Skip to main content

सरंजामशाही संपली आहे का?

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 10/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं. शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो. व्यवहारासाठी उदयन राजेंचे NOC लागते. राजेंचे कार्यकर्ते ते मिळवुन देण्यासाठी कमिशन घेतात. ह्याविरुद्ध श्रमजीवी रयत संघटना अनेक वर्षांपासुन लढा देतेय, पण सरकार मौन बाळगुन आहे. मुळात ह्या गोष्टींसाठी जनतेला आंदोलन करावं लागणं हेच शिवरांयाच्या घराण्याला शोभनीय नाही. शिवाजी महाराज खुद्द असते, तर त्यांनी काय केले असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. पण आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते. एकीकडे समाजवादाला नावं ठेऊन भांडवलशाहीकडे वाट करत असलेल्या आपल्या देशात नोकरशहा, भांडवलदार, राज्यकर्ते, माफ़िया ही चांडाळ-चौकडी मोकाट सुटलेली दिसते. हा नवसरंजामवर्ग उदयास आलेलाच आहे, पण जुना सरंजाम वर्ग तरी कुठे संपलाय? जुने सरंजाम राजकारणातुन कधीही ह्द्दपार झाले नाहीत, पण त्याचे कारण म्हणजे आपण समाजवादी धोरणं नीटशी राबवलीच नाही हेच आहे. समाजवादाच्या नावाखाली कायदे तर अनेक केले, पण त्यांचा उपयोग लोकांना त्रास द्यायला आणि संरजामी वर्गाचं उपद्रवमुल्य कायम ठेवण्यासाठीच झाला. आपण जाती-धर्म-भाषा-प्रांत ह्या सगळ्या विषयांवरुन तावातावाने वाद घालतो, चर्चा करतो. त्यावरुनच आपले राजकिय मत बनते. पण आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. आपण त्याबद्दल अजिबात बोलत नाही. अब्दुल कलाम रांगेत उभे राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटते. पण ते असंच असायला नको का? मनमोहन सिंगांच्या सेक्युरिटीमुळे ट्रॅफ़िक अडवुन ठेवली जाते, त्यामुळे दवाखान्याला जात असणारे रुग्ण दगावतात तरी आपल्याला फ़ारसे काही वाटत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते. संधी मिळत नाही एव्हढेच.

वाचने 13821
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

माझ्या माहितीनुसार जम्मु व काश्मीर राज्याखेरीज संपूर्ण भारतात ५० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन एका व्यक्तिच्या नावावर असू शकत नाही. याबाबतचा कायदा स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आला. इथे तर मर्यादेपेक्षा जवळ जवळ २३० पट जमीनीचा उल्लेख आहे. भोगवटादार म्हणजे नेमके काय?

लेखातील भावनांशी सहमत. पण मग काय करायला हवे?

ऐकीव माहीतीवरुन निष्कर्ष काढु नका . मटा पुर्णपणे विकलेला पेपर आहे अगदी सकाळ सारखाच .... आणि महाराजांच्या विरुध्द ही जी काय गरळ ओकण्याचा प्रकार चाललाय तो केवळ राजकारणाचा प्रकार आहे . त्याचा जोरदार निषेध.

मुळ बातमीबद्दल कल्पना नसल्यानं अधिक भाष्य करता येत नाही. मात्र 'भारतातील सरंजामशाही संपली आहे का?' हा प्रश्नच मुळात चुकीचा वाटतो. खरं म्हणजे, असा प्रश्न पडण्याचं कारणच नसावं. स्वातंत्र्याआधीची गोष्ट एकवेळ सोडूनच देऊ, पण त्यानंतरच्या इतक्या वर्षातलं नग्न वास्तव नजरेसमोर आहेच. स्वातंत्र्यानंतरही संस्थानिक टेचात मिरवत होतेच. बाईनं पंतप्रधान झाल्यावर संस्थानिकांच्या मुसक्या आवळल्या (असं आमच्या इतिहासाचे जगताप गुर्जी सांगायचे.) पण सरंजामशाही संपली का? संस्थानं गेली, अन मतदारसंघ आले! फरक फार काही नाही. असं असताना आपण सामान्य जनतेनं असे वेडगळ प्रश्न विचारणं शोभतं का दादा (दादा म्हणल्यास राग आला असेल तर क्षमस्व! ;) भाऊ म्हणतो, आण्णा म्हणतो...तुम्हाला काय आवडेल ते म्हणातो.)?

