मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खारवलेले शेँगदाणे

कंजूस · · पाककृती
खारवलेले शेंगदाणे साहित्य: शेंगदाणे ,मीठ (+अर्धीवाटी भाजण्यासाठी) .स्टीलची चाळण ,जुनी अॅल्यु०ची कढई इ० कृती : (१)वाटीभर दाणे बोलमध्ये घेऊन एक छोटा चमचाभर पाणी टाका .मिसळून अर्धाएक तास ठेवल्यावर सर्व पाणी शोषले जाईल .ओलसरपणा गेला पाहिजे . (२)दोन चमचे पाण्यात चमचाभर मीठ टाकून विरघळवा .थोडे तसेच राहील .हे एक चमचा पाणी एका मोठ्या थाळ्यात टाकून बाजूला ठेवा . (३)एका कढईत वाटीभर कोरडे मीठ टाकून भाजायला सुरुवात करा .चांगले तापले की क्र १ मधले दाणे टाकून हलवत राहा .पाच एक मिनीटांनी दाणे फुटल्याचा आवाज येईल .आणखी पाच मिनी दाणे लालसर दिसू लागल्यावर पटकन सर्व मिठासकट एका चाळणीवर टाकून मीठ बाजूला करा (आणखी भाजल्यास दाणे जळतात )आणि लगेच गरम दाणे क्र २ मधल्या थाळ्यात टाकून घोळवा . त्यातले खारे पाणी दाण्यांना चिकटून पांढूरका मिठाचा थर चढेल . झाले खारवलेले दाणे तयार . सूचना : (अ)दाणे अथवा मीठ ओलसर असल्यास कढईला भोके पडतात .कढई गार झाल्यावर लगेच धुवून कोरडी करा . (ब)दाणे थोडे मऊ राहीले तरी चालेल पण तापलेल्या मिठातून योग्यवेळीच बाजूला न काढल्यास करपतात . (ड)सालंवाल्या काजूंसाठी हीच कृती फार सावधतेने करावी .

वाचने 16400 वाचनखूण प्रतिक्रिया 33

रेवती Sat, 07/19/2014 - 07:05
खारे दाणे नक्की कसे करतात हे माहित नव्हते ते समजले. धन्यवाद. फोटू दिला असतात तर बरे झाले असते. अवांतर- मी खारेदाणे तूनळीवरील कृतीप्रमाणे मावेमध्ये करते. तेही चाम्गले होतात.

कंजूस Sat, 07/19/2014 - 08:10
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे करण्यासाठी खाऱ्या पाण्याने प्रथम दाणे एक दिवस भिजवून नंतर एका रोळीत (बांबूची करंडी )अथवा चाळणीत टाकून निथळवतात .एका लोखंडी कढ ईत मीठात(अथवा वाळूत) जलद फोडतात .एका तारेच्या झाऱ्यानेच जलद हलवतात .पटकन झाऱ्याने मीठ वेगळे करत बाजूला टाकतात .मीठ दाण्यांच्या आतमध्ये मुरलेले राहते .चणे फोडण्यासाठी हीच पध्दत वापरतात .महाबळेश्वरात पाहता येईल .या पध्दतीत दाणे दुप्पट मोठे होतात पण त्यांची मूळची चव थोडी बदलते (भुजनो खारा सिंग).चणे ,दाणे ,लाह्या फोडणाऱ्यांना भडभुंजे म्हणतात . वाण्यांकडून 'खवट' व्हायला आलेले दाणे हे भडभुंजे कधीकधी स्वस्तात घेऊन वापरतात . इथे थोडी पटकन होणारी कृती दिली आहे .पावसाळ्यात खारे दाणे खायची हुक्की आली तर तासाभरात गरमागरम तयार . सालंवाले काजूंचं जमल्यास त्या सालांचाही चिकटपणा जातो आणि चविष्ट लागतात .

