Skip to main content

बौंड्रीपार जाताना – डेस्टिनेशन पुणे

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 24/10/2017 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक पाठ दुखू लागणं, पोट दुखू लागणं, डोकं जड वाटणं.. झालंच तर बॅगमध्ये आपलं सामान मावणारच नाहीये इथपासून ते अलार्म बिघडलाय बहुतेक, जागच कशी येणार असली कैच्याकै कारणं डोक्यात उगवू लागणं.. आणि अधून मधून गाण्यातल्या धृवपदासारखं “जाऊ दे रद्दच करू” हे वाटत राहणं....... एखादा अत्रंगी प्रकार करण्याच्या आदल्या रात्री होणारे हे असे सगळे प्रकार आता माझे मला सवयीचे झाले आहेत. त्यामुळे यावेळी हे सगळं एन्जॉय करतच मी माझी सॅक भरून घेतली, सकाळचा अलार्म ते नाश्ता या दोन टोकात करायच्या सगळ्या गोष्टींची सोय आणि पूर्वतयारी केली, आणि तय्यार झाले एका नव्या उद्योगासाठी! झालं असं की या वर्षीच्या पावसाळ्यात एक मस्त रोड ट्रीप पार पडली आणि “असं आपलं आपल्याला फिरता आलं पाहिजे” हे डोक्यात आलं. चारचाकी चालवायला मला तितकंसं आवडत नाही, त्यात फारसं थ्रील नाही, आणि माझ्याकडे बाईक नाही. त्यामुळे माझ्याकडे फक्त होंडा अॅक्टिवाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मुंबईमध्ये इथे ठाण्यापासून तिथे पार फोर्टपर्यंत गाडी अनेको वर्षं पळवलेली असल्याने आणि तिच्यावर बागडणं हा माझा पार थेरपी लेव्हलचा नितांत आवडता प्रकार असल्याने तेही चाललं असतं. पण लॉंग ट्रीपसाठी बाईकशी तुलना केली तर अॅक्टिवाचे लहान टायर्स, एका बाजूला असलेलं इंजिन, एकुणातच छोटा जीव.. असं सगळं असताना त्या गाडीवर कितीसं फिरता येणार असं वाटलं आणि माझा रोड ट्रीपचा विचार आला तसा कोपऱ्यात गेला. हे सगळं सुरू होतं सप्टेंबर मध्ये. आणि एक दिवस फेसबुकवर एका पोस्टमध्ये ‘निशा राव’, ‘होंडा अॅक्टिवा’ आणि काश्मिर ते कन्याकुमारी’ हे सगळे शब्द सलग वाचायला मिळाले. मी ती पोस्ट वाचत असताना तोंडाचा आ वासणे, डोळे विस्फारणे, खुर्चीतून तीनताड उडणे या सगळ्याचा डेमो अवतीभवती असलेल्या लोकांना मिळाला असणार हे नक्की!! ते जे काही तपशील होते, ते इथे वाचता येतीलच. पुण्याच्या या मुलीबद्दल वाचल्यावर आधी तिची मुलाखत घ्यायचाच विचार डोक्यात आला. पण मग तो रद्द केला, कारणं वेगवेगळी होती. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे... नुसती मुलाखतच काय घ्यायची.. हे!! एवढं अफाट काहीतरी केलेल्या मुलीला “आता कसं वाटतंय” छाप प्रश्न विचारणं साफच नामंजूर होतं मला. पण तरी तिला भेटावंसंही वाटत होतं. वेगळं काहीतरी करायला हवं... पण काय? केदार ओकने त्या पोस्टमध्ये अखेरीस म्हटलं होतंच की - खरंच, तुम्ही ह्याला आवड म्हणा, क्रेझ म्हणा, ध्यास, पॅशन, वेड, किडा, भुंगा - काय वाट्टेल ते म्हणा. पण बॉस, ह्यातलं काहीतरी, मग ते कशाच्याही बाबतीतलं असूदे; आपल्या गाठीशी हवं म्हणजे हवंच. हे किडे प्रत्येकाला चावले पाहिजेत. मग म्हटलं लहर आलीच आहे तर कहर करूयाच - किडा मला आधीच चावलाय.. तो पक्का नीटच चावून घ्यावा आता. एकटीनं भटकायला जायचं, तेही आपल्या अॅक्टिवावरूनच. अशा तऱ्हेने त्या दिवशी माझी स्वतःची पहिली सोलो रोड ट्रीप मला चावली! पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपसाठी रूट ठरवताना दोनच पर्याय होते – कोकण किंवा पुणे. आधीची रोड ट्रीप कोकणातलीच होती म्हणून आणि पुणं तसं माहितीचं, सवयीचं म्हणून. पैकी पुणे नक्की केलं, दिवाळीनंतर तिथे करियर कौन्सिलिंगच्या नेहमीच्या कामासाठी खेप करायची होतीच हे एक कारण आणि निशा पुण्यात असते, तिला भेटता येईल हेही. दिवस ठरला २२ ऑक्टोबरचा. मग तिच्याच त्या