मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तळेगावचे सतीश शेट्टी

विकास · · काथ्याकूट
तळेगाव दाभाडे येथील सतीश शेट्टी हे नाव मला आज टाईम्स आणि नंतर सकाळ बघे पर्यंत माहीत नव्हते. मात्र त्यांच्या हत्येची बातमी वाचून त्यांच्याबद्दल वाईट वाटले, झालेल्या प्रसंगाबद्दल एकीकडे चीड आली आणि दुसरीकडे आपण पूर्ण रानटी होत आहोत का असे वाटून अस्वस्थता आली. सतीश शेट्टी, वय वर्षे ३९ ह्यांना एपिलप्सीसारखा आजार असूनही भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत होते. त्यांनी गेले पाचसहा वर्षे माहीती अधिकाराचा वापर करून अनेक बिल्डर्सची भांडी फोडली होती. मात्र कालच्या सकाळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून निर्घृण हत्या केली... झाला प्रकार निषेधार्ह आहे. मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे आणि त्यात पुढच्या अराजक राज्याची बीजे आहेत असे वाटते म्हणून याचा आवाजी निषेध राज्यभर व्हावा असे वाटते आणि गुन्हेगारांना आणि त्यांच्या बोलवत्या धन्यास पकडण्याची मागणी सतत जागी ठेवून आमलात आणली पाहीजे असे वाटले.

वाचने 20918 वाचनखूण प्रतिक्रिया 36

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 01/14/2010 - 07:38
लोकसत्तात ही बातमी वाचली आणि संतापलो. या हत्येचा निषेध. खर्‍या गुन्हेगारास पकडले जाईल असे वाटत नाही. असे न वाटणे हेच कदाचित अराजकाचे चिन्ह असावे.

विनायक रानडे गुरुवार, 01/14/2010 - 08:13
बोलवत्या धन्यास पक्षात मोठे पद - मानकर प्रक्रणातून काय निघाले? असल्या व्यक्तीला राजकिय पक्षाचे पाठबळ मिळाले. एका दगडात दोन पक्षि फार कमी म्हणून एका प्रसंगातून जास्तितजास्त फायदा घेतला जात आहे. चिते वर मेजवानीचे जेवण बनवणे हेच राजकारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून घडते आहे. आज २४ तास द्रुष्य माध्यमांच्या बातम्या घरात आल्याने ते जास्त भेडसावते आहे. आठवा आठवा - नगरवाला, एल.एन मिश्रा, खडकवासला प्रक्रणातील संबंधीत व्यक्तींचे काय झाले? पोसलेले लेखक ह्यावर कादंबर्‍या, लेख, सिनेमा .... जाउद्या मला दात घाडयला आज जायचे आहे? ? ? ? (सगळे माहित असलेले अर्थ लावा)

In reply to by विनायक रानडे

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/14/2010 - 10:20
हेच म्हण्तो. कायदा व सुव्यवस्था ही जर नुसतीच कागदावर राहिली तर अराजक माजायला वेळ लागणार नाही. अशा घटना कृतिशील सज्जनांचे मौन वाढवतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋषिकेश गुरुवार, 01/14/2010 - 08:42
एकूणच व्यवस्था निर्ढावली आहे असे वाटू लागले आहे. त्या व्यवस्थेत नागरिकही आले. राज्यकर्ते मुठभर अराजकीय लोकांच्या तालावर नाचत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांमधे प्रचंड मुजोरी भरली आहे. "आपल्याला काही करण्याची कोणाची हिंमत नाही" हे त्यांच्या मनावर ठसले आहे. ह्या मुजोरीला जरब बसण्याची लक्षणे शुन्य आहेत किंवा शुन्यवत आहेत असे म्हणावेसे वाटते. श्री. शेट्टी यांना सखेद श्रद्धांजली -ऋषिकेश

II विकास II गुरुवार, 01/14/2010 - 08:51
>>त्यांच्या हत्येची बातमी वाचून त्यांच्याबद्दल वाईट वाटले, झालेल्या प्रसंगाबद्दल एकीकडे चीड आली आणि दुसरीकडे आपण पूर्ण रानटी होत आहोत का असे वाटून अस्वस्थता आली. असे पुर्णपणे म्हणु शकत नाही. जेव्हा शिकलेली बहुतांशी लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करु लागतील, तेव्हा असे म्हणणे जास्त रास्त ठरले. सध्या तरी भारतीय शिक्षणव्यवस्थेने चांअग्ले नागरीक तयार करणे हे ध्येय ठेवले पाहीजे. मला सगळ्यात वाईट वाटलेले हे एक प्रकरण आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Engineer-killed-in-Gaya/articleshow/327015.cms जेव्हा कोणत्याही समाजकार्य करणार्‍या कार्यकर्त्याचे नाव जास्त प्रसिध्द नसते तेव्हा असले प्रकार जास्त होतात, कारण अशा केस दड्पुन टाकणे सहज सोपे जाते.