कंजूस Sat, 07/19/2014 - 10:05
होय लै भारी.दाणे ,लाह्या वगैरे 'फुटतात' तेव्हा त्यात एक वेगळीच चव येते आणि ही क्रिया तापलेल्या वाळूत (=भट्टीत) उत्तम होते .परंतू वाळूचे कण आत राहीले की नकोसे वाटते .

त्यात दाणे भट्टीसारखे उत्तम भाजले जातात. मीठ-पाण्यात दाणे दिवसभर भिजवून, नंतर वाळवून, त्यात भाजायचे अशी कृती आहे. इंटरेस्टेड लोकांनी ते मशिन (`सकाळ' प्रदर्शन लागल्यावर) जरुर पाहावे, अशी शिफारस करतो.

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 21:25
सूचनांच्या सूचीत अ, ब, आणि ड सूचना आहेत. (क) सूचना लपविली आहे. ते कांही व्यावसायिक रहस्य आहे का? असो. माझी बायको मिठ विरघळविलेले पाणी हाताशी ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यावर कढईतच ते पाणी टाकून परतते. चांगले होतात. वरीलप्रमाणे कृती करून पाहीन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस Sun, 07/20/2014 - 15:18
(क) चे रहस्य .दाणे फुटल्यानंतर ची तीन चार मिनीटे महत्त्वाची आहेत .झटकन ते लाला होतात आणि जळतात . असे होऊन ते वाया जाण्यापेक्षा आपण ते जरा लवकर काढतो आणि मीठाच्या पाण्यात घोळवल्यावर लक्षात येते की जरा मऊ राहिले आहेत .अशावेळी ते पुन्हा कढईतल्या गरम मीठात ठेवून एका वर्तमानपत्राने झाकून ठेवले की कुरकुरीत होतील . मी खारे दाण्यांवर बरेच प्रयोग केले त्यातली ही कृती खात्रीशिर आहे .भाजतांनाच मीठाचे पाणी मारतांना गरम कढईवर उडून भोके पडतात .काळजीपूर्वक करावे लागते .

In reply to by कंजूस

प्रभाकर पेठकर Sun, 07/20/2014 - 15:58
ह्म्म्म! (क) चे रहस्य उघड केल्याबद्दल धन्यवाद. खारे शेंगदाणे मी कधी केले नाहीत. पण वरील एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझी सौ. ते बनविते. आणि विश्वास ठेवा गेल्या ३० वर्षात कधी कढई बदलण्याची वेळ नाही आली.

पुण्यात मंडईच्या मागे बुरुड आळीत घरून नेलेले दाणे आणि धान्य (लाह्या) भाजून देणार्‍यांची दुकाने आहेत. काळ्या वाळूवर मोठमोठ्या घमेल्यांमध्ये मस्त भाजून मिळतात. अनिल अवचटांच्या "पुण्याची अपुर्वाई" या पुस्तकामध्ये पण यावर एक लेख आहे.

कंजूस Sun, 07/20/2014 - 22:57
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच आणि श्रावण जवळच आलाय ना . मी खारे दाणेच म्हणायचो परंतू आमच्या एका वर्धाच्या मित्राने सांगितले याला खारवलेले म्हणा . लहानपणी मामाच्या गावाला (सांगलीजवळ ,साठ पासष्ट साली )जायचो तेव्हा गावात दहा बारा चणे -फुटाणे -मुरमुरे-बत्ताशे-चिक्कीची दुकाने होती .मुलांचा खाऊ हाच होता .ऐंशी सालात ती सर्व दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली .निरोगी राहण्याचे गुपित याच चणेफुटाण्यांत दडलं होतं का ?आता गावागावांत मधुमेह पसरलेला दिसतो आहे .संध्याकाळी गल्ल्यावरून उदबत्ती फिरवतांना हा मेडिकलवाला देवाजवळ मनोभावे रोज काय बरं मागत असेल ?(---सहज सुचलं म्हणून ) .