Skip to main content

बुवांचा न्याय

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 25/05/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक बुवा राहत होते. लोक त्यांना बाबा म्हणत. बाबांवर गावाचं प्रेम होतं. वय तरूणच होतं. पण कुठल्याही गोष्टीचं तार्किक विश्लेषण, न्यायबुद्धी यामुळं गावातच काय पंचक्रोशीत त्यांचं नाव झालेलं होतं. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे कोर्टाची पायरी चढणंच बंद झालं होतं. गावाला बुवांचा अभिमान होता. त्यांना रहायला घर बांधून दिलं होतं. शेतजमीन दिली होती. लोक स्वतःहून ती जमीन कसत आणि उत्पन्न बुवांच्या चरणी आणून ठेवत. बुवा नको नको म्हणत असताना त्यांचं बँकेत खातं उघडलं होतं. त्यात पैसे जमा होत होते. अन्नधान्य, दूधदुभतं ..कशाचीच कमी नव्हती. बुवांचं म्हणणं काय करायचंय मला सडाफटिंगला हे ? गावाचं म्हणणं सडाफटिंग राहू नका. एक दिवस बुवांमुळे शेजारच्या गावातल्या एका कुटुंबाला न्याय मिळाला. त्यांच्यावरचं सावकाराचं अरिष्ट नाहीसं झालं. लग्नासाठी काढलेलं कर्ज आणि मोडलेलं लग्न यात त्यांनी सावकार आणि सासरकडची मंडळी यांना योग्य तो दंड दिल्याने पंचक्रोशीत त्या न्यायाची चर्चा झाली. न्याय तर झाला पण वधूपित्याचं म्हणणं असं पडलं कि आता मुलीशी कोण लग्न करणार ? मुलगी सुशील, सुंदर होती. बुद्धिमान होती. इतक्या चांगल्या मुलीचं वाटोळं होत होतं. सासरकडच्यांची शिक्षा अंमलात आणल्यास लग्न होतच नव्हतं. आणि लग्न केल्यास चुकीचा संदेशा जाउन न्याय होत नव्हता. गावाने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि काहीही केल्या बुवांच्या न्यायाची हेळसांड होऊ नये असा चंग बांधला. गावाने तोडगा काढला.. मुलगी चांगली आहे. मुलगा तिच्या लायकीचा नव्हताच. बुवा देखील एकटेच आहेत. अशी मुलगी चालून आलीये. बुवांनाच बोहल्यावर चढवलं तर क्या बात है !! झालं सगळ्यांनीच हा विचार उचलून धरला. बाहेरच्या पाहुण्यांनाही हे आवडलं. बुवांना गळ घातली गेली. बुवांचा नकार आला. पाटील, सरपंच.. सर्वांनी गळ घातली पण बुवा नाहीच म्हणाले. मुलीचा चेहरा कसानुसा झालेला.. अचानक वधुपित्याने येऊन बुवांचे पाय धरले. न्याय तर झाला पण माझी पोरगी देशोधडीला लागली. तिचा स्विकार करावा अशी विनवणी केली. मग बुवांवर मोठा दबाव आला. एक वेळ अशी आली कि बुवांचा नकार क्षीण पडला आणि तोच होकार समजून सर्वांनी जल्लोष केला. सर्वांनाच आनंद झालेला. पण बुवा खूष दिसत नव्हते. लग्न