मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

दिपोटी · · काथ्याकूट
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्‍या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे? विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते. माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?

वाचने 27395 वाचनखूण प्रतिक्रिया 108

विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी यांनी बरंच एकांगी आणि वादग्रस्त लिहून ठेवलंय. विजय तेंडूलकरांनी तर जे वादग्रस्त लिहीलंय तेही बर्‍यापैकी रटाळ आणि फारसं नावीन्य नसलेलं आहे. कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात. दडपशाही आणि हिंसेचा विरोध करणार्‍या या साहित्यिकाला शेवटी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याची इच्छा व्हावी यातच त्यांचे अपयश ठळकपणे दिसून येते. जयवंत दळवी यांनी गंमतीच्या गोष्टी सारखी पुस्तके लिहीली ज्यात अतिशय असभ्य मजकूर वापरून कथा लिहील्या आहेत. बरे एवढे करूनही त्या रंजक तर नाहीच. या दोन्ही साहित्यिकांनी इतर काही चांगली साहित्यनिर्मीती केली असली तरी वर उल्लेखित बाबींमुळे त्यांना ज्ञानपीठ सारखा मानाचा पुरस्कार देणे इष्ट ठरणार नाहीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. ज्ञानपीठ कुणाला द्यायचे हे ठरविण्याचा ज्यांना अधिकार आहे ते काय तो अंतिम निर्णय घेतीलच म्हणा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Sat, 10/08/2011 - 16:51
विजय तेंडूलकरांनी तर जे वादग्रस्त लिहीलंय तेही बर्‍यापैकी रटाळ आणि फारसं नावीन्य नसलेलं आहे.
तेंडुलकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा आरोप मान्य नसला तरी कळण्यासारखा आहे ... सर्वांची मते सारखी नसल्याने असे वाद निश्चितच उदभवू शकतात पण 'तें'चं साहित्य 'रटाळ व फारसं नावीन्य नसलेलं'?? हा आरोप मात्र मुळातच मजेदार/गमतीशीर व बिनबुडाचा वाटतो. काळाच्या व तत्कालीन साहित्याच्या पुढे असलेल्या 'तें'च्या साहित्यात नावीन्य नाही?!! खरे तर त्यांच्या साहित्यातील नावीन्यच तत्कालीन 'संस्कृतीरक्षकां'च्या पचनी पडले नाही म्हणून तर पुढील वाद निर्माण झाले (जे नंतर कालौघात शमले).
हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात. दडपशाही आणि हिंसेचा विरोध करणार्‍या या साहित्यिकाला शेवटी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याची इच्छा व्हावी यातच त्यांचे अपयश ठळकपणे दिसून येते.
'अर्धसत्य' सारखा वास्तववादी व नितांतसुंदर चित्रपट अपवादानेच निर्माण होतो. यातील हिंसा ही या चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने व ओघाने आली आहे ... हिंसेचा प्रसार व प्रचार करणे (किंवा गर्दी खेचणे) हे लेखकाचे उद्दिष्ट आहे असे यात कोठेही दिसून येत नाही. अर्थात आता फक्त goody-goody चित्रपट पहायची एखाद्याची आवड असेल तर त्याला/तिला हे चित्रपट 'हिंसेचे प्रचारक व कमी प्रभावी वाटतात' हे मग समजण्यासारखे आहे.
जयवंत दळवी यांनी गंमतीच्या गोष्टी सारखी पुस्तके लिहीली ज्यात अतिशय असभ्य मजकूर वापरून कथा लिहील्या आहेत. बरे एवढे करूनही त्या रंजक तर नाहीच.
दळवींच्या सर्वच साहित्यात असभ्य मजकूर असता तर तो एखाद्या विशिष्ट वाचकवर्गाला आकृष्ट करण्यासाठी केलेला स्टंट आहे असे आपण म्हणू शकलो असतो. पण अर्थात असे नाही आहे. 'गंमतीच्या गोष्टी' असे त्यांचे पुस्तक माझ्या तरी ऐकिवात/वाचनात नाही, त्यामुळे या पुस्तकाबद्दल काही बोलू/लिहू शकत नाही. मात्र एक खरे ... साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही. The very first step towards resolving a problem is acknowledging and accepting it (rather than pushing it under the carpet and denying its existence). या तत्वाचा एकदा स्वीकार केला की मग साहित्यातील (आशयाच्या व अभिव्यक्तीच्या अनुषंगाने आलेली) हिंसा, शिवराळपणा, इत्यादि असभ्य वा आक्षेपार्ह न वाटता तो साहित्यानुभव सकस बनवण्यास त्याचा हातभारच लागतो - नपेक्षा बाळबोध साहित्य वाचनापलीकडे आपली मजल पोचणार नाही.

In reply to by दिपोटी

अर्धसत्य चित्रपट मी फ्रेम टू फ्रेम पाहिलाय. ज्या मूळ सूर्य ह्या कथेवर तो बेतलाय ती देखील माझ्यापाशी आहे. चित्रपटात ह्या कथेचा व्यवस्थित विचका केला गेलाय. कमला हा चित्रपटही मी पाहिलाय. ऑनलाईन उपलब्ध असल्याने आपणही पाहू शकाल. रटाळ आणि प्रचारकी ही विशेषणे हा चित्रपट अगदी सार्थ ठरवितो. मला वाटतं आपण मुद्दा समजुन घेण्यात काहीतरी गल्लत केलीय. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या हिंसेविषयी माझा आक्षेप नाहीये. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते जे काही जाहिर रीत्या वादग्रस्त विधानं करीत होते त्यावर आहे. त्यांनी असं म्हंटलं की मला कुणीतरी एक पिस्तूल आणून दिलं तर मी नरेंद्र मोदींना संपवेन; त्याचप्रमाणे अजुन एका साहित्यिकाला त्यांनी मनोहर जोशींच्या हस्ते पुरस्कार घेऊ नका असा जाहीर सल्ला दिला (जो अर्थातच त्या सन्माननीय साहित्यिकांनी जुमानला नाही). बाकी त्यांना जसं लिहायचं तसं ते लिहीणारच... फक्त तुमच्या लेखात तुम्ही पुरस्कार देण्याविषयीचं मत मागितलंत आणि एक वाचक म्हणून मी ते नोंदविलं. माझं मत इतर कुणाला पटलंच पाहिजे असा माझा तेंडुलकरी दुराग्रह नक्कीच नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Sat, 10/08/2011 - 18:17
मला वाटतं आपण 'अर्धसत्य' हा चित्रपट समजून घेण्यात काहीतरी गल्लत केली आहे. तेंडुलकरांनीच नमूद केल्याप्रमाणे या चित्रपटाच्या पटकथेचा फक्त एक छोटासा भाग श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर बेतला गेला आहे, कथानकाचा उरलेला व बराचसा भाग तेंडुलकरांची निर्मिती आहे. तेव्हा 'या चित्रपटात या कथेचा विचका केला गेला आहे' हे विधान थोडे अतिशयोक्तीपूर्ण व खोडसाळ वाटते. 'अर्धसत्य' सारख्या सुंदर चित्रपटाला रटाळ म्हणता तेव्हाच आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडत असतील व रंजक वाटत असतील याची थोडीफार कल्पना येते. अर्थात येथे 'एकेकाची आवड' असे म्हणावे लागेल.

In reply to by दिपोटी

तेंडुलकरांनीच नमूद केल्याप्रमाणे या चित्रपटाच्या पटकथेचा फक्त एक छोटासा भाग श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर बेतला गेला आहे, कथानकाचा उरलेला व बराचसा भाग तेंडुलकरांची निर्मिती आहे. >> हे वेल्डींग च चूकले आहे अस माझे स्पष्ट मत आहे. तेव्हा 'या चित्रपटात या कथेचा विचका केला गेला आहे' हे विधान थोडे अतिशयोक्तीपूर्ण व खोडसाळ वाटते. 'अर्धसत्य' सारख्या सुंदर चित्रपटाला रटाळ म्हणता तेव्हाच आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडत असतील व रंजक वाटत असतील याची थोडीफार कल्पना येते. अर्थात येथे 'एकेकाची आवड' असे म्हणावे लागेल. >> मत मागितले असता प्रांजळ मत द्यायला हवे. त्यात खोडसाळ असे काहीही नाही. उलट मोठ्या आशेने व बर्‍याच अपेक्षा ठेवून मी मोठ्या कष्टाने तो चित्रपट मिळवला होता. असो. याच न्यायाने वर ठळक केलेले आपले वाक्यही खोडसाळ म्हणावे लागेल. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही असे म्हणणे हा खोडसाळपणा ठरत नाही. नाहीतर आपल्याला फक्त आपण सूचविलेल्या लेखकांच्या बाजुनेच प्रतिसाद अपेक्षित होते अशी शंका वाटून जाते. असो आपला ह्या http://www.youtube.com/watch?v=r6AJ8gAzejA&feature=watch-now-button&wide=1 चित्रपटाबाबतचा अभिप्राय जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Sun, 10/09/2011 - 06:18
आपले मत (कसेही असले तरी) येथे मांडण्याचा आपला अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - तशी अपेक्षाही अजिबात नाही. मात्र आपल्या त्या मताचे समर्थन करण्याची अपेक्षा इतरांनी ठेवण्यात काहीही गैर नाही हे आपल्यालाही मान्य असावे - नाहीतर पुढील चर्चेचा मार्गच खुंटतो. प्रवाहाविरुध्द जाण्यात काहीही गैर नाही (खरे तर काही बाबतीत ते आवश्यकही ठरते), मात्र एखाद्या सर्वमान्य सुंदर चित्रपटाला 'रटाळ' व 'प्रचारकी'सारखी शेलकी विशेषणे सरसकट बहाल करताना त्या विशेषणांमागील कारणांचा खुलासा केला नाही तर जाणूनबुजून वा खोडसाळपणे प्रवाहाविरुध्द (जायचे आहे म्हणूनच) जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की काय अशी शंका मनाला चाटून जाते. 'कमला' हिंदी चित्रपट मी पाहिलेला नाही (मात्र मराठी नाटक पाहिले आहे). मात्र त्या चित्रपटाचा या धाग्याशी काय संबंध? वर धाग्यात 'ज्ञानपीठ' पुरस्कारासाठी माझ्या वैयक्तिक मते जे विजय तेंडुलकर पात्र आहेत, ते या चित्रपटाचे पटकथाकार आहेत तरीही या चित्रपटाचा या धाग्याच्या मूळ विषयाशी सरळसरळ संबंध नाही आहे. आपल्या मते तेंडुलकरांच्याऐवजी इतर कोणी पुरस्कारासाठी पात्र अवश्य असू शकते - खरा मुद्दा तो नाही आहे. धाग्याचा खरा मुद्दा आहे जर 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भाषांतील साहित्यापेक्षा जास्त सरस आहे' हे गृहितक (assumption) वा जनमानसातील विचार खरा मानला तर त्याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत का दिसत नाही? असे प्रतिबिंब दिसत नाही याचे कारण या दोहोंपैकी कोणते : (अ) मूळात हे गृहितक वा जनमानसातील विचार चुकीचा आहे किंवा (ब) गृहितक खरे आहे पण 'पडद्यामागील हालचालीं'मुळे वस्तुस्थिती व पुरस्कार-विजेत्यांची यादी मध्ये तफावत आहे ? असो. मला वाटते चर्चा येथे मूळ धाग्यापासून दूर भरकटत आहे.थोडेफार अवांतर होऊ-चालू शकते मात्र धाग्याच्या मूळ विषयावर मत द्यावे अशी अपेक्षा आहे.

In reply to by दिपोटी

अजिबात भरकटत नाहीये.. हा तुमचा मूळ प्रश्न माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?>> त्याला हे माझे उत्तर. माझ्या मते पर्यायांमध्ये सूचविलेल्या नावांपैकी विजय तेंडूलकर आणि जयवंत दळवी ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र नाहीत / नव्हती.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Sun, 10/09/2011 - 15:37
चेतन सुभाष गुगळे, पुरस्काराला कोण पात्र वाटते यावर दहा जणांना विचारले असता अकरा मते मिळू शकतील ... प्रत्येकाचे वाचन व प्रत्येकाचा व्यासंग निराळा असतो. मला पात्र वाटणारे साहित्यिक इतरांना वाटतील असे जरुरी नाही. तेव्हा 'कोण पात्र आहे' हा मुद्दा या धाग्यासाठी (पूर्ण गौण नसला तरी) तसा दुय्यम आहे. एकतर 'इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याच्या दर्ज्याबद्दल सर्वसामान्य मराठी समाजात जो समज आहे, तो समज सर्वथा वृथा/खोटा तरी आहे' किंवा ''ज्ञानपीठ' पुरस्काराच्या निवडप्रक्रियेत lobbying सारख्या बाबींमुळे घोळ तरी आहे' अशा दोन शक्यता असताना यातील कोणती शक्यता खरी आहे यावर चर्चा व्हावी यासाठी हा धागा टाकला होता. (धाग्यातील 'आपले मत काय आहे?' हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी होता ... फक्त शेवटच्या वाक्यासाठी नाही). असे असताना या मूळ मुद्द्याला संपूर्ण बगल-कलाटणी देऊन फक्त शाब्दिक कीस पाडण्यात काय हशील? मूळ मुद्याबाबतीत (उदाहरणार्थ lobbying असावे वा नसावे) आपले मत ऐकण्यास उत्सुक आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

