मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी आणि भाषांतर - ३

मेघना भुस्कुटे · · काथ्याकूट
भाषांतरकार आणि समीक्षिका म्हणून काम करताना दुवा: http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=4641 (एकच गुणधर्म दाखवणार्‍या, पण वेगवेगळ्या संदर्भात वापरल्या जाणार्‍या ’जेंडर’ आणि ’सेक्स’ शब्दांना मराठीत दोन निरनिराळे प्रतिशब्द नाहीत. मात्र इंग्रजीत (बर्‍याचदा) नसलेली लिंगबदलाची सोय मराठीतल्या (बर्‍याचश्या) नामांसाठी उपलब्ध आहे. उदा. समीक्षक - समीक्षिका, लेखक - लेखिका, नर्तक - नर्तकी, अभिनेता - अभिनेत्री (मग ’अभियंता - अभियंत्री’पण की काय?! :)) इ. ही सोय वापरणं काही जणांना अपमानास्पद वाटतं. ’मी ’अ‍ॅक्ट्रेस’ नाही, अ‍ॅक्टर आहे’ असं शबाना आझमीचं या संदर्भातलं प्रतिपादन तुम्हांला माहीत असेलच. असा उद्मेखून लिंगनिर्देश करणं तिला अमान्य असल्यानं, आणि कामाच्या बाबतीत या गोष्टीचा संदर्भ टाळणंच योग्य समजत असल्यानं ती असं आग्रहाने मांडते. पण या बाबतीत तुमची भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. असा फरक करावा की करूच नये, सरसकट करावा की कधी कधीच करावा, भाषेत त्यासाठी शब्द नसतील, तर ते घडवणं योग्य की आचरटपणाचं, त्यानं नक्की काय साधेल इत्यादी) वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी भाषांतरकार-समीक्षिका म्हणून काम करताना वासंती शंकरनारायणन यांच्या आयुष्याला नवा अर्थ आला. त्यांनी १९६९ साली ’बॅंक ऑफ अमेरिका’मध्ये जेव्हा सचिव म्हणून कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मनाशी काहीएक योजना होती. ’ऑपरेशन्स’ विभागात काम करत असताना त्यांनी ’सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकर्स’(सीएआयआयबी)च्या परीक्षा दिल्या. लिपिक (की कारकून? शिवाय मला लिपिका असं म्हणणं अंमळ विनोदीच वाटतंय.) म्हणून त्या नोकरीवर रुजू झाल्या होत्या. पण १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी उपव्यवस्थापक या पदापर्यंत मजल मारली. "अकाउण्टन्सीच्या (???) कामात मला फारशी गती कधी नव्हतीच. मात्र हातात घेतलेल्या कामाला संपूर्णपणे न्याय द्यायचा, हे मात्र पक्कं होतं," त्या सांगतात. त्यानुसार त्यांच्या दुसर्‍या डावालाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. निवृत्तीनंतर आपल्या साहित्यिक आवडीनिवडींचा उपयोग करून घेत त्यांनी मल्याळमधून इंग्रजीत भाषांतरं करायला आणि कलासमीक्षा करायला सुरुवात केली. चेन्नईत राहणार्‍या वासंतीबाईंना (मूळ लेखात बाईंचं वय आणि राहतं ठिकाण एकाच वाक्यात आलं आहे. पण त्याचं मुळाबरहुकूम भाषांतर मराठीत केलं, तर ते सरळ सरळ भाषांतरित आहे हे कळेल आणि विशोभित दिसेलसं वाटलं, म्हणून ते तपशील असे विखरून लिहिले. शिवाय ’शंकरनारायणनबाई’पेक्षा ’वासंतीबाई’ हे मराठीत बरं वाटेल, असं वाटल्यामुळे हा नावातला बदल. हे बदल केले तर अर्थामध्ये काही बदल होतो का?) साहित्य आणि ललित कला या दोन्ही विषयांमध्ये पहिल्यापासून रस होता. पण त्याबद्दल लिहायचं म्हटल्यावर, त्यांचा खोलात जाऊन रितसर (की रीतसर?) अभ्यास करायचं त्यांनी ठरवलं. बॅंकेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ’केरळातल्या जीवनावर पडलेला नृत्यनाट्याचा प्रभाव’ या विषयावर ’एम.