Skip to main content

कोकणातले नवे ठिकाण

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 07/05/2018 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण म्हटले की माडांच्या बनात नटलेले समुद्रकिनारे, लाल मातीच्या गच्च झाडोर्‍यातल्या डोंगरदर्‍या आणि जिव्हालौल्य पुरवणारे आंबेगरे, जीभ रंगवणारी जांभळे, करवंदे तोरणे, जाम इ. रानमेवा समुद्रखाद्य हे सारे डोळ्यांसमोर येते. पण एक आगळेवेगळे रौद्रसौंदर्य एका नव्या ठिकाणी आढळेल. https://prathameshshirwadkar.wordpress.com/2018/05/05/suryast_darshan/#… इथे वाचायला मिळेल इथल्या वाचकांना आवडेल असे वाटते. कुणीतरी जाऊन मस्त प्रवासवर्णन इथे टाकेल जर वाचायला मज्जा येईल.

वाचने 15888
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

मस्त स्पॉट आहे! अशी ठिकाणे डेव्हलप केली पाहिजेत , चांगले रस्ते आणि सोयी असल्या की कोकणचा विकास नक्की होईल

प्रश्न कळला नाही.

लेखातले वर्णन कोकणाचे "लाल मातीच्या गच्च झाडोर्‍यातल्या डोंगरदर्‍या आणि जिव्हालौल्य पुरवणारे आंबेगरे, जीभ रंगवणारी जांभळे, करवंदे तोरणे, जाम इ. रानमेवा समुद्रखाद्य हे सारे डोळ्यांसमोर येते- - - -" हे सर्व झपाट्याने गायब होत आहे. शहरीकरण,सोसायट्या उभ्या राहात आहेत आणि ते लोक जुनी झाडे काढून टाकतात. डास भयपूर वाढत आहेत. पेप्रातल्या रोहाऊस बंगलो,फ्लॅटसच्या जाहिराती साक्षीला आहेतच. असा विकास होत आहे.

खालील निवेदन हसहसत लिहिलेले आहे, आवेशाने भावनिक आवेगाने वा नाही. मी गेली सहा वर्षे मालवणपासून ५ किमीवर सतत वास्तव्यास आहे. सोसायट्या घरे उभी राहिली खरी, त्यात माझे घर पण आले. आंबेगरे आहेत, करवंदे तोरणे कमी झाली नाहीत, जांभळे भरपूर आहेत पण जांभळे काहीतरीच महाग झाली आहेत. टप्पोरी झांभळे १०० रु. पायली म्हणजे दोनतीन पसा होतील एवढी आहेत. साठसत्तर वर्षांपूर्वी एका जोडप्यास साताठ मुले असत. भातशेतीतले अन्न पुरत नसे. पोटासाठी माण्से मुंबईला गेली. शेती करायला माणसे उरली नाही. शेतजमीन पडीक राहून आडमाप राने वाढली. त्यात कोणती झाडे वाढली तर ऐन, किंजळ, ओय, कुडा, खैर, तिरफळे इ. पोटासाठी मुंबईला गेलेल्यांच्या काही नातवंदापतवंडांनी जमिनी विकल्या. चार पैसे गाठीला बांधलेल्या नातवंडा पतवंडांनी त्या जमिनी विकत घेतल्या, विकसित केल्या. पण शंभर झाडे पाडल्यावर काजू/आंब्याची दोनतीनशे कलमे लावतात. विकासामुळेच कसे का असेनात पण रस्ते झाले, पूल झाले. माझ्या लहानपणी माझ्या गावी यायला बस नव्हती. कोळंबला बैलगाडी पडावात (होडीत) घालावी लागे. बैल पोहत येत. बोटीतून मालवणला उतरल्यावर दीड तास हाडे ढिली केल्यावर अर्धमेला ओऊन माणूस घरी पोहोचे. आता वीज आली. पंधरा मिनिटात कार/रिक्षा/बसने घरी पोहोचतो. हे मिळवण्यासाठी काही झाडे गेली पण नवी झाडे आली. साग तर प्रत्येक माणूस लावतो. एक मालक निदान १०० तरी साग लावतो. प्रदूषण अजूनतरी नाही. साध्या पाण्याने धुतलेली जखम कोणतेही औषध न लावता न चिघळता आपोआप बरी होते. सहा वर्षात मी एकदाच डॉक्टरचे तोंड पाहिले. आज वय वर्षे पासष्ट. रक्तदाब १३२-७७, पल्स ८१. कोणतेही औषध घेत नाही. मेलो तर बंदुकीच्या गोळीने, औषधाच्या नाही. ((((-)))) सर्वात जमेची बाजू म्हणजे आता पोटासाठी कोणी तरुण गाव सोडून शहरात जात नाही. इथेच आपापल्या कुवतीप्रमाणे उद्योग करतात. शेतीला जोडधंद्याचा आधार देतात. गरीब शेतमजूर देखील मोटरसायकल ऊर्फ बाईकने फिरतात. माझे तीर्थरूप भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोटासाठी मुंबईत गेले. मी सेवानिवृत्त झाल्यावर वडिलोपार्जित जागेवर काही न करता घरासाठी आणि शेतीसाठी नवीन जागा घेतली. जगात फुकट काही मिळत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावे लागते. विकासाच्या नावाने चांगभले करण्याआधी कृपया ही बाजू देखील ध्यानात घ्यावी.