एकतर 'इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याच्या दर्ज्याबद्दल सर्वसामान्य मराठी समाजात जो समज आहे, तो समज सर्वथा वृथा/खोटा तरी आहे' >> असा समज करून घेणे मला तरी इष्ट वाटत नाही. (धाग्यातील 'आपले मत काय आहे?' हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी होता ... फक्त शेवटच्या वाक्यासाठी नाही). असे असताना या मूळ मुद्द्याला संपूर्ण बगल-कलाटणी देऊन फक्त शाब्दिक कीस पाडण्यात काय हशील?>> पण तो देखील आपल्या संपूर्ण लेखातलाच एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचे मी उत्तर दिले. खरे तर माझ्या त्या उत्तरामुळे तुमच्या मूळ मुद्याबाबतीत (उदाहरणार्थ lobbying असावे वा नसावे) आपले मत ऐकण्यास उत्सुक आहे. >> या मूळ प्रश्नाचे उत्तर देखील सोदाहरण आपोआपच मिळून जाते. हवे तर मी अधिक विस्ताराने इथे मांडतो. पुरस्कार एक आणि निर्णय घेणाराही एक असेल तर प्रश्नच उद्भवत नाही. पुरस्कार एक आणि निर्णय घेणारे एकाहून जास्त असतील तर मग पुरस्कार कुणाला द्यावा याचे एकाहून अधिक पर्याय संभवतात. अर्थातच एकाला पुरस्कार मिळणार असल्याने पर्यायातील नावांचे समर्थन / विरोध ही प्रक्रिया सुरू होते. या समर्थन / विरोधाच्या प्रक्रियेलाच आपण लॉबींग अस म्हणणार का? आता हे समर्थन / विरोध अपरिहार्य च असतात कारण त्यानंतरच पर्यायांमधील इतर नावे वगळली जाऊन एका अंतिम नावावर शिक्कामोर्तब होते. प्रश्न इतकाच आहे की हे समर्थन / विरोध कशाच्या आधारे केले जाते? जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषिकता, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन या निकषावर केल्या जाणार्‍या समर्थन / विरोधाचा निषेधच करायला हवा. पण यापलिकडे जाऊन कोणी एखाद्या विशिष्ट कारणास्तव एखाद्या पर्यायाचे समर्थन / विरोध करीत असेल तर त्याविषयी आक्षेप घेतला जाऊ नये. उदाहरणार्थ एका पुरस्कार प्रसंगी उंबरठा हा मराठी चित्रपट (हिंदी रुपांतर - सुबह) समिती तील सदस्यांच्या समोर आला असता ज्येष्ठ माननीय सदस्य श्री. बलदेव राज चोप्रा यांनी या चित्रपटास कडाडून विरोध केला. कारण या चित्रपटात नायिका आपल्या पतीला सोडून देते असे दाखविले होते. चोप्रांनी त्यांच्या कारकीर्दीत या विषयावर जेवढे चित्रपट बनविले त्या प्रत्येकात त्यांनी नायिकेला पतीबरोबर नांदतानाच (प्रेम असो वा नसो) दाखविले होते. त्यांची या विषयावर काही ठाम मते होती. त्यामुळे त्यांनी उंबरठा बाबत नोंदविलेला आक्षेप हा त्यांच्या आयुष्यभरातील भूमिकेशी सुसंगत असाच होता. त्याच समितीत श्री. गिरीश कर्नाड देखील होते. त्यांनी मात्र या चित्रपटाचे जोरदार समर्थने केले जे त्यांच्या खुल्या विचारसरणीशी सुसंगत होते. शेवटी उंबरठाला पुरस्कार देण्याविषयी निर्णय झाला. परंतू चोप्रांच्या विरोधावर किंवा कर्नाडांच्या समर्थनावर कोणीही biased असल्याचा आक्षेप नोंदविला नाही (जरी स्वत: कर्नाड यांनी उंबरठा चित्रपटात काम केले होते तरीही) कारण हे दोघेही जे काही समर्थन अथवा विरोध करीत आहेत ते तात्विक कारणाने हे सर्वांनाच पटले होते. आता इथेही आपण तेंडूलकर आणि दळवी या नावांचे समर्थन करीत आहात त्यामागे आपल्याला त्यांच्या कलाकृती तील विचार पटले, त्यातून आनंद मिळाला हीच कारणे असणार असे मी गृहीत धरतो. त्याचप्रमाणे मी त्यांच्या नावाला विरोध करतोय कारण त्यांच्या साहित्यकृती मला तितक्याशा मानवल्या नाहीत. वर उल्लेखिलेले घातक निकष (जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषिकता, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन) न लावता आपण दोघेही या लेखकांचे समर्थन / विरोध केवळ एक चोखंदळ रसिक ह्या भूमिकेतून करीत आहोत हे लक्षात घेता अशा प्रकाराला निकोप लॉबींग समजण्यास काहिच हरकत नाही. असे लॉबींग होत असेल तर त्यास नावे ठेवणे योग्य नव्हे. परंतू लॉबींग घातक निकषांवर होत असेल (तसे होतेय की नाही हे ठाऊक नाही) तर त्याचा जरूर निषेध व्हावा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Mon, 10/10/2011 - 14:58
खाली 'चिरोटा' यांच्या एका प्रतिसादाला 'लॉबिंग' या शीर्षकाखाली मी एक प्रतिसाद दिला आहे, तो आपल्या या वरील प्रतिसादाला पण लागू आहे. - दिपोटी

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नगरीनिरंजन Sun, 10/09/2011 - 14:59
आपली मते नेहमीच क्रांतिकारी आणि गैरसमजुतींच्या उच्चभ्रू तुमानी खेचणारी असतात हे मी पाहिलंच आहे. पण ती तशी का आहेत हे प्रत्येकाला कळेलच असे नाही, म्हणून जरा खुलासेवार सांगाल का?
कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात
या चित्रपटांमध्ये कसला प्रचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. अर्धसत्य पाहून मी प्रभावित झालो होतोच शिवाय सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल ही नाटके आणि मित्रा, बेडूक, थोटूक, बॅकसीट इत्यादी कथा वाचून आणि त्यात तेंडुलकरांनी त्या काळात (आणि अजूनही) अब्रह्मण्यम अशा समजल्या जाणार्‍या विषयांवर किती मार्मिक आणि संवेदनशीलतेने लिहीलं आहे हे पाहून थक्क झालो. त्यांच्या लेखनात हिंसा असे कारण स्वतःच्या सभोवती असलेली हिंसा त्यांनी टिपली. पण त्यांनी कधीही त्या हिंसेच्या विरोधात प्रचार केला असे वाटत नाही. उलट निष्पक्षपातीपणे ती टिपल्यानेच त्यांच्या लेखनाला एक सर्वकालिक संदर्भ मिळाला. जयवंत दळवींच्याही प्रत्येक कलाकृतीत असभ्य भाषा नाही आहे. त्यांची स्पर्श ही कथा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. (त्यात कोणाला कुष्ठरोगाविरुद्धचा प्रचार दिसू शकतो.) त्यांच्या चक्र कादंबरीत तुम्ही म्हणता तशी असभ्य भाषा आहे पण ती नसती तर ती पात्रं झोपडपट्टीतली न वाटता तुमच्या दिवाणखान्यात बसून बोलताहेत असं वाटलं नसतं का? बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही. शिवाय त्यांच्या विनोदी कथाही चांगल्या आहेत. ठणठणपाळ हे त्यांचं रुप तर खूपच गाजलं. अशी माझी सध्याची मते आहेत. ती तुमचा खुलासा ऐकून कदाचित बदलता येतील.

In reply to by नगरीनिरंजन

दिपोटी Sun, 10/09/2011 - 16:10
नगरीनिरंजन,
बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही.
अगदी बरोबर ... हाच मुद्दा मी वर मांडला आहे की 'साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही.' परत दळवींच्या सर्वच साहित्यात असा अनाचार बोकाळलेला दिसला असता तर 'एक प्रतिभावान साहित्यिक' म्हणून त्यांच्या प्रतिमेविषयी फेरविचार झाला असता. पण 'बॅरिस्टर' व 'पुरूष' सारखी उत्तम नाटके लिहिणार्‍या लेखणीतूनच 'संध्याछाया' वा 'नातीगोती' सारख्या हृदयस्पर्शी कलाकृती देखील उतरल्या. 'सारे प्रवासी घडीचे' सारखी कोकणच्या पार्श्वभूमीवरील एक अत्युत्तम कादंबरी सुध्दा या लेखणीनेच प्रसवली. आपण लिहिल्याप्रमाणे 'ठणठणपाळ' हे त्यांचे सदर गाजले ते समकालीन साहित्यिकांवर-प्रकाशकांवर ताशेरे ओढूनही त्यातील निखळ, निर्विष व निर्भेळ विनोदामुळे. विनोदाचा हा अनोखा साहित्यप्रकारच त्यांनी जन्माला घातला. -दिपोटी

In reply to by नगरीनिरंजन

आपली मते नेहमीच क्रांतिकारी आणि गैरसमजुतींच्या उच्चभ्रू तुमानी खेचणारी असतात हे मी पाहिलंच आहे. >> हे वाक्य फारच स्फोटक आहे, पण तरीही यात तथ्यांश असल्याचं मान्य करतो. यात माझ्या कौतुकाचा भाग असेल तर (आणि नसेल तरीही) त्याचा विनम्र स्वीकार करतो. पण ती तशी का आहेत हे प्रत्येकाला कळेलच असे नाही, म्हणून जरा खुलासेवार सांगाल का? कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांमध्ये कसला प्रचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. >> अर्धसत्य आपण पाहिलाच आहे. केव्हा पाहिलाय? मी तो पाहून जेमतेम वर्षच झालंय त्यामुळे फ्रेम टू फ्रेम लक्षात आहे. त्यात पोलिस अधिकारी असलेल्या नायकावरील ताणाचं जे समर्थन केलंय ते अगदीच न पटणारं आहे. यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. नायकाला जो काही त्रास होतो तो त्याच्या स्वत:च्या चूकांमुळेच हे स्पष्ट दिसते. तरीही त्याचा दोष शेट्टीच्या किंवा इतरांच्या माथी मारणे ही नायकाची पळवाट आहे. मुख्य म्हणजे मूळ सूर्य कथेत बाप आणि मुलगा यातला संघर्ष आहे. बाप मुलाला त्याच्या इच्छे विरुद्ध आपल्या कल्पनेनुसार घडवितो हा विषय आहे. अर्धसत्य मध्येही तो मांडलाय. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं? (मुख्य म्हणजे त्याशिवाय इतर अनेक पर्याय खुले असताना) चांगली कथा, चांगले अभिनेते असूनही ठिसूळ पटकथे मुळे रसभंग झाला. कमला चित्रपटाचा दुवा मी दिला आहेच. तो आपण स्वत:च पाहावा, कदाचित आपली तेंडूलकरांविषयीची मते बदलुही शकतील. त्यांच्या लेखनात हिंसा असे कारण स्वतःच्या सभोवती असलेली हिंसा त्यांनी टिपली. पण त्यांनी कधीही त्या हिंसेच्या विरोधात प्रचार केला असे वाटत नाही. उलट निष्पक्षपातीपणे ती टिपल्यानेच त्यांच्या लेखनाला एक सर्वकालिक संदर्भ मिळाला. >> त्यांच्या नाटकांचे खेळ बंद पाडले गेले तेव्हा त्यांनी या दडपशाहीचा / हिंसेचा विरोध केला होता. त्यानंतर दोन दशकांनी मात्र त्यांनीच मला कुणीतरी पिस्तुल आणुन दिले तर मी मोदींची हत्या करील असे विधान केले. त्याचप्रमाणे एका मान्यवर साहित्यिकाने मनोहर जोशींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारू नये असा जाहीर सल्ला त्यांनी दिला होता. आयुष्यात आधी हिंसेला विरोध व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन व नंतर त्यांच्या अगदी उलट वर्तन मला त्यांच्या जीवनातला हा विरोधाभास दाखवून द्यायचा होता. शिवाय तेंडूलकरांनी अजुन एक विचित्र प्रकार केला. साहित्यनिर्मितीतून त्यांनी वैयक्तिक हिशेब चुकते केले. काही वर्षांपूर्वी त्यांचे लोकसत्ता मध्ये रामप्रहर या सदरात लिखाण येत असे. मीही ते रोज आवडीने वाचत असे. नंतर मात्र त्यांनी आपल्या वैयक्तिक वैर्‍यांना या सदरातून टिपणे सुरू केले. यामूळे अनेक वाचक वैतागले. एकाने तर राम प्रहर चे नाव बदलून आता त्यास विजय प्रहार हे नाव द्या असेही सूचविले. नंतर हे सदर बंद झाले. पुढे काही कालावधीनंतर या सर्व लेखांचे संकलन करून राम प्रहर हे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. अशा काही कारणांमूळे माझा तेंडूलकरांच्या नावाला आक्षेप आहे. तुम्ही दळवींविषयी व्यक्त केलेली मते ही ठीकच आहेत. परंतू त्यांनी गंमतीच्या गोष्टी सारखे बाजारू लिखाण करून ठेवले. त्याचप्रमाणे ***** वगैरेसारख्या उपमा वापरण्याचा प्रकार मला तरी अतिशय अश्लाघ्य वाटतो. अशा साहित्यिकाने इतर कितीही चांगली साहित्यनिर्मिती केली तरी त्यास साहित्य पुरस्कारातून वगळावे असे माझे वैयक्तिक मत आहे. अशी माझी सध्याची मते आहेत. ती तुमचा खुलासा ऐकून कदाचित बदलता येतील. >> माझ्या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. ***** इथले शब्द हे जयवंत दळवी यांनी आपल्या पुस्तकात वापरलेले होते. परंतू इथे प्रकाशित करण्याएवढे उचित नसल्याने संपादकांच्या सूचनेवरून काढून टाकण्यात आले आहेत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नगरीनिरंजन Mon, 10/10/2011 - 08:27
यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. नायकाला जो काही त्रास होतो तो त्याच्या स्वत:च्या चूकांमुळेच हे स्पष्ट दिसते. तरीही त्याचा दोष शेट्टीच्या किंवा इतरांच्या माथी मारणे ही नायकाची पळवाट आहे. मुख्य म्हणजे मूळ सूर्य कथेत बाप आणि मुलगा यातला संघर्ष आहे. बाप मुलाला त्याच्या इच्छे विरुद्ध आपल्या कल्पनेनुसार घडवितो हा विषय आहे. अर्धसत्य मध्येही तो मांडलाय. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं?
एखाद्या कथेतले पात्र आपल्या नेहमीच्या आयुष्यात माणसं जशी वागतात तसे का नाही वागले वगैरे विचारणे मलातरी पूर्णपणे गैरलागू वाटते. हे म्हणजे पंचतंत्र वाचताना 'सिंह कधी बोलतो का?' असं विचारल्या सारखंच आहे. शिवाय शेट्टीचा निगरगट्टपणा कोणाला सहज स्वीकारार्ह वाटेल आणि कोणाला तो अत्यंत त्रासदायक वाटेल. तुमच्या मतानुसार जे तार्किक वागणे आहे तसे नायक न वागणे म्हणजे तो लेखकाने केलेला प्रचार ठरू शकत नाही. अशा घटना खर्‍या आयुष्यातही घडतात आणि जे त्या घटनेचा भाग नसतात ते 'असं कोणी कसं वागू शकतं?' असं आश्चर्य व्यक्त करतात.
त्यांच्या नाटकांचे खेळ बंद पाडले गेले तेव्हा त्यांनी या दडपशाहीचा / हिंसेचा विरोध केला होता. त्यानंतर दोन दशकांनी मात्र त्यांनीच मला कुणीतरी पिस्तुल आणुन दिले तर मी मोदींची हत्या करील असे विधान केले.
यात मला कुठेही विरोधाभास दिसत नाही. दिसली तर त्यांची वाढत गेलेली उद्विग्नताच दिसते. त्यांच्या नाटकाचे खेळ बंद पाडले म्हणून त्यांनी दडपशाहीचा/हिंसेचा विरोध केला असेल पण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते असा त्यावरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. किंबहुना ते तत्त्ववेत्ते असल्याचा आणि काही तत्त्वे अंगिकारल्याचा त्यांनी कधी कुठला दावाही केला नव्हता मग दडपशाहीविरुद्ध आणि हिंसेविरुद्ध झालेल्या त्यांच्या मनुष्यसहज उद्रेकाला दुटप्पीपणा ठरवणे हा त्यांच्यावर अन्याय होईल असे वाटते. रामप्रहर मी वाचलेले नसल्याने तुमचे मत मी ग्राह्य धरतो.
परंतू त्यांनी गंमतीच्या गोष्टी सारखे बाजारू लिखाण करून ठेवले. त्याचप्रमाणे ***** वगैरेसारख्या उपमा वापरण्याचा प्रकार मला तरी अतिशय अश्लाघ्य वाटतो.
तुम्ही कोणत्या उपमेबद्दल लिहीलंय ते मला कळलं नाही आणि गमतीच्या गोष्टी मी वाचलेल्या नाहीत पण बाजारू या शब्दावरून त्यात अश्लील किंवा चावट असं काही असावं असं वाटतंय. ज्ञानपीठसाठी ठराविक प्रकारचेच लेखन केलेले असणे ही अट असेल तर हा मुद्दा योग्य आहे. अन्यथा अश्लीलता, बीभत्सता आणि क्रौर्य हे ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असल्याने त्यावर थेट आणि खुलेपणाने लिहीण्यात वावगे नाही. एकंदरीतच माझ्या शंका अजून फिट्ल्या नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे साधारणपणे त्या लेखकांचे चारित्र्य, तत्त्वभूमिका किंवा लेखनविषयांची निवड या बाबतीत आहेत. लेखनाच्या वैपुल्यावर आणि दर्जावर तुम्ही काही सांगू शकाल काय? ज्ञानपीठ पुरस्कार (माझ्या मते) चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसून तो साहित्यातील कर्तृत्वासाठी आहे असे मला वाटते. त्यासाठी लेखक कधी काय बोलला, कोणाशी भांडला वगैरे गोष्टी मध्ये येऊ नयेत असे वाटते. लेखनाच्या दर्जाविषयी बोलल्यास आणि इतर मराठी वा अमराठी लेखक का श्रेष्ठ आहेत यावर आपण प्रकाश टाकलात तर ते धागाप्रवर्तकाच्या मूळ मुद्यालाही धरून होईल.

