Skip to main content

यांना कमरेतून उचलून फेकून द्या !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते. अजूनही जाते. परंतु शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य सुरेश कलमाडी यांनी आपल्या कर्तृत्वाने या पुण्यनगरीला नवी अस्मिता देण्याचा जणू विडा उचलला आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली दूर मंडालेच्या कारागृहात बंदिस्त होते. आज सुरेश कलमाडी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत गजाआड झाले आहेत. त्यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे आरोप टिळकांवर करण्याचे धाडस कोणाला झाले नाही. ब्रिटिशांची चाकरी करायची नाही आणि सर्व वेळ देशसेवा करायची असे व्रत सर्वप्रथम ज्या पिढीने घेतले त्या पिढीचे टिळक आणि आगरकर हे प्रतिनिधी होत.
आपली आणि आपल्या कुटुंबियांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली की बाकी सगळा वेळ कुठे शाळा कुठे वर्तमानपत्र काढ असे करीत लोकांना जागे आणि ज्ञानी करण्यात टिळकांनी व्यतीत केला. टिळकांच्या तपस्येतून जो देश उभा राहिला तो लुटण्याचे काम कलमाडी करीत आहेत. म्हणून यांना साधी शिक्षा देऊन भागणार नाही. एका पिढीला वाईट वळणावर नेऊन दरीत ढकलून देण्याचे काम या राजकारणी लोकांनी केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे गेल्या वर्षी दिल्लीत आयोजन करून काही हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप कलमाडी यांच्यावर आहे. लोकमान्य टिळक सुरुवातीला प्रकृतीने तसे क्षीण होते; पण एकदा देशसेवेला आयुष्य वाहून घ्यायचे ठरविल्यानंतर महाविद्यालयाचे पहिले वर्ष त्यांनी केवळ शरीरबळ संवर्धनासाठी उपयोगात आणले. कुस्ती, मल्लखांब जोरबैठका आणि पोहणे असा विविध प्रकाराचा व्यायाम दिवसभर करीत राहून पुढच्या आयुष्यातील सगळ्या चढउतारांना पुरून उरेल अशी आपली देहयष्टी त्यांनी कणखर केली. मंडालेहून टिळक घरी आले आणि मुलांच्या खोलीत शिरले. तेथे बॅडमिण्टनचा सेट त्यांनी पाहिला. तो त्यांनी फेकून दिला. ‘असले मुलींचे खेळ का खेळता’, असे विचारून ‘पुरुषासारखे जगा’, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या आवारात बोलत असतांना टिळकांच्या हातून एक बंदा रुपया खाली पडला. आगरकरांनी त्यावर पाय ठेवला आणि टिळकांना गमतीने म्हटले की, हिंमत असेल तर तुमचा रुपया परत घेऊन दाखवा. टिळकांनी आगरकरांच्या कमरेला दोन हातांनी पकडून वर उचलले आणि अलगद बाजूला ठेवले. त्यांचे शरीरसामर्थ्य पाहून सगळे वर्गमित्र थक्क झाले. आज कलमाडींना असे कमरेतून उचलून बाजूला फेकण्याची वेळ आली आहे. हे काम जनतेने आपल्या सामर्थ्याचा इंगा दाखवून करायचे आहे; कारण जनतेच्या पैशावर कलमाडी पाय देऊन उभे आहेत आणि ‘हिंमत असेल तर मला हात लावा’, असे आव्हान देत आहेत. लोकांची सेवा अप्रतिहतपणे करता यावी म्हणून टिळकांनी शरीर कमवले. क्रीडासंस्कृती वर्धिष्णू करण्याचे ढोंग रचून कलमाडींनी लोकांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करण्याचा अधम डाव केला. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. कलमाडींनी ‘गणेश फेस्टिवल’ उभा केला. ताबुतात नाचणार्‍या हिंदूंना टिळकांनी सार्वजनिक पूजनासाठी देव दिला आणि संघटित होण्यासाठी व्यासपीठ दिले. ब्रिटिशविरोधी भावना प्रखर करण्यासाठी गणेशोत्सवातील मेळ्यांनी चपखल माध्यम दिले. कलमाडींचा ‘फेस्टिवल’ टिळकांच्या तेल्यातांबोळ्यांसाठी नव्हता. टिळकांनी शिवजयंत्युत्सव सुरू केला आणि धर्मप्रेमाने संघटित झालेल्या सामान्य माणसांचे राजकीय जागरण करण्याच्या दृष्टीने एक खंबीर पाऊल त्यांनी टाकले. सर्व जातींचे लोक टिळकांनी शिवाजी महाराजांसमोर विनीत भावांनी उभे केले. शरद पवार, सुरेश कलमाडी यांनी लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडला आणि दुसरीकडे फेकला. यापुढचे राजकारण जातीजातीतील विद्वेषावर केले जाणार असल्याचा डांगोरा त्यांनी पिटला. ‘टिळकांच्या काळात वेश्यांनाही नीतीमत्ता होती’, असे पु.भा. भावे म्हणत. वेश्या आपले शरीर विकून गिर्‍हाइकांना सुख देण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांना लुटत नाहीत. आजचे राजकारणी नीतीमत्तेत वेश्यांच्याही समोर धड उभे राहू शकणार नाहीत. ज्या लोकांच्या जिवावर ते निवडून येतात त्याच लोकांना लुटण्याचा एकमेव उद्योग ते निवडून आल्यावर करीत असतात. शुद्ध चारित्र्य हा टिळकांचा अनन्य साधारण विशेष आहे. कलमाडींनी चारित्र्य या संकल्पनेची चेष्टा मांडली आहे. माणसाला चारित्र्याची आवश्यकता नसते, उलट चारित्र्य हा व्यक्तीच्या उत्कर्षातील अडथळा असतो, असा या पाताळयंत्री लोकांचा सिद्धांत आहे. ही अधोगती राष्ट्रवादातून झाली. काँग्रेसचा राष्ट्रवाद आईला विकून आपले पोट जाळतो. हिंदूंना आपले राष्ट्र स्थापन करू द्यायचे नाही आणि पाकिस्तानसाठी पायघड्या अंथरायच्या हा मातृद्रोह नाही तर काय आहे ? ‘गांधी हा आपला माणूस नाही’, असे दादासाहेब खापर्डे एकदा पटकन अंतस्फूर्तीने टिळकांना म्हणाले होते. यापुढे आपल्या सार्वजनिक जीवनातले कलमाडींसारखे खडे आपण उचलून बाजूला फेकू तेव्हा गांधींच्या राष्ट्रवादाने निर्माण केलेले स्वार्थी नेते आपण दूर करीत आहोत, हे समाधान मिळाले पाहिजे. पुण्यनगरीला पापनगरी करणार्‍या अशा अनेक असुरेशांना आपण दूर करू तेव्हाच हिंदुराष्ट्र स्थापनेचा दिवस लवकर उगवेल !!!