In reply to by सुधीर कांदळकर

काका दंडवत घ्या..!! == काय आहे विकास हा फक्त शहरातच शोभून दिसतो असे अनेकांचे मत झालेले आहे. गाव तसेच निसर्ग सौंदर्यात राहावे जेणे करून उन्हाळी- दिवाळी सुट्टीत लोकांना मकेची बुट्टे खायला मिळत जातील आणि रौद्र ठिकाणी येऊन थ्रिल केल्याचे फोटो चेपुवर टाकता यावीत. (कंजूस साहेब हे मी यिन जनरल लिहले आहे. कृपया गैरसमज नसावा )

In reply to by सुधीर कांदळकर

परफेक्ट हो सुधीरकाका, लै भारी लिहिलायत. . आणि त्याची बाजू आमच्या विशुपाटलाने मांडलीय ती खरीच आहे.

In reply to by सुधीर कांदळकर

जबरदस्त प्रतिसाद. जवळपास अठरा वर्षे सह्याद्री आणि परिसरात फिरतोय. खुप बदल पाहिलेत. अक्षरशः डोळ्यावर विश्वास बसत नाही असे बदल झालेत. पण फार खंत वाटत नाही. बदल हे होणारच आणि बदलांना विरोध हि स्वाभाविक मानवी मनोवृत्ती म्हणायला हवी. "पहिलं लई चांगल हुत" हे कायमच एकायला मिळते, ते सुध्दा नव्याचे फायदे घेउन. हा दुटप्पीपणा झाला. असो. या ठिकाणाबधल थोडे लिहीतो. कोकणसारखा निसर्ग संपन्न प्रदेश पर्यटनाचा जोरावर फुलवायला हवा. त्याचा कॅलिफोर्निया होईल कि नाही ते माहिती नाही, पण जगात कोकण म्हणून ओळख मिळवायला हवी. त्या अनुषंगाने वरील विकसित केलेले ठिकाण चांगली सुरवात म्हणायला हवी. फोटो अप्रतिम आहेत. मी आमच्या ग्रुपमधे धागा शेअर केला आहे. प्रत्यक्षात भेट द्यायची उत्सुकता वाढली आहे.

In reply to by सुधीर कांदळकर

जबरदस्त प्रतिसाद... तोही खुद्द त्या व्यवस्थेचा कृतिशील सदस्य असलेल्या व्यक्तीकडून असल्याचे त्याचे विशेष मोल आहे !!! धन्यवाद कांदळकरसाहेब !

सुधीरभाऊ तसा विकास झाला तर ठीकच आहे पण एकूण कठीण परिस्थिती होणार हे मला जाणवलं ते लिहिलं. १) टुमदार कौलारू घरं गेलीच ना? २) सोसायट्या हे भयानक प्रकरण ३) वृक्ष नकोसे झालेत. तोडायला परवानगी लागते आणि जागा व्यापतात. आहे ते जातील कसे ही विवंचना आहे. जाऊ दे उगाच चांगल्या धाग्यावर हे नकोच लिहायला.

महामार्ग बांधतांना शंभरेक वर्षांचे तीनतीन माणसांच्या कवेत येणार नाहीत एवढे प्रचंड वड पिंपळ आणि इतर अनेक वृक्ष हजारोंच्या संख्येने तोडले गेले तेव्हा खरेच वाईट वाटले. ते सारे वृक्ष पुनस्थापित होऊ शकले असते पण लाकूड विकून मिळणार्‍या पैशातल्या भ्रष्टाचारामुळे ते झाले नाही. फक्त ठराविक जातीचे वृक्ष तोडायला परवानगी लागते. आपोआप वाढलेली किरकोळ झाडे तोडायला परवानगी लागत नाही. काही झाडे उपद्रवकारक देखील असतात. ते इतर झाडांना वाढू देत नाहीत. आंब्याच्या बागेत सहसा कोणीही साग लावत नाहीत. माझा याबाबत फारसा अभ्यास नाही. अर्थात प्रत्येक गोष्टीला फायदेतोटे असतात. तारतम्याने वागून बरेवाईट ठरवावे लागते.