सहज गुरुवार, 01/14/2010 - 09:39
ही बातमी वाचून दिवसाची सुरवात - फार वाईट. अश्या घटना थांबवता येत नाही याची असहायता खूप त्रासदायक आहे. :-( ह्यातील आरोपींना (बोलवते धनी) लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी.

In reply to by सहज

स्वाती दिनेश गुरुवार, 01/14/2010 - 13:04
ही बातमी वाचून दिवसाची सुरवात - फार वाईट. अश्या घटना थांबवता येत नाही याची असहायता खूप त्रासदायक आहे. हेच मनात आले. स्वाती

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/14/2010 - 10:41
सकाळी सकाळी फिरून येताना नेहमीप्रमाणे पेपर घेतला आणि ही ठळक बातमी नजरेस पडली. गलबलून आले. कोण कुठला हा शेट्टी माणूस... ना नात्याचा ना गोत्याचा... पण सख्खा भाऊ जावा असं झालं. सध्याच्या सामाजिक अवस्थेवर संतापलो, रडलो, कुढलो आणि घरी येईपर्यंत शांत झालो. :( नपुंसक असल्यासारखे वाटते. शक्य तेवढे माझ्यापरीने जमेल तिथे काही करत असतो. पण तेवढ्याने भागणार आहे का? एनडीटीव्ही / आयबीएन / लोकमत सारख्या वाहिन्या आता काय आणि कसे हे प्रकरण लावून धरतात ते बघायची उत्सुकता आहे. @घाटपांडे: पुण्यात या बद्दल काही होणार आहे का? जरूर कळवा. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुधीर काळे गुरुवार, 01/14/2010 - 12:47
बिपिन, कमीत-कमी शब्दात सुरेख प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही! आवडली! ------------------------ सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

मोहन गुरुवार, 01/14/2010 - 11:09
अशा घटना या पुढे येणार्‍या संपूर्ण क्रांतीची नांदी असू देत. सामाजिक इतिहास पाहता अराजकता ही पूढे येणार्‍या क्रांतीची बीजमूल असते. राजकीय/सामाजीक हत्या , शेतकर्‍यांच्य आत्महत्या, धान्यापासून दारू, शिक्षणाचा बाजार, वाढत चाललेली आर्थिक विषमता, ... घडा भरतोय ! आता एखाद्या शिवाजीची वाट आहे ! मोहन

In reply to by मोहन

सागरलहरी Fri, 01/15/2010 - 10:51
गर्दी अशी दरिद्री, जगते ही रोज मरुनी, निर्लज्ज लान्डग्यान्चे, असहाय्य भक्ष्य बनुनी, पिचली उरेही फूटती, खळगीत अन्न भरुनी करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, बघतो नवीन चाळे, गीधाड कावळ्यान्चे... घेतो मिटून डोळे, बघताच थेर त्यांचे .. जगतो कसे म्हणावे, मरतोच रोज आम्ही .. करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, घेउन अमर पट्टा, नव्हता कुणीच आला, झुन्जात सांडला तो , नव्हता कधीच मेला, तानाजी बाजी सारे, होऊ सवेच आम्ही, करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, - सागर लहरी ८-१०-२००९