झालं बुवा नाराज बायको धास्तावलेली.. एक दिवस झाला. बुवा चिंताग्रस्त होते. पाच दिवस झाले. बुवांनी बायकोकडे पाहीलंदेखील नाही. महिना होऊन गेला बायको रडत होती. काय चुकलं ? दाद तरी कुणाकडे मागावी ? धर्माधिकारी तर स्वतःच बुवा !! वर्षभर वाट पाहील्यावर बायकोने धीर करून विषय काढला... बुवांच्या चेह-यावर तीव्र नाराजी.. विषाद आणि चक्क अपराधीपणाची भावना कसे बसे शब्द उच्चारत त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून बायकोला धरणीकंप झाल्यासारखं झालं. बुवा नपुंसक होते. ते कधीच तिला वैवाहीक सुख देऊ शकणार नव्हते. त्यांच्या स्वरात अन्याय झाल्याची भावना होती. फसवणूक झाल्याची बोच होती. अपराधी ते स्वतःच होते आणि फिर्यादी कुणीच नव्हतं.. त्यांनी स्वतःच न्याय करायचं ठरवलं. त्यांनी तिला सांगितलं.. जेव्हा तुला आई व्हावंस वाटेल तेव्हा मला सांगून तू कुणाशीही संबंध कर. त्या मुलाला मी माझं नाव देईन. तिला एका वर्षानंतर मुलगा झाला. घरात लहान मूल आल्याने वातावरण बदललं. गावालाच काय सर्वांनाच आनंद झाला. बुवांच्या मुलाचं खूप कौतुक झालं सत्य काय ते बुवांना माहीत होतं. वर्ष उलटून गेल्यावर तिने आणखी एका मुलाची परवानगी मागितली. एक देखणं कन्यारत्न जन्माला आलं. नाही म्हटलं तरी बुवांना मुलांची आवड होतीच. वर्षं उलटून जाऊ लागली. मुलं मोठी झाली आणि तिला आणखी एका मुलाची इच्छा झाली. एवीतेवी बुवांचा काही उपयोग नव्हताच. मग विचाराचा सोपस्कार पार न पाडताच यावेळी पुन्हा ते सर्व घडलं.. यावेळी मुलगा झाला... मात्र बुवा चिडले. त्यांना अपमान झाल्यासारखं वाटू लागलं. तिस-या मुलाकडं त्यांनी पाहीलंही नाही. बुवा खचले. म्हातारे दिसू लागले. त्यांनी मृत्युपत्र बनवलं. दोन मुलांच्या आणि पत्नीच्या नावे सगळं करून ते निघाले. गाव सोडून, देश सोडून.. गाव दु:खी झालं. सर्वांनाच दु:ख झालं आणि बायकोने बुवांकडे चावडीवर तक्रारनामा दाखल केला. खळबळ माजली. बुवांनी तिस-या मुलाच्या नावावर संपत्ती का केली नाही. बुवांनी गावासमोर आपली असमर्थता उघड केली. लग्नाला असलेल्या नकारामागच कारण सांगितलं. बायको आणि त्यांच्यात झालेला करार त्यांनी सांगितला. तो करार तिने मोडला होता. ते मूल त्यांचं नव्हतं असा बुवांचा दावा होता. बुवांनी हा न्याय केला होता.... तुम्हाला काय वाटतं ? बुवांचा हा न्याय बरोबर कि चूक ?? आणि का ? मूळ आर्टिकल : http://www.maayboli.com/node/25657 ( स्म्बंधित लेखकाच्या परवानगीने कॉपी पेस्ट)