पोस्टच्या मदतीने घरी सुतोवाच करून टाकलं. मग हे सगळं डिस्कस करायला मुंबई-पुणे ये जा करणाऱ्या मित्रांना विचारायला सुरुवात केली. खरं सांगते – जेवढ्या जणांना विचारलं त्या सगळ्यांनी “वेडी आहेस का?” हा प्रश्न इतक्यांदा आणि असा काही एकमताने विचारला; की अजून काही वेळा ऐकलं असतं तर मी वेडीच आहे अशी माझीच खात्री पटली असती कदाचित. अगदी नेमाने सोलो ट्रीप करणाऱ्या मित्राचाही याला अपवाद नव्हता. अर्थात अशा उत्तरांनी माझा प्लान जास्तच पक्का केला हेही खरं. रिस्की आहे, अॅक्टिवावर नाही जमणार – एक ना दोन... धड काही उत्तरं मिळेनात त्यामुळे निघायच्या आदल्या संध्याकाळपर्यंत काहीही नीट ठरलं नव्हतं... पुण्यालाच तर जायचंय म्हणून असेल पण मी फार चिंतेत नव्हते. काही फिरस्त्या लोकांना जवळून ओळखत असल्याने आणि स्वतःही लॉंग ट्रिप्स करत असल्याने प्रवासाची तयारी हा भाग नवा नव्हता, वस्तूंच्या याद्या तयार असतातच. फक्त यावेळी दुचाकीवरून एकटीनेच जायचं असल्याने मोजकं, लागेल तेच सामान हा क्रायटेरिया होता, आणि जास्तीचं असं फक्त टूलकीट असणार होतं – जे मला वापरता येत नाही... :( बाईकच्या तुलनेत अॅक्टिवाचा फूटबोर्ड आणि डिकी ही एक सोयीची गोष्ट असते. खांदे मोकळे राहतात आणि सामान नजरेसमोर राहतं. घरून निघाल्यापासून पोचायला फार तर पाच तास लागतील हे माहीत असल्याने फार काटेकोर तयारीही करायची गरज नव्हती. आता आली गाडीची आणि माझी स्वतःची सर्विसिंग – पैकी गाडीचं काम सोपं होतं, ते सप्टेंबर अखेरीस करून घेतलं. पण मी म्हणजे शरीरात किती सांधे असतात हे त्यांच्या दुखत असण्यावरून अचूक सांगू शकेन असं मॉडेल आहे, शिवाय खांदे आणि गुडघे आपटून, मोडून घेणे हे माझं जन्मसिद्ध कर्तव्य असल्यासारखं तेही मी पार पाडत असते. कशाकशाचं सर्विसिंग करणार ना? त्यामुळे तो विचारच न करता आपल्याला पाच, लागलेच तर सहा तास गाडी चालवायचीच आहे एवढं स्वतःला बजावून मेंटल सर्विसिंग करून टाकलं.. संपला विषय! दुसरीकडे बाईकिंगला वाहिलेल्या साईट्सवरून माहिती गोळा करणं सुरू होतंच. एका साईटवर आयता रोडमॅपच हाती लागला. मी “फ्रॉम व्हीनस” जमातीची असूनही मॅप वाचता येण्यात कैच अडचण येत नाही मला. शिवाय गुगल मॅप वापरण्याचा दिल्ली, बंगळूर, गुजराथ अशा ठिकाणांचा यशस्वी अनुभव असल्याने हे तर सोपंच होतं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला न लागता जुन्या रस्त्याला जाण्यासाठीचा एक्झिटच काय तो महत्वाचा होता, तो डोक्यात बसवला – कारण दुचाकी चालवत असताना मोबाईलचा उपयोग शून्य, ऐनवेळी गाडी बाजूला घ्या, थांबा हे मला नको होतं. त्यासाठी वाटेवरच्या मोठमोठ्या लँडमार्क्सची नावंही पाहून ठेवली. पुण्यात पिंपरीचिंचवडच्या दिशेने शिरायचं असं त्या रोडमॅपवरून दिसत होतंच. निघायच्या आठवडाभर आधी नेमकं स्पीडोमीटर बंद पडलाय असं लक्षात आलं, शिवाय अगदी बारीक असा खुळखुळ्यासारखा आवाज यायला लागला. परत गाडी देऊन आले.... इथे मात्र – जाऊ दे, कशाला, उगाच उद्योग कोणी सांगितलेत.. असे संवाद असलेला आणि कोणती तरी केबल तुटलीय, नाहीतर गाडी पंक्चर झालीय, आपण ती ढकलत नेतोय, वगैरे सीन असलेला सिनेमा डोक्यात सुरू झाला. यावर सोपा उपाय असतो तो केला – चॅनल बदलणे ;) त्यापुढचा अजून घोळ म्हणजे मी पुण्यात जिथे मुक्काम करणार होते ती मंडळी दिवाळीसाठी बाहेर गेली होती. ती काही कारणाने रविवार सकाळ ऐवजी संध्याकाळी परत येणार होती. मी दुपारी पुण्यात पोचणार होते. त्यामुळे आदल्या चार दिवसात जास्तीच्या चार तासांची सोय करणं भाग पडलं. मग चक्क त्यांच्या घराजवळचा सिनेमा हॉल मुक्रर केला.. भले सिनेमा पाहू, नाहीतर