण घालतो ते आपल्या शरीरातील तापमान बाहेर जऊ नये म्हणून. जेव्हा त्या तापमानाची शरीराला गरज नसते तेव्हा शरीरच घामाच्या वाटे ते तापमान कमी करत असते. (माझ्या अल्प मतीप्रमाणे. चु भु दे घे)

In reply to by आनन्दा

आणि थंडी वाजयचीच असेल तर ती रजई मध्ये गुन्डाळून बसल्यावर पण वाजते. त्याचा बाहेरच्या तापमानाशी तेव्हढा संबन्ध नसून मज्जासंस्थेशी जास्त आहे असे मला वाटते.

धरती,गगन,स्वर्गोम्हरे, हम सूर्य को मनसे वरे ! प्रेरित करे जो बुद्धि को, उस तेज का चिंतन करे !! जय मायमराटी

In reply to by अव्यक्त

धन्यवाद अव्यक्त. हिंदीमध्ये जरी हा भाषांतरित असला तरीही अगदी शब्दशः आणि समजण्यासारखा आहे हा अर्थ. आणि खरे सांगायचे तर त्या कार्ट्याला (म्हणजे ज्याच्यासाठी हा धागा काढला होता तो हो) हिंदी पण छान समजते. फक्त "स्वर्गोम्हरे" याचा अर्थ नीटसा कळला नाही. थोडी फोडाफोडी कराल का? संधीची हो! खूप खूप धन्यवाद. उत्तर मिळाले असे जाहीर करतो. :D

हा सवितृमंत्र आहे... गायत्री हा छंद आहे तो मंत्र म्हणण्याचा.

In reply to by अर्धवटराव

गायत्री मंत्र हे ऋग्वेदातील सूर्याला उद्देशून केलेले सूक्त आहे. ऋग्वेद मंडल ३, सूक्त ६२, श्लोक १० पण यात सुरुवातीचा ॐ भूर्भूवः स्वः ही ओळ मात्र नाही. बहुधा दुसर्‍या श्लोकातून घेतली असावी.

In reply to by प्रचेतस

हा मंत्र जणू सर्व वेदमंत्रांचा मूलमंत्र असल्यासारखं महत्व आणी स्थान मिळालेला मंत्र आहे. याचे मूळरूप ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढच आहे. दुसरं रूप ॐ भूर्भुवः स्वः , तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ हे प्राणायाम करताना सामान्यतः धार्मिकविधिंमधे सर्वत्र म्हटलं जातं. आणी त्रिकाल संध्योपासनेत आचमन होऊन चोविस नामांचा उच्चार झाल्यावर प्राणायाम करताना सर्व सप्तलोक आणी पुढे गायत्रीमंत्र ( ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ असं म्हणून कुंभक,पूरक,रेचक असा प्राणायाम करण्याची पद्धत आहे. यातही ऋग्वेदी परंपरे नुसार कोणत्याही मंत्रपठणापूर्वी त्याचे छंद-ऋषी म्हणण्याची पद्धत आहे. जसे की.. गायत्रीमंत्राचे छंदर्षी- प्रणवस्य परब्रम्ह ऋषि:। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंदः । गायत्री शिरसः । प्रजापर्तिब्रम्हाग्निवाय्वादित्या देवता:। यजु:छंदः , एतेषां प्राणायामे विनियोगः॥ आणी मग पुढे ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम असे म्हणून पुढे उजव्या नाकपुडी ने सावकाश दीर्घ श्वास घेऊन डावी नाकपुडी बंद करून मनातल्या मनात एकदा ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ असे म्हणून झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास सोडतात. हा कुंभक झाला. पूरक आणी रेचकाला गायत्री मंत्र अनुक्रमे २ वेळा.. व ३ वेळा म्हटला जातो. आणी अर्थ तर वरती बर्‍याच जणांनी दिलेला आहे.. तो लहान मुलांना त्यांच्या भाषेत आणी त्यांच्या भावनेला पचेल/रुचेल असाच सांगावा. हे उत्तम! वेळ पडली तर अगदी इसापनिती/कार्टुन/सिनेमा यातल्या त्यांना अवडणार्‍या हव्या त्या व्यक्तिरेखेची उदा. द्यावी. त्यांना ऐकताना अवडत आहे की नाही? हे मात्र सतत पहावं. मी मुंजीच्या अनेक समरप्रसंगात :D हा उपद्व्याप जमेल तसा करत असतो. (तो इथे सांगायचा म्हणजे एक अख्खा लेख पडेल. :D असो! )