लिट्‍’साठी प्रबंध लिहिला. तसंच ’मल्याळम चित्रपटातून दिसलेला समाज आणि राजकारण’ या विषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट (???) केली. नाटकावरही त्यांचं मनापासून प्रेम आहे. इतकं की, नाटकांची समीक्षा करण्यापूर्वी त्या नाटकाच्या तालमींना उपस्थित राहतात. कलाकारांशी चर्चा करतात आणि मगच समीक्षा लिहितात. (’आणि....’ हा मी जोडलेला वाक्यांश. त्याशिवाय एकसंधपणा येणार नाही असं वाटलं.) त्यांच्या लेखांतून, समीक्षणांतून त्यांना दरमहा जेमतेम ४००० रुपये मिळतात. पण त्याबद्दल त्यांची अजिबात कुरकुर नाही. त्यांनी भाषांतरं करायलाही निवृत्तीनंतरच सुरुवात केली. ’मातृभूमी’नामक नियतकालिकात आलेली ’अग्निसाक्षी’ नावाची एक क्रमश: कथा त्यांनी वाचली. यथावकाश त्या कथेच्या लेखिका ललितांबिका अंतर्जनम यांनी त्यांना त्या कथेचं भाषांतर करण्याची परवानगीही दिली. हे भाषांतर (भाषांतरच ना? की मूळ कथा? माझा काही गोंधळ होतोय?) १९८० साली केरळ साहित्य अकादमीनं प्रसिद्ध केलं. नंतर आलं मतम्पु कुंजुकुट्टन यांचं पुस्तक ’ब्रश्तु’. हेही क्रमश:च प्रसिद्ध झालं होतं. ’आउटकास्ट’ या नावानं मॅकमिलननं ते प्रकाशित केलं. मग ’विरागो, लंडन’ यांचं ’इनर कंट्री’, स्त्रियांसाठीचं ’काली’नं प्रकाशित केलेलं ’इनर स्पेसेस’. एकामागोमाग एक भाषांतर प्रसिद्ध होत गेली. वासंतीबाईंच्या मते - तसं शब्दागणिक भाषांतर नाहीच करता येत. मूळ लेखकाइतकीच भाषांतरकाराची सर्जनशीलताही महत्त्वाची ठरते ती त्यामुळेच. आता वासंतीबाई रोज सुमारे दोन ते चार तास काम करतात. त्यांना मिळणारं मानधनही प्रकाशक आणि रॉयल्टीनुसार (???) बदलत असतं. "पुस्तक विकल्यानंतर ५ ते १० टक्के रॉयल्टी भाषांतरकाराला मिळते. दर पुस्तकामागे मला दहा ते बारा हजार मिळू शकतील." (इथे अवतरणातली वाक्यं वासंतीबाईंची आहेत, हे अध्याहृत असल्यामुळे मी तसं थेट लिहायचं टाळलं आहे.) पण वीस वर्षांपूर्वी वासंतीबाईंचे यजमान गेले. त्यानंतर भाषांतराच्या कामानंच बाईंचं आयुष्य अर्थपूर्ण केलं आहे. हा आनंद हेच खरं मानधन असं त्यांना वाटतं. "माझ्या साहित्यप्रेमामुळेच मी माझं आयुष्य मनासारखं जगू शकते आहे," त्या म्हणतात. त्यांच्या मुलांचीही त्यांना मदत होत असते. मुलगी आशा अमेरिकेत राहत असली, तरी त्यांच्याशी कायम संपर्क राखून असते. तर मुलगा आनंद चेन्नईमध्ये स्वत:चं उपाहारगृह चालवतो. तो त्यांच्याच गृहसंकुलात दुसर्‍या इमारतीत राहतो. ’हे सारं कशासाठी?’ असा प्रश्न वासंतीबाईंना विचारलातच, तर त्या खलिल जिब्रानचे शब्द उसने घेतात. म्हणतात - जवळपणानंही जरा अंतर राखूनच असावं. अर्थात दर शुक्रवारी आपल्या नातवाबरोबर - अमर्त्यबरोबर - त्यांची ’डिनर डेट’ असते, तेव्हा हे अंतर मिटवून ठेवलेलं असतं, हे सांगणे न लगे! (ही माझी पुरवणी. लेखाच्या सुराला शोभून दिसतेय, की विजोड दिसतेय?) - पद्मिनी नटराजन हार्मनी मासिकासाठी, मार्च २००७