चक्क झोप काढू; पण काय वाटेल तरी हा अनुभव घ्यायचाच आहे हे इतकं पक्कं केलं होतं की सगळे शंकेखोर मुद्दे, अडथळे ऑप्शनलाच टाकत गेले. शनिवारी दुपारनंतर फायनल तयारीला लागले. सामान भरलं. फार लवकर नाही आणि फार उशिरा नाही असं निघायचं ठरवलं होतं. रात्री नऊनंतर आठवलं, टाकी फुल केलेली नाही. मग तेवढ्यासाठी बाहेर पडायचा कंटाळा केला, आणि आवरून दहालाच झोपायला गेले. तर उत्साह आणि टेन्शन या जालीम कॉम्बिनेशनमुळे साडेअकरा वाजले तरी झोप येईना. शेवटी एकदाची झोप लागली केव्हातरी. सुरूवात सुरूवात सुरूवात हे आपलं उगाच पद्धत है म्हणून ;) ठरवल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे आवरून ठरवल्या वेळेला – ८.१५ ला घराबाहेर पडले. पेट्रोल टाकायला गेले तर “नेहमीचा” पंप बंद होता, मग दुसरीकडे जाऊन सोपस्कार पूर्ण केले – मात्र प्लानपेक्षा हा जास्तीचा वेळ लागूनही मी नऊ वाजेपर्यंत सायन पनवेल हायवेला लागले. तिथून सरळसोट पनवेलच्या मॅकडोनाल्डस् पर्यंत जायचं होतं. हे तसं विस्तारित मुंबईच असल्याने कोणतेही नयनरम्य दृश्यांचे अडथळे न येता गाडी सुसाट पळवली. नऊ वीसला मी चक्क एक्प्रेस वे च्या एक्झिटच्या जवळ पोचले होते. तिथे एक सरकारमान्य ब्रेक घेतला. मिनीब्रेक मिनीब्रेक मग एक्प्रेसवेच्या “दुचाकींना प्रवेशबंदी”च्या पाटीला टाटा करत फ्लाय ओव्हर खालून उजवी घेतली. शेडुंगचा एक्स्प्रेसवे साठीचा एक्झिट मागे पडला, मजल दरमजल करत “खोपोली – २७” दिसलं, मुंबई मागे राहिलं हे एकदम जाणवलं आणि मग सकाळपासून पळवत आणलेली गाडीही आपोआपच रमत गमत चालवायला लागले. तो रस्ता एकदम मस्त झाडांच्या हिरव्यागार कमानींचा, जेमतेम वर्दळ असलेला असा आहे. त्यामुळे इथे काही ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडीचेही काही सेल्फी काढले. सेल्फी Selfie ticha आमचे सेल्फी नेहमी पुण्याची वाट ही गारेगार शिवनेरीतून पाहत असल्यामुळे आजची मजा वेगळीच होती. एका पॅचला तर मी आणि माझी गाडी फक्त दोघीच बराच वेळ पळत होतो, बाकी रस्ता पूर्ण रिकामा.... या निवांत रस्त्यावर मी अर्ध्या तासाहून जास्त वेळ घालवला असेल. खोपोलीतून रस्ता गावातून जाणार की बाहेरूनच हे माहीत नव्हतं. तो जरासा गावातून जात बाहेर पडला आणि मग सुरू झाला घाट रस्ता. इथल्या वळणांवर मागच्या पुढच्या गाड्यांचे वेग बघून जागा देत देत दुचाकी चालवण्याची माझी पहिलीच वेळ.... नाही म्हटलं तरी जरा धडधडत होतंच. मग मुंबईचा बम्पर टू बम्पर ट्राफिक डोळ्यापुढे आणला आणि तिथं जमतंय मग हे जमेलच म्हणत घाट चढत गेले. अशा प्रवासाची एक मजा असते, नशा असते.. तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या सहवासात असता.. मनाला आलं तर स्वतःशी गप्पा माराव्या, नाहीतर आजूबाजूला पाहत गाडीची लय पकडावी.. काही मस्त संदर्भ आठवतात, कविता, गाणी आठवतात, ती एन्जॉय करावी.. आपलीआपलीच मैफल मस्त जमत जाते. नुकताच मी भारताच्या भूरचनेवर शंकराच्या संदर्भाने लिहिलेला ‘मौज’ मधला लेख वाचला होता, अश्विन पुंडलिकांनी त्यात सह्याद्रीचे खूप छान उल्लेख केले आहेत. रस्त्याच्या पलीकडे नजर गेली की त्यातली अप्रतिम वर्णनं जणू चित्रमय होत होती. लेखातला लाखो वर्षांपूर्वी जन्माला आलेला रौद्र सह्याद्री मनात होता आणि आज आता माणसाळलेला सह्याद्री नजरेसमोर होता. तो सगळा लेखच मी या टप्प्यात “पाहिला” असेन.. हळूहळू रिसोर्ट्सच्या पाट्या दिसायला लागल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढत राहिली आणि मी लोणावळ्यात प्रवेश केला. इथे तर व्यवस्थित ट्रॅफिकच लागला. इथून बाहेर पडताना दोन तीन ठिकाणी एक्स्प्रेस वे बाजूने