आपल्या प्रतिक्रियेमागची आस्था, निसर्गप्रेम जाणवले म्हणून लिहितो आहे. कौलारू घरे कमी झाल्याची खंत मला देखील आहे. काल कमीत कमी दहा जणांशी मी कौलारू घरांबद्दल बोललो. माहिती विचार करण्यासारखी आहे. १.कौलारू छ्परावरची कौले काही वर्षानंतर दरवर्षी नीट करावी लागतात. मध्ये फटी निर्माण होतात आणि पावसाळ्यात घर गळते. हे काम करणारी माणसे आजकाल कमी झाली आहेत. मिळालीच तर ठरल्या वेळी येतील याची शाश्वती नाही. इथे वचन/वेळ पाळण्याचा प्रघात नाही. दहा वेळा दातांच्या कण्या केल्या की मग येतील. २. माकडांचा उपद्रव. माकडे इथे फार उपद्रव देतात. एका घरावरची किमान आठदहा कौले फोडतात आणि इतर बरीच विस्कळीत करतात. मग पुन्हा पावसाळ्यात गळणे. ३. १०० वर्षापूर्वी घरावर गवती छप्पर वा नळे होते. ५० वर्षापूर्वी ते जाऊन मंगलोरी कौले आली. आता काँक्रीट स्लॅब आल्या. हे देखील बदलते आहे. कालाय तस्मै नम:. तरी सपाट स्लॅबचे घर उन्हाळ्यात प्रचंड तापते. स्लॅबची गच्ची दोनतीन वर्षांनतर गळते. स्लॅब कमी तापण्यासाठी आणि गळणे थांबवायला स्लॅबवर कौले बसवतात किंवा पत्र्याची शेड बांधतात. गळण्यावरचा सोपा उपाय म्हणजे सिमेंटची पातळ स्लरी ओतणे. चहाच्या गाळण्यात चहापूड जमली की चहा गाळण्यातून बाहेर येत नाही तसे मग कळणार्‍या स्लॅबच्या सूक्ष्म गळक्या छिद्रात सिमेन्ट साठते आणि मग गळत नाही. पण हे कोणाला पटत नाही तर कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे आता उतरत्या कौलारू छपरासारखी स्लॅब बांधून घेतात. तुमच्या माझ्यासारख्या कौलारूप्रेमी व्यक्ती बहुधा त्यावर नव्या प्रकारची आकर्षक छोटी सुबक कौले लावून घेतात. ती सिमेन्टने पक्की केलेली असल्यामुळे फुटत वा विस्कळित होऊन गळत नाहीत. पण फार महाग आहेत. काही ठिकाणी तर मी मंगलोरी कौलारू छपराच्या आकाराचे रबरी कार्पेटच अशा उतरत्या स्लॅबवर पाहिले. ते देखील पुण्यातला एका आधुनिक सातमजली इमारतीवर. मी भरपूर शोधले पण कुठे मिळाले नाही. असो तुमची आस्था जाणवली, नव विचार मिळाला. त्या निमित्ताने नवे निरीक्षण झाले धन्यवाद. लौकरच जास्तीत जास्त घरे कौलारू होतील अशी मला आशा आहे.

माझि विनन्ति आहे कि अशा नव्य ठिकाणान्चि माहिति देऊच नका. सभ्यपणे निसार्गाचा अस्वाद घेणे बहुतेकजणान्ना जमत नाही. कचरा , उपद्रव हे सर्व आलेच. तिथेच दारु पार्ट्या होणार. ज्याना जायचे आसेल त्याना अशी ठिकाणे शोधु देत. काहि लोक शहरातल्या लोकाना स्वार्थि समजत आहेत. त्याना शहरासारखा विकास गावात पण हवा आहे. विकासापोटी शहरान्चे उकिरडे झाले तेवढे बास असे मला तरि वाटते. गावान्चि ओळख तरि पुसुन जाउ नये. गावाचि जुनी ओलख तशिच ठेउन विकास काय हरकत आहे. जो विकास शहरात तोच जर गावात व्हायला लागला तर मग .........

In reply to by एक छायाचित्रकार

माझि विनन्ति आहे कि अशा नव्य ठिकाणान्चि माहिति देऊच नका.>>> ==>> एकदम सहमत. काय राडा घालायचा तो महाबळेश्वर, पुळे, अलिबाग, गोआ इथेच घाला. === महाबळेश्वरला सनसेट बघायचे सोडून (कितीजणांना ढेकळे समजते देव जाणे) ९० % पब्लिक मॅप्रो गार्डन मध्ये सरबताचे फ्री सॅम्पल्स पिण्यात व्यग्र.