वाचने 6046
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

कसल्या कसल्या घाणेरड्या गोष्टी सांगता?

In reply to by शैलेन्द्र

पैसा बुवांचा, मर्जी बुवांची...
तूर्तास हेच लॉजिक बरोबर वाटत आहे. बुवांनी स्वतःच्या आयुष्यात (स्वकमाईने) मिळवलेली संपत्ती ते कोणत्याही कारणासाठी कोणाच्याही नावावर करू शकतात. (अगदी माझ्यासुद्धा! मग भले मी त्यांच्या बायकोचा त्यांच्या परवानगीने झालेला मुलगा असो वा नसो. किंवा मनमोहनसिंगांच्या किंवा ओबामांच्या नावानेही करू शकतात.) किंवा वाटले तर कोणाला त्या संपत्तीच्या वाट्यातून वगळूही शकतात. त्यांची मर्जी. त्याला कोणी च्यालेंज करू शकू नये. जोवर बुवांनी मृत्युपत्र केलेले आहे तोवर त्यात वारसाहक्काची भानगड येऊ नये. (असे वाटते. चूभूद्याघ्या.) बुवांच्या वडिलोपार्जित संपत्तीची भानगड थोडी वेगळी आहे. तेथे वारसाहक्क वगैरे यावा. पण या परिस्थितीत 'वारसदारां'ची व्याख्या कशी होईल, सांगवत नाही. म्हणजे बुवांची बायको ही निश्चितपणे त्यांची वारसदार आहे, पण मुलांबद्दल खात्री नाही. (तिन्ही मुले ही बुवांच्या बायकोची कायदेशीर वारसदार असावीत खरी*, पण बुवांची कायदेशीर वारसदार होऊ शकतात का, याबाबत साशंक आहे. अगदी पहिली दोन मुलेसुद्दा. त्यांना 'कायद्याने दत्तक' - बोले तो 'जंटलमेन्स अ‍ॅग्रीमेंट'नुसार बुवांनी त्यांना कायदेशीरपणे दत्तक घेतल्यासमान - मानता येईल का? कल्पना नाही. तसे मानता आल्यास ती बुवांचे वारसदार बनू शकावीत, असे वाटते. अन्यथा त्यांच्या वारसाहक्काबद्दलही शंकाच आहे. धाकट्या कन्येच्या कायदेशीर वारसाहक्काविषयी कोणत्याही परिस्थितीत शंका आहे.) (* पण मग तिसरी मुलगी ही बुवांच्या बायकोची कायदेशीर वारसदार असल्यास, बुवांच्या बायकोच्या मृत्यूपश्चात बुवांच्या वडिलोपार्जित संपत्तीतल्या त्यांच्या बायकोच्या वाट्यातला काही भाग तिला वारसाहक्काने मिळावा का? बहुधा मिळावा. अर्थात हे थेट बुवांच्या वडिलोपार्जित संपत्तीतला स्वतःचा वाटा मिळण्यासमान नाही, आणि त्यातसुद्दा पुन्हा बुवांच्या बायकोच्या वाट्याची तिन्ही मुलांमध्ये बहुधा समसमान वाटणी व्हावी, हा भाग वेगळा.)

तो करार तिने मोडला होता. ते मूल त्यांचं नव्हतं असा बुवांचा दावा होता. आधीची पण त्यांची नव्हतीच ना ?

जेव्हा तुला आई व्हावंस वाटेल तेव्हा मला सांगून तू कुणाशीही संबंध कर. त्या मुलाला मी माझं नाव देईन. जेव्हाजेव्हा (कितीदाही) अशा अर्थाचे शब्द बुवा बोलले असतील तर मग पत्नी कितीदाही हे करु शकते आणि त्या पोरांना बुवान्यायघटनेनुसार बुवांचे नाव मिळायला हवे. दुसर्‍या वेळी "परवानगी घेतली" याचाच अर्थ हे सिद्ध होते की प्रत्येक मातृत्वेच्छेसमयी नव्याने परवानगी (एक्स्प्लिसिट) घेणे आवश्यक होते. अर्थात ब्लँकेट परवानगी नव्हती. तिसर्‍या वेळेस परवानगी न घेऊन पत्नीने अनियमितता केली. त्यामुळे त्या मुलाला नाव न देण्याचा बुवांचा हक्क ते वापरू शकतात. तस्मात आपले नाव लावू न देण्याचा निर्णय योग्य. इतक्या साध्या तर्काला काकु कशाला ? इतर मुद्दे बरेच काढता येतीलः त्याबद्दल शिक्षा म्हणून पत्नीला सोडून निघून जाणे (पत्नीस ती शिक्षा वाटते की बक्षीस तो भाग वेगळा..) हा निर्णय कदाचित चूक असू शकेल. पण सामान्य कायदा ऑब्सोलीट आणि बुवावाक्यं प्रमाणम् अशा कायदेपद्धतीत एकूणच या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. बुवांचे कायदे आणि निकाल सत्यावरच आधारित होते असे दिसत नाही. नाहीतर कोणाच्याही मुलांना माझे नाव देतो हे उदात्त असले तरी कायदेशीररित्या असत्यच. पण बुवांचे कायदे सर्वमान्य होते असे धरून त्या फ्रेममधे विचार केला आहे. आयडियली, जो स्वतः खटल्यात एक पार्टी आहे तोच न्यायदान करूच शकत नाही. त्याने निकालात सब्जेक्टिव्हिटी येऊ शकतेच. त्यामुळे हा खटला / निवाडा स्वतः बुवांनी करणे हेच चूक.