किंवा वरून जातो, मुंबई पासिंगच्या गाड्या काढून सकुसप फिरायला बाहेर पडलेले, सेल्फी काढणारे, उत्साही वाटून घेणारे तुंदिलतनु लोक दिसत राहतात. इथून अगदी जराशा पट्ट्यात एक्स्प्रेस वेवरून जावं लागतं. राजमाची पॉईंटच्या अलीकडे ही कृष्णसुंदरी रस्त्याकडेला उभी होती. अतिशय आवडती गाडी असल्याने त्या डेंजर वळणावरही थांबून फोटो घेतलाच. कृष्णसुंदरी कृष्णसुंदरी थोडं पुढे माझ्या “डर के आगे जीत है” या स्टोरीच्या पहिल्या एपिसोडचा नायक ड्युक्स नोज नजरेला पडला, त्याला हात करून पुढे निघाले. (तो एपिसोड पुन्हा कधीतरी.) लोणावळा, खंडाळा मागे पडलं की पुढे तसा सपाटीचाच रस्ता आहे. इथं मग मी एका कानात हेडफोन खुपसले आणि गाणी ऐकत ऐकत रस्ता संपवला. आतापर्यंत नसलेलं ऊन आता जरा जाणवायला लागलं होतं. सोबतच्या गाड्यांवर आता लेंगे टोप्या घातलेले बाप्ये, एका बाईकवरून चाललेले तिघंचौघं स्वार दिसायला लागले – आलं, पुनवडी जवळ आलं! तेवढ्यात देहूची पाटी दिसली. देहू म्हटलं की आर्मीचं कँटॉनमेंट डोक्यात येतंच, पण मध्येच तुकारामाबावासुद्धा एका कमानीवर बसलेले दिसले आणि मला स्वतःचंच हसायला आलं... आर्मीच्याही आधी ते आठवायला हवे होते, देहू आधी त्यांचं नाही का! कँटॉनमेंटच्या आसपासचा २-४ किमी रस्ता अगदीच वाईट आहे. तिथं गाडी स्लो ठेवत आणि पाट्यांवरही लक्ष ठेवत पुढे आले. चिंचवडपाशी विनोद झाला.. चालत्या गाडीवरूनच शेजारच्या एका बाईक स्वाराला विचारलं, पुण्यात अभिरुचीला जायचंय, हाच रस्ता जात राहिल ना? तो फार धक्का लागल्यासारखा चेहरा करून म्हणे – अहो केवढं लांब आहे ते इथून, कस्काय जाणार तुम्ही? मनात आलं, फार लांब?? मग काय गाडी इथंच ठेवा नि बसने जा म्हणणार की काय हा..! वाकडेवाडीच्या जवळ एक राईट टर्न घेऊन शिवाजीनगर गाठायचं होतं, तिथे सिग्नलवर बाजूच्याला एकदा विचारलं, तर तेही तसंच.. “इकडून राईट घ्या नाहीतर पुढून घ्या, आपल्याला काय, कुठलातरी राईट घ्यायचाच है”... असल्या मनरंजक सहप्रवाशांसोबत सफर काटत काटत यावेळी मी माझ्या अॅक्टिवासोबत "निशा रावच्या पुण्यात" प्रवेश करती झाले. तिथून मग म्हात्रे पूल का लकडी पूल, हा राईट की तो लेफ्ट, येणारा सिग्नल की त्यानंतरचा अशा आट्यापाट्या खेळत फायनली मुक्काम गाठला तेव्हा घड्याळात दुपारचे पावणेदोन वाजले होते! आणि युरेक्क्का असं ओरडत मी माझ्या मनातलं पुढचं डेस्टिनेशन ठरवलंही होतं..! (सुमारे दीडशे किलोमीटरचं हे अंतर एकटीने दुचाकीवर पार पाडण्यात मी फार काही विशेष केलंय असं नक्कीच नाही... पण तरीही हे मुद्दाम इथे लिहावंसं वाटलं. साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो!! पण त्याऐवजी त्या न करण्यासाठी आपण कितीतरी कारणं देत असतो, कारणांनाच कायम चिकटून राहतो. या बाउंड्रया आपणच स्वतःला घालून घेतल्याने दुसऱ्याने केलेल्या अचाट गोष्टींवर तोंडात बोट घालणं इतकंच होत राहतं. खरंतर ते अचाट काहीतरी प्रत्येकजण करू शकतो – प्रश्न फक्त इच्छेचा असतो. हे स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास दिसतं. माझ्या अनेक मैत्रिणींना दुचाकी न चालवण्यासाठी “भीती वाटते, “हे” नको म्हणतात” अशी तीच ती निमित्तं पुढे करताना मी नेहमीच ऐकत असते. आणि बरेचसे “हे” सुद्धा आपापल्या बायकांना बाईका चालवायला चक्क नकार (!) वगैरे देत असतात. पण दुचाकी चालवण्यात केवढीतरी सोय आहे आणि त्यापुढे जाऊन असलं काहीतरी करण्यात अचिव्हमेंटचा आनंद तर अपार आहे! माझ्या बाबतीत निशामुळे मला तो मिळाला. माझ्या या लेखातून दहातल्या चौघींना जरी गाड्या चालवायचा हा किडा चावला, तरी माझा (लेखाचा) खटाटोप सफल झाला असं मला वाटेल.)

