मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण खरेच पुरोगामी आहोत का?

विकास · · काथ्याकूट
​​​​​​नरेन्द्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त हे मला त्याच्याशी वैयक्तीक ओळख नसली तरी व्यक्तीशः आणि एकंदरीतच सामाजीक स्तरावर अस्वस्थता आणणारे ठरले. जर समाजास (त्यात मी केवळ सामान्य माणूस धरत आहे, राजकारणी नाही) त्यातून खरेच अस्वस्थता आली असेल, तर तो महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे. २०१० च्या जर्मन बेकरीवरील दहशतवादी घातपातापेक्षाही पुण्यासारख्या शहरात घडलेली ही एकच हत्या जास्त गंभीर आहे असे कुठेतरी वाटते. हल्ल्यास भ्याड म्हणावे का थंड डोक्याने आखलेला कट हे काळच सांगेल.
या दुर्घटनेवर सर्वत्र लिहीले जात आहेत. आशा आहे की आरोपी आणि त्यांचे बोलविते धनी यांचा शोध लवकरात लवकर लागेल आणि त्यांना कायद्यानुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल... ते होईपर्यंत यावर बोलण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र बातम्या-लेख-प्रतिक्रीया वाचताना ह्या ना त्या रुपात, हळहळी बरोबरच त्राग्याने एक गोष्ट लिहीली/बोलली जात आहे ती म्हणजे "पुरोगामी महाराष्ट्रास हे लांच्छनास्पद आहे." अथवा "महाराष्ट्राची पुरोगामीओळख संपली..." वगैरे वगैरे. पण जितका या घटनेनिमित्ताने गेल्या काही दशकांचा विचार करू लागतो तेंव्हा परत परत प्रश्न पडू लागतो की आज महाराष्ट्र आणि पर्यायाने आपण खरेच पुरोगामी आहोत का?
"पुरोगामी" म्हणजे जर "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince hoUna) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल" असा अर्थ असला तर स्वातंत्र्याच्या अलिकडे-पलीकडे विचार केल्यास महाराष्ट्रात नक्कीच अनेक पुरोगामी विचारवंत झाले, त्यांच्यामुळे बदल देखील झाले. पण गेल्या दिड-दोन दशकांचा विचार केल्यास आपण नक्की महाराष्ट्रात एक समाज म्हणून काय केले आहे ज्यामुळे आज आपल्याला पुरोगामी म्हणवून घेण्याचा हक्क आहे?
जातींवरील नुसतेच राजकारण नाही तर जातींचे पुनरुत्थापन आणि त्यातून सामाजीक द्वेष, बुवाबाबांचा केवळ सामान्यांवरच नाही तर राजकारणी आणि प्रथितयश आर्थिक उच्चवर्गावर वाढता प्रभाव, दुसरीकडे स्वतःला बुद्धीवादी म्हणत आणि इतरांना हिणवत "केवळ पाश्चात्यांची जीवन पद्धत स्विकारणे म्हणजेच अधुनिकीकरण आणि पुरोगामित्व", असे समजणारा स्वतःच्याच नशेत धुंद असलेला सुशिक्षित वर्गाचा एक भाग... सोशल मेडीयावरील जातीय ग्रूप्स, धर्माच्या / परंपरांच्या विरोधात असलेल्यांची केवळ तुच्छ लेखणारी, प्रत्येक गोष्टीस जुनी आहे म्हणून काय वाट्टेल ते करून चू़क ठरवणारी मुक्ताफळे असे बरेच काही बघायला सहज मिळू शकते.
मग नक्की आपण, म्हणजे सद्यस्थितीतील महाराष्ट्र, खरेच पुरोगामी आहे का? असलो तर नक्की कुठल्या संदर्भात? नसलो तर नक्की काय करायला हवे जेणे करून आपण समाज म्हणून पुरोगामी ठरू? का काही गरज नाही? Who cares! असे म्हणत, "ठेवीले अनंते" म्हणायचे आणि पोटा पाण्यासाठी. "मी एक मुंगी, तू एक मुंगी" म्हणत आयुष्य पुढे रेटायचे?