अतिशय एकतर्फी आणि अज्ञानानी भरलेला धागा…जर पूर्ण माहिती नसेल तर असे धागे टाकू नका…त्या बावळट आमदाराने छत्रपतींच्या राज्याभिषेकाची खिल्ली उडवली, उभ्या महाराष्ट्रासाठी जो सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता त्याचा त्याने अपमान केला त्यावरूनच त्याची लायकी कळली

In reply to by मालोजीराव

त्या बावळट आमदाराने छत्रपतींच्या राज्याभिषेकाची खिल्ली उडवली, उभ्या महाराष्ट्रासाठी जो सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता त्याचा त्याने अपमान केला त्यावरूनच त्याची लायकी कळली
जर तुम्हाला या बद्दल माहिती असेल तर तुम्ही ती शेअर का करत नाही? बातमी फक्त महाराष्ट्र टाइम्स ला आलेली नाहिये. मी तर ती टिव्ही वर पाहिली. बाकी आमदारांनी छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची खिल्ली उडवली आहे असे वाटत नाही.

In reply to by मालोजीराव

सदर लेखक हे मुक्तपीठ कम्युनिटीवरती लिहिणारे शैलेंद्रसिंहच असतील, तर ह्या धाग्यात आश्चर्य काही नाही. घाऊक ब्राह्मण द्वेषानंतर आता घाऊक मराठा द्वेषाला सुरुवात येवढाच त्याचा पारिपाक आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो मालक त्यांनी बातमी चा संदर्भ देऊन चर्चेसाठी धागा काढला असता तर योग्यच होता पण इथे ते स्वतःच निष्कर्ष हि काढतायेत. उद्या मी पण धागा टाकू शकतो असा बिनबुडाचा कि या धागाकर्त्याने जमिनी हडपल्या गोर-गरिबांच्या मग त्यावर स्पष्टीकरणासाठी उतारे च्या उतारे लिहावे लागतील यांना ;) आम्हीपण माहिती देऊच कि साहेब, पण धागाकर्त्याने पण दोन्ही बाजू तपासून घ्याव्यात आणि मग असले बिनबुडाचे धागे टाकावेत हीच अपेक्षा आहे. त्यांना या जमिनी बाबत काय माहिती आहे ती त्यांनी द्यावी मग आम्ही ती क्रॉस करूच कि !

In reply to by मालोजीराव

मालोजीराव, अहो अशा कथीत समाजसेवक आणि अत्याचारविरोधी लढ्यातील सेनापतींना कोणी पुरावे मागते होय ? ते म्हणतील ती पूर्वदिशा. ते म्हणाले 'राजे चोर आहेत' की राजे चोर आहेत. ते म्हणाले 'ब्राह्मण अत्याचारी आहेत' की ब्राह्मण अत्याचारी आहेत हे मान्य करायचे, ते म्हणाले 'मराठेच आरक्षणाविरुद्ध आहेत' की आपण लगेच मान डोलवायची. ते म्हणाले 'शिवाजी महाराज की...' की आपण जय !! म्हणायचे. ते म्हणाले 'राजांना देव बनवू नका' की आपण लगेच इतिहासाची पुस्तके फाडून टाकायची. ;) कसे कळत नाही बरे तुम्हाला ? तुमचे नाव आता 'मालोजीराजे' ठेवायला हवे.

In reply to by मालोजीराव

जमिनी हडपल्या हे कुठे लिहिलंय..लिहिलं असेल तर ते अधोरेखित करा. माझ्यासारख्याच अनेकांचा असा समज होता/आहे की जमिनींचे वाटप केलं गेलं आणि कोणालाही ५० एकरपेक्षा अधिक शेतजमीनीची मालकी मिळु शकत नाही. ह्या कायद्याचा अभिमानच वाटायचा. पण त्यामधे भोगवटादार सारखी मेख आहे ज्यामुळे तो कायदा अजुनही सरंजामांचे हितसंबंध कसे जोपासतो हे कळुन आले. ह्याविरोधात जो मोर्चा गेला त्याला शिवसेनेचेही समर्थन होते. शिवसेनेचेही आमदार तिथे उपस्थित होते. तेव्हा कोणी राज्याभिषेकाची खिल्ली उडवली वगैरे चर्चा गौण आहेत इथे. राज्याभिषेकाची इतकी काळजी करत असाल तर महाराजांनी स्वत: काय केले असते ह्या परिस्थितीत ह्याचाही विचार करायला हवा. निदान कमिशन घेणाऱ्यांवर तरी कारवाई केलीच असती की नाही?