वाचने 39074
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

वा! मस्त भटकंति आणि अजयाताईंचा व्रूतांत पण छान ! आता मला पण अ‍ॅक्टीवा बाहेर काढावी असं वाटायला लागलय...

In reply to by स्वाती दिनेश

निशाचेही खूप कौतुक.. आणि अभिनंदन! अजया, हे इथे सांगितल्याबद्दल धन्यु. स्वाती

माझ्या आणि निशाच्या राईडमागचा उद्देश आणि लागू पडलेला अनुभव वेगवेगळा आहे. वर अजयाने निशाबद्दल, आणि रेकाॅर्डबद्दल लिहिलं आहेच. 60-80 हा वेग नाॅर्मल कंडिशनमध्ये अॅक्टिव्हाला धोकादायक नाही, आणि बाकी सुरक्षिततेची काळजी अर्थातच तिने घेतली होती (हेल्मेट, स्पेअर पार्टस् वगैरे तपशील..), तिचा पुणे ते लडाख हा प्रवास आधीही झालेला असल्याने प्रवासाची मजा हा भाग या मोहिमेचा नव्हता. हा प्रवास मुलीने (1) अॅक्टिव्हावरून (2) ठराविक वेळात (3) पूर्ण करणं हे तिचं लक्ष्य होतं. (..हे वर उल्लेखलं असतानाही अॅक्टिव्हा ऎवजी बाइक वापरा हे म्हणजे सगळं रामायण ऎकल्यावर रामाची सीता कोण हे विचारल्यासारखं वाटलं - कृहघ्या हो सुबोध खरे. बाईकने हेच अंतर 61 तासात, आणि अरुणाचल ते कच्छ 66 तासात पूर्ण केल्याचं रेकाॅर्ड आहेच, अजूनही असतील) या प्रवासात सलग अमूक तास ड्रायव्हिंग करू शकणं, वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरून आणि हवामानातून गाडी चालवू शकणं - त्यात - लेहचे बेभरवशी, वाॅटर क्राॅसिंगसहितचे विरळ हवामानातले रस्ते, मक्खन असलेला यमुना एक्स्प्रेस, ते साऊथचे धोधो पावसातले पुढची गाडीही दिसू न देणारे रस्ते, अगदी साऊथचे गाडी तिरपी करून टाकणारे सोसाट्याच्या वा-यातले रस्ते - एवढी रेंज होती - असा बराच कस लागत गेला. मला असं वाटतं.. की "हे सगळं मी करू शकतेय/शकतोय" हे जे फीलिंग आहे, ते आणि रमतगमत प्रवास करताना येणारं जे फीलिंग आहे ते, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्याच राहू द्याव्या. शिवाय आता हेही वाटतंय.. की खरंच निशाची तपशीलवार मुलाखत केली तर हे सगळं कुतूहल शमू शकेल!