वाचने 3392
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

>>पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते पूर्वी पुणे पेशव्यांमुळेही ओळखले जात होते असे वाटते. >>अनेक असुरेशांना आपण दूर करू तेव्हाच हिंदुराष्ट्र स्थापनेचा दिवस लवकर उगवेल १. फक्त पुण्यनगरीतल्या असुरेशांना दूर केले की पुरे? २. हिंदुराष्ट्रस्थपनेची आम्हाला मुळीच आस नाही. त्यामुळे आम्ही का तसे करावे? एकूण भारतातून भ्रष्टाचाराचा नायनाट व्हावा आणि भारताची भरभराट व्हावी म्हणून हे करायला सांगत असाल तर ठीक आहे पण हिंदुराष्ट्र स्थापण्यासाठी हे करायची काही गरज नाही. "गांधींच्या राष्ट्रवादाने निर्माण केलेले स्वार्थी नेते" याचा अर्थ समजावून सांगावा अशी विनंती. >>ताबुतात नाचणार्‍या हिंदूंना टिळकांनी सार्वजनिक पूजनासाठी देव दिला मोहरमच्या ताबूतावरून (किंवा ताबूतांना कॉम्पिटिशन म्हणून) टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला हा आरोप या संस्थळावर पूर्वीच पुराव्यानिशी खारिज झालेला आहे. बाकी चालू द्या. :)