समंजस गुरुवार, 01/14/2010 - 12:06
ह्या घटनेमागे असलेले काही प्रत्यक्ष व्यक्ती हे खरे दोषी नाहीत तर अश्या लोकांना, अश्या लोकांना पोसणार्‍यांना, अश्या लोकां सोबत आर्थिक लाभा करीता हात मिळवणूक करणार्‍या त्या सर्व राजकारणी नेत्यांना मतं देउन सत्तेत आणणार्‍या मतदारांचा आहे. त्या मुळे असल्या तथाकथित शिक्षित/समजुतदार/जाणत्या मतदारांना मी दोषी समजतो. काहीही होउ देत, मतदार आपल्याला मतं देतात हे असल्या नेत्यांना कळून चुकल्या मुळे हि नेते मंडळी जास्त निर्ढावत चालली आहे. सतीश शेट्टींसारखी प्रकरणे आणखी वाढणार या बाबत मला तरी काही शंका नाही. सध्याची लोकशाही आणी पुर्वीची राजशाही(मोगलशाही/आदीलशाही) यात काही विशेष फरक दिसत नाही. फक्त व्यक्तींमधे बदल झाला आहे, बाकी राज्य चालवण्यामागे असलेली मानसीकता तीच आहे. उगाचच आम्हाला वाटतय की आम्ही स्वतंत्र झालोय आणी स्वातंत्र्यात जगतोय. प्रत्यक्षात मात्र आमची परीस्थीती हि 'मॅट्रिक्स' सिनेमातल्या लोकांसारखी झालीय (त्यात लोकांना वाटत असतं की ते स्वतंत्र जीवन जगत आहेत. राज्यकर्ते त्यांनी निवडलेले आहेत पण खरी वस्तुस्थीती अशी असते की त्यांच्या वर नियंत्रण ठेवलेलं असतं आणि त्या सर्व मानवांना त्यांच्या नकळत वापरल्या जातं त्यांच्यावर नियत्रंण ठेवून असलेल्या मशिन्स तर्फे फक्त एक इंधन म्हणून). ईथे थोडा फरक हा आहे की आम्ही इंधन म्हणून न वापरल्या जाता, ह्या नेत्यां करीता एक मशिन आहोत ज्यांचं काम फक्त ३-५ वर्षातून एक/दोनदा बटन दाबायचं आणि ह्या नेत्यांना पुढील काही वर्षे संपत्ती जमवायला मोकळीक द्यायची. हाँ, आता 'मॅट्रिक्स' सिनेमातल्या हिरो सारखं एखाद्या व्यक्तीने या पलीकडे जाउन काही वेगळे केलं, ह्या निर्ढावलेल्या नेत्यांच्या संपत्ती जमवण्याच्या मार्गात अडथळा आणला तर त्याला सतीश शेट्टी सारखे बाजूला काढावे. बाकी आमच्या सारख्या लोकांनी त्या कृष्णा ची वाट बघावी. (हो, गीतेत कृष्णा नी सांगितलय म्हणून आम्ही त्या कृष्णा ची वाट बघतोय, की तो येणार पापं जास्त झाल्यावर आणि दुर्जनांचा नाश करणार).

चतुरंग गुरुवार, 01/14/2010 - 17:39
विरोध करणार्‍याला सरळ संपवूनच टाकायचे हा एकेकाळी फक्त बिहारी म्हणून कुख्यात असलेला खाक्या, पुरोगामी आणि पुढारलेल्या म्हणवणार्‍या महाराष्ट्राचा नवा अवतार झाला आहे हे पाहून पोटात खड्डा पडला. कायदा आणि सुव्यवस्था ह्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाने आणि भ्रष्टाचाराने लुळे बनवले आहे. सामान्य माणूस भेदरुनच जगत रहाणार असे दिसते. थेट जिवाशीच गाठ पडल्यावर कसला विरोध आणि कसले काय! (विषण्ण)चतुरंग

In reply to by चतुरंग

II विकास II गुरुवार, 01/14/2010 - 21:12
विरोध करणार्‍याला सरळ संपवूनच टाकायचे हा एकेकाळी फक्त बिहारी म्हणून कुख्यात असलेला खाक्या, पुरोगामी आणि पुढारलेल्या म्हणवणार्‍या महाराष्ट्राचा नवा अवतार झाला आहे हे पाहून पोटात खड्डा पडला. कायदा आणि सुव्यवस्था ह्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाने आणि भ्रष्टाचाराने लुळे बनवले आहे. दुर्देवाने सहमत. दिवसेदिवस हे प्रकार वाढत चालले आहेत. आपण नक्की लोकशाही राष्ट आहोत की उलट दिशेचा प्रवास सुरु आहे???

रेवती गुरुवार, 01/14/2010 - 19:46
श्री. शेट्टी यांना श्रद्धांजली! त्यांनी खरी समाजसेवा केली. आजकाल ज्याप्रकारे खून केले जातात त्याचे स्वरूप इतके भीषण असते की वाचूनच भीती वाटते. वर्तमानपत्रे वाचण्याचे मी कधीच बंद केले आहे. या बातमीच्या निमित्ताने पुन्हा सकाळ उघडला. रेवती

शाहरुख Fri, 01/15/2010 - 00:13
अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लागणारा दम माझ्यात नाही..