वाचने 4502 वाचनखूण प्रतिक्रिया 22

अर्धवटराव Fri, 08/23/2013 - 00:45
माहित नाहि, पण पुरोगामी होण्याशिवाय पर्याय नाहि एव्हढं मात्र खरं. एक शतकभर आगोदर पुरोगामी असण्या/नसण्याला वैयक्तीक चॉईस होती, कारण माणसाची पोटापाण्याची सोय आणि रात्रीची सुरक्षीत झोप त्यावर अवलंबुन नव्हती. आज आपल्याला चॉईस नाहि. एक समाज म्हणुन आपल्याला पुरोगामी व्हायचं असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला हि अनिवार्यता समजाऊन सांगायला हवी. तसं आपण थोडंफार पुरोगामी झालोय. समाजाचं स्ट्रक्चर, जीवनशैली, घडवण्यात अर्थकारण फार महत्वाची भुमीका बजावतं. आज अर्थकारण सर्वांकरता खुलं झालय. त्यामुळे पुरोगामित्वाचा एक सशक्त घटक सर्वांसाठी खुला झालाय. रक्तहीन सत्तापालट देखील पुरोगामीत्वाचच लक्षण आहे. पण अजुन फार मोठा पल्ला गाठायचा आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचं महत्व समजणं, स्विकारणं व त्यानुषंगाने येणार्‍या जबाबदारीप्रती कमीटेड असणं, हे खरं पुरोगामित्व. लेट्स सी. अर्धवटराव

"पुरोगामी" म्हणजे जर "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince hoUna) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल"
ह्या व्याख्येतच गडबड आहे , कारण "चांगल्यासाठी " म्हणजे नक्की काय ? प्रत्येक कालानुरुप चांगलं काय वाईट काय ह्याच्या व्याख्याबदलत राहणार . चांगुलपणाचा असा काही सार्वजनीन सार्वकालीन आदर्श असुच शकत नाही . म्हणुन ह्या व्याखेनुसार आपणच काय कोणीही पुरोगामी असु शकत नाही ... जो तो आपापली वाचवायचा प्रयत्न करत आहे हा सिंपल नेचर्स लॉ ...बस्स (हे जो स्वतःसाठी करतो त्याला स्वार्थी म्हणतात आणि जो १०० लोकांना पुढं करुन 'ह्यांच्या साठी करतो ' असे म्हणतो त्याला समाजसुधारक ! )... काही लोकांना उगाचच पुरोगामी बिरोगामी अवघड शब्द वापरुन साध्या गोष्टी ग्लोरीफाय करायची हौस असते ... नथिंग मोअर नथिंग लेस !

चौकटराजा Fri, 08/23/2013 - 10:12
पुरोगामित्व हे दोन प्रकारचे असते. ऐहिक स्वरूपात आपण पुरोगामी आहोत. सगळे जगच आहे. प्रगतीने काही वाईट गोष्टी आणल्या असल्या ( उदा पर्यावरण हानी) तरी काही गोष्टी पूर्वी पासून आह्वेत.लूटालूट, भांडणे, वैचारिक कारणासाठी हिसा, भाउबंदकी, गद्दारी या काय इतिहासात नव्हत्या काय ? पुतण्याचे , बापाचे , भावांचे वध देखील करंण्यात आले आहेत. आपल्या बर्‍याचशा सामाजिक समस्यांचे कारण एकच आहे. ते म्हणजे सज्जन माणसांचे सवते सुभे व दुर्जनांचे सिंबॉयसीस .

"पुरोगामी महाराष्ट्रास हे लांच्छनास्पद आहे." अथवा "महाराष्ट्राची पुरोगामीओळख संपली..." हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय वेगळी बाब आहे का? का ती महाराष्ट्रातली अन्य कुठली जागा आहे? Who cares! असे म्हणत, "ठेवीले अनंते" म्हणायचे आणि पोटा पाण्यासाठी. "मी एक मुंगी, तू एक मुंगी" म्हणत आयुष्य पुढे रेटायचे? मग व्यक्तीस्वातंत्र्याच्या जमान्यात पोटापाण्यासाठी साधे जीवन जगणे गैर का? साधे सरळ जीवन जगू शकत नाही का? असो जरा भडकूनच दिलेला प्रतिसाद आहे.