In reply to by नितिन थत्ते

२. हिंदुराष्ट्रस्थपनेची आम्हाला मुळीच आस नाही. त्यामुळे आम्ही का तसे करावे?
'हिंदू आणि मुसलमान ही हिंदुस्थानच्या भूमीत वास्तव्य करून असलेली दोन राष्ट्रे आहेत, आणि ती एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत' हा पं. मुहम्मदशास्त्री जीना यांनी प्रतिपादिलेल्या 'द्विराष्ट्रवादा'चा पाया होता. (स्वा. सावरकरांचे प्रतिपादनसुद्धा बहुधा थोड्या वेगळ्या भाषेत, पण काहीसे अशाच धर्तीवरचे असावे, असे वाटते; पण तो मुद्दा येथे सोडून देऊ. शेवटी कितीही झाले, तरी सावरकर 'आपले', आणि जीना 'त्यांचे'.) त्याच धर्तीवर, 'स्वतंत्र भारतभूमीत आज (कमीत कमी) दोन राष्ट्रे आहेत - एक भारतराष्ट्र, आणि दुसरे हिंदुराष्ट्र. आणि हे जे दुसरे राष्ट्र आहे, ते पहिल्या राष्ट्राबरोबर - संपूर्ण देशाला हायजॅक करून पहिल्या राष्ट्राला नेस्तनाबूत केल्याशिवाय - गुण्यागोविंदाने राहू शकत नाही' असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by नितिन थत्ते

>>१. फक्त पुण्यनगरीतल्या असुरेशांना दूर केले की पुरे? नितिनजी चांगल्या कामची सुरुवात आपल्यापासून तसेच आपल्या घरापासून करावी असे म्हणतात. नाही का? आणि लेखक पुण्याचे असल्यास त्यांनी तसे म्हणण्यात वावगे ते काय??? बाकी >>एकूण भारतातून भ्रष्टाचाराचा नायनाट व्हावा आणि भारताची भरभराट व्हावी म्हणून हे करायला सांगत असाल तर ठीक आहे पण हिंदुराष्ट्र स्थापण्यासाठी हे करायची काही गरज नाही.>>> याच्याशी सहमत.

टिळकांची आणि कलमाडींची तुलना का? कशासाठी? संपूर्ण लेखाचे प्रयोजन अशी तुलना करणे हे असेल तर ते व्यर्थ आहे.

‘गांधी हा आपला माणूस नाही’, असे दादासाहेब खापर्डे एकदा पटकन अंतस्फूर्तीने टिळकांना म्हणाले होते.
यावर टिळक काय म्हणाले होते? (अंतस्फूर्तीने म्हणा, किंवा विचारपूर्वक म्हणा...) कलमाडींना मोजण्यासाठी टिळक नावाची भलीमोठी पट्टी वापरण्याचे प्रयोजन काय? हे म्हणजे नॅशनल हायवेच्या साईट सर्व्हे उपकरणांनी सार्वजनीक संडासाची जागा आखण्यासारखे झाले. टिळक आणि कलमाडींमध्ये गांधी(जी) कसे काय आले ते समजले नाही.