In reply to by अत्रुप्त आत्मा

व्वा गुरुजी. उत्तम माहिती. गायत्री मंत्राच्या शास्त्रशुद्ध उच्चाराने (ॐ, विसर्ग, ओष्ट्य, तालव्य इ.इ.) गालांच्या, जीभेच्या, ओठांच्या स्नायुंना व्यायाम होतो आणि त्यामध्ये चापल्य येऊन स्पष्टोच्चारास मदत होते. तसेच, श्वासांचा व्यायाम होऊन प्राणवायूचा पुरवठा शरीराला खोलवर होतो ज्या योगे प्राणवायुचे वहन स्नायुंपर्यंत होऊन स्नायुंचे पर्यायाने आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते, असे लहानपणी शिकविले गेले आहे. नाटकात काम करतानाही आमच्या गुरूंनी आम्हाला शब्दांच्या स्पष्टोच्चारासाठी, वाक्याच्या सहज चढउतारासाठी, संवादाची फेक सुधारण्यासाठी गायत्रीमंत्र आणि प्राणायामाचा सराव करायला सांगितले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी हे हेच ऐकले होते एका व्हाईस कल्चर तज्ञ बाईंच्या भाषणात. त्यांना लहानपणच्या स्त्रोत्र मंत्र श्लोक यांचा त्यांच्या व्यवसायात खुप उपयोग झाला.

In reply to by अर्धवटराव

गायत्री हा छंद आहे प्रत्येक श्लोकात २४ अक्षरे असतात . अवांतर :अनिष्टुभ मध्ये ३२... बाकीचे आठवत नाही ...

In reply to by प्रसाद गोडबोले

अनुष्टुभ् मध्ये ३२ अक्षरे टोटल. ४ पाद, प्रत्येकात ८ अक्षरे. पहिल्या अन तिसर्‍यात ५वे अक्षर लघु पायजे इतकेच बंधन- अन्य अक्षरे कुठलीही असोत, तर २र्‍या व चौथ्यात ५वे ते ८व्या अक्षरांचा प्याटर्न लघु-गुरू-लघु-गुरू असा आहे. पहिली चार अक्षरे कैपण चालतात. अनुष्टुप हा वैदिक छंदांपैकी सर्वात जास्त पापिलवार छंद आहे. किंबहुना संस्कृतमध्ये सर्वांत जास्तवेळेस वापरला गेलेला हाच छंद आहे. कारण वापरायला अन गायला सर्वात सोपा अन सुटसुटीत आहे. गायत्री, उष्णिक वैग्रे छंद वेदांपुरतेच मर्यादित राहिले असे दिसते. पुढे कधी त्यांचे उदाहरण सापडल्याचे माहिती नै. अनुष्टुप मात्र पार रामायणापासून ते पुढे अगणित ग्रंथ व भीमरूपी महारुद्रा पासून थेट मिपावरील आमच्या जिलब्यांपर्यंत तितकाच पापिलवार राहिला आहे.

In reply to by बॅटमॅन

सैषा गणेशविद्या:। गणक ऋषि:। निचृद्वायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता। हा गायत्रि छंद की "निचृद्वायत्रीच्छंद"? दोन्हीत काय फरक आहे?

In reply to by बॅटमॅन

ही माहीती विकी वर मिळाली Gayatri: 3 padas of 8 syllables containing 24 syllables in each stanza. Ushnuk : 4 padas of 7 syllables containing 28 syllables in each stanza. Anustubh: 4 padas of 8 syllables containing 32 syllables in each stanza. Brihati : 4 padas (8 + 8 + 12 + 8) containing 36 syllables in each stanza. Pankti : 4 padas (sometimes 5 padas) containing 40 syllables in each stanza. Tristubh: 4 padas of 11 syllables containing 44 syllabes in each stanza Jagati: 4 padas of 12 syllables containing 48 syllables in each stanza There are several others such as: Virāj: 4 padas of 10 syllables Kakubh असो... (अवांतर : आपल्या भाषेबद्दल आपल्याच माहीती नाही , संस्कृत छंदांबद्दल इंग्लिशमशुन माहीती मिळवावी लागतीये :( स्वतःच्या कर्मदरिद्रीपणाबद्दल स्वतःचीच खंत वाटली :( छ्या:राव , हे काही बरोबर नाही आपल्याच माहीत नाही , पुढच्या जनरेशन्स ना कसे कळणार ? शिवाय हे उष्णता बिष्णता वादी लोक आधीच वैदीक संस्कृतीची वाट लावायचे काम जोमाने करत आहेतच :( )

मला शिकविलेला गायत्री मन्त्र अजुन मोठा आहे ॐ भू: भुव: स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ ॐ आपो ज्योति रसो अमृतम् ब्रह्म भुर्भुवस्वरोम्