In reply to by विशुमित

सहमत महाबळेश्वर पाचगणीला कठेही जा. गुज्जू पब्लिक खाण्या पिण्यासाठीच तेथे आले आहेत आणि "उद्यापासून उपास आहे तर आज जमेल तितका आणि जमेल तेथे खाऊन घ्या" अशा तर्हेने वागताना पहिले कि डोक्यात जातं.

**माझि विनन्ति आहे कि अशा नव्य ठिकाणान्चि माहिति देऊच नका.** यासारखे अजून एक उदाहरण म्हणजे BNHS वाले पक्षांच्या /पक्षीदर्शनच्या जागा सांगत नाहीत.

काही ठिकाणी माणसाला जाऊ देऊ नये, या स्पष्ट मताचा मी आहे. काही गोष्टींचा आनंदच माणसाला घेऊ देऊ नये. त्यातल्या मुख्य गटाची लक्षणे: गळ्यात पोस्ट -उदारीकरणातला डीएसेलार आला की पॅशनच्या नावाखाली किंवा फेसबुकी हावरटपणामुळे हे लोक सगळीकडे घुसतात आणि वाट लावतातच. यांची केजीतली पिळगी हिरव्या ऑइलपेंटने सोसायटीच्या भिंतीवर "गो ग्रीन" वाली झाडांची ग्राफीटी काढतात तेव्हा यांच्या कृतकृत्यतेला पारावार राहत नाही. - कासची काशी झालेली या डोळ्यांनी पाहिलेला पंचवीशीतला जीव (तीन चार वर्षांपासून माझ्या मित्राला फुलांची एक जातच कासवर सापडली नाही)

नवे पर्यटनस्थळ म्हणून विकास करीत असलेले ठिकाण आहे. कशेळी गावानजीकच आहे. पर्यटन झाल्यामुळे. विकासाला चालना मिळते. हैदोस घालतात ते बेपर्वा पर्यटक. कायदे कडक झाले तर हैदोस थोडाफार कमी होईल. साईड इफेक्ट होतो म्हणून औषधच नको असे म्हणता येत नाही. पर्यटक वाईट म्हणून पर्यटनच नसावे हे बरोबर नाही. शिवाय मला असे वाटते की आपल्याकडे पर्यटक - नाही समाजमनच अजून पोक्त झालेले नाहीत. किंवा आपण अति उच्चभ्रू असल्यामुळे नियम लागू होत नाहीत, आम्ही कसेही वागू आणि इतरांना उपद्रव होत असेल त्याला आम्ही काय करणार? ही सरंजामी वृत्ती बळावते आहे. गणेशविसर्जनावेळी जर असे होत असेल तर पर्यटनस्थळी देखील तसेच होणार.

In reply to by सुधीर कांदळकर

माझा नैनितालचा अनुभव चांगला होता. त्या नैनी झील मध्ये माशांना खायला टाकायची काय कोणाची बिशाद ! === जेजुरीचे दर्शन करून जाणाऱ्या भाविकाने केत-कावळ्याच्या बालाजी मंदिराच्या आवारात प्लास्टिकची पिशवी टाकून दाखवावी!

कायदे आणि सरकार याविषयी आनि त्या॑चे पालन याविषयी न बोललेलेच बरे. पर्यटनामुळे विकासाला चालना मिळते हे खरे. अशी कितीतरी विकसित ठिकाणे आहेत जिथे आता जवेसे देखिल वाटत नाही. केवळ औषधापुरती हवी असल्यास अनेक ठिकाणे आहेत. थोडिफार चा॑गली ठिकाणे शिल्लक आहेत किमान ती तरी चा॑गली रहावीत असे वाटते. केवळ इथे बोलुन समाजमन कधीच पोक्त होनार नाही. चा॑गल्या सवयी लहानपणापासून असतील तर मोठेपणी सार्वजनिक क्षेत्रात देखील आपसूकच दिसतात. तुम्ही गणेशविसर्जनाचे उदाहरण दिलेत. तुम्हाला सर्व ठिकणि असेच व्हावेसे वाटते का? ( नक्किच वाटत नसेल. ). म्हणूनच अशी माहिती उघडपणे देउ नये असे मला वाटते.

कंजूस मामा आणि हणमंतअण्णा यांच्याशी सहमत... जांभ्या दगडात बांधलेली घर आणि सीमेंट ची घर यातील फरक नजरेला क्षणात जाणवतो... कोकणाचे सीमेंटीकरण होउ नये हीच एक इछा आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरी मम्मी नु पसंद नहियो तू... ;) :- SUNANDA SHARMA | SuKh E | JAANI |