In reply to by शैलेंद्रसिंह

ज्या राजघराण्यांना विशेष दर्जा आहे ती घराणी ५० एकरांपेक्षा जास्त जमीन ठेऊ शकतात, त्यात सातारा,कोल्हापूर येथील छत्रपति घराणी आहेत. एव्हडच नाही अजूनही काही किल्ले,तलाव,राजवाडे,काही प्रसिद्ध देवस्थाने यांच्या मालकी हक्कात येतात. ज्या वसईच्या आमदाराला सातार्यातल्या शेतकऱ्यांचा पुळका आला त्याच्या एजंट लोकांचा महाबळेश्वर मध्ये सुळसुळाट होता हे लोक स्थानिक शेतकऱ्यांची खोटी कागदपत्रे तयार करून जमिनी विकत,नंतर त्या लोकांना महाराज साहेबांच्या लोकांनी चेम्बवला आणि याच्यावर खटले भरले. त्याचा राग धरला असावा. मूळ मुद्दा जमिनींचा १६५९ साली जेव्हा थोरल्या महाराजांनी अफ्झुल्या ला मारला तेव्हा प्रतापगड भवानीआई ची स्थापना उत्सव चालू झाला त्यासाठी छत्रपति राजेंनी ५ गाव जमीन इनाम दिल्या ,नंतर त्यांचे नातू थोरले शाहूजी यांनी दोन गाव इनाम दिले,पुढे पेशव्यांनी पुन्हा ३ गाव जमीन इनाम आणि सालाना २०० रुपये भवानी आई च्या उत्सव खर्च आणि सरंजामास दिले. अश्याच जमिनी छत्रपतींनी पाल चा खंडोबा, शिखर शिंगणापूर शंभू महादेव, वाडी रत्नागिरी ज्योतिबा, यमाई देवी यांनाही दिल्यात ज्या छत्रपति घराण्याच्या आहेत. परंतु तिथे कसण्याची परवानगी मिळालेल्या शेतकऱ्यांचे जे देवाला खंड देत होते नंतर कुळ लागले. कुळकर्यांना जमीन विक्री चे अधिकार नसतात (कुळाचे काही प्रकार आहेत या प्रकारात विक्री करता येत नाही ). सरकारने प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली तर मालकाला ७ ० % आणि कुळकर्याला ३० % भरपाई मिळते. वाई,महाबळेश्वर भागात काही स्पेशल झोन्स,पाटबंधारे चे प्रकल्प,सेकंड महाबळेश्वर वगैरे प्रकल्प येणारेत अशी कुणकुण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमिनी विकून परतावा मिळवायचा आहे.
कायदा अजुनही सरंजामांचे हितसंबंध कसे जोपासतो हे कळुन आले.
बाकी तुमचं विधान बरंच हास्यास्पद आहे हो, शिवराय,पेशव्यांनी पुण्याच्या उभारणीत लावलेला हातभार,छत्रपति घराण्यांनी केलेली सातारा,कोल्हापूर,नागपूर ची उभारणी. पंत सचिव,पंत प्रतिनिधी,पटवर्धन,पुरंदरे घराण्यांनी भोर ,औंध , सांगली,सासवड चा विकास. होळकर,शिंदे,गायकवाड,पवार,आंग्रे,खेमसावंत,नाईक-निंबाळकर यांनी उभा केलेली इंदोर,ग्वाल्हेर,बडोदा,धार,अलिबाग,सावंतवाडी,फलटण हि शहरे तुम्हाला दिसली नसतीलच. बर गेला बाजार राजर्षी शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड,राजमाता सुमित्रा राजे,भवानीराव पंत प्रतिनिधी,सरफोजीराजे भोसले (तंजावर कलाकेंद्र), अहिल्याबाई होळकर यांचेही कार्य दिसल नसेल. शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एजुकेशन सोसायटी,रयत शिक्षण संस्था, SSPMS यांना दिलेल्या हजारो एकर जमिनी कुणाच्या आहेत हेही तपासून घ्या. आणि त्या तुलनेत निवडून दिलेल्या आत्ताच्या राज्यकर्त्यांशी तुलनाही करून पहा. वाढदिवसाला एका नेत्याने ऐन दुष्काळात ७० हजार लोकांच्या जेवणावळी घातल्या त्याची न्यूज झाली पण उदयन राजेंनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून ५००० चार्याच्या गाड्या दुष्काळग्रस्त भागात स्वनिधी ने पाठवल्या हे नसेल पाहिल.