In reply to by गवि

राजा, न्यायी सम्राट म्हणून तुला लोक युगानुयुगे ओळखतील. तुझे समतोल उत्तर ऐकून मी प्रसन्न झालो. पण तू बोललास आणि मी निघालो.... हिहिहहाहाहा... - प्यारेवेताळ

In reply to by गवि

पण सामान्य कायदा ऑब्सोलीट आणि बुवावाक्यं प्रमाणम् अशा कायदेपद्धतीत एकूणच या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. ... पण बुवांचे कायदे सर्वमान्य होते असे धरून त्या फ्रेममधे विचार केला आहे.
बुवा मृत्युपत्र करून गाव सोडून जायला निघाल्यावर त्यांच्या बायकोने चावडीवर तक्रार नोंदवलेली आहे, आणि त्या तक्रारीची छाननी गावासमोर होत आहे. थोडक्यात, या परिस्थितीत बुवांचे ज्युरिस्डिक्शन संपुष्टात आलेले असून लॉ ऑफ द ल्यांड सुप्रीम रेनत आहे, हे गृहीतक असावे असे वाटते. (अन्यथा तक्रारीचा, अपिलाचा प्रश्नच उद्भवता ना! मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अपील कसचे?)
आयडियली, जो स्वतः खटल्यात एक पार्टी आहे तोच न्यायदान करूच शकत नाही. त्याने निकालात सब्जेक्टिव्हिटी येऊ शकतेच. त्यामुळे हा खटला / निवाडा स्वतः बुवांनी करणे हेच चूक.
पुन्हा वरील आर्ग्युमेंट. बुवा या परिस्थितीत न्यायाधीश आहेत असे वाटत नाही.
दुसर्‍या वेळी "परवानगी घेतली" याचाच अर्थ हे सिद्ध होते की प्रत्येक मातृत्वेच्छेसमयी नव्याने परवानगी (एक्स्प्लिसिट) घेणे आवश्यक होते. अर्थात ब्लँकेट परवानगी नव्हती.
"परवानगी घेतली" याने "सिद्ध होते" किंवा कसे, याबद्दल साशंक आहे, पण मूळ अ‍ॅग्रीमेंटमधल्या "मला सांगून" या क्लॉज़मध्ये तसे सुस्पष्ट आहे, असे वाटते. ब्लँकेट परवानगी नसण्याबद्दल सहमत.
तिसर्‍या वेळेस परवानगी न घेऊन पत्नीने अनियमितता केली. त्यामुळे त्या मुलाला नाव न देण्याचा बुवांचा हक्क ते वापरू शकतात.
प्रश्न मुलाला नाव देण्याचा तितकासा नसून प्रामुख्याने संपत्तीतल्या वाट्याचा आहे, असे वाटते. त्या बाबतीत स्वकमाईच्या संपत्तीतला वाटा (कोणत्याही कारणासाठी अथवा बहुधा कोणतेही कारण न देतासुद्धा) न देण्याचा हक्क ते तसाही कधीही वापरू शकतात. (अगदी नाव देऊनसुद्धा!)
तस्मात आपले नाव लावू न देण्याचा निर्णय योग्य.
पुन्हा, नाव लावू देण्या/न देण्याचा प्रश्न येथे दुय्यम आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