In reply to by इनिगोय

60-80 हा वेग नाॅर्मल कंडिशनमध्ये अॅक्टिव्हाला धोकादायक नाही, ऍक्टिव्हा ला साठ वेग खूप जास्त आहे आणि ती ८० वेगाने जाईल का हि शंकाच आहे. ऍक्सिलरेटर पिळून ठेवला तर जाईल. पण या वेगाने जाताना मध्ये एखादा दगड किंवा कुत्रा किंवा खड्डा आला किंवा एखाद्या वळणावर वाळू पडलेली असेल तर गाडी नक्कीच घसरेल आणि अशा स्थितीत फक्त हेल्मेट हे पुरेसे सुरक्षित नाही. आपल्याला पूर्ण रायडींग गियर असण्याची आवश्यकता आहे. गुढघे आणि कोपरावर भर येऊन अस्थिभंग होणे किंवा डोके आपटून मेंदुत रक्तस्राव होणे इ गोष्ट सहज होतात. आपण तासन तास जर गाडीच्या जास्तीत जास्त वेगाने चालवता तेंव्हा आपली एकाग्रता टिकवणे शक्य होत नाही आणि एका विशिष्ट दुर्दैवी वेळेस एकाग्रता भंग झाली असताना अपघात होतो. जे चालक लांबच्या सहली करतात त्यांना हा "थोडक्यात वाचलो" हा अनुभव नवीन नाही गाडी बंद पडली तर ट्रक मध्ये टाकून आणता येईल.या पण अपघात झाला तर फार कठीण होते. माझ्या कडे आजमितीला ऍक्टिव्हा सीबीएस आहे. होंडा युनिकोर्न आहे आणि आता बजाज डॉमिनार आहे४०० सी सी ३४ BHP. डॉमिनारचा टायर साईझ ऍक्टिव्हाच्या दीडपट आहे शिवाय त्याला पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स आहेत आणि ABS(अँटी लॉक ब्रेक सिस्टीम) पण आहे. ९० वरून ० वेगाने आल्यावरही गाडी अजिबात घसरत नाही. असे असूनही ८० च्या वेगाने सतत तासन तास चालवणे हे सुरक्षित नाही. मग ऍक्टिव्हा तर नाहीच नाही. "हे सगळं मी करू शकतेय/शकतोय" हे जे फीलिंग आहे. हे इतर बरेच लोक करून पुढे गेले आहेत. निशा ताईंना हे कौतुक मिळते आहे ते स्त्री म्हणून मिळते आहे असे लिहायचे नव्हते तरी खेदाने लिहावे लागत आहे. याचे कारण ऍक्टिव्हा चालवायला सोपी आहे म्हणून हा लेख वाचून कोणी दुसरी मुलगी अनाठायी धाडस करू नये असेच माझे मत आहे. क्ष किरण तज्ज्ञ म्हणून मी असंख्य दुचाकीचे अपघात पाहिले आहेत. आणि ते का होतात आणि कसे होतात याची बरीच कारण मीमांसा आणि उहापोहा आमच्या वैद्यकीय जर्नल मध्ये वाचायला मिळतात. एवढे अवांतर लिहिण्याचे कारण-- सुरक्षितता वाऱ्यावर सोडून कोणतेही धाडस करू नये एवढेच मी म्हणेन. ऍक्टिव्हा ऐवजी बाईक वापरा हा सल्ला एवढेच एक वाक्य म्हणून घेऊ नका. जास्त मोठ्या इंजिन क्षमतेची आणि सुरक्षित उपकरणे असलेली दुचाकी विकत घ्या म्हणजे ऍक्सिलरेटर पिळून असुरक्षित रित्या चालवावी लागणार नाही असा अर्थ आहे. बाकी जो तो काय करावे ते करण्याला मुखत्यार आहेच. कृपया हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये. (माझा प्रतिसाद निशा ताईंना दाखवला तरी चालेल.)

In reply to by सुबोध खरे

बातमी वरील बातमीमधे एका प्रथितयश बाईकर्सच्या आपघाताची माहिती आहे. संपूर्ण रायडीन्ग गियर असताना बाइक स्किड होउन अंर्तगत रक्त्स्त्रावामुळे मृत्यू झाला. ब्रेकींग डिस्टन्स : तुमच्या बाइकचा ब्रेकींग डिस्टन्स ही सर्व बाईकर्स नी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ८० च्या स्पीडमधे कुत्रा किंवा माणूस अचानक पुढे आला किंवा समोरच्या गाडीने ब्रेक मारले. अचानक खड्डा आला तर आपली बाईक स्किड ना होता किती अंतरावर थांबते हे महिती पाहिजे. ८० च्या स्पीड मधे डोमिनार सहज जागीच स्किड ना होता थांबते पण अ‍ॅक्टीवा घसरते सो तो वेग सेफ नाही. त्याचप्रमाणे बॅलन्स , टायर्स मधे सुधा अ‍ॅ़तीवा टूर बाइकस च्य तुलनेत सेफ नाही.