विकास Fri, 01/15/2010 - 00:33
शेट्टींना खुनाच्या धमक्या येत असल्याने गुरूवारपासून पोलीस संरक्षण मिळणार होते. अर्थात हे जाहीर नव्हते पण तरी देखील बुधवारीच त्यांची हत्या झाली. यात बरेच काही येते... आजचे लोकसत्ता संपादकीय हे सतीश शेट्टींसंदर्भातच आहे आणि वाचनीय आहे. त्यात "तळेगावचा शिलेदार" नामक शेट्टींवरच लिहीलेल्या खालील ओळी त्यांची ओळख करून देतातः
उसळत्या रक्तात मला, ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती पण, भान ध्येयाचे असू दे!’
-------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सागरलहरी Fri, 01/15/2010 - 10:54
गर्दी अशी दरिद्री, जगते ही रोज मरुनी, निर्लज्ज लान्डग्यान्चे, असहाय्य भक्ष्य बनुनी, पिचली उरेही फूटती, खळगीत अन्न भरुनी करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, बघतो नवीन चाळे, गीधाड कावळ्यान्चे... घेतो मिटून डोळे, बघताच थेर त्यांचे .. जगतो कसे म्हणावे, मरतोच रोज आम्ही .. करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, घेउन अमर पट्टा, नव्हता कुणीच आला, झुन्जात सांडला तो , नव्हता कधीच मेला, तानाजी बाजी सारे, होऊ सवेच आम्ही, करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणूनी, - सागर लहरी ८-१०-२००९

चिंतातुर जंतू Fri, 01/15/2010 - 12:09
शेट्टी यांनी आय. आर. बी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अनेक बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारवाया उघडकीस आणल्या होत्या. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतची हजारो एकर जमीन खोटे दस्त बनवून हडपण्याचा या कंपनीचा डाव महिती अधिकाराद्वारे शेट्टी यांनी हाणून पाडला होता. या हत्येशी याचा संबंध असू शकेल. - चिंतातुर जंतू

विदेश Fri, 01/15/2010 - 19:53
भ्रष्टाचाराला कवटाळणा-याचा सन्मान,आणि भ्रष्टाचाराला विरोध करणा-याची जमेल त्या पद्धतीने उचलबांगडी -असाच रिवाज एकंदरीत दिसून येतो. हे नुसते पहाण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by विदेश

विकास Fri, 01/15/2010 - 20:07
हे नुसते पहाण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. कृपया व्यक्तीगत घेऊ नका, पण एरव्ही साधा पाकीटमार रस्त्यात मिळाला तर वाटेल तसे त्याला धुउन काढणारी आपली (जनतेची) वृत्ती अशा वेळेस "आपण काय करणार" म्हणण्या इतकी वांझोटी आहे का? म्हणून आपले म्हणणे नाही पटले. याचा अर्थ कुणी एकट्यादुकट्याने जाऊन काही करावे असा नाही पण ज्या बिल्डर्सचे संबंध गुंतलेले आहेत त्यांच्यावर सामाजीक बहीष्कार घालता येऊ शकतो. निर्वाचीत प्रतिनिधींना (स्थानिक, राज्य, केंद्र स्तरावरील) ह्याचा छडा लावायला वेठीस लावता येऊ शकते. शेट्टींचे खरे स्मारक म्हणून पारदर्शकता ही मागितली तर हक्क न राहता जाहीर करण्याचे कर्तव्य करायला भाग पाडणे होऊ शकते. बरेच काही आहे जे करता येईल - अगदी नि:शस्त्र सामान्य माणसाला. अर्थात इच्छा असावी लागते. तशी नसायचे कारण भिती हे कदाचीत १०% च असेल उर्वरीत ९०% कारण हे स्वतःचा स्वार्थ (मला काय त्याचे) हे असते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