In reply to by आळश्यांचा राजा

ह्या लेखात कलमाडी आणि टिळकांची तुलना हा उद्देश नसून तेव्हाचे पुणे आणि आजचे पुणे अशी तुलना आहे. ज्या पुण्याने टिळकांना आपला नेता मानले त्याच पुण्याने अनेक वर्षे ह्या नालायक, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, स्वार्थी नेत्याला आपला नेता मानले हा विरोधाभास ह्या लेखातून अधोरेखित होतो आहे. हा विरोधाभास दाखवून देणे अत्यंत प्रसंगोचित आहे. कदाचित पुढचा नेता निवडताना पुणेकर बोध घेतील. जिथे पूर्वी तुळशी वृंदावन होते तिथे उकिरडा निर्माण झाला तर कसे विचित्र वाटेल तसेच हा विरोधाभास बघून वाटते. अजून एक विरोधाभास म्हणजे टिळक हे खर्‍या अर्थाने नेता होते. पक्षाची धोरणे, विविध आंदोलने ह्यात त्यांचा शब्द महत्त्वाचा असे. सिंहाचा वाटा असे. काँग्रेसची राष्ट्रीय धोरणे टिळकांच्या सल्ल्याशिवाय ठरत नसत. आजचा नेता सुरेश कलमाडी कसा आहे? शक्य तितक्या मार्गाने सोनिया निष्ठा व्यक्त करणे. बाकी धोरणे वगैरे बाबतीत शून्य. क्रीडा स्पर्धामधे मिरवणे आणि त्या निमित्ताने अमाप भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव येणे ही आणि इतकीच कलमाडीची ओळख आहे. बाकी कुठल्या राष्ट्रीय धोरणामागे कलमाडीचा हात असेल असा संशयही यायला वाव नाही. शेती, पाणी वाटप, ऊर्जा निर्मिती, उद्योगधंदे, रस्ते, वाहतुक, कुठे कलमाडीने काही केल्याचे ऐकले आहे का? कमरेतून उचलून फेकून द्या ह्याचा अर्थ समूळ उच्चाटन करा असे मानायला हरकत नाही. आगरकरांशी,त्याच्या पायाशी झटापट करून ते नाणे मिळवण्यापेक्षा त्यांना उचलून बाजूला ठेवले तेव्हा ते नाणे साफ मोकळे झाले आणि ते उचलणे सोपे झाले. कलमाडी नामक बांडगूळ खासदारकीच्या नाण्यावर असा कब्जा करुन आहे. त्याला दे माय धरणी माय करुन सोडणे, आणि त्याचा राजीनामा घेणे आणि पुन्हा त्याला त्या पदाचा विचारही करता येऊ नये असे काही तरी करणे हे कमरेत उचलून देण्याचे रुपक आहे असे मी मानतो. नसेल तर लेखकाने आपला खुलासा लिहावा.

In reply to by हुप्प्या

>>ह्या लेखात कलमाडी आणि टिळकांची तुलना हा उद्देश नसून तेव्हाचे पुणे आणि आजचे पुणे अशी तुलना आहे. तेव्हाच्या पुण्यात सर्व/बहुतांशी टिळकांसारखी माणसे होती का? (तशी असती तर टिळक कशाला लक्षात राहिले असते?) अवांतर : "कमरेतून उचलून फेकणे" याचे इतके स्पष्टीकरण द्यावेसे का वाटले?

In reply to by नितिन थत्ते

तेव्हाच्या पुण्यात सर्व/बहुतांशी टिळकांसारखी माणसे होती का? (तशी असती तर टिळक कशाला लक्षात राहिले असते?) टिळकांच्या जोड्याशी ही उभे राहायची लायकी नसलेली बरीच पुरोगामी, समाजसुधारक , लेखक मंडळी ही तेव्हा होती. व त्यांना नंतर महात्मा, भारतसेवक, राजर्षी अश्या पदव्या ही मिळाल्या. लेख उत्तम आहे. कलमाडी कोन्ग्रेस मधील आहेत ही बर्‍याच पुरोगाम्यांची पोटदुखी आहे. अवांतर-- कलमाडी आणि साने गुरुजी अशी तुलना ही करण्या सारखी आहे. भ्रष्टाचार काही पैशाचाच नसतो. असत्य प्रतिपादन, लोकांची दिशाभुल ह्या गोष्टी ही भ्रष्टाचारामध्ये मोडतात.