प्रत्येकाचा त्या त्या राईडचा उद्देश आणि अनुभव वेगळा असतो तसेच राईडकडे पाहण्याचा दृष्टीकोनही* वेगळा असतो. हे सगळे का करायचे..?आणि असे करण्यापेक्षा तसे केले असते तर चालले असते की..! हे सनातन मुद्दे आहेत. जितक्या असतील तितक्या बाजू ती ती भूमीका मांडणार्‍याच्या दृष्टीने बरोबर असतात. त्यामुळे कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर हे न ठरवता निव्वळ निशाने जे साध्य केले आहे त्यावर एक फर्मास मुलाखत वाचायला आवडेल. इतके अंतर रोजच्या रोज कापताना काय काय काळजी घेतली..? सलग १८ - १९ तास गाडी चालवून खांदे आणि मनगटाच्या ठरावीक स्नायुंना विलक्षण रग लागते त्या अंगदुखीचे काय केले..? वेळेचे आणि पाण्याचे शेड्युल कसे मॅनेज केले..? झोप आणि दमणूक कशी लांब ठेवली..? हे सगळे नक्की वाचण्यासारखे असेल कारण ३ दिवस मिळून १३ तास झोपणे आणि अडीच हजार किमी अंतर कापणे ही अचाट कामगिरी आहे. *मी वर कपिलमुनीला सहमती दर्शवली आहे, माझ्या मते आदर्श राईड तशी असावी. तशी राईड कोणी करत नसेल तर त्याला चुकीचे म्हणण्याचा मला अधिकार नाही याची जाणीव आहे. ** तसेच हे गवि, डॉ खरे आणि कपिलमुनीसारखे लोकांचे मुद्दे आहेत म्हणून मुलाखतीचा आग्रह... "वडीलांच्या बुलेटवर देशभर फिरलो" असल्या बढाया किंवा कंजुसकाका छाप अनावश्यक तुलना असेल तर मी ही फाट्यावरच मारले असते.

:) बर्याच दिवसांनी मिपाश्टाइल चर्चा वाचली. मजा आली ! प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद हो गविकाका ;) नाहीतर पुढचे वाचायला नसते मिळाले!! निशाची सविस्तर मुलाखत जरुर घेऊ.

इनिगोय, पहिल्याप्रथम तुमचं अभिनंदन. केवळ एक अडसर असतो. तेव्हढा दूर झाला की आकाश मोकळं झालंच म्हणून समजा. निशा राव यांची मुलाखत घ्याच म्हणतो मी. वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै. जाताजाता : वरील चित्रात एमेच-०२ ला खेटून आहेत त्या तुम्ही आणि एमेच-१२ च्या जवळ आहेत त्या निशा राव. हा अंदाज बरोबर आहे का?

जियो. खूप खूप आवडली तुझी सफर. काॅलेजात असताना सायकल वरंन लांब लांब जायचे मी त्यांची आठवण आली. तुझा लेख वाचून उत्साह वाढला आहे. येणार्या थंडीच्या मोसमात एक ट्रिप तो बनती है.

सुमारे दीडशे किलोमीटरचं हे अंतर एकटीने दुचाकीवर पार पाडण्यात मी फार काही विशेष केलंय असं नक्कीच नाही... पण तरीही हे मुद्दाम इथे लिहावंसं वाटलं. साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो!! पण त्याऐवजी त्या न करण्यासाठी आपण कितीतरी कारणं देत असतो, कारणांनाच कायम चिकटून राहतो. या बाउंड्रया आपणच स्वतःला घालून घेतल्याने दुसऱ्याने केलेल्या अचाट गोष्टींवर तोंडात बोट घालणं इतकंच होत राहतं. खरंतर ते अचाट काहीतरी प्रत्येकजण करू शकतो – प्रश्न फक्त इच्छेचा असतो.
इन्स्पायरिंग! Sandy

नमस्कार... पुण्यात शेवटचे दोन तीन दिवस पुण्यातल्या पार अनोळखी वाटा धुंडाळण्यात गेल्याने फारसा वेळ मिळाला नाही. आणि उरलेल्या वेळात नेटवर्क चा मिस्टर इंडिया होत राहिल्याने लॉगिन केलं नाही. वर आलेले प्रश्न निशाकडे पाठवले आहेत, तिची उत्तरं येतील तेव्हा इथे पोस्ट करेनच. सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.. बाकी २९ तारखेला (परवा) असाच परतीचा प्रवास करून मुंबई गाठली आहे. एकूणच या एका आठवड्याच्या आगळ्यावेगळ्या ब्रेक ने दोन तीन वर्षांचा शीण पार घालवला. येताजाता केलेला प्रवास, दिवसाला एक पुस्तक या गतीने केलेलं वाचन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "मला जसं पाहायचं होतं तसं" पाहता आलेलं पुणं, ... या सगळ्यामुळे तुडुंब खुश होऊन परत कामाला लागले आहे.