In reply to by मालोजीराव

सरंजाम वर्गाचं कार्य अर्थात असणारच आहे. राज्यकर्ता वर्ग असल्याने त्यांनी काम केलेही असेलच. पण लोकशाही समाजवादात त्यांना ’कामं करण्यासाठी’ विशेष अधिकार का द्यावेत? कारण ते राजकुळात जन्मले म्हणुन? उद्या अंबानीची पोरं म्हणतील की आम्हाला पण असे अधिकार द्या, आमच्या बापजाद्यांनी बरंच मोठं कार्य करुन ठेवलंय. आपली व्यवस्था त्यांना तो अधिकार देईलही आपल्याला त्यात काही वावगंही वाटणार नाही. तुम्ही कायद्यातल्या तरतुदींवर प्रकाश पाडला त्याबद्दल धन्यवाद. पण त्या तरतुदी सरंजामांच्याच बाजुने आहेत असं नाही का वाटत? सरंजामांची माणसं/मध्यस्त सर्वसामान्यांना त्रास देऊ शकतील ह्याची काळजीच ह्या कायद्यातील तरतुदींनी घेतलेली दिसते. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या जमिनी/गावं छत्रपतींनी इनाम म्हणुन दिले होते ते त्यांच्या तत्कालीन राज्यकारभारानुसार होते. ती राज्याची जमीन होती. त्यावेळी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही अस्तित्वात नव्हते. गावाचा महसुल मिळावा म्हणुन इनाम दिलं जायचं. महसुल शेतसाऱ्यातुनही यायचा. त्यासाठी शेती करणारे लोकंही असणं गरजेचे होतं. शेतीवर वहीवाटीचा हक्क शेतकऱ्यांचा असायचा. ब्रिटीश आल्यानंतर जमीनीच्या प्रॉपर्ट्या व्हायला लागल्या. जमिनीची मालकी, खरेदी-विक्री असा प्रकार सुरु झाला. स्वतंत्र भारतात विलीन होण्याआधी प्रत्येक संस्थानिकाने आपल्या जमीनींचे सर्वेक्षण करुन आपली मोठी प्रॉपर्टी करुन घेतली. विवेक पंडित कसली खुन्नस खाऊन आंदोलन करत आहेत ह्याच्याशी काहीही देणेघेणे नाही कारण त्यांचा मुद्दा बरोबर वाटतोय. मुद्दा बरोबर असल्यास प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. भारत सरकार ह्या संस्थेने आजवर इतकं काम केलं, तरी सरकारवर टिका करतोच ना आपण? आणि हे आंदोलनही उदयन राजेंविरुद्ध नाही, सरकारविरुद्धच आहे. कायदा बदलला तर त्यातुन अनेक संस्थानिकांच्या जमिनी जातील आणि तो कायदा बदललाच पाहिजे.

In reply to by शैलेंद्रसिंह

सरंजाम वर्गाचं कार्य अर्थात असणारच आहे. राज्यकर्ता वर्ग असल्याने त्यांनी काम केलेही असेलच. पण लोकशाही समाजवादात त्यांना ’कामं करण्यासाठी’ विशेष अधिकार का द्यावेत? कारण ते राजकुळात जन्मले म्हणुन?
हे विशेषअधिकार द्यायलाच हवेत,राष्ट्राच्या उभारणीस तेव्हडा हातभार त्यांनी नक्कीच लावलाय. आणि असेही विशेष अधिकार राज घराण्यांना इंग्लंड,स्कॉटलंड,जर्मनी,फ्रांस आणि जवळपास पन्नासेक देशात आहेतच कि, मग तुम्हाला फक्त महाराज साहेबच काय दिसतात ?
तरतुदी सरंजामांच्याच बाजुने आहेत असं नाही का वाटत? सरंजामांची माणसं/मध्यस्त सर्वसामान्यांना त्रास देऊ शकतील ह्याची काळजीच ह्या कायद्यातील तरतुदींनी घेतलेली दिसते.
छत्रपति घराण्यातील प्रत्येक व्यक्ती समाजकारणात आहे त्यांना सरंजाम म्हणता येणार नाही. सहकार,शिक्षण प्रत्येक क्षेत्रात लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम केलय त्यांनी.
जमिनी/गावं छत्रपतींनी इनाम म्हणुन दिले होते ते त्यांच्या तत्कालीन राज्यकारभारानुसार होते. ती राज्याची जमीन होती. त्यावेळी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही अस्तित्वात नव्हते.
इतिहासाच्या अभ्यासाची प्रचंड गरज आहे तुम्हाला…आमच्या घराण्याची शिवपूर्व-कालीन १०० वर्षे म्हणजे ४५० वर्षे जुनी जमीन खरेदी ची कागदपत्रे आहेत अगदी सीमारेषे सह. राज्याची ती जमीन नव्हती ,छत्रपति आणि पेशव्यांनी जी गावे इनाम दिलेली ती त्यांच्या स्वताच्या पाटीलकीची होती.आणि त्याची कागद पत्रेही उपलब्ध आहेत.
विवेक पंडित कसली खुन्नस खाऊन आंदोलन करत आहेत ह्याच्याशी काहीही देणेघेणे नाही कारण त्यांचा मुद्दा बरोबर वाटतोय. मुद्दा बरोबर असल्यास प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे.
त्याचे सगळे मुद्दे चुकीचे आहेत आणि संदर्भासह मांडले आहेत. पण तुम्ही आतापर्यंत या संदर्भात एकही पुरावा आणि संदर्भ दिलेला नाही. संदर्भ कसा द्याल एक दोन बातम्या वाचून लेख टाकणार्यानकडून काय अपेक्षा ठेवावी.