In reply to by नगरीनिरंजन

लेखनाच्या दर्जाविषयी बोलल्यास आणि इतर मराठी वा अमराठी लेखक का श्रेष्ठ आहेत यावर आपण प्रकाश टाकलात तर ते धागाप्रवर्तकाच्या मूळ मुद्यालाही धरून होईल. >> याविषयी डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे. त्याचप्रमाणे वर एका प्रतिसादात मी समर्थन / विरोधा विषयी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ती पुरेशी आहे. एकंदरीतच माझ्या शंका अजून फिट्ल्या नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे साधारणपणे त्या लेखकांचे चारित्र्य, तत्त्वभूमिका किंवा लेखनविषयांची निवड या बाबतीत आहेत. लेखनाच्या वैपुल्यावर आणि दर्जावर तुम्ही काही सांगू शकाल काय? ज्ञानपीठ पुरस्कार (माझ्या मते) चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसून तो साहित्यातील कर्तृत्वासाठी आहे असे मला वाटते. त्यासाठी लेखक कधी काय बोलला, कोणाशी भांडला वगैरे गोष्टी मध्ये येऊ नयेत असे वाटते. >> कुठलाच पुरस्कार चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसतो. परंतू या बाबत माझी भूमिका अशी आहे की कुठल्याही पुरस्कारासाठी सूचविली जाणारी व्यक्ती चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकाच्या निकषावरही वादातीत असलीच पाहिजे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कुणावर ते लादण्याची लादेन प्रवृत्ती माझ्यात नाही, परंतू याबाबत माझ्या भूमिकेत फरक पडण्याची सूतराम शक्यता नाही. तेव्हा वाद निरर्थक आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नगरीनिरंजन Mon, 10/10/2011 - 15:21
माझाही 'कलात्मक म्हणजे नेमके कसे आणि प्रचारकी म्हणजे नेमके कसे' असा मुळातच गोंधळ उडाला असल्याने बाकीच्या शंका तुर्तास सोडून देतो. सगळी मते वैयक्तिक असल्याने वाद असा नव्हताच हे फक्त नम्रपणे नमूद करतो. जाता जाता, बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मराठीच्या बाहेरचे भारतीय लेखन फारसे वाचलेले नसल्याने फक्त लॉबिंग वगैरे मुद्यांवर चर्चा झाली/होतेय. या धाग्यावर तुलनात्मक काही चर्चा झाली तर आनंद वाटेल. जाणकारांच्या प्रतिक्षेत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 13:32
यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. कुठल्याच ताणतणावाचे हिंसेत झालेले रुपांतर समर्थनिय नाही असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण उपासमारीने मरायला टेकलेल्या माणसाने केलेली खाद्यपदार्थाची चोरी आणि वैफल्यग्रस्त माणसाच्या हातून घडलेले असे एखादे कृत्य, कायद्याच्या चौकटीत गुन्हाच असला आणि नैतिकतेच्या पातळीवर समर्थनिय नसला तरी, क्षम्य आहे. कायद्यातही कुठल्या मानसिक अवस्थेत हिंसा घडली ह्यावर विचार करून शिक्षा कडक किंवा सौम्य ठरवली जाते. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. ह्याला कारण नायक हा पोलीस अधिकारी आहे आणि आपण सामान्य नागरिक. पोलीस अधिकार्‍याची जबाबदारी गुन्हेगारांना अटक करून शासन करणे. ती जबाबदारी सामान्य नागरिकाची नसते. पोलीस अधिकार्‍याकडून, प्रशिक्षणा दरम्यान, तशी शपथही घेतली जाते. जेव्हा, एखादा अधिकारी त्या शपथेला आणि आपल्या कर्तव्याला स्मरून गुन्हेगारांना अटक करतो आणि राजकारणी त्या गुन्हेगाराला सोडवितात तेंव्हा तो अधिकारी वैफल्यग्रस्त होतो. शेट्टीने वैयक्तिक काही त्रास नायकाला दिलेला नसला तरी गुन्हेगारांचा सामान्य नागरिकांना, समाजाला, सहनशक्तीच्या पलिकडे, त्रास होत असतो. आणि जेंव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी आपले कर्तव्य बजावण्याच्या भावनेतून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याला त्या गुन्हेगारांचा सामान्य जनतेपेक्षा जास्त त्रास होतो. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं? पोलीस होण्यामागिल अनिच्छेचे कारण नायकाच्या बालमनावर झालेला परिणाम आहे. त्याचे वडील (अमिरिश पुरी) पोलीसात असतात आणि ते स्वतःच्या पत्नीला म्हणजेच नायकाच्या आईला मारहाण करीत असतात. त्यामुळे पोलीसांबद्दल त्याच्या मनात एक तिडिक निर्माण झालेली असते. पण जेंव्हा तो पोलीस दलात भरती होतो तेंव्हा एक आदर्श अधिकारी बनू पाहतो. आपले कर्तव्य नीट पार पाडू इच्छितो पण भ्रष्ट राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे तो गुन्हेगारांना चाप लावू शकत नाही ह्याने इतर अनेक पोलीस अधिकार्‍यांप्रमाणे त्याच्या मनात वैफल्य भावना निर्माण होते. ह्याही पुढे, जखमेवर मीठ चोळावे त्या प्रमाणे तोच गुन्हेगार, रामा शेट्टी, निवडणूक लढवून जिंकतो आणि त्याच गुन्हेगाराच्या विजय मिरवणूकीत नायकासारख्या कर्तव्यकठोर अधिकार्‍याला, बंदोबस्तासाठी जावे लागते. हा त्याच्या भावनांचा कडेलोट असतो. आणि त्यामुळेच, ह्या किड लागलेल्या व्यवस्थेवर इतर कुठलाही उपाय नाही ह्या विचारातून त्याच्या हातून कायदा हाती घेतला जातो. तुम्ही चित्रपट पाहिलात पण तुम्हाला तो नीट समजला नसावा असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुम्ही चित्रपट पाहिलात पण तुम्हाला तो नीट समजला नसावा असे वाटते. >> मला जर एखाद्या चित्रपटात मांडलेला विचार पटला नाही तर मला तो चित्रपट समजलाच नाही असे आपणांस वाटणे हा अतिशय एकांगी विचार झाला. याच पद्धतीने मीही विचार करू लागलो तर आपणांस माझे विवेचन समजलेच नाही अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देऊ शकतो, पण अर्थातच ती माझी विचारपद्धती नव्हे. सर्वप्रथम आपण कष्ट घेऊन मला चित्रपट (अतिशय बाळबोध पद्धतीने) समजावल्याबद्दल धन्यवाद. पण जेंव्हा तो पोलीस दलात भरती होतो तेंव्हा एक आदर्श अधिकारी बनू पाहतो. आपले कर्तव्य नीट पार पाडू इच्छितो पण भ्रष्ट राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे तो गुन्हेगारांना चाप लावू शकत नाही ह्याने इतर अनेक पोलीस अधिकार्‍यांप्रमाणे त्याच्या मनात वैफल्य भावना निर्माण होते. ह्याही पुढे, जखमेवर मीठ चोळावे त्या प्रमाणे तोच गुन्हेगार, रामा शेट्टी, निवडणूक लढवून जिंकतो आणि त्याच गुन्हेगाराच्या विजय मिरवणूकीत नायकासारख्या कर्तव्यकठोर अधिकार्‍याला, बंदोबस्तासाठी जावे लागते. हा त्याच्या भावनांचा कडेलोट असतो. आणि त्यामुळेच, ह्या किड लागलेल्या व्यवस्थेवर इतर कुठलाही उपाय नाही ह्या विचारातून त्याच्या हातून कायदा हाती घेतला जातो.>> ह्यात नायकाने घेतलेली भूमिका अतिशय स्वप्नाळू, हळवी व भावनिक आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे सार्वजनिक व व्यावसायिक जीवनात सर्वांनाच याहूनही अधिक अपमान व अन्यायास सामोरे जावे लागते. हे असे घडणार याची मानसिक तयारी पोलीस अधिकार्‍याला सुरूवातीपासूनच करायला हवी. नायक ह्यात कमी पडतो. आपण अन्याय आणि अन्यायी व्यक्तींना कुठल्याही अडथळ्याविना संपवू शकू असा भोळा भाबडा आशावाद स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात ठीक होता परंतू ८० च्या दशकातल्या नायकाने असा विचार करणे म्हणजे त्याच्या मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. या वैफल्यते वर उतारा म्हणून त्याने शस्त्र उचलले ते पण त्याच्या नोकरी मुळे त्याच्या हाती आलेलेच ना? सामान्य माणसा कडे तर शस्त्र देखील नसते. त्याने काय करावे? या प्रश्नाचे उत्तर तेंडूलकरांच्या लेखणीकडे नाही (म्हणूनच त्यांना मोदी विरूद्ध पिस्तूल मागण्याची गरज पडली असावी). अर्धसत्य १९८३ चा तर त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८५ ला आलेला जवाब यांची सहज एक तूलना करतो. जवाब मध्ये नायक (राज बब्बर) ला खलनायक (डॅनी) असाच त्रस्त करतो. शिवाय यात नायक एक सर्वसामान्य नागरिक आहे. पोलिस नाही. पोलिस अधिकारी (सुरेश ओबेरॉय) देखील नायका व त्याच्या कुटुंबाला संरक्षण पुरविण्यास असमर्थ ठरतो. नायकाला स्वत:ची ओळख लपवत खलनायकापासून दूर पळावे लागते. प्रत्येक वेळी खलनायक त्याला गाठतोच. शेवटी कंटाळून तो पळण्याऐवजी लढायचे ठरवतो. खलनायकाचे कच्चे दुवे हेरतो आणि चक्क बाजी पलटते. ज्या यातना खलनायकाने त्याला दिलेल्या असतात त्याच तो खलनायकाला भोगायला लावतो. शेवटी खलनायक हतबल ठरतो आणि नायकाला शरण येतो. अर्धसत्यचा नायक भावनिक पातळीवर स्वत:चा प्रश्न सोडवितो, ज्यास फारसे शारिरीक / बौद्धिक कष्ट पडत नाहीत आणि यात तात्कालिक मानसिक समाधानाशिवाय काहीच साध्य होत नाही कारण खून केल्याबद्दल शिक्षा तर होणारच. याउलट जवाब चा नायक स्वत:चा प्रश्न युक्तीने सोडवतो ज्या करिता त्याला बरेच बौद्धिक आणि शारिरीक श्रम करावे लागतात. या मार्गाने प्रश्न सोडविण्यास थोडा अधिक वेळ लागला तरी मिळणारा परिणाम जास्त प्रभावी असतो. अर्थात आपल्या नायकाने कुठला मार्ग चोखाळावा हे ठरवायचे स्वातंत्र्य तेंडूलकरांना एक पटकथाकार म्हणून नक्कीच आहे. परंतू त्याचबरोबर इतकी सामान्य सरधोपट पटकथा लिहीणार्‍या साहित्यिकाच्या नावाला पुरस्कार मिळण्यास असलेला माझा विरोध नोंदविण्याचे स्वातंत्र्य मला का असू नये?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 16:37
त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. आपल्या वरील वाक्याला अनुसरून आपल्याला चित्रपट समजला नाही असे मी मत मांडले आहे. कारण नायकाला काय त्रास होतो आहे हे आपल्याला समजलेले नाही. चित्रपटातील लढा हा, एक पोलीस अधिकारी आणि एक गुंड ह्यांच्यामधील (तुम्ही समजता तसा) नाही. तो भ्रष्ट राजकिय व्यवस्थेविरुद्ध आहे. पोलीस खात्यातील प्रामाणिक अधिकार्‍यांच्या घुसमटीला अधोरेखित करणारा आहे. ८० च्या दशकातल्या नायकाने असा विचार करणे म्हणजे त्याच्या मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. आदर्शवादाला आपण मानसिक दौर्बल्य मानत असाल तर माझी काही ना नाही. पण ८० च्या दशकातच काय पण आजच्या काळातही आदर्शवाद जोपासणारे अधिकारी सरकारी खात्यात अनेक ठिकाणी भेटतात. या वैफल्यते वर उतारा म्हणून त्याने शस्त्र उचलले ते पण त्याच्या नोकरी मुळे त्याच्या हाती आलेलेच ना? वैफल्य भावनेतून उचललेले शस्त्र म्हणजे वैफल्यावर उतारा नाही. ते वैफल्याने जन्माला घातलेले अपत्य आहे. नायकाच्या कृतीचे मी समर्थन करीन नाहीए. त्याच्या मानसिक अवस्थेचे विदारक चित्र आपल्या ध्यानात यावे एवढीच माझी इच्छा आहे. सामान्य माणसा कडे तर शस्त्र देखील नसते. त्याने काय करावे? प्रसंगी सामान्य माणूसही बेभान होतो. पाहा: 'डोंबिवली फास्ट'. अर्धसत्यचा नायक भावनिक पातळीवर स्वत:चा प्रश्न सोडवितो, ज्यास फारसे शारिरीक / बौद्धिक कष्ट पडत नाहीत बौद्धीक आणि भावनिक दोन्ही मार्ग 'ध्येया' कडे घेऊन जाणारे आहेत. 'ध्येय' महत्त्वाचे की तिथपर्यंत पोहोचण्यचा मार्ग? ह्या भावनिक मार्गावरील नायकाच्या समर्पणाच्या त्यागी वृत्तीला, स्वतः संपलो तरी बेहत्तर पण ह्या गुन्हेगारापासून समाजाला सोडविन ह्या उदात्त भावनेला आपण कमी लेखता आहात. जपानी युद्धातील 'हाराकिरी', राजस्थान्यांचे 'केसरिया' आणि मराठ्यांच्या बाजीप्रभू देशपांड्यांचे पावनखिंडीतील आत्मसमर्पण आपल्या लेखी फक्त 'भावनिक' म्हणून कमीपणाचे आहे का? 'जवाब' चित्रपट मी पाहिलेला नाही. पण जे शब्दचित्र आपण उभे केले आहे त्यावरून वाटते की त्या चित्रपटाच्या पटकथाकाराला 'ज्ञानपीठ' नक्कीच मिळाले असणार.