मला पाहायचं होतं त्या पुण्याची काही स्मरणचित्रं - भाऊ रंगारींचा वाडा. हा आवर्जून पहा असं सांगण्यात आलं होतं, थोडी शोधाशोध करून सापडला आणि तो आतून पाहताही आला. ट्रस्टींपैकी एकांची भेट झाली आणि त्यांनी तिथे असलेली शस्त्रास्त्रं, गुप्त जागा, भुयार इ. दाखवलं, माहितीही दिली. अक्षरशः इतिहासाच्या पुस्तकात फिरून आल्यासारखं वाटलं हा वाडा पाहिल्यावर... Wada मागे कै. भाऊ रंगारी गणपतीची कागदाची मूर्ती घडवतानाचं वाड्यातलं चित्र. ही कागदी मूर्ती उत्सवात ठेवली जाते अजूनही. आणि पुढ्यात त्यांची स्वतःची मोठी मूर्ती. हिची अजून एक लहान प्रतिकृती वाड्यात आहे, जी कागदाची असून भाऊंनी स्वतःच ती घडवलीय अशी माहिती मिळाली. Bhau 1857 चं बंड पुण्यात ज्याच्या समोर सुरू झालं तो हा बंडातला म्हसोबा.. हा शोधूनही सापडला नसता, रंगारी ट्रस्टचे खजिनदार कुसुरकर यांची गाठ पडल्यामुळे सापडला! Mhasoba बादशाही बोर्डिंग!! दु.दा.मधल्या बाकी सगळ्या जागांपैकी समहाऊ हाच एक फोटो बरा आला. badshahi आणि ही अफलातून कॉफी..... पुण्यात चक्क रात्री उशिरा मिळाल्यामुळे जास्तच छान लागली. coffee

In reply to by इनिगोय

बादशाही बोर्डिंगच्या फोटोत सूचनापाट्या न दिसल्याने भडभडून आलं. -पूर्वाश्रमीचा बादशाही अनालिमिटेड आमटीपोळी कुस्करण चाहता गवि

In reply to by गवि

:D पुढच्या ट्रिपमध्ये नक्की. बाकी "...हवा काढण्यात येईल" सारख्या पाट्यांचे फोटो काढण्याची फर्माईश पूर्ण केली आहे.

दुचाकी चालवून केलेल्या पहिल्या मोठ्या प्रवासाबाबतचे अनुभवकथन + प्रकटन आवडले. दहावीत असताना वर्गमित्रांबरोबर शहराबाहेर लुना व सनीसारख्या गाड्यांवर केलेल्या पहिल्या सहलीच्या आठवणी ताज्या झाल्या. A journey of a thousand miles begins with a single step. हे मूळचे चिनी बोधवाक्य इथे लिहून लेखिकेच्या पुढील मोहिमांना शुभेच्छा देतो.

मी सुद्धा मिसेस साठी नवी ऍक्टिवा घेतली होती या दिवाळी ला, सरप्राईस देण्यासाठी डायरेक्ट सासुरवाडी गाठली ऍक्टिवा वर... पिंपरी चिंचवड - पुणे - सातारा - कराड-सांगली-कोल्हापूर- पुणे असा प्रवास केला.. शिवाय टू व्हीलर म्हंटलं की वाटेत येणारी कैक ठिकाणे करता येतात.. हवे तिथं हॉटेलिंग, शॉपिंग इ. .. या आधी बाईक ने प्रवास केला होताच असा बरेचदा ... पण ऍक्टिवा जास्त निवांत अन कम्फर्टेबल वाटली

In reply to by दिपस्तंभ

वा मस्तच,आवडलं. नियमित चालवायचाआग्रह करा त्यांनाही. टू व्हिलर हाताशी असणं ही फार मोठी सोय आहेच.

ओल्ड बॉम्बे पूना रोड वर अजूनही तो जीवघेणा केमिकल्सचा वास येतो का हो रासायनी जवळ? अफलातून ट्रिप केलीत तुम्ही तुमचं खूप कौतूक आणि अभिनंदन