In reply to by मालोजीराव

इतिहासाच्या अभ्यासाची प्रचंड गरज आहे तुम्हाला…आमच्या घराण्याची शिवपूर्व-कालीन १०० वर्षे म्हणजे ४५० वर्षे जुनी जमीन खरेदी ची कागदपत्रे आहेत अगदी सीमारेषे सह. राज्याची ती जमीन नव्हती ,छत्रपति आणि पेशव्यांनी जी गावे इनाम दिलेली ती त्यांच्या स्वताच्या पाटीलकीची होती.आणि त्याची कागद पत्रेही उपलब्ध आहेत.
जमीनीची खरेदी विक्री करुन पाटीलकी मिळवता येते हे ठाऊकच नव्हते मला. जमीनीची खरेदी-विक्रि असा प्रकारच अस्तित्वात नव्हता इतका अभ्यास नक्कीच आहे. पाटीलकीची गावं इनाम म्हणुन दिली होती ना? इनाम म्हणुन का दिली जातात गावं? त्या गावांचा महसुल लाभार्थीला मिळावा म्हणुन अन्यथा तो महसुल कुठे जातो? राज्याच्या तिजोरीत. इथे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्नच येत नाही. पाटलाचं काम महसुल जमा करणं आणि तिजोरीत जमा करणं.

In reply to by शैलेंद्रसिंह

जमीनीची खरेदी विक्री करुन पाटीलकी मिळवता येते हे ठाऊकच नव्हते मला.
अस कुठेच लिहिल नाहीये
जमीनीची खरेदी-विक्रि असा प्रकारच अस्तित्वात नव्हता इतका अभ्यास नक्कीच आहे.
मग चुकीचा अभ्यास आहे तुमचा...
पाटीलकीची गावं इनाम म्हणुन दिली होती ना? इनाम म्हणुन का दिली जातात गावं? त्या गावांचा महसुल लाभार्थीला मिळावा म्हणुन
साहेब तेच सांगतोय कधीपासून, इथे लाभार्थी भवानी देवी संस्थान आणि शिखर शिंगणापूर संस्थान आहे

In reply to by मालोजीराव

जमिनीचा मालकी हक्क ही संकल्पना मध्ययुगीन भारतात वेगळी होती. राजे मंडळी जहागिरी देऊ शकायचे. त्याला वशंपरंपरागतही बनवु शकायचे. पण जहागिरी, देशमुखी, पाटीलकी हे सगळे महसुलीचे अधिकार असत. जमिनीची मालकी राजाकडेच राहत असे. एखादा पाटील गावाची जमीन इतरांना विकु शकत नसे, मात्र त्या गावाच्या जमिनीवर कुठल्या भागात कोण शेती करेल वगैरे नियमन करायचे, तिथे न्यायनिवाडा करायचा, सारा जमा करायचा त्यातला स्वत:चा हिस्सा ठेऊन बाकीचा राजाकडे पोहोचवायचा इतके बेसिक अधिकार गावच्या पाटलाला असत. खरेदी-विक्रीचे नाही. त्या अर्थाने जमिनीचा मालकी हक्क आणि वैयक्तिक खरेदी-विक्री हा प्रकार ब्रिटीशांनी भारतात रुजवला. अनेक संस्थानांना इनाम म्हणुन मिळालेली जमीन ही त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी बनली. ह्या प्रकारात ब्रिटीश अधिकाऱ्यांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांच्या श्रीमंतीच्या गाथा थेट ब्रिटीश पार्लमेंटमधे चर्चिल्या जाऊ लागल्या. तुम्ही महालवारी, रयतवारी, जमिनदारी सिस्टम बद्दल वाचा, गुगल करा. खुप चांगली माहिती मिळेल. नाहीतर हि लिंक तेव्हढी वाचा. http://www.ghadar.in/gjh_html/index.php?q=node/68

In reply to by मालोजीराव

इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत केल्याबद्दल किंवा अजून कसलीही मदत केल्याबद्दल विशेषाधिकार देण्याचे काही खास कारण? बाहेरच्या देशात काही अधिकार देवोत न देवोत, इथे ते अधिकार देण्याचे कारण स्पष्ट होत नाही. बाकी सातारकरांबद्दल सध्याच्या काळातली काही विशेष माहिती नसल्यामुळे तूर्त पास.

In reply to by मालोजीराव

कोल्हापुर येथिक श्री जोतिबा देवस्थान व त्याचा शेकडो एकर डोंगर आजही गाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या मालकीचा आहे.परंतु त्यानी इथे येवुन त्यावर अधिकार गाजवल्याचे एकिवात नाही. बाकी चाळु द्या.