वाचने 4371 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मुक्तसुनीत Tue, 04/06/2010 - 22:35
तुमचे भाषांतर उत्तम झाले आहे. खाली माझे काही विचार मांडले आहेत. -------------------------------------------------- वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी भाषांतरकार-समीक्षिका म्हणून केलेल्या कामामुळे वासंती शंकरनारायणन यांच्या आयुष्याला नवा अर्थ लाभला. त्यांनी १९६९ साली ’बॅंक ऑफ अमेरिका’मध्ये जेव्हा सचिव म्हणून कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मनाशी काहीएक योजना आखली होती. ’ऑपरेशन्स’ विभागात काम करत असताना त्यांनी ’सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकर्स’(सीएआयआयबी)च्या परीक्षा दिल्या. लिपिक म्हणून त्या नोकरीवर रुजू झाल्या होत्या. पण १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी उपव्यवस्थापक या पदापर्यंत मजल मारली. "अकाउण्टन्सीच्या कामात मला फारशी रुचि कधी नव्हतीच. मात्र हातात घेतलेल्या कामाला संपूर्णपणे न्याय द्यायचा, हे मात्र पक्कं होतं," त्या सांगतात. [इथे भाषांतर बरोबर आहेच. पण एक सुचलेली गोष्ट : I like to do full justice to whatever I do या वाक्यात असलेली अभिमानाची , आपल्या स्वभावाचा पैलू दाखवण्याची जी भावना आहे ती भाषांतरात येत नाही. मुद्दा लहान आहेच. पण इथे सगळा भरच अशा छटांबद्दल आहे. ]त्यानुसार त्यांच्या दुसर्‍या डावालाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. इथे थोडा गोंधळ आहे. सेकंड करीयर चे भाषांतर दुसरा डाव हे अचूक आहे काय ? "दुसर्‍या कारकीर्दीला " हे जास्त योग्य ठरेल काय ? अजून एक. - since retirement याचे भाषांतर "आणि तेही निवृत्तीनंतरच्या" असे करणे बरोबर होईल का ? निवृत्तीनंतर आपल्या साहित्यिक आवडीनिवडींचा उपयोग करून घेत त्यांनी मल्याळमधून इंग्रजीत भाषांतरं करायला आणि कलासमीक्षा करायला सुरुवात केली. चेन्नईत राहणार्‍या वासंतीबाईंना (मूळ लेखात बाईंचं वय आणि राहतं ठिकाण एकाच वाक्यात आलं आहे. पण त्याचं मुळाबरहुकूम भाषांतर मराठीत केलं, तर ते सरळ सरळ भाषांतरित आहे हे कळेल आणि विशोभित दिसेलसं वाटलं, म्हणून ते तपशील असे विखरून लिहिले. शिवाय ’शंकरनारायणनबाई’पेक्षा ’वासंतीबाई’ हे मराठीत बरं वाटेल, असं वाटल्यामुळे हा नावातला बदल. हे बदल केले तर अर्थामध्ये काही बदल होतो का?) साहित्य आणि ललित कला या दोन्ही विषयांमध्ये पहिल्यापासून रस होता. पण त्याबद्दल लिहायचं म्हटल्यावर, त्यांचा खोलात जाऊन रीतसर अभ्यास करायचं त्यांनी ठरवलं. बॅंकेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ’केरळातल्या जीवनावर पडलेला नृत्यनाट्याचा प्रभाव’ या विषयावर ’एम.लिट्‍’साठी प्रबंध लिहिला. तसंच ’मल्याळम चित्रपटातून दिसलेला समाज आणि राजकारण’ या विषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट (???) केली. नाटकावरही त्यांचं मनापासून प्रेम आहे. इतकं की, नाटकांची समीक्षा करण्यापूर्वी त्या नाटकाच्या तालमींना उपस्थित राहतात. कलाकारांशी चर्चा करतात आणि मगच समीक्षा लिहितात. (’आणि....’ हा मी जोडलेला वाक्यांश. त्याशिवाय एकसंधपणा येणार नाही असं वाटलं.) त्यांच्या लेखांतून, समीक्षणांतून त्यांना दरमहा जेमतेम ४००० रुपये मिळतात. पण त्याबद्दल त्यांची अजिबात कुरकुर नाही. त्यांनी भाषांतरं करायलाही निवृत्तीनंतरच सुरुवात केली. ’मातृभूमी’नामक नियतकालिकात आलेली ’अग्निसाक्षी’ नावाची एक क्रमश: कथा त्यांनी वाचली. यथावकाश त्या कथेच्या लेखिका ललितांबिका अंतर्जनम यांनी त्यांना त्या कथेचं भाषांतर करण्याची परवानगीही दिली. हे भाषांतर (भाषांतरच ना? की मूळ कथा? माझा काही गोंधळ होतोय?) १९८० साली केरळ साहित्य अकादमीनं प्रसिद्ध केलं. नंतर आलं मतम्पु कुंजुकुट्टन यांचं पुस्तक ’ब्रश्तु’. हेही क्रमश:च प्रसिद्ध झालं होतं. ’आउटकास्ट’ या नावानं मॅकमिलननं ते प्रकाशित केलं. मग ’विरागो, लंडन’ यांचं ’इनर कंट्री’, स्त्रियांसाठीचं ’काली’नं प्रकाशित केलेलं ’इनर स्पेसेस’. एकामागोमाग एक भाषांतर प्रसिद्ध होत गेली. वासंतीबाईंच्या मते - तसं शब्दागणिक भाषांतर नाहीच करता येत. मूळ लेखकाइतकीच भाषांतरकाराची सर्जनशीलताही महत्त्वाची ठरते ती त्यामुळेच.इथे कोट्स न टाकल्याने वरील विधान वासंतीबाईंचे की स्तंभलेखिकेचे ? असा संभ्रम होऊ शकतो. आता वासंतीबाई रोज सुमारे दोन ते चार तास काम करतात. त्यांना मिळणारं मानधनही प्रकाशक आणि रॉयल्टीनुसार (???) बदलत असतं. "पुस्तक विकल्यानंतर ५ ते १० टक्के रॉयल्टी भाषांतरकाराला मिळते. दर पुस्तकामागे मला दहा ते बारा हजार मिळू शकतील." (इथे अवतरणातली वाक्यं वासंतीबाईंची आहेत, हे अध्याहृत असल्यामुळे मी तसं थेट लिहायचं टाळलं आहे.) पण वीस वर्षांपूर्वी वासंतीबाईंचे यजमान गेले. त्यानंतर भाषांतराच्या कामानंच बाईंचं आयुष्य अर्थपूर्ण केलं आहे. हा आनंद हेच खरं मानधन असं त्यांना वाटतं. "माझ्या साहित्यप्रेमामुळेच मी माझं आयुष्य मनासारखं जगू शकते आहे," त्या म्हणतात. त्यांच्या मुलांचीही त्यांना मदत होत असते. मुलगी आशा अमेरिकेत राहत असली, तरी त्यांच्याशी कायम संपर्क राखून असते. तर मुलगा आनंद चेन्नईमध्ये स्वत:चं उपाहारगृह चालवतो. तो त्यांच्याच गृहसंकुलात दुसर्‍या इमारतीत राहतो. ’हे सारं कशासाठी?’ हे असं कशासाठी ? हे जास्त योग्य वाटते. "सारं" मधे रहाण्याच्या व्यवस्थेबद्दल नव्हे तर समग्र जीवनाबद्दल भाष्य आहेसे वाटते.असा प्रश्न वासंतीबाईंना विचारलातच, तर त्या खलिल जिब्रानचे शब्द उसने घेतात. म्हणतात - जवळपणातही जरा अंतर राखूनच असावं. अर्थात दर शुक्रवारी आपल्या नातवाबरोबर - अमर्त्यबरोबर - त्यांची ’डिनर डेट’ असते, तेव्हा हे अंतर मिटवून ठेवलेलं असतं, हे सांगणे न लगे! (ही माझी पुरवणी. लेखाच्या सुराला शोभून दिसतेय, की विजोड दिसतेय?) - पद्मिनी नटराजन हार्मनी मासिकासाठी, मार्च २००७

श्रावण मोडक Wed, 04/07/2010 - 12:38
भाषांतर उत्तम. माझ्या मते हा भाषांतरीत मसुदा भाषांतर म्हणून अंतिम आहे. दुसर्‍या वाचनानंतर सहसा ज्या सुधारणा होतात, त्या आणि तेवढ्याच करणं शक्य आहे आणि ते संस्कार झाले की 'मुद्रण प्रत' तयार होऊ शकते.

