Skip to main content

वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

लेखक गांधीवादी यांनी मंगळवार, 17/08/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपण हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते. एकदा का आपले मत पेटीमध्ये गेले कि आपण परत लोकशाहीचे गुलाम होतो. नंतरची पाच वर्षे सरकार विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण आंदोलने, चर्चा सत्रे, जनहित याचिका दाखल करू शकतो. पण परिणाम सर्वांना माहित असतात. पैसा कुठे, कसा व किती खर्च करायचा हे आपण सरकारला ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच CWG ला 1 हजार करोड काय नि १५ हजार कोरड काय, पैसा द्यायचा का नाही हे आपण ठरवू शकतच नाही. आपला वर्षाआखेर जमा होणार कर एकदा कर एकदा सरकारच्या घशात गेला कि सरकार म्हणेल तीच पूर्व दिशा. आपण फक्त घाम गाळून कर भरायचा पण खर्च ठरविण्याच्या बाबतीत आपले मत शून्य, असे का ? ह्यावरून एक विचार मनात आला कि दर पाच वर्षांनी सरकार जसे आपले धोरण जाहीर करते तसे सरकाने एक यादी सुद्धा प्रसिद्ध करावी. जसे कि, खेळ विभाग, रस्ते विभाग, धरणे विभाग, संरक्षण विभाग, अन्य (आणि जे काही अन्य विभाग जिथे सरकार पैसे खर्च करते वा करणार आहे असे सगळे विभाग) आणि दर वर्षी कर भरताना मला एक सवलत देऊ केली कि मी माझा कर भरताना वर सर्व दिलेले विभाग यांचा विचार करून माझा कर कुठे खर्च व्हावा ह्याची टक्केवारी मी त्यासोबत द्यावी. म्हणजे जर मला वाटत असेल कि सरकारने खेळ विभागात पैसा खर्च करू नये तर त्या विभागासाठी मी कमीत कमी (शून्य) टक्केवारी माझा कर भरतेवेळी नमूद करीन, कदाचित क्रीडाप्रेमी आपले कर भरताना खेळ विभागासाठी १०० % नमूद करतील. आणि जेणे करून सरकारकडे खेळ विभागासाठी लोकांनी ह्या प्रकारे नमूद केलेलीच रक्कम खर्च करण्याचा अधिकार असेल. अश्या प्रकारे सरकारकडे प्रत्येक विभागासाठी ठराविक रक्कमच हाथी राहील. त्यामुळे सरकार अवाजवी खर्च करण्यास (कदाचित) परावृत्त होऊ शकेल. आणि मला माझा कररुपी पैसा कसा खर्च व्हावा ह्याचा निर्णय तरी घेता येईल. मग देऊ दे क्रीडाप्रेमींना हवा तेवढा कर क्रीडेसाठी आणि भरवू द्यात हजारो करोडोचे खेळ. काय म्हणताय ?