In reply to by प्रभाकर पेठकर

कारण नायकाला काय त्रास होतो आहे हे आपल्याला समजलेले नाही. >> त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- द ९०-१० प्रिन्सिपल http://intheinterestofpublic.blogspot.com/2011/10/90-10-principle_01.html शिवाय त्रास सहन करता यायला हवा. विजय सहजासहजी मिळत नाही. नायकाने अनेक वर्षे पोलिस सेवेत घालवली आहेत आणि त्यानंतरच्या घुसमटीला कंटाळून तो कायदा हाती घेत नाही तर नोकरीच्या अगदी सुरूवातीच्या काळातच सर्वांशी पंगा घ्यायला जातो असे दाखविले आहे. त्याच्याकडे पेशन्स नाही असे दिसून येते. आदर्शवादाला आपण मानसिक दौर्बल्य मानत असाल तर माझी काही ना नाही. >> आदर्शवादाचा मीही आदर करतो आणि तो जोपासतो ही . पण म्हणून सर्वच जण तसे असतील असा भाबडा आशावाद मी बाळगत नाही (http://at-least-i-think-so.blogspot.com/2011/01/blog-post.html). म्हणजे मी जरी प्रामाणिक असलो तरी माझे सहकारी / वरिष्ठ विकले गेलेले असू शकतात. मला रिझल्ट्स मिळायला वेळ लागणार हे मी गृहीत धरलेले असते. ह्या भावनिक मार्गावरील नायकाच्या समर्पणाच्या त्यागी वृत्तीला, स्वतः संपलो तरी बेहत्तर पण ह्या गुन्हेगारापासून समाजाला सोडविन ह्या उदात्त भावनेला आपण कमी लेखता आहात. >> नायकाची समर्पणाची त्यागी वृत्ती अजिबात जाणवत नाही. तो एक आततायी निर्णय वाटतो. जपानी युद्धातील 'हाराकिरी', राजस्थान्यांचे 'केसरिया' आणि मराठ्यांच्या बाजीप्रभू देशपांड्यांचे पावनखिंडीतील आत्मसमर्पण आपल्या लेखी फक्त 'भावनिक' म्हणून कमीपणाचे आहे का? >> आता कायद्याचे राज्य असल्याने ही उदाहरणे येथे गैरलागू ठरतात. म्हणजे असे पाहा की बाजीप्रभूंनी लढाईत ५० सैनिक ठार केले तरी त्यांच्यावर खटला भरला गेला नसता. आताच्या काळात मी कसाबवर जरी गोळी झाडली तरी आपले सरकार माझ्यावर कायदेशीर कारवाई करणारच. त्यामुळे कसाबला सरकार देत असलेली रॉयल ट्रीटमेंट मला कितीही चीड आणणारी ठरली तरी मी तिचा निषेध केवळ सनदशीर (http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/11/blog-post_26.html) मार्गानेच करणार. शॉर्ट कट्स कितीही आकर्षक वाटले तरी माझा त्यांना विरोधच आहे. लांबचा मार्ग अनाकर्षक असला तरी त्याला पर्याय नाही. अर्धसत्य विषयी बरीच चर्चा झाली. कमला विषयी काही बोलायचे असेल तर बोला.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 17:58
त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- हा त्रास मी करून घेतलेला नाही. शिवाय त्रास सहन करता यायला हवा. व्वा क्या बात है। पोलीस खात्यात हेच नेमके शिकवित नाहीत. नायकाने अनेक वर्षे पोलिस सेवेत घालवली आहेत आणि त्यानंतरच्या घुसमटीला कंटाळून तो कायदा हाती घेत नाही चला, म्हणजे पोलीसखात्यात निवृत्तीकाळ येईपर्यंत आपला आदर्शवाद टिकला तर हातात कायदा घ्यायला परवानगी आहे. निदान ते समर्थनिय तरी आहे. उत्तम. आदर्शवादाचा मीही आदर करतो आदर्शवादाला तुम्ही मानसिक दौर्बल्य मानता. सर्वच जण तसे असतील असा भाबडा आशावाद मी बाळगत नाही म्हणजे नायकाने जे-जे आदर्शवादी नाहीत त्या-त्या सर्वांना संपविण्याचा चंग बांधला होता. आदर्शवादी नसलेला पहिला बळी पडला बिचारा रामा शेट्टी. म्हणजे नायक वेलणकरला सरकारने दिलेले पिस्तुल आणि गोळ्या कमीच पडल्या असत्या. नायकाची समर्पणाची त्यागी वृत्ती अजिबात जाणवत नाही. नायक एक पोलीस अधिकारी आहे. आपण करीत असलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला ठाऊक आहे. तरीही त्याच्या आदर्शवादाला, कर्तव्यदक्षतेला स्मरून तो ते कृत्य करतो. तेही समाजाच्या हितासाठी. ह्याला आत्मसमर्पणच म्हणतात. आपल्या असल्या बिनबुडांच्या विधानांमुळेच आपल्याला चित्रपट समजलाच नाही असे पुन्हा पुन्हा जाणवते आहे. आता कायद्याचे राज्य असल्याने ही उदाहरणे येथे गैरलागू ठरतात. कायद्या॑च्या राज्यात एक देश दुसर्‍यादेशात हेर पाठवत नाही का? त्या हेराला आपण पकडले गेलो तर काय परिणाम होतील हे माहित नसते का? पोलीसांत अजूनही शौर्यपदके वाटत नाहीत का? कसाबला पकडताना मारल्या गेलेल्या अधिकार्‍यांचे बलिदान व्यर्थ म्हणायचे का? ज्यांनी ज्यांनी त्या दहातल्या ९ दहशतवाद्यांवर गोळ्या झाडून त्यांना यमसदनास पाठविले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली का? म्हणजे असे पाहा की बाजीप्रभूंनी लढाईत ५० सैनिक ठार केले तरी त्यांच्यावर खटला भरला गेला नसता. आताच्या काळात मी कसाबवर जरी गोळी झाडली तरी आपले सरकार माझ्यावर कायदेशीर कारवाई करणारच. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांचे सरदार होते, स्वराज्याच्या रक्षणासाठी ते लढले.ते जिवंत राहिले असते तर खटला नाही, महाराजांनी सोन्याचे कडे बहाल केले असते. आत्ताच्या काळात आपण पोलीस दलात असता आणि 'त्या' दिवशी आपण कसाबला मारले असते (जीवंत पकडणे शक्य नसेल तर) आपणावर कायदेशीर कारवाई नाही आपला गौरव केला असता. (अगदी मीही). उलट आपण हातात बंदूक असूनही 'भाबडा आदर्शवाद जोपासण्यापेक्षा कसाबला बुद्धीच्या बळावर अटक करूया असा विचार केला असतात' तर आज मिपावर सदस्य नसता. भिंतीवर आपण फोटोला चंदनाचा हार असता. लांबचा मार्ग अनाकर्षक असला तरी त्याला पर्याय नाही. पाकिस्तान बरोबर काश्मीर बाबतीत चर्चेचे 'गुर्‍हाळ' अनेक दशके चालू आहे तसेच ह्या पुढेही अनेक दशके (कदाचित शतके) चालू राहील. पाकिस्तान भारतात दहशत कारवाया चालूच ठेवेल. आपण परिपक्व आदर्शवादाचे बिल्ले छातीवर मिरवूया.