मदनबाण Fri, 08/23/2013 - 12:30
आपण खरेच पुरोगामी आहोत का? ही पुरोगामी काय भानगड आहे ते मला जरा समजवुन घ्यायचे आहे,मोठ मोठे नट नट्या राजकारणी आणि वॄत्तवाहिन्या अनेकवेळा या पुरोगामी महाराष्ट्राची माळ जपताना दिसतात ! पण गेल्या दिड-दोन दशकांचा विचार केल्यास आपण नक्की महाराष्ट्रात एक समाज म्हणून काय केले आहे ज्यामुळे आज आपल्याला पुरोगामी म्हणवून घेण्याचा हक्क आहे? टप्प्याटप्प्याने का होईना आपला समाज रसातळाला चालला आहे / गेला आहे,हे मनापासुन मान्य केले पाहिजे,आणि समाजात घडणार्‍या घटना त्याच्या साक्षिदार आहेत हे देखील डोळसपणे समजवुन घेतले पाहिजे. जाता जाता :- राज्य आणि एकुण देशातली अराजकता पाहता ज्या देशात / राज्यात रोज स्त्रीयांवर / चिमुरड्यांवर बलात्कार होणे,गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढणे,आमदार मंडळींनी मग्रुरीचे प्रदर्शन करणे,महत्वाच्या फाईली जादु घडाव्या तश्या गायब होणे, खेळांमधे फिक्सींग नित्याची बाब ठरणे,भ्रष्टाचार हा शिष्टाचाराप्रमाणेच पाळणे आणि स्वसंरक्षणात गाफिल राहुन देशाचे लचके तोडणार्‍यांशी,जवानांचे बळी घेणार्‍यांशी शांतता शांतता हा खेळ खेळ बसणे.. हे सर्व ज्या देशातील लोकांना दिसते तरी ते तोंड उघडत नाहीत, बोलत नाहीत, लिहीत नाहीत त्यांना हा पुरोगामी शब्दाचा अर्थ कळेल काय असा मला प्रश्न पडला आहे ! नरेन्द्र दाभोलकरांच्या हत्ये नंतर अनेक लेख विविध वॄत्तपत्रात / जालावर आले. असाच एक लेख कुमार सप्तर्षी यांचा लेख लोकसत्ता विशेष मधे आला :- आत्मसंरक्षणाची गरज त्यातला एक परिच्छेद इथे देतो आणि थांबतो... यावरून एकच धडा शिकायचा की हिंसाचारात पुढाकार घेऊ नये; पण आत्मसंरक्षण करण्यास सदैव दक्ष असले पाहिजे. आपण अहिंसेचे पुजारी आहोत म्हणून हिंसाचारावर श्रद्धा असणारे लोक आपल्याला सोडून देतील, अशा भ्रमात कोणी राहू नये.

In reply to by विकास

पुरोगामीवर कितीही चर्चा झाल्या तरी त्या चर्चा पुन्हा पुन्हा होणे गरजेचे आहे. दोन तीन दिवसापासून मिपापासून ते माझ्या महाविद्यालयाच्या स्टाफरुममधेही चर्चेत सारखं पुरोगामी, पुरोगामी येतच आहे. तेव्हा चर्चेतुन नवं काही सुचतं किंवा वाचायला मिळत असतेच, तेव्हा आपण टाकलेला काथ्याकुट योग्यच आहे. आणि आपण, म्हणजे सद्यस्थितीतील महाराष्ट्र, खरेच पुरोगामी आहे का? असलो तर नक्की कुठल्या संदर्भात? नसलो तर नक्की काय करायला हवे जेणे करून आपण समाज म्हणून पुरोगामी ठरू? का काही गरज नाही? Who cares! असे म्हणत, "ठेवीले अनंते" म्हणायचे आणि पोटा पाण्यासाठी. "मी एक मुंगी, तू एक मुंगी" म्हणत आयुष्य पुढे रेटायचे? यावरचा उत्तम काथ्याकुट अजून बाकी आहे. सवडीने चर्चेत सहभागी होतच आहे, तेव्हा चर्चाप्रस्ताव टाकल्याबद्दल धन्स. -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Fri, 08/23/2013 - 12:52
पुरोगामी म्हणजे नक्की काय व नक्की कोण पुरोगामी आहेत? तसेच पुरोगामी नसणे म्हणजे नक्की काय असणे? वृत्तपत्रे किंवा दूरदर्शनवर पाहिले तर भाजप/शिवसेना वगळता बहुतेक इतर सर्व पक्षांचा पुरोगामी पक्ष असा उल्लेख होतो. समाजवादी, राजद, काँग्रेस, राष्ट्रवादी इ. जाती व धर्माचे राजकारण करणारे पक्ष खरोखरच पुरोगामी आहेत का? जातपंचायतीला पाठिंबा देणारे, मुस्लिमांच्या अन्यायकारक पध्दती व्यक्तिगत कायदा या नावाखाली न्याय्य ठरविणारे, ब्राह्मणांना कायम झोडपून काढणारे इ. पुरोगामी कसे होतात? मुळात आधी पुरोगामी म्हणजे नक्की काय व नक्की कोण हे ठरविल्याशिवाय पुढे कसे जाता येणार?