In reply to by पंगा

बुवा मृत्युपत्र करून गाव सोडून जायला निघाल्यावर त्यांच्या बायकोने चावडीवर तक्रार नोंदवलेली आहे, आणि त्या तक्रारीची छाननी गावासमोर होत आहे. थोडक्यात, या परिस्थितीत बुवांचे ज्युरिस्डिक्शन संपुष्टात आलेले असून लॉ ऑफ द ल्यांड सुप्रीम रेनत आहे, हे गृहीतक असावे असे वाटते. एक वाक्य अधोरेखित करतो. आणि बायकोने बुवांकडे चावडीवर तक्रारनामा दाखल केला. तस्मात बुवांची ज्युरिस्डिक्शन लागू आहे असे दिसते. त्यामुळे, जो स्वतः खटल्यात एक पार्टी आहे तोच न्यायदान करूच शकत नाही. त्याने निकालात सब्जेक्टिव्हिटी येऊ शकते हा मुद्दा योग्य वाटतो. अर्थात हा नैतिक मुद्दा आहे, कायदेशीर नव्हे. तांत्रिकदृष्ट्या अगदी बापसुद्धा आपल्या मुलाचा न्यायही करू शकतो. (आज मैं तुम्हारे सामने एक बाप की हैसियत से नही बल्कि एक पुलीस अफसर की हैसियत से खडा हूं..!!) "परवानगी घेतली" याने "सिद्ध होते" किंवा कसे, याबद्दल साशंक आहे, पण मूळ अ‍ॅग्रीमेंटमधल्या "मला सांगून" या क्लॉज़मध्ये तसे सुस्पष्ट आहे, असे वाटते. मान्य. त्याने सिद्ध होत नाही. इथे आपण म्हणू की मूळ क्लॉज ("मला सांगून") हा प्रथम वेळेस पाळल्याने अधोरेखित एवं अधिक रूढ झाला. म्हणजेच पत्नीने तो स्वीकारला आणि पाळला. प्रश्न मुलाला नाव देण्याचा तितकासा नसून प्रामुख्याने संपत्तीतल्या वाट्याचा आहे, असे वाटते. त्या बाबतीत स्वकमाईच्या संपत्तीतला वाटा (कोणत्याही कारणासाठी अथवा बहुधा कोणतेही कारण न देतासुद्धा) न देण्याचा हक्क ते तसाही कधीही वापरू शकतात. (अगदी नाव देऊनसुद्धा!) तस्मात आपले नाव लावू न देण्याचा निर्णय योग्य. पुन्हा, नाव लावू देण्या/न देण्याचा प्रश्न येथे दुय्यम आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) इथे मला वाटते, नाव लावू देणे आणि संपत्तीचा वाटा देणे हे समानार्थी वापरले आहेत. "नाव लावू देणे" चा सामाजिक अर्थ इथे महत्वाचा किंवा अधोरेखित वाटत नाही कारण मुळात हा सर्व प्रश्न बुवा संपत्तीचे वाटप करुन सोडून जायला निघेपर्यंत उद्भवलाच नाही. त्या अर्थी तो शाळेत बापाचे नाव लावणे /समाजात उजळपणे बाप कोण हे सांगणे आणि तत्सम अर्थाने दुय्यमच होता. अजूनही मुलांची आई लाभार्थी आहेच. ती आपल्या मनाने उर्वरित मुलाला संपत्ती देऊ शकतेच. अर्थात तो वेगळा भाग झाला.