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रपटातील मार्ग मला पटला नाही म्हणजे चित्रपट मला समजला नाही हा आपला अट्टहास मला मान्य नाही. त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- हा त्रास मी करून घेतलेला नाही.>> आपण त्रास करून घेताय असे मला म्हणायचे नसून नायक असा त्रास करुन घेतोय हे माझे मत आहे. नायक एक पोलीस अधिकारी आहे. आपण करीत असलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला ठाऊक आहे. तरीही त्याच्या आदर्शवादाला, कर्तव्यदक्षतेला स्मरून तो ते कृत्य करतो. तेही समाजाच्या हितासाठी. ह्याला आत्मसमर्पणच म्हणतात. आपल्या असल्या बिनबुडांच्या विधानांमुळेच आपल्याला चित्रपट समजलाच नाही असे पुन्हा पुन्हा जाणवते आहे. >> मग न्यायालयीन प्रक्रिया कशाकरिता आहे? सर्वच पोलिसांनी सर्वच गुन्हेगारांना अशा पद्धतीने संपवायला हवे का? माझी विधाने बिनबुडाची असल्याचा आपला आरोप अतार्किक आहे. कसाबला पकडताना मारल्या गेलेल्या अधिकार्‍यांचे बलिदान व्यर्थ म्हणायचे का? ज्यांनी ज्यांनी त्या दहातल्या ९ दहशतवाद्यांवर गोळ्या झाडून त्यांना यमसदनास पाठविले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली का? >> ह्या विधानांना बिनबुडाचे का म्हणू नये? कसाबच्या साथीदारांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या कारण ते निरपराध जनतेवर हल्ला करीत होते. जनतेवरील हल्ला रोखण्याकरिता पोलिसांनी केला गेलेला गोळीबार कायद्याने समर्थनीय च ठरतो. पण अर्धसत्य चित्रपटात नि:शस्त्र शेट्टीवर नायक जो शस्त्र हल्ला करतो त्याचे समर्थन कायदा करेल काय? आत्ताच्या काळात आपण पोलीस दलात असता आणि 'त्या' दिवशी आपण कसाबला मारले असते (जीवंत पकडणे शक्य नसेल तर) आपणावर कायदेशीर कारवाई नाही आपला गौरव केला असता. (अगदी मीही) >> हे मला मान्य आहे. माझी वाक्ये पुन्हा वाचा - जनतेवरील हल्ला रोखण्याकरिता पोलिसांनी केला गेलेला गोळीबार कायद्याने समर्थनीय च ठरतो. पण अर्धसत्य चित्रपटात नि:शस्त्र शेट्टीवर नायक जो शस्त्र हल्ला करतो त्याचे समर्थन कायदा करेल काय? कसाब आज पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचेवर लाखो रुपये खर्च होत आहेत ज्यास जनतेचा विरोध आहे तरीही आज जर एखाद्याने कसाबवर हल्ला करून ठार मारले तर हल्लेखोरावर (हल्लेखोराचा हेतू कितीही उदात्त असला तरीही) निश्चितच कायदेशीर कारवाई होणार. उलट आपण हातात बंदूक असूनही 'भाबडा आदर्शवाद जोपासण्यापेक्षा कसाबला बुद्धीच्या बळावर अटक करूया असा विचार केला असतात' तर आज मिपावर सदस्य नसता. भिंतीवर आपण फोटोला चंदनाचा हार असता. >> त्याक्षणी शस्त्र चालविणे योग्यच ठरते. इन फॅक्ट पोलिसांना त्याकरिताच शस्त्रे दिलेली असतात. नि:शस्त्र व शांत पणे बसलेल्या व्यक्तिवर शस्त्र चालविण्याचे समर्थन कायदा करीत नाही. आदर्शवादाला तुम्ही मानसिक दौर्बल्य मानता. >> असं काहीही मी मानत नाही. पण आपला आदर्शवाद जोपासताना मला कायदा मोडून गुन्हेगारांना संपविणे योग्य वाटत नाही. कारण अशा प्रकारे उद्या एखादा भ्रष्ट पोलिस ही चांगल्या व्यक्तिला घरात घुसून ठार करू शकेल व नंतर ठार झालेली व्यक्ती गुन्हेगारी वर्तनाची होती असा कांगावाही करू शकेल. म्हणूनच पोलिसांनी शक्यतो संशयितांना जिवंत पकडावे, अगदीच नाईलाज असेल तर त्यांच्या हातापायावर गोळ्या चालवाव्यात, पकडलेल्या आरोपींना न्यायालयापुढे सादर करावे. खटला चालवून त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले म्हणजे न्यायालयाने ठरवून दिलेली शिक्षा गुन्हेगारांनी भोगावी अशी आपली पद्धत आहे. काहि त्रूटी यात असल्या तरी याला पर्याय म्हणून अर्धसत्य चित्रपटात सूचविली गेलेली पद्धत अधिकच घातक आहे. पाकिस्तान बरोबर काश्मीर बाबतीत चर्चेचे 'गुर्‍हाळ' अनेक दशके चालू आहे तसेच ह्या पुढेही अनेक दशके (कदाचित शतके) चालू राहील. पाकिस्तान भारतात दहशत कारवाया चालूच ठेवेल. आपण परिपक्व आदर्शवादाचे बिल्ले छातीवर मिरवूया. >> हा परराष्ट्राशी संबंधित विषय आहे. अर्धसत्य च्या पटकथेशी याचा संबंध नसल्याने काही भाष्य करीत नाही. अर्धसत्य ने सूचविलेला उपाय मला वास्तववादी वाटत नाही आणि एखादी कलाकृती वास्तवापासून दूर आहे http://www.misalpav.com/node/19372#comment-345317 असा अभिप्राय देण्याचं माझं स्वातंत्र्य आपणही मान्य कराल अशी आशा आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

राही Mon, 10/10/2011 - 17:10
एकदा गिरीश कर्नाड यांची प्रदीर्घ मुलाखत ऐकण्या-पाहाण्याचा योग आला होता. त्यांना विचारला गेलेला एक प्रश्न असा होता- इतकं सगळं समृद्ध आयुष्य तुम्ही जगलात. तर आता एखादी गोष्ट व्हायला हवी होती ती राहून गेली,अशी एक खंत तुम्हाला कधी वाटते का? तर त्यावर ते म्हणाले होते,-वैयक्तिक आयुष्याबाबत कसलीच खंत नाही.पण सार्वजनिक आयुष्यात मात्र एक गोष्ट तीव्रतेने घडावी असं वाटत होतं,ती गोष्ट घडली नाही. तेंडुलकरांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं, तेही माझ्या आधी, ते मिळालं नाही.

चिरोटा Sat, 10/08/2011 - 15:37
आय आय टी/आय ए एस/ एन डी.ए मध्ये मराठी टक्का कमी, आता ज्ञानपीठपण? असो.
आपले काय मत आहे?
ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार? हिंदी भाषा अनेक राज्यांत बोलली/वाचली जाते तेव्हा त्या भाषेत लिहिणार्‍यांना अधिक पुरस्कार मिळावेत ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. कन्नड साहित्याविषयी खूप माहिती नाही पण मित्र सांगतात त्यानुसार साहित्यात विविधता प्रचंड आहे.
का असे पुरस्कार मिळवण्यासाठी पडद्यामागे ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्यात मराठी माणूस मागे पडतो
सरकारी पुरस्कार मिळवण्यासाठी हालचाली कराव्याच लागतात. अगदी दादासाहेब फाळके पुरस्कारापासून ते भारतरत्न पर्यंत. ज्ञानपीठचे ठावूक नाही पण आधिचे ज्ञानपीठ विजेते बघितलेत तर त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच आहे असे म्हणता येईल. डॉ. चंद्रशेखर कंबार ह्यांना पुरस्कार देण्यापेक्षा तो एस्.एल. भैरप्पा ह्यांना मिळायला हवा होता असे काही कन्नड लेखकांचे मत असल्याचे वाचले. ( http://www.dnaindia.com/bangalore/report_noted-kannada-writer-patil-puttappa-kicks-up-jnanpith-storm_1589749 ) Puttappa sees intense lobbying as the reason for Bhyrappa losing out to less deserving litterateurs like Kambar भैरप्पा ह्यांनी एका पुस्तकात्/भाषणात इंदिरा गांधींना भ्रष्टाचाराची माता असा उल्लेख केला होता. तेव्हा योगदान अधिक असूनही पुरस्कार मिळण्याची शक्यता ३ वर्षे तरी नाही!! ( कंबार ह्यांचे नाव तर अनेक कन्नड मित्रांना माहितही नव्हते! पण पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर त्यांनी माना डोलावल्या!! कंबार ह्यांचेही साहित्य वाचनिय/अभ्यासनीय आहे पण भैरप्पांएवढे ते लोकप्रिय नाहीत). प्रश्न असा पडतो की हे intense lobbying कोण करतो ? ( कर्नाटकात भा.ज.प. चे सरकार आहे . त्यांच्या मतांना केंद्रातले मंत्री फार विचारतील असे वाटत नाही. केंद्रात कर्नाटकचे दोनच वजनदार मंत्री आहेत. एस्,एम. कॄष्णा / वीरप्पा मोईली . मराठी मंत्री तर केंद्रात अनेक आहेत आणि अधिक वजनदार) निवडपक्रिया येथे दिली आहे ( http://jnanpith.net/awards/jnanpith-award ) The process of selection begins with the submission of proposals by a large number of litterateurs, teachers, critics and discriminating readers, also from various universities, literary and language associations and other similar organisations. (As per the rules of the award, once a language gets the award, it is not eligible for consideration during the next three years. Thus three languages are out of reckoning for the award every year). Intense lobbying कुठे करावे लागते वर कळते.

In reply to by चिरोटा

दिपोटी Sun, 10/09/2011 - 06:52
चिरोटाजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एक खुलासा : या धाग्यामागे 'आपल्या तो बाळ्या' या न्यायाने 'मराठी साहित्याला 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत अधिक प्राधान्य मिळायला(च) हवे' असा कोता विचार मांडण्याचा हेतू निश्चित नव्हता. मूळ धाग्यात आणि माझ्या वरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे धाग्याचा खरा मुद्दा आहे : जर 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भाषांतील साहित्यापेक्षा जास्त सरस आहे' हे गृहितक (assumption) वा जनमानसातील विचार खरा मानला तर त्याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत का दिसत नाही? असे प्रतिबिंब दिसत नाही याचे कारण या दोहोंपैकी कोणते : (अ) मुळात हे गृहितक वा जनमानसातील विचार चुकीचा आहे किंवा (ब) गृहितक खरे आहे पण 'पडद्यामागील हालचालीं'मुळे वस्तुस्थिती व पुरस्कार-विजेत्यांची यादी मध्ये तफावत आहे ? ज्ञानपीठ पुरस्कार विजेता निवडीची प्रक्रिया पारदर्शक व स्वच्छ असेल तर या निवडीचा स्वीकार सर्वांनी करायलाच हवा. जर यात मराठी साहित्याला इतरांच्या मानाने कमी पुरस्कार मिळाले तर so be it ! तर 'ही प्रक्रिया अशी स्वच्छ आहे का' असा प्रश्न मांडणे व त्यावर चर्चा होणे निव्वळ एवढाच हेतू या धाग्यामागे आहे.
ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार?
इतर भाषांतील साहित्य मराठी साहित्यापेक्षा निश्चितच कमी वा अधिक सरस असू शकतात. पुनरुक्तीचा धोका पत्करुन परत एकदा : मुद्दा असा आहे की 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भारतीय भाषांमधील साहित्यापेक्षा अधिक सकस व समृध्द आहे' असा जो सर्वसामान्य विचार आहे तो विचार तरी एकतर मुळातच चुकीचा आहे अथवा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या निवडप्रक्रियेत (पडद्यामागील हालचालींना सुध्दा महत्व दिल्यामुळे) घोळ आहे : या दोहोंपैकी सत्य काय आहे? Interestingly, 'इतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार?' असा प्रश्न प्रतिसादाच्या सुरुवातीला विचारुन प्रतिसादाच्या शेवटी आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.

In reply to by दिपोटी

मराठी (व बंगाली) साहित्य इतर भारतीय भाषांमधील साहित्यापेक्षा अधिक सकस व समृध्द आहे' असा जो सर्वसामान्य विचार आहे तो विचार तरी एकतर मुळातच चुकीचा आहे इतर भाषांमधील मी काही खूप लेखन वाचलेले नाही परंतु मराठी लेखनाबद्दल नेहमी असे बोलल्या जाते की, एकसुरीपणा आणि लेखनातील साचलेपणा यामुळे मराठी साहित्य लेखन फारसं पुढे जातांना दिसत नाही. इतर भाषेच्या तुलनेत ज्ञानपीठ पुरस्काराच्या यादीत आपण मागे का आहोत त्याचाही विचार केला पाहिजे. मराठीतील एखादी कलाकृती गाजते आणि अनेक दिवस संबंधित लेखकाला पुढे काय लिहावे असा प्रश्न पडतो आणि लिहिले तरी पूर्वी इतकेच कसदार लेखन आणि विषय मांडतांना नावीन्य लेखनात दिसून येत नाही. मराठी समाजमनावर आणि साहित्यावर विविध प्रभाव पडत असतात अशा प्रभावांचा विचार समर्थपणे मराठी साहित्यातून आला पाहिजे. सभोवातलाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलत्या प्रवाहांचा विचार समर्थपणे मराठी साहित्यातूना आला पाहिजे, तो का येत नाही ? प्रचारकी लेखनापेक्षा अधिक कलात्मकता प्रकट करणारे लेखनच आपल्याला ज्ञानपीठाकडे घेऊन जातील असे मला वाटते. गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी,कलात्मकता, वैश्विक मुल्य, लेखनाचा नवा आकृतीबंध मराठी लेखनात आला पाहिजे. साचेबद्ध,एकसुरी, आणि कंटाळवाणे साहित्य ज्ञानपीठाच्या शर्यतीत टीकणार कसे ? शेतकरी, कष्टकरी, दलित, स्त्रिया, यांच्याबद्दलचे लेखन अजूनही प्रभावीपणे आलेले नाही त्यामुळे मराठी लेखनाला अजून खूप वाव आहे, भविष्यात ज्ञानपीठ आपल्यापासून फारसे दूर राहणार नाही असे वाटते. नवा मराठी वाचक जोडणारे किती मराठी लेखन आज बाजारात उपलब्ध आहे. एखाद्या नव्या मराठी वाचकाने एखादी नवी दर्जेदार कादंबरी वाचायला मागितली तर एक वाचक म्हणून आपण या दशकात उत्तमोत्तम वाचलेल्या मराठी पुस्तकांपैकी आपलं कोणत्या नावावर एकमत होईल ? मी अजूनही ययाती आणि प्रसिद्ध अशा काहीच पुस्तकांची नावे का घेतो ? कारण या कलाकृतींनी मराठी वाचकांच्या र्‍हदयाचा ठाव घेतलेला आहे. मागेही म्हटलं होतं तेच म्हणतो की, विंदांच्या कविता वाचून डॉ.कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते. असे नवे वाचक जोडणारे लेखन किती लेखकांनी दिले आहे याचाही विचार या निमित्ताने झाला पाहिजे असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिपोटी Sun, 10/09/2011 - 15:48
डॉ बिरुटे, मराठी साहित्यातील कमतरता / सुधारणेस जागा / नवीन विषय वगैरे मुद्यांचा हा आढावा-धांडोळा निश्चितच आवडला ! - दिपोटी