वाचने 3372
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

विसाव्या शतकाच्या मध्यावर आपण एक घटनासमिती निवडून दिली. आपल्या वतीने घटना बनवण्याचे काम आपण या घटना समितीवर सोपविले. त्यांनी बनवलेली संसदीय आणि फेडरल लोकशाही पद्धत स्वीकारून आपण ती २६ जानेवारी १९५० पासून लागू केली. या घटनेनुसार आपण आपला प्रतिनिधी निवडतो आणि आपल्या वतीने संसदेत बोलण्याचे काम (दुसर्‍या भाषेत अधिकार) आपण त्या प्रतिनिधीवर सोपवतो. हे प्रतिनिधी त्यांच्यातून एकाला पंतप्रधान म्हणून निवडतात आणि त्याच्या मार्फत (आणि त्याने निवडलेल्या मंत्रीमंडळामार्फत) देशाचा कारभार करावा असे अधिकार या मंत्रीमंडळाला सुपूर्त करतो. हे मंत्रीमंडळ संसदेला म्हणजेच आपल्या प्रतिनिधींना जवाबदार असते. आपल्या प्रतिनिधींच्या परवानगीशिवाय ते कोणताही खर्च करू शकत नाहीत. त्यानुसार दरवर्षी काय खर्च करणार याचे अंदाजपत्रक आपल्या प्रतिनिधींसमोर ठेवले जाते. अर्थमंत्री ठळक बाबींविषयी संसदेत सुमारे एक तासाचे भाषण करतात पण त्याबरोबरच अंदाजपत्रकाचे सर्व तपशील संसद सदस्यांना (म्हणजेच आपल्या प्रतिनिधींना) पुरवले जातात. त्यावर चर्चा होऊन सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन काही बदल होऊन अंतिम अंदाजपत्रक संमत केले जाते. [या साईटवर] राष्ट्रकुल सामन्यांवर होणार्‍या खर्चाचे तपशील आहेत. असे तपशील प्रत्येक मंत्रालयाच्या वेबसाईटवर आहेत. म्हणजे धागाप्रवर्तकाच्या म्हणण्यानुसार सरकारतर्फे त्यांचा प्रत्येक बाबींवरचा प्रस्तावित खर्च जाहीर केला जातोच. धागाप्रस्तावकाला जे वाटत आहे की "सरकार सगळा खर्च आपल्याला न विचारता करते" ते चुकीचे आहे. हां... गांधीवादी या व्यक्तीला सरकार/अर्थमंत्री येऊन विचारत नाहीत ही गोष्ट खरी आहे. पण गांधीवादी यांच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणजेच गांधीवादी असे समीकरण लोकशाहीत मानले जाते. अजून पुढे जाऊन म्हणायचे तर अप्रत्यक्षपणे गांधीवादी यांनाही विचारले जातच असते. अंदाजपत्रक फेब्रुवारीत मांडले जाते. त्यावरील चर्चा/प्रश्नोत्तरे/सूचना वगैरे होऊन ते मंजूर व्हायला मे महिना उजाडतो. फेब्रुवारीत अर्थमंत्र्यांचे भाषण होताक्षणीच या प्रस्तावित खर्चाचा पूर्ण तपशील जालावर उपलब्ध असतो. गांधीवादी तो वाचून त्यांना चुकीचे वाटणारे खर्च करू नयेत असे आपल्या प्रतिनिधीला सांगू शकतात. असे हजारो लोकांनी शंभर दीडशे प्रतिनिधींना कळवले तर ते प्रतिनिधी नक्कीच संसदेत विरोध करतील. पण आपण असे काही करीत नाही. मीही करीत नाही. साधारण अशीच पद्धत लोकशाहीत सर्व देशांत अवलंबली जाते. धागाप्रवर्तक प्रस्तावित करीत असलेली प्रत्येक खर्चाच्या आयटमला थेट जनतेकडून स्वतंत्र मान्यता घेण्याची पद्धत कुठेही अवलंबिली जात नाही कारण ती चुकीचीच आहे. एक म्हणजे ती खर्चिक आहे. दुसरे म्हणजे काही सरकारी योजनांची कल्पनाच काही विशिष्ट गटांसाठी फोकस्ड खर्च करण्याची आहे. ज्याला जनतेची थेट मान्यता मिळेलच असे नाही आणि मग कदाचित ती योजना राबवताच येणार नाही असे होईल. उदा शाळेत मुलांना मोफत जेवण देण्याची योजना घ्या. कर भरणारे (म्हणजे खाऊनपिऊन सुखी असलेले) लोक कदाचित या योजनेची गरज नाही* असे सुचवतील कारण त्यांचे काही जळत नसते. [*याचे एक ताजे उदाहरण नुकतेच पाहिले आहे. आमच्या सोसायटीत टॉप फ्लोअरला राहणार्‍यांची गच्चीवर पत्रे घालण्याची मागणी आहे. कारण दर पावसाळ्यात होणारी गळती. सोसायटी वॉटरप्रूफिंगवर दरवर्षी खर्च करते पण तरीही गळती राहतेच. पत्रे घालण्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढेल असेही आर्किटेक्ट व इंजिनिअर लोक म्हणत आहेत. पण वार्षिक सभेत या खर्चाला मंजूरी मिळाली नाही. कारण खाली राहणार्‍या सर्व सदस्यांनी एऽऽऽऽवढ्या खर्चाला अनावश्यक म्हणून विरोध केला] काही खूप कमी लोकसंख्या असलेल्या देशांत महत्त्वाच्या प्रश्नांवर रेफरंडम घेण्याची पद्धत आहे. पण खर्चाच्या बाबतीत नाही. सरकारने खरेच मला अंदाजपत्रकाचे बाड पाठवून त्यावर अ‍ॅप्रूवल द्यायला सांगितली तर मी काही मीनिंगफुल काँट्रिब्यूशन करेन या बाबत साशंक आहे. ते बाड वाचेन तरी की नाही याबाबतही साशंक आहे. सध्या एवढेच पुरे.