In reply to by गवि

एक वाक्य अधोरेखित करतो. आणि बायकोने बुवांकडे चावडीवर तक्रारनामा दाखल केला. तस्मात बुवांची ज्युरिस्डिक्शन लागू आहे असे दिसते. त्यामुळे, जो स्वतः खटल्यात एक पार्टी आहे तोच न्यायदान करूच शकत नाही. त्याने निकालात सब्जेक्टिव्हिटी येऊ शकते हा मुद्दा योग्य वाटतो. अर्थात हा नैतिक मुद्दा आहे, कायदेशीर नव्हे. तांत्रिकदृष्ट्या अगदी बापसुद्धा आपल्या मुलाचा न्यायही करू शकतो. (आज मैं तुम्हारे सामने एक बाप की हैसियत से नही बल्कि एक पुलीस अफसर की हैसियत से खडा हूं..!!)
अधोरेखित नजरेतून सटकले होते खरे. प्वाइंट आहे. पण मग या परिस्थितीत कायद्यानेसुद्धा (केवळ नैतिकदृष्ट्या नव्हे) या बाबतीतले बुवाकोर्टाचे ज्युरिस्डिक्शन कितपत वैध ठरावे, याबाबत साशंक आहे. या मुद्द्यावर अधिक विचार करावा लागेल. (मात्र, इतर कोर्टांत मामला नेल्यास या 'जंटलमेन्स अग्रीमेंट'च्या वारसाहक्कासंबंधीतल्या वैधतेविषयी विचार केला जाईलच, आणि ते बाईंच्या कितपत फायदाचे ठरेल - अ‍ॅज़ इन, बाईंच्या थोरल्या दोन मुलांचा वारसाहक्कसुद्धा त्यातून रद्दबातल ठरेल का - याबद्दल कल्पना नाही. अर्थात, आपल्या सर्वच मुलांचे वारसाहक्क रद्दबातल ठरवून संपत्ती एकट्यानेच हडप करण्याचा बाईंचा डाव असला, तर गोष्ट वेगळी. आणि हे फक्त बुवांच्या वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी झाले. बुवांच्या स्वकमाईच्या संपत्तीची मृत्युपत्राद्वारे हवी तशी विल्हेवाट लावण्याचा बुवांचा हक्क बहुधा तरीही अबाधित रहावाच.)

अमोल पालेकरचा अशा विषयावर अनाहत की कोणता तरी पिक्चर होता ना? त्यात राजा नपुसक असतो म्हनून राणी दुसर्‍या पुरुषाची दुसर्‍अयांदा मागणी करते. ( पहिली मागणी राजाच्या इच्छेनुसार मुल होण्यासाठी पूर्ण केलेली असते.)

जर पैसा त्याचा असेल तर त्याच काय करायच हा १००% त्या माणसाचा प्रश्न आहे.. ---- काय शिंपल प्रश्न विचरता राव तुमि बि..

ज्यांच्या नियोगाने मुले झाली त्यांच्याशी एरवी संबंध कशावरुन नव्हते ? शेवटी तीही माणसेच होती ना ? एखादी वहिवाट झाली की ,ती दुसर्‍याच्या शेतातून जात असली, तरी कोणी रोज विचारतो का की मी ही वापरु का ? विक्रम राजाने याचीही उत्तरे द्यावीत.

अ‍ॅक्च्युअली "बुवांची" काही संपत्ती स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित नव्हती असे कथेवरून वाटते. घर गावाने बांधून दिले होते. जमीन दिली होती पण गावकरीच कसत असत. वगैरे. बाकी गविंशी सहमत आहे. बुवांनी अन्याय केला असे वाटत नाही. [आईने बुवांना सांगितले नव्हते यात त्या तिसर्‍या मुलाचा काय दोष? हा प्रश्न सध्या बाजूस ठेवला आहे]. बुवांनी 'नाव लावू देण्याचे' मान्य केले होते ते त्यांनी पाळले आहे. तिसरे मूल सांगून जन्माला घातले नाही त्यामुळे त्याला नाव लावू देणे बंधनकारक नव्हते. नाव लावू दिले म्हणजे मूल म्हणून मान्य केले आणि पर्यायाने वारस म्हणून स्वीकारले हेही बुवांनी मान्य केले आहे. आईने खरेतर तक्रार केली हीच मोठी चूक आहे. [कदाचित स्वतःचे नपुंसकत्व बुवा जाहीर करू धजणार नाहीत असा आडाखा तिने बांधला असावा].