JAGOMOHANPYARE Sat, 10/08/2011 - 20:04
मराठी लेखकाला ज्ञानपीठ द्यायचे असेल तर दोन क्रायटेरिया आहेत.. नावाची सुरुवात वि ने असावी लागते आडनावात शेवटी कर असावे लागते.. वि स खांडेकर वि वा शिरवाडकर विन्दा करंदीकर त्यामुळे इतराना ज्ञानपीठ मिळणे शक्य नाही.. :)

In reply to by गवि

शाहिर Mon, 10/10/2011 - 18:21
विग मिपाकर यांना मानाचा मिपा पीठ पुरस्कार जाहिर झाला आहे ( खर तर गुर्‍हाळ पूरस्कार मिळायला हवेत असे अनेक लेखक आहेत मि पा वर ..नावे घेतली कि मारुतीच्या शेपू टा सारखे प्रतिसाद ..असो )

प्रभाकर पेठकर Sat, 10/08/2011 - 20:59
'अर्धसत्य' कुठल्या कथेवर आधारीत आहे. तो संपूर्णपणे त्या कथेवर आधारीत आहे की त्याच्या एका भागावर वगैरे जे काही 'पूर्णसत्य' असेल किंवा 'अर्धसत्य' असेल ते असूदे बापुडे आम्हाला 'अर्धसत्य' चित्रपट मनापासून आवडला. तो मलातरी 'रटाळ' किंवा 'प्रचारकी' वगैरे वाटला नाही. तसेही, एखाद्या कथेचा चित्रपट बनविताना चित्रपटक्षेत्राची अशी म्हणून काही गणितं असतात त्यांना अनुसरून कथानकात बदल केले जातात. ह्यालाही लेखकाची संमती असतेच. अन्यथा लेखकाला कोर्टाचा मार्ग मोकळा असतो. जर अजिबात काही बदल करावयाचे नसतील तर लेखकाने एकतर स्वतःच आपल्या कथेवर चित्रपट काढावा किंवा आपल्या कथा चित्रपट निर्मात्यांना 'विकू' नयेत. 'कमला' चित्रपटही पाहिला आहे पण आता तपशिलवार आठवत नाही. वाचक, लेखकाचे लेखन डोक्यावर घेतात ह्याहून दूसरा पुरस्कार तो काय? पुलंना ज्ञानपिठ नाही मिळाले म्हणून त्यांच्या लेखनाचा दर्जा काही कमी होत नाही. पुलंच्या पश्चात आजही कधी एखाद्या पार्टीत, सहलीत, दूरच्या प्रवासात किंवा अगदी सहजपणेही जेंव्हा जेंव्हा पुलंच्या लेखनाचे संदर्भ निघतात, चर्चा होतात तेंव्हा तेंव्हा उतारेच्या उतारे पाठ असलेले अनेक जणं चर्चेत रंग भरतात. लोकं डोळ्यात पाणी येईस्तोवर हसत राहतात. आपले वैयक्तिक दु:ख, समस्या विसरायला लावणारे पुलंचे लेखन लाखो वाचकांनी स्वतःच्या मनावर कोरले आहे. तो पुलंना वाचकांनी बहाल केलेला सर्वात मोठा पुरस्कार आहे. इतर सर्व पुरस्कार (ज्ञानपिठासहित) म्हणजे एक 'औपचारिक' साहित्यिक घटना म्ह्णावी लागेल.

In reply to by यकु

प्रभाकर पेठकर Sat, 10/08/2011 - 21:18
अर्धसत्य पहिला नाही. कुठे मिळाल्यास जरूर पाहा. पोलीसखात्यात होणारी घुसमट, सदाशिव अमरापुरकरांचा हिन्दीतील पदार्पणातील अभिनय, ओम पुरीचा, घुसमट सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा , अभिनय इत्यादी अनेक गोष्टीनी पूर्णत्वास नेलेला 'अर्धसत्य' चित्रपट एकदा पाहावाच असा आहे. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

ज्यांनी पाहिले नसतील आणि पाहण्यास इच्छुक असतील त्यांच्याकरिता अर्धसत्य http://www.youtube.com/watch?v=WTyarLp-zuQ कमला http://www.youtube.com/watch?v=r6AJ8gAzejA&feature=watch-now-button&wide=1

In reply to by यकु

कुलकर्णी साहेब, तुमचा या दोन्ही चित्रपटांवरचा अभिप्राय जाणण्यास उत्सुक आहे. तुम्ही यापुर्वी रारंगढांग पुस्तकावर दिलेला अभिप्राय अजुन माझ्या स्मरणात आहे. प्रवाहाविरुद्ध असले तरी आपले प्रांजळ मत आपण मांडू शकता हे त्यावेळी दिसून आले होते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

प्रभाकर पेठकर Sun, 10/09/2011 - 01:29
प्रवाहाविरुद्ध असले तरी आपले प्रांजळ मत आपण मांडू शकता हे त्यावेळी दिसून आले होते. हे कौतुक इथे कशा करीता? प्रवाहाविरुद्ध असेल तरच 'प्रांजळ' असे काही ठसविण्याचा प्रयत्न आहे का? दोन्ही चित्रपटांच्या लिंक्स दिल्या, कौतुकास्पद आहे. पुढील वाक्य अभिप्राय कुठल्या दिशेने अपेक्षित आहे हे 'सुचविणारा' आहे. ते जरा खटकले. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुढील वाक्य अभिप्राय कुठल्या दिशेने अपेक्षित आहे हे 'सुचविणारा' आहे. ते जरा खटकले. >> जी व्यक्ती बहुसंख्यांच्या प्रवाहाविरुद्ध स्वत:चे मत मांडण्याचे धाडस करते त्या व्यक्तीला मला कसा अभिप्राय अपेक्षित आहे हे मी कशाला सूचवेन? बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे असे आपणांस वाटते की काय?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 15:35
बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे असे आपणांस वाटते की काय? अजिबात नाही. तसे असते तर मी आपल्याला प्रतिसाद न देता श्री. एकनाथ यशवंत ह्यांना व्यनिद्वारे 'सावध' केले असते. पण, ज्या शब्दात आपण आपला प्रतिसाद बांधाला आहे त्यावरून 'बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे' असा आपलाच गैरसमज झाल्याचे जाणवल्याने आपणास प्रतिसाद दिला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण, ज्या शब्दात आपण आपला प्रतिसाद बांधाला आहे त्यावरून 'बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे' असा आपलाच गैरसमज झाल्याचे जाणवल्याने आपणास प्रतिसाद दिला आहे. >> माझ्या प्रतिसादातून माझा गैरसमज झाला आहे असा जो आपला गैरसमज झाला आहे त्याबद्दलचे हे स्पष्टीकरण:- नाही मला माझ्या त्या प्रतिसादातून असे सूचवायचे होते की श्री. कुलकर्णी ह्यांचा अभिप्राय निर्भीड व प्रांजळ असतो. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट त्यांनी स्वत: पाहावे व आपला अभिप्राय मांडावा. तो मी मांडलेल्या अभिप्रायाच्या अनुकूल / प्रतिकूल कसाही असला तरी मी त्या अभिप्रायाचा निश्चित आदर करील. बाय द वे - आपल्या ज्येष्ठते विषयी पूर्ण आदर बाळगूनही असे म्हणतो की मी श्री. कुलकर्णी यांना काही सूचविले असेल तर ते कुठल्या तरी गैरसमजाने असा जो आपण तर्क बांधलात आणि इथे मांडलात तो माझ्या व श्री. कुलकर्णी यांच्या संवादात शिरून आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Mon, 10/10/2011 - 16:37
... असा जो आपण तर्क बांधलात आणि इथे मांडलात तो माझ्या व श्री. कुलकर्णी यांच्या संवादात शिरून आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो
बाप रे बाप!! औचित्यभंग ?!! श्रीयुत गुगळे, या व अशा संस्थळावरील एखाद्या खुल्या धाग्यावर दिलेल्या आपल्या खुल्या प्रतिसादाला इतर कोणीही तसाच खुला प्रतिसाद दिला तर तो औचित्यभंग ठरत नाही किंवा यात गैर काहीही नाही. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. खुल्या धाग्यावर खुली चर्चा होते - येथे खाजगी संवाद (वा खाजगी इतर काहीही) नाही. कोणाचाही कोणताही प्रतिसाद हा कोणालाही उलटा प्रतिसाद देण्यासाठी मोकळा आहे. खाजगी संवादासाठी व्यनिची सोय आहे हे लक्षात ठेवल्यास सर्वांनाच बरे. - दिपोटी

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Mon, 10/10/2011 - 16:52
श्रीयुत गुगळे, बाय द वे - एक मैत्रीपूर्वक सल्ला ... श्रीयुत प्रभाकर पेठकर यांना उद्देशून लिहिलेला 'औचित्यभंगा'चा प्रस्ताव आपणच मागे घेतल्यास बरे नपेक्षा प्रतिसादांची ही जी वरील विशिष्ठ फांदी प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या प्रतिसादाने सुरु झाली आहे, या त्यांच्या संवादात शिरुन आपण दिलेला आपला या फांदीवरील पहिला प्रतिसाद हा मग आपल्या व्याख्येनुसार (मात्र माझ्या व्याख्येनुसार निश्चितच नाही) आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो ... काय म्हणता? - दिपोटी खुद के साथ बातां : धागा भरकटला आहेच, तो परत कसा आणावे बरे ?

In reply to by दिपोटी

प्रतिसादांची ही जी वरील विशिष्ठ फांदी प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या प्रतिसादाने सुरु झाली आहे, या त्यांच्या संवादात शिरुन आपण दिलेला आपला या फांदीवरील पहिला प्रतिसाद हा मग आपल्या व्याख्येनुसार (मात्र माझ्या व्याख्येनुसार निश्चितच नाही) आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो ... काय म्हणता? >> तसं अजिबात म्हणता येणार नाही कारण अर्धसत्य विषयी मी जी काही मतं मांडली होती त्याविषयी श्री. पेठकर यांनी आपल्या प्रतिसादातील १ ल्या परिच्छेदात काही मुद्दे मांडले होते. त्यांना उत्तर देणे मला क्रमप्राप्त होते. श्री. कुलकर्णी यांनी त्यांच्या २ र्‍या परिच्छेदा विषयी सहमती दर्शविली होती. मी त्या संदर्भात संवादात शिरलोच नाही. श्री. कुलकर्णी यांनी अर्धसत्य पाहिला नव्हता व श्री. पेठकर यांनी त्यांना तो पाहा असे सूचविले होते. श्री. कुलकर्णी यांना संदर्भाकरिता मी कमला व अर्धसत्य च्या लिंक दिल्या हा औचित्यभंग ठरत नाही. खुद के साथ बातां : धागा भरकटला आहेच, तो परत कसा आणावे बरे ? >> आधी तुम्ही मला सूचविलेत की इथे खासगी काही नसते. खासगी हवे असेल तर व्य नि करावा. इथे तुम्ही स्वत:शी साधलेला संवाद टंकलाय तेव्हा त्याबद्दल मी काही अभिप्राय व्यक्त केल्यास तो तुमच्या व्याख्येनुसार औचित्यभंग ठरणार नाही असे समजून लिहीत आहे. धागा भरकटला आहेच पण तो नेमका http://www.misalpav.com/node/19366#comment-345143 या प्रतिसादामुळे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Mon, 10/10/2011 - 17:35
श्रीयुत गुगळे, __/\__ प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या संवादात आपण शिरणे हे (आपल्या काही कारणांमुळे) आपल्याला 'क्रमप्राप्त' ठरते तर यशवंत एकनाथ व आपण यांच्या संवादात श्री पेठकर यांनी शिरणे हा (त्यांची काहीही कारणे असली तरी) एकदम त्यांनी केलेला 'औचित्यभंग' ठरतो. हम्म ... वैयक्तिक सोयीनुसार व्याख्या बदलतात असे दिसते! - दिपोटी