राजेश घासकडवी Wed, 04/07/2010 - 13:54
मूळ लेख अतिशय वाईट लिहिलेला आहे. वृत्तपत्रीय, माहिती ठासणारी लांबलचक वाक्यांची भाषा, व आत्मा नसलेली जंत्री लिहिण्याचा सोस यामुळे त्याचं भाषांतर करणं म्हणजे त्रास आहे. कारण भाषांतर बरं होण्यासाठी तुम्हाला मूळ लेखिकेपेक्षा खूपच जास्त कष्ट घ्यावे लागतात.. तुमच्या भाषांतरातलं. कुठचंही एक वाक्य घेतलं तर ते वाचायला खूप नैसर्गिक वाटतंय. पण परिच्छेद पातळीवर काहीसं विस्कळित वाटतंय. पहिल्या परिच्छेदात कथा यायला हवी "त्याआधीचं आयुष्य त्यामानाने विशेष काही न सांगण्यासारखं - बॅंकेत काम करणाऱ्या सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणेच. पण चिकाटी होती, (ती बॅंकेतही दिसली होती) काही प्रेरणा मिळाली आणि मूळचा साहित्यातला रस. त्यामुळे मोकळ्या वेळाचा फायदा घेऊन त्यांनी त्यात खोलवर बुडी मारली, व रीतसर पदवी मिळवली. कुठच्यातरी कथेने भारावून जाऊन लेखिकेकडून परवानगी मिळवली व त्यांचं भाषांतर इतकं उत्तम झालं की... त्यानंतर मालिकाच सुरू झाली." हा ओघ येत नाही. सचिव, लिपिक व उपव्यवस्थापक यातली उतरंडही नीट कळत नाही (शब्द जवळपास परके असल्यामुळे)... "पुस्तक विकल्यानंतर ५ ते १० टक्के रॉयल्टी भाषांतरकाराला मिळते. दर पुस्तकामागे मला दहा ते बारा हजार मिळू शकतील." पण वीस वर्षांपूर्वी वासंतीबाईंचे यजमान गेले. त्यानंतर भाषांतराच्या कामानंच बाईंचं आयुष्य अर्थपूर्ण केलं आहे. हा आनंद हेच खरं मानधन असं त्यांना वाटतं. यात पोकळी भरून निघणं, हे खरं मानधन, पैसा आपला आहे. ही भावना येत नाही (वाक्यं तोडल्यामुळे). ____ जेव्हा वासंती शंकरनारायणन यांना १९६९ साली बॅंक ऑफ अमेरिकामध्ये, साध्या सेक्रेटरीची नोकरी लागली, तेव्हाच त्यांनी आपल्या मनात प्रगतीचा मार्ग निश्चित केला होता - व तो त्यांनी यशस्वीरीत्या आक्रमलाही. चिकाटीने बॅंकिंगच्या परीक्षा देऊन यशाच्या पायऱ्या चढत, कारकुनीपासून सुरूवात करून १९८६ साली रिटायर होण्यापूर्वी त्या असिस्टंट मॅनेजरच्या हुद्द्यापर्यंत पोचल्या होत्या. याचं श्रेय त्या आपल्या मेहेनतीला देतात - "मला हिशोब, बॅंकेचे व्यवहार, यात खरं तर मुळात गती नव्हती. पण एकदा काम हाती घेतलं की त्याला न्याय द्यायचा हा माझा स्वभाव आहे." निवृत्तीनंतर सुरू झालेल्या दुसऱ्या इनिंगलाही त्यांनी तितक्याच मनोभावे न्याय दिलेला आहे. आपल्या साहित्यातल्या रसापोटी त्यांनी निवृत्तीनंतर भाषांतरं करायला सुरूवात केली, व आज ७१व्या वर्षी त्यांनी उत्तम भाषांतरकार व कलासमीक्षक म्हणून नाव कमावलं