Skip to main content

यंत्राद्वारे मिळणार्‍या निष्कर्षांवर किती अवलंबून राहायचे?

लेखक विश्नापा यांनी शुक्रवार, 27/08/2010 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल कोणत्याही डा.कडे गेले असता ते पेशंटला सर्वप्रथम विविध प्रकारच्या चाचण्या करावयास लावतात..त्या प्यथलोजी lab मधून मिळणारे निष्कर्षसुद्धा वेगवेगळे असतात. पूर्वीच्याकाळी अश्या चाचण्या न करताही वैद्य रोगनिदान करत असत.यंत्रापेक्षा पेशंट काय लक्षणे सांगतो याला जास्त महत्व होते.आजकाल मानवाच्या मनापेक्षा यंत्र काय सांगते याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.तुम्हाला काय वाटते.?

वाचने 2262
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

यंत्रांद्वारे मिळणारे निष्कर्ष हे तितकेच उत्तम असतात जितका ते वाचणारा डॉक्टर उत्तम आहे. यंत्रांची मदत ही निश्चित उपयोगाची आहे ह्यात वाद नाही. शरिरांतर्गत बिघाड हा बाहेरुन बघता येण्याची सोय तसेच विविध तपासण्यांनी जाणण्याची सोय ही निश्चितच मदतीची आहे परंतु ते का करायचे ह्याचा विवेक मात्र गरजेचा ठरतो आणि तोच हल्ली कळीचा मुद्दा बनला आहे. पूर्वी पेशंटचे आणि डॉक्टरांचे नाते फॅमिली डॉक्टर असे बर्‍याचदा असे. पुष्कळवेळा लहानपणापासून तब्बेत तपासत असल्याकारणाने डॉक्टरांना पूर्वेतिहास माहीत असे त्याचा निदान करतेवेळी पुष्कळ उपयोग होई. तपासताना डोळे, जीभ, नाकाचा आतला भाग, पोट, नाडी, हृदयठोके आणि फुफ्फुसे (स्टेथॉस्कोप) इ. नी बरीचशी परीक्षा होत असे. शिवाय लगेच एका दिवसात खडखडीत बरे वाटलेच पाहिजे अशी घाईसुद्धा नसे. थोडा हलका आहार, थोडी विश्रांती ह्यातून रोग्याला बरे वाटणे पुष्कळवेळा शक्य असते, तेवढी उसंत दिली जाई. स्पेशालिस्ट, तपासण्या, औषधकंपन्यांचा वाढता दबाव इत्यादी प्रकार जसजसे वाढत गेले तसतशी ही फॅमिली डॉक्टरची संकल्पना आटत जाऊन औषधे आणि तपासण्यांच्या चक्रात टाकणारे एजंट्स अशी भूमिका बर्‍याच डॉक्टरांकरवी वठवली जाऊ लागली. सर्वसाधारण जेनेरिक औषधांनी जर पुरेसा उतार पडत नसला तर पॅथॉलॉजी तपासण्या आवश्यक ठरतात आणि त्यातून उपाययोजना निश्चित करणे सोयीचे जाते तसेच इतर तपासण्या सोनोग्राफी, क्षकिरण इ सुद्धा कधी आवश्यक ठरतात ह्याबाबत डॉक्टरांचे तारतम्य उपयोगी ठरावे अशी अपेक्षा असते परंतु बाजारु प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावल्याने तो विवेक इतिहासजमा होत आहे हे खरे.

In reply to by चतुरंग

सहमत! इथे उसगावात असलेला अजुन एक प्रॉब्लेम म्हणजे मालप्रॅक्टिसचे दावे. आमचा इथे फॅमिली डॉक्टर आहे. तो म्हणाला उद्या कदाचित कुणी दावा केलाच तर ... या भीतीने आजकाल बर्‍याच टेस्ट केल्या जातात. मला आवडत नाही पण माझाही नाईलाज आहे.

पूर्वीच्या डॉक्टरांचे टेस्ट न करता केलेले डायग्नोसिस नव्या डॉक्टरांच्या टेस्ट करून केलेल्या डायग्नोसिस इतकेच अचूक असल्याचा काही विदा उपलब्ध आहे का? [लेखातील भाव काहीसा "पूर्वी सिझेरिअन नव्हते तेव्हा काय बायकांना पोरे होत नव्हती काय?" असा आहे. त्याचे उत्तर सिझेरिअन अभावी बर्‍याच प्रमाणात बायका/अर्भके बाळंतपणात मरत असत हे आहे. तद्वतच वरच्या लेखातल्या भावनेचे उत्तर आहे] गैरप्रकारांची शक्यता मान्य आहे.