In reply to by श्रीगुरुजी

विकास Fri, 08/23/2013 - 17:16
पुरोगामी म्हणजे नक्की काय व नक्की कोण पुरोगामी आहेत? चर्चा प्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, माझ्या मते "पुरोगामी" म्हणजे "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince होऊन) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल" असा अर्थ असावा. हा शब्द इंग्रजीतील progressive या शब्दाला समांतर आहे. या अर्थाने समाजाला हळू हळू बदलण्यासाठी मार्ग दाखवणारे, निर्माण करणारे हे सर्वच माझ्या लेखी पुरोगामी आहेत. त्यात कालौघात देखील ज्यांचे संतत्व टिकून राहीले आहे असे ज्ञानेश्वरांपासूनचे संत तुकारामापर्यंत अनेक संत येतील. कारण ते न दुखावता समाजास बदलतच होते. कायम नाव घेतेले जाणारे शाहूमहाराज, आंबेडकर, फुले देखील पुरोगामीच. कर्वे आणि त्याआधी स्वतःच्या राज्यात कैद्यांपासून ते अस्पृश्यांपर्यंत सर्वांनाच सामाजीक न्याय मिळवून देणारे औंधचे पंतप्रतिनिधी देखील पुरोगामीच. तेच सावरकरांच्या बाबतीत. पण ते आत्ताच्या तथाकथीत पुरोगाम्यांना पटणार नाही. मात्र आपल्याकडे सद्यस्थितीत स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणारे स्वतःस एकतर (फक्त आम्हीच) बुद्धीवान आणि विज्ञानवादी असे समजतात आणि जर कोणी धार्मिक असल्यास (अथवा एकंदरीतच धार्मिक परंपरांना) तुच्छ लेखतात. त्यामुळे सगळा वाद होतो. समाजवादी, ... इ. पुरोगामी कसे होतात? तोच तर मुद्दा आहे! विशेष करून जे स्वतःस पुरोगामी समजतात ते अशा पक्षांना-विचारसरणींना वगैरे पुरोगामी म्हणायला तयार असतात अथवा त्यांच्या मुळे घडणार्‍या सामाजीक दुष्कृत्यांवर डोळेझाक करायला तयार असतात.. थोडक्यात त्यांचे पुरोगामीत्व पण कचकड्याचेच असते आणि समाजाला खरेच बदलण्याचे त्यांना काही पडलेले नसते असे वाटण्यासारखी अवस्था आहे. म्हणूनच आपण खरेच पुरोगामी आहोत का हा प्रश्न पडतो.