आहे. कला व साहित्य यांची वासंतीबाईंना मुळची आवड असली तरी त्याबद्दल लिहिण्यासाठी त्यांनी याही विषयाचा चिकाटीने, व सखोल अभ्यास करायचं ठरवलं. बॅंकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एम. लिट. (विषय - नृत्य नाट्याचा केरळी जीवनावरील परिणाम) व पदव्युत्तर अभ्यास (मल्याळी चित्रपटातील समाज व राजकारणाचं दर्शन) पूर्ण केला. महिन्याला फक्त ४००० रुपये मिळत असले तरी त्या नाट्यसमीक्षा व लेख लिहितात. त्यांची त्याविषयी तक्रार नाही, उलट समीक्षा लिहिण्यासाठी नाटकाच्या तालमींना जाणं, कलाकारांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे त्या नाट्यप्रेमापोटी करतात. मल्याळमच्या इंग्रजीमधील भाषांतरकार म्हणून सुरूवात झाली ती 'मातृभूमी' नियतकालिकात आलेली 'अग्निसाक्षी' ही क्रमश: कथा वाचल्यानंतर, त्यांनी लेखिकेकडून भाषांतराची परवानगी घेतली तेव्हा. हे भाषांतर १९८० साली केरळ साहित्य अकादमीनं प्रसिद्ध केलं. नंतर आलं मतम्पु कुंजुकुट्टन यांचं पुस्तक 'ब्रश्तु'. हेही क्रमश:च प्रसिद्ध झालं होतं. ’आउटकास्ट’ या नावानं मॅकमिलननं ते प्रकाशित केलं. मग ’विरागो, लंडन’ यांचं ’इनर कंट्री’, स्त्रियांसाठीचं ’काली’नं प्रकाशित केलेलं ’इनर स्पेसेस’. एकामागोमाग एक भाषांतर प्रसिद्ध होत गेली. 'शब्दाला शब्द ठेवून भाषांतर करता येत नाही. त्यामुळेच लेखकाप्रमाणेच भाषांतरकाराची सर्जनशीलताही महत्त्वाची ठरते' असं त्या म्हणतात. आता वासंतीबाई रोज सुमारे दोन ते चार तास काम करतात. त्यांना मिळणारं उत्पन्न प्रकाशक कोण आहे व रॉयल्टी किती आहे यानुसार बदलतं. "पुस्तक विकल्यानंतर ५ ते १० टक्के रॉयल्टी भाषांतरकाराला मिळते. दर पुस्तकामागे मला दहा ते बारा हजार मिळू शकतील." पण पैसा हे त्यांच्यासाठी सर्वस्व नाही. वीस वर्षांपूर्वी पती गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली, ती या कामातून भरून निघते, जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. हा आनंद हेच खरं मानधन असं त्यांना वाटतं. "माझ्या साहित्यप्रेमामुळेच मी माझं आयुष्य मनासारखं जगू शकते आहे," त्या म्हणतात. ____ -'ऑपरेशन्ससारख्या डिपार्टमेंटमध्ये काम करून' काढून टाकलंय - वाचकाला काहीही नवीन कळत नाही. मूळ इंटरव्ह्यूमध्ये ते का महत्त्वाचं हे असणार, पण लेखात ते नाही आलेलं. -सी.ए.आय.आय.बी. काढून टाकलंय - निरुपयोगी अडचण आहे. -भाषांतरकार व कलासमीक्षक - मल्याळम ते इंग्लिश मुद्दाम टाळलंय. ते पुढे येईलच. -शेवटचा परिच्छेद भाषांतर करण्याच्या लायकीचा नाही.