In reply to by मनिम्याऊ

@मला शिकविलेला गायत्री मन्त्र अजुन मोठा आहे >>> =)) नाही नाही.. तसे नाही.. गायत्रीमंन्त्र हा ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढाच आहे. त्या अधी असलेल्या ॐ भू: भुव: स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम या व्याहृती आहेत. त्या फक्त प्राणायाम पूर्व म्हणतात. आणी ॐ आपो ज्योति रसो अमृतम् ब्रह्म भुर्भुवस्वरोम् ही शेवटची ओळ म्हणत असताना,दोन्ही कानांच्या पाळ्यांन्ना उजव्या हताने स्पर्श करतात. त्यासाठी ती ओळ आहे. गायत्रीमंन्त्राचा जप(१/१०/२८/१०८) करताना फक्त ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढाच आणी एव्हढाच मंत्र म्हणायचा असतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

यग्जाक्टलि. सोनाराने कान टोचले हे उत्तम झाले. जर तो मंत्र मोठा असता तर पहिली गोष्ट म्हणजे गायत्री नामक छंदातच बसला नसता ;) शिवाय योग्य तितकी उष्णतादेखील पैदा झाली नसती हेवेसांनल ;)

In reply to by बॅटमॅन

फ्रीजावर गायत्री मंत्राचा स्टीकर लावला की त्याचा ओव्हन होतो. ;) ते स्टीकर छापताना सुध्दा हात भाजतात म्हणून आम्ही छापत नै :)

In reply to by अभ्या..

अगागागागागागा =)) तरीच भारतात "शुद्ध" संस्कृतवाले सगळे दक्षिणेला आहेत! गायत्रीपठणाने कायम उष्णता वाढून वाढून काळे ठिक्कर पडलेत भौतेक =))

In reply to by बॅटमॅन

ती उष्णता पास व्ह्यायसाठी ओन्ली लुंगी ना? आणि नॉर्थवाले ते श्लोक उपरण्यावर छापून त्यासाठीच पांघरतेत. गायत्री थर्मल वेअर भौतेक. :) च्यायला नियम सिध्द होतोय राव ब्याट्या :)

पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का
ह्याचं खरं कारण असं अहे कि कुठल्याही मंत्राचा जप हा स्वताच्या मानाने हवा तसा करता येत नहि. त्यासाठी मंत्रदीक्षा घ्यावी लागते (नामस्मरण कुठेही कसही केला तरी चालतं ). गायत्री हा तर मंत्रांचा राजा आहे . वयाच्या ८ व्या वर्षी मुंज करताना गुरु त्या मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्राची दीक्षा देतात आणि मगच गायत्री मंत्र जप करण्याची परवानगी मिळते . पूर्वीच्या काळी स्त्रियांची मुंज होत नसल्यामुळे त्या जप करू शकत नवत्या . पण ह्याचा अर्थ असा नव्हे कि त्यांना मंत्र जपण्याची परवानगी नाही वगेरे . स्त्री - पुरुष दोघेही मंत्र दीक्षा घेवू शकतात . मला वाटत ४-५ वर्षाच्या मुलांना गायत्री मंत्र जपायला सांगणे चूक आहे कारण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उच्चार . गायत्री मंत्रामध्ये २४ बीजमंत्र अहेत. मंत्राने उष्णता वाढते , कुंडलिनी जागृत होते वगेरे हे सगळा बरोबर अहे. त्यामुळे चुकीचा उच्चाराने वेगळेच परिणाम होण्याचा धोका आहे .

In reply to by म्हैस

पूर्वीच्या काळी स्त्रियांना उपनयनाचा अधिकार होता. त्यामुळे स्त्रिया गायत्री मंत्र जपू शकत असत. पुढे तो राहिला नाही. आणि मंत्राने उष्णता वाढते वगैरे सगळे बिनडोकांचे पोरखेळ आहेत. विदा द्या मग बोलू.

In reply to by बॅटमॅन

>>>बिनडोकांचे पोरखेळ आहेत. विदा द्या मग बोलू. असला काय होत नाय म्हनून कुनाकुनाला सांगनार? सोरून दे ना रं बाला. बिनडोकांच्या नादाला कं लागतंस? -प्यारे भोईर (हलके घ्या)

मला वाटत ४-५ वर्षाच्या मुलांना गायत्री मंत्र जपायला सांगणे चूक आहे कारण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उच्चार . गायत्री मंत्रामध्ये २४ बीजमंत्र अहेत. मंत्राने उष्णता वाढते , कुंडलिनी जागृत होते वगेरे हे सगळा बरोबर अहे. त्यामुळे चुकीचा उच्चाराने वेगळेच परिणाम होण्याचा धोका आहे
सहमत

फक्त "स्वर्गोम्हरे" याचा अर्थ नीटसा कळला नाही. थोडी फोडाफोडी कराल का? संधीची हो! "स्वर्गोम्हरे" स्वर्गोम्हरे = स्वर्ग + ॐ + हरे

In reply to by म्हैस

( अवांतर :अतिशाहणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण आहे , रेडा रिकामा अशी नाही , पण आजकालच्या LGBT पुरक वातावरणात म्हशीला बैलाचीही भिती वाटणे स्वाभाविक आहे :D )