Skip to main content

फसवणुक - कायदेशीर मदत हवी आहे.

लेखक अभिज्ञ यांनी शुक्रवार, 28/05/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
५ हजार वर्षापूर्वी वेगवेगळ्या ऋषी-मुनींनी माझे भविष्य आणि मला मार्गदर्शक गोष्टी एका नाडीपट्टी वर माझ्यासाठी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच लिहिलेल्या आहेत. त्यावर माझे नावही कोरलेले आहे. शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्‍या कुणालाही उपयोग नाही. असे असुनही नाडीकेंद्रातल्या लोकानी महर्षींनी फक्त माझ्या साठी लिहिलेली ही पट्टी लपवून ठेवलेली आहे. मला ते देत नाहीतच शिवाय ती वाचायचे पैसे मागत आहेत. महर्षींनी माझ्यासाठी लिहिलेली पट्टी हे केंद्रवाले कोणत्या बळावर दाबून ठेवू शकतात? या मुजोर केंद्रचालकांवर कोणत्या कायद्यान्वये मला कारवाई करता येईल? माझ्या एकट्याचीच नव्हे तर मला माझ्या पुढच्या पिढीतल्या सगळ्या पट्ट्या ताब्यात हव्या आहेत. ह्या पट्टीच्या अभावी माझे भविष्य अंधकारमय झाले आहे. तरी सर्वांनि योग्य ते मार्गदर्शन करावे.

वाचने 4083
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

वा, अभिज्ञा. थांबा थोडे. सल्लामसलत करून घेतो आणि पाहू काही उपाय मिळतो का ते. पण कायदेशीर पाऊल उचलावेच लागेल याबाबत मात्र खात्री आहे. आता तसा कायदा नसेल तर तो कायदा करावा यासाठी प्रसंगी दुसरा कुठला तरी कायदा हाती घेतला जाऊ नये इतके शासनाने पहावे एवढीच तुमचीही अपेक्षा असणार. माझीही तीच आहे. :)

अभिज्ञा माहितीच्या अधिकाराचा वापर कर पाहु आधी. मग जर नाडी मिळाली नाही तरच कायदेशीर मदत माग. :)

या खटल्यात वादी क्र. २ म्हणून पुरातत्व खाते येईल. पेशव्यांच्या कोणत्याही वारसाला 'आमचा वाडा' म्हणून शनीवारवाड्यात मनाला येतील तसे बदल करता येणार नाहीत. त्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी लागेल. याच धर्तीवर पट्ट्या (जर मूळ स्वरूपात असतील तर) पुरातत्व खाते त्या नक्कीच ताब्यात घेईल. आता त्या पट्ट्यांचे महत्व तुमच्यासाठी आणि पुरातत्व खात्यासाठी वेगवेगळे असल्याने कोर्ट दोघांनाही संयुक्त वादी करून घेईल. (बास की किती पाल्हाळ लावतोस)

"शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्‍या कुणालाही उपयोग नाही." असं कसं? लोकांना दुसर्‍याच्या भानगडी जाणुन घ्यायला फार्फार आवडतात. "महर्षींनी माझ्यासाठी लिहिलेली पट्टी हे केंद्रवाले कोणत्या बळावर दाबून ठेवू शकतात?" रस्सम भात खावुन जो अवयव कमावलाय त्याच्या बळावर... "माझ्या एकट्याचीच नव्हे तर मला माझ्या पुढच्या पिढीतल्या सगळ्या पट्ट्या ताब्यात हव्या आहेत." शिवाय सिक्वेन्समधे लावुन द्यायला सांगा, परत कन्फ्युजन नको. "तरी सर्वांनि योग्य ते मार्गदर्शन करावे" आमचीपण नाडी हरवलीय हो, नाडीपिडीत सेना काढुया का?