In reply to by ईश आपटे

अवांतर-- कलमाडी आणि साने गुरुजी अशी तुलना ही करण्या सारखी आहे. भ्रष्टाचार काही पैशाचाच नसतो. असत्य प्रतिपादन, लोकांची दिशाभुल ह्या गोष्टी ही भ्रष्टाचारामध्ये मोडतात.
माझ्या समजुतीकरिता विचारतो. साने गुरुजी हे खोटे बोलत, लोकांची दिशाभूल करीत, असा काही आपला दावा आहे काय?

In reply to by नितिन थत्ते

>>अवांतर : "कमरेतून उचलून फेकणे" याचे इतके स्पष्टीकरण द्यावेसे का वाटले? काही पुरोगामी वेड पांघरून पेडगावला जात आहेत किंवा खरोखरच त्यांची कुवत बेताची असावी त्यामुळे त्यांनी ह्या रुपकाचे स्पष्टीकरण मागितले होते. आपण अर्थातच कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे आपल्याला हे स्पष्टीकरण त्रासदायक झाले असेल. आपण दुर्लक्ष करावे. >>तेव्हाच्या पुण्यात सर्व/बहुतांशी टिळकांसारखी माणसे होती का? टिळक हे असामान्य होते. सगळे टिळकांसारखे होते का हा बावळट प्रश्न का पडावा? अर्थातच नव्हते. पण निदान आपला नेता हा असामान्य असावा ही त्यावेळच्या लोकांची इच्छा तरी नक्कीच असावी. आणि तसे त्यांनी करुन दाखवले. त्या बाबतीत आजच्या पुणेकरांपेक्षा तेव्हाचे पुणेकर वरचढ म्हटले पाहिजेत. अवांतरः कलमाडी असामान्य आहे. पण तो नीचपणात, निर्ढावलेपणात, स्वार्थीपणात; निर्भयपणात, नि:स्वार्थीपणात नाही.

टिळकांनी आगरकरांच्या कमरेला दोन हातांनी पकडून वर उचलले आणि अलगद बाजूला ठेवले. त्यांचे शरीरसामर्थ्य पाहून सगळे वर्गमित्र थक्क झाले. आज कलमाडींना असे कमरेतून उचलून बाजूला फेकण्याची वेळ आली आहे.
'असे' बाजूला फेकण्याची वेळ आली आहे म्हणजे नेमके कसे? आगरकरांना फेकून दिले तसे? माझ्या समजुतीकरिता विचारतो. 'आगरकरांना कमरेतून उचलून (कलमाडींसारखे - म्हणजे कलमाडींना फेकून द्यावेसे वाटते तसे, socio-political sceneवरून) बाजूला फेकून द्यायला हवे होते' असे काही तर आपल्याला सुचवायचे नाही ना? (आगरकरांच्या अनेक समकालीनांना नेमके असेच वाटत असे, असे ऐकलेले आहे. किंबहुना, अशा मंडळींनी आगरकरांच्या जिवंतपणी त्यांचीच अंत्ययात्रा त्यांच्याच दारावरून नेल्याबद्दलच्या वदंताही ऐकलेल्या आहेत.)

लेखाचा पायाच कच्चा वाटतो. कुठलेही साम्य नसलेल्या दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. बॅटमिंग्टनची रॅकेट, बंदा रुपया, कमरेत धरुन उचलणे, हिंदुराष्ट्र वगैरे गोष्टी या भेळेत खटकतात. फक्त कलमाडींना फेकून प्रश्न सुटेल ? खर्‍या सूत्रधाराला शोधा, मग लक्षांत येईल की त्याची कंबरच तुमच्या हातात मावणार नाही!

कलमाडी सध्या 'आत' आहेत. ते बाहेर आल्यावर त्यांना कमरेतून उचलून फेकले पाहिजे याच्याशी सहमत आहे. मिपांकरांपैकी या शुभकार्यासाठी 'टारझण' चे नाव सुचवतो.