In reply to by वेताळ

तसेच अजुन एक देशमुख सरकार माझ्या माहितीतले आहेत त्यानी त्याच्या ५०० एकर मधील १०० एकर जमीन चांदोली धरण प्रकल्पातील निर्वासिताना दिली आहे. १५० एकर कुळाना दिली आहे.बाकी चालु द्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा-दलित मारामाऱ्यांनी अवघे महाराष्ट्राचे राजकारण वेठीला धरले गेल्यावर इतरांनी गप्प बसायचं असतं किंवा त्याच्या एकाची बाजु घ्यायची असते असा संकेत आहे का? बाकी तुझ्या सनकीपणावर टीका म्हणजे ब्राह्मणांचा घाऊक द्वेष..उदयन राजेंवर टिका म्हणजे मराठ्यांचा घाऊक द्वेष हे तर्कशास्त्र अजबच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मीच आहे तो. ब्राह्मण-मराठा-दलित मारामाऱ्यांनी अवघे महाराष्ट्राचे राजकारण वेठीला धरले गेल्यावर इतरांनी गप्प बसायचं असतं किंवा त्याच्या एकाची बाजु घ्यायची असते असा संकेत आहे का? बाकी तुझ्या सनकीपणावर टीका म्हणजे ब्राह्मणांचा घाऊक द्वेष..उदयन राजेंवर टिका म्हणजे मराठ्यांचा घाऊक द्वेष हे तर्कशास्त्र अजबच आहे.

In reply to by शैलेंद्रसिंह

बाकी तुझ्या सनकीपणावर टीका म्हणजे ब्राह्मणांचा घाऊक द्वेष..उदयन राजेंवर टिका म्हणजे मराठ्यांचा घाऊक द्वेष हे तर्कशास्त्र अजबच आहे.
तुम्ही खरंच येवढे मंद आहात, का राग आला की तुमची बुद्धी काम करेनाशी होते ? मी तुमच्या आजवरच्या 'एकूणच सर्व लेखनाचा' परिपाक म्हणून ते वाक्य लिहिलेले आहे. जरा उत्तर देण्याआधी डोके शांत ठेवून पूर्ण प्रतिसाद वाचत चला की. लगेच शेराला सव्वाशेर होण्याची इच्छा बाळगून असे घाईघाईने प्रत्युत्तर द्यायला जाऊ नये. काय होते, उद्या उघडा पडणारा चेहरा आजच उघड पडतो. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओह.. अच्छा..’माझ्या आजवरच्या लेखनाचा परिपाक’ म्हणुन तुला मी ब्राह्मणद्वेष्टा किंवा मराठाद्वेष्टा वाटतो. मग ठीक आहे. मला वाटलं की तुला ह्या धाग्यावर मराठाद्वेष दिसला. माझ्यासारख्या मंदबुद्धीला तो दिसला नव्हता म्हणुन वाटलं की तुझी सनकी खोपडी जागृत झाली की काय. ते वाटायलाही कारण आहेच…”तुझ्या आजवरच्या लेखनाचा परिपाक”

In reply to by शैलेंद्रसिंह

उत्तरे तरी स्वशैलीत देत चला हो. तिथे पण साला कॉपी पेस्ट. शेवटी ज्याची त्याची जाण समज... असो.. पुन्हा टैमपास करायचा असेल तेव्हा भटकूच तुमच्या धाग्यावरती. तेवढीच जरा वादावादी झाली की अंमळ करमणूक होते, आणि वेळ पण बरा जातो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

माझ्या शैलीत उत्तर दिलं तर म्हणशील तर ब्राह्मण-मराठा द्वेष्टा आहे. त्यापेक्षा तुला जितकं कळतं तेव्हढंच आणि त्याच शैलीत लिहावं असं वाटलं. बाकी करमणुकीची अनेक साधनं आहेत.

In reply to by शैलेंद्रसिंह

बाकी करमणुकीची अनेक साधनं आहेत.
खरंच सांगतो, तुमचे वेडझवे लिखाण आणि हे असे सगळ्यांना 'अरे जारे' करणे ह्यापेक्षा अजून काही भारी करमणुकीची साधने या जगात उपलब्ध असतील असे वाटत नाही.. म्हणजे खरेतर तशी खात्रीच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्वत:चे लिखाण वाचत जा, मत बदलेल. उदा. तुला अरे-जारे करणं म्हणजे सगळ्यांना अरे-जारे करणं….ह्या धाग्यात घाऊक मराठा द्वेषाला सुरुवात होणं इत्यादी

In reply to by शैलेंद्रसिंह

अजून थोडे मोठे प्रतिसाद लिहा ना. प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज. मला मोठे विनोद वाचायला आवडतात.