In reply to by दिपोटी

मी माझ्या प्रतिसादातील मुद्यांना उत्तर दिले आणि संदर्भाकरिता माहिती (चित्रपटांचे दुवे) पुरविली याला आपण औचित्यभंग म्हणताय. ज्यात मी कुठेही श्री. कुलकर्णी व श्री. पेठकर यांच्या संवादात शिरलो नव्हतो. याउलट श्री. पेठकर यांनी मी श्री. कुलकर्णी यांना मला स्वत:ला सोयीस्कर असा अभिप्राय मांडण्यास सूचवितो आहे असा आरोप माझ्यावर केला होता. असा आरोप एकवेळ श्री. कुलकर्णी त्यांना वाटल्यास करू शकतात. परंतू असा आरोप श्री. पेठकर यांनी माझेवर करणे यास मी औचित्यभंग म्हंटले होते. इथूनच धागा अवांतर भरकटला. खरे तर आपण मूळ धागा लेखक असल्याने आपण हा अवांतर प्रकार ताणायला नकोय. तसेही आपल्या माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?>> धाग्यात हा प्रश्न असूनही मी जेव्हा या प्रश्नातील दोन पर्यायांकरिता नकारात्मक उत्तर दिलं ते आपणांस रूचलं नाही. माझ्या त्या प्रश्नाच्या उत्तराला आपण पुरस्काराला कोण पात्र वाटते यावर दहा जणांना विचारले असता अकरा मते मिळू शकतील ... प्रत्येकाचे वाचन व प्रत्येकाचा व्यासंग निराळा असतो. मला पात्र वाटणारे साहित्यिक इतरांना वाटतील असे जरुरी नाही. तेव्हा 'कोण पात्र आहे' हा मुद्दा या धाग्यासाठी (पूर्ण गौण नसला तरी) तसा दुय्यम आहे. >> असं उत्तर दिलंत. जर आपल्याला हा मुद्दा खरंच गौण वाटत होता तर आपण मूळ धाग्यात नावं सूचविलीच नसतीत तर इतका वादविवाद झडलाच नसता. कारण सूचविलेल्या नावांचे समर्थन करणारे असतात तसे त्यांचा विरोध करणारे ही असणारच की.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दिपोटी Mon, 10/10/2011 - 18:53
मी आपल्या (व इतर कोणाच्याही प्रतिसादाला) औचित्यभंग मानलेले नाही, तर आपणच श्री पेठकरांच्या प्रतिसादाला 'औचित्यभंग' म्हणण्यात (व स्वतःच्या प्रतिसादाला मात्र 'क्रमप्राप्त' म्हणण्यात) असलेली विसंगती दाखवली आहे. पेठकरांच्या (वा कोणाच्याही या व अशा खुल्या संस्थळांवरील खुल्या व सभ्य भाषेतल्या) प्रतिसादाला 'औचित्यभंग' म्हणणे निश्चितच खटकण्याजोगे आहे व म्हणूनच हा प्रकार (अवांतर असूनही) ताणला गेला. माझ्या या प्रतिसादाला आपण प्रतिसाद दिला नाही तेव्हा आपली याला अनुमती आहे असे समजतो. असो. नाही म्हणालो तरी धाग्याचे थोडेफार धिरडे झाले आहेच. आतापर्यंतच्या प्रतिसादांबद्दल तरीही धन्यवाद. आपण सर्वांनीच थोडा संयम राखून व किंचित थोडासा विश्राम घेऊन इतरही नवीन प्रतिसादकर्त्यांना प्रतिसादाची संधी दिली तर थोडे नवीन विचार येण्याची शक्यता आहे नाहीतर तेच ते चर्वितचर्वण होण्याचा संभव अधिक आहे. 'सूचवलेल्या नावांचे समर्थन करणारे असतात तसेच विरोधही करणारे असतात' हा आपला मुद्दा मात्र पटला. असे असायला निश्चितच हवे. मात्र वर माझ्या काही प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ''ज्ञानपीठ' पुरस्कारास पात्र अशी नावे सूचवा' असा धाग्याचा मुख्य विषय नसून 'मराठी भाषेला आजपावेतो तीन पुरस्कार लाभले ते या भाषेतील - आपल्या मायबोलीतील - साहित्याच्या गुणवत्तेच्या प्रमाणात / प्रमाणाहून कमी / प्रमाणाहून जास्त लाभले का' आणि त्या अनुषंगाने 'या पुरस्काराच्या निवड-प्रक्रियेत lobbying सारखे (नकारात्मक अर्थाने) प्रकार घडतात का' अशा दोन मुख्य विषयांवर साधक-बाधक चर्चा अपेक्षित होती. अर्थात काही प्रतिसाद या दिशेने वळले परंतु एकंदरीत हा धागा मात्र या पुरस्कारास पात्र/अपात्र अशा वैयक्तिक नावांमध्येच गुरफटून अडकला. (या धाग्यातील अखेरीस माझा प्रश्न 'आपले मत काय आहे' हा मी माझी वैयक्तिक मते म्हणून फक्त उदाहरणार्थ सुचवलेल्या नावांच्या नंतर लगेच न टाकता एका स्वतंत्र ओळीत दिला असता तर हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी आहे - व फक्त पात्र नावे सूचवण्यासाठी नाही - हे कदाचित अधिक स्पष्ट झाले असते. असो.) - दिपोटी

In reply to by दिपोटी

माझ्या या (http://www.misalpav.com/node/19366#comment-345350) प्रतिसादाला आपण प्रतिसाद दिला नाही तेव्हा आपली याला अनुमती आहे असे समजतो. >> नाही, मी आपल्या उपरोक्त प्रतिसादाशी अजिबात सहमत नाही. परंतू श्री. पेठकर यांनी स्वतःच हा विषय संपविला असताना त्यावर आता तुम्ही आणि मी चर्चा करावी असे वाटत नाही.

In reply to by दिपोटी

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 18:11
श्री. दिपोटी साहेब, माझ्या प्रत्येक प्रतिसादाला कारण आहे. उगाचच विषय भरकटवण्यासाठी किंवा एखाद्याला भडकवण्यासाठी कुठलेच प्रतिसाद दिलेले नाहीत. तरी पण, विषय भरकटण्यात अनवधानाने माझा हातभार लागला आहेच. माझे सर्व प्रतिसाद उडविले तरीही हरकत नाही. आपण संपादक मंडळास तशी विनंती करावी. किंवा ह्या प्रतिसादाद्वारे हिच माझी विनंती समजून संपादक मंडळाने योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपोटी Mon, 10/10/2011 - 18:59
श्री पेठकर, 'साहेब' वगैरे म्हणू नका हो ... आपण सगळे या संस्थळावर मित्रच आहोत. मला वाटते विषय भरकटवण्यासाठी माझ्यासकट व इतरांसकट आपल्या सगळ्यांचाच हातभार लागला आहे, तेव्हा आपण माघार घ्यायची काहीही गरज नाही आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

प्रभाकर पेठकर Mon, 10/10/2011 - 20:56
धन्यवाद श्री. दिपोटी. पण आता ह्या चर्चेतून काही निष्पन्न होईलसे दिसत नाही. त्यामुळे इतरांचा ह्या वादविवादात वेळ जाऊ नये आणि मुख्य मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. असो.

आशु जोग Sun, 10/09/2011 - 00:53
शिरवाडकर आणि खांडेकर हे निश्चित 'ज्ञानपीठ' च्या योग्यतेचे होते. पण करंदीकरांच्याबद्दल काय बोलावे "देणार्‍याने देत जावे" आणि "सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते" याच्या पलिकडे कुणी माहिती दिली तर बरे होइल

पिवळा डांबिस Sun, 10/09/2011 - 11:22
खांडेकर, शिरवाडकर, आणि करंदीकर हे निश्चितच ज्ञानपीठ मिळविण्याच्या योग्यतेचे साहित्यिक होते.... लेखकाने सुचविलेल्या साहित्यिकांबद्दल काय म्हणू? तो लहान तोंडी मोठा घास ठरायचा! इतकेच म्हणतो की जर मी निवड समितीवर असतो तर त्यांची निवड केली नसती.... ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिले जातात की नाही ते माहिती नाही पण असते तर मी न. र. फाटक, इरावती कर्वे आणि बहिणाबाई चौधरी यांची निवड केली असती.....

पैसा Sun, 10/09/2011 - 11:46
विकि वरच्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या ४५ वर्षात एकूण २२ राजभाषांपैकी फक्त १० भाषांमधे हा पुरस्कार दिला गेला आहे. हे पाहता मराठीत ३ ही संख्या कमी वाटू नये. आणखी अनेक कवी, लेखकाना हा पुरस्कार मिळायला हवा होता हेही खरंच पण तसाच दावा इतर भाषिकही करतील काही लेखक -कवी एकापेक्षा अधिक भाषांमधे लेखन करतात. उदा. कै. बा.भ. बोरकर. पण त्यानाही लायक असून हा पुरस्कार मिळाला नाही. मरणोत्तर पुरस्कार द्यायची प्रथा नाही, नाहीतर पार ४००/५०० वर्षापूर्वीच्या कवी लेखकानासुद्धा हा पुरस्कार द्यावा लागेल!

In reply to by पैसा

यकु Sun, 10/09/2011 - 15:00
नाहीतर मेल्या म्हशीला मणभर दूध आहेच!
ते म्हैस कोकणातली की घाटावरची यावर अवलंबून आहे ;-) पण 'या' म्हशींच्या बाबतीत कोकणातल्याच म्हशींना जास्त दुध असते असे उलटे निरिक्षण आहे.

In reply to by यकु

ते म्हैस कोकणातली की घाटावरची यावर अवलंबून आहे पण 'या' म्हशींच्या बाबतीत कोकणातल्याच म्हशींना जास्त दुध असते असे उलटे निरिक्षण आहे. हा हा हा. सॉलिड निरीक्षण.

''कालाय तस्मय नमः'' मी तर भगत साहेबांना कधी हा पुरस्कार मिळतोय ह्याची वाट पाहत आहे . हे आडनाव आपल्या मराठीत सुद्धा आहे .त्यामुळे तेवढेच समाधान

In reply to by निनाद मुक्काम …

वपाडाव Mon, 10/10/2011 - 14:59
चेतन भगत सारख्या सुमार दर्जाच्या तद्दन फिल्मी वाटाव्या अशा कथा लिहिणार्‍या माणसाला जर ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आपण करत असाल तर आपला ती$$$$$$$व्र निषेध..............

चिरोटा Sun, 10/09/2011 - 14:00
डॉक्टरांशी सहमत.
आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.प्रश्न एवढाच की ज्याला ज्ञानपीठ दिले जाते ती व्यक्ती लायक आहे की नाही. समजा आपण निवड समीतीत आहोत आणि आपल्याकडे चार भाषांतील लेखकांची यादी आली तर कोणाची निवड करु ? १)ज्याच्या लेखनात्/काव्यात विविधता/कल्पकता/नाविन्य आहे. २) ज्याचे लेखन समाजाच्या विविध थरांत वाचले गेले आहे. ३)ज्याचे पुस्तक्/पुस्तके विद्यापीठांत संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. ४)भारताबाहेरही त्याच्या लिखाणाची चर्चा होते. ५) ज्याचे थोडेफार लिखाण ईतर भारतिय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. सध्या किती मराठी लेखक्/कवींची नावे अशी घेता येतील? कोणी सांगु शकेल का? हे सर्व असेल तर lobbying करणे ही पुढची गोष्ट. समजा ह्या चार लेखकांतून दोन पात्र ठरले तर कोणाची निवड करायची?समितीवर एकाहून अधिक सदस्य असल्याने एका अमुक भाषेला डावलले जात असेल असे वाटत नाही.सध्याची निवड समिती बघितलीत तर त्यात एकही कन्नड सदस्य नाही.

In reply to by चिरोटा

दिपोटी Sun, 10/09/2011 - 14:33
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.
जेव्हा आपण एखादी सिस्टीम सुधारण्याचा वा आदर्श बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातील गैर बाबी काढून टाकणे हा उद्देश असतो. आता नोबेल वा इतर कोणत्याही पुरस्कारासाठी lobbying होते ही वस्तुस्थिती असली तरी ही वस्तुस्थिती अशा lobbying चे इतरत्र समर्थन करण्यासाठी वापरता येत नाही ... जो गलत है सो गलत है ... कारण शेवटी ही वस्तुस्थिती ही केवळ एखाद्या आदर्श सिस्टीम मधील विसंगती (नाईलाज / तडजोड / fault) म्हणून मानावी-स्वीकारावी लागेल व जेव्हा व जेवढे जमेल तेव्हा व तेवढ्या स्वरुपात ही विसंगती काढून टाकण्याचाच प्रयत्न झाला पाहिजे. असे पुरस्कार विजेते ठरवताना गुणवत्ता हा केवळ एकच निकष मानला पाहिजे. याबरोबरच 'पडद्यामागील हालचाली करण्याची क्षमता' हादेखील निकष असेल, तर गुणवत्तेचा निकष पिछाडीस पडण्याचा धोका संभवतो. उदाहरणार्थ, पंजाबी भाषेतील एखाद्या लेखकाने साहित्याला उत्तम योगदान दिले असेल पण त्याच्याकडे lobbying करण्याची इच्छा वा क्षमता वा दोन्ही नसेल तर त्याचा त्याला हा पुरस्कार मिळण्याच्या शक्यतेवर अजिबात - अगदी थोड्या अंशाने सुध्दा - परिणाम होता कामा नये. अगदी याच कारणामुळे 'ज्ञानपीठ' पुरस्काराच्या पात्रतेसाठी (आपल्याच वरील एका प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे) कोणत्याही भारतीय भाषेवर असलेले ३ वर्षांचे बंधन सुध्दा कृत्रिम व म्हणून अर्थहीन वाटते. गुणवत्ता - व केवळ गुणवत्ता - हा एकच निकष मानला तर एखाद्या भाषेतील दहा साहित्यिक इतर भाषांतील साहित्यिकांच्या तुलनेत उजवे ठरले तर त्या सर्वांना सलग दहा वर्षात हा पुरस्कार देणे यात तात्विक दृष्ट्या काहीही गैर नाही आहे.

In reply to by दिपोटी

चिरोटा Mon, 10/10/2011 - 11:27
Lobbying चांगल्या अर्थाने अपेक्षित आहे. आधिचे विजेते बघितलेत तर सर्वजण ज्ञानपीठ मिळवण्याच्या तोडीचे आहेत हे दिसून येईल.एखादा लेखक लोकांना ज्ञानपीठपात्र वाटत असेल तर लोकांना निवडसमीतीच्या तसे निदर्शानास आणून दाखवावे लागेल. विदा गोळाकरुन्/समाजातील ईतर लेखकांकडून्,विद्यापीठांकडून्,समी़क्षकांकडून वगैरे... मराठी वा बंगाली लेखकांना ज्ञानपीठ मिळत नाही तेव्हा हे असे lobbying होते नसावे किंवा ईतर भाषिक लेखकांचे लॉबिंग मोठ्या प्रमाणावर होते असावे किंवा आधि चर्चिलेली शक्यता- somebody else is more capable then them.