In reply to by नितिन थत्ते

शब्दाशब्दाशी सहमत आहे. दैनंदिन आयुष्याशी निगडीत गोष्टी हाताळण्यासाठी आणि देश चालवण्यासंदर्भातील प्रत्येक निर्णयासाठी प्रत्येकाची मान्यता घेत बसलो तर एकही काम पूर्णच होणार नाही. ही कामे करण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. आणि या प्रतिनिधींनी संविधानाच्या चौकटीत काम करणे, देशाचा विकास साधण्यासाठी नवनवीन निर्णय राबवणे आणि काळानुसार संविधानात बदल करुन ते अधिकाधिक लोकाभिमुख बनविणे अपेक्षित असते. आणि आंदोलने, याचिका, बंद यांच्या आधारे जनतेकडे आवाज उठवण्याचा अधिकार आहेच. हा अधिकार धागाप्रवर्तकांना 'फक्त' वाटतो त्याला कोण काय करणार? मुद्द्यांशी निगडीतच लिहिलेले आहे. वैयक्तिक टीका नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. >>आंदोलने, याचिका, बंद यांच्या आधारे जनतेकडे आवाज उठवण्याचा अधिकार आहेच. सहमत, पण सध्याच्या काळात सरकार (कोणतेही, मी कोणत्याही पक्षाचे समर्थ करत नाही) सरकार किती संवेदनशील आहे ह्याबाबत मी जास्त सांगणे न लागे. (नुकतेच माननीय मनमोहन सिंघ यांनी ठासून सांगितले कि 'आम्ही धान्य मोफत वाटू शकणार नाही,' इथे मला केवळ एवढेच वाटते कि जेव्हा ते त्यांचा हक्क ठासून सांगतात त्याच वेळेस 'इथून पुढे धान्याचा एकहि कण वाया न जाऊ देण्याची जबाबदारी आपलीच आहे ' असे सांगायला विसरतात. म्हणजे हक्कांची जाणीव आहे, पण कर्तव्य ?) आजकाल सामान्य जनतेचे सरकारवरील नियंत्रण जवळ जवळ नाहीच. जे एक मत आपण बटन दाबून देतो त्याचा पुढे किती घोडेबाजार केला जातो हे जनता प्रत्येक वेळेस हताशपणेच पाहते. माननीय थत्ते यांनी जी मते मांडली ती नक्कीच कोणालाही पटतील (मलाहि पटली), पण आज जे आहे , त्याच्या पुढे एक पाऊल पुढे आपल्या लोकशाहीने टाकले पाहिजे आणि व्यवहारातील पारदर्शक पणा दाखवावा असे वाटते. >>मुद्द्यांशी निगडीतच लिहिलेले आहे. वैयक्तिक टीका नाही. मी आपले विचार वाचत असतो. आपल्या विचारांची (थोडीफार का होईना) कल्पना आहे. त्यामुळे काळजी नसावी. आपणास एक नम्र विनंती स्वार्थी लोकशाहीला कुठेतरी अटकाव घालायलाच हवा. पण कसा ? हि चर्चा वाचून ह्यावर देखील आपली प्रतिक्रिया नोंदवावी.