II विकास II Fri, 01/15/2010 - 20:50
वरील प्रतिसादाशी काहीसा सहमत व काहीसा असहमत >>एरव्ही साधा पाकीटमार रस्त्यात मिळाला तर वाटेल तसे त्याला धुउन काढणारी आपली (जनतेची) वृत्ती अशा वेळेस "आपण काय करणार" म्हणण्या इतकी वांझोटी आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे खुप काही बाबींवर अवलंबुन आहे. सर्वसामान्य माणसांना खुप काहीसे करावेसे वाटते पण प्रत्येक वेळी योग्य मार्ग सापडतोच असे नाही. हळु हळु वेळेबरोबर सगळे विसरतो. >>म्हणून आपले म्हणणे नाही पटले. याचा अर्थ कुणी एकट्यादुकट्याने जाऊन काही करावे असा नाही पण ज्या बिल्डर्सचे संबंध गुंतलेले आहेत त्यांच्यावर सामाजीक बहीष्कार घालता येऊ शकतो. ह्या मुद्दा योग्य आहे. कमीत कमीत त्या बिल्डरचे घर घेणे टाळणे हा चांगला मार्ग आहे. मग मुद्दा उरतो की कोणता बिल्डर चांगला आहे? घर कोणाकडुन घ्यायचे? दगडापेक्षा वीट मउ हा न्याय लावायचा का? >>बरेच काही आहे जे करता येईल - अगदी नि:शस्त्र सामान्य माणसाला. अर्थात इच्छा असावी लागते. तशी नसायचे कारण भिती हे कदाचीत १०% च असेल उर्वरीत ९०% कारण हे स्वतःचा स्वार्थ (मला काय त्याचे) हे असते. पुर्ण सहमत. ह्या वरुन मला ह्या ओळी आठवतात. First they came for the communists, and I did not speak out—because I was not a communist; Then they came for the trade unionists, and I did not speak out—because I was not a trade unionist; Then they came for the Jews, and I did not speak out—because I was not a Jew; Then they came for me—and there was no one left to speak out. कोणीतरी जात्यात तर कोणी सुपात. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकावर फरक पडत असतो, फक्त जाणवत नाही इतकेच.

In reply to by विकास

शाहरुख Sat, 01/16/2010 - 00:19
विकास-जी, अशा लोकांवर वैयक्तिक बहीष्कार मी घालतोच पण मी वर म्हटल्याप्रमाणे अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लागणारा दम माझ्यात नाही..आपण मला काय सल्ला द्याल ? प्रामाणिक प्रश्न आहे

विदेश Fri, 01/15/2010 - 20:38
'मला काय त्याचे-' हे खूपच अंगवळणी पडले आहे.हजार नि:शस्त्र सामान्य माणसात एखादाच हजारे लढताना दिसतो. शिवाय भीति हे कारण तर ९०% लोकाना असते.

कपिलमुनी Mon, 08/11/2014 - 15:14
सीबीआय ने सुद्धा या हत्येचा तपास बंद केला.. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/satish-shetty/articleshow/40055966.cms म्हणजे मारेकर्‍यांचे हात कुठवर पोचले आहेत याची कल्पना करा .

In reply to by कपिलमुनी

मृगनयनी Mon, 08/11/2014 - 19:48
ह्म्म्म..... सतीश शेट्टी' यांच्या हत्येनन्तर १३ ऑक्टोबर २०१२ रोजी.. त्यांच्या भावावर- 'सदानन्द शेट्टी'वर देखील असाच खुनी हल्ला झाला होता. तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमी.. आणि सीबीआय'वाले जास्त होते. दोन दिवसांनी त्यांना जहांगीर'ला ठेवले गेले. १७ ऑक्टोबरला त्यांचाही दुर्दैवी अन्त झाला... आणि फाईल क्लोज झाली......

कपिलमुनी Wed, 01/14/2015 - 16:04
सतीश शेट्टींचे मारेकरी ५ वर्षांनंतरही मोकाट ५ वर्षे झाली . आणि पुढेही काही न्याय मिळेल अशी आशा नाही . सध्या आय आर बी वर छापे मारले पण एका केंद्रात असलेल्या वैदर्भीय नेत्याच्या इंटरेस्टमुळे पुढे सर्व थंडच आहे . शेट्टी , दाभोळकर अशा घटनांमुळे सामाजिक कार्यकर्त्यांचे खून करून ते राजकीय पाठबळावर पचवता येतात असे दिसते .

In reply to by मोहनराव

मराठी_माणूस Fri, 01/16/2015 - 14:15
तसेच समाजातल्या एकाने सत्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या साठी त्याला आपले प्राण द्यावे लागले त्याच्या साठी समाजाने काय केले ?

Rajesh188 गुरुवार, 01/14/2021 - 20:10
जसे पुणे वाढत गेले तसे भू माफिया पण वाढत गेले. हे सर्व भू माफिया लोकांचीच काम आहे. राजकीय वरदहस्त असल्या शिवाय असली काम होतच नाहीत. बाबू,राजकारणी,पोलिस,आणि आता काही प्रमाणात सहभागी असलेला मीडिया. ही युती राज्य,देश,आणि कायदा प्रेमी सामान्य लोक ह्यांच्या साठी धोक्याची घंटी च आहे.. आणि हे माफिया पुणे,मुंबई सारख्या शहरात आहेतच पण हल्ली त्यांचीच छोटी पिल्ल खेडेगाव,तालुका अशा ठिकाणी पण आहेत. राजकीय वरद हस्त हेच एकमेव कारण आहे ह्या पाठी.