In reply to by नितिन थत्ते

नाही तसा भाव मला तरी जाणवला नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे की उच्च तंत्रज्ञानामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी झालेली आहे. पण आजकाल डॉक्टर शक्यतो जोखीम घेत नाहीत. काही काही गोष्टींचे भाकीत प्राथमिक निदानावरुन शक्य असते पण आजकाल डॉक्टर सरळ सगळ्या तपासण्या करायला सांगतात. बर्‍याच वेळा या तपासण्यांमधुन काहीच निष्पन्न होत नाही. होणार नाही हे सुद्धा डॉक्टरांना माहित असतेच. पण तरीसुद्धा डॉक्टर असा मुद्दा मांडतात की काही निघालेच तर त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकांकडे पैसा आहे. डॉक्टरांकडे तंत्रज्ञान आहे. दोन्ही असताना योग्य चाचण्या केल्या नाहीत त्यामुळे रोगनिदान व्यवस्थित झाले नाही आणि रुग्णाचा जीव गेला तर डॉ़क्टरवरच हलगर्जीपणाचा आरोप होणार. काही डॉक्टर मग याचा गैरफायदा घेणारे पण असतातच. डॉ़क्टरांच्या रॅकेट मध्ये मग अश्या रुग्णाला पद्धतशीरपणे अडकवले जाते. आणि त्याला काही टेस्ट्स विनाकारण करणे भाग पाडले जाते. रुग्णाला बर्‍याच वेळा अश्या प्रकारात विनाकारण भुर्दंड पडतो. कधीकधी तो डॉक्टरच्या स्वतःच्या रोगनिदाना वर अजिबात भरवसा न ठेवता सगळ्या टेस्टस करुन स्वतःला सेफ करण्याच्या अट्टाहासापायी घडतो. जेंव्हा गरज आहे तेंव्हा टेस्टस केल्याच पाहिजेत. पण कित्येकवेळा या टेस्टस अनावश्यक असतात असे लेखकाचे म्हणणे दिसते आहे.

In reply to by मृत्युन्जय

"काही डॉक्टर मग याचा गैरफायदा घेणारे पण असतातच. डॉ़क्टरांच्या रॅकेट मध्ये मग अश्या रुग्णाला पद्धतशीरपणे अडकवले जाते." याला दुसरीही एक बाजू आहे, ती म्हणजे सार्वजनिक पातळीवर उतरलेली गुंडागर्दी आणि ठोकशाही. कोल्हापुरात अगदी एम.डी. असलेल्या, नामवंत आणि सुमारे ३०-३५ वर्षे डॉक्टरी व्यवसायात असलेल्या काही सर्जन्सना "पेशंट कसा काय दगावला? तू सा* झोपल्या होतास काय?" अशा प्रश्नांची/आरोपांची बरसात करीत नातेवाईकांनी आणि भजीपाव फाळकुट दादांनी रक्तबंबाळ होईतोपर्यंत मारहाण केली. नंतर पोलिस आले, नेहमीप्रमाणे एकादोघांना पकडण्याचा नेहमीचा यशस्वी कार्यक्रम झाला. पण त्यानंतर शहरात मारहाणीची ही एक प्रथाच पडून गेली. (केवळ दगावला म्हणूनच नव्हे तर अ‍ॅडमिट करून घेतले नाही म्हणून.... आणि एका फूटबॉलपटूचा खेळताना लचकलेला पाय बरा झाला नाही म्हणून..) गेल्या वर्षातील या संदर्भातील विदा एकत्र केल्यावर असे दिसून येईल की ग्रामीण भागात हे लोण पोहोचले आहे....इतका हा प्रकार वाढला की, शेवटी कोल्हापूर आणि जिल्ह्यातील सुमारे ३०० डॉक्टर्सनी कलेक्टर ऑफिसवर "रक्षण द्या" असा मूक मोर्चा काढला. आता रा.रा.कलेक्टर तरी काय प्रत्येक दवाखान्याच्या बाहेर पोलिस ठेवू शकत नाही. त्यामुळे असे झाले की, साधे पडसे झाले तरी इथले डॉक्टर आता"चला, अमुकतमुक यांचा टेस्ट रिपोर्ट घेवून या. मग औषधपाणी बघु," अशा भाषेत पेशंटसची बोळवण करीत आहेत. गावात नजर जाईल तिकडे "लॅबोरेटरीज" उघडल्या गेल्या आहेत. रिस्क फॅक्टरशी सामना करायला डॉक्टरांची मानसिक (आणि शारीरिकही) तयारी अजिबात नाही.

स्टेथोस्कोप आल्यावर पण असाच प्रश्न विचारला गेला असेल का? [या सुश्रुताला ही एवढी उपकरने कशाला लागतात? आमच्या शेजारचा भगत नुसत्या मंत्राने बरे करतो असे त्याकाळी विचारले असेल का?]

मान्य की यंत्र शरीराच्या आतील दोष दाखवू शकतात.परंतु बर्‍याच वेळा रुग्ण हा जी लक्षणे सांगतो तिकडे डा.चे लक्ष नसते.यंत्र सर्व लक्षणांची खात्री देवू शकत नाहीत.