In reply to by नितिन थत्ते

"बुवांची" कुठली संपत्ती? घर गावाने बांधून दिले होते. जमीन दिली होती पण गावकरीच कसत असत. वगैरे.
बुवा गावाला काही विशिष्ट सेवा पुरवत असत. (जसे, न्यायदान वगैरे.) त्या बदल्यात, इन लिउ ऑफ कॅश, गावकरी त्यांना इन काइंड काँपेन्सेट करत असत (जसे, घर बांधून देऊन, जमीन देऊन, शेत कसून - शेतकसणीची पण बाजारभावाने काही किंमत असेलच की नाही, जी बुवांनी शेतमजूर नेमले असते तर त्यांना मजुरी म्हणून द्यावी लागली असती?) असे समजू. आता? तशी परिस्थिती असल्यास ते घर, जमीन, जमिनीतील उत्पन्न ही बुवांची कमाई झाली की नाही? घराची, जमिनीची टायटल (किंवा सातबाराचा उतारा वगैरे) कोणाच्या नावे आहे? (बुवा गाव सोडून गेल्याच्या अथवा त्यांच्या मृत्यूच्या पश्चात ती कसणी आणि शेतीउत्पन्न अर्थातच स्वतः कसल्याशिवाय त्यांच्या बायकोला मिळणार नाही - कारण ती काही गावाला कोणती विशिष्ट सेवा पुरवत नाही आणि/किंवा तो तिच्या काँपेन्सेशन प्याकेजचा भाग नाही. पण घर आणि जमीन जर बुवांच्या नावे असेल, तर ते तरी बुवांना तिला देता येतेच ना?) थोडक्यात, बुवांचे काँपेन्सेशन प्याकेज कसे आहे यावर सर्व अवलंबून आहे. ते घर, जमीन आणि जमिनीतील उत्पन्न हा वेतनाचा भाग आणि शेतकसणीची मजुरी हा अलावन्सचा भाग असेल, तर प्रश्न मिटला. मग ते सरळसरळ उत्पन्न झाले. मात्र हा सर्व जर पर्क्सचा भाग असेल, तर तुमच्या म्हणण्यात काही तथ्य आहे. (डिस्क्लेमर: असे वाटते. चूभूद्याघ्या.) (अर्थात, हा जर पर्क्सचा भाग असेल, तर मग बायकोजवळ दावा करण्यासारखे राहिले काय आणि मग बुवांनी मृत्युपत्र तरी नेमके कशासंदर्भात केले, हा प्रश्न पडतो.)

In reply to by नितिन थत्ते

[आईने बुवांना सांगितले नव्हते यात त्या तिसर्‍या मुलाचा काय दोष? हा प्रश्न सध्या बाजूस ठेवला आहे]
तिसर्‍या मुलाचा यात काही दोष नाही या मुद्द्याला माझ्या मते यात काहीही जागा नाही. बुवांचे सोडा. नॉर्मल लग्नांची गोष्ट घेऊ. समजा दुसरे एखादे जोडपे आहे, पैकी नवरा नपुंसक नाही आणि त्यांना (नवर्‍यापासून झालेली) दोन मुले आहेत. नंतर (हे लग्न डिझॉल्व झालेले नसता) त्या बायकोने नवर्‍याव्यतिरिक्त अन्य कोणाशी संबंध ठेवून तिला मूल झाले. नवर्‍याने ते स्वीकारण्यास नकार दिला. त्या परिस्थितीत त्या तिसर्‍या मुलाचा काहीही दोष नाही. अशा वेळी (केवळ दोष नाही म्हणून) ते तिसरे मूल नवर्‍याच्या (बायकोच्या नव्हे) वैयक्तिक संपत्तीत वारसदार होऊ शकते का?