>> नितिन थत्ते - > " फक्त पुण्यनगरीतल्या असुरेशांना दूर केले " असा कोठे ही उल्लेख नाही आहे . -> तुम्हाला हिंदुराष्ट्रस्थपनेची आम्हाला मुळीच आस नाही. तर त्यावर बोल्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आणि काही करण्याचा प्रश्नच येत नाही !!!! --> "गांधींच्या राष्ट्रवादाने निर्माण केलेले स्वार्थी नेते" याचा अर्थ पाकिस्तानप्रेमी राज्यकर्ते असा आहे . --> ताबुतात नाचणार्‍या हिंदूंना टिळकांनी सार्वजनिक पूजनासाठी देव दिला ...... यात प्रतीस्पर्धेचा प्रश्नच येत नाही आमचे सण साजरे करण्यासाठी प्रतीस्पर्धेचा प्रश्नच येत नाही ..... आणि ताबुतात नाचणारे तेच हिंदू आज अफजलखानाला नवस घालतात मुलगा होण्यासाठी !!! काय अहो अफजलखानाला नवस घातला तर काय शिवाजी जन्माला येणार की अफजलखान याचा विचार त्यांनीच करावा ? -->तेव्हाच्या पुण्यात सर्व/बहुतांशी टिळकांसारखी माणसे होती का? "पुण्याने टिळकांना आपला नेता मानले त्याच पुण्याने अनेक वर्षे ह्या नालायक, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, स्वार्थी नेत्याला आपला नेता मानले हा विरोधाभास ह्या लेखातून अधोरेखित होतो आहे." इतके स्पष्ट लिहिले आहे तरी सुद्धा ???? @ पंगा -->अहो गेली ६० वर्षे हिंदू गुण्यागोविन्द्यानेच राहत आले आहेत ...तर पण काहीना काही कुरापत काढून हिंदूंच्या सणांमध्ये दंगली करणे ...गणेश मूर्ती वर दगड फेक होते ? जर अशा लोकांना राहाचेच नाही तर खुशाल पाकिस्तानात निघून जावे असे का तुम्ही बोलून दाखवत कधी ? मग वेगळ्या राष्ट्राचा प्रश्नच येत नाही !!!! आणि सावरकरांनी कधीही द्विराष्ट्राचा पाया घातला नव्हता त्यांनी फक्त अखंड हिंदुराष्ट्राचा पायामांडला होता जीनानीच मुसलमान राष्ट्राची मागणी केली आणि गांधीनी नेहमी प्रमाणे त्यांचे चोचले पुरवले ..... -->'असे' बाजूला फेकण्याची वेळ आली आहे म्हणजे नेमके कसे? आगरकरांना फेकून दिले तसे? " टिळकांनी आगरकरांच्या कमरेला दोन हातांनी पकडून वर उचलले आणि अलगद बाजूला ठेवले. इतके स्पष्ट लिहिले आहे तरी सुद्धा ????"तुम्ही पुन्हा पुन्हा चुकीच्या शब्दाचा वापर करताय राव !!!! @राही --> लेखात कुठेही तुलना नाही आहे !!!! उलट टिळकांची तुलना करण्या सारखा एकही राज्य करता आता उरला नाही आहे !!! @आळश्यांचा राजा -->तुम्हाला सुद्धा वरीलप्रमाणेच सूचना . लेखा नीट वाचा मगच प्रतिक्रिया द्या !!! @हुप्प्या -->तुम्ही लेखाचे यथायोग्य विश्लेषण केलेत त्यासाठी धन्यवाद. आपले बोलणे शतश: योग्य आहे . @ तिरशिंगराव माणूसघाणे -->होय कदाचित माझा पाया कच्चा असेल कारण नवीन नवीन लेखन आहे ना !!!! पण माझ्या मते मी यालाच लेखन म्हणतो , तुम्हाला विरोध लेखाला करायचा आहे की लेखाला की तुम्हाला काही समझलेच नाही म्हणून उचलली जीभ आणि कपाळाला लावली असा प्रकार करताय !!!! पण फक्त कलमाडींना फेकून प्रश्न सुटेल ? याचा विचार लोकांनी करावा !!!