> ऐकीव माहीतीवरुन निष्कर्ष काढु नका . मटा पुर्णपणे विकलेला पेपर आहे अगदी सकाळ सारखाच हे मात्र खरे आहे गिरीजा साहेबांचे एखाद्या माहितीवर मत व्यक्त करण्यापूर्वी ती खरी आहे का हे तपासायला पाहीजे.

शैलेन्द्र , तु जाणते पणे महाराजांचा उल्लेख सरंजाम असा करत आहेस ... त्याच्या जोरदार निषेध !! महाराज साहेबांबाबत बोलताना कोणाविषयी बोलत आहोत ह्याचं तारतम्य बाळगा . शैलेन्द्र , लोकशाही असली तरीही You are accountable for every single word you say .

In reply to by प्रसाद गोडबोले

एक होते शिवाजी महाराज..ज्यांनी सरंजामशाही नष्ट करुन मजबुत केंद्र असलेले राज्य बनवले. एकीकडे ते आहेत आणि दुसरीकडे त्यांचे वंशज ज्यांनी पुन्हा जहागिऱ्या द्यायला सुरुवात केली आणि पुढे पुढे ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करुन स्वत:च एक संस्थानिक बनले. आम्ही आमच्या प्रत्येक शब्दाला जबाबदार आहोतच, तुम्ही काळजी करु नका. तुम्ही निदान आपल्या निष्ठा जबाबदारीने निभवा..म्हणजे झालं.

In reply to by शैलेंद्रसिंह

दुसरीकडे त्यांचे वंशज ज्यांनी पुन्हा जहागिऱ्या द्यायला सुरुवात केली आणि पुढे पुढे ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करुन स्वत:च एक संस्थानिक बनले.
वर सांगितल्याप्रमाणे इतिहासाचा अभ्यासण्याची नितांत गरज आहे तुम्हास…माहिती नसल्यास बेजबाबदार विधान करू नका ! हा स्वतंत्र ५-१० पुस्तक होतील एवडा मोठा विषय आहे, तुम्ही फक्त मुद्द्याच तेव्हड बघा कि
आम्ही आमच्या प्रत्येक शब्दाला जबाबदार आहोतच, तुम्ही काळजी करु नका. तुम्ही निदान आपल्या निष्ठा जबाबदारीने निभवा..म्हणजे झालं.
आमची निष्ठा आम्ही ३५० वर्षांपासून निभावतोयच कि, पण तुम्हीच महाबळेश्वर मध्ये पंडितांनी सोडलेल्यानपैकी एक निष्ठावंत तर नाई ना ?

In reply to by मालोजीराव

तुमच्या सारखी पराकोटीची "स्वामिनिष्ठा" आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्याच बरोबर आजच्या छत्रपतींच्या वंशजांचे वर्तनही खूप जवळून पाहिलेले आहे. त्या तथाकथित निष्ठेचे वर्णन फक्त 'कीव येते' इतकेच करू शकतो. तुमच्यासारख्यांच्या रूपाने सरंजामशाही अजूनही सुरूच आहे. बाकी चालू द्या.

In reply to by आनंदी गोपाळ

अरे वा आमच्या निष्ठेवर जळणारे बरेच आहेत की ! ज्यांना इतिहास असतो त्यांना निष्ठा म्हणजे काय माहित असत,ज्यांना नसतो ते भेळ तिथे खेळ करतात. आणि आम्हाला या गोष्टीची कीव नाही आली कधी तुम्ही ही करण्याची गरज नाही. छत्रपतिंची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा

In reply to by प्रसाद गोडबोले

कुणीही थोरल्या महाराजांबद्दल इथे उणे शब्द काढलेले नाहीत. जे काय लेखन आहे ते आजच्या पुंडांबद्दल आहे. वडाची साळ पिंपळाला लावू नका.

In reply to by आनंदी गोपाळ

थोरल्या महाराजांविषयी कोणी काही बोलले नाही हे कळत आहेच आम्हाला पण श्रीमंत छत्रपति उदयन महाराज साहेब ह्यांच्या जो एकेरी सरंजाम असा उल्लेख चाललाय त्याच्या निषेध केलाय मी .
जे काय लेखन आहे ते आजच्या पुंडांबद्दल आहे.
>>> ह्यातल्याही "पुंड" ह्याशब्दाचा नक्की अर्थ क्लीयर करा. महाराज , महाराज आहेत हे लक्षात ठेवा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

माफ करा पण लोकशाहीत सगळे एक समान नसतात का? उदयन राजे हे राजघराण्यात जन्माला आले यात त्यांचे कर्तुत्व काय? लोकशाही ने त्याना आणि मला आणि तुम्हाला सारखेच अधिकार आणि हक्क दिले आहेत. नाही का? मी उदयन राजे या प्रकरणात दोषी आहेत असे म्हणत नाही. पण ते राजे आहेत आणि आपण सर्व सामान्य प्रजेने त्याना अजुन पण कायम मुजरा घालावा असा सूर तुमच्या प्रतिक्रियेत दिसला ताई