In reply to by ५० फक्त

इतक लांब कशाला जाता? महाराष्ट्रातल्या एका शिक्षण सम्राटांची या बाबत पाटीलकी आहे.. रोज सामने रंगतात...

In reply to by परिकथेतील राजकुमार

बुवांची बायको कुठे असते आजकाल ? प्वाईंटातला प्रश्न इच्यातन्यात आमचा परा भलताच हुशार ब्वॉ... बाकी अ‍ॅन्थ्रोपोलॉजीत "सोशिअल फादर"ची कन्सेप्ट जास्त महत्त्वाची मानल्या जाते. बुवा तिसर्‍या मुलाला नाव देण्याचा हक्क नाकारु शकतात (विदाऊट परमिशन बायकोने संबंध ठेवल्याने).. मात्र स्वअर्जित संपत्ती असल्यास कुणास द्यायची आणि कुणास नाही हे ते ठरवू शकतातच...

In reply to by परिकथेतील राजकुमार

बुवांची बायको कुठे असते आजकाल? >> बुवीणबाई गावातच असतात. पाळणाघर चालवतात. गावकर्‍यांनीच एकमताने निर्णय घेऊन ही व्यवस्था केली आहे. बुवापण गावातल्या मुलांसाठी संस्कारवर्ग घेतात. याखेरीज प्रौढ शिक्षण वर्ग, रात्रशाळा, लोकनाट्य संवर्धन, देशी मालाला उत्तेजन असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. या. आपले स्वागत आहे. :) आपले विणम्र सरपंच, जवळघेवाडी

त्यो बुवा येक शाणा, त्याची ती बायको दिडशाणी! कोन कंचा येक बुवा, त्याची बाई ती जातीय तिसर्‍याकडं, येक ते धाकलं पोरगं; त्याला वाटणीतून डच्चू दिल्याला... त्यो बुवा बसला निवांत तपचर्येला, ती बाई, च्याबायलीचं, गेली उंडगंत कुठं, ती तीन पोरं आपली तलाठ्याचं खिसं गरम करु करु फेरफाराचं उतारं काडून आणायलेत. आन् हितं, घेनं ना देनं, पारावर तबांक मळत मळत समदी गावकरी बसल्यात वडा कुटत! ह्याला म्हन्तेत 'कोन नाय कोन्चा आन् डाळभात लोनचा'! =)) =))

जोपर्यन्त तिसर्‍या मुलाला जातीचा दाखला मिळवण्याची गरज पडत नाही तोवर त्याचे काहीच अडणार नाही. बुवाने त्याला काही दिले नाही तर तो स्वतःच्या पायावर उभा राहील. खेडोपाडी जावून बुवागिरी करेल आणि पुन्हा त्याच्या तिसर्‍या मुलाचा प्रश्न उपस्थित होईल. हम दो हमारे दो असे पुरेसे असताना बुवाच्या बायकोला तिसरे का हवे होते. बुवाची चूक नसताना तीने ती बुवाच्या माथी मारली. म्हणून बुवाची बायको दोषी ठरते आपल्या माथी मारलेली चूक बायकोवरील प्रेमापोटी सहन केली बायकोला अद्दल न घडवता स्वतः घराबाहेर पडले ही बुवाची चूक. म्हणून तो दोषी बायकोला घराबाहेर काढले नाही ही भुतदया बुवानी दाखवली. हा त्यांचा सद्गुण. बुवाने केले ते योग्यच आहे. अन्यथा त्यांच्या बायकोने अशीच पलटण उभी केली असती. अवांतर : हीच चूक काँग्रेस आणि भाजप ने केली आणि तथाकथीत मित्रपक्षांच्या चुकांची पलटण उभी राहिली