In reply to by चिरोटा

दिपोटी Mon, 10/10/2011 - 14:55
'लॉबिंग'च्या अर्थाबाबत थोडी संदिग्धता येऊ शकते, ती आधी दूर करुया. 'लॉबिंग'चा अर्थ - निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी - सर्वसाधारणपणे नकारात्मक घेतला जातो. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर : (श्री गुगळे यांच्या वरील एका प्रतिसादातील आयती तयार यादी घेऊन) "जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषा, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन अशा ( थोडक्यात म्हणजे एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेशी अजिबात निगडीत नसलेल्या अशा) भलत्याच निकषांच्या जोरावर त्या साहित्यिकाचे नाव त्याच साहित्यिकाने स्वतः किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने पुढे वा मागे ढकलणे" म्हणजे lobbying असा अर्थ मी गृहित धरतो. या नकारात्मक अर्थाचे lobbying होत असेल तर अर्थातच हा (कोणत्याही भाषेतील) इतर साहित्यिकांवर अन्याय आहे हे तरी आपल्याला मान्य व्हावे. हे असे होते का हे निश्चितपणे माहित नाही व तेच शोधण्यासाठी हा प्रपंच. अर्थात असे होत नसेल तर मग प्रश्नच मिटला. 'लॉबिंग'चा वर चिरोटा व चेतन सुभाष गुगळे यांनी लावलेला अर्थ मात्र सकारात्मक आहे. 'एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेच्या जोरावर त्या साहित्यिकाला समर्थन वा विरोध करणे' ... याला मी तरी justification असा सकारात्मक प्रतिशब्द वापरीन. कोणता शब्द वापरावा हा शेवटी फक्त terminology अथवा convention चा भाग आहे, तेव्हा निदान यात तरी खोलात शिरण्याची गरज नाही. कोणताही प्रतिशब्द वापरला तरी असा सकारात्मक प्रचार होणे यात काही गैर दिसत नाही. आता प्रश्न शेवटी असा उरतो की जर 'ज्ञानपीठ' (किंवा इतर कोणत्याही) पुरस्कारासाठी lobbying होत असेल तर ते वरील सकारात्मक ('justification' या) अर्थाने की नकारात्मक ('fielding लावणे' या) अर्थाने? - दिपोटी

गवि Mon, 10/10/2011 - 11:38
वरील प्रतिसादांपैकी श्री. गुगळे यांचे प्रथमपासूनचे म्हणणे विषयाला सोडून किंवा भरकटलेलं मुळीच वाटलं नाही. उलट जशी चर्चा व्हायला हवी तशीच त्यांनी केली आहे असं वाटतं. बाकी त्यांच्या मतावर मतमतांतरे होऊ शकतीलच. पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि Mon, 10/10/2011 - 13:41
तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून तुम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ज्या पद्धतीने मांडलेत ते अत्यंत वैध असून चर्चा करताना जे अपेक्षित असते तसेच आहेत आणि त्यात मूळ चर्चेला / मुद्द्याला / विषयाला सोडून काही भरकटलेले नाही असं माझं म्हणणं आहे. शिवाय चर्चा म्हटली की काही नवीन मुद्देही येणारच. तुम्ही मांडलेला अँगल मुद्दाम विरोधी म्हणून मांडलेला आहे असं वाटत नाही. त्यात सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे.

In reply to by गवि

तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून .......सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे. >> होय. हे मी समजून घेतले होतेच. मुख्य म्हणजे मी वर स्पष्टीकरणात मांडलेल्या बी. आर. चोप्रा व गिरीश कर्नाड यांच्या उदाहरणाशी सुसंगत आहे.

In reply to by गवि

साधामाणूस Mon, 10/10/2011 - 18:59
पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे. - गवि साहेब अगदी एक नंबर बोललात!

In reply to by कुंदन

चिरोटा Mon, 10/10/2011 - 16:31
बिसीबेळेभात डॉट कॉम आणि दाल रोटी डॉट कॉम वरून निवडसमीतीच्या सदस्यांना दर रविवारी मिठाई,गुलाबगुच्छ पाठवले जातात असे ऐकून आहे.

चित्रा Mon, 10/10/2011 - 19:08
उत्तम चर्चाविषय. तूर्त जर यामागे थोडे फार काही लॉबी करून होत असले तर ते बाजूला ठेवावे. कारण ते थोडेफार होत जरी असले तरी निवड ही चांगल्याच साहित्यिकांची झाली आहे असे दिसते. माझ्या मते या अशा सन्मानास पात्रतेसाठी एक प्रमाण 'बरेचसे साहित्य कालातीत असावे' असे असावे. काही साहित्य आणि त्याहीपेक्षा साहित्यिक आपल्याला आवडत असले, तरी त्यांचे सर्व साहित्य कालातीत असते असे मला वाटत नाही.

आशु जोग Mon, 10/10/2011 - 23:00
एक माहिती सर्वांसाठी पु. ल. देशपांडे यांची निवड ज्ञानपीठासाठी होण्याचे घाटत होते. परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. अन्यथा त्यांचा दर्जा नि:संशय ज्ञानपीठचा होता

In reply to by आशु जोग

ही माहिती निदान माझ्याकरिता तरी नवीन आणि अतिशय मोलाची आहे. म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशीही काही कारणे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by आशु जोग

गवि Tue, 10/11/2011 - 10:49
परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. बरोबर आहे. "पुढचे दोन तास मी एका हातात घरची वीट आणि दुसर्‍या हातात बाजारची वीट घेऊन त्याच्यामागे त्याचं घर बघत फिरत होतो. एखाद्या गोष्टीचा अतिशय कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात ते मला त्यादिवशी कळलं." कसं करणार भाषांतर..??

In reply to by गवि

मराठी_माणूस Tue, 10/11/2011 - 11:21
ह्या वरुन एक आठवले. स्वतः पुलंनी त्यांच्या एका लेखात "पाश्चात्यांना खरकटं म्हणजे काय हे कसे समजावणार " असे म्हटले होते. लेफ्टओव्हर वगैरे ठीक आहे , पण खरकटे म्हणल्यावर जो अर्थ ध्वनीत होतो तो कसा काय समजावणार.

In reply to by मराठी_माणूस

गवि Tue, 10/11/2011 - 11:39
अगदी अगदी.. आणि त्यातही नुसते लेफ्टओव्हर म्हणजे खरकटे नव्हे. अमुक पदार्थ ताजा, न उष्टावलेला असला तरी त्याचा स्पर्श झालेला हात खरकटा होतो. काही पदार्थांच्या बाबतीत तसं नाही... असंही काहीतरी त्यात आहे... सरळसोट नॅरेटिव्ह कथा कादंबर्‍यांची भाषांतरं त्यातल्यात्यात बरी होतात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. बापू काणे सेक्रेटरी जेव्हा म्हणतो "सुशी मेक्स फस्क्लास झुणका" ..... हे वाक्य तर सरळ इंग्रजीतच आहे.. पण त्यामागच्या भावनेला जे संदर्भ लागतात ते कुठून येणार इंग्रजीत? शिवाय पुलं फ्रान्सविषयी एकदा म्हणाले होते की "त्यांची ती द्राक्षसंस्कृती आणि आपली रुद्राक्षसंस्कृती" किंवा आमच्याकडे सर्वजण देशपांडे आहेत आणि ही (सुनिताबाई) तेवढी उपदेशपांडे आहे.. अहो कोट्यांवरच ज्याचा सगळा भार आहे ते भाषांतरित नाहीच होऊ शकत. चिंवि जोशींबाबतही मला वाटतं हेच होईल. मराठीच फार थोर आहे म्हणून नव्हे.. उलट बाजूने इंग्रजीतल्या भाषिक खाचाखोचा मराठी भाषांतरात तरी कशा आणणार?

In reply to by गवि

मराठी_माणूस Tue, 10/11/2011 - 12:23
चांगला मुद्दा मांडलात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. "ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार .

In reply to by मराठी_माणूस

>>"ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार . ते भाषांतर नसून रुपांतर आहे. उर्वरित वाक्याशी सहमत. अवांतर :- काही तरी गंडले आहे. मी प्रतिसाद देण्याआधीच जे प्रतिसाद इथे होते, ते माझ्या प्रतिसादाचे उपप्रतिसाद म्हणून दिसत आहेत. तरीही मी हा प्रतिसाद संपादित पण करू शकलो. काहीतर गडबड आहे. मिपाच्या तांत्रिक मंडळाने इथे लक्ष द्यावे.

In reply to by गवि

मध्यंतरी मिपावरच तेंडुलकरांच्या घाशीरामची पोर्टेबिलीटी कमी असल्याबद्द्लची चर्चा वाचली होती. म्हणजे त्यातली प्रवृत्ती सर्वत्र असेलही पण हे श्राद्ध, कोतवाली इ. भाषिक संदर्भ परकीय भाषांमधे कसे न्यायचे याबद्द्लची चर्चा होती. असो.

वपाडाव Tue, 10/11/2011 - 13:54
ताज्या बातमीनुसार, चंद्रशेखर कंबरा यांना ह्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे असे वाचण्यात आले आहे..... http://in.news.yahoo.com/blogs/thewatercooler/magic-kambara-writing-100727035.html

आशु जोग Wed, 10/12/2011 - 01:32
कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ विजेते होउन गेले पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये

In reply to by आशु जोग

सुनील Wed, 10/12/2011 - 10:10
सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये कन्नड तसेच मराठी आवृत्तीं किती प्रतींच्या होत्या?

In reply to by आशु जोग

चिरोटा Wed, 10/12/2011 - 14:32
पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही
खरे आहे. बेंगळूरमध्ये पहाल तर जुने कन्नड ग्रंथ मिळायची मारामार असते. पूर्ण शहरात १० हून अधिक दुकाने नसतील कन्नड ग्रंथ विकणारी.अनेक जण मैसूरला जातात पुस्तके घ्यायला.अनेक उच्चशिक्षित लोक ज्ञानपीठ काय्,साहित्य अकादमी काय ,संगीत वगैरे बाबतीत अनभिज्ञ असलेले मी पाहिले आहेत. मी,माझे काम्,माझे कुटूंब एवढाच विचार असतो. पं.भीमसेन जोशींचे निधन झाले तेव्हा तरुण पिढीला ते कन्नडिगा आहेत आणी त्यांनी कन्नड गाणी गायली आहेत हे माहित नव्हते,

सुनील Wed, 10/12/2011 - 10:16
'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र? येथी मराठी साहित्यिक म्हणजे मराठी भाषेत लिहिणारा साहित्यिक असे गृहित धरतो. कारण द रा बेंद्रे हे ज्ञानपीठ विजेते कन्नड कवी मराठी भाषक होते!

आशु जोग गुरुवार, 10/13/2011 - 00:08
पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही पण त्यांनी लिहिलेले एखादे पुस्तक सांगा म्हटले तर तो अडखळतो व्यक्ती आणि वल्ली चे तेलुगु रुपांतर नरसिंहराव यांनी केले आहे.

In reply to by आशु जोग

चिरोटा गुरुवार, 10/13/2011 - 12:02
पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही
हे नविनच ऐकतोय. ईतक्या वर्षात एकही तेलगु मित्राने त्यांची महती गायल्याचे आठवत नाही.चिरंजीवीबद्दल म्हणाल तर ठीक आहे.एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!

In reply to by चिरोटा

वपाडाव Fri, 10/14/2011 - 12:00
एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!
अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......

अप्पा जोगळेकर Fri, 10/14/2011 - 22:50
माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे? पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. प्र. के. अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे की नाही हे मला ठाउक नाही. पण मिळालेला असेल असे वाटते. जर मिळाला नसेल तर तो त्यांच्यावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय होय. भारतात होउन गेलेला आजवरचा सर्वश्रेष्ठ लेखक जर कोणी असेल ते आचार्य अत्रे हेच होय, असे प्रामाणिक मत आहे. साहित्याचे असे एकही दालन नाही, असा एकही कोपरा नाही की जिथे हा माणून मुक्तपणे आणि समर्थपणे वावरला नाही. कविता (मॄदू, गंभीर,विनोदी,विडंबन सगळ्या प्रकारच्या), नाटके (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारची), चित्रपट कथा (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारच्या), चरित्र लेखन, आत्मचरित्र लेखन, नाटकातील पदांची रचना करणे, चित्रपटातील गाणी लिहिणे, लहान मुलांसाठी वाचनमाला, शैक्षणिक पुस्तकांचे लिखाण,प्रचंड प्रमाणावर वॄत्तपत्रीय लिखाण आणि ऐतिहासिक कादंबरीसुद्धा, ही यादी संपतच नाही. जर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर विडंबन काव्याचे ते जनक आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर असा लेखक गेल्या दहा हजार वर्षांत होउन गेलेला नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. आयला, हे काय नवीनच ??

In reply to by अप्पा जोगळेकर

फारएन्ड Sun, 10/16/2011 - 12:54
तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार. पहिला लेखकाला असतो व दुसरा पुस्तकाला, असा माझा अंदाज आहे.

In reply to by फारएन्ड

अप्पा जोगळेकर गुरुवार, 10/27/2011 - 16:04
तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार या दुरुस्तीबद्दल आभार. माझ्याकडून चूक झाली.