आतिवास Fri, 08/23/2013 - 18:23
'पुरोगामिन' (पाय मोडका न) म्हणजे पुढे जाणारे, नेतृत्व करणारे, सुधारक विचारांचे (यात समता, शोषणरहितता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णूता, उदारमतवाद, चिकित्सक वृत्ती .. अशी अनेक मूल्ये येतील) लोक. अशा विचारांना समाजाचा सरसकट पाठिंबा कधीच नव्हता ही एक वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. प्रत्येक बदलाच्या वेळी विरोध, उपहास, टीका ... झाली आहे; बदल घडवून आणणा-यांना त्रास झाला आहे. एके काळी - म्हणजे ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात असे 'सुधारक' विचार मांडणारे नेतृत्व होते. त्या काळात इतर राज्यांच्या तुलनेत असा 'सुधारक विचार' मांडणारी आणि मानणारी बरीच मंडळी आपल्याकडे होती. म्हणून महाराष्ट्र पुरोगामी. पण हाही इतिहासच. आपले पुरोगामीपण कधी संपले आणि आपण गर्दीतले एक कधी होऊन गेलो ते कळलेही नाही. आता "पुरोगामी महाराष्ट्र" ही वापरुन वापरुन गुळगुळीत झालेली फक्त एक संज्ञा झाली आहे. काही लोक पुरोगामी विचा रांचे आजही आहेत - हा त्यातल्या त्यात दिलासा.

In reply to by आतिवास

विकास Fri, 08/23/2013 - 19:12
सहमत. म्हणूनच प्रश्न पडला की आज आपण खरेच पुरोगामी आहोत का? आणि आपण दिलेल्या उत्तराच्या जवळच गाडी जाऊन थांबली.
'पुरोगामिन' (पाय मोडका न) म्हणजे पुढे जाणारे, नेतृत्व करणारे, सुधारक विचारांचे (यात समता, शोषणरहितता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णूता, उदारमतवाद, चिकित्सक वृत्ती .. अशी अनेक मूल्ये येतील) लोक.
खरे आहे. या गुणांचा विचार केल्यास एक लक्षात काय येते तर बहुतांशी सुधारक (पुरोगामी) हे समाजात राहून काम करत. तो करत असताना ज्यांनी ज्यांनी "मी (अथवा माझा गट/आम्ही) विरुद्ध ते" असा पवित्रा घेतला ते त्यांच्या सुधारकी कार्यात कमी यशस्वी झाले. त्याची दोन टोकाची म्हणावीत अशी उदाहरणे म्हणजे आगरकर आणि सावरकर. असो. आता जे काही लिहीत आहे, त्याला व्यक्ती आणि संस्थांचे सन्मान्य अपवाद आहेत, पण ते अपवादच आहेत अशी म्हणण्यासारखी अवस्था आहे. आज अनेकदा स्वतःस पुरोगामी म्हणवणारे मात्र समता, शोषणरहितता म्हणताना कळत-नकळत जातीयता उकरत असतात ज्याचे स्वरूप गेल्या काही दशकात अमुलाग्र बदलले आहे. काही बाबतीत चांगल्या अर्थाने तर काही बाबतीत काळजी करायला लावण्यासारखे. धर्मनिरपेक्षते पेक्षा स्वतः निधर्मी आहोत म्हणून इतरांच्या धार्मिक पणास विरोध अथवा तुच्छ लेखण्याचा प्रकार वाढीस लागला. सहिष्णूता आणि उदारमतवाद हा "माझे म्हणणे मान्य असेल तरच" यावर अवलंबून राहू लागला आणि चिकीत्सक वृत्ती केवळ धर्माच्या बाबतीतच राहीली, समाजसुधारणेसाठी घेण्याच्या कष्टामधील काय यशस्वी होते आणि का यशस्वी होते तसेच काय होत नाही, हे पहाण्यासाठी वापरलीच जात नाही... कारण सध्याचे पुरोगामित्व हे समाजाला पुढे नेण्यासाठी नसून स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी असते अशी म्हणायची वेळ आली आहे. परीणामी जे बदलायला हवेत ते अधिकच अडमुठे होतात आणि एकंदरीतच समाज आणि राज्य म्हणून आपण पुरोगामी असण्यापेक्षा मागेच जाणारा जास्त होत जातो.