In reply to by पिंपातला उंदीर

कायम मुजरा घालावा
असं कुठेही म्हणलेलं नाहीये , "राजघराण्याविषयी आदर ठेवावा" अशी अपेक्षा आहे . (चर्चा भरकटवण्याचा उद्देश नाही पण हे विचारायचा मोह आवरत नाहीये ...
माफ करा पण लोकशाहीत सगळे एक समान नसतात का? उदयन राजे हे राजघराण्यात जन्माला आले यात त्यांचे कर्तुत्व काय?
हा प्रश्ण राजीव गांधी संजय गांधी राहुल गांधी ह्यांच्या बाबतीत विचारला का हो कोणी ?? अजुनही बाईं पुढे लोटांगण घालतच आहेत ना बहुसंख्य लोक ? ते चालते अन पुण्यश्लोक शिवछत्रपतिंच्या वंशजांना आम्ही आदर दाखवायला निष्ठा दाखवायला गेलो की चालत नाही ... ह्याला शुध्द मराठीत हिप्पोक्रसी म्हणतात )

In reply to by प्रसाद गोडबोले

बहुसंख्य लोक एखादी गोष्ट चुक करत असतील तर ती नैतिक दृष्ट्या बरोबर ठरेलच असे नाही. चुका करणारा माणूस कुठल्या घराण्यातला आहे यावरून त्याच्या चुका आहेत किंवा नाहीत हे कसे ठरवू शकता? मग तो गांधी घराण्यातला असो वा अजुन कुठल्या राज घरांतला. दारू घेऊन प्रेस कान्फरेन्स घेणार्‍या आणि खुनाचा आळ असणारा इसम निव्वळ तो एका विशिष्ट घरातला असल्याने इतरांच्या आदाराचा विषय होवो ही तुमची अपेक्षा असली तर धन्य

In reply to by पिंपातला उंदीर

>>> दारू घेऊन प्रेस कान्फरेन्स घेणार्‍या आणि खुनाचा आळ असणारा इसम निव्वळ तो एका विशिष्ट घरातला असल्याने इतरांच्या आदाराचा विषय होवो ही तुमची अपेक्षा असली तर धन्य १००१ टक्के सहमत! खुनाचा आरोप आल्यावर ५ व्या मिनिटाला छातीत दुखायचे नाटक करून अटक टाळली व तब्बल २ वर्षे हे नाटक सुरू ठेवून रूग्णालयातील पंचतारांकित खोलीत मुक्काम ठोकला. नंतर २ वर्षांनी खटल्याचा निकाला आपल्याला पाहिजे तसा लागल्यावर (की लावल्यावर?) ५ व्या मिनिटाला यांचे दुखणे पळून गेले आणि त्यानंतर आजतगायत मस्त मजेत आहेत. राजेराजवाडे, संस्थानिक, संस्थाने, साम्राज्ये इ. स्वातंत्र्यानंतर केव्हाच लयाला गेले. आता या मंडळींना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढीसुद्धा किंमत नाही. पण यांचा उल्लेख श्रीमंत, छत्रपती, युवराज, युवराज्ञी, महाराज, राजर्षि अशा संरंजामशाहीवाचक व गुलामगिरीवाचक शब्दांनी अजूनही केला जातो हे पाहून अत्यंत खेद वाटतो.

In reply to by पिंपातला उंदीर

अमोल साहेब तुमचा मुद्दा एकदम पटण्यासारखा आहे, पण जर उदयन राजे स्वतः म्हणत असतील की मला राजे म्हणु नका, तर त्यांना राजे म्हणावे उदयन म्हणावे की उदया म्हणावे ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. हा विडिओ पूर्ण पहा म्हणजे लक्षात येइल

In reply to by मदनबाण

हे बोल चाणाक्याचे कि डॉ. चंद्रप्रकाशचे? चाणाक्याचा एक अर्थशास्त्रावरचा ग्रंथ सोडला तर त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ऑथेण्टीक ऐतिहासीक साधन उपलब्ध नाहि (बहुतेक ;) ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बरं झालं काडी सारली ते.... काय आहे चाण्यक्याची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी ९ वर्ष संशोधन केले. मी इथे अधिक टंकण्या पेक्षा विकिपिडीयावर वाचन करावे. :) वाचन करुन झाल्या नंतर अंदाज येईल की वरती दिलेल्या व्हिडीयोसाठी मी चाणाक्याचे बोल आजही महत्वाचे वाटतात असे का म्हंटले आहे.