अभिज्ञ तुमची फसवणुक भयंकर आहे. नाड्या केंद्रातुन हरवणार। हवेत तामीळ कूटलिपीकार॥ माल हे हपापा करणार। धाड पडणार निश्चित॥

...ह्या पट्टीच्या अभावी माझे भविष्य अंधकारमय झाले आहे. कदाचीत असेच तुमच्या नाडीपट्टीत लिहीलेले असावे. तेंव्हा आता नाडीपट्टी मिळवायचा नाद सोडून द्या... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आमच्या मते हे केवळ अभिज्ञ यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन नसुन हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. आतापर्यंत वाचकांना माहित असेल की पट्टया या अखिल मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी आपली हयात घालवुन तयार केल्या होत्या. (इथ हिशोब पहा) अशा अमुल्य खजिन्याचे जतन करण्यासाठी खर तर शासनाने एन डी एस एल (नाडीपट्टी डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड) काढली पाहिजे व तिथेच सर्वांच्या पट्ट्या ठेवणे बंधन कारक केले पाहिजे. जीवनाडी साठी दृकश्राव्य व्यवस्था केली पाहिजे म्हणजेच एनडी एस एल हे अतिशय अद्ययावत हवे. नाडी पट्टी ही युनिक असते अंगठ्याचा ठसा हा युनिक असतो. त्यामुळे निलकेणींचे युनिक आयडेंटीफिकेशन या कामी उपयोगाला येईल नाडीपट्टी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. शासनाने एक तातडीचा अध्यादेश काढून हे जाहीर केले पाहिजे. म्हणजे एक कायदेशीर अधिष्ठान या केसला येईल. माहिती अधिकाराच्या कक्षेत हा विषय आला पाहिजे यासाठी एखादे राष्ट्रिय जन आंदोलन उभारले पाहिजे. हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे. खर तर हा आंतरराष्ट्रिय पातळीवरचा प्रश्न आहे. जगाचे अस्तित्व कुठपर्यंत राहणार? प्रलय केव्हा होणार? तिसरे महायुद्ध केव्हा होणार? अशा अखिल मानवजातीचे भवितव्य ठरवणारी माहिती या गुलदस्त्यात आहे. पत्र्याच्या ट्रंकात ही माहिती घालून हे लुंगीवाले स्वामी मद्रास प्रांतातुन पुण्यामुंबईकडे फिरतात हे किती धोकादायक आहे. अभिज्ञ नी या प्रश्नाला वाचा फोडल्या बद्दल अभिनंदन प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

=)) =)) =)) =)) अभिज्ञा खासच रे..... अवांतरः ओक मिपावर येउनसुद्धा असल्या धाग्याच्या वाट्याला का जात नाहीत? कदाचित त्यांच्या नाडीमधे आज कुठले धागे वाचायचे (किंवा फक्त लिहायचे) हे लिहिलेले असणार...... आंबोळी

मित्र हो, हा प्रश्न एक तर नाडी ग्रंथ केंद्रांना उद्देशून आहे. त्यासाठी कायदेशीरबाजू काय हा माझा अभ्यासाचा विषय नाही. म्हणून यावर मला मार्गदर्शन करायला येणार नाही. जर तशी गरज असेल तर गरजूंनी व्यावसायिकांकडून यावर सल्ला घेऊन विचार मांडावेत. वाचायला आवडतील.

अभिज्ञा, कायद्याच्या मर्गाने जणार म्हणजे तुम्ही तुमचे भविष्य जणुन घेण्याआधिच तुमचे भविष्य तुम्हाला समजले आसेल. म्हणुन तुम्ही मागील दाराचा/टेबला खालच मार्ग उपयोगात आणुन प्रयन्त करुन बघावा आसा आताच्या जगात चालणारा हा सुन्यपणाच उपाय सुचवला आहे. बघा विचार करुन उगाच डोक्याला ताप करुन घेउ नका. विनित

तुमच्या कायदेशीर प्रयत्नांना यश लाभो व नाडीपट्ट्या पब्लिक डोमेनमध्ये येवोत. त्यांचा अभ्यास करून, त्यांची सत्यता पडताळून पाहिली की नेचर, सायन्स वगैरे मोठ्या मोठ्या जर्नलमध्ये निबंध येतील. मग मी निश्चितच माझी नाडीपट्टी तपासून बघेन.