In reply to by विकास

अर्धवटराव Fri, 08/23/2013 - 19:19
आगरकर-सावरकर तुलना पटली नाहि. आगरकरांची सर्वसमावेषक सुधारणा एकाकी होती तर सावरकरांची एकाकी सुधारणा सर्वसमावेषक. असो. अर्धवटराव

In reply to by विकास

अर्धवटराव Fri, 08/23/2013 - 21:57
"मी(आमचा गट) विरुद्ध ते" असा सावरकरांचा पवित्रा होता म्हणुन ते कमि यशस्वी असा; त्या विरुद्ध, सर्वसमावेषक असे आगरकर जास्त यशस्वी झाले, असा जर अर्थ असेल तर त्याबद्दल आमची असहमती. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

विकास Sat, 08/24/2013 - 00:27
"सर्वसमावेषक असे आगरकर " असे मला म्हणायचे नव्हते. मात्र सुधारकी आगरकरांच्या बाबतीत "मी विरुद्ध ते" नक्की होते तर विज्ञाननिष्ठ सावरकरांच्या बाबतीतही ते काहीफार प्रमाणात होते. तरी देखील सावरकरांनी समाजसुधारणे संदर्भात सर्वसमावेषक भुमिका घेतली असे मला वाटते. विशेष करून नाशिकचे पतितपावन मंदीर तथाकथीत अस्पृश्यांना उघडे करताना...

दत्ता काळे Fri, 08/23/2013 - 20:22
पुरोगामी" म्हणजे जर "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince hoUna) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल" असा अर्थ असला तर स्वातंत्र्याच्या अलिकडे-पलीकडे विचार केल्यास महाराष्ट्रात नक्कीच अनेक पुरोगामी विचारवंत झाले, त्यांच्यामुळे बदल देखील झाले. बदलाची प्रक्रिया आर्थिक संपन्नतेवरुन अवलंबून असु शकेल. त्यातून भारतात त्याचा वेग कदाचित संथ असेल कारण बहुधर्म आणि बहुजातिनिष्ठ प्रथाविविधता.

पैसा Sat, 08/24/2013 - 22:06
अनेक प्रश्न मनात उभे राहिलेले. त्यांना वाचा फोडलीत. उत्तरे शोधते आहे. महाराष्ट्र अगदी इतिहासात सुद्धा बर्‍यापैकी पुरोगामी राहिला. शिवाजी महाराज तसे काळाच्या पुढेच होते. जातीभेद संपवणारी संतमंडळी आणि नंतरच्या काळात राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळींची नेतृत्वं महाराष्ट्रातच उभी राहिली. पण हा पुरोगामी महाराष्ट्र १९६० मधेच संपला बहुतेक. नंतर आम्ही विरुद्ध ते असे अनेक सामने उभे राहिले. जागतिकीकरण आता आले. त्यापूर्वी भारतात सामील होण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली. बिहारी, बांगलादेशी, दक्षिणी अनेक मंडळी महाराष्ट्राच्या वातावरणाला भुलली आणि बहुसंख्येने मुंबईच्या आसर्‍याला आली. आता शेट्टी आणि डो. दाभोळकरांच्या हत्या एकामागोमाग झाल्या आणि नंतर त्यासारखीच भीषण अशी भर दिवसा मुंबईत गँगरेप झाल्याची बातमी आली. महाराष्ट्र पुरोगामी वगैरे काही राहिला नाहीये. सगळ्या भारतभर जे चालू आहे तेच महाराष्ट्रातही घडते आहे. आपण संवेदना शिल्लक राहिलेले लोक इतरांसारखे मुर्दाड कधी होणार एवढाच प्रश्न आहे.

ही पुरोगामी ,प्रतिगामी काय भानगड आहे बुआ मी तर स्वतःला युरोपियन समजतो. विज्ञान हा धर्म .भांडवलशाही माझी जात व जागतिकीकरण ही उपजात वैश्विक नागरिक मुक्काम पोस्ट....

विनोद१८ Sun, 08/25/2013 - 23:37
मित्रहो जर जरा खालील दुव्यावर जाउन या म्हणजे 'सावरकरान्चे पुरोगामित्व' म्हणजे काय ते कळेल. 'पुलन्च्या भाषणात....!!!!' 'स्वातन्त्र्यवीराना' समजून घेता येइल. https://www.youtube.com/watch?v=U0S9179jgRc विनोद१८