In reply to by गांधीवादी

मनमोहन सिंघ यांनी "मोफत धान्य वाटू शकणार नाही" असे ठासून सांगितले नाही. धोरणात्मक बाबीत न्यायालयाने ढवळाढवळ करू नये असे ठासून सांगितले. (जे न्यायालयानेही नंतर समजून घेतले आहे/ मान्य केले आहे). >>इथून पुढे धान्याचा एकहि कण वाया न जाऊ देण्याची जबाबदारी आपलीच आहे ' असे सांगायला विसरतात. जवाबदारी नाकारल्याचे कुठे दिसले नाही. जवाबदारी आहेच; ते मुद्दाम सांगायची काही आवश्यकता नाही. बाकी एकही कण वगैरे शब्द अर्थहीन आहेत. वाया जाणे टाळणे शक्य आहे. एकही कण वाया जाऊ देणार नाही वगैरे वाक्ये सभेत बोलण्याची असतात.

आपली सुचना एक कल्पना म्हणून उत्तम आहे पण त्यामधे अनेक गुंतागुंती आहेत. आपण म्हणता ती फक्त आर्थिक ताळेबंदाची ( Finance Budget) एक बाजू झाली. केवळ खर्च ही एक बाजू धरून विचार करता येत नाही. याला खालिल कारणे आहेत. १ सरकार जो unplanned expenditure karte पूर किन्वा दुष्काळ ग्रस्त प्रदेशाला मदत देणे या वर आधि नियोजन करता येत नाही जरी रकमेची तरतूद करून ठेवली असली तरी. २ केवळ खर्च कमी करून काही होणार नही तर त्या साठी उत्पन्न वढव्ण्यावर भर देणे तितकेच महत्वाचे ठरते. आत्ताच्या मंदीच्य काळात सरकार ने जे stimulus package (?) दीले तो एक ताळेबन्दात नसलेला खर्च होता आणि तो करणे उत्पन्न वाढवण्या साठी आवश्यक होते. ३ आपण म्हणता त्या प्रमाणे सगळया खर्चा चा एक ताळेबंद सरकार लोकसभेत सादर कारते आणि यात CWG सरख्या गोष्टींचा खर्च पण धरलेला असतो. हा खर्च राज्य आणि केंद्र सरकार या मधे वाटलेला असतो. अजून बरीच गुंतगुंत आहे पण एवढे टंकणे कठीण आहे. जर कर भरणारी व्यक्ती त्याचा विनीयोग ठरवणार असेल तर Reserve Bank के ला पत धोरण व राज्य व केंद्र सरकार ला ताळेबंद बनवणे कठीण होवून बसेल. या वर एक उपाय म्हणजे योग्य नियंत्रण असणे आणि त्या साठी CAG , क्रीडा मंत्रालय अश्या अनेक department चा समन्वय असणे हे होय. अनिर्बंध कर्भार असेल तर काही करणे केव्ळ कगदा वर राहाते आपल्या बाबतीत हेच खरे आहे Power corrupts but absoulte power is more fun.

सरकारला मिळणार्‍या एकूण उत्पन्नात वैयक्तिक आयकरातून मिळणार्‍या उत्पन्नाचे प्रमाण साधारणता किती टक्के असते?

In reply to by सुनील

एकूण कर उत्पन्नापैकी १६% आयकर (वैयक्तिक), ४०% कंपनी कर, १५% कस्टम, १८% एक्साइज, ९% सर्विस टॅक्स. (२०१०-११ च्या अंदाज पत्रकानुसार)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तो विक्रीकराचा वंशज असल्याने राज्यांच्या करात येतो. तो राज्यसरकारे गोळा करतात आणि स्वतःकडेच ठेवतात.

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे यात नफ्यात चालणार्‍या सरकारी धंद्यांचा समावेश नाही तर. मग आम्ही जेव्हा करदात्यांचा पैसा असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा नक्की किती टक्क्यांबद्दल बोलत असतो? अर्थात, एक्साइज, सर्वीस टॅक्स इ. मध्ये नागरीकांचाच पैसा असतो, हे धरून.

In reply to by सुनील

नाही. हे कर उत्पन्न आहे. त्याखेरीज नॉन टॅक्स रेव्हेन्यू असतो त्यात नफ्यातील उद्योगावरील लाभांश वगैरे असतो. नॉन टॅक्स रेव्हेन्यू करउत्पन्नच्या मानाने खूप कमी असतो. त्यात डिव्हिडंड+ नफा हा व्यक्तिगत आयकराच्या एक तृतीयांश आहे. म्हणजे एकूणा उत्पन्नाच्या सुमारे ५%. एकूण कर उत्पन्नाच्या २०% रक्कम प्रत्यक्ष कराची आहे. बाकीची रक्कम अप्रत्यक्ष कर आहेत म्हणजे जे सर्वांकडून वसूल होतात. प्रत्यक्ष कर मात्र विशिष्ट उत्पन्नच्या वरच्या लोकांकडून घेतले जातात.

In reply to by नितिन थत्ते

काही गडबड आहे का या आकड्यांमध्ये? ११० टक्के होताहेत!

In reply to by श्रावण मोडक

खरंच की. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. आयकर १६% आणि कंपनी कर ४० टक्के, कस्टम १५%, एक्साइज १८%, सर्विस टॅक्स ९% असे हवे. संपादकांनी बदल केल्यास बरे होईल. बदल कालच केला होता, तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही! -संपादक:) प्रत्यक्ष आकडे Gross Tax Revenue  746651             Corporation tax 301331              Income tax 120566              Other taxes and Duties* 8103              Customs 115000              Union Excise Duties 132000              Service Tax 68000

१) पर्यटनास चालना १.१) वाहन कंपन्या, रहाण्यास हॉटेल, खानपानसेवा, जिथे स्पर्धा होतात तेथील बाजार, या सर्वांच्या निमित्ताने सरकारला मिळणारा महसूल २) स्पर्धांनिमित्त त्या राज्यात / प्रांतात घडून येणारे इन्फ्रास्ट्रक्चर बदल - उदा. रस्ते डागडूजी, रंगरंगोटी, यातून होणारी रोजगारनिर्मीती (ज्यात फक्त कर भरणारेच लोक येत असतील असे नाही.) ३) विविध खेळ, खेळाडू व खेळ व्यायसायीकांना मिळणारी संधी बाकी कुठल्याही मोठ्या स्पर्धेकरता किमान ८-१० वर्षे आधीपासुन ही तयारी (खर्च) होत असते. व प्रत्येक अश्या मोठ्या स्पर्धात बजेट बरेचदा जास्त होत असते (भारतच नव्हे तर अन्य देशातही). पुढच्या १० वर्षांनी किती रक्कम लागेल हे सांगणे कठीण असते हे आपणासही मान्य असावे. शेवटी प्रत्येकाचे मत प्रत्येक बाबीसंबधी विचारात घेउन निर्णय करणे अव्यवहार्य आहे. थत्ते यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

कॉमनवेल्थ गेम्स घ्यावे की नाही असे मला बिड करण्यापूर्वी (दहा एक वर्षांपूर्वी) सरकारने विचारले असते आणि अंदाजित खर्चाचा तपशील दिला असता तर काय मी उत्तर दिले असते याचा अंदाज